Wednesday 30 December 2015

८६ वर्षांचं बहरलेलं कवित्व ….


                                              गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे
                                             ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे

या शब्दांप्रमाणे त्यांनी कवितेशी आणि गाण्याशी आत्यंतिक निष्ठा राखत आपल्या आयुष्याचेच गाणे केले. कवीच्या मनात गाणं असलं पाहिजे आणि गीतकाराच्या मनात कविता असली पाहिजे या पाडगावकरांच्या वाक्याने कविता आणि गीत या साहित्यप्रकारांचे एकमेकांशी नाते अधिक घट्ट केले.    

 'शुक्रतारा मंदवारा' या गीताने तर वर्षानुवर्षे अनेक युगुलांच्या मनात प्रेमाचा झरा वाहता ठेवला, त्यांच्या हृदयात बारमाही वसंत फुलवला आणि चांदण्यांची अव्याहत बरसात केली. 'डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी' या गाण्याने अनेकांची कातरवेळ अधिक गहिरी झाली. 'श्रावणात घननीळा' या गीताने अनेक रसिकांच्या मनातला मोरपिसारा सतत फुलत ठेवला.       
                                         अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेउनी जाती
                                         दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती

या ओळींनी एक चिरंतन वैश्विक सत्य सांगितलं.
                                         कुठे कुणाच्या घडल्या भेटी
                                        गीत एक मोहरले ओठी
                                       त्या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजूनही गाती

अशासारख्या त्यांच्या अनेक भावूक गीतांनी शेकडो रसिकांच्या मनात कायमचं घर केलं ज्याचं मोल करता येणं केवळ अशक्य आहे. 

पाडगावकरांची प्रतिभा निसर्ग कवितेतून खुलली, प्रेम कवितेतून फुलली, भाव कवितेतून तेवली आणि गझलेतून निनादली.
                                      डोळ्यांत जन्म सारा दाटून डोह झाला
                                     अश्रूत चंद्र माझ्या विखरून रात्र गेली
 

                                                          किंवा
                                    बागेत अक्षरांच्या जन्मास फूल आले 
                                   अपुल्याच अंतरीच्या रंगात फूल न्हाले

ही व्यक्त होण्यातील उत्कटता त्यांच्या अनेक गझलांतून आणि भावकवितांतून जाणवत राहते.      

वास्तवावर उपरोधिक भाष्य करणारी त्यांची 'सलाम' ही कविता किंवा
                                   जेव्हा राजरस्त्यावर कोल्ह्यांचा महापूर येतो
                                   आणि एकामागून एक कोसळतात मूल्यांची मंदिरे

यासारखे  नीतिभ्रष्ट माणसांवर ओढलेले शाब्दिक कोरडे किंवा
                                        मी पाहिले काचेचे संत
                                        भुश्शाचे आत्मे भरलेले
                                       झोपेच्या शब्दगोळ्यांचे घाउक कंत्राटदार
                                       रेशमी नेसून प्रवचने करताना

या सारख्या पाखंडी अध्यात्मवाद्यांना सुनावलेले खडे बोल किंवा
                                      हिप्नोटीस्टांनी हुकुम केला
                                      एकसाथ द्वेष करा
                                     आम्ही करकरा चावले सामूहिक द्वेषाचे दात

यासारख्या राजकीय संदर्भ असलेल्या कविता पाडगावकरांच्या सर्वकष जाणीवेच्या साक्षीदार होत्या.  

                                     शब्द खोल कळलेल्या समजूतदार दु:खासाठी
                                     शब्द निष्पापांच्या घावावर बांधण्यासाठी
                                     शब्द कालच्या काळोखाच्या विध्वंसासाठी
                                     शब्द नव्या पहाटेच्या दुर्दम्य आश्वासनासाठी

असे असंख्य चपखल शब्द योजून ज्यांनी स्वप्रतीभेने कविता आणि गाणं रसिकहृदयी विराजमान केलं त्या शब्द्प्रभूला माझी ही छोटीशी आदरांजली!


Monday 28 December 2015

'स्मार्ट सिटी' संकल्पाच्या निमित्ताने …….

भारतातील अनेक राज्यांना 'स्मार्ट सिटी' करण्याची अधिकृत घोषणा झाली आहे. पण जर बारकाईने पहिले तर यातील अनेक राज्यांतर्गत मुलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे, प्रदूषण, दारिद्र्य , भ्रष्टाचार, अत्याचार, अस्वच्छता व त्यामुळे होणारी रोगराई अशा अनेक अंतर्गत समस्यांनी कित्येक राज्यांना ग्रासलं आहे. या समस्यांचे निवारण न करता केवळ बाह्यस्वरूपी योजना अमलात आणणे हे म्हणजे हजारो व्याधींनी पछाडलेल्या व्यक्तीला केवळ उत्तम रंग-केश आणि वेशभूषा करून बसवल्यासारखे आहे.   
दिवसागणिक किंबहुना तासागणिक होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराचे समूळ उच्चाटन करण्यास शासन असमर्थ ठरले आहे. कायद्यात कोणत्याही कडक शिक्षेची योग्य ती तरतूद नसल्यामुळे लहान बालिका ते वयोवृध्द महिला या अत्याचारांना सतत बळी पडत आहेत. घरी व दारी या वाढत्या पुरुषी अत्याचाराच्या कहाण्या फोफावत आहेत आणि कोणत्याही कडक कायद्याअभावी या  विकृत मानसिकतेचे तण माजले आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढतेच आहे. गरिबीला कंटाळून, रेल्वेचा पास काढायला पैसे नाहीत म्हणून, शाळेची फी भरायला पैसे नाहीत म्हणून, कुटुंबाचे पोट भरायला पैसे नाहीत म्हणून अनेकजण आपले वय विसरून आपली मान फासाच्या ताब्यात देत आहेत. सरकार मगरीचे अश्रू ढाऴण्यात आणि एकमेकांवर दोषारोप करण्यात व्यग्र आहे.       

अनेक वेळा काही सार्वजनिक कामांसाठी रस्ते उकरले जातात परंतु काम झाल्यानंतर मात्र त्या रस्त्यांची जी काही अवस्था होते ती बघण्यासाठी या महानगरपालिकेतील अधिकारी चुकूनही फिरकत नाहीत. हा असा रस्ता म्हणजे अनेक अपघातांना खुले निमंत्रण असते. येणारे जाणारेही मनातल्या मनात या अधिकाऱ्यांच्या नावाने बोटे मोडत राहतात आणि अशा अपघातप्रवण रस्त्यांवरून सर्व वाहनांची येजा तशीच चालू राहते.   
ठिकठिकाणी जाहीर समारंभ, सोहळे, जत्रा, मेळावे अव्याहत चालू असतात.  रोषणाईवर वारेमाप पैसा उधळला जातो. वीजही फुकट जाते. याशिवाय खरा उच्छाद असतो तो ठणठणा वाजणाऱ्या गाण्यांचा. उत्तम ऐकू येत असलेल्यालाही कर्णबधीर करतील इतक्या जोरात ही गाणी सुरु असतात. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांत कुणी नुकतीच जन्मलेली बालके किंवा रुग्ण असू शकतात. तक्रार केल्यास दमदाटीचे भय असते. या ध्वनी प्रदूषणाच्या समस्येवर अजून तरी कोणताही प्रभावी तोडगा निघाल्याचे ऐकिवात नाही.            
आता अट्टल गुन्हेगारांबरोबर शाळेतील शिक्षकही मुला-मुलींवर अत्याचार करण्यास सरसावत आहेत. वरून शिक्षकी पेशाचे वेष्टन घालून आत नराधम वावरत आहेत. सगळ्यात 'easy targets' म्हणजे लहान मुले व असहाय्य मुली. या मुलांच्या निरागसतेचा फायदा घेत या मुलामुलींना याच्या आयुष्यातून उठवून, त्यांचे भविष्य अंध:कारमय करून हे पापी उजळ माथ्याने समाजात वावरत आहेत. यांना कसलाही निर्बंध, धाक, वचक उरलेला नाही. भावी पिढीचे असे अतोनात नुकसान करणाऱ्यांना कायद्यात नक्की कोणती शिक्षा आहे?    
रस्त्यावर जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग व त्यावर सर्रास वावरणाऱ्या घुशी, कुत्रे , कीटक, साचलेल्या पाण्याची डबकी, उघडून ठेवलेली गटारे व त्यातून वाहणारी दुर्गंधी  आणि हे सर्व जातायेता अनुभवणारे पादचारी असे दैनंदिन दृश्य अनेक ठिकाणी पाहायला मिळते. स्वच्छ भारत अभियानाचे तीन तेरा वाजवणारी ही दृश्ये 'स्मार्ट सिटी' ची घोषणा करणाऱ्यांनी सोयीस्कर रित्या डोळ्यांआड केली आहेत का असा प्रश्न पडतो.     
देशाचे संरक्षण करणाऱ्या पोलिसदलाची अवस्था बरी म्हणण्याइतपत तरी आहे का? त्यांना राहायला चांगली घरे नाहीत, कसल्याही सोयी नाहीत, व्यवस्थित म्हणावा असा पगार नाही आणि त्यांच्यावर लादलेला कामाचा अतिरिक्त ताण हे सगळे केवळ मजबुरी म्हणून त्यांनी कधीपर्यंत सोसायचे? आपल्या मासिक पगारात जर त्यांना घरच्यांच्या किमान गरजाही भागवता येणार नसतील तर त्यांचा हात टेबलाखाली जायचा राहील का? म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार करावा असे मुळीच नाही पण त्यांना स्वत:च्या किमान गरजा पूर्ण करण्याचा हक्क तरी आहे की नाही? यासाठी कोण जबाबदार आहे?   
अनेक सरकारी शाळांची दुरावस्था, तिथे शिक्षण घेण्याऱ्या मुलांची हलाखीची स्थिती, कुपोषणामुळे बालकांचे ओढवणारे मृत्यू, अस्वच्छतेमुळे पसरणारी रोगराई, लहान मुलांची तस्करी, बालमजुरी, साक्षरतेपासून वंचित राहणारी अनेक मुले, अंधश्रद्धांच्या आहारी जाऊन घेतले जाणारे बालकांचे बळी, वाईट संगतीत फसली जाणारी शाळकरी मुले अशा अनेक समस्यांकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची आज गरज आहे अन्यथा देशाला पुढे घेऊन जाणारी ही भावी पिढी स्वत: तर अज्ञानाच्या अंधारात खितपत तर पडेलच पण देशाचे भविष्य सुद्धा अंध:कारमय झाल्याशिवाय राहणार नाही.          
शाळेत एखादा विषय कमी केला तरी चालेल पण मुलांना पर्यावरणाचे महत्व, सहृदयता, काही मुलभूत संस्कार जसे प्रेम, ममत्व, आदर, सहिष्णुता, मानवता यांचे शिक्षण मिळायलाच हवे जेणेकरून नुसतीच पैशांसाठी उरीपोटी घोडदौड करणारी मानवी यंत्रे निर्माण न होता त्यातून उद्याचे उत्तम मागारिक निर्माण होतील.    
वयोवृद्धांसाठी सुरक्षेचा प्रश्नही दिवसेंदिवस बिकट होतो आहे. वार्धक्यात अनेकांना घरी एकटे राहण्याचा प्रसंग येतो अशावेळी त्यांना सुरक्षेची नितांत आवश्यकता असते. केवळ काही पैशांसाठी आजवर अनेक वृद्धांची हत्या झाली आहे. यात फक्त बाहेरचेच नाहीत तर बरेचवेळा कुटुंबीयही सामील असतात. अनेक वृद्धांना वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पोखरून टाकत असतो. यावर उपाययोजना आखली गेली पाहिजे. त्यांच्या अनुभवाचा तरुणांना फायदा होण्यासाठी शासनाने मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत म्हणजे त्याद्वारे या अनुभवी लोकांना इतरांसाठी काही केल्याचे समाधान मिळेल आणि आर्थिक  दृष्ट्याही  कोणावर अवलंबून राहण्याची पाळी त्यांच्यावर येणार नाही शिवाय वेळेचेही उत्तम नियोजन होईल.      
आजकालच्या तरुणांवर कामाचा अनावश्यक ताण असतो. त्यांच्या ऑफिसला जायच्या वेळा जरी निश्चित असल्या तरी यायच्या नसतात. सतत संगणकासमोर बसून डोळे आणि पाठ यांच्या व्याधी निर्माण होतात. 'targets' achieve करण्यासाठी जीवाचे रान करणारी ही तरुण पिढी अवघ्या तिशी-चाळीशीतच अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांनी ग्रस्त होते. वाढती महागाई, changed life style आणि बाहेर चाललेली जीवघेणी स्पर्धा यामुळे या तरुण पिढीची अतोनात दमछाक होते. ते कुटुंबालाही पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. घरचे सकस अन्न पोटात न जाता बरेचवेळा हॉटेल मधील अन्न, fast food खाउन पोटाची भूक शमवली जाते. मुलांनाही योग्य वयात त्यांच्या आई-वडिलांचा सहवास न मिळाल्याने ती हट्टी, बेपर्वा,
असंस्कारक्षम, संवेदना हरवलेली, कोरडी तसेच एकलकोंडी होऊन जातात. या सततच्या कामाच्या ओझ्याखाली अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधींना आमंत्रण देणारया तरुण पिढीसाठी काही ठोस पावले उचलण्याची आत्यंतिक गरज आहे.                     

याशिवाय सार्वजनिक ठिकाणी उत्तम आणि स्वच्छ प्रसाधनगृहे उभारण्याची आवश्यकता आहे जेणेकरून रस्त्यावर इतरत्र घाण होणार नाही. चाकरमान्यांच्या प्रवासांतर्गत सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली पाहिजे जेणेकरून कामाच्या वेळा कोणत्याही असोत त्यांना प्रवासाचे आणि प्रवाशांचे  भय वाटणार नाही.          
आजमितीला अशा कैक समस्या आपल्या कराल दाढा उघडून उभ्या आहेत. त्यांचे वेळीच निराकरण करण्यात सरकारचे आणि पर्यायाने जनतेचे हित आहे. या समस्या तशाच ठेऊन स्मार्ट सिटी योजना राबवाल तर भविष्यात ही सिटी सगळ्याच निकषांवर 'poor' सिटी म्हणून घोषित करावी लागेल.   

