Monday 22 April 2013

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय असते?


अहो आपली माधवरावांची रमा उर्फ अवंतिका हो! आठवतेय ना? तिने एक नुकतीच प्रेमाची गोष्ट सांगितलीय. चित्रपटाद्वारे! अहो कुणाला म्हणजे तुम्हा आम्हाला. आपल्याला पटावी असा तिचा अट्टाहास असेलही कदाचित पण आपल्याला नाही आवडली बुवा तिची ही प्रेमकथा. अहो लेखनही तिचंच आहे. मग आजच्या युगात अशी स्वत:साठी कणा नसलेली व्यक्तिरेखा तिने का बरे निवडावी? या दांडेकर आजोबांच्या नातीने आमच्या अपेक्षा खूप उंचावल्या होत्या म्हणून आम्ही हा चित्रपट बघायला गेलो. या चित्रपटाच्या पोस्टरचा आणि चित्रपट संपल्यानंतर दाखवल्या जाणाऱ्या भीषण नाचाचा संपूर्ण चित्रपटाशी काहीएक संबंध नाही. संकलनामध्ये अनेक तृटी आहेत. सचिन खेडेकरचा चित्रपटातील सुखावह वावर आणि पल्लवी जोशीची छोटी परंतु चांगली भूमिका  ही शक्तिस्थाने सोडली तर बाकी चित्रपट कंटाळवाणा वाटतो. मृणालच्या बहिणीची व्यक्तिरेखा मात्र दिलखुलास आहे. ( तिच्या व्यक्तिरेखेवर शेवटचे गाणे चित्रीत केले असते तर ते अधिक समर्पक ठरले असते)  मध्यंतर होण्याआधीचा चित्रपट जरातरी बरा आहे पण नंतरचा चित्रपट बोअरिंग आहे. मधूनमधून या चित्रपटातील पात्रे येउन अनावश्यक स्वगत म्हणतात. तरी बाबा ज्याने त्याने आपापल्या सहनशक्तीचा अंदाज घेऊन हा चित्रपट बघणे सोयीस्कर! 
ही कथा आहे दोन समदु:खी जीवांची. डॉ. रोहित फडणीस आणि अनुश्री यांची. स्वत:च्या स्वप्नांची म्हणा किंवा महत्वाकांक्षेची पूर्तता करण्यासाठी रोहितची बायको त्याच्यापासून विभक्त होते. परदेशात स्थायिक होते. त्यांना दोन मुले असतात. अनुश्रीच्या नवऱ्याने परक्या बाईशी संधान बांधल्याने तो त्याच्या घरापासून, घरच्यांपासून वेगळा राहत असतो. या गोष्टीला तब्बल चार वर्षे लोटलेली असतात. अनुश्री स्वत:च्या पायावर उभी असते. 'प्रीटी पेटल' नामक तिचे फुलांचे दुकान असते. तिला दोन मुली असतात. तिच्या सासूबाई सुद्धा प्रेमळ असतात. मुख्य म्हणजे तिच्या बाजूने असतात. या रोहित आणि अनुश्रीची मुले एकाच शाळेत शिकत असतात. एकदा खेळ ऐन रंगात आला असता अनुच्या मुलीला खरचटते आणि तिला बँडेज बांधायला तिथे रोहित अवतरतो. गाठ भेट होते.  मग नेमकी तिची गाडी त्याच्या हॉस्पिटल समोर येउन बंद पडते. पुन्हा गाठ पडते. दोघांत संवाद होतात. नंतर रोहितच्या वाढदिवसाचे निमित्त होते. फुलांचे बुके पाठवायचे असतात. अनुची बहिण तिची नजर चुकवून रोहितला तिच्या घरी येण्याबद्दल त्याला एक एसएमएस पाठवते. तो येतो. ती सुंदर साडी नेसलेली असते. या भेटीआधीच त्यांच्या नात्याला बहर यायला सुरवात झालेली असते. तो फक्त प्रेमाने तिचा हात हातात घेतो आणी नेमका त्याच वेळी अवसानघात होतो. कोणाच्यातरी  लग्नाला गेलेल्या तिच्या सासूबाई, दोन मुली आणि तो बाहेरख्याली नवरा घराच्या बंद दरवाज्यातून बिनदिक्कत आत येतात आणि कढत नजरेने दोघांकडे बघतात. ते दोघे चोर असल्यासारखे व गुन्हा केल्यासारखे चरकून उभे राहतात.  इथे वाजवलेले पार्श्वसंगीतही खूप अतिरेकी आहे.
