Friday 20 September 2013

विचार आणि वास्तव …………


आपण सर्वजण शालेय शिक्षण घेऊन, कॉलेजात जातो, तेथील शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करू लागतो , यथावकाश संसार थाटतो आणि इतरांप्रमाणे एकदाचे मार्गाला लागतो.  या प्रवासात अनेक खड्डे, खाच-खळगे असू शकतात, सगळ्यांचीच वाट सुकर,सोपी नसते. मग अनेक वेळा आपण परिस्थितीला बोल लावतो, चिंतातूर होतो, हतबल होतो, दडपणाखाली वावरू लागतो. समाज हा आपल्याला शत्रू वाटू लागतो. आपल्या आनंदासाठी, सुखासाठी आपण तज्ञांचे सल्ले घेत फिरतो. आपले हित कशात आहे हेच आपल्याला कळेनासे होते. आपल्या या घुसमटीला समोरची व्यक्ती वा परिस्थिती जबाबदार आहे हे आपण मनाशी पक्के ठरवून टाकलेले असते. आपण बाहेर उत्तरे शोधत फिरतो जी केवळ आपल्या आतच आपल्याला सापडू शकतात जी आपल्याशी आयुष्याची नव्याने ओळख करून देऊ पाहत असतात.        
विचार प्रत्येकजण करतच असतो अगदी समजायला लागल्यापासून! फक्त योग्य विचार कसा करावा याचे बाळकडू आपल्याला मिळालेले नसते. माणसाची विचारप्रक्रिया त्याचे व्यक्तिमत्व आणि त्याचे वास्तव घडवत असते. समोरच्या व्यक्तीचे विचार हे आपले विचार असू शकत नाहीत. त्याने आपल्यापर्यंत पोहोचवलेला विचार हा आपल्या आत झिरपू द्यावा अथवा नाही या निवडीचे स्वातंत्र्य प्रत्येकाचे असते. विचार आणि माणसाचे आरोग्य यांचे जवळचे नाते असते. घातक विचार, ऋण अर्थात निगेटिव्ह विचार, नैराश्यजनक विचार  आणि निरुपयोगी विचार यांनी आपल्या शरीरातील उर्जेचा ऱ्हास होत असतो. याउलट धन अथवा चांगले विचार, आशावादी विचार यांनी व्यक्तीच्या शरीरातील उर्जा जास्त प्रमाणात स्रवते.               
दोन माणसे मोबाईलवर जेव्हा एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा ज्या उर्जालहरींमुळे हा संवाद साध्य होतो त्या लहरी कधीच दृष्टीक्षेपात येत नाहीत. त्याचप्रमाणे एक व्यक्ती जेव्हा अमुक एक विचार करते त्यावेळी तिच्या विचारानुसार अशा लहरी अवकाशात प्रक्षेपित होत असतात. गुरुत्वाकर्षण तत्वानुसार ज्या प्रकारची उर्जा वातावरणात सोडली जाते तीच उर्जा परतून त्या व्यक्तीकडे येत असते. माणसाच्या मनातील प्रत्येक विचार हा अनुकूल वा प्रतिकूल अशा उर्जेने भरलेला असतो. तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे निर्देशित केलेला एखादा विचार त्यातील चांगल्या-वाईट उर्जेसकट त्या व्यक्तीकडे पोहोचतो आणि त्याच प्रकारची उर्जा परतून तुमच्याकडे येते.      
एखाद्या माणसाची हत्या करण्याआधी ती हत्या विचारांत झालेली असते. एखादा घातपात घडवण्याआधी तो विचारात झालेला असतो. एखादी लढाई प्रत्यक्ष हरण्याआधी ती विचारांतून हरलेली असते. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी तो आधी मनातील विचारांतून मिळवावा लागतो. दहाव्वीतील आपल्या पाल्याचा रिझल्ट अनेक पालकांनी प्रत्यक्ष परीक्षेआधीच कल्पनेत पाहिलेला असतो. विचारांना योग्य दिशा कशी द्यावी याचे क्लासेस जरी आज उपलब्ध नसले तरी तसे साहित्य मात्र जरूर आहे. अनेक रोगांचे मूळ हे मनात केल्या जाणाऱ्या विचारांत असते या निष्कर्षाप्रत वैद्यकीय क्षेत्रातील अनेक विद्वान आले आहेत.      
घातक अथवा निगेटिव्ह विचारांमुळे शरीरातील काही प्रतिकूल हार्मोन्स स्रवू लागतात ज्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. सतत उदास असणारी माणसे शक्तिपात झाल्यासारखी दिसतात. काही माणसांना सतत काही ना काही तक्रारी करायची सवय असते. मला बरे वाटत नाही, समोरील व्यक्ती माझ्याशी नीट वागत नाही, मला समजून घेत नाही, समाज कुठे चालला आहे, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, तरुण पिढी ऐकेनाशी झाली आहे अशी कोणतीही कारणे पुढे करून ही माणसे रडत असतात, कुढत असतात आणि स्वत:चे विचार सुधारण्याऐवजी  ज्या गोष्टींवर आपले काडीमात्र नियंत्रण नाही अशा गोष्टी बदलायची वाट पाहत बसतात. 
आपण दैव किंवा प्रारब्ध असे जे काही मानतो ते दुसरे-तिसरे काही नसून आपण अवकाशात सोडलेल्या उर्जेचे परतून येणे असते.  जो बाण अवकाशात मारला जातो तोच बाण तीच उर्जा घेऊन जेव्हा आपल्यासमोर येतो त्याला आपण नशीब ही संज्ञा देऊन मोकळे होतो. विचार निवडीचे स्वातंत्र्य आपले असते पण मुळात विचारांची निवड करायची कशी याविषयी आपण अनभिज्ञ असतो. आपल्याकडून अवकाशात सोडल्या जाणाऱ्या अनुकूल विचार लहरी ही आपल्या आनंदाची, सौख्याची नांदी असते. क्रोध, मत्सर, हेवा, असूया, निंदा या लहरी तीच उर्जा परत आपल्यापर्यंत पोहोचवतात याउलट आनंद, प्रशंसा, प्रेम, वात्सल्य,अनुकंपा,सहिष्णुता या लहरी तीच उर्जा परत आपल्याकडे आणतात. आपण घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेतो, संत -महात्म्यांचे आशीर्वाद घेतो तेव्हा त्यांच्यातील आपल्या विषयीचे प्रेम वा सद्भावना लहरींच्या रुपात आपल्यापर्यंत येउन योग्य ती उर्जा आपल्याला देत असतात.          
मनात आलेला वाईट विचार आपल्या दुष्कर्मात भर टाकतो तर सद्विचार सु-कर्मात! अनेक जण म्हणतात, आम्ही काहीच करत नाही, विचार येताच राहतात. पण असे नसते. वाईट विचारांना थोपवण्याची क्षमता आपल्यात नक्कीच असते आणि प्रयत्नपूर्वक चांगले विचार करण्याची क्षमताही आपल्यात असतेच असते. चुकीचे, नसते,भलभलते विचार करून अनारोग्याला किंवा प्रतिकूल परिस्थितीला आमंत्रण द्यायचे की चांगले, सद्विचार मनात रुजवून आपल्या भोवतीचे वातावरण आणि माणसांना आनंदी करायचे हे ज्याचे त्याने ठरवावे!      

Thursday 5 September 2013

शिक्षक दिनाच्या निमित्ताने ………….

मानवी मूल्यांवर आधारित शिक्षण आज दुर्मिळ होत चालले आहे. नवीन नवीन शाळा आणि क्लासेसचे जिथेतिथे नुसते पेव फुटले आहे. भरमसाट फी घ्यायची, चकचकीत शाळेत, एअर कंडीशण्ड वर्गात मुलांना बसवायचे आणि तेच ते चाकोरीतले शिक्षण द्यायचे असा सगळा शिक्षणाचा खेळ चालू आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे बहुतेक शाळा फारसे लक्ष पुरवित नाहीत. शारीरिक विकासाइतकाच मुलांचा भावनिक विकासही महत्वाचा आहे हे आज शिक्षण क्षेत्रातील महत्वाची पदे भूषवणारे लोकही विसरून गेले आहेत. मुलांचे शिक्षण हे घरापासून सुरु होत असल्याने मुलांचे पालक हेच त्यांचे पहिले शिक्षक असतात. पण वेळेच्या अभावापायी म्हणा किंवा इच्छेच्या अभावापायी पण बहुतांश पालक ही आद्य  शिक्षकाची भूमिका निष्ठेने बजावताना दिसत नाहीत. त्यामुळेच की काय शारीरिक आणि भावनिक सक्षमता हरवून बसलेली आणि केवळ पैशालाच परब्रम्ह मानणारी पिढी यापुढे निर्माण होईल की काय अशी शंका मनाला ग्रासू लागली आहे.         
मोकळ्या वातावरणात जाणे, सकाळचा अद्वितीय निसर्ग पाहणे, आजूबाजूच्या परिसरातील झाडा-फुलांशी मायेने बोलणे, सूर्योदय पाहणे, आकाशाचे रंग बदलताना डोळ्यांनी टिपणे, मुक्या प्राण्यांशी ममतेने वागणे, संकटग्रस्तांची  तत्परतेने मदत करणे,  कोणत्याही सामाजिक,आर्थिक स्तरातील माणसाशी शालीनतेने वागणे, त्याच्या व्यवसायाचा यथायोग्य आदर करणे, दैनंदिन व्यवहारातील छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणे, घरी पालकांना सर्व प्रकारची मदत करणे या आणि अशासारख्या सवयी आज आपण मुलांना लावतो आहोत का याचा पालकांनी आणि शिक्षकांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची पाळी आली आहे.           
प्रदूषणावर शाळेत धडा असतो पण हे प्रदूषण टाळण्यासाठी नेमके काय करायला हवे याचे प्रात्यक्षिक मुलांना का दाखवत नाहीत?  रस्त्यावर इथेतिथे कचरा टाकू नये ही वृत्ती अंगी बाणण्यासाठी मुलांना शहराच्या, गावाच्या अस्वच्छ भागाची पाहणी करायला नेउन तेथील वातावरण आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांची गैरसोय दाखवणे गरजेचे नाही का? विजेचा,पाण्याचा वापर नियंत्रित कसा करावा हे शिकवणे महत्वाचे नाही का? वृध्द,आजारी माणसाची शुश्रुषा कशी करावी, प्रथमोपचार कसे करावेत, शासनाने पुरविलेल्या शासकीय सुविधांचा लाभ कशा प्रकारे घ्यावा, मानवी मुल्यांची जपणूक कशी करावी, झाडे कशी लावावीत व त्यांची निगा कशी राखावी अशा कोणत्याही प्रकारचे शिक्षण देण्यास शाळा तसेच पालक अनुत्सुक दिसून येतात.     
आजकाल मुलांच्या शाळेच्या सहलीही पंचतारांकित हॉटेलात उतरतात. एकंदर पॉश शाळा, हॉटेल्स आणि मॉल्स या सो-कॉल्ड उच्चभ्रू वातावरणात मुले वाढतात पण विकसित होत नाहीत. शिक्षकांनी शिकवलेल्या पाठ्यपुस्तकाच्या धड्यातील  उत्तरे पाठ करून परीक्षेत घोकणे याला बुद्धीचा विकास कसे म्हणायचे? भूमितीतील प्रमेये आणि भाषेचे निबंध मुले पाठ करतात केवळ काही मार्कांचे उद्दिष्ट ठेवून! घरी पालकांना वेळ नसल्याने श्लोक वर्ग, संस्कार वर्ग इथे मुलांना बळजबरीने पाठवले जाते,  कुत्र्यांच्या, मांजरींच्या पिल्लांना दगड मार, त्यांच्या शेपट्या ओढ, झाडांची पाने, फुले कुस्करून त्यांचा लगदा कर, दुपारच्या वेळी लोकांच्या घराची डोअरबेल वाजवून पळून जा अशा बाललीलांत बरीचशी मुले रमताना दिसतात, सगळ्यात कळस म्हणजे छंद वर्गात मुलांना ढकलणे! चित्रकला-गाणे-नृत्य याकडे आपल्या मुलाचा कल आहे की नाही हे आजमावण्यासाठी हा आटापिटा केला जातो. हे सगळे सातव्या-आठव्या इयत्तेपर्यंत चालते. नववी आणि दहावीत मूल गेले की हे सगळे छंद वर्ग ताबडतोब मुलाला न विचारताच बंद केले जातात. मग अभ्यास एके अभ्यास. तू अमके टक्के मिळव, तुला महागडी वस्तू मिळेल हे आमिष दाखवले की आपली जबाबदारी संपली या भ्रमात अनेक पालक वावरत असतात. नापास झालेल्या मुलांना घरी-दारी अपमान सहन करावा लागतो. तू धुणी-भांडी कर, तू वडा-पावाची गाडी चालव असे मौलिक सल्ले पालक आणि शिक्षकांकडून मुलांना दिले जातात त्यांच्या हातात असलेल्या एखाद्या कलेची जराही दाखल न घेता!              
आपण माणूस घडवतो आहोत की पैशांचा पाऊस पाडणाऱ्या टाकसाळी बनवतो आहोत, आपण भावना-संवेदनांची कदर करणारी पिढी घडवत आहोत की कोरडेठक्क पाषाण घडवत आहोत, आपण दुसरयाला माणुसकीने वागवणारी पिढी घडवत आहोत की दुसऱ्याला सतत निंदनीय, तिरस्करणीय पद्धतीने अवमानित करणारे, अर्वाच्च्य शब्दांनी संबोधणारे, केवळ काही रकमेसाठी समाजातील कार्यनिष्ठ माणसांचा खून पाडणारे, स्त्री-जातीची अब्रू वेशीवर टांगणारे नर-राक्षस घडवत आहोत, आपण निसर्गाचे, प्राणीमात्रांचे मित्र घडवत आहोत की शत्रू, आपण जीवनातील आव्हाने खंबीरपणे स्वीकारणारी पिढी घडवत आहोत की नैराश्याच्या गर्तेत स्वत:ला झोकून आयुष्य पणाला लावणारी, आत्महत्येस प्रवृत्त होणारी, व्यसनांच्या आहारी जाउन स्वत:ला बरबाद करणारी  पिढी घडवत आहोत का याचा अतिशय गांभीर्याने विचार करण्याची वेळ कधीच येउन ठेपली आहे.        

Wednesday 28 August 2013

मानसिक आरोग्याचे बाळकडू ………….


एखाद्या मुलीवर, स्त्रीवर अत्याचार घडतो आणि मग जळी -स्थळी -काष्ठी -पाषाणी त्या घटनेची मीमांसा होते. मुलांच्या, मुलींच्या स्त्रियांच्या, पुरुषांच्या घोळक्यातून याच चर्चा ऐकू येतात. सरकार, पोलिस, कायदा या सर्व घटकांवर आगपाखड सुरु होते. दिवस अतिशय वाईट आलेले आहेत, बाहेर वावरण्याचीही भीती वाटू लागली आहे, या देशाचे काय होणार आहे कुणास ठाऊक, पुढील पिढीचे भवितव्य कठीण आहे वगैरे वगैरे वाक्ये कानी पडत राहतात. प्रश्न उभे राहतात आणि उत्तरे मात्र दुरान्वयानेही दृष्टीपथात येत नाहीत. मुलीवर,स्त्रीवर अत्याचार झाला की आरोपी शोधा आणि तुरुंगात डांबा, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करा, वांझोट्या चर्चांचे रान उठवा आणि परत अशा एखाद्या घटनेची सतत चिंता वाहत आलेला दिवस ढकला हेच चित्र कमी-जास्त फरकाने सगळीकडे पाहायला मिळते.        
पण या गंभीर प्रश्नाच्या मुळाशी दडलेली आहे मानसिकता. ती बदलायची तर आहे पण नक्की कोणत्या मार्गाने हे समजत नाही.  मुलांच्या-मुलींच्या जडणघडणीसाठी  एक विशिष्ट वय असते. घरात आई-वडील तर शाळेत शिक्षक हे मुलांचे मार्गदर्शक असतात. मुलांची प्रेरणास्थाने असतात. आजूबाजूच्या परिस्थितीचे, समाजाचे आघात मुलांच्या कोवळ्या मनांवर होण्याआधीच  त्यांच्या मानसिक आरोग्याची जपणूक या पालकांनी तसेच शिक्षकांनी करणे अत्यावश्यक आहे. या मुलांची किंवा मुलींची ठराविक वैचारिक बैठक पक्की होण्याआधीच त्यांना निकोप मानसिक आरोग्याचे बाळकडू या आदरस्थानांकडून मिळणे गरजेचे आहे.     
सर्व प्रकारच्या हिंस्त्र, वासना उद्दीपित करणाऱ्या साधनांपासून या मुलांना प्रयत्नपूर्वक दूर ठेवणे नितांत आवश्यक आहे.  या जगात पैशापेक्षाही मानवता अधिक महत्वाची आहे हा सु-विचार मुलांच्या मनावर सातत्याने ठसवला जायला हवा. पर्यावरणाची काळजी, मुक्या प्राण्यांबद्दल जिव्हाळा, वृद्धांबद्दल यथोचित आदर, संकटप्रसंगी दुसरयाच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती, मुलांच्या मनात स्त्री-जातीबद्दल आदर, मुलींच्या मनात समाजात वावरण्याची निर्भयता या गोष्टी शाळेतूनच शिकवल्या जायला हव्यात. ज्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेता येईल अशा थोर व्यक्तींची जीवनचरित्रे  दृक-श्राव्य माध्यमाद्वारे मुलांना दाखवायला हवीत. प्रत्येक मुलाच्या मनात सहिष्णू भाव रुजायला हवा  व त्यासाठी घरी पालकांनी आणि शाळेत शिक्षकांनी आपले सक्रिय योगदान द्यायला हवे.    
पूर्वी मुले गुरूगृही घडत असत. घर आणि समाज यांपासून ही मुले कैक योजने दूर असत. त्यामुळे त्या मुलांना त्यांच्या विचारांपासून विचलित करणारी माध्यमे वा प्रलोभने नसायची. गुरुवर्यांच्या नजरेसमोर ही मुले संस्कारित होत असत. त्यामुळे गुरूचा उत्तम प्रभाव या मुलांवर पडत असे. अशी मुले मग मोठी होऊन समाजात मिसळल्यानंतर एक चांगला मानसिक प्रवाह घेऊन वावरायची. त्यांची वैचारिक बैठक गुरूगृही पक्की झालेली असायची. म्हणजे त्यावेळी समाजविघातक कृत्ये व्हायची नाहीत असे नाही परंतु त्याचे प्रमाण मात्र नगण्य असायचे.       
आज समाजाचे विदारक चित्र आपल्याला दिसते आहे पण ते बदलण्याची गरज किती जणांना मुळापासून वाटते हे महत्वाचे आहे. वडील-मुलगी, काका-पुतणी, मामा-भाची, आजोबा-नात ,भाऊ-बहिण या नात्यांमधील पावित्र्य नष्ट होताना आज दिसते आहे. माणसे हिंस्त्र बनत चालली आहेत. केवळ काही पैशांसाठी समाजातील चांगल्या माणसांना नष्ट करण्याचा घाट घाटला जातो आहे.  कृतिशीलता कमी होऊन शिथिलता वाढली आहे. आज माणसांची यंत्रे घराघरातून टाकसाळीचे काम करत आहेत. मुले पालकांच्या अस्तित्वाला, प्रेमाला वंचित होत चालली आहेत. मुलांवर चांगले संस्कार करायला ना पालकांना वेळ आहे ना शाळेतील गुरुजनांना!  मुले सुख शोधण्याच्या भरात यंत्रांतून मिळणारे बरे-वाईट ज्ञान त्यांच्या मनात भरून घेत आहेत. चांगले काय, वाईट काय याविषयी मार्गदशन करणारे पैशामागे धावत सुटले आहेत. कारण त्यांना त्यांच्या मुलांना अनेक उत्तमोत्तम, उंची साधने खरेदी करून द्यायची आहेत, त्यांना परदेशवारयांना घेऊन जायचे आहे, मुलांना येणारे एकाकीपण, नैराश्य काही यांत्रिक साधनांनी किंवा पर्यटन करायला नेउन घालवायचे आहे. त्यांच्या मूळ गाभ्यावर कोणतेही आवश्यक संस्कार न करता!       
बाहेरील अनावश्यक खाण्याने मुलांचे शारीरिक आरोग्य ढासळते आहे आणि आवश्यक त्या संस्काराअभावी त्यांचे मानसिक आरोग्यही उतरणीला लागले आहे. स्त्रीत्व आणि पौरुष यांविषयीच्या चुकीच्या व्याख्या समाजमनात बिंबल्या आहेत.  या व्याख्या बदलण्याची गरज समाजाला वाटते काय हे तपासून पाहण्याची वेळ आली आहे.  
कलियुगात असेच होणार असे अकलेचे तारे तोडणारे महाभागही भरपूर आहेत. गतानुगतिक समजांनी समाज आज अगतिक, हतबल झाला आहे. पण हे चित्र बदलावयाचे असेल तर जात-धर्म-लिंग-वय-प्रांत या घटकांना बाजूला सारून मुळापासून काही करण्याची गरज भासणार आहे. योगक्रिया, आत्मसंयमन याद्वारे मुलांना लहानपणीच मानसिक दृष्ट्या सशक्त,सक्षम करण्याची गरज आहे. चांगल्या,शुध्द विचारांचे बीज मुलांच्या कोवळ्या, संस्कारक्षम मनात रुजवण्याची गरज आहे.  आहारानुसार विचार बनतो आणि विचाराप्रमाणे आचार बनतो. म्हणूनच सात्विक, सकस आहार आणि उत्तम विचारांचे खतपाणी घालून मुलांचे आचरण सुयोग्य बनवणे हि तुम्हा-आम्हा सर्व समाजघटकांची सामुहिक जबाबदारी आहे. तर आणि तरच  उद्याच्या सुरक्षित समाजाची हमी देता येईल.         

Monday 26 August 2013

अत्याचाऱ्यांचे माजलेले तण आणि मवाळ शासन …………


वर्तमानपत्र आणि टी. व्हीच्या अनेक वाहिन्यांवर हेडलाईन्स या मथळ्याखाली महिलांवरील वेगवेगळ्या अत्याचाराचे किस्से जवळजवळ दररोज झळकत आहेत.  इतक्या पराकोटीच्या उद्वेगजनक घटना राजरोस घडताना शासन आणि कायदयाची अंमलबजावणी करणारे मात्र या विकृत अत्याचारी घटकांना अत्यंत कडक किंवा कठोर शिक्षा सुनावताना दिसत नाहीत किंबहुना त्यांना शिक्षा देण्यातच अक्षम्य दिरंगाई होते आहे ही शरमेची आणि निंदनीय तसेच असमर्थनीय गोष्ट आहे.   
समाजातील या विकृत घटकांबद्दल समस्त जनमानसात एक प्रक्षोभ आहे. वेळोवेळी निदर्शने, मोर्चे काढून त्याचे प्रकटीकरण झाले आहे. मुंबई असो वा दिल्ली, शहर असो वा खेडे एकूणच लहान मुली, महिला यांच्या सुरक्षित विश्वाला केव्हा टाचणी लागेल आणि त्यांची अब्रू वेशीवर कधी टांगली जाईल याचा नेम नाही. मग अशी बीभत्स घटना घडली की लोकक्षोभाला आवरण्यापुरती  आश्वासने द्यायची, त्यांच्या संरक्षणाची पोकळ हमी द्यायची हे धोरण शासनाकडून अव्याहत चालू राहिले आहे.       
दिल्ली इथे घडलेल्या निर्भयाच्या केसची पुढील प्रगती काय आहे हे कोणी सांगू शकेल का? आरोपी नुसते गजाआड होताना दिसतात पण मुळात त्यांना कोणतीही सज्जड, अद्दल घडवणारी शिक्षा मिळताना दुर्दैवाने दिसत नाही. ते चार भितींमध्ये सरकारचे जावई बनून पाहुणचार घेत असतात. हे स्त्रियांच्या शीलावर घाला घालणारे अशिक्षित, बेकार, बेरोजगार तरुण मस्तपैकी फुकाचे उदरभरण करत असतात. सुनावणी, तारीख, वाद-प्रतिवाद असे कोर्ट-कचेऱ्यांत वापरले जाणारे शब्द लोक कधीतरी वाचतात आणि खटला फक्त चालू असल्याची माहिती समजू शकते पण यापलीकडे जाऊन अशा बलात्कारी आरोपींना प्रत्यक्ष जबरदस्त शिक्षा मिळालेली अजूनतरी दृष्टीपथात यायची आहे.    
का शासन या आरोपींना कठोर शिक्षा द्यायला असमर्थ आहे? समाजहिताच्या किंवा स्त्री-हिताच्या दृष्टीने असा एखादा कायदा का संमत होऊ शकत नाही? इतरत्र वावरणाऱ्या आणि संधीचा फायदा घेणाऱ्या या प्रकारच्या विकृत वासनांधांना चाप बसावा असे सरकारला खरेच मनापासून वाटत नाही का? निष्पाप बालिका, तरुण मुली, महिला यांनी आज आपल्यावर अतिप्रसंग तर ओढवणार नाही ना या चिंतेतच सदोदित वावरायचे का? आपल्या तीन-चार महिन्यांच्या अजाण बाळावर घरातून की बाहेरून सैतानी घाला येईल या विचारांतच त्या बाळाच्या आईने तिची शक्ती आणि बुद्धी झिजू द्यायची का?  एखाद्या मुलीच्या, स्त्रीच्या उध्वस्त होणाऱ्या आयुष्याची शासनाच्या लेखी काहीच किंमत नाही का? तिचे विस्कटलेले आयुष्य आणि तिच्या घरच्यांचा समाजापुढे झालेला मानभंग या बाबी आरोपींना कडक शिक्षा सुनावण्यास अपुऱ्या आहेत का?   
मुंबईतील केस बाबतही हेच चालले आहे.  कधी ते 'fast trak'  कोर्ट स्थापन होणार आणि कधी या मुलीला न्याय मिळणार ? त्यात पुन्हा कुणी म्हणतय फाशी द्या, कुणी दयेचा आधार घेऊन म्हणतय फाशी नको. अरे पण मग या आरोपींना कठोर शिक्षा केली नाही तर इतर समाज कंटकांना कसा कायद्याचा धाक बसणार? परत परत घरी-दारी असे अत्याचार होत राहणार आणि आरोपी फक्त गजाआड होत राहणार, तेही सापडले तर ! या प्रश्नांवर संसदेत पुनश्च गदारोळ होत राहणार, रस्त्यावर निषेध मोर्चे काढले जाणार आणि प्रकरण काहीसे जुने झाले की त्यातील हवा निघून जाणार. शासन चौकशी समित्या नेमणार, कडक कारवाईची हमी देत राहणार  आणि या आरोपींना सज्जड शिक्षा देत इतर भविष्यातील आरोपींना वचक बसवणारा कायदा जन्माला येण्याआधीच  माणुसकीचे आचके देत गतप्राण होणार. निष्फळ, कोणत्याही एका निर्णयाप्रत न येणाऱ्या राजकीय चर्चा रंगणार. शासन आणि कायदा यांचे हेच चित्र जनसामान्यांच्या मनात अधोरेखित होणार.     
एखादी वाचता येणारी, तिसऱ्या-चौथ्या इयत्तेत शिकणारी मुलगी आईला टी.व्ही. वरील अक्षरे वाचून विचारणार,'आई बलात्कार म्हणजे काय गं ?' तिच्या निष्पाप डोळ्यांना डोळा न भिडवता आई म्हणणार तू अजून लहान आहेस, तुला काय करायच्यात नसत्या गोष्टी? पण तिला लहान राहण्याची मुभा तर या अशा सर्रास रस्तोरती सांडलेल्या अत्याचाऱ्यांनी तर दिली पाहिजे ना? असंख्य निरागस कळ्या, फुले स्वत:च्या कामवासनेपायी निर्दयपणे तुडवणारे हे पिसाट या भूतलावर राहण्याच्या लायकीचे तरी आहेत का ते एकदा शासनाने तपासून पहिले पाहिजे.       
अनेक थोर संतांचा, महात्म्यांचा आणि विचारवंतांचा वारसा लाभलेल्या या देशात आज विकृत वासनेने आपले वखवखलेले हात-पाय जागोजागी पसरावेत आणि त्यांच्या या बीभत्स कृत्याचा निषेध होण्यापलीकडे काही होऊ नये हे या देशाचे दुर्भाग्यच! शिकून सवरून,पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून संसाराचे हात बळकट करणाऱ्या स्त्रीवर पुन्हा घरातील चार भिंतींच्या आत घाबरून,असुरक्षित होऊन बसायची पाळी येऊ नये एवढीच मनोमन इच्छा आहे.       

Thursday 22 August 2013

वारसा ………. अंधश्रद्धेविरुध्द लढण्याचा !


आज आपण एकविसाव्या शतकात आहोत ही वस्तुस्थिती असली तरीही आपल्यापैकी कित्येकांची मने किंवा त्यांचे विचार प्रतिगामित्वाकडेच झुकणारे आहेत असे खेदाने म्हणावेसे वाटते. अंधश्रद्धेचा विळखा निव्वळ ग्रामीण भागापुरताच सीमित नसून अनेक शिक्षित, शहरी माणसेही या अघोरी प्रथांना कवटाळताना आजही आपल्याला दिसतात. 
अफाट पैसा हवा आहे बाबाकडे जा, अपत्यप्राप्ती होत नाही मंत्रतंत्र कर, दुष्ट शक्तींपासून संरक्षण हवे आहे मंतरलेला धागा किंवा ताईत बांध असे अनेक उपाय आपल्या अवतीभवती पसरलेले बांधव राजरोस करत असतात.  घरात कुणी आजारी असेल तर त्या व्यक्तीला तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले पाहिजेत पण अशा वेळेस भोंदू बाबांचा, त्यांच्या तांत्रिक शक्तींचा आधार घेतला जातो. कर्वे-फुले यांसारखे थोर पुरुष नुसते पुरुषांनीच नाही तर या देशातील स्त्रीनेही शिक्षित व्हावे म्हणून झटले, सावित्रीबाई फुलेही त्यांच्या यजमानांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या. त्यांनी समाजाचा, सनातन्यांचा अपरिमित रोष सहन केला पण  बहुजनांना शिक्षित करण्याचा आपला लढा आमरण चालू ठेवला. आज त्यांचा वारसा सांगणारे आपण शिक्षित झालेले आपले मन बासनात गुंडाळून किती सहजतेने या बुवा-बाबांच्या चरणी अर्पण करतो ही खरोखरीच निंदनीय बाब आहे.     
रोज वर्तमानपत्रातून अशा कितीतरी बातम्या आपल्या दृष्टीस पडत असतात. काविळीवर योग्य ती वैद्यकीय उपाययोजना न करता मंत्रतंत्राचा अवलंब केल्याने सोळा वर्षीय मुलीचा मृत्यू किंवा तुला लवकरच अपत्यप्राप्ती होईल असे सांगून एखाद्या बाबाने स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवून तिची फसवणूक केली. या बातम्यांतून कुणीच कसलाही बोध घेत नाही ही अनाकलनीय गोष्ट आहे. देवाला किंवा देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी बालकाचा किंवा कुमारिकेचा बळी देणे किंवा मुक्या जनावराचा बळी देणे अजूनही अनेक ठिकाणी प्रचलित आहे. अंगारे-धुपारे, मंत्र-तंत्र, गंडेदोरे, ताईत हे उपाय केल्यानंतर खरोखरीच जर माणसांचे सर्व प्रश्न सुटले असते तर वैद्यकशास्त्र अस्तित्वातच आलं नसतं, मानसोपचार तज्ञांची गरज भासली नसली, शालेय शिक्षण रद्दबातल झालं असतं.          
अठरा वर्षे अनेक राजकीय पक्षांचे उंबरठे झिजवून डॉ. दाभोलकरांना जादूटोणाविरोधी विधेयक संमत करून घेण्यात अपयश आलं ही सगळ्या भारतवासियांसाठी खाली मान घालायला लावणारी बाब नाही का? कुणाकुणाचे हितसंबंध, राजकीय स्वार्थ यात गुंतले असल्या कारणाने हे विधेयक राजकीय पटावरून पुढे सरकवले जाण्यास असमर्थ ठरले आहे. अनेक चर्चा, वाद-वितंडवाद होऊनही या विधेयकाभोवती अनेक अंधश्रद्धांचा जीवघेणा विळखा पडलेला आहे. हवेतून उदी काढणे, ताईत काढणे किंवा अनेक वस्तू काढणे ही निव्वळ हातचलाखी आहे , या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक दृष्टीकोन नाही हे सप्रमाण सिध्द करून दाखवले गेले तरीही या भस्म-विभूती-मंतरलेले धागे मानवी मनाचा कब्जा सोडत नाहीत हे पाहून लाज वाटते.   
आज अशा अनेक बुवा-बाबांनी जादूच्या, हातचलाखीच्या बळावर जनमानसातील त्यांचं स्थान पक्कं केलं आहे. अध्यात्म्याच फक्त आवरण आहे पण आत मात्र सैतानाचा वावर आहे. तरुण मुली, स्त्रिया या अशा बाबांना सहज फशी पडतात, त्यांच्या अज्ञानाचा, निरागसतेचा फायदा ही मंडळी उठवतात. अनेक पुरुषही या बाबांच्या नादी लागून आपल्या आयुष्याचं वाटोळं करून घेतात. या बुवा-बाबां मध्येही श्रेण्या असतात. त्याप्रमाणे त्यांना शिष्यगण मिळतात, देणग्या मिळतात, त्यांची पब्लिसिटी होत राहते, हे महागड्या गाड्या, विमानांतून प्रवास करतात, गुबगुबीत मलमलचे गालिचे यांच्या पायांखाली अंथरले जातात,  अत्यंत महाग भेटवस्तू या बाबांना भक्तगणांकडून अर्पण केल्या जातात. चार-दोन प्रभावी प्रवचने ठोकली की यांच्या कार्याचा सर्वत्र उदोउदो होतो.                .     
आज डॉ. दाभोलकरांचे चाहते आणि वारसदार सर्वदूर पसरलेले आहेत, त्यांची शिकवण, त्यांचे विचार , त्यांचे संघटना कौशल्य आज समाजात रुजवण्याची नितांत गरज आहे. अंधश्रद्धेची पुटे समाजमनावरून कायमची पुसू पाहणाऱ्या आणि त्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या डॉ. दाभोलकरांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहण्यासाठी हा पुरोगामित्वाचा लढा आज मोठ्या संख्येने पुढे नेण्याची गरज आहे. तुम्ही-आम्ही सर्वांनीच या लढ्यात सहभागी व्हायला हवे तरच समाज-परिवर्तनाची आशा बाळगता येईल. सत्तेवरील आणि सत्तेच्या विरोधात बसलेल्या सर्व घटकांनी आपापले वैयक्तिक मतभेद बाजूला सारून या परिवर्तनाची कास धरली पाहिजे नाहीतर ही अंधश्रद्धेची काळरात्र  कधीच संपणार नाही आणि मानवाच्या सर्वकष प्रगतीला खीळ बसल्याशिवाय राहणार नाही.     

Wednesday 3 July 2013

भाषा तरुणाईची!


भाषा हे इतकं प्रभावी माध्यम आहे की त्याचा अनुकूल वा प्रतिकूल परिणाम ऐकणाऱ्यावर चटकन होत असतो. घरी पालकांसमोर वापरली जाणारी भाषा वेगळी असते, शाळेत शिक्षकांसमोर वापरली जाणारी भाषा वेगळी असते आणि मित्रपरिवारात वापरली जाणारी भाषा ही सर्वस्वी वेगळी असते.    
हल्लीची तरुणाई सभ्यतेशी विसंगत असणारी भाषा अगदी सहज, कसलाही विधिनिषेध न बाळगता वापरत असते. अगदी लहान लहान शाळकरी मुले मित्रांच्या घोळक्यात अतिशय गलिच्छ भाषा लीलया वापरतात. मग त्या घोळक्या शेजारून एखादी बाई चालली असो वा मुलगी त्यांना काहीही फरक पडत नाही. हा अनुभव मला अनेकदा आला आहे. मुले शाळेला किंवा क्लासला जाण्यासाठी रस्त्यावर एकवटतात. मग त्यांच्या गप्पा सुरु होतात. यात एकमेकांना अगदी हीन पातळीवर संबोधले जाते. फार घाणेरड्या स्तरावरील विनोद सांगून दुसऱ्याला हसवले जाते. मी अनेक वेळा दुपारी ट्युशनला जात असताना अशा काही घोळक्यांच्या बाजूने नाईलाजास्तव जावे लागते आणि आपण बहिरे असतो तर किती बरे झाले असते अशी पश्चात्ताप करण्याची पाळी आपल्यावर येते. आपल्या घरीही आपली आई, आपली बहिण आहे हे सोयीस्कररित्या विसरून या मुलांची अर्वाच्च्य बडबड चालू असते. बरे त्यांना असे बोलताना हटकावे तर आपल्याला ते काय ऐकवतील याची मनोमन धास्ती असते कारण ते जी भाषा वापरतात ती ऐकण्याचे धारिष्ट्य आपल्यात औषधालाही नसते.           
आपण मैत्रिणींबरोबर चित्रपट बघायला जातो. उद्देश निव्वळ करमणुकीचा असतो. आपण आनंदी मूडमध्ये असतो. पण समोर जमलेल्या तरुणांचा मूड मात्र काही औरच असतो. ते कुणाला तरी उद्देशून खूप घाणेरडे बोलत असतात. तेही इतक्या मोठ्याने की  आजूबाजूच्या कुणालाही ते सहज ऐकू जावे. आई-बहिणींच्या नावाने ती उधळलेली मुक्ताफळे ऐकताना आत खूप त्रास होत असतो. घरी जाउन आंघोळ करावीशी वाटते. त्यांना खडसावून विचारावेसे वाटते की अरे चांगल्या भाषेत तुम्हाला इतरांशी संवाद साधताच येत नाही का? घरीसुद्धा असेच बोलता का? ह्यांनी सांगितलेल्या विनोदात तर कंबरेखालच्या विनोदांचीच भर असते. या तरुणांचे काय होणार या प्रश्नाचा विचार करत आपण फक्त खंतावत राहतो.             
 ट्रेनमध्ये बायकांच्या डब्यात चढावे तर तिथेही बायकांच्या जिभेवर शिव्या-शापांचे ढीग रचलेले असतात. सीट मिळाली नाही घाल शिव्या, कोणी सरकले नाही घाल शिव्या, कोणी उत्तर दिले नाही घाल शिव्या हे अव्याहत चालू असते. अगदी चांगल्या घरातील वाटणाऱ्या बायका-मुलीही अतिशय घाणेरडे,बहिष्कृत शब्द सहज वापरत असतात. घरच्या मंडळींचा यथास्थित उद्धार केल्याशिवाय जणू या बायकांना चैनच पडत नाही.        
मराठीत भ, झ ने सुरु होणारे आणि इंग्रजीत एफ ने सुरु होणारे शब्द आजच्या युगातील जणू पर्वणीचे शब्द झाले आहेत. हे किळसवाणे शब्द उच्चारले नाहीत तर हा जन्म फुकट जाईल अशी भीती या शब्दांचा वापर करणाऱ्यांना वाटत असावी. प्रत्येक वाक्यागणिक या बीभत्स शब्दांची पेरणी करून ही मुले  संस्कृतीवर, संस्कारांवर नांगर फिरवत असतात. अवेळी कळलेले यातील शिव्यांचे, अश्लाघ्य शब्दांचे अर्थ यांच्यातील निरागस बाल्य पुरते उध्वस्त करून टाकतात. या शब्दांच्या अर्थातून एक किळसवाणी लैंगिक निष्पत्ती होत असते जी मनातील विकृत हेतूंना जन्म देऊ शकते किंवा असे घातक विचार करण्यास उद्युक्त करू शकते.      
तरुणाईच्या मनाला लागलेली ही शाब्दिक कीड वेळीच चांगल्या संवादांची, संस्कारांची फवारणी करून नष्ट केली पाहिजे अन्यथा याचे दुष्परिणाम साऱ्या समाजाला भोगावे लागतील.  

Thursday 27 June 2013

निसर्गाचा कोप की मानवी घात ?


केदारनाथ ह्या भगवान शंकराचा वास असलेल्या पावनभूमीवर निसर्गाने अवचित घाला घातला आणि मृत्यूचे भीषण तांडव सगळ्यांच्याच अंत:करणाचा थरकाप उडवून गेले. अनेक घरे वाहून गेली , अनेक संसार विस्कटले, अनेक मने मृतप्राय झाली , अनेक हृदये विदीर्ण झाली. प्रत्यक्ष केदारनाथ मंदिराच्या अवतीभवती प्रेतांचा खच पडला. रस्ते नाहीसे झाले. चंद्रापर्यंत झेपावलेल्या माणसाचे थिटेपण पुनश्च अनुभवास आले.       
झाडांची बेमालूम केलेली कत्तल, वळवलेल्या किंवा बुजवलेल्या नद्या, खाड्या, नष्ट केलेली तिवरे, जागोजागी अवैधपणे बांधलेल्या इमारती अशी कित्येक कारणे एकत्र आली आणि भारतीयांना महाप्रलयाची चुणूक बघायला मिळाली. 
लष्करातील जवान आपले प्राण पणाला लावून, अहोरात्र राबून अडकलेल्या लोकांची सुटका करत आहेत. कित्येक प्रेतांवर अंत्यसंस्कार करायचे अद्याप बाकी आहेत. केदारनाथ परिसराला दुर्गंधीने वेढलेले आहे. तेथील अनेक गावांवर रोगराईचे सावट पसरलेले आहे अडकलेल्यांना उपासमारीची, जीवघेण्या थंडीची चिंता भेडसावते आहे. आजूबाजूच्या पट्ट्यातील लुटारू, बलात्कारी यांना परिस्थितीच्या खिंडीत अडकलेले असहाय लोक आणि त्यातील महिला ही जणू काही सुवर्णसंधीच वाटते आहे. जे लोक बेपत्ता आहेत त्यांच्या येथील नातेवाईकांना अनेक शंका-कुशंकांनी ग्रासलेले आहे. आपल्या प्रियजनांच्या वाटेकडे आशेने डोळे लावून बसलेले अनेक जण आहेत. ज्यांच्या घरातील अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत त्या मागे राहिलेल्यांना आपल्या आयुष्याचेच निर्माल्य झाल्यासारखे वाटत आहे.  
अशा परिस्थितीत वरिष्ठ राजकारणी केवळ हवाई पाहणी करण्यात धन्यता मानत आहेत ही अत्यंत खेदजनक बाब आहे. कोणी राजकारणी पुनर्वसनाचा मुद्दा हाताशी धरून त्याचे सत्तेसाठी भांडवल करू पाहत आहेत. स्थानिक लोकांशी, नेत्यांशी, व्यावसायिकांशी साटेलोटे जमवून तेथील भूखंड गिळंकृत करणाऱ्या राजकारण्यांची बजबजपुरी माजली आहे. मग तिथे मोठाली हॉटेल्स, इमारती उभ्या राहतात. त्यांची ध्येये साध्य करण्यासाठी म्हणून मोठमोठ्या वृक्षांची निघृणपणे कत्तल केली जाते, नद्यांचे स्त्रोत वळवले जातात, रान-तिवरे नष्ट केली जातात. पर्यावरणाचा विध्वंस होतो. निसर्गाचा समतोल ढळतो आणि मग अशा प्रकारे निसर्ग मानवाचा घास घेतो.   
पण निसर्गाची कत्तल करणारे ह्यात भरडले जात नाहीत तर ह्यात तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांची आहुती पडते. त्यांच्या आलिशान बंगल्यात बसून निसर्गाचे हे भयाकारी तांडव पाहण्यात हे मश्गुल असतात. एखाद दुसरी मुलाखत दिली जाते तीही ढिम्म चेहऱ्याने! आम्ही ही मदत पाठवली आहे, ही कुमक पाठवली आहे, अमक्या रकमेचा धनादेश पाठवला आहे असे म्हटले कि ह्याची नैतिक जबाबदार जणू संपूनच जाते. निसर्ग संपत्ती, प्राणी संपत्ती, जल-जैविक संपत्ती ह्या सगळ्यावर तर निसर्गाच्या समतोल अवलंबून असतो. ह्यातील कोणत्याही गोष्टीचा साठा नष्ट झाल्यास अथवा जाणूनबुजून नष्ट केल्यास भू-स्खलनाचा धोका अपरिहार्यपणे संभवू शकतो. हा निसर्गाचा प्रकोप संपूर्ण सृष्टीची राखरांगोळी करण्यास पूर्णपणे समर्थ असतो. स्वार्थासाठी, राजकीय मतलबासाठी पोखरलेले डोंगर व त्यावर झालेली ढगफुटी यामुळेच हा प्रलय झाला. फक्त ह्या परिस्थितीला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जबाबदार असलेले सुरक्षित राहिले आणि परमेश्वर चरणी नत व्हायला गेलेले प्रलयाच्या दलदलीत कायमचे गाडले गेले.         
आपले पूर्वज आर्य निसर्गालाच देव मानून त्याची पूजा करायचे. त्यांच्यासाठी देव हा सगुण स्वरूप नसून अवतीभवती पसरलेला निर्गुण निराकार निसर्ग हा होता. निसर्गाला जर देव मानले तर हल्लीचे सत्ताधारी,व्यावसायिक ह्या देवावरच लोभाची कुऱ्हाड चालवत आहेत आणि तेही अत्यंत बेदरकार,निर्लज्ज वृत्तीने! आणि स्वत:ची खुर्ची शाबूत राहू दे म्हणून देव्हाऱ्यात बसवलेल्या सगुण स्वरूपाला सोने-चांदी-हिऱ्यांनी मढवत आहेत. परंतु हे राजकारण्यांनो एक लक्षात ठेवा, ज्या कोटी लोकांच्या बळावर आज तुम्ही ही सत्ता उपभोगू शकता त्या जनतेच्या प्रक्षोभाला आमंत्रण देऊ नका अन्यथा भयंकर मानवी प्रकोपाला तुम्हाला आज ना उद्या सामोरे जावेच लागेल.             
   

Tuesday 25 June 2013

प्रेम, आकर्षण, लग्न वगैरे वगैरे…………


सध्या मद्रास हायकोर्टाने दिलेला स्त्री-पुरुष संबंधा विषयीचा निकाल वेगवेगळ्या कारणास्तव गाजतो आहे. अनेक रोमीओंचे धाबे यामुळे दणाणले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळात प्रेम, लैंगिक आकर्षण आणि कायदेशीर विवाह या संबंधीच्या कल्पना खूपशा वैयक्तिक असतात. पुरोगामी, प्रतिगामी असे वेगवेगळ्या  विचार प्रवाहांचे गट अत्यंत निरनिराळी मते समाजात मांडताना दिसतात. पण या सगळ्याचा उहापोह न करता एक पुरोगामी विचाराची स्त्री म्हणून मला काही मते मांडावीशी वाटतात.      
सर्वसामान्य स्त्रीची प्रेमाची व्याख्या ही पुरुषाच्या प्रेमाच्या व्याख्येपेक्षा निश्चित वेगळी असते. आपण ज्या पुरुषावर मनापासून प्रेम करतो त्याने आपल्याशी लग्न करावं, आपल्याला आधार द्यावा, आपलं रक्षण करावं, आपल्या मुलांना पित्याचं प्रेम द्यावं, आपला संसार सुखाचा करावा अशा भावना मनाशी बाळगून स्त्री एखाद्या पुरुषावर प्रेम करू पाहते. पण पुरुषांचा प्रेम या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन असा असतोच असे नाही. त्यांच्या मनातील स्त्री विषयक लैगिक आकर्षण आधी जागं होतं आणि कालांतराने प्रेमभावना जागी होते पण ती प्रत्येकाच्या बाबतीत होतेच असेही नाही. पुरुषाला सर्वस्व अर्पण करणारी स्त्री त्याच्याशी संसार करण्याच्या इराद्यानेच पुढे जात असते तथापि एखाद्या स्त्रीशी शारीरिक दृष्ट्या समरस होणारा पुरुष तिच्याशी लग्न करण्याच्या उद्देशानेच जवळ येतो असे नाही. लग्न हा केवळ सामाजिक उपचार असतो. मंगळसूत्र, अंगठ्या, कायदेशीर विवाह नोंदणी ही स्त्री-पुरुष  संबंधांना मिळालेली समाजमान्यता असते एवढाच याचा अर्थ आहे. लग्ने जमतात, जमवली जातात पण प्रेम जमवून, ठरवून करता येत नसते. आपल्याकडे विवाह हा एक 'स्टेटस सिम्बॉल' मानला जातो. समारंभांना नवरा-बायकोने जोडीने जाणे ही गोष्ट प्रतिष्ठेची 
मानली जाते. मग अशा नवरा-बायकोत प्रेमाचा अंश असो वा नसो, रूढार्थाने असे पती-पत्नीचे लेबल लावून त्यांना समाजात मानाने फिरता येऊ शकते.  लौकिकार्थाने 'आदर्श' संसार करता येऊ शकतो आणि मुलेबाळे सुद्धा प्रसवता येऊ शकतात.    
प्रश्न असतो तो परस्परांमधील नात्याचा, संबंधांचा! निसर्गनियमानुसार लैंगिक आकर्षण आणि त्यानंतर सहवासाने निर्माण होणारं प्रेम जर दोघांत रुजलच नाही तर संसार हा केवळ एक बाह्य उपचार ठरतो. ना अशी स्त्री कधी सुखी राहू शकत ना पुरुष! आजमितीला अशी अनेक जोडपी असे उपचार पार पडताना आढळतात. संसाराचे रहाटगाडगे, संसाराचा गाडा अशी शुष्क संबोधने वापरून हे उभयता दिवस रेटत राहतात. स्त्रिया अकाली पोक्त दिसू लागतात. यांच्या पुरुषांची नजर इतरत्र वेध घेत फिरू लागते. दोघांतील दुही वाढू लागते. आपण लग्न का केलं हा विचार अंतरबाह्य पोखरू लागतो  आणि लग्न या संकल्पनेवर आपण उपहासाने हसू पाहतो.       
स्त्रीने पुरुषाचा संसार करायचा, त्याच्यापासून होणारी मुले मोठी करायची , घरची चूल सांभाळायची आणि पुरुषाने स्त्रीला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून द्यायची, कुटुंबाचा आर्थिक भार उचलायचा आणि आपला वरचष्मा कुटुंबावर आणि पर्यायाने स्त्रीवर प्रस्थापित करायचा हे दिवस आता सरले आहेत. आज स्त्री शिक्षित आहे, कमावती आहे, स्वत:चा आणि स्वत:च्या कुटुंबाचा सांभाळ करण्या इतपत सक्षम आहे. तिलाही वर हवा आहे पण इच्छित ! कुणाच्याही गळ्यात वरमाला घालून त्याला जन्मभरासाठी आपला पती म्हणून स्वीकारणारी स्त्री एकतर ग्राम्य, विचारांनी मागासलेली अथवा आर्थिक दृष्ट्या परावलंबी तरी असावी,          
प्रेम हे एक अजब रसायन आहे. प्रेमासाठी जीव घेतले जातात तसेच दिलेही जातात. पण या धकाधकीच्या आणि संपूर्णपणे अस्थिर आणि क्षणभंगुर आयुष्यात हिरवळ फुलवण्याचे सामर्थ्य निव्वळ प्रेमभावनेत आहे. जो तुम्हा-आम्हा सर्वांचा हक्क आहे. लैंगिक आकर्षण ही वयानुसार कमी होत जाणारी बाब आहे तर प्रेमभावना ही चिरंतन टिकणारी अशी गोष्ट आहे.   
यापुढे प्रत्येक स्त्रीने सर्वार्थाने इतके सक्षम व्हावे की तिला स्वत:ला हवे तसे जगता येईल, आपल्या प्रेमासाठी लायक असलेल्या माणसाशी लग्न करता येईल आणि जिथे प्रेमाखेरीज आदर या भावनेचीही सम विभागणी होईल. जिथे केवळ तिच्या शरीरावर नाही तर तिच्या विचारांवर प्रेम करणारा, तिच्या मतांचा यथायोग्य आदर करणारा सहचर तिला लाभेल. त्यामुळे केवळ लैंगिक आकर्षणावर टिकलेला लग्न नामक उपचार मोडीत निघाल्यावर पोटगी मागण्याची वेळ तिच्यावर येणार नाही. त्याच्या आधाराशिवाय स्वत:च्या पोटात वाढणारे बाळ तिला या जगात येऊ देता येईल किंवा लग्न या सामाजिक उपचारापर्यंत न जाता ही तिची प्रेमभावना अबाधित ठेवता येईल.                    

Tuesday 18 June 2013

अनुमती - एक कटू सत्य


अगदी अलीकडेच प्रदर्शित झालेला अनुमती हा एक विचाराधीन चित्रपट आहे. नवरा-बायको यांच्या नात्यातील एक  घट्ट वीण अधोरेखित करणारा असा हा चित्रपट आहे. काही काही आजार असे असतात की त्यातून माणूस बरा होईल की नाही हे सांगणे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही निश्चितपणे सांगता येणे शक्य नसते. अद्ययावत साधन-सुविधा असलेली हॉस्पिटल्स, अत्यंत महागडे औषधोपचार, डॉक्टरांच्या फीज परवडणे ही सर्वसामान्य  माणसाच्या आवाक्याबाहेरील गोष्ट असते.  ज्या मुलांना आई-वडिलांनी लहानपणापासून तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेले असते, ती मुलेही त्यांच्या मोठेपणी संसार,जबाबदाऱ्या या चक्रात इतकी अपरिहार्यपणे अडकली जातात की त्यांच्याकडूनही कुठल्याही घवघवीत मदतीची अपेक्षा करणे व्यावहारिक दृष्ट्या शक्य नसते. अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करता करता एका हरलेल्या किंवा लौकिकार्थाने अपयशी ठरलेल्या एका माणसाची ही कथा आहे.    
गजेंद्र अहिरे यांचा हा चित्रपट स्तुत्य आहे. काही वेळेस चित्रपट तुटक वाटतो हे खरे परंतु हे या चित्रपटाचे अपयश आहे असे मात्र वाटत नाही. कोकणातील निसर्ग मात्र अप्रतिम टिपला गेला आहे. समुद्राच्या खडकांवर आपटणाऱ्या लाटा, दुतर्फा माडांची झाडे, पायाखालचे हिरवेगार गवत आणि पावसाची संततधार हे दृश्य डोळ्यांना अक्षरश: जखडून ठेवते. संपूर्ण चित्रपटात रत्नाकर पाठारे  यांची त्यांच्या पत्नीला वाचवण्याची जीवापाड धडपड दाखवली आहे. त्यांची हतबलता, असहायता, DNR  फॉर्मवर साईन न करण्यासाठी त्यांच्या मनाची चाललेली कुतरओढ परिणामकारकरित्या दाखवली गेली आहे.       
हा सबंध चित्रपट म्हणजे जुन्या आठवणींचे आणि प्राप्त परिस्थितीचे एक कोलाज आहे असे म्हणायला हरकत नाही. चित्रपटाचा विषय गंभीर आहे, शेवट डिप्रेसिव्ह आणि संदिग्ध आहे. तरीही तुम्हा-आम्हा सारख्यांच्या मनात अशा एका कटू सत्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. भविष्यातील तरतुदीविषयी सजगता निर्माण करणारा आहे. भावनांच्या प्रवाहात न भरकटता शांतपणे आणि सुज्ञपणे विचार करायला लावणारा आहे.  
हा संपूर्ण चित्रपट ज्या कारणासाठी बघावासा वाटतो तो नि:संशय विक्रम गोखले या अभिनेत्यामुळे ! मनात चाललेली घालमेल अभिनित करण्याचे त्यांचे कौशल्य केवळ अतुलनीय आहे. ती हतबलता, निराशा, मनाला आलेला विलक्षण थकवा, अनेक शंका-कुशंकांनी पोखरलेले मन, पत्नीच्या आजारपणामुळे आलेली लाचारी, कटू वास्तवाने विझत चाललेली डोळ्यातील चमक, पत्नीच्या सतत मनात रुंजी घालणाऱ्या गतकाळातील आठवणी या रसायनातून रत्नाकर पाठारे ही भूमिका विक्रम गोखले यांनी उत्कृष्ट साकारली आहे  याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. नीनाने रंगवलेली रत्नाकरच्या पत्नीची म्हणजेच मधूची भूमिका चांगली आहे पण यात नीना आपल्याला फक्त गतकाळाच्या माध्यमातूनच भेटते. रीमाचे काम नीटनेटके परंतु अगदी छोटेसे आहे. आपल्या सासऱ्याच्या मनातील वादळ समजून घेऊ शकणारी सून सई ताम्हणकर हिने चांगली साकारली आहे. सुबोध भावे यांचे काम छोटेसे पण लक्षणीय आहे. नेहा पेंडसेची भूमिकाही ठीक आहे.   
 विझत चाललेल्या ज्योतीला कसे विझण्यापासून परावृत्त करायचे आणि ती ज्योत तेवती राहण्यासाठी प्रयत्नांचे पहाड कसे जीवाची पर्वा न करता फोडण्याची शिकस्त करायची याचा वस्तुपाठ म्हणजे हा चित्रपट आहे असे म्हणायला हरकत नाही. प्रेक्षकांनी जरूर बघावा असा हा चित्रपट आहे.   