Thursday 24 December 2015

माझ्यातील 'मी' ची खरी ओळख …

मी कोण आहे  किंवा कोहं यासारख्या प्रश्नांची कोडी सोडवता सोडवता केस पांढरे होतात. सगळ्यांनाच असे प्रश्न पडतात असेही नाही. पण खरंच माझ्यात वसणाऱ्या या 'मी' ची ओळख जर आपण कुतुहलापोटी का होईना पण करून घेतली तर आपले आयुष्य रंजक व्हायला मदत होईल. धर्मभेद, जातीभेद, श्रेष्ठ-कनिष्ठ यांच्यातील वाद संपुष्टात येतील. प्रत्येकाची इहलोकीची यात्रा सुखकर होईल.         
जन्मत: आपल्याला शरीर मिळतं. पण हे शरीर म्हणजे मी आहे का? यथावकाश या शरीराला एक नाव मिळतं. मग हे नाव म्हणजे मी आहे का? आपल्याला नाती मिळतात. पालक मिळतात.  मित्र-मैत्रिणी मिळतात.  आपल्याला शिक्षण मिळते. डिग्री मिळते. नंतर नोकरी मिळते. नात्यांचा परीघ वाढत जातो. लग्न होते. घरी-दारी आपल्या संपर्कात येणाऱ्या माणसांची संख्या वाढतच जाते. मग काही काळानंतर आपल्याला मुले होतात. संसार विस्तारतो. तारुण्याकडून आपण प्रौढत्वाकडे झुकतो व नंतर वृद्धत्वाकडे. आता नातवंडे आपल्या अवतीभवती वावरू लागतात. आपली आजी-आजोबांची धुरा आपण आनंदाने सांभाळू लागतो. बाल्य-तारुण्य-प्रौढत्व-वार्धक्य या अवस्थेनंतर या शरीरावरील आपला हक्क डळमळीत व्हायला लागतो आणि कधीतरी या शरीरातील 'मी' चा प्रवास संपून जातो. पण 'मी' मात्र संपत नाही. ही यात्रा युगानुयुगे सुरूच राहते.                     
'Energy can never be created and destroyed' हे वाक्य आपण विज्ञानाच्या संदर्भात अनेकदा ऐकलेले असते. परंतु माझ्या शरीरातील 'मी' म्हणजे हाच 'energy form' आहे हे किती जणांना ठाऊक असते? आपल्या आजूबाजूला वावरणारी अनेकविध माणसे म्हणजेच असे अनेकविध 'energy forms' असतात. आता हा energy form म्हणजे 'spirit' म्हणजेच 'आत्मा'. आत्मा हा शब्द उच्चारताच मेलेल्या माणसांचे इच्छा अतृप्त राहिलेले, पिंडाला न शिवणारे, पिशाच्चयोनीत भटकणारे असे काही चित्र आपल्या डोळ्यासमोर तरळते. परंतु शरीरात राहून जीवन व्यतीत करणारेही आत्मेच असतात.              
आपल्याला माता -पित्यांकडून नाव मिळाल्यानंतर आपला एक धर्म, एक जात निश्चित होते. हा हिंदू, तो मुस्लिम, तो शीख, तो पारशी, हा ब्राम्हण, तो कायस्थ, तो क्षत्रिय अशी धर्माची आणि जातीची वर्गवारी निश्चित होते. आखलेल्या रुळांवरून आपल्याला आता मार्गक्रमणा करायची असते. आपण मी हिंदू आहे किंवा मी मुस्लिम आहे असे अभिमानाने सांगतो. पण माझ्यातील 'मी' हा हिंदू वा मुसलमान वा ब्राम्हण वा क्षत्रिय कधीच नसतो. तर तो या जात, धर्म, पंथाच्या पलीकडे असतो. मी 'Indian' आहे असे सांगण्याऐवजी मी India या देशात जन्म घेतला आहे असे का म्हणत नाही? मी हिंदू आहे असे म्हणण्याऐवजी 'this is my way of connecting to Him' असे का म्हणत नाही त्याचप्रमाणे दुसऱ्या धर्मबंधूबद्दल 'that is his way of connecting to Him' असे का म्हणत नाही? यामुळे धार्मिक तेढ न वाढता धार्मिक सामंजस्य वाढू शकेल. कोणताही धर्म असो, त्याचा अंतिम उद्देश त्या 'source of light' ची उपासना करणे व त्याच्या जवळ जाता येणे हाच असतो ना?  एखाद्या जातीबद्दलसुद्धा मी ब्राम्हण असा वृथा अहंकार न बाळगता 'this is my way of functioning' असे का बरे म्हणत नाही? प्रत्येकाचा धर्म आणि जात वेगवेगळी असेना का त्यातून परस्पर सलोख्याची भावनाच निर्माण होणे अभिप्रेत असते. माणसाशी माणसासारखे वागणे हा माझ्यातील 'मी' चा सर्वोच्च धर्म असायला हवा व त्या दृष्टीने माझे आचरण असायला हवे.      
रंगभूमीवर वावरणारा नट त्याच्या वाट्याला आलेली भूमिका जीव ओतून करतो. रसिकांकडून 'appreciation' मिळवतो पण शो संपल्यावर त्या भूमिकेपासून अलिप्त होतो. या इहलोकात आपल्यापैकी प्रत्येकाच्याच वाट्याला काहीनकाही भूमिका येतात. मुलगी-मुलगा,बहिण-भाऊ, आई-वडील, आजी-आजोबा, मित्र-मैत्रीण अशा अनेक भूमिका आपण वठवत असतो. शिक्षण संपल्यानंतर काही व्यावसायिक भूमिकाही आपल्या वाट्याला येतात. त्याही आपण इमाने-इतबारे करतो. डॉक्टर, इंजिनियर, बिझनेसमन, शिक्षक, गायक-वादक, नर्तक, शिल्पकार अशा असंख्य लौकिकार्थाने कमी-जास्त प्रतिष्ठेच्या भूमिका प्रत्येकाच्या वाट्याला येतात. पण घरी-दारी या भूमिका करताना आपण त्याच्याशी इतके तादात्म्य पावतो की एक दिवस हा शो संपणार आहे हे भान बहुसंख्य लोकांना राहत नाही. यामुळे आपल्या वाट्याला येणारे सुख-दु:खाचे भोग आपण विचलित न होता भोगू शकत नाही.              
मी डॉक्टर आहे आणि तो माझा ड्रायव्हर आहे. अर्थात माझी सामाजिक प्रतिष्ठा त्याच्यापेक्षा मोठी आहे. त्याने माझ्याशी अदबीने वागायलाच हवे पण माझे त्याच्याशी वागणे हे मात्र माझ्या लौकिकाला साजेसे असेच असले पाहिजे. त्याला माझे वरिष्ठपण जाणवून देणे गरजेचे आहे. इथे एक 'मी' दुसऱ्या 'मी' शी संवाद साधत नसून माझा हुद्दा दुसऱ्या हुद्द्याशी संवाद साधतो आहे. माझी सामाजिक प्रतिष्ठा माझ्यासारख्याच दुसऱ्या 'मी'ला ओळखण्याच्या आड येते आहे. आम्ही फक्त दोन वेगळ्या भूमिका निभावतो आहोत आमच्या संस्कारांच्या माध्यमातून पण ती energy मात्र दोन्हीकडे एकच आहे हे स्वीकारायला मन तयार होत नाही. जाती,धर्म या बरोबर अशी शिक्षणानुसार, व्यवसायानुसार सामाजिक प्रतिष्ठेची वर्गवारी सर्रास केली जाते आणि आपण त्याप्रमाणे आपले आचरण करत राहतो.             
अगदी बाल्यावस्थेपासून ते वृद्धत्वापर्यंत ही सामाजिक व्यवस्था जशीच्या तशी आपण स्वीकारतो आणि आपल्या प्रेमात, आनंदात, सुखात अडसर निर्माण करून ठेवतो. आतल्या 'मी' च्या सत्चित स्वरूपावर हे असे धर्माचे, जातीचे, रंगरूपाचे, शिक्षणाचे, सामाजिक प्रतिष्ठेचे मळभ साचत जाते आणि त्यालाच आपण खरे मानून चालत राहतो.        
माझ्यातला 'मी' हा कृष्णासारखा असायला हवा. नानाविध लीला करूनही त्यात रममाण न होणारा. सुख-दु:खाच्या प्रसंगी 'स्व'भान हरपू  न देणारा. सगळीकडे असूनही नसणारा. कार्यरत तरीही अलिप्त. द्वेष,असूया,अहंकार, लोभ,मोह, भय यांनी लिप्त नसणारा आणि प्रेम, शक्ती, संयम  आणि शांततेची उटी यांच्या लिंपणाने अवकाश सुगंधित करणारा! तेजोमय ब्रम्हाशी सादृश्य सांगणारा!   

    

टीप: या ब्लॉगमधील संपूर्ण विचार माझे नाहीत. एका spiritual teacher चे आहेत. तिच्या विचारांनी प्रभावित झाल्यामुळे ते विचार मातृभाषेत लिहिण्याचा मोह मला आवरला नाही म्हणून हा प्रपंच!             

Tuesday 22 December 2015

मनातील गुन्हेगारी न बदलू शकणारा कायदा ……


निर्भया प्रकरणातील वयाने 'बाल' पण कृतीने 'प्रौढ' असलेला आरोपी सुटला आणि संपूर्ण देशात गदारोळ उठला. निर्भयाच्या पालकांना त्यांना झालेल्या वेदनांची पुन्हा एकदा उजळणी करावी लागली. बाल आरोपीचे नक्की कोणते वय शिक्षेसाठी ग्राह्य धरावे यावर अनेक वाहिन्यांवर खल सुरु झाला. अनेक विचारवंतांची मते पुन्हा एकदा चर्चेत आली. अखेर त्या दृष्टीने राजकीय हालचाली सुरु झाल्या आणि १८ ऐवजी १६ असे वय शिक्षेसाठी निश्चित करण्यात आले. तसा कायदा संमत झाला. ही बाब कितीही स्तुत्य असली तरी या नव्या कायद्यामुळे सामाजिक परिवर्तन होऊन बाल गुन्हेगारीला आळा बसेल किंवा हा नवा कायद्याचा बडगा मुलांच्या मनात भीती निर्माण करू शकेल व त्यामुळे अशा गुन्ह्यांचे प्रमाण घटेल असे समजणे हा बालिशपणा ठरेल.         
मूल हे दोन ठिकाणी घडत किंवा बिघडत असते. एक म्हणजे घर आणि दुसरे म्हणजे शाळा. एखाद्या चांगल्या अथवा वाईट कृतीची पहिली पायरी म्हणजे विचार. विचारात आचाराची बीजे असतात. शाळेत भिंतींवर सुविचारांच्या अनेक पाट्या असतात पण यातील विचार विद्यार्थ्यांच्या मनात खरोखर बिंबले गेले आहेत की नाही हे पडताळून पाहण्याची नैतिक जबाबदारी किती शाळा घेतात? घरात किती पालक मुलांच्या मनात चाललेल्या उलटसुलट विचारांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करतात? मुलांचा आचार हे त्यांच्या मनातील विचारांचे प्रकटीकरण असते हे पालक आणि शिक्षक यांना समजू शकत नाही का? उत्तम मार्क मिळवलेला आणि शाळेत अव्वल आलेला मुलगा अथवा मुलगी मनाने निकोप आणि निरोगी आहेत याची ग्वाही शिक्षक वा पालक देऊ शकतात का? 'value education' अशा नावाचा एक विषय शाळेत केवळ देखाव्यापुरता लावला जातो. यातून खरंच काही 'value addition' होते आहे का हे तपासून पाहण्याची जबाबदारी कुणाची?    
आजकाल ज्याच्या त्याच्या हातात मोबाईल नामक खेळणे असते. लहान लहान मुले त्यावर बघू नये ती दृश्ये घोळक्याने बघत रस्त्यावर उभी असतात. मग त्यावर अचकट -विचकट चर्चा करतात. अत्यंत बीभत्स बोलतात. अशावेळी त्यांच्यातील 'बाल्य' लुप्त होते. त्यांचे हातवारे अन हावभाव प्रौढ माणसांसारखे होतात. वाईट विचार करण्यासाठी वय नसतं पण आचार करण्यासाठी मात्र वय निश्चित केलं जातं. आता १६ वयोमानाची व त्याखालील मुले असा अश्लाघ्य विचार आणि आचार करायला मोकळी आहेत कारण त्यांना गुन्हा केल्यानंतर शिक्षा म्हणून निरीक्षण गृहात पाठवलं जाईल पण यापलीकडे काही होणार नाही. या कायद्यामुळे १६ ते १८ वयोगटातील मुले घाबरून जातील असे समजण्याचे कारण नाही कारण कायद्यात पळवाटा बऱ्याच आहेत शिवाय वयाचे खोटे दाखलेही देता येतातच की! असा एखादा कायदा ही नुसती वरवरची मलमपट्टी आहे पण समाज पोखरत चाललेल्या या विचार व आचारांच्या वाळवीला समूळ उपटून टाकण्यास हा कायदा असमर्थ आहे.  
सामाजिक परिवर्तन हवे असेल, चांगला आचार मुलांच्या हातून घडायला हवा असेल तर त्यासाठी चांगला विचार करण्यास या मुलांना उद्युक्त करायला हवे. या मुलांना मुक्या प्राण्यांच्या, छोट्या बालकांच्या सहवासात राहायला देऊन त्यांच्या मनात सहृदयता जागी करायला हवी. त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात जास्तीत जास्त राहू द्यावे कारण निसर्ग हा परमोच्च गुरु आहे. समाजकल्याणासाठी झटणाऱ्या विचारवंतांचे चरित्र या मुलांना उलगडून सांगण्याची आज नितांत गरज आहे. चांगल्या विचारांची बीजे मुलांच्या मनात रुजवण्यासाठी पालक आणि शिक्षक या दोन्ही आधारस्तंभांनी कार्यरत होण्याची आज सर्वात जास्त गरज आहे. काय बघावे, काय बघू नये, काय बोलावे, काय बोलू नये, काय ऐकावे, काय ऐकू नये याचप्रमाणे विचार कसा करावा वा कसा करू नये याविषयी मुलांना लहान वयातच जागरूक करायला हवे. नाहीतर अशा मुलांची अभ्यासातील प्रगती चांगली होऊन सुद्धा वैचारिक प्रगती खुंटेल. मुलाने मिळवलेल्या चांगल्या मार्कांची जरूर प्रशंसा करा पण त्याचे विचार योग्य मार्गानेच पुढे जात आहेत ना याचीही खात्री करून घ्यायला विसरू नका.                
आमची पिढी आजी-आजोबांनी सांगितलेल्या कर्तृत्ववान माणसांच्या गोष्टी ऐकत मोठी झाली. आज आजी-आजोबा ही संस्थाच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे आई-वडिलांची जबाबदारी अधिक वाढली आहे. थोर पुरुषांच्या स्फूर्तीदायक कथा मुलांच्या संस्कारक्षम मनावर उत्तम परिणाम करून त्यांना भावी आयुष्यात सत्प्रवृत्त होण्यास खचित मदत करू शकतात. मुलांना नुसतं साक्षर करून उपयोग नाही तर त्यांना सुसंस्कृत करणं आवश्यक आहे. त्यांच्या भरकटणाऱ्या नावेला सुयोग्य दिशा हे पालक आणि शिक्षक सहज दाखवू शकतात फक्त त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे.        
शिक्षेसाठी वय १६ की १८ ही चर्चाच गौण आहे. मुळात असे गुन्हे घडूच नयेत यासाठी सामाजिक घटकांनी सजग राहायला हवे. 'मुले हीच राष्ट्राची खरी संपत्ती' अशा घोषणा देत आम्ही वर्षानुवर्षे बालदिन साजरा केला. आता 'मुले हीच राष्ट्राची खरी आपत्ती' असे म्हणायची पाळी या समाजावर कधीही येऊ नये एवढीच पार्थना तमाम पालक आणि शिक्षकांच्या चरणी!     

Thursday 17 December 2015

लोकलचा जीवघेणा प्रवास ….


माझ्या सुदैवाने मला अशा ओसंडून वाहणाऱ्या लोकलमधून फारसा प्रवास करावा लागला नाही. नोकरीच्या निमित्ताने अगदी अल्पकाळ मी लोकलमधून ऑफिस अवर्समध्ये प्रवास केला. अर्थात त्यावेळेस या प्रचंड गर्दीची आणि त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीची झलक नक्कीच पाहायला मिळाली. लोकलमधून प्रवास करणे म्हणजेच जीव मुठीत धरणे. ह्या दैवभोगाला ज्यांना रोज सामोरे जावे लागते त्यांच्या हालाची कल्पनाही करवत नाही.      
माझी एक आत्या कांदिवली ते वसई दरम्यान नोकरीसाठी प्रवास करायची. तिचा किमान दोन ते तीन वेळा चढता-उतरताना हात मोडला होता. म्हणजे नोकरी तर अपरिहार्यपणे करायची आणि रेल्वे प्रशासनाकडून असा बोनसही मिळवायचा.  दादरला उतरताना आपले दोन्ही पाय गमावून बसलेली व त्यानंतर जीवही गमावून बसलेली तसेच भर गर्दीत आपला केवळ वीस वर्षाचा जीव गमावलेला असे दोघे माझ्या सोसायटीमधील होते. अशी असंख्य उदाहरणे आपल्या अवतीभवती वावरत असतात. कुणाला परत एकदा जगण्याची संधी मिळते तर कुणापासून ती पहिल्या फटक्यातच हिरावून घेतली जाते. कुणी अपघातानंतर जन्मभर अपंगावस्थेत जगण्याची शिक्षा भोगतात.       
प्रचंड वाढती लोकसंख्या आणि अपुरी वाहतुकीची साधने यामुळे हे दुष्परिणाम चाकरमान्यांना रोज सहन करावे लागतात. शहरे 'स्मार्ट' करण्याआधी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे व त्यासाठी काही कडक उपाययोजना करणे, जास्तीत जास्त वाहतुकीची साधने उपलब्ध करून देणे, ओव्हरहेड वायर्स, पेंटोग्राफ याविषयी जागरूक असणे, गाड्या 'डिरेल' न होण्याची खबरदारी घेणे, ज्या लोकांच्या जीवावर सरकार निवडून आलं आहे त्या जनतेचा दैनंदिन प्रवास सुखकर व्हावा यासाठी कार्यरत राहणे याचे भान सत्ताधारयांनी सतत ठेवले पाहिजे.  

रेल्वे अपघात झाला की पीडितांना तात्पुरती मदत देऊन, वाहिन्यांना काही 'इमोशनल बाइट्स' देऊन प्रशासन हात झटकते. रोज वाढत जाणारी platform वरील गर्दी, गाड्यांची अनियमितता, खिसेकापू, भिकारी, फेरीवाले यांची गर्दीतील अव्याहत लुडबुड, प्रसाधनगृहांची कमालीची अस्वच्छता, रेल्वे वेळापत्रकाचा उडालेला बोजवारा, त्यात कधी येणारी नैसर्गिक तर कधी यांत्रिक संकटे यामुळे लोकलने प्रवास करणे  म्हणजे मागील जन्मी केलेल्या पातकांचे प्रायश्चित्त घेणे असे वाटू लागले आहे. गरोदर बायका, लहान मुले आणि वृध्द यांनी या रेल्वेच्या माध्यमातून प्रवास टाळावा इतपत हा प्रवास असुरक्षित झाला आहे.     
लोकल स्टेशनात आली की मागचा-पुढचा विचार न करता लोक धावत सुटतात.  'सीट' मिळवण्याची प्रत्येकालाच इतकी घाई असते की त्यापायी आपण कुणाचे शारीरिक नुकसान तर करत नाही याचे साधे भानही कुणाला उरत नाही. भर गर्दीच्या वेळेस लोकलमधून इच्छित स्थळी चढणे आणि उतरणे हा एक जीवावर येणारा अनुभव असतो. रेल्वेच्या डब्यात भल्या सकाळी प्रवास करणे हा एक दुर्गंधीयुक्त असाही अनुभव असतो. गाडीच्या दुतर्फा हेच दृश्य असते आणि ते फुटबोर्ड वर उभे राहणाऱ्यांना इच्छा असो वा नसो पण बघावेच लागते. गाडीत सीट वरून भांडणे, गलिच्छ शिवीगाळ हेही नित्याचेच असते. काही वेळेस मारामारीपर्यंत हे वाद जातात. रोज या नरकातून जाण्यापेक्षा मरण बरे अशी अनेकांची भावना असते.             
हे सारे वर्षानुवर्षे तसेच आहे. तसूभरही बदललेले नाही. चाकरमान्यांचे लोंढे मात्र दिसामाशी वाढताहेत. संकुचित आकाराच्या ब्रिजवरून  येणारी-जाणारी भीषण गर्दी बघून चेंगराचेंगरीच्या अपघाताचे सतत भय वाटत राहते. सकाळी रेल्वेमधून गेलेली आपल्या घरातील व्यक्ती सुखरूप परत येईल ना अशी शंका अनेक गृहिणींच्या, वडीलधारयांच्या मनात डोकावल्याशिवाय राहत नाही. शहरे आधुनिक आणि स्मार्ट बनवायची आणि जनतेच्या दैनंदिन गैरसोयी, मुलभूत गरजा दुर्लक्षित करायच्या या प्रशासनाच्या अजब न्यायाविरुध्द आवाज उठवण्याची आज खरी गरज आहे.   
मुंबईची 'लाईफ लाईन' असे जिचे वर्णन केले जाते ती लाईफ देणारी आहे की हिरावून घेणारी आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आज आली आहे.   

Monday 14 December 2015

बाजीराव -मस्तानी ….


संजय लीला भन्साळी यांचा बाजीराव-मस्तानी हा बहुचर्चित चित्रपट येत्या १८ तारखेला चंदेरी पडद्यावर झळकणार आहे. यातील गाण्यांचे प्रोमोज टीव्ही वर दाखवले जात आहेत. भन्साळी यांनी म्हणे तब्बल बारा वर्षे या चित्रपटाची अभ्यासपूर्ण तयारी केली(?) बाजीराव हे खंदे लढवय्ये होते. मस्तानीचा  उल्लेख 'नाटकशाळा' असा केला जायचा. काशीबाई या बाजीरावांच्या भार्या असून त्या शालीन आणि कुलीन अशा स्त्री होत्या. त्यांची मस्तानीबरोबरची उठबस ही अशक्यप्राय कोटीतील गोष्ट होती. शिवाय बाजीराव हे फक्त नाच-गाण्यात रमणारे राज्यकर्ते नसून एक शूर आणि निष्णात राजकारणी म्हणून त्यांचा लौकिक होता. या पार्श्वभूमीवर या आगामी चित्रपटातील बाजीरावांवर चित्रित केलेले आणि काशीबाई आणि मस्तानी या दोघींवर चित्रित केलेली गाणी पूर्णपणे आक्षेपार्ह आहेत.          
इतिहासाच्या निरीला हात घालताना तो जरा जपूनच आणि अवधान सांभाळूनच घालावा लागतो हे भन्साळी यांना कुणीतरी सांगायला हवे. अनेक दस्तऐवजातून  आणि चरित्रातून ह्या अलौकिक व्यक्तींच्या उज्ज्वल प्रतिमा करोडो लोकांच्या हृदयात कोरल्या गेलेल्या असतात. या अशा लोकोत्तर पुरुषांचे तेजोमय कर्तृत्व हे अनेकांसाठी एक स्फूर्तीस्थान असते. त्यांचे खाजगी आयुष्य हा फक्त त्यांच्या संपूर्ण जीवनातील एक भावनिक कप्पा असतो जो इतरांसाठी बंद असतो. अशा वीरांचे खाजगी आयुष्य चव्हाट्यावर आणून जणू काही अशा प्रकारचेच जीवन बाजीराव जगत होते हे दाखवण्याचा खटाटोप या चित्रपटाच्या निमित्ताने केला जात आहे.  
शिवाजी महाराजांचे खाजगी आयुष्य अथवा ज्या शूरांनी स्वपराक्रमाने इतिहास घडवला त्यांचे खाजगी जीवन अधोरेखित करून काय साधले जाणार आहे? ज्या व्यक्तींशी आपले नाते हे केवळ त्यांच्या असाधारण कर्तृत्वामुळे जोडले जाते त्या व्यक्तींच्या खाजगी जीवनाचा उहापोह चित्रपटाद्वारे करून कोणता संदेश जनमानसात दिला जातो याचे भान ठेवणे नितांत गरजेचे आहे. ज्या नव्या पिढीतील तरुणांनी बाजीरावांना कधी इतिहासातून अथवा कथा-कादंबरी यांच्या माध्यमातून अनुभवलेच नाही अशा व्यक्तींना बाजीरावाची ही पडद्यावर साकारली गेलेली प्रतिमाच खरी वाटू लागेल.  जे जाणते आहेत आणि बाजीरावांचे लढवय्येपण ज्यांनी इतिहासातून अनुभवले आहे  त्यांना ही गाणी म्हणजे बाजीरावांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रतिमेचे धिंडवडे वाटल्याशिवाय राहणार नाहीत.    
केवळ भव्य-दिव्य आणि दिमाखदार सेट्स लावून, नट्यांना भरजरी साड्या आणि दागिन्यांनी मढवून इतिहासाची पाठराखण करता येत नाही. लोकांची दिशाभूल मात्र जरूर करता येते. भन्साळी यांच्या चित्रपटातील सोहळे जरी कितीही नेत्रदीपक असतील तरी त्यांनी हे लक्षात घ्यावे की अशा महापुरुषांचे कार्य हेच मुळी जनसामान्यांचे डोळे दिपवणारे होते.  बाजीरावांचे फक्त मस्तानीवर प्रेम नव्हते तर त्यांच्या तख्तावर, राज्यातील जनतेवर आणि त्यांच्या नसानसातून स्त्रवत असलेल्या शौर्यावरही त्यांचे निस्सीम प्रेम होते. त्यांची निष्ठा नाच-गाण्यापेक्षा त्यांच्या समशेरीवर अधिक होती. घडलेला इतिहास त्याचे विद्रुपीकरण करून किंवा तो भ्रष्ट स्वरुपात दाखवणे हे थोर पुरुषांचे चारित्र्यहनन केल्यासारखेच आहे.       
असो.  चित्रपटावर आताच भाष्य करणे योग्य होणार नाही कारण अजून हा चित्रपट रिलीज झालेला नाही. परंतु त्यातील गाण्यांची झलक मात्र इतिहासाचे वास्तव गढूळ करणारी आहे असे प्रामाणिकपणे वाटते.  

Monday 30 November 2015

'Happy to Bleed' च्या निमित्ताने …….

कुठल्याशा देवस्थानच्या अध्यक्षांनी 'मासिक पाळी सुरु असलेली स्त्री शोधणारं यंत्र जेव्हा येईल तेव्हाच त्यांच्या प्रवेशाबाबत निर्णय घेऊ' अशा आशयाचं स्वत:चं प्रतिगामित्व सिद्ध करणारं वक्तव्य केलं आणि देशभरातील महिला विशेषत: युवती आक्रंदून उठल्या. मोर्चे, चर्चा, लेख यांना उधाण आलं.    
मुळात स्त्री अथवा पुरुष कोणत्याही देवालयात जेव्हा प्रवेश करतात तेव्हा त्यांच्या शरीराबरोबर त्यांचे मनही शुचिर्भूत असण्याची नितांत आवश्यकता असते. पावित्र्याच्या कल्पना या केवळ शरीराशी संबंधित नसून त्या मनाशीही संबंधित असतात. जर शरीराबरोबर मनाची शुचिर्भूतता पारखणारं यंत्र अस्तित्वात आलं तर मला शंका आहे की देशभरातील १% पुरुषांना तरी मंदिरात प्रवेश मिळेल का?  
स्त्रियांना येणारी मासिक पाळी म्हणजे पावित्र्याचा ऱ्हास किंवा अशी स्त्री मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेण्यास अपात्र हे कोणी ठरवलं? 'भाव तेथे देव' या उक्तीप्रमाणे 'देव' या संकल्पनेचा माणसाच्या मनात वसणाऱ्या भावाशीच फक्त संबंध आहे. तिथे शरीराचा संबंध येतच नाही. मनात काडीचाही भक्तीभाव नाही तरी देवळात जाऊन पैसा आणि सोनेचांदी यांची खैरात करणारे महाभाग पवित्र का म्हणून समजायचे? पुरुषांना मासिक पाळी येत नाही म्हणून त्यांच्या तथाकथित पावित्र्यावर शिक्कामोर्तब करणारे पुरुषच ना? म्हणजे देवाबद्दल श्रद्धा, भक्ती मनाच्या गाभाऱ्यात न का वसेनात पण मंदिराच्या गाभाऱ्यात यांना बिनदिक्कत प्रवेश! शरीराचे आणि देवाचे नाते तेवढेच महत्वाचे पण मनात जपलेले पावित्र्य कवडीमोलाचे! प्रत्येकाच्या मनातील परमेश्वराचा अंश ज्याला त्याला जपता येणं हाच खरा धर्म. मनातील विचारांचे पावित्र्य उघड करणारे यंत्र आले तर देवळे ओस पडतील याची खात्री आहे.   
पूर्वीच्या काळी घरातील बाईचा परीघ सीमित होता तरी आलेल्या पाहुण्यांची सरबराई, आल्यागेल्याची उठबस करता करता बायका दमून जायच्या. शिवाय त्या काळी यंत्रांची उपलब्धता नसल्याने अंगमेहनतीची कामेही बरीच असायची. मासिक पाळीच्या चार दिवसांतील सक्तीची विश्रांती हा शिणवटा कमी करण्याचा एक हेतू होता. रजस्वला स्त्रीची शारीरिक झीज कमी व्हावी तसेच तिची चिडचिड, तिचा त्रागा कमी व्हावा असाही त्यामागे उद्देश होता. पण अशा 'कावळा शिवलेल्या' स्त्रियांना जी वागणूक मिळत असे ती सर्वस्वी आक्षेपार्ह होती. तिला शिवायचं नाही, तिच्या जवळ जायचं नाही, तिचे जेवणाचे ताट दुरून सरकवायचे, तिला स्वयंपाकघरात प्रवेश द्यायचा नाही, देवघरात जाण्यास मज्जाव करायचा हे सामाजिक वर्तन निंदनीय होते. आज इतक्या वर्षांनंतरही जर ही मानसिकता समाज बदलू शकत नसेल तर अशा प्रतिगामी घटकांनाच बहिष्कृत करण्याची गरज आहे.                   
अनेक वर्षांपासून पौरुषत्वाचे झेंडे मिरवणारयांकडून हे स्त्रीचं 'दमन' होत आलं आहे. स्त्रीचं खच्चीकरण हेच काही पुरुषांच्या आयुष्याचं ब्रीद असतं. बौद्धिक दृष्ट्या प्रगत नसलेले आणि स्त्रीच्या शरीराबद्दल वैज्ञानिक दृष्ट्या अनभिज्ञ असलेलेच असे वाद निर्माण करत असतात. ज्या समस्त पुरुष जातीची उत्पत्ती ज्यापासून झाली आहे अशा उत्पत्तीस्थानाला अपवित्र ठरवणारे आणि या कारणास्तव त्यांना मंदिरात प्रवेश नाकारणारे पुरुष 'शिव-शक्ती' च्या नात्याविषयी कितपत सज्ञान आहेत असा प्रश्न पडतो. शुचिता आणि सामर्थ्य यांच्या संयोगातून विश्वाचे सृजन झाले आणि त्यामुळेच स्त्री आणि पुरुष यांच्यात कोणतीही श्रेष्ठ-कनिष्ठता नाही तर वास्तविक स्त्री व पुरुष हे परस्पर पूरक आहेत या माहितीकडे यांनी सोयीस्कररित्या डोळेझाक केलेली दिसते.             
वर्षानुवर्षे त्याच त्याच ऐकलेल्या आणि बघितलेल्या गोष्टी महिलांवर लादायच्या आणि आपण आखून दिलेल्या मार्गावरूनच त्यांनी चालायचे हा आग्रह धरायचा हा बहुतांश पुरुषवर्गाचा खाक्या आहे. पण यापुढे नव्या पिढीतील स्त्रिया ह्या बुरसटलेल्या प्रथा , चालीरीती यांना नजीकच्या काळातच तिलांजली देतील. त्या स्वत:चा मार्ग स्वत: निर्माण करतील जो त्यांच्यासाठी सन्मान्य असेल. त्यांच्या पावित्र्याच्या कल्पना या शरीराशी नसून मनाशी निगडीत असतील. मनाच्या पवित्र गाभाऱ्यातील देव त्यांना तिथेच गवसेल आणि मग अशा तथाकथित परंपरांना कवटाळून बसणारयांनी बांधलेल्या मंदिराच्या पायऱ्या चढायची त्यांना गरजच भासणार नाही.                 

Friday 27 November 2015

अंजलीताई टोळे अर्थात टोळेकाकू….

कुठल्याही परिचितांच्या दरवाज्यावरची बेल वाजवल्यानंतर दार उघडतानाच, आकारमान वाढलंय तुझं, केस किती पांढरे झालेत अशी किंवा यापैकी कोणतीही स्वागतपूर्ण वाक्ये ज्या घराच्या उंबरठ्यात बोलली जात नाहीत आणि दार उघडल्यानंतर ज्या ओठांची चंद्रकोर होताना प्रयास पडत नाहीत अशांपैकी एक म्हणजे टोळेकाकूंचं घर!       
तशी अंजलीताईंची आणि माझी ओळख एका तपाची.  त्यांचे सासरे कै. भाऊसाहेब टोळे यांच्याकडे मी काही वर्षांपूर्वी ज्योतिषविषयक मार्गदर्शनासाठी जायचे. तेव्हा अंजलीताईंची प्रथम ओळख झाली.  बहुतेक वेळा त्या लगबगीतच असायच्या. पुढे कधीतरी त्यांनी पेटी  शिकण्याची इच्छा माझ्यापाशी बोलून दाखवली आणि अशा तऱ्हेने त्या माझ्या संगीत परिवारात सामील झाल्या. नंतर काही वर्षे त्या माझ्याकडे गाणेही शिकत होत्या. अतिशय अदबीने बोलायच्या. मी वयाने त्यांच्यापेक्षा लहान पण त्यांची सांगीतिक मार्गदर्शक म्हणून माझ्याविषयीचा आदर त्यांच्या बोलण्या-वागण्यातून सतत व्यक्त व्हायचा. आज त्या माझ्याकडे शिकत नसल्या तरी त्यांची ती स्नेहाची, आदराची भावना कायम आहे.                      
मला माहित आहे की त्यांना कौतुकाची, प्रशंसेची allergy आहे. जरा त्यांच्याबद्दल स्तुतीपर दोन शब्द बोलावे की त्या कमालीच्या संकोचतात. सेवाभावी वृत्तीचं अंजलीताई हे मूर्तिमंत प्रतीक आहेत. चेहऱ्यावर कोणतेही त्रासिक भाव न आणता त्यांच्या सासू-सासऱ्यांची मनोभावे सेवा करताना मी त्यांना पाहिलं आहे. इतरांना मदत करण्यासाठी त्या सदैव तत्पर असतात. अत्यंत अगत्यशील. स्वभाव रोखठोक. काहीसा कडक वाटणारा. हल्लीच्या तरुण-तरुणींच्या उथळ वागण्याची त्यांना मनस्वी चीड आहे. विवाहित मुला-मुलींनीही एका विशिष्ट चौकटीत राहूनच आचरण करावे असे त्यांना वाटते. अंजलीताई चांगले वाचतात. चांगले विचार ग्रहण करून ते विचार आचरणात आणू पाहतात. त्या परमोच्च शक्तीला मानणाऱ्या जरूर आहेत पण म्हणून त्या कर्मकांडाच्या आहारी जाणाऱ्या नाहीत.                
त्यांच्या घराला 'घरपण' आहे. साधेपणा हा त्यांच्या घराचा 'आत्मा' आहे. त्यांच्या घरात कुठेही बिनदिक्कतपणे वावरावेसे वाटते. टोळे काकांचाही हसरा, प्रेमळ चेहरा स्वागत करण्यासाठी असतोच! आग्रह करकरून पोटभर सुग्रास अन्न खायला घालणे हा अंजलीताईंचा स्थायीभावच आहे. मला जेवायचे निमंत्रण दिल्यानंतर, येताना काहीही घेऊन यायचं नाही निशाताई असा प्रेमळ दमही त्या देतात. त्याकडे मी लक्ष देत नाही हा भाग वेगळा. अंजलीताईंच्या हाताला उत्कृष्ट चव आहे. 'मेतकूट पोहे' ही त्यांची खास डिश आणि मी आणि माझ्या लेकींची खास फर्माइश. त्यांच्या घरी गेल्यावर मला माहेरी आल्यासारखेच वाटते. जेवण असो, दिवाळीचा फराळ असो वा अल्पोपहार असो, अंजलीताईंचा सढळ हात मी नेहमीच अनुभवत आले आहे.                           
अशी निरपेक्षपणे प्रेम करणारी माणसे आज समाजातून हळूहळू लुप्त होत चालली आहेत. उंची फर्निचर, महागडे शो पीस व  इलेक्ट्रोनिक gadgets  आणि  बद्धकोष्ठ झाल्यासारखी हसणारी माणसे अशा प्रकारची घरं मला त्यांची पायरी चढण्यासाठी आकृष्ट करू शकत नाहीत. मेणचट चेहरे, टोमणेवजा बोलणी आणि दुसऱ्याच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल नको तेवढे औत्सुक्य या गोष्टी मला अशा व्यक्तींच्या दरवाज्यावरची बेल वाजवण्यापासून परावृत्त करतात.        
या सगळ्या पार्श्वभूमीवर टोळेकाकूंचं घर हे माझ्यासाठी आनंदनिधान आहे. आमच्या इतक्या वर्षांच्या ऋणानुबंधाचे हेच सबळ कारण आहे.     

Wednesday 25 November 2015

अभिनेता आणि 'सत्यमेव जयते' फेम आमीर खान यांस उद्देशून …….


का हो तुम्हाला दुर्बुद्धी सुचली असे वक्तव्य करण्याची? ही दुर्बुद्धी म्हणायची की तुमच्या आगामी 'दंगल' या चित्रपटासाठी केलेला पब्लिसिटी स्टन्ट? तुमच्या सारखीच करोडो कुटुंबे या भारत देशात राहतात. असहिष्णुता वाढली म्हणून यापैकी किती कुटुंबे दुसऱ्या देशात स्थलांतरित होण्याचा विचार करतात? आणि इतर देशांत सगळेच आलबेल आहे का? तिथेही काही खटकणाऱ्या गोष्टी असतीलच ना? थोडे आत्मपरीक्षण केलेत तर तुम्हाला या देशातील सहिष्णुतेची ग्वाही मिळेल.     
एक अभिनेता म्हणून तुमची वाटचाल सुरु झाली त्यावेळेस या भारत देशातील जनता तुमची जात, तुमचा धर्म लक्षात न घेता तुमच्या अभिनयाला दाद देत होती. कोणत्याही जातीच्या,धर्माच्या,पंथाच्या पलीकडे तुमचे आणि सिनेरसिकाचे नाते निर्माण झाले. तुम्ही अभिनयात बाजी मारून जवळजवळ प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वत:चं एक अढळ स्थान निर्माण केलंत. दिल चाहता है, थ्री इडीयट्स, सरफरोश, लगान, गजनी, पीके हे व असे अनेक चित्रपट रसिकमनात तुमच्या अभिनयाची मोहोर उमटवून गेले.             
पीके या चित्रपटात तुम्ही हिंदू धर्माची, देवदेवतांची यथेच्छ खिल्ली उडवलीत, श्रद्धांची थट्टा केलीत, रुढींचा उपहास केलात, तरीही हा चित्रपट चालला. जरा कल्पना करा की अशा प्रकारचा चित्रपट तुम्ही इस्लामी देशांत केला असतात तर आज हे वक्तव्य करण्यासाठी तरी शिल्लक राहिला असतात का? या देशातील जनतेने तुम्हाला खऱ्या अर्थाने 'हिरो' बनवलं. या जनतेमुळेच तुम्हाला कीर्तीची चव चाखायला मिळाली. तुम्ही प्रथितयश झालात. अनेक मानसन्मान तुम्हाला लाभले. अनेक तरुणांचे तुम्ही 'रोल मॉडेल' झालात तर तरुणींनी तुम्हाला त्यांच्या मनात पूजलं.            
तुम्ही 'सत्यमेव जयते' नावाच्या शो च्या माध्यमातून छोट्या पडद्यावर आलात. अनेक संवेदनशील मुद्दे हाताळलेत. अनेक उद्बोधक चर्चा घडवून आणल्यात. पीडितांच्या समस्या समजून घेतल्यात. त्यांच्या व्यथा ऐकताना अनेक वेळा तुमच्या डोळ्यांत पाणी तरळलेले अवघ्या भारतवासियांनी पाहिले. तुम्ही या शो द्वारे एक 'अवेअरनेस' जनतेत निर्माण करायचा प्रयत्न केलात जो स्तुत्य होता. अर्थात तुमची ही 'समाजसेवा' चालू आहे या भ्रमात भारतीय जनता मुळीच नव्हती. तरीही या शो ला प्रचंड लोकप्रियता मिळाली. प्रत्येक प्रोजेक्ट मधून तुम्ही उदंड पैसा कमावलात. या देशातील जनतेची तुमच्यामध्ये झालेली मानसिक गुंतवणूक एन्कॅश करण्यात तुम्ही यशस्वी झालात. या देशातील जनतेने तुम्हाला जे मिळवून दिले तो त्यांच्या सहिष्णुतेचा परिपाकच होता. आज 'आमीर खान' या नावाला आलेलं वलय केवळ या भारत देशातील जनतेमुळेच आहे याचा आपल्याला सोयीस्कर विसर पडला का हो?                       
जगाच्या पाठीवर कोणी कुठे रहावे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय आहे. आपल्या कुटुंबाच्या भवितव्याची चिंता जर आपल्याला एवढी सतावत होती तर आपण केव्हाच हा देश सोडायला स्वतंत्र होतातच. आपल्याला कोणी अडवलं होतं का? या देशातील असहिष्णुतेविषयी जाहीर भाष्य करून आपण अनेकांचा रोष ओढवून घेतलात. सगळीकडे चर्चांची राळ उठवून दिलीत. आपल्याला हेच अपेक्षित होते का? अशा प्रकारे आपल्याला मिळालेल्या कुप्रसिद्धीचा वापर आपल्याला 'दंगल' या चित्रपटासाठी करून घेता येऊ शकतो ही शक्यता आपण विचारात घेतलीत का? या निमित्ताने आमीर खान हे नाव पुनश्च ज्याच्या त्याच्या तोंडी येईल हे तुमचं गणित अचूक आलं का?         
आपल्याकडे लोकांचं चुकतंच. आपण या अभिनेत्यांना एकदम डोक्यावर घेतो. त्यांना देवाचा दर्जा द्यायला मागेपुढे पाहत नाही. कमी म्हणून त्यांची देवळेही बांधतो. आपलं आयुष्य ही हिरो मंडळी व्यापून टाकतात. इतके की आपण त्यांच्यापुढे थिटे वाटायला लागतो. खणखणीत पैसे मोजून ही स्वत:ला कलाकार म्हणवणारी मंडळी समाजसेवेचा आव आणून अभिनय करतात. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात जे आपण ओळखू शकत नाही. अर्थात ह्यालाही अपवाद आहेत. ह्या 'नटश्रेष्ठ' मंडळींची पूजा बांधण्याऐवजी या भूतलावर अशा अनेक व्यक्ती आहेत ज्या पूजेस पात्र आहेत त्यांच्या दिशेने आज जनतेने मोर्चा वळवला पाहिजे. या भारत देशासाठी आपले तनमनधन अर्पण करणाऱ्या भूमिपुत्रांचे आपण चाहते झालो पाहिजे. अत्यंत निरलसपणे समाजासाठी, देशासाठी झटणाऱ्या व्यक्ती हेच खरे आपले 'हिरो' असतात, नायक असतात.                 
मेकअपच्या आत दडलेला खरा चेहरा असा प्रसंगी बाहेर येतो आणि मग हीच जनता त्याच लोभस वाटणाऱ्या चेहऱ्याला डांबर फासायला कमी करत नाही. अनेक वर्षे पूजनीय वाटणारी व्यक्ती मग निंदनीय वाटू लागते. भक्तीची जागा संताप घेतो. आतापर्यंत ही गोष्ट आमिर खान ह्यांना समजली असेल असे वाटते. स्वत:च्या वक्तव्याबद्दल त्यांनी फेरविचार जरूर करावा. इच्छा असल्यास समस्त देशवासीयांची माफी मागावी अथवा असहिष्णुतेचे कारण पुढे करून आपल्या कुटुंबकबिल्यासह गाशा गुंडाळावा.                    

Sunday 22 November 2015

माझे दादा आजोबा …

'छडी लागे छम छम, विद्या येई घम घम' असे समजण्याचा तो काळ होता. समस्त वडीलधारयांचे या विषयी एकमत होते. आपण खाल्लेल्या माराचा आणि प्राप्त होणाऱ्या विद्येचा अर्थाअर्थी काहीही  संबंध नाही हे कळेपर्यंत आमचे शालेय जीवन संपुष्टात आले होते. मी दादा आजोबांच्या म्हणजेच शिवराम त्रिंबक तळवलकरांच्या मार्गदर्शनाखाली कमी आणि धाकाखाली जास्त मुळाक्षरे गिरवली. माझे हस्ताक्षर  जास्तीत जास्त चांगले करण्याचा आजोबांनी जणू विडाच उचलला होता. त्यामुळे मी जे काही उत्तम हस्ताक्षर काढू शकले त्याचे संपूर्ण श्रेय दादा आजोबांना जाते. आपले हस्ताक्षर सुधारले म्हणून आपली डॉक्टर व्हायची दारे बंद झाली असे मला उगाचच वाटायचे. डॉक्टरांचे ते अगम्य भाषेत व गिचमिड अक्षरात लिहिलेलं प्रिस्क्रिप्शन जर आजोबांनी कधी वाचलं असतं (वाचलं असेलही ) तर त्या डॉक्टरची धपाट्याने पूजा करून त्यांना बाराखडी पुन्हा पुन्हा गिरवायला लावली असती.                 
त्या काळी बालमोहन शाळेत आम्हाला दिवाळीचा व नाताळचा असा स्वतंत्र अभ्यास असायचा. नेहमीच्या गृहपाठा व्यतिरिक्त वेगवेगळ्या माहितीचे संकलन आणि त्यानुसार चित्रे काढणे अथवा चिकटवणे हे अपेक्षित असायचे. संपूर्ण वहीची सजावट जितकी उत्तम तितकी बक्षीस मिळण्याची शक्यता जास्त! या कामात माझी भिस्त पूर्णपणे दादा आजोबांवर असायची. वेगवेगळ्या रंगाच्या पेन्सिली वापरून गोळा केलेली माहिती माझ्याकडून सुवाच्य अक्षरात लिहून घेणे, चित्रे काढणे आणि चिकटवणे व वहीची सजावट करणे हे काम आजोबा आवडीने करायचे. आजोबांनी माझ्या वह्यांवर घेतलेल्या परिश्रमांमुळे माझी बक्षिसे कधी फारशी चुकली नाहीत.          
दादा आजोबांचे प्रत्येक काम सुबक असायचे. अत्यंत नीटनेटके. शिस्तीचे. 'मुलांना कधी मारू नये' असा प्रेमळ सल्ला देणारे हितचिंतक तेव्हा समाजात निर्माण झाले नसावेत बहुधा. शिस्तीचा बडगा दाखवण्याबाबत सर्व वडीलधारी मंडळींचे जणू ऐक्य असायचे. मुलांना वठणीवर आणण्याचा एकमेव मार्ग म्हणजे खरपूस मार याबद्दल दुमत असायचं घरीदारी कारणच नव्हतं. त्यात आजोबा शीघ्रकोपी. त्यामुळे हस्ताक्षर नीट आले नाही, खा मार. बेरीज चुकली, खा धपाटा असा 'खाऊ' सातत्याने मिळायचा. पण हेच आजोबा आजीने दिलेला खाऊचा डबा घेऊन रोज माझ्या शाळेत यायचे. मधल्या सुट्टीतील खाऊचा डबा भोपटकरांचा आणि शाळा संपल्यावरचा तळवलकरांचा. मग मी आजोबांबरोबर आजीने दिलेला खाऊ खात रमत गमत लक्ष्मीनारायण बाग येथे माझ्या आजोळी जायचे. माझ्या आईच्या म्हणण्यानुसार मी माझ्या आजोळीच जास्त असायचे.        
 पानात टाकलेले आजोबांना अजिबात चालायचे नाही. ते स्वत: अतिशय सुंदर जेवायचे. पानावर बसले की प्रथम चित्राहुती व नंतर प्रोक्षण करून जेवण सुरु. पहिला भात, मध्ये पोळी वा भाकरी आणि नंतर दही किंवा ताक भात. भाकरीचा पापुद्रा अलगद उचलून त्याला तूप-मीठ लावणे, ताटातील प्रत्येक पदार्थाला योग्य तो न्याय देत त्यांचे जे जेवण चालायचे ते खरोखरीच प्रेक्षणीय असायचे. आजोबांची पूजाही साग्रसंगीत. देवांना आंघोळ घालणे, मलमलच्या तलम कापडाने देव पुसणे, गंध उगाळणे, फुलांना गंधाक्षता लावून ते देवांना अर्पण करणे, दुध-साखरेचा नैवेद्य दाखवणे, स्तोत्र-आरती अशी त्यांची सुमारे एक-दिड तास विधिवत पूजा चालायची.               
स्वत:चे धोतर स्वच्छ धुवून वाळत घालण्याचा त्यांचा सोहळा देखणा असायचा. एकही सुरकुती न पाडता, चोख निरी करत ज्या पद्धतीने ते धोतर वाळत घालायचे ते बघत रहावसं वाटायचं. आजीला तांदूळ निवडण्यात आजोबा मदत करायचे. तांदळातील प्रत्येक भातकण अंगठ्याच्या नखाने अलगद सोलून त्यातून तांदळाचा अख्खा दाणा ते वेगळा काढायचे. लसूण सोलण्यातले त्यांचे कसब सुद्धा वाखाणण्यासारखे होते. पालेभाज्याही ते उत्तम निवडायचे.           
पत्त्याचा डाव लावणे हा आजोबांचा विरंगुळा होता. पण त्यांना पेशन्स कमी असल्याने मनासारखा डाव लागला नाही की पत्ते फेकून द्यायला ते मागेपुढे बघत नसत. माझे बरेचसे बालपण दादा आजोबांच्या सान्निध्यात गेले. त्यांनी माझ्या अक्षराला लावलेले सुबक वळण, माझा घेतलेला अभ्यास, मला बक्षीस मिळावे म्हणून दिवाळी-नाताळच्या वहीच्या सजावटीवर घेतलेली मेहनत ह्या गोष्टी माझ्या लेखी आनंदाचा ठेवा आहेत. माझ्याकडून श्लोक म्हणून घेणे, पाढे म्हणून घेणे, पाठांतर करवणे ही कामेही ते नित्यनेमाने पार पाडीत. कालांतराने माझ्या अभ्यासाची जबाबदारी माझ्या मामाने त्याच्या अंगावर घेतली खरी पण आजोबांबरोबर गिरवलेली मुळाक्षरे, त्यांच्याबरोबर शाळेतून येताना खाल्लेला खाऊ, पाठ केलेले पाढे आणि श्लोक, निजताना त्यांचा डोक्यावर जाणवणारा हळुवार हात  ही माझ्या मर्मबंधातली ठेव आहे.              
 आजही अनेक वेळा कच्चं लिखाण करताना अक्षर वेडंवाकडं आलं, जे येतंच की वाटतं, दादा आजोबा हळूच मागून येतील आणि पाठीत धपाटा घालत म्हणतील, काय हे अक्षर! असं शिकवलं मी? गधडे किती वेळा सांगायचं तुला? पण आता ते दादा आजोबांचे रागाने किंवा कौतुकाने बघणारे डोळे नाहीत, चांगल्यासाठी उगारला जाणारा हात नाही की बघत राहावे असे त्यांचे नेटके हस्तकौशल्यही नाही. उरल्या आहेत त्या फक्त पिठीसाखर आणि साजूक तुपात घोळवलेल्या त्यांच्या सायीसारख्या तलम आठवणी!                   

Friday 20 November 2015

hats off 'जामुन'………।

जामुन हे नाव कदाचित काल्पनिक असेल. स्थळ व इतर पात्रांची नावेही बदललेली असू शकतील पण ही गोष्ट मात्र शंभर टक्के खरी आहे. एका खेडेगावात जन्मलेल्या एका गोंडस परीची ही कथा आहे. जशी आणि जेवढी हृदयद्रावक तेवढीच जामुनच्या जिद्दीची, धाडसाची. परिस्थितीला सहजासहजी शरण न जाणाऱ्या तिच्या मानसिकतेची.       
आई-बाबांची लाडकी जामुन  वयाच्या आठव्या वर्षी शाळेची पहिली पायरी चढते. तेही आईच्या आग्रहास्तव. तिच्या आईचं तिला डॉक्टर करण्याचं स्वप्न असतं. घरची परिस्थिती म्हणजे हातातोंडाची लढाई. काही दिवस अथवा महिने शाळेची अन तिची कुठे तोंडओळख होते आहे तोच तिच्या कुटुंबावर दुर्दैवी घाला येतो आणि तिची आई हे जग सोडून जाते. आपली आई नक्की कुठे गेली आहे हे समजण्याचीही बौद्धिक कुवत नसलेली जामुन आता एकाकी पडते. शाळा सुटलेली असते. वडील हलाखीने अधिकच गांजलेले. लहानग्या जामुनचे नशीब अंधाराच्या उदरात गडप होते.            
एक दिवस जामुनच्या वडिलांचा मित्र एका 'एलाईट' जोडप्याला घेऊन येतो. अलिशान गाडीतून पायउतार झालेल्या या दाम्पत्याला एक लहान मुलगा असतो. ते जामुनला दत्तक घेण्याची त्यांची मनीषा बोलून दाखवतात. तिला उच्च शिक्षण देण्याचं आश्वासन देतात. जामुनच्या वडिलांच्या एका डोळ्यात न मावणारा आनंद तर दुसऱ्या डोळ्यात लेकीच्या विरहाचं दु:ख दाटून येतं. ते जोडपं जामुनच्या वडिलांच्या हातात नोटांची थप्पी देतं. पण तिचे वडील ती नाकारतात. कारण त्यांच्या मुलीचं उज्ज्वल भविष्य त्यांना दिसू लागलेलं असतं. त्यांचा मित्र मात्र हक्काने त्या नोटांचा स्वीकार करतो.              
जामुन मोठ्या शहरात येते. एका टोलेजंग इमारतीत हे कुटुंब राहत असतं. या घरातील सर्व आधुनिक उपकरणे आणि सोयीसुविधा जामुनला स्वप्नवत वाटतात. कुटुंबाच्या मालकीणबाई या सर्व साधनांची तिला माहिती करून देतात. त्या साधनांचा वापर करायला शिकवतात. तिच्या शाळेची व्यवस्था काही दिवसात होईल असे तिला सांगत राहतात. दिवसामागून दिवस उलटतात आणि या उच्चभ्रू कुटुंबाचा खरा चेहरा जामुनला दिसू लागतो. खरकटी भांडी धुणे, कपड्यांना इस्त्री करणे, बाहेर जाउन सामान आणणे, झाडू-लादी करणे, छोट्याला सांभाळणे अशी अनेक कामे चिमुरड्या जामुनवर सोपवली जातात. या कामांत कुचराई झाल्यास त्याची शिक्षा म्हणून छडीचे, चामडी पट्ट्याचे फटके, इस्त्रीचे चटके आणि उपासमार हा दंड ठरलेला असतो. तिच्या आजारातही तिची जराही गय केली जात नाही.  लोकांसमोर मात्र आपण ह्या गरीब घरातील मुलीला दत्तक घेऊन किती पुण्याचं काम केलं आहे व आपण तिच्यावर किती जीवापाड प्रेम करतो आहे  ह्याचे नाटक  अत्यंत चोख पद्धतीने वठवले जात असते.                  
 या मालकीणबाई 'day care' चालवतात. मुलांच्या ट्युशन घेतात. माझा child psychology चा अभ्यास असल्याचेही लोकांना सांगतात. पण जामुनचे त्यांनी चालवलेले अतोनात हाल मात्र त्यांच्यातील एका स्त्रीला ,शिक्षिकेला, मातेला खटकत नाहीत. जामुन अनेकदा तिच्या आईच्या आठवणीने व्यथित होते. तिच्या डोळ्यांतील बाल्य अकाली कोमेजल्यासारखे वाटू लागते. इतक्या लहान वयात तिच्या देहाने आणि मनाने अनन्वित अत्याचार भोगलेले असतात. या कुटुंबाचा मालकही वासनांध होऊन तिच्यावर अत्याचार करण्यासाठी दबा धरून बसलेला असतो. योग्य संधीची वाट पाहत असतो. जामुनला या नरकयातनांतून लवकरात लवकर मुक्ती हवी असते. तिला या अघोरी कैदेतून सुटून आपल्या गावी वडिलांकडे जायचे असते. ती खचून न जाता काही मार्ग मिळतो का ते शोधत असते.
एक दिवस day care मधील मुलांची जबाबदारी जामुनवर टाकून मालकीणबाई shopping ला जातात. day care मधील एका मुलीशी जामुनची मैत्री होते. त्या मुलीला जामुनच्या यातनांविषयी काहीच माहिती नसते. जामुन तिला एक प्रश्न विचारते. एखाद्या झाडाला किंवा फुलाला कोणी इजा केली तर ते झाड किंवा फूल काय म्हणेल? तिची मैत्रीण जर विचार करून म्हणते, please save me असं म्हणेल. जामुन म्हणते की हे मला तू एका पेपरवर लिहून देशील का? मग तिची ही मैत्रीण तिला एका कागदावर ते वाक्य लिहून देते. जामुन ह्या मैत्रिणीकडून काही रिकामे कागद मागून घेते. नंतर ते कातरून त्याचे छोटे छोटे तुकडे करते आणि प्रत्येक तुकड्यावर हे वाक्य इंग्रजी येत नसतानाही लिहिते म्हणजेच गिरवते. असे अनेक कागद ती तयार करून घेते. स्वत:जवळ लपवून ठेवते. रोज मालकीणबाई बाहेर गेल्या की त्यातील एक एक कागद अंतराअंतराने बाल्कनीतून अलगद खाली सोडते. सुरवातीस हे कागद कचऱ्याच्या टोपलीत टाकले जातात पण रोज सातत्याने पडणाऱ्या या कागदांकडे सफाई कामगारांचे लक्ष जाते आणि अखेरीस हा कागदांचा गठ्ठा पोलिसांपर्यंत पोहोचतो.                  
  कोणालातरी वाचवायचे आहे हे पोलिसांना समजते. पण कोणाला? एव्हाना कागदावरील हस्ताक्षरावरून हे अक्षर लहान मुलाचे आहे ज्याला किंवा जिला इंग्रजी नीट लिहिता येत नाही एवढे पोलिसी बुद्धीला कळलेले असते. यंत्रणा कामाला कागतात. सुरवातीस यश येत नाही. मग एक दिवस अचानक एका कागदाच्या मागील बाजूस  international school तसेच division हा तपशील पोलिसांना मिळतो आणि जामुनच्या मैत्रिणीपर्यंत पोलिस पोहोचतात. पण हे हस्ताक्षर तिचे नसते हेही त्यांना कळते. हे जामुनने लिहिले आहे हे मैत्रीण सांगते आणि अखेरीस पोलिस चौकशीसाठी जामुनच्या घरी पोहोचतात. जामुन पोलिसांना काहीच सांगू शकत नाही कारण तिला मालकीण बाईंनी धमकावलेले असते. पण तिचे डोळे तिची व्यथा बोलून जातात. 
 यानंतरही जामुनवर अत्याचार सुरुच राहतात. आता तिच्या तोंडात बोळा कोंबून, तिचे हातपाय बांधून तिला खोलीत कोंडले जाते. एक दिवस जमुनची मैत्रीण मालकीण बाईंना विचारते की जामुन कुठे आहे. ती परत आपल्या गावाला गेली असे मालकीणबाई सांगतात. पण मैत्रिणीला संशय येतो. मालकीणबाई बाहेर गेल्या आहेत ही संधी साधून आणि धाडस एकवटून जामुनची मैत्रीण कोपऱ्यातील खोलीत हळूच डोकावते आणि जामुनला या अवस्थेत बघून तिला फार वाईट वाटते. 'ये मम्मी पापा बहोत गंदे है, मुझे रोज मारते,पिटते है' अशी जामुनची कबुली मोबाईलवर रेकॉर्ड करून ती पोलिसांना ऐकवते आणि पोलिसांनी तिच्या आईबाबांना विश्वासात घेऊन जी मोहीम हाती घेतलेली असते ती फत्ते होते.              
यथावकाश मालक आणि मालकीणबाई गजाआड जातात आणि जामुन तिच्या वडिलांच्या हाती सोपवली जाते.
अशी असंख्य लहानगी मुले आणि मुली कुणा नराधमांच्या अत्याचाराला बळी पडतात. काही निराश होतात , खचतात, कुणी सुटकेचा मार्ग न सापडल्याने आत्महत्या करतात. पण केवळ आठ वर्षाच्या व रूढार्थाने काहीही शिक्षण न घेतलेल्या जामुनने जे करून दाखवलं ते इतरांसाठी निश्चित आशेचा किरण ठरू शकेल.
खरंच hats off टू little brave जामुन!                                                      