अनुच्या सासूबाई आपल्या सुनेच्या या प्रतापामुळे तिच्याशी बोलेनाशा होतात. नवरा उखडतो. (वास्तविक पाहता त्याने उखडण्याचा अधिकार आधीच गमावलेला असतो) ती म्हणजे अनु नुसती आतल्या आत रडते. तिची बहिण तिच्या पाठीशी असूनही ती मौनव्रत असल्यासारखी तोंड उघडत नाही. जवळ जवळ पाऊण सिनेमा तिच्या तोंडाचे हे कुलूप निघालेले नाही. ती तिचे दु:ख अश्रूंबरोबर गिळते. तिच्या सासुला लो बी. पी. होते. अर्थातच त्यांना रोहितच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येते.  तिथे हा उपटसुंभासारखा उगवलेला तिचा नवरा येतो आणि त्याच्या आईला तावातावाने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवतो. अनु दिग्मूढ होते . नाईलाज झाल्यासारखी बघत राहते. तिच्या न बोलण्याने रोहीतही चिडतो. मग यथावकाश अनुची सासू घरी येते. मुलाला तिथे राहण्याचा आग्रह करते. त्याचा बिझनेस उतरणीला लागलेला असतो. तो अनुची सहानुभूती प्राप्त करु पाहतो.  कळस म्हणजे एकदम उठून तो तिला स्वत:च्या जवळ ओढतो आणि ती प्रतिकार करत नाही. तिच्या मुली आणि सासूबाई त्याची गाडी रुळावर आल्याचे पाहून आनंदतात.  तिकडे रोहितची बायको दिवाळीला घरी येते म्हणजे घटस्फोटीत नवऱ्याच्या घरी! थोडक्यात दोन्ही घरे आनंदित असतात निदान वाटतात. मुलांना आईबाबा एकाच वेळी अनुभवायला मिळतात.                         
 पण आत काहीतरी बिनसलेलेच राहते.  अनुला रोहित हवा असतो पण तिच्यात लढण्याची ताकद नसते किंवा नातेवाईकांना फेस करण्याची ताकद नसते. तुझी लढाई तूच लढली पाहिजेस असे रोहित तिला सांगत असतो. स्वत:च्या मुलाचे वागणे गैर असूनही तिच्या सासूबाई सुनेला परपुरुषाबरोबर पाहिल्यानंतर  एकदम अबोलाच  धरतात. इतकी चार वर्षे म्हणजे तो नतद्रष्ट मुलगा घरातून निघाल्यापासून त्या सुनेने अगदी स्वत:च्या सुखाचा विचार बाजूला सारून जिवाभावाने सासूचे, मुलींचे केलेले असते. हे त्या सासूला दिसत नाही काय?  बरं यात भरीत भर म्हणून अनुचे आईवडीलसुद्धा ती जेव्हा घटस्फोटाचा विषय काढते तेव्हा अगं संसारात चढ-उतार हे यायचेच. शेवटी घर एकसंध राहावं म्हणून घरातील स्त्रीलाच तडजोड ही करावीच लागते असा मौलिक सल्लाही देतात. ती भांबावून, गोंधळून जाते. तिचा रोहितशी लग्न करण्याचा निर्णय बदलते. बहिण याबद्दल जेव्हा तिला विचारते तेव्हा ती शेवटी कसाही असला तरी तो माझा नवरा आहे  असे म्हणून तिची आणि प्रेक्षकांची बोलती बंद करून टाकते. व्वा रे पतिव्रता!      
अनुचा नवरा ज्या बाईबरोबर चार वर्षे राहत असतो ती बाई एके दिवशी एकाएकी म्हणजे नेमकी दिवाळीला त्यांच्या घराच्या दाराशी येते आणि त्याला धमकावते. त्याआधी अनुच्या वडिलांकडून तिच्या नवऱ्याने तीस एक लाख रुपये लाटलेले असतात. याचे बिंग तिची बहिण फोडते. तरीही अनुच्या सासूबाई मुग गिळून गप्प! अनु थोडीफार वाक्ये मुसमुसून रडत त्याच्या अंगावर फेकते आणि सरळ रोहीतकडे धाव घेते. रोहितच्या बायकोला तिच्या नवऱ्याचे महत्व कळलेले असते पण अंमळ उशीर झालेला असतो. तो प्रेमात पडल्याची कबुली तिला देतो आणि तुला आनंदी राहण्याचा पूर्ण हक्क आहे असे त्याला सांगत पण खिन्न मनाने ती काढता पाय घेते. दोन दु:खी जीवांचे अखेरीस मिलन होते आणि प्रेक्षक सुटले असे वाटत असताना ते शेवटचे नाच-गाणे प्रेक्षकांच्या डोळ्यांचा ताबा घेते. एक प्रेम, दोन प्रेम अशी बरीच गिनती करत हे चौघेजण मनमुराद नाचतात. कदाचित या चित्रपटातून सुटल्याचा त्यांनाही आनंद होत असावा.          
चित्रपटभर पोटभर रडल्यानंतर या गाण्यात अनुश्री म्हणा किंवा मृणाल आनंद व्यक्त करत, हसतहसत गाणे म्हणताना, नाचताना दिसते. चित्रपटाचा आशय, त्याचा दर्जा याचे शेवटच्या नाचगाण्याशी काहीही सोयरसुतक नाही. कितीही प्रेमं केली तरी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं अशा अर्थाचे गाणे म्हणत चौघे व इतरही नाचतात. प्रेक्षक सबंध चित्रपटाचे आणि त्या गाण्याचे नाते समजून घेण्याचा व्यर्थ प्रयत्न करत घरी येउन चित्रपट बघितल्याच्या त्वेषाने तरी किंवा चित्रपट संपल्याच्या आनंदात नाचू शकतात.       

