Friday 30 December 2011

आत्महत्त्या

चोरी,खून,दरोडा या आणि तत्सम अपराधांप्रमाणेच आत्महत्त्या हा ही एक गंभीर अपराध आहे हे कळण्याची समजही नसलेली मुले स्वत:ला फासावर लटकवून मोकळी होतात. आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माणसांचा विचार अशावेळी या भाबड्या जीवांच्या मनात डोकावत नाही का? आयुष्याने घातलेलं अवघड कोडं उकलण्याची क्षमता या मुलांच्यात नसते का? जीव देणं म्हणजे नक्की काय या गोष्टीचे आकलन न होताच ही मुले आपलं अस्तित्व या जगातून सहजपणे पुसून टाकण्याचा हा जीवघेणा खटाटोप का करतात? 
अभ्यासात आलेल्या अपयशाने आलेलं प्रचंड नैराश्य हे बहुतांश आत्महत्त्यांमागील कारण असतं. माझ्या घरचे मला काय म्हणतील, मित्र-मैत्रिणी, इतर नातेवाईक काय म्हणतील, माझे शिक्षक काय म्हणतील या भीतीपोटी आत्महत्त्या केल्या जातात. पूर्ण समाजात माझी व माझ्या घरच्यