Monday 6 July 2015

Water filter, चिक्की, वह्या अन बरेच काही ……….


या निवडणुकीच्या वेळी भाजपने आपल्या पक्षाची अशी काही हवा तयार केली की पंधरा वर्षांच्या काँग्रेसच्या भ्रष्टाचारी राजवटीला जनता कंटाळली आहे, मंत्रांच्या अनेकविध घोटाळ्यांनी पुरेपूर त्रस्त झाली आहे. त्यामुळे या समस्त जनतेला या भ्रष्टाचारी राजवटीच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी आम्ही सर्वार्थाने सक्षम आहोत. एकदा का आम्ही सत्तेवर आलो की हे वर्षानुवर्षे जनतेला दिसत असलेलं चित्र पूर्णतया बदलेल. उत्तम शासनकर्ते जनतेला लाभतील. काळा पैसा, बेकारी, अवैध बांधकामे, वीज, पाणी, महागाई, रस्ते, शिक्षण, वाहतूक, टोलसमस्या, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था, महिलांवरील अत्याचार  अशा अनेक प्रश्नांना पूर्णविराम मिळेल. उद्योगधंद्यांना बरकत येईल. थोडक्यात सगळीकडे आलबेल होईल. या सगळ्या प्रचाराचा परिपाक म्हणून मग जनतेने एकदाचे भाजपला निवडून दिले. या आशेवर की ज्या दैनंदिन समस्या माणसाला भेडसावत आहेत त्यांचे निराकरण हा सत्ताधारी पक्ष व त्या पक्षाचा सहकारी पक्ष हे मिळून करतील. सामाजिक आणि राष्ट्रीय आपत्तीपासून आपलं रक्षण होईल. पण वास्तवातील चित्र मात्र अजिबात बदललेले नाही. फक्त खुर्च्यांवरील माणसे बदलली पण जनतेच्या पदरी मात्र घोर निराशाच पडली असे आज आत्यंतिक खेदाने म्हणावे लागते आहे.                      
विदेशातून काळा पैसा परत भारतात आणण्याच्या वल्गना हवेत कधीच्याच विरून गेल्या. महागाई य:त्किंचीतही कमी झाली नाही. शेतकऱ्यांकडे योग्य ती मदत पोहोचली नाही. उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर चालले.  अनेक ग्रामीण भागात भेडसावणाऱ्या पाणी आणि विजेच्या दुर्भिक्षावर तोडगा निघू शकला नाही. परप्रांतीयांचे लोंढे सुरूच आहेत त्यांना कोणताच अटकाव नाही. अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केलेले अक्षम्य घोटाळे अजूनही उघडकीस आलेले नाहीत. समित्या, अहवाल आणि चौकश्या या पलीकडे सरकार काही ठोस पावले उचलेल याची शक्यता शून्य टक्के आहे. चुकीच्या डिग्र्या लिहून जनतेची दिशाभूल मंत्री करत आहेत. धर्मांध वक्तव्ये करून समाजात तणावाचे वातावरण पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. काही मंत्री अंधश्रद्धेच्या आहारी जात आहेत. जनता ज्या रस्त्यावरून दररोज ये जा करते त्या रस्त्यांचे नशीब बदलण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. रस्त्यांची कंत्राटे दिली की खड्ड्यांची असा संभ्रम माणसांच्या मनात उत्पन्न होतो आहे. पर्यावरणाची अपरिमित हानी रोजच होते आहे. एक पाउस फक्त समस्त जनतेला समस्यांच्या पुरात लोटण्यास समर्थ आहे. नालेसफाईचा आजवरच्या शिरस्त्याप्रमाणे बोजवारा उडालेला आहे. हॉस्पिटलच्या आवारातील दुर्गंधी हटायला म्हणून तयार नाही. अनेक ठिकाणी रस्त्यावर साचलेले कचऱ्याचे ढीग व त्याभोवती घुटमळणारे कीटक आणि प्राणी सामाजिक आरोग्याला घातक आहेत.   
त्यात आता रोजच भाजप मंत्रांची नवनवीन प्रकरणे ऐकिवात येत आहेत. ती खरी आहेत असे विरोधक ठासून म्हणत आहेत तर ती सपशेल खोटी आहेत असे सत्ताधीश म्हणत आहेत. आपापले निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी पत्रकार परिषदा घेतल्या जात आहेत. दृक-श्राव्य माध्यमे आपल्या खास पद्धतीने अशा खमंग चर्चा घडवून आणून त्यांचे सादरीकरण जनतेला दाखवीत आहेत. अंगणवाड्या एकदम प्रकाशात आल्या आहेत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. तिथले शिक्षक, आया किंवा संबंधित लोकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. ई-टेन्डरिंग, दरकरार, GR  असे रोजच्या वापरत ऐकू न येणारे शब्द  जनतेचे लक्ष वेधून घेत आहेत. इतक्या कोटींची खरेदी केली पण ती अनेक अंगणवाड्यांत पोहोचलीच कुठे हा सवाल मंत्री महोदयांना विचारला जातोय. निकृष्ट दर्जाचे अन्न अंगणवाड्यांतील मुलांना कसे मिळते आहे याबद्दलची दृश्ये अनेक वाहिन्यांवरून प्रसारित केली जात आहेत. चिक्कीत सापडलेल्या अळ्या, गळके water filter, अवाजवी आकाराच्या चटया आणि असे बरेच काही चव्हाट्यावर येते आहे.शाळांत बसवल्या जाणाऱ्या fire extinguisher संबंधीही गैरव्यवहार झाल्याचे ऐकिवात आले आहे. 
पाच वर्षात १०० शहरांना 'स्मार्ट सिटी' करण्याचा संकल्प सुटलेला आहे.  प्राथमिक आरोग्य, सुविधा यांना दुर्लक्षून शहरांचा कायापालट करण्याच्या सरकारच्या कार्यक्रमाचे स्वागत करावे की त्यावर उपहासाने हसावे हेच कळेनासे झाले आहे. कोर्टाच्या रस्त्यावर सार्वजनिक सण साजरे न करण्याच्या आदेशाने अनेक राजकीय रथी-महारथींना पोटशूळ उठला आहे. त्यात मग नमाजाच्या वेळचे भोंगे विरुद्ध सणाच्या वेळी लाउड स्पीकर वर ठणाणणारी  गाणी असे डिबेट रंगते आहे. त्यातून वेगवेगळ्या राजकीय वादांना उधाण आले आहे. जो तो एकमेकांच्या राजकीय कारकीर्दीवर जमेल तसे शरसंधान करतो आहे. येनकेन प्रकारेन दुसऱ्या पक्षाची प्रतिमा मलिन करणे हा जणू प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क असल्यासारखा जो तो वावरतो आहे. यातून आणखी नवनवे वाद उपस्थित होत आहेत. अशी ही राज्य व्यवस्थेची वाटचाल सुरु आहे. यातून जनकल्याणाची कोणती विकासकामे होण्याची शक्यता आहे हे तो जगनियंता तरी सांगू शकेल याची शक्यता जवळजवळ शून्यच  आहे.            
त्यामुळे यापुढे सत्तेवर कोणतेही सरकार असो, ते सरकार आपल्याला 'सुशासन' द्यायला बांधील आहे असा कृपया कोणी गैरसमज करून घेऊ नये.
             

Saturday 4 July 2015

……… त्याच्या पियानोत 'लता' आहे


सुरांच्या साम्राज्यातील लता हे निर्विवाद आणि अंतिम सत्य मानलं तर होय ब्रायनच्या पियानोत लताचा वास आहे. म्हणजेच स्वरमाधुर्य आहे, सुरांवर असीम निष्ठा आहे, दोन शब्दांमधील अंतरात सौष्ठव आहे, लयीवर हुकमत आहे, गाण्यात अंतरात्मा आहे. जशी लता भावनेने ओथंबून गाते  तद्वत ब्रायनचा पियानोही गातो. दोन सुरांमधील आणि शब्दांमधील ठहरावाची त्याची भाषा आपल्याला अंतर्मुख करते. तहानभूक हरपून हातात घेतलेलं हे वाद्य आज अनेक अजरामर रचनांचा पुन:प्रत्यय आपल्याला आणून देत आहे.           
 दिलकी गिरह खोल दो, जाने क्या ढूंढती रहती है, धीरे धीरे मचल, कही दीप जले कही दिल, प्यार हुआ इकरार हुआ, जारे उड़ जा रे पंछी, रहे न रहे हम अशी एक ना अनेक गाणी आज ब्रायनच्या पियानोच्या मुशीतून बाहेर येऊन श्रोत्यांवर मोहिनी घालत आहेत. गाण्याचं कोणतही प्राथमिक शिक्षण नसताना त्याने त्याच्या आतील सुरांचा दिवा परिश्रमाने घासूनपुसून लख्ख केला आणि आपल्याभोवतीचा परिसर सुरांनी उजळवला. एखाद्या लाटेवर अलगद तरंग उमटावेत त्याप्रमाणे त्याच्या पियानोवर सुरांचे नानाविध तरंग उमटतात आणि रसिकांची मने काबीज करतात. त्याची बोटे अव्याहतपणे सगळ्या सप्तकांमध्ये लीलया संचार करतात आणि त्यातून चित्रपट संगीताचा इतिहास जिवंत होतो.           
वास्तविक पाहता पियानो हे वाद्य continuity म्हणजेच अखंडतेच्या दृष्टीने वाजवायला अवघड. परत गाणे वाजवायचे म्हणजे त्यातील मर्म नेमके पकडता आले पाहिजे. त्यातील ठराविक जागा beautify करता यायला हव्यात. त्यात चित्रपट संगीत म्हणजे लोक वर्षानुवर्षे ज्या गाण्यांवर जगत आले आहेत त्या गाण्यांतील गोडवा तसाच्या तसा श्रोतृमनात प्रतिबिंबित झाला पाहिजे. नुसती ध्रुवपद आणि कडवी नव्हेत तर interlude म्हणजे दोन कडव्यांमधील संगीतही लोकांना पाठ असते. ते तसेच्या तसे सादर झाले नाही तर असा कलाकार रसिकांना अपील होण्याची शक्यता कमी असते. परंतु ब्रायन सारखा कलाकार केवळ एवढ्यावरच थांबत नाही तर काही स्वरांवरील त्याने वाजवलेल्या बारीक, सूक्ष्म हरकती सुद्धा लाजबाब असतात. गाण्यातील मर्म त्याच्या पियानोने अचूक पकडलेले असते.        
ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांनी ब्रायनला दिलेली शाब्दिक पावती फार बोलकी आहे. ते म्हणाले, 'आपने तो मेरे गाने की रुह ही पकड ली'. जे काही माझ्या गाण्यात  द्यायचं राहून गेलं होतं तेही ते आपण अचूक वेधलत आणि गाण्याला चार चांद लावलेत. तसे ब्रायन फारसे बोलके नसावेत. जे काही बोलायचं आहे ते ते पियानोच्या माध्यमातून बोलतात. चेहऱ्यावर विशिष्ट अदब, नम्रता. सुरांशी तद्रूप होऊन गाणे वाजवणे हा त्यांचा धर्म आहे. मी वाजवताना बघा कशी चमत्कृती करतो आहे असा फाजील अविर्भाव त्यांच्या देहबोलीत औषधालाही नसतो. आपलं सुरांशी, संगीताशी नातं किती घनिष्ठ आहे हे त्यांचा पियानोच सांगत असतो. रसिकांनी दिलेली दाद ते काहीसे संकोचून अदबशीरपणे स्वीकारताना दिसून येतात.              