Tuesday 17 November 2015

'सौरभ' नावाचा 'आदर्श'


'दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती' ही काव्यपंक्ती २३ वर्षीय सौरभ निंबकर नावाच्या तरुणाने सार्थ ठरवली आहे. मी काही महिन्यांपूर्वी, नमस्कार हा वयाला नव्हे तर माणसाच्या वर्तनाला,कर्तृत्वाला करायचा असतो अशा आशयाचा ब्लॉग लिहिला होता. खरंच सौरभच्या या माणुसकी जपणाऱ्या वर्तनाला माझा मनापासून नमस्कार!
त्याची आई cancer होऊन गेली. ती केईएम मध्ये admit असताना इतर समदु:खी परिवारांच्या यातना त्याने बघितल्या. cancer सारख्या दुर्धर रोगाची treatment घेताना सामान्यांच्या तोंडाला फेस आणणारा अमाप खर्च, निकटच्या नातेवाईकांची होत असलेली कुतरओढ, आपल्या ऐपतीपेक्षा कित्येक पटींनी खर्च करून कंगाल झालेली कुटुंबे हे सगळे सौरभने अनुभवले आणि त्याच्या आत असलेला माणुसकीचा झरा खळखळून वाहण्यासाठी आतुर होऊ लागला.  
त्याला cancer ने पिडीत असणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी काहीतरी करायचे होते. विचार सुरु झाला. विचार आणि लहानपणापासून जपलेली आवड यांची सांगड घातली गेली आणि मध्य रेल्वेतील डब्यांत गिटारचे सूर निनादू लागले. जरा बऱ्या घरातला आणि चांगल्या कपड्यांमधील हा 'भिकारी' अनेकांना आवडू लागला. गर्दीने खचाखच भरलेला डबा तर हवा परंतु गिटार वाजवण्यासाठी space सुद्धा हवी. त्यामुळे असा नेमका स्पॉट हेरून ही संगीतपूजा सुरु झाली. काही प्रवासी या स्वरलहरीत सामील होऊ लागले. यातून जमणाऱ्या उत्पन्नाचा  cancer पिडीत तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी विनियोग केला जाणार होता. सौरभचा हा उपक्रम अनेकांना स्तुत्य वाटला.            

२-३ दिवसांपूर्वी सौरभच्या या उपक्रमाला खुद्द बिग बिंचा हातभार लागला आणि त्याच्या प्रयत्नांना जणू परीसस्पर्शच झाला. या सीएसटी टू अंबरनाथ  ट्रेनमधील सुरांच्या अनोख्या यात्रेत साक्षात अमिताभ सहभागी झाले. त्यांनीही इतर प्रवाशांबरोबर गाणी गात सौरभच्या उपक्रमाला चार चाँद लावले. हा गिटार वाजवणारा अवलिया आता अधिकाधिक परिचित होईल आणि त्याच्या या अभिनव योजनेला आणखी आर्थिक यश मिळेल अशी खात्री वाटते आहे.       
टी व्ही वर नुसते 'शो' करून सामाजिक बांधिलकी जपली जाते का हाच खरा प्रश्न आहे. नामांकित सुपरस्टार अशा शो द्वारे जनजागृती करण्याचा फक्त 'शो' करतात. शो संपला की जाणीवही लोपते आणि हे सो कॉल्ड सुपरस्टार आपापली popularity एन्कॅश करून पुढील प्रोजेक्ट करायला धावतात.   
सौरभला music मध्ये किती गती आहे यापेक्षा जे थोडंफार ज्ञान त्याच्या गाठीशी आहे ते अशा पद्धतीने एन्कॅश करून त्या ज्ञानाचा, छंदाचा तो ज्या कारणासाठी वापर करू इच्छितो आहे ही बाब मुळातच त्याच्यातील उत्तुंगतेची जाणीव करून देणारी आहे. वयाच्या पंचाहत्तरीला सुद्धा प्रॉपर्टी, दागिने, पैसा या भौतिकतेला घट्ट आवळून बसणाऱ्या आणि केवळ शारीरिक वयाच्या हिशेबात स्वत:ला 'ज्येष्ठ' म्हणवून घेणाऱ्या अनेकांना विचारप्रवृत्त करणारा सौरभ समस्त आबालवृद्धांसाठी एक 'आदर्श' आहे यात तिळमात्रही शंका नाही.      


मुग्ध करणारी सूरमयी मुग्धा


व्यासपीठावर वयाने ज्येष्ठ आणि सांगितिक अनुभवाने संमृद्ध अशा गायकांची मांदियाळी दाटली आहे. या गायकांमध्ये अवघी १०-१२ वर्षांची एक छोटी गायिका बसली आहे. गोरी गोरी पान, नाच रे मोरा किंवा जास्तीत जास्त एका तळ्यात होती अशी काही गीते तिच्या वयाला आणि गळ्याला साजेशी अशी ऐकू येतील असे वाटते न वाटते तोच  तिचा खणखणीत आवाज अवघ्या श्रोतृवर्गाचा कब्जा घेतो आणि पुढील दहा एक मिनिटे 'पद्मनाभा नारायणा'च्या सुरावटीत समस्त रसिकांना अक्षरश: न्हाऊ घालतो. तिच्या सांगितिक जाणीवेने स्तिमित व्हावे असा हा क्षण! 
आपल्या डोळ्यांसमोर असते ती 'सारेगमप' मधील छोटीशी, खळखळून हसणारी, बालगीतांत रमणारी मुग्धा! 'सारेगमप' मधील तिचा प्रवास संपल्यावर तिने कमावलेलं सुरांचं ऐश्वर्य जसजसं कानावर पडत जातं तसतसं चकित व्हायला होतं. तिशी-चाळीशी-पन्नाशीला आल्यानंतर अथक रियाजातून जी परिपक्वता गळ्यातील सुरांना येते आणि त्यातून मग जे गाणे श्रोत्यांसमोर साकारते ते गाणे आणि सुरांची ती परिपक्वता षोडशी पूर्वीच ज्या मुग्धाने संपादन केली आहे ती ऐकताना आपण शब्दहीन होतो.   
तोडी रागातील 'सो हम हर डमरू बाजे' असो वा चारुकेशी तील 'हे सुरांनो चंद्र व्हा' असो वा भटियार मधील 'एक सूर चरचर छायो' हे निर्गुणी भजन असो, मुग्धाच्या गळ्यातून एकेक गाणे एकेका  रत्नासारखे बाहेर पडते आणि रसिकांच्या कानांवर गारुड करते. जोहार मायबाप, श्रीरंगा कमलाकांता, अमृताहुनी गोड किंवा अगदी अलीकडचे उगवली शुक्राची चांदणी असो, तिच्या गळ्याला काही अटकावच नाही. खणखणीत आवाज,सुस्पष्ट शब्दोच्चार, कसदार ताना आणि सुरलयीशी खेळण्याची प्रभावी हुकमत या भांडवलावर मुग्धा मैफिलीला लीलया आपलंसं करते. आवाजात कमालीचं माधुर्य. तिचा आवाज नाट्यसंगीतासाठी अतिअनुकुल असाच आहे. डोळ्यांत आत्मविश्वासाबरोबर एकवटून येणारं गाणं ठायीठायी जाणवत राहतं. हल्लीच्या मोबाईल हेच जगणे मानून चालणाऱ्या तरुणाईला तिच्या 'बोलावा विठ्ठल करावा विठठल' या गाण्याचा रिंगटोन करण्याचा मोह पडावा इतकं देखणं गाणं मुग्धापाशी आहे.नेमक्या जागा, गाण्याचं मर्म नेमकं हेरून ते सहीनसही व्यक्त करण्याचं तिचं कसब खचितच वाखाणण्यासारखं आहे. सायन्स शाखा तिच्या आवडीची आहे पण गाणं हा ध्यास आहे. त्यामुळे अभ्यासक्रम hectic वाटल्यास शाखा बदलण्याची तिची तयारी आहे. 'पियरवा घर आवो, घर आवो, ही तिची बागेश्रीतील बंदिशही लाजवाब!    
इतक्या लहान वयातच इतकी सांगितिक तयारी आणि प्रगल्भता पाहून अशी शंका येऊ लागते की गेल्या जन्मीच्या तिच्या सूरसंचिताचे तर हे 'carry forward' नाही ना? असो. तिची उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो आणि तिच्या गळ्यातून स्त्रवणाऱ्या मधुर स्वरांनी सगळ्या श्रोतृवर्गाची तृषा पुन्हा पुन्हा शांत होवो हीच सदिच्छा!             

Monday 6 July 2015

Water filter, चिक्की, वह्या अन बरेच काही ……….


या निवडणुकीच्या वेळी भाजपने आपल्या पक्षाची अशी काही हवा तयार केली की पंधरा वर्षांच्या काँग्रेसच्या भ्रष्टाचारी राजवटीला जनता कंटाळली आहे, मंत्रांच्या अनेकविध घोटाळ्यांनी पुरेपूर त्रस्त झाली आहे. त्यामुळे या समस्त जनतेला या भ्रष्टाचारी राजवटीच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी आम्ही सर्वार्थाने सक्षम आहोत. एकदा का आम्ही सत्तेवर आलो की हे वर्षानुवर्षे जनतेला दिसत असलेलं चित्र पूर्णतया बदलेल. उत्तम शासनकर्ते जनतेला लाभतील. काळा पैसा, बेकारी, अवैध बांधकामे, वीज, पाणी, महागाई, रस्ते, शिक्षण, वाहतूक, टोलसमस्या, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था, महिलांवरील अत्याचार  अशा अनेक प्रश्नांना पूर्णविराम मिळेल. उद्योगधंद्यांना बरकत येईल. थोडक्यात सगळीकडे आलबेल होईल. या सगळ्या प्रचाराचा परिपाक म्हणून मग जनतेने एकदाचे भाजपला निवडून दिले. या आशेवर की ज्या दैनंदिन समस्या माणसाला भेडसावत आहेत त्यांचे निराकरण हा सत्ताधारी पक्ष व त्या पक्षाचा सहकारी पक्ष हे मिळून करतील. सामाजिक आणि राष्ट्रीय आपत्तीपासून आपलं रक्षण होईल. पण वास्तवातील चित्र मात्र अजिबात बदललेले नाही. फक्त खुर्च्यांवरील माणसे बदलली पण जनतेच्या पदरी मात्र घोर निराशाच पडली असे आज आत्यंतिक खेदाने म्हणावे लागते आहे.                      
विदेशातून काळा पैसा परत भारतात आणण्याच्या वल्गना हवेत कधीच्याच विरून गेल्या. महागाई य:त्किंचीतही कमी झाली नाही. शेतकऱ्यांकडे योग्य ती मदत पोहोचली नाही. उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर चालले.  अनेक ग्रामीण भागात भेडसावणाऱ्या पाणी आणि विजेच्या दुर्भिक्षावर तोडगा निघू शकला नाही. परप्रांतीयांचे लोंढे सुरूच आहेत त्यांना कोणताच अटकाव नाही. अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केलेले अक्षम्य घोटाळे अजूनही उघडकीस आलेले नाहीत. समित्या, अहवाल आणि चौकश्या या पलीकडे सरकार काही ठोस पावले उचलेल याची शक्यता शून्य टक्के आहे. चुकीच्या डिग्र्या लिहून जनतेची दिशाभूल मंत्री करत आहेत. धर्मांध वक्तव्ये करून समाजात तणावाचे वातावरण पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. काही मंत्री अंधश्रद्धेच्या आहारी जात आहेत. जनता ज्या रस्त्यावरून दररोज ये जा करते त्या रस्त्यांचे नशीब बदलण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. रस्त्यांची कंत्राटे दिली की खड्ड्यांची असा संभ्रम माणसांच्या मनात उत्पन्न होतो आहे. पर्यावरणाची अपरिमित हानी रोजच होते आहे. एक पाउस फक्त समस्त जनतेला समस्यांच्या पुरात लोटण्यास समर्थ आहे. नालेसफाईचा आजवरच्या शिरस्त्याप्रमाणे बोजवारा उडालेला आहे. हॉस्पिटलच्या आवारातील दुर्गंधी हटायला म्हणून तयार नाही. अनेक ठिकाणी रस्त्यावर साचलेले कचऱ्याचे ढीग व त्याभोवती घुटमळणारे कीटक आणि प्राणी सामाजिक आरोग्याला घातक आहेत.   
त्यात आता रोजच भाजप मंत्रांची नवनवीन प्रकरणे ऐकिवात येत आहेत. ती खरी आहेत असे विरोधक ठासून म्हणत आहेत तर ती सपशेल खोटी आहेत असे सत्ताधीश म्हणत आहेत. आपापले निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी पत्रकार परिषदा घेतल्या जात आहेत. दृक-श्राव्य माध्यमे आपल्या खास पद्धतीने अशा खमंग चर्चा घडवून आणून त्यांचे सादरीकरण जनतेला दाखवीत आहेत. अंगणवाड्या एकदम प्रकाशात आल्या आहेत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. तिथले शिक्षक, आया किंवा संबंधित लोकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. ई-टेन्डरिंग, दरकरार, GR  असे रोजच्या वापरत ऐकू न येणारे शब्द  जनतेचे लक्ष वेधून घेत आहेत. इतक्या कोटींची खरेदी केली पण ती अनेक अंगणवाड्यांत पोहोचलीच कुठे हा सवाल मंत्री महोदयांना विचारला जातोय. निकृष्ट दर्जाचे अन्न अंगणवाड्यांतील मुलांना कसे मिळते आहे याबद्दलची दृश्ये अनेक वाहिन्यांवरून प्रसारित केली जात आहेत. चिक्कीत सापडलेल्या अळ्या, गळके water filter, अवाजवी आकाराच्या चटया आणि असे बरेच काही चव्हाट्यावर येते आहे.शाळांत बसवल्या जाणाऱ्या fire extinguisher संबंधीही गैरव्यवहार झाल्याचे ऐकिवात आले आहे. 
पाच वर्षात १०० शहरांना 'स्मार्ट सिटी' करण्याचा संकल्प सुटलेला आहे.  प्राथमिक आरोग्य, सुविधा यांना दुर्लक्षून शहरांचा कायापालट करण्याच्या सरकारच्या कार्यक्रमाचे स्वागत करावे की त्यावर उपहासाने हसावे हेच कळेनासे झाले आहे. कोर्टाच्या रस्त्यावर सार्वजनिक सण साजरे न करण्याच्या आदेशाने अनेक राजकीय रथी-महारथींना पोटशूळ उठला आहे. त्यात मग नमाजाच्या वेळचे भोंगे विरुद्ध सणाच्या वेळी लाउड स्पीकर वर ठणाणणारी  गाणी असे डिबेट रंगते आहे. त्यातून वेगवेगळ्या राजकीय वादांना उधाण आले आहे. जो तो एकमेकांच्या राजकीय कारकीर्दीवर जमेल तसे शरसंधान करतो आहे. येनकेन प्रकारेन दुसऱ्या पक्षाची प्रतिमा मलिन करणे हा जणू प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क असल्यासारखा जो तो वावरतो आहे. यातून आणखी नवनवे वाद उपस्थित होत आहेत. अशी ही राज्य व्यवस्थेची वाटचाल सुरु आहे. यातून जनकल्याणाची कोणती विकासकामे होण्याची शक्यता आहे हे तो जगनियंता तरी सांगू शकेल याची शक्यता जवळजवळ शून्यच  आहे.            
त्यामुळे यापुढे सत्तेवर कोणतेही सरकार असो, ते सरकार आपल्याला 'सुशासन' द्यायला बांधील आहे असा कृपया कोणी गैरसमज करून घेऊ नये.
             