Wednesday 12 June 2013

अवेळीच मिटलेल्या अथवा मिटू पाहणाऱ्या कळ्यांना …………


नुकतीच जिया खान या अभिनेत्रीने प्रचंड नैराश्यापोटी आत्महत्या केली आणि मन अतिशय अस्वस्थ झाले. तिने लिहिलेल्या पत्रातील मजकूर जाहीर झाला आणि तिच्यावर झालेल्या अन्यायाची जाहीर वाच्यता झाली. यातील किती खरे किवा किती खोटे याचा यानंतर कीस काढला जाईल. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतील. पण एक अवघी पंचवीस वर्षाची युवती आपले सगेसोयरे,  आपले करियर या गोष्टींचा जराही विचार न करता मृत्युच्या विचारांना आपल्यावर अधिराज्य गाजवू देते हे एक भीषण सत्य कोणालाच विसरता येणार नाही.  
तिने लिहिलेल्या पत्रात तिच्या प्रियकराने तिच्यावर सतत जबरदस्ती केल्याचे म्हटले आहे. मला एक कळत नाही की आपण ज्याला आपले सर्वस्व मानतो, ज्याच्यावर स्वत:हूनही अधिक प्रेम करतो, ज्याला निष्ठेने तन-मन-धन अर्पण करतो त्या पुरुषाची नियत आपल्याला आधी कशी कळत नाही? जो माणूस केवळ आपल्या देहाचा उपभोग घेण्यासाठी आपल्या जवळ येतो तो माणूस किती चांगल्या वर्तणुकीचा असू शकेल याचा अंदाज या मुलींना कसा येत नाही? जो पुरुष पार्ट्या,मद्य,मुली यात रममाण होण्यात धन्यता मानतो तो माणूस एकपत्नीबाणी कसा होऊ शकेल? किंबहुना लग्न,विवाह या कल्पना तरी त्याच्या मनाला शिवण्याची सुतराम शक्यता आहे का याचा पडताळा या मुलींना कसा येत नाही? एखाद्या पुरुषाच्या स्वाधीन होण्याआधी तो पुरुष खरोखर त्या लायकीचा आहे की नाही याची खातरजमा मुली का करून घेत नाहीत? त्याने आपली फसवणूक केली असे म्हणण्यापेक्षा मुलींनो तुम्ही आपली फसवणूक करून घेतलीत असे मला म्हणावेसे वाटते.  
आपण गरोदर राहू याची भीती असतानाही तिने स्वत:ला कोणतीही काळजी न घेता त्याच्या स्वाधीन करावे ही गोष्ट मनाला पटतच नाही. ती गर्भवती राहिली आणि ते बाळ तिला तिच्या इच्छेविरुद्ध abort  करावे लागले. गरोदर राहिल्यानंतर तिने जिद्दीने त्या बाळाला वाढवण्याचा निर्णय का घेतला नाही आणि गरोदर राहायचे नव्हते तर मग योग्य ती काळजी का घेतली नाही या प्रश्नांची उत्तरे जीयाबरोबरच वाहून गेली आहेत. जे चित्रपटातील करियर तिला आश्वासक वाटत होते त्या करियरला लाथ मारून अयोग्य माणसाच्या मोहजालात ती भरकटत कशी गेली या प्रश्नाचे उत्तर आता कधीच मिळणार नाही.    
अनेक मॉडेल्स, मुली चित्रपटसृष्टीत करियर करण्याच्या उद्देशाने आपापली शहरे, गावे सोडून मुंबानगरीत स्थायिक होतात आणि करियर पेक्षाही गुंतागुंतीच्या आणि जीवघेण्या मोहजालात गुरफटल्या जातात. त्यांनी त्यांच्या आयुष्याची रंगवलेली स्वप्ने काही दिवसातच धुळीला मिळतात आणि पुढ्यात असलेले आयुष्य दुधात मिठाचा खडा पडल्यासारखे नासून जाते. यातील काहीजणी मग स्वत:ला सिगारेट,दारू, ड्रग्ज या व्यसनांत पूर्णपणे बुडवून घेतात तर काहीजणी उद्विग्न मनस्थितीत मृत्यूला कवटाळतात.  
एखाद्या विकृत स्वभावाच्या माणसाच्या स्वाधीन स्वत:ला करून संपवण्यासाठीच केवळ आपण या शरीराचा वापर करणार आहोत का याचा विचार प्रत्येक सुशिक्षित म्हणवणाऱ्या मुलीने या क्षणापासून केला पाहिजे असे मला वाटते. आपले विचार, तत्वे, स्वप्ने  यांना साकार होण्याचा अधिकार आहे की नाही याचा विचार केला गेला पाहिजे. आपली सुखाची कल्पना आणि दुसऱ्या व्यक्तीची सुखाची कल्पना यांचा समन्वय साधला जातोय का याचा विचार किमान केला गेला पाहिजे. आपले प्रेम आपण दुसऱ्यावर त्याची इच्छा नसताना लादतोय का याचा विचार व्हायला हवा आणि या अशा एकतर्फी प्रेमसंबंधातून आपल्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे की नाही याचेही भान प्रत्येक मुलीला असलेच पाहिजे. त्या पुरुषाच्या मोहजालात अडकून आपले घरच्यांशी असलेले नातेसंबंध दुरावत चालले आहेत का याचाही आढावा स्वत:शी घेणे आवश्यक आहे.      
शेवटी मृत्यूचे पाश गळ्याभोवती आवळत स्वत:चे आयुष्य स्वत:ला परके करायचे की प्रेमात सावधानता बाळगत नाती,करियर उत्तम रीतीने सांभाळत भविष्याच्या रेशमी लड्या आपल्याशा करायच्या हा निर्णय ज्याचा त्याचा !