गाणी प्रेमाची असोत वा विरहाची, आनंदाची असोत वा दु:खाची ब्रायन त्यांना तितक्याच उत्तम रीतीने, त्यातील सौदर्य समजून सादर करतात. देशाविदेशात  ब्रायनने  पियानोला लताच्या, आशाच्या, रफीच्या, मुकेशच्या, किशोरच्या आवाजात गातं  केलं आहे. एखाद्या चित्रकाराच्या कुंचल्यातून सहस्त्र रंगांची उधळण व्हावी तशी ब्रायनच्या पियानोतून सुरांची उधळण होत असते.  लताने गाण्याच्या माध्यमातून तमाम रसिकांवर जे सुरांचे लोभस वार केले आणि लाखोंच्या आयुष्याची सुरावट बदलून टाकली तसेच लोभस वार ब्रायनही आपल्या पियानोतून रसिकमनावर चिरकाल करत राहोत हीच सदिच्छा!  


Friday 3 July 2015

भावनिक IQ - एक भले मोठे शून्य


बसने दिलेल्या धडकेत दोन तरुणी भीषण अवस्थेत रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. मात्र आजूबाजूचा जमाव त्यांना तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याऐवजी त्यांचे मोबाईल शूट करण्यात गुंतला होता. अतिशय संवेदनाहीन, निरुपयोगी, माणुसकी  हरवलेल्या गर्दीचा चेहरा या निमित्ताने सगळ्यांनीच अनुभवला. त्या मरणासन्न अवस्थेत पडलेल्या तरुणींमध्ये आपली जिवाभावाची एखादी व्यक्ती असती तर आपण असेच बघ्याची भूमिका बजावत राहिलो असतो का असा प्रश्न सुद्धा त्या गर्दीतील एखाद्याच्या मनाला शिवू नये हे नक्की कशाचे द्योतक आहे? आपण बौद्धिक आणि यांत्रिक दृष्ट्या पुढारलेले आणि भावनिक, नैतिक दृष्ट्या मागासलेले झालो आहोत का हे प्रत्येकाने तपासून घेणे अत्यावश्यक आहे. हातात मोबाइल असलेले आपण सर्व त्या यंत्राचाच आधार अशा वेळी  डावलतो आहोत का? ज्या रस्त्यावर पडल्या आहेत त्या तर आपल्या कुणीच नाहीत मग उगाच हा खटाटोप का करायचा आणि पोलिसांचा ससेमिरा हकनाक मागे का लावून घ्यायचा अशासारख्या विचारांनी आपण घेरले गेले आहोत का? मोबाइलवर ही भीषण दृश्ये चित्रित करून आपण काय मिळवणार?  भावनेचा लेशही नसलेली अशी आपण माणसं आहोत का? या आणि अशा प्रश्नांची उत्तरे मिळवायची वेळ आता नक्कीच आली आहे.    
भावना नावाची व्यक्तीच्या अंत:करणात स्त्रवत असलेली गोष्ट समूळ नष्ट झाली आहे का अशी शंका यावी अशी ही वर्तणूक आहे. कोंबड्यांची अथवा रेड्यांची रक्तबंबाळ होईपर्यंतची झुंज enjoy करण्याची मानसिकता ही अशीच निषेधार्ह आहे. अपंग मुलीवर आपल्या डोळ्यांदेखत बलात्कार होत असताना त्या गुन्हेगारापेक्षा अधिक संख्येने तिथे उपस्थित असलेली माणसे सुद्धा त्याला विरोध करू शकत नाहीत आणि आमच्याही वासना उद्दीपित होतील म्हणून आम्ही त्याला प्रतिकार करायला गेलो नाही असा अतिशय अधम पातळीवर स्वत:चा बचाव करू पाहतात हे धिक्कारार्ह आहे. मुळातच बघ्यांची भूमिका घेणे हा एक कलमी कार्यक्रम अशावेळी सर्वजण निष्ठेने निभावताना आढळतात.  