Thursday 18 April 2013

आंबा न आवडणारी माणसे ………


या पृथ्वीतलावर आंबा, आईस्क्रीम, लता मंगेशकर आणि पु.ल.देशपांडे न आवडणारी माणसे आहेत. नुसती आहेत नव्हे तर ती सुखनैव नांदत आहेत. आंबा न आवडणाऱ्या माणसांना चैत्र-वैशाख हे मराठी महिने आवडत नाहीत. झाडांवर कोकिळा ओरडू लागल्या की आम्रमासाची चाहूल लागते. रस्त्यावरून हापोssss स असा पुकारा केव्हाही कानावर पडू शकतो.  आंबा न आवडणारी माणसे अशा वेळी दारे-खिडक्या बंद करून बसत असावीत.   
आपली अशी जगावेगळी आवड किंवा नावड जोपासताना ह्यांची छाती विलक्षण उन्नत होत असावी. एकदा एक ओळखीचे गृहस्थ मला रस्त्यात भेटले. आम्ही बोलत असताना बाजूने एक आम्बेवाला हापोssss स असा पुकारा करत गेला. त्या गृह्स्थांच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली. काय वैताग आणतात हो हे आंबेवाले? एका जागी स्वस्थ बसा. ज्यांना आंबे घ्यायचे ते घेतील. उगीच हापोssss स, हापोssss स कशाला ओरडत राहायचे? मी सांगतो निशाताई, ह्यांच्यावर बंदीच घालायला पाहिजे. मला त्यांच्या त्राग्याचे नक्की कारण कळले नाही. अहो जाऊ दे हो. पण बाजारात आंबे यायला लागले आहेत याची ही नांदी आहे. आम्ही सगळे आंबा शौकीन आहोतमी फक्त एवढेच म्हटले आणि त्या गृहस्थांचा चेहरा कारले प्यायल्यासारखा कडू झाला. आंब्याचा आणि माझा काहीही संबंध नाही. ते गृहस्थ तिरीमिरीत निघून गेले आणि आंब्याचा राग करणारे हे गृहस्थ मला त्यांच्या नावडत्या माणसांच्या यादीत गणून गेले कारण नंतर ज्या ज्या वेळी मी त्यांना दिसत असे त्या वेळी ते रस्ता बदलत.          
 एकदा लायब्ररीतून येताना आमच्या सोसायटीतील एक वयस्कर बाई भेटल्या. काय वाचताय? त्यांनी आत्मीयतेने विचारले. अर्थातच पु.ल. मी उत्तरले. त्यांच्या हातात एक चांगले जाडजूड पुस्तक होते.  एक ऐकाल? यापुढे असं काही वाचू नका. बाबा कदम वाचत जा. आयुष्य रोमांचकारी वाटेल. मला माझं आयुष्य रोमांचकारी वाटण्यापेक्षा दर्जेदार वाटायला हवे आहे म्हणून मी पु.ल. वाचते. मी ताड्कन उत्तरले. त्या बाई नाक मुरडत फणकाऱ्याने निघून गेल्या. नंतर कधी दिसल्याच नाहीत. बहुधा त्यांनी लायब्ररी बदलली असावी.              
एक गृहस्थ नित्यनेमाने त्यांची कुत्री घेऊन संध्याकाळी हिंडायला निघत. मी थोडी लांबूनच त्यांना भेटले. इकडच्या तिकडच्या चारदोन गोष्टी बोलल्यानंतर मी त्यांना सहज म्हटले, अहो ते बघा आपल्या जवळ नवीन आईस्क्रीम पार्लर उघडले आहे. माझ्या चेहऱ्यावरील आनंदाचा त्या गृहस्थांना बराच त्रास झाला असावा. आमची कुत्री देखील आईस्क्रीमला तोंड लावत नाहीत ते म्हणाले आणि माझ्या आ वासलेल्या तोंडाची यत्किंचितही दाखल न घेता ते गृहस्थ भराभर कुत्र्यांना ओढत निघून गेले.      
लताचा अद्वितीय सूर हे तर माझ्यासारख्या अनेकांच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. मुळात लताचा स्वर आणि गोडवा ही द्विरुक्ती आहे. हापूस  जास्त गोड की लताचा स्वर जास्त गोड हे सांगणे दहाव्वीच्या पेपरातील 'डी' ग्रुप प्रश्नापेक्षाही अवघड काम आहे. त्यापेक्षा हापूस आंबा म्हणजे 'सिझनल लता' आणि लता म्हणजे 'बारमाही हापूस' ही व्याख्या जास्त सोयीस्कर आहे. तर अशा बहुतेक सर्वांच्या तनामनात रुजलेल्या लताला नाके मुरडणारीही माणसे आहेत. 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या' हे गाणे मी लतापेक्षा जास्त चांगले गायले असते असे सांगणारी व्यक्ती एकेकाळी माझ्या परिचयाची होती असे मी सखेद इथे नमूद करते. 'इतना क्यों आप लता को सुनते हो'? असा प्रश्न विचारून आपल्या आनंदी राहण्याचा मूलमंत्र नासवणारी मंडळी आहेत.    
प्रत्येकाला मते आहेत , आवडीनिवडी आहेत मान्य. पण ढळ श्रद्धास्थाने असलेल्या आणि जास्तीत जास्त सरासरी असलेल्या आवडीच्या संदर्भात इतकी पराकोटीची तीव्र नावड असलेली माणसे आपल्या अवतीभवती क्षणोक्षणी वावरत आहेत  असे अनुभवास आले की गुबगुबीत उशीमधून टाचणी टोचल्यासारखे वाटत राहते.  