Saturday 4 July 2015

……… त्याच्या पियानोत 'लता' आहे


सुरांच्या साम्राज्यातील लता हे निर्विवाद आणि अंतिम सत्य मानलं तर होय ब्रायनच्या पियानोत लताचा वास आहे. म्हणजेच स्वरमाधुर्य आहे, सुरांवर असीम निष्ठा आहे, दोन शब्दांमधील अंतरात सौष्ठव आहे, लयीवर हुकमत आहे, गाण्यात अंतरात्मा आहे. जशी लता भावनेने ओथंबून गाते  तद्वत ब्रायनचा पियानोही गातो. दोन सुरांमधील आणि शब्दांमधील ठहरावाची त्याची भाषा आपल्याला अंतर्मुख करते. तहानभूक हरपून हातात घेतलेलं हे वाद्य आज अनेक अजरामर रचनांचा पुन:प्रत्यय आपल्याला आणून देत आहे.           
 दिलकी गिरह खोल दो, जाने क्या ढूंढती रहती है, धीरे धीरे मचल, कही दीप जले कही दिल, प्यार हुआ इकरार हुआ, जारे उड़ जा रे पंछी, रहे न रहे हम अशी एक ना अनेक गाणी आज ब्रायनच्या पियानोच्या मुशीतून बाहेर येऊन श्रोत्यांवर मोहिनी घालत आहेत. गाण्याचं कोणतही प्राथमिक शिक्षण नसताना त्याने त्याच्या आतील सुरांचा दिवा परिश्रमाने घासूनपुसून लख्ख केला आणि आपल्याभोवतीचा परिसर सुरांनी उजळवला. एखाद्या लाटेवर अलगद तरंग उमटावेत त्याप्रमाणे त्याच्या पियानोवर सुरांचे नानाविध तरंग उमटतात आणि रसिकांची मने काबीज करतात. त्याची बोटे अव्याहतपणे सगळ्या सप्तकांमध्ये लीलया संचार करतात आणि त्यातून चित्रपट संगीताचा इतिहास जिवंत होतो.           
वास्तविक पाहता पियानो हे वाद्य continuity म्हणजेच अखंडतेच्या दृष्टीने वाजवायला अवघड. परत गाणे वाजवायचे म्हणजे त्यातील मर्म नेमके पकडता आले पाहिजे. त्यातील ठराविक जागा beautify करता यायला हव्यात. त्यात चित्रपट संगीत म्हणजे लोक वर्षानुवर्षे ज्या गाण्यांवर जगत आले आहेत त्या गाण्यांतील गोडवा तसाच्या तसा श्रोतृमनात प्रतिबिंबित झाला पाहिजे. नुसती ध्रुवपद आणि कडवी नव्हेत तर interlude म्हणजे दोन कडव्यांमधील संगीतही लोकांना पाठ असते. ते तसेच्या तसे सादर झाले नाही तर असा कलाकार रसिकांना अपील होण्याची शक्यता कमी असते. परंतु ब्रायन सारखा कलाकार केवळ एवढ्यावरच थांबत नाही तर काही स्वरांवरील त्याने वाजवलेल्या बारीक, सूक्ष्म हरकती सुद्धा लाजबाब असतात. गाण्यातील मर्म त्याच्या पियानोने अचूक पकडलेले असते.        
ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांनी ब्रायनला दिलेली शाब्दिक पावती फार बोलकी आहे. ते म्हणाले, 'आपने तो मेरे गाने की रुह ही पकड ली'. जे काही माझ्या गाण्यात  द्यायचं राहून गेलं होतं तेही ते आपण अचूक वेधलत आणि गाण्याला चार चांद लावलेत. तसे ब्रायन फारसे बोलके नसावेत. जे काही बोलायचं आहे ते ते पियानोच्या माध्यमातून बोलतात. चेहऱ्यावर विशिष्ट अदब, नम्रता. सुरांशी तद्रूप होऊन गाणे वाजवणे हा त्यांचा धर्म आहे. मी वाजवताना बघा कशी चमत्कृती करतो आहे असा फाजील अविर्भाव त्यांच्या देहबोलीत औषधालाही नसतो. आपलं सुरांशी, संगीताशी नातं किती घनिष्ठ आहे हे त्यांचा पियानोच सांगत असतो. रसिकांनी दिलेली दाद ते काहीसे संकोचून अदबशीरपणे स्वीकारताना दिसून येतात.              
गाणी प्रेमाची असोत वा विरहाची, आनंदाची असोत वा दु:खाची ब्रायन त्यांना तितक्याच उत्तम रीतीने, त्यातील सौदर्य समजून सादर करतात. देशाविदेशात  ब्रायनने  पियानोला लताच्या, आशाच्या, रफीच्या, मुकेशच्या, किशोरच्या आवाजात गातं  केलं आहे. एखाद्या चित्रकाराच्या कुंचल्यातून सहस्त्र रंगांची उधळण व्हावी तशी ब्रायनच्या पियानोतून सुरांची उधळण होत असते.  लताने गाण्याच्या माध्यमातून तमाम रसिकांवर जे सुरांचे लोभस वार केले आणि लाखोंच्या आयुष्याची सुरावट बदलून टाकली तसेच लोभस वार ब्रायनही आपल्या पियानोतून रसिकमनावर चिरकाल करत राहोत हीच सदिच्छा!  


Friday 3 July 2015

भावनिक IQ - एक भले मोठे शून्य


बसने दिलेल्या धडकेत दोन तरुणी भीषण अवस्थेत रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. मात्र आजूबाजूचा जमाव त्यांना तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याऐवजी त्यांचे मोबाईल शूट करण्यात गुंतला होता. अतिशय संवेदनाहीन, निरुपयोगी, माणुसकी  हरवलेल्या गर्दीचा चेहरा या निमित्ताने सगळ्यांनीच अनुभवला. त्या मरणासन्न अवस्थेत पडलेल्या तरुणींमध्ये आपली जिवाभावाची एखादी व्यक्ती असती तर आपण असेच बघ्याची भूमिका बजावत राहिलो असतो का असा प्रश्न सुद्धा त्या गर्दीतील एखाद्याच्या मनाला शिवू नये हे नक्की कशाचे द्योतक आहे? आपण बौद्धिक आणि यांत्रिक दृष्ट्या पुढारलेले आणि भावनिक, नैतिक दृष्ट्या मागासलेले झालो आहोत का हे प्रत्येकाने तपासून घेणे अत्यावश्यक आहे. हातात मोबाइल असलेले आपण सर्व त्या यंत्राचाच आधार अशा वेळी  डावलतो आहोत का? ज्या रस्त्यावर पडल्या आहेत त्या तर आपल्या कुणीच नाहीत मग उगाच हा खटाटोप का करायचा आणि पोलिसांचा ससेमिरा हकनाक मागे का लावून घ्यायचा अशासारख्या विचारांनी आपण घेरले गेले आहोत का? मोबाइलवर ही भीषण दृश्ये चित्रित करून आपण काय मिळवणार?  भावनेचा लेशही नसलेली अशी आपण माणसं आहोत का? या आणि अशा प्रश्नांची उत्तरे मिळवायची वेळ आता नक्कीच आली आहे.    
भावना नावाची व्यक्तीच्या अंत:करणात स्त्रवत असलेली गोष्ट समूळ नष्ट झाली आहे का अशी शंका यावी अशी ही वर्तणूक आहे. कोंबड्यांची अथवा रेड्यांची रक्तबंबाळ होईपर्यंतची झुंज enjoy करण्याची मानसिकता ही अशीच निषेधार्ह आहे. अपंग मुलीवर आपल्या डोळ्यांदेखत बलात्कार होत असताना त्या गुन्हेगारापेक्षा अधिक संख्येने तिथे उपस्थित असलेली माणसे सुद्धा त्याला विरोध करू शकत नाहीत आणि आमच्याही वासना उद्दीपित होतील म्हणून आम्ही त्याला प्रतिकार करायला गेलो नाही असा अतिशय अधम पातळीवर स्वत:चा बचाव करू पाहतात हे धिक्कारार्ह आहे. मुळातच बघ्यांची भूमिका घेणे हा एक कलमी कार्यक्रम अशावेळी सर्वजण निष्ठेने निभावताना आढळतात.  
दमलेल्या बाबांची कहाणी तर सर्वश्रुत आहे पण दमलेल्या आईची कहाणी ऐकून किंवा प्रत्यक्ष अनुभवून तिची मनापासून सेवा करणारे हाताच्या बोटांवर मोजण्या इतपत तरी आहेत का? इथे भाषा लागते ती भावनेची. एखाद्याला वेदना होते आहे हे पाहूनही ज्याच्यात समानुभूतीची भावना उत्पन्नच होत नाही तो स्वत:ला माणूस कसा म्हणू शकतो? शिकून सवरून मोठे होऊन गलेलठ्ठ पगार घेणे आणि स्वत:ला यांत्रिकतेत बंदिस्त करून घेणे एवढेच आयुष्याचे संकुचित ध्येय राहिले आहे काय? याला आधुनिकता म्हणतात का? लहानपणी शाळेत शिकत असताना वाचलेल्या सुविचारांवर आज परिवर्तनाची इतकी धूळ साचली आहे की त्यामागील अक्षरेच आज धुसर झाली आहेत. शेजारच्या ब्लॉक मध्ये खून का पडेना आपल्याला काय त्याचे या विचारांनी भारलेली पिढी निर्माण झाली आहे का या भीतीने मनात चर्र झाल्याशिवाय राहत नाही.      
तसं बघायला गेलं तर आजचं शिक्षण हे 'money based' आहे , 'value based' नाही असे खेदाने म्हणावसे वाटते. झाडाची आभाळाकडे झेपावणारी फांदी झाडाच्या मुळाचे महत्व विसरू शकेल काय? Moral education नावाचा एक विषय पूर्वी शालेय अभ्याक्रमात असे.  आज त्याचे उच्चाटन झाले आहे की काय न कळे. मुके प्राणी, वृक्षवल्ली आणि आपल्यासारखी दिसणारी भोवतालची माणसे यांच्याप्रती भूतदया आणि कणव दाखवावी असे आपले कोणे एकेकाळी संत सज्जन सांगून गेले. त्यांचे विचार आम्ही चित्रपटात बघितले, पुस्तकात वाचले, अभ्यासक्रमात काही मार्कांसाठी आहेत  म्हणून अभ्यासले पण आचरले मात्र मुळ्ळीच नाही. दुसऱ्याची वेदना आपल्यातील भावनेची मुळे गदगदा हलवू शकत  नाही. अमक्या  ठिकाणी झालेल्या अपघातात इतके ठार असे आपण सहजगत्या म्हणू शकतो. रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जीवाची वेदना आपल्या डोळ्यांच्या कडा पाणावू शकत नाही. आपल्यातील माणुसकीच्या लोपलेल्या जाणीवेला आर्त साद घालू शकत नाही.             
'तू प्यार का सागर है,  तेरे इक बूंद के प्यासे हम' ही प्रार्थना ऐकल्यावर वाटत की खरंच त्या परमेश्वराच्या अंतरात पाझरणाऱ्या मायेच्या समुद्राचा एक थेंब तरी आपल्यात आज शिल्लक आहे का? आपण त्याचीच लेकरे आहोत ना? मग ही माया , ही ममता आपण कुणावर निछावर करण्यासाठी राखून ठेवली आहे? कुणाच्याही जखमेवर फुंकर घालण्याची क्षमता आपल्यात नाही का? कुणाच्या वेदनेवर ममतेची मलमपट्टी करण्याची ताकद आपल्यात नाही का? अहस्य वेदनेने, दु:खाने कुणी कळवळत असता त्याला तातडीने उपचारासाठी आपण शुश्रुषालयात घेऊन जाणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे असे समजत नाही का? उद्या हीच वेळ आपल्यावर आल्यास किंवा आपल्या जवळच्या कुणावर आल्यास आपण असेच उदासीन राहू शकू का? ही भावनिक, नैतिक बधिरता आपल्या माणूसपणाच्या अध:पतनाची पहिली पायरी नव्हे का? आपण इतके मेलेले आहोत का की कुणाची प्राणांतिक हाक सुद्धा आपल्यातील माणसाला जिवंत करू शकत नाही? आपल्यातील भावनेचा, असीम प्रेमाचा झरा वाहता करू शकत नाही?      
पैसा हे केवळ चरितार्थाचे साधन, प्रतिष्ठा हे शो ऑफ करण्याचे साधन आहे पण मनात रुजलेली माणुसकीची भावना हा या पृथ्वीतलावरील आपण माणूस असल्याचा आणि या देशाचे महत्तम नागरिक असल्याचा एक सबळ पुरावा आहे हे विसरून चालणार नाही. 

Tuesday 24 February 2015

कसं व्हायचं आपलं ……….