Tuesday 7 May 2013

आय नो ………


काही व्यक्ती या विश्वातील प्रत्येक लहानसहान घटना आपल्या परिचयाची आहे अशा वृत्तीने वागत असतात. त्यांचा परवलीचा एकाच शब्द असतो 'आय नो' म्हणजे मला माहित आहे, मला ज्ञात आहे. कोणत्याही पेपरातून छापून आलेली हर एक गोष्ट यांना कशी माहित असते? स्वत:ची नोकरी, व्यवसाय अथवा विद्यार्थीदशेत असल्यास शाळा किंवा कॉलेज या गोष्टींना सुट्टी देऊन ह्या व्यक्ती दिवसाचे चोवीस तास फक्त आणि फक्त वर्तमानपत्रेच वाचत बसतात की काय अशी शंका यावी इतपत हे महाभाग 'आय नो' हा शब्द पुन्हा पुन्हा उच्चारत असतात.      
काही गोष्टी यांच्या परिचयाच्या असतील किंवा यांच्या कानावर आल्या असतील पण म्हणून प्रत्येक गोष्ट कशी यांना माहित असेल? अंजली तेंडूलकर ही सचिन तेंडूलकरची बायको आहे किंवा हृतिक रोशनला सहा बोटे आहेत किंवा शाहरुख खान आपल्या बायकोपेक्षा सिगारेटीवर जास्त प्रेम करतो किंवा जयाने रेखाकडे संसदेत टाकलेला जळजळीत कटाक्ष किंवा मनमोहन सिंग यांची बारमाही तटस्थता किंवा सोन्याचा भाव उतरला या गोष्टी 'आय नो' काय 'वुई नो' या वर्गात मोडतात पण म्हणून सोनियाच्या घरातील मांजरी व्याली या बातमीला राखी 'आय नो' असे का म्हणाली हे मला आजतागायत उलगडलेले नाही. ( या व्यक्ती अनुक्रमे सोनिया गांधी आणि राखी गुलजार किंवा राखी सावंत नव्हेत हे कृपया लक्षात घ्यावे)   
मला तर वाटते की ह्या व्यक्ती जन्मल्या जन्मल्या रडण्याऐवजी 'आय नो' हेच म्हणत असाव्यात. आता किनई बाळा तुझी आई तुला दुदू पाजणार आहे असं नुसतं कोणी म्हणायचा अवकाश की हुंकाराऐवजी 'आय नो' लोकांच्या कानावर पडत असेल. दिन्याला ब्याण्णव टक्के मिळाले हे कोणीही न सांगताच अर्णवला कसे कळले? फोनवरून जेव्हा आलोकने त्याला ही बातमी दिली तेव्हा तो लगेच म्हणाला 'आय नो'. आलोकने शंका येउन विचारले, तुला आधीच माहित होते ? कसे काय? रिझल्ट तर आत्ता लागला. यावर अर्णवचे उत्तर असे होते, अरे दिन्याने सॉलिड अभ्यास केला होता. तेव्हाच मी समजून चुकलो की हा नव्वदी पार करणार.      
अदिती साडी खरेदीला आईबरोबर दुकानात शिरली . तिथे तिला तिची जुनी मैत्रीण वृषाली भेटली. अदिती म्हणाली, माझ्या ताईचे लग्न ठरले आहे. वृषाली म्हणाली, 'आय नो'. अदिती आश्चर्याने म्हणाली, अगं तुला कशी कळली ही बातमी ? यावर वृषाली म्हणाली, अगं तुला साड्यांच्या दुकानात आईबरोबर शिरताना पहिले आणि माझ्या लगेच लक्षात आले. ग्रेट, अदिती म्हणाली.     
या 'आय नो' वर्गातील लोकांना बाजारभाव, सेन्सेक्समधील चढ-उतार, शिक्षकांच्या-व्यापाऱ्यांच्या मागण्या, वकिली डावपेच, राजकीय कुस्त्या, खून-दरोडे-बलात्कार सत्र , सुपरस्टार लोकांची इंगिते, हिट-फ्लॉप सिनेमा-नाटके, खाद्य-पर्यटन या विषयीचे ज्ञान म्हणजे थोडक्यात काय सगळे सगळे ठाऊक असते. त्यामुळे अय्या, बाप रे, खरं की काय, कित्ती कित्ती छान वगैरे प्रतिक्रिया यांना कधी देताच येत नाहीत. सगळ्या बातम्यांवर यांची आपली एकच प्रतिक्रिया 'आय नो'.        
या 'आय नो' वाल्यांची मदत घेऊन खालील प्रश्न सोडविता येतील का? कारण यांना सगळ्याचीच उत्तरे आधीच ठाऊक असतात. दुष्काळाचे निवारण कसे करता येईल ? यावर्षी पाऊस कसा पडेल? देशाचा पुढील पंतप्रधान कोण होईल? सैफ-करीना यांना अपत्यप्राप्ती कधी होईल? अंबानी बंधूंचे संबंध कधी सुधारतील? मराठी मालिका कधी वास्तवदर्शी होतील? पर्यावरणातील प्रदूषण कसे कमी करता येईल? 
एकदा राजू आपल्या दोन कुत्र्यांना घेऊन फिरायला बाहेर पडला. समोरून त्याचा एकेकाळचा 'आय नो'वाला मित्र  रवि येत होता. काय म्हणतोस ? कसा आहेस ? अशा काही जुजबी गप्पा झाल्यावर काहीतरी नवीन माहिती देण्याच्या उद्देशाने राजू रविला म्हणाला , माझ्या या दोन पठ्ठ्यांना रोज एक किलो चिकन लागतं. 'आय नो' , रवि म्हणाला. राजू हिरमुसला. तुला याबद्दल कशी काय माहिती आहे? तुझ्याकडे पण कुत्री आहेत का? नाही. माझ्याकडे एक मांजरी आहे. ती रोज साधारण अर्धा किलो पर्यंत चिकन खाऊ शकते त्यावरून मी अंदाज लावला. तेव्हापासून राजू रोज वेगळ्या रस्त्यावरून जातो .         

Monday 6 May 2013

सुट्टीतील वेळेचा सदुपयोग ……


सुट्टी आणि अभ्यास याच मुळी परस्परविरोधी अशा गोष्टी आहेत.  परंतु अभ्यास या शब्दाचा नेहमी केवळ शालेय अभ्यास असाच अर्थ घेतला जातो जो इथे अभिप्रेत नाही. आम्हाला बालमोहन शाळेत असताना दिवाळी , नाताळ आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील अभ्यास दिला जायचा. आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले लोक, संशोधने ,प्राणी,पक्षी,फुले-झाडे या आणि अशा इतर गोष्टींबद्दल सचित्र माहिती, थोडे पाढे, अगदी थोडी गणिते, छोटेखानी निबंध अशा स्वरूपाचा अभ्यास असायचा. परंतु खरी मजा यायची ती वही सजवताना! गोल्डन किंवा सिल्व्हर पेपरचे कव्हर किंवा दुसरा एखादा रंगीत पेपर आणि त्यावर पारदर्षी जिलेटीन पेपरचे कव्हर यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांच्या वह्या सुंदर दिसायच्या. शिवाय रंगीत पेन्सिली,स्केजपेन वापरून सुशोभित केलेली अक्षरे आणि त्याभोवतीची नक्षी पाहताना खूप छान वाटायचे. वह्यांतील अभ्यास आणि त्यावरील सजावट पाहून आम्हाला नंबर दिले जायचे व बक्षीसही! त्यामुळे प्रत्येकजण आपली वही उत्तम होण्यासाठी खूप मेहनत घ्यायचा.          
मुळात अभ्यास आणि कला यांच्या समन्वयातून एखादी उत्तम गोष्ट घडू, आकारू शकते हे मुलांना पटवून देणे गरजेचे आहे. अभ्यास करण्याची कला आणि कला जोपासण्यासाठी केला जाणारा अभ्यास या दोन्ही गोष्टी मुलांच्या अंगवळणी पडायला हव्यात नव्हे त्या त्यांनी आत्मसात करायला हव्यात. आजकाल सर्वसाधारणपणे सुट्टी लागली की मुले वेगवेगळ्या छंदवर्गात जाताना दिसतात. पण तिथे ती आई-वडिलांच्या हट्टाखातर ढकलली गेलेली असतात की त्यांच्या व्यक्तिगत आवडीपायी जातात हे तपासणे गरजेचे आहे. निरनिराळे बैठे आणि मैदानी खेळ, थोडा स्व-अभ्यास आणि एखादी आवडीची कला यांचा सुरेख मिलाफ साधून सुट्टी उत्तम तऱ्हेने व्यतीत होऊ शकते. संगणकाद्वारेही अनेक गोष्टी शिकता येतात.    
आपल्याला आवडत नसलेल्या एखाद्या विषयासंबंधित काही पुस्तके वाचल्यास त्या त्या विषयाची आवड उत्पन्न व्हायला मदत होऊ शकते.  रोज थोडे पाढे लिहून काढल्याने पाढे पाठ करण्यास सोपे जातात. आपल्याला कठीण वाटत असलेला एखादा विषय आपण त्या विषयातील एखाद्या जाणकाराच्या सहाय्याने समजून घेऊ शकतो. कचरा म्हणून टाकून दिलेल्या वस्तूंपासून काही उपयुक्त गोष्टी बनवता येऊ शकतात. आईस्क्रीम स्टिक्स, बांगड्या, पेयाचे टीन्स यापासून पेन stand  तयार करता येतात. रिकामे सेल्स , काड्यापेटी यापासूनही वस्तू बनवता येतात. वापरल्या गेलेल्या सीडी पासून फोटो आल्बम, wall hanging तयार करता येऊ शकते. रिकाम्या खोक्यांपासून पेपराच्या डेकोरेटिव्ह पिशव्या तयार करता येतात. कल्पकता असेल तर आपल्या अवतीभवती असलेल्या अनेक टाकाऊ गोष्टी आपण उपयुक्त गोष्टीत परिवर्तित करू शकतो.          
मुलांना सुट्टी असली तरी त्यांच्या पालकांना सुट्टी असतेच असे नाही. त्यामुळे मग त्यांचा बराचसा वेळ पालकांच्या अनुपस्थितीत जातो. सारखे व्हिडीओ गेम खेळणे, कार्टून बघणे, पिक्चर टाकणे हे काही क्षणापुरतेच मनोरंजन असते पण त्याने मुलांच्या सृजनशीलतेला,कल्पकतेला, बुद्धीला, अंगभूत कौशल्याला काहीच खाद्य मिळत नाही. मित्र जमवून कोल्ड ड्रिंक्स पिणे, वेफर किंवा चिप्स खात खात टी. व्ही. बघणे हे आरोग्याला हानिकारक असते. याउलट सकाळ-संध्याकाळ मोकळ्या हवेत खेळणे अथवा फिरणे हा त्याला उत्तम पर्याय असू शकतो.       
अभ्यास करणे म्हणजे एखादा विषय समजून घेणे, त्यातील खुबी आत्मसात करणे, त्याविषयी मनन करणे असा असतो. मग तो विषय मुलांच्या शालेय अभ्यासक्रमा बाहेरील सुद्धा असू शकतो. आईला स्वयंपाकात मदत करणे, बाजारहाट करणे, भाज्यांचे,फळांचे,धान्याचे भाव समजून घेणे, घरातील एखादी नादुरुस्त वस्तू रिपेअर करणे, कपडे स्वत: धुणे व त्यांना इस्त्री करणे, साफसफाई करणे ही कामे मुलांनी स्वत:हून, कोणताही कमीपणा न बाळगता केल्यास पालकांना तर मदत होतेच पण शिवास मुलांचे व्हावहारज्ञान पक्के व्हायला मदत होते.  
गेलेला वेळ पुन्हा कधीही परतून कोणाच्याच आयुष्यात येत नाही. मग हाच वेळ चांगल्या गोष्टींसाठी, छंदांसाठी, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी वळवता आला तर भविष्यातील वेळ मुलांवर कधीही पश्चात्तापाची पाळी आणणार नाही.