Wednesday 17 April 2013

'आजचा दिवस माझा' या चित्रपटाच्या निमित्ताने……….


काही दिवसांपूर्वी प्रसृत झालेला हा चित्रपट चांगला आहे. सर्व राजकारण्यांनी पाहण्यासारखा आहे व त्यातून बोध घेण्यासारखा आहे. माणसाची, त्यातून सत्तेवरील माणसाची इच्छाशक्ती दुर्दम्य असेल तर एका रात्रीतही चमत्कार घडू शकतो याचा प्रत्यय चित्रपट बघताना येतो. सत्तेत प्रमुखपद भूषवणारा जर मनात आणेल तर जनहितासाठी योग्य बदल घडवत सामान्य माणसाच्या मनातील स्वप्नांना सत्याचे पंख देऊ शकतो. पण मुळात असा बदल घडवण्याची त्याची इच्छा असेल तरच! नाहीतर केवळ स्वत:च्या सगे-सोयऱ्यांची सोय करून इतर लायक लोकांची गैरसोय करणारेच या क्षेत्रात जास्त आहेत. 
अहो भर रस्त्यावरील खड्डे या राजकारण्यांना दिसत नाहीत का? पण ते बुजवण्याची इच्छा असलेले किती असतात? ठिकठिकाणी लावलेल्या होर्डिंग मुळे बकाल झालेल्या भिंती, उघडी गटारे, नाक्यानाक्यावर साचलेले कचऱ्याचे ढीग, रोजची वाहतुकीची होणारी कोंडी,  अनधिकृत इमारती, जंगलात जाऊन केलेली प्राण्याची शिकार, स्त्रियांवर होणारे अत्याचार, पैशाअभावी सर्वसामान्यांना नाडणारी हॉस्पिटले, रोज काही ना काही कारणाने जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहणारी रेल्वे, शिक्षणाचा होत  असलेला चुथडा, खिशाला आव्हान देणारी महागाई, राजकारण्याचे लांछानास्पद वर्तन, दुष्काळ, बेरोजगारी, बालमजुरांच्या समस्या, वृद्ध-अपंगाच्या समस्या असे अनेक प्रश्न तडीस लावून जनतेचे भविष्य सुकर करायचे सोडून स्वत:चे खिसे गरम करून आपले भविष्य सुकर करण्याच्या कामीच हे सत्ताधारी लागलेले असतात.   
राजकीय वाद , उद्घाटने, समारंभांची निमंत्रणे, भाषणे, बक्षिसांचे वितरण अशा अनेक मौलिक व्यापात व्यस्त असलेले हे सत्ताधारी इतर त्यांच्या दृष्टीने बिन-महत्वाच्या कामांत काय म्हणून लक्ष घालतील? अहो यांनी समारंभांना हजेरी लावली नाही तर समारंभाची शान बिघडणार नाही का? सत्ताधारयांच्या हातून पारितोषक स्वीकारण्यात काय मजा असते ते आम जनतेला काय कप्पाळ कळणार? शिवाय रिबिनी यांनी नाही कापायच्या तर कुणी कापायच्या? राजकीय वाद, एकमेकांवर कुरघोड्या, दोषारोप नाही केले तर पत्रकार सनसनाटी बातम्या कशा मिळवणार ? प्रत्येक वाहिनीचा टी. आर. पी कसा वाढणार? लोक टी. व्ही. ला  खिळून कसे बसणार? एकमेकांविरुद्ध षड्डू ठोकून, रिंगणात उतरून आपापल्या राजकीय सामर्थ्याचे प्रदर्शन करणारे मदमस्त सत्ताधारी लोक कसे बघू शकणार?    