आपल्या सर्वांचीच कमाल आहे हं! म्हणजे आपण थंडीत म्हणतो केवढी थंडी आहे आणि उन्हाळ्यात म्हणतो केवढं उकडतंय. हे म्हणजे कॉंग्रेसच्या राजवटीत केवढा हा भ्रष्टाचार आणि भाजपच्या राजवटीत केवढी ही धर्मांधता असं म्हणण्यासारखं आहे.     
रस्त्यावर जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसले की आम्ही नाकावर रुमाल तरी धरणार किंवा रस्ता तरी बदलणार. आपल्या लहानपणापासून रस्त्यावरील, ट्रेनमधील आणि सार्वजनिक ठिकाणांवरील गलिच्छता  पाहूनही डोळ्यांना आणि नाकांना त्याची सवय होत नाही म्हणजे काय ? उघडी गटारे, घाणीने तुंबलेले नाले, पानांच्या पिचकाऱ्यांनी बरबटलेल्या भिंती, थुंकीने सजलेले रस्ते, क्रियाकर्म करून सजवलेले आडोसे हे सगळे आपल्या राज्याचे, देशाचे वैभव नाही का? म्हणूनच या घाणेरड्या सवयी अशा वर्षानुवर्षे जतन केल्या जातात.       
कुठेतरी, कोणातरी चिमुरडीवर पाशवी बलात्कार झाला तर आमचे मन एवढे आक्रंदून का उठते ? कित्येक वर्षांपासून अशाच प्रकारच्या बातम्या वाचून आणि ऐकून आपली गात्रे बधिर कशी होत नाहीत? बलात्कार करणारी माणसे आहेत का पशु? यांना आया-बहिणी नाहीत का? असे वांझोटे प्रश्न आपण स्वत:ला का पुन्हा पुन्हा विचारात राहतो? शिवाय बलात्कारा सारख्या अधम आणि मानवतेला काळिमा फासणाऱ्या कृत्याला शिक्षा मिळायलाच हवी असं कुठल्या बुकात लिहिलंय? आणि लिहिलं असेल तरी कायद्याच्या पळवाटा आहेतच ना त्यांच्या या कृष्णकृत्यावर पांघरूण घालायला?  सकाळी बातमी वाचून आपण मात्र सबंध दिवस उद्विग्न मनस्थितीत घालवणार. काय चाललंय या देशात असे विषण्ण होऊन म्हणणार. बलात्कार करणाऱ्यांना फाशी दिलं पाहिजे, हत्तीच्या पायदळी दिलं पाहिजे, तोफेच्या तोंडी दिल पाहिजे, टकमक टोकावरून त्याचा कडेलोट केला पाहिजे, त्याचे हात-पाय कलम केले पाहिजेत असं संतापाने बोलत राहणार. स्वत:शीच. अहो इथे वेळ आहे कुणाला? ज्याला त्याला आपल्या चरितार्थाशीच मतलब आहे. शिवरायांचा जमाना केव्हाच इतिहासजमा झाला आहे हे तरी आपल्या लक्षात येते आहे का?         
  अंधश्रद्धेविरुध्द जन्मभर लढा देत ज्या वयात शरीराने आणि मनाने निवृत्त जीवन जगायचं त्या वयात एवढ्या तळमळीने समाजोद्धार करायला दाभोलकर का सरसावले? ८२ वर्षाचे वृद्धत्व अंगावर घेऊन गोर-गरिबांच्या न्याय्य हक्कासाठी आणि टोलविरोधी आंदोलनात पानसरे एवढे सक्रिय का झाले ? दोघांनाही माहिती होतं की दबा धरून बसलेला मृत्यू क्षणाक्षणाला त्याचा पाठलाग करतो आहे. तरी झपाटल्यासारखे काम करत राहिले. नतीजा? दोघांनाही या भूमीवरून एकाच प्रकारे नेस्तनाबूत करण्यात आलं. दाभोलकर गेल्यावर जशा चर्चा रंगल्या तशाच पानसरे गेल्यावरही रंगल्या. सरकार आणि विरोधकांची एकमेकांवर आगपाखड करून झाली. व्यवस्थेला दूषणे देऊन झाली. पोलिसांच्या हतबलतेबद्दल सुस्कारे सोडून झाले. गवसले का काही हाती? तो काळाकुट्ट दिवस आपण शोकमग्न अवस्थेत घालवला आणि दुसऱ्या दिवशी क्रिकेटचा सामना बघण्यात गर्क झालो. महाराष्ट्र बंद किती यशस्वी झाला?     
आजकाल काळ जणू शेतकऱ्यांच्या जीवावरच उठला आहे. पिकामागून पिकं उध्वस्त होताहेत. बागाच्या बागा जळून जात आहेत. मनाने आधीच मेलेला शेतकरी फास लावण्याचा केवळ उपचार पार पडतो आहे. पण विशेष काय त्याचं? सत्ताधारी पक्षाने कोट्यवधींची मदत जाहीर केली आहे. ती शेतकऱ्यांना मिळो वा न मिळो. शाब्दिक रित्या जाहीर करणं महत्वाचं. सत्ता कोणाचीही असो, शेतकऱ्याच्या नशिबी सत्यानाश हा प्रारब्धभोग लिहिलेलाच आहे. दुष्काळाने करपून गेलेली शेते किंवा अवकाळी पावसाने वाहून गेलेली शेते आपण उघड्या डोळ्यांनी बघत रहायची आणि ही दुर्दशा सहन न झाल्याने शेतकऱ्याने डोळे मिटायचे हीच वहिवाट आजवर चालत आली आहे. शेतकरी कर्जबाजारी होवो नाहीतर त्याची जीवनयात्रा संपून जावो, एकमेकांची उणीदुणी काढण्याचे राजकीय कर्तव्य सर्व पक्षांनी तत्परतेने करायचे हा रिवाज आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी तर घडायच्याच. त्याने काय एवढे विचलित व्हायचे?     
शंकराच्या पिंडीवर अभिषेक करताना लाखो लिटर दूध वाया गेले तरी चालेल पण ते गोरगरीब मुलांच्या चुकूनही तोंडी लागता कामा नये. सण-समारंभ, शाही सोहळे, कुंभमेळे,डोळे दिपवणारी रोषणाई या सर्व गोष्टींवर कितीही वीज आणि पैसा खर्च झाला तरी चालेल पण हीच वीज आणि हाच पैसा कोणत्याही विधायक कामांकडे अजिबात वळवायचा नाही. भारताला शांघाय करायचा प्रयत्न करायचा पण अजूनही गावोगावी, खेडोपाडी केवळ पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करणाऱ्या महिलांचे प्रश्न अनुत्तरितच ठेवायचे. टोलेजंग इमारती बांधायच्या पण पायाखालचे रस्ते खड्डेविरहित म्हणून करायचे नाहीत. भारत बलाढ्य राष्ट्र म्हणून छात्या फुगवायच्या पण या राष्ट्राच्या मुळावर येऊ शकणारे परप्रांतीय लोंढे थोपवायचे नाहीत. लोकसंख्येला आळा घालण्याचे वैध उपाय मनात सुद्धा आणायचे नाहीत. परदेशांच्या धर्तीवर नाईटलाईफच्या लंब्याचौड्या बाता मारायच्या पण मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षिततेचा धसास न लागलेला प्रश्न तसाच लोंबकळत ठेवायचा. स्कॉटलंड पोलीसांनंतर मुंबई पोलिसांचा नंबर असे अभिमानाने नुसते म्हणायचे पण या पोलिसांच्या राहत्या घराची अतिशय दयनीय अवस्था, त्यांचा तुटपुंजा पगार, त्यांच्यावरील कामाचा अतिरिक्त ताण सोयीस्कररित्या दृष्टीआड करायचा.        
आणि शाळेत असताना शिकवलेले 'सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा' हे राष्ट्रभक्तीपर गीत आठवत आपण या निष्प्राण समाजव्यवस्थेकडे आणि निष्क्रिय सत्ताधारयांकडे बघता बघता आतून संपून जायचं.             

Sunday 22 February 2015

शिरीष कणेकरांना पत्र …………


आदरणीय श्री.शिरीष कणेकर यांस
तुमचं चारशेच्या वर पृष्ठसंख्या असलेलं 'मी माझं मला' हे प्रदीर्घ आत्मचरित्र वाचलं. बऱ्याच वर्षांनंतर एवढं मोठं पुस्तक वाचण्यासाठी म्हणून हातात धरलं. आजवर मी तुमची अनेक पुस्तके वाचली आहेत.( विकत घेऊन ) पण मला हे पुस्तक सौ. नंदिनी गोखले यांच्याकडून भेट मिळालं ही खास बाब आहे. माझा व्यवसाय आणि प्रापंचिक जबाबदाऱ्या (तुमच्या भाषेत त्या शिंच्या असतातच पाचवीला पुजलेल्या ) सांभाळून मी हे पुस्तक वाचून पूर्ण केलं. लेखनाची भट्टी छान जमली आहे. ( तशी तुमची नेहमीच जमते ) सगळ्या खऱ्या गोष्टी तुम्ही पुस्तकात समाविष्ट केल्या नाहीत तरी जे लिहिलं गेलं आहे ते सत्य आहे असं मानल्यास तुम्ही खूप काही लहानपणीच गमावलेलं आहे हे कबूल पण नंतर मात्र खूप काही कमावलेलही आहे याची जाणीव हे पुस्तक करून देतं.     

तुम्ही विकसित केलेली 'कणेकरी शैली' खुमासदार आहे. एखाद्या प्रसंगातील बोलकं लघुभाष्य, त्या परिस्थितीतही सुचलेला विनोद,त्या विशिष्ट प्रसंगाला लाभलेली कारुण्याची झालर,काही प्रसंगांत माणसांच्या स्वभावामुळे,वर्तनामुळे त्यांच्याविषयी मनात निर्माण झालेला कडवटपणा आणि त्यातून जन्मलेलं उपरोधिक भाष्य या सगळ्या भावभावनांची सरमिसळ म्हणजे हे आत्मचरित्रपर लेखन आहे असे म्हणायला हरकत नसावी.       
या पुस्तकातील काही प्रकारणे  (लोकांची नव्हे ) अगोदर माझ्या वाचनात आलेली आहेत. काल्पनिक प्रकाशक  कोठावळे यांच्या काल्पनिक भाच्याने तुम्हाला 'मामा ' बनविणे, लेखकाचा ऑटोग्राफ मागून मग त्याचे नाव विचारणे, advertising agency मधील लतादीदींच्या CD प्रकाशनाच्या वेळचा प्रसंग आणि असे अनेक प्रसंग तुमच्या खास शैलीत वाचायला जाम आवडले. 'पॉप्युलर' कडे तुमची सगळी ठेव बुडाल्यानंतर देखील तुम्ही जो काही प्रसंग वर्णन केला आहे त्यात पैसे बुडाल्याचे शल्य आहेच पण 'ह्या माणसांनी असेच परस्परांचे पैसे देऊन टाकावे' या कारखानिसांच्या वाक्यानंतर त्या परिस्थितीतही हसू आल्याशिवाय राहत नाही.         
जेव्हा क्रिकेटचं चालतंबोलतं तंत्र सुनील गावसकर तुमच्या घरी जेवायला येत होता तेव्हा तुमच्या मुलाने जिन्यातच त्याला विचारले, ए सुनील गावसकर तुझे दात पाडू का ? त्यावर त्यानेही तितक्याच सहजतेने 'नको. राहू देत. जेवताना उपयोगी पडतील.' हे जे हजरजबाबीपणे उत्तर दिले तेही वाचताना मजा  आली. एरवी ही छोटी मुले मोठ्यांना अतिशय निरागसपणे क्लीन बोल्ड करतात. यथावकाश अमर कणेकर हा डॉक्टर झालाच पण डेंटल सर्जन झाला असता तर 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' ही म्हण त्याने खरी केली असती. प्रत्येक भारतीयाच्या मनात गायिका म्हणून जिचे अग्रगण्य स्थान आहे त्या लतादीदी तुमच्या घरी जेवायला आल्या, त्यांनी खिमा पटीस परत मागून घेतले आणि चक्क 'निगाहे मिलानेको जी चाहता हैं' हे आशाचं गाणं गुणगुणलं  असं अनमोल भाग्य किती जणांच्या वाट्याला आलं आहे?          
सिनेसृष्टीतील अनेक चेहऱ्यांना,मुखवट्यांना तुम्ही जवळून पाहिलंत. त्यांचा खरेपणा-खोटेपणा-भपका तुम्हाला अनुभवायला मिळाला. त्यातील काहींच्या मनातील सच्चेपणाला तुम्ही स्पर्श केलात, काहींशी मैत्री जोपासलीत. ज्येष्ठ नटी शशिकला यांनी अभिनेते प्राण यांच्या संदर्भात 'थरो जंटलमन' ची केलेली व्याख्या ऐकून तुम्ही अंतर्बाह्य थरारलात. अभिनेते मनोजकुमार(?) आणि अशोककुमार यांच्या एका चित्रपटातील प्रसंग मात्र डोळ्यांत पाणी आणेपर्यंत हसवून गेला. अशोककुमारचे पाय लुळे पडतात. मुंबईत काही केल्या डॉक्टर मिळत नाही. (बहुतेक सगळे ग्रामीण भागात दवाखाने उघडून असतात ) मनोजकुमार तिरका शिडीसारखा उभा राहतो आणि रेडिओ लावतो. रेडिओवर 'कदम कदम बढाये जा' हे गाणे सुरु होते आणि या गाण्यापासून स्फूर्ती घेऊन अशोककुमार त्याचे पाय ड्रील केल्यासारखे हलवू लागतो. हा प्रसंग 'परलिसिस' वर उपचार करणाऱ्या समस्त डॉक्टरांनी जरूर वाचवा. मनोरंजन तर होईलच पण त्यातून त्यांना संशोधनाची नवी दिशाही मिळू शकेल.                
तुम्ही अनुभवलेला न्यूयॉर्क पासून जवळ असलेल्या तुम्ही राहत असलेल्या एका गावातील दिवे गेल्यानंतरचा प्रसंग अंगावर काटा आणतो. वैज्ञानिक,तांत्रिक,आर्थिक दृष्ट्या प्रगत असलेल्या देशातही असे जीवघेण्या थंडीत घाम फुटायला लावणारे प्रसंग घडू शकतात याचं प्रत्यंतर आलं. शिवाय शेजारधर्म तिथे औषधालाही नसल्याने अडचणीत सापडलेल्या माणसासाठी फक्त आणि फक्त त्याची पूर्वपुण्याईच कामाला येऊ शकते याची खात्री पटते. अशावेळेस आपल्या देशाची, येथील माणसांची आणि शेजारधर्माची किंमत आपल्याला कळते.         
तुमचा 'कट्टा ग्रुप' देखील मनाला खूप भावाला. तुमच्या अनेक मिश्किल, धम्माल, हळव्या आठवणी त्या शिवाजीपार्कच्या कट्ट्याशी निगडीत आहेत. तुमच्या बऱ्याच मित्रांना तुम्ही लेखक आहात याचा पत्ताही नाही हे ऐकून मजा वाटली. आज यातील अनेक मित्र हे जग सोडून गेल्याचं दु:ख आहे, कुणाशी बिनसल्याची खंत आहे. पण डोळे ओले करणाऱ्या या सुगंधित आठवणींची शिदोरी हे तुमचे वैभव तुमच्यापाशी आहे.
एकपात्री प्रयोगाच्या निमित्ताने अकरा वेळा केलेले अमेरिकेचे दौरे, अवघा महाराष्ट्र पिंजून काढणारे दौरे आणि स्वदेशी व परदेशी प्रेक्षकांनी तुमच्या कार्यक्रमाला मनमुराद हसून दिलेला प्रतिसाद ही तुमच्या मर्मबंधातील ठेव असावी असे मानायला हरकत नाही. 'कुछ पानेके लिए कुछ खोना पडता है' हे सूत्र जवळजवळ प्रत्येकाच्याच आयुष्याला applicable आहे. तेव्हा आतातरी जुनी मढी उकरू नका कारण तुमच्याच शब्दात फक्त दु:खाचेच सांगाडे हाती लागतील. असो.               

तुम्ही सिटीलाईटला 'ठाकूर आणि मंडळी' यांच्याकडे लाडू खात खात गप्पा मारता हे मला विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे. माझे माहेरही तिथलेच आहे. त्यामुळे कधी आपल्या भेटीचा योग आला तर मला खूप आवडेल आपल्याला भेटायला.
असेच लेखानाधीन होऊन लिहित जा आणि लिखाणातून वाचकांना भरपूर आनंद देत जा. ( कारण 'आनंद' नावाचा शब्द आताशा आपल्या जीवनातून हद्दपार होतो आहे की काय अशी भीती वाटू लागली आहे )