दमलेल्या बाबांची कहाणी तर सर्वश्रुत आहे पण दमलेल्या आईची कहाणी ऐकून किंवा प्रत्यक्ष अनुभवून तिची मनापासून सेवा करणारे हाताच्या बोटांवर मोजण्या इतपत तरी आहेत का? इथे भाषा लागते ती भावनेची. एखाद्याला वेदना होते आहे हे पाहूनही ज्याच्यात समानुभूतीची भावना उत्पन्नच होत नाही तो स्वत:ला माणूस कसा म्हणू शकतो? शिकून सवरून मोठे होऊन गलेलठ्ठ पगार घेणे आणि स्वत:ला यांत्रिकतेत बंदिस्त करून घेणे एवढेच आयुष्याचे संकुचित ध्येय राहिले आहे काय? याला आधुनिकता म्हणतात का? लहानपणी शाळेत शिकत असताना वाचलेल्या सुविचारांवर आज परिवर्तनाची इतकी धूळ साचली आहे की त्यामागील अक्षरेच आज धुसर झाली आहेत. शेजारच्या ब्लॉक मध्ये खून का पडेना आपल्याला काय त्याचे या विचारांनी भारलेली पिढी निर्माण झाली आहे का या भीतीने मनात चर्र झाल्याशिवाय राहत नाही.      
तसं बघायला गेलं तर आजचं शिक्षण हे 'money based' आहे , 'value based' नाही असे खेदाने म्हणावसे वाटते. झाडाची आभाळाकडे झेपावणारी फांदी झाडाच्या मुळाचे महत्व विसरू शकेल काय? Moral education नावाचा एक विषय पूर्वी शालेय अभ्याक्रमात असे.  आज त्याचे उच्चाटन झाले आहे की काय न कळे. मुके प्राणी, वृक्षवल्ली आणि आपल्यासारखी दिसणारी भोवतालची माणसे यांच्याप्रती भूतदया आणि कणव दाखवावी असे आपले कोणे एकेकाळी संत सज्जन सांगून गेले. त्यांचे विचार आम्ही चित्रपटात बघितले, पुस्तकात वाचले, अभ्यासक्रमात काही मार्कांसाठी आहेत  म्हणून अभ्यासले पण आचरले मात्र मुळ्ळीच नाही. दुसऱ्याची वेदना आपल्यातील भावनेची मुळे गदगदा हलवू शकत  नाही. अमक्या  ठिकाणी झालेल्या अपघातात इतके ठार असे आपण सहजगत्या म्हणू शकतो. रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जीवाची वेदना आपल्या डोळ्यांच्या कडा पाणावू शकत नाही. आपल्यातील माणुसकीच्या लोपलेल्या जाणीवेला आर्त साद घालू शकत नाही.             
'तू प्यार का सागर है,  तेरे इक बूंद के प्यासे हम' ही प्रार्थना ऐकल्यावर वाटत की खरंच त्या परमेश्वराच्या अंतरात पाझरणाऱ्या मायेच्या समुद्राचा एक थेंब तरी आपल्यात आज शिल्लक आहे का? आपण त्याचीच लेकरे आहोत ना? मग ही माया , ही ममता आपण कुणावर निछावर करण्यासाठी राखून ठेवली आहे? कुणाच्याही जखमेवर फुंकर घालण्याची क्षमता आपल्यात नाही का? कुणाच्या वेदनेवर ममतेची मलमपट्टी करण्याची ताकद आपल्यात नाही का? अहस्य वेदनेने, दु:खाने कुणी कळवळत असता त्याला तातडीने उपचारासाठी आपण शुश्रुषालयात घेऊन जाणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे असे समजत नाही का? उद्या हीच वेळ आपल्यावर आल्यास किंवा आपल्या जवळच्या कुणावर आल्यास आपण असेच उदासीन राहू शकू का? ही भावनिक, नैतिक बधिरता आपल्या माणूसपणाच्या अध:पतनाची पहिली पायरी नव्हे का? आपण इतके मेलेले आहोत का की कुणाची प्राणांतिक हाक सुद्धा आपल्यातील माणसाला जिवंत करू शकत नाही? आपल्यातील भावनेचा, असीम प्रेमाचा झरा वाहता करू शकत नाही?      
पैसा हे केवळ चरितार्थाचे साधन, प्रतिष्ठा हे शो ऑफ करण्याचे साधन आहे पण मनात रुजलेली माणुसकीची भावना हा या पृथ्वीतलावरील आपण माणूस असल्याचा आणि या देशाचे महत्तम नागरिक असल्याचा एक सबळ पुरावा आहे हे विसरून चालणार नाही.