निवडणुका जसजशा जवळ येऊ लागतात तसतसे या क्षेत्रातील नामधारी हळूहळू जागे होतात. कार्यरत असल्याचे निदर्शनास आणतात.  नागरी वस्त्यांत फिरून जनमताचा कौल घेऊ लागतात. आता जनतेच्या समस्या यांना अंधुकशा दिसू लागतात. विजयाची गुढी उभारायची तर या जनतेला शरण जाण्यावाचून पर्यायच नसतो. त्यामुळे त्यांच्या समस्यांवर तात्पुरती का होईना पण फुंकर ही घालावीच लागते. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे नाटक करावे लागते, धान्याचे-भाज्यांचे भाव कमी करावे लागतात, आश्वासनांचे डोस पाजावे लागतात, अनधिकृत बांधकामांच्या चौकशीसाठी समित्या नेमाव्या लागतात, समस्त स्त्री-वर्गाला संरक्षण देण्यासाठी काही उपाययोजना कागदावर तयार ठेवाव्या लागतात, झोपडपट्टीची पाहणी करून  त्यात राहणाऱ्या जनतेच्या गरजेनुसार त्यांना गोष्टी मोफत पुरवल्या जातात, पाणी-वीज या समस्यांवर तोडगे काढावे लागतात, अवेळी येणारा पाउस किंवा दुष्काळ, पिकांचे झालेले नुकसान, कर्जात आकंठ बुडालेला शेतकरी, नैराश्यापोटी त्याने केलेल्या आत्महत्या अशा सत्ताधाऱ्यांच्या गळ्यापर्यंत येणाऱ्या समस्या राजकीय कुशलतेने दूर ठेवण्यात यशस्वी व्हावे लागते, एकदा खुर्ची मिळाली की पुन्हा पाच वर्षांसाठी या प्रश्नांकडे पाठ फिरवली तरी काही बिघडणार नसते .      

मुळात मला या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे भले करायचे आहे ही प्रामाणिक इच्छा किती सत्ताधाऱ्यांच्या मनात असते ही संशोधनाचीच बाब आहे. शेवटी रामाच्या मंदिरात जाउन रामाला पूजणे सोपे आहे पण त्याच्या आदर्श राज्यकारभाराचा कित्ता गिरवणे हे कोणत्याही सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर खचितच पडण्यासारखे नाही. शिवबांच्या पुतळ्याला हार घालणे सोपे आहे परंतु त्यांच्यासारखा  निर्भीडपणे, निपक्षपातीपणे राज्यकारभार चालवणे महत्कठीण काम आहे. 
इतरांचे भले करण्यासाठी थोडेच आपण या सत्तेवर विराजमान झालो आहोत? आधी आपले भले करू मग इतरांचा विचार करू अशा विचारांच्या प्रवाहात स्वत:च्या माणुसकीच्या प्रतिमेचे विसर्जन करणाऱ्या सर्व सत्ताधाऱ्यांना माझा कोपरापासून ढोपरापर्यंत नमस्कार!


