Sunday 1 January 2012

नववर्षाच्या निमित्ताने ..........

लोकपालचे भवितव्य,कसाबच्या शिक्षेची दिशा,2-G स्पेक्ट्रम घोटाळ्याची उकल,शेतकऱ्यांचे प्रश्न आणि अशा अनेक समस्या   अधांतरी  ठेऊनच  २०११ सरले आणि २०१२ सुरु झाले. जुनेच, जुनाट,चावून चावून चोथा झालेले आणि बोथट झालेले प्रश्न आता पुन्हा एकदा नव्याने सोडवण्याचा सरकारी खटाटोप जनसामान्यांना पाहावा लागणार आहे. तोंडावर आलेल्या ५ राज्यांतील निवडणुका आणि टीम अण्णांचे लोकांवरील वाढते वर्चस्व लक्षात घेऊन यूपीए सरकारला नक्कीच काहीतरी ठोस पावले उचलणं भाग पडणार आहे. 
जुन्या वर्षाला निरोप देताना अवघी तरुणाई रस्त्यावर उतरते. सगळी हॉटेल्स,पब्ज हाउसफुल होतात. ३१ डिसेंबरची रात्र तरुणांसाठी आव्हान ठरते. जुन्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाचे स्वागत करताना त्यांना दारूचा आधार घ्यावासा वाटतो. आकाशातले आणि पृथ्वीवरील दारूकाम जोमाने सुरु असते. हायवेवर भन्नाट धावणाऱ्या बाईक्स,गाड्या यांचा सुळसुळाट  असतो. गर्ल फ्रेंड्सना घेऊन लाँग ड्राइव्हला जाण्यासाठी बॉय फ्रेंड्स अतिउत्सुक असतात. अनेक डिस्को-पब्ज मध्ये कर्कश्श संगीताच्या तालावर बेधुंदपणे तरुणाईची पावले थिरकायला लागतात. टी.व्ही.च्या बहुतांश वाहिन्यांवर अतिरटाळ, टुकार कार्यक्रमांची स्पर्धा चालू असते. आजाराने त्रासलेले,गरिबीने गांजलेले, वाढत्या वयाप्रमाणे ताकद आणि उत्साह कमी झालेले असे अनेकजण हा तरुणाईचा जल्लोष असहायतेने पाहत असतात. बॉम्बस्फोट, दंगली, भूकंप, अतिवृष्टी, महागाई, बेरोजगारी, चोऱ्या-दरोडे-खून-आत्महत्त्या,अपघात,मतांचे राजकारण अशी कोणतीही निमित्ते या तरुणाईचा बेबंदपणा कमी करण्यास असमर्थ ठरतात.   
राजकीय,सामाजिक,घरगुती पार्ट्यांना उत येतो. सिगरेटचा धूर आणि मद्याचा दरवळ आसमंतात भरून राहिलेला असतो. फटाक्यांची आतषबाजी होत राहते. माणसांच्या आनंदाप्रीत्यर्थ कोंबड्या-बकरे कापले जातात. पोलिसांना अतिरिक्त ताण पडतो. अनेक मद्यपींना त्यांना महत्प्रयासाने जेरबंद करावे लागते. समुद्रकिनाऱ्यासारखी एकांताची ठिकाणे पिंजून काढावी लागतात. मुलींची छेडछाड करणाऱ्यांवर करडी नजर ठेवावी लागते. भन्नाट गाड्या चालवून पादचाऱ्यांना चिरडू पाहणाऱ्या उन्मत्त तरुणांवर अंकुश ठेवावा लागतो. त्यांना बायको-मुलांसोबत नववर्षाचे स्वागत करण्याची स्वप्ने मनाच्या कडीकुलुपात बंदिस्त करावी लागतात. 

अशा प्रकारे नवीन वर्षाला सुरवात होते. मागील वर्षाचा वृत्तपत्रीय लेखाजोखा मांडला जातो. अडगळीत पडलेले, मृत झालेले प्रश्न काही कालावधीसाठी पुन्हा सचेतन होऊ पाहतात. चोऱ्या-अपघात-खून-आत्महत्त्या या मानव आणि निसर्गनिर्मित घटनांनी वृत्तपत्रातले रकाने वर्षाच्या पहिल्या दिवशी सजतात. कधीही पूर्णत्त्वाला न जाणारे राजकीय,सामाजिक संकल्प नव-वर्षाच्या निमित्ताने सोडले जातात. सार्वजनिक पूजा होतात. हे वर्ष सर्वांना सुखाचं, सम्मृद्धीचं आणि भरभराटीच जावो अशा शुभेच्छांचा वर्षाव होतो. विशिष्ट क्षेत्रातील बहुमूल्य कामगिरीबद्दल सन्माननीय पारितोषके घोषित होतात. राजकीय संदेशांची खैरात होते. 
अनेक वर्षे राजकीय फाईलींमध्ये धूळ खात पडलेले सामाजिक हिताचे प्रश्न निदान आतातरी सोडवले जातील आणि आपलं जगणं बऱ्यापैकी सुकर होईल अशा आशेवर सामान्य माणूस नववर्षात पदार्पण करतो.

No comments:

Post a Comment