Saturday 13 April 2013

एका 'TEN' ची सत्यकथा


मला ज्ञात असलेल्या आणि अज्ञात असलेल्या सर्व डॉक्टरांचा योग्य आदर राखून मी ही सत्यघटना लिहावयास प्रवृत्त झाले आहे . सर्वसामान्यांच्या लेखी डॉक्टर हा देव असतो जो रुग्णाला यमपाशातून सोडवू शकतो. पण प्रस्तुत घटना निराळी आहे . माणसाचा डॉक्टरवरील विश्वास डळमळीत करणारी आहे.  
भारतातील एक दाम्पत्य जे अमेरिकेत स्थायिक असतं ते भारतात येतं. येथील वातावरणाने म्हणा किंवा गर्दीने की आणखी कोणत्या तरी कारणाने तिचे डोके दुखू लागते. ती नेहमी घेत असलेली व तिच्या सवयीची डोकेदुखीची गोळी येथील केमिस्टकडे उपलब्ध नसते म्हणून तो केमिस्ट तिला एक पर्यायी गोळी देतो. या विशिष्ट गोळीबद्दल त्या दोघांनाही माहिती नसते. केवळ केमिस्ट हमी देतो यास्तव कोणत्याही डॉक्टरचा वैद्यकीय सल्ला न घेता तो गोळी घेते.  
त्यांच्या येथील घरी मित्रमैत्रिणी जमा होतात.  या आधीच त्या घेतलेल्या गोळीचा काहीसा परिणाम म्हणून तिच्या हातावर पुरळ उठून खाज येत असते. त्यावर उपाय म्हणून तिचा नवरा कसलेसे मलम लावतो. घरी पाहुण्यांच्या गराड्यातही ती अस्वस्थच असते. तो समारंभ कसाबसा निभावतो. त्या रात्रीही तिला अंगावर ठिकठिकाणी  पुरळ उठून विलक्षण खाज येते.  
दुसऱ्या दिवशी मात्र त्यांना डॉक्टरांकडे जावेच लागते. साधी Allergic reaction आहे असे सांगून ते डॉक्टर काही विशेष करावयास नको असे खात्रीपूर्वक सांगतात. पण तिच्या शरीरात चाललेल्या भयंकर घडामोडींची सुतरामही कल्पना या डॉक्टरांना येत नाही. ती परत घरी येते. तिच्या गळयाकडील भाग थोडा सूजट वाटू लागतो. डोके जड झाल्यासारखे वाटते. ताप येतो. तो काही खास व्यावसायिक कारणानिमित्त तिच्या परवानगीने बाहेरगावी जातो आणि इथे तिची परिस्थिती गंभीर होते. तिला हॉस्पीटलमध्ये दाखल केले जाते  जे डॉक्टर तिला ट्रीट करत असतात ते तिला स्टेरोईडचा ओव्हरडोस देतात. परिणामी तिची तब्येत अधिक खालावते. तो तिला बघून हवालदिल होतो. नर्स कडून डॉक्टरांचा नंबर जबरदस्तीने घेतो आणि त्यांच्याशी बोलल्यावर त्याला कळते की डॉक्टर बाहेरगावी आहेत. तिला दुसऱ्या नामांकित हॉस्पिटल मध्ये शिफ्ट केले जाते. तिथे दोन डॉक्टर तिला ट्रीट करतात. तिला  'TEN'  म्हणजेच 'Toxic Epidermal Necrolysis'  झाल्याचे सिद्ध होते. त्याच्या बाहेरगावी असलेल्या डॉक्टर मित्राकडून त्याला कळते की या अवस्थेत रुग्णाच्या रक्ताच्या तपासण्या होणे खूप गरजेचे असते. तो डॉक्टरांना परोपरीने सांगतो पण त्याचे म्हणणे डॉक्टर उडवून लावतात. तिला  'IV ड्रीप ' सुद्धा लावलेली नसते जी 'Toxic fluid ' शरीराबाहेर टाकण्यास मदत करते. स्टेरोईड मात्र चालूच असते. तिची रोग प्रतिकारक क्षमता कमी कमी होत जाते. त्यात तिला न्युमोनिया होतो. तिच्या शरीरात विष भिनते आणि शेवटी ' Sepsis' ने तिचा मृत्यू होतो.  
तिला डोकेदुखीची गोळी आपणच घ्यायला लावल्याचा तिच्या नवऱ्याला भयंकर पश्चात्ताप होतो. पण त्याचबरोबर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या बायकोचा मृत्यू झाल्याची त्याची खात्री पटते. तो या सर्व डॉक्टर विरुद्ध मेडिकल कौन्सिलकडे दाद मागतो. कित्येक महिन्यांनी तो त्याचे म्हणणे मेडिकल कौन्सिलला पटवून देण्यात जरी यशस्वी झाला तरी केवळ तीन महिन्यांची सस्पेन्शन ऑर्डर त्या अपराधी डॉक्टरविरुद्ध निघते. त्याचे समाधान होत नाही. तो त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी अजूनही प्रयत्नशील असल्याचे कळते आणि ही मनाला विषण्ण करणारी घटना इथेच संपते.    
घटना संपली तरी मनावर उमटलेले तिचे उदास पडसाद सहजासहजी पुसले जाणार नाहीत  या घटनेने अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे . डॉक्टरांना काही गोष्टी सुचल्याच नाहीत का? रक्तातील ' Toxicity' तपासण्यासाठी  रक्ताची चाचणी वारंवार करावी लागते हे ज्ञान त्यांना नव्हते का? मग तरीही या चाचण्या का केल्या गेल्या नाहीत? 'IV ड्रीप' का लावली गेली नाही ज्या द्वारे रुग्णाच्या शरीरातील  'Toxic Fluid' फ्लश आउट होण्यास मदत झाली असती. एवढ्या गंभीर अवस्थेत रुग्णाला सोडून डॉक्टर स्वत:ची नैतिक जबाबदारी झुगारून देऊन बाहेरगावी कसे काय जाऊ शकले? स्टेरोईडचा ओव्हरडोस का दिला गेला? त्याच्या परिणामांची क्षिती डॉक्टरांना नव्हती का? हे तमाम वैद्यकीय व्यावसायिक स्वत:चे ज्ञान 'अपडेट' करण्याचा प्रयत्नच करत नाहीत का? एखाद्या विशिष्ट किंवा दुर्मिळ आजाराबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा आटापिटा यांना करावासा वाटत नाही का?  सुशिक्षित असलेल्या या दाम्पत्याने कोणताही वैद्यकीय सल्ला न घेता ती गोळी कशी घेतली? केमिस्टनेही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गोळी घ्या असे का नाही सुचविले? 
ती आता त्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेली आहे परत कधीही न येण्यासाठी. पण इतर काहींच्या पायाखाली हीच वाट न येण्यासाठी समाजाचा अविभाज्य घटक असलेल्या तुम्हा-आम्हाला सजग राहणे अपरिहार्य आहे आणि समाजाचे आधारस्तंभ असलेल्या डॉक्टरांना आपल्या बोथटलेल्या माणुसकीला आणि नोटांच्या जंजाळात हरवलेल्या ज्ञानकक्षेला पुनश्च तपासून पाहणे क्रमप्राप्त आहे.    
  

Thursday 4 April 2013

जेनी आणि आजोबा ......


ही कथा आहे जेनी आणि तिचे आजोबा रॉजर डेव्हीस यांची. त्यांच्यातील हळुवार नात्याची. एका अनोख्या मैत्रीची. दु:खातून सुखाप्रत नेणाऱ्या नातेसंबंधांची. 
जेनीला तिचे आई-वडील फारसे आठवतही नाहीत. ती अवघी तीन वर्षांची होती. नाताळचे दिवस होते. सगळ्या वातावरणात एक उत्साह भरलेला होता. जेनीच्या अंगावर नवे कपडे होते. खाण्यापिण्याची रेलचेल होती. सगळे घर सुशोभित केले होते. घराच्या एका कोपऱ्यात ख्रिसमस ट्री होते. घरातील मंडळी म्हणजेच तिचे आजी-आजोबा, आई-वडील खूप आनंदी होते. एका संध्याकाळी तिचे आई-वडील त्यांच्या मित्राकडे पार्टीला गेले. जेनीला त्यांनी त्यांच्याबरोबर नेले नव्हते. तिच्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळता येणार नाहीत शिवाय तिला जागरण होईल म्हणून तिला आजी-आजोबांकडेच राहू दिले. जेनी आजी-आजोबांबरोबर खूप खेळली आणि नंतर थकून झोपली. 
दुसऱ्या दिवशी ती सकाळी उठली तेव्हा घरात बरीचशी माणसे जमली होती. हलक्या आवाजात काहीतरी कुजबुजत होती. ती डोळे चोळत आजीपाशी आली तशी 'जेनी माय चाईल्ड ' असे म्हणून आजीने रडत रडत तिला कवटाळले. आजोबांनी तिला जवळ घेत हलक्या आवाजात तिला काहीसे सांगितले. पार्टीहून येताना तिच्या आई-वडिलांच्या गाडीला अपघात झाला आणि तिचे आई-वडील जागीच ठार झाले. या भयंकर घटनेने तिच्या घराचे स्वरूप पालटले. आजी अबोल झाली. तिच्या काळजीने आजोबा अस्वस्थ राहू लागले. तिच्या आजीने खाणे-पिणे सोडून दिले. आजोबांनी तिच्या खूप विनवण्या केल्या, आपल्याला आता जेनीसाठी उभे राहायला हवे याची जाणीव करून दिली पण तिच्या आई -वडिलांच्या अपघाती मृत्युनंतर आजी पुरती खचून गेली. तिने अंथरूण धरले. ती यातून कधीच सावरली नाही. वर्षभरात जेनी आजीलाही पोरकी झाली. 
त्यानंतरचे काही दिवस खूप वाईट गेले. पण मग एक दिवस तिचे आजोबा उठले. त्यांनी कंबर कसली. घरातील वातावरण हळूहळू बदलायला लागले. सकाळी तिच्या आजोबांसमवेत ती बागेतल्या फुलझाडांशी गप्पा मारू लागली. आजोबांबरोबर थोडा थोडा व्यायाम करू लागली. तिच्यासाठी आजोबांनी खूप पुस्तके आणली. परीकथा, साहसकथा, वन्यकथांनी तिचा एकटेपणा दूर केला. पुस्तकांमधील रंगीत चित्रे तिचे मन वेधून घेऊ लागली. तिची शाळा, मित्र-मैत्रिणी यात ती रमून गेली. तिचा पाचवा वाढदिवस खूप थाटामाटात तिच्या आजोबांनी साजरा केला. घर सजवण्यापासून सगळी तयारी आजोबांनी स्वत: केली. पाहुण्यांची, तिच्या मित्र-मैत्रिणींची सरबराई त्यांनी उत्तम रीतीने केली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आजोबाही सुखावले.  
कालांतराने जेनी मोठी झाली. इतर आठवणी पुसट झाल्या. आजोबाही थोडे थकले होते. पण त्यांचा उत्साह जराही कमी नव्हता. जेनीला काय हवं काय नको ते जातीने बघण्यात त्यांना आनंद व्हायचा. आता वाढत्या वयाप्रमाणे वाचनाचे, बघण्याचे विषय बदलले. तिचे मित्र-मैत्रिणींचे क्षितिजही रुंदावले. आजोबांच्या हातचा pancake, सूप-ब्रेड, ख्रिसमस टर्की आणि काही खास पदार्थ खाण्यासाठी ती नेहमीच आसुसलेली असायची. बरेच वेळा तिच्या दोस्तांची फौज जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी तिच्या घरी धडकायची. आजोबा अमाप उत्साहाने निरनिराळे पदार्थ त्यांना मायेने खाऊ घालायचे. त्यांना माहित नसलेल्या गोष्टी सांगून हसवायचे. ते तीन-चार तास कसे जायचे कोणाला कळायचे नाही. मनात खूप आनंद साठवून तिचे दोस्त त्यांच्या घरी परतायचे.  
आज जेनी एका प्रायव्हेट फर्म मध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करते. तिची स्वत:ची गाडी आहे, घर आहे आणि तिच्या सोबत तिचे ऐशी वर्षांचे आजोबाही आहेत. तिने अजूनतरी लग्न केलेले नाही. सकाळी आजोबांबरोबर बागेत फिरणे, फुलझाडांशी गप्पा मारणे, त्यांचे हाताचा एखादा स्वादिष्ट पदार्थ खाणे, कामावरून घरी आल्यानंतर दोघांनी मिळून एखादा चांगला सिनेमा बघणे, सुट्टीच्या दिवशी तिच्या गाडीतून हिंडणे, शॉपिंग करणे यात अजिबात खंड पडलेला नाही. 
एका रविवारी घरातील कप्पे लावत असता जेनीला तिने शाळेत असताना लिहिलेला एक निबंध सापडला. तिने आजोबांना हाक मारली. मग तिने आणि आजोबांनी मिळून निबंध वाचायला सुरवात केली. निबंधाचे शीर्षक होते- 'Grandfather-my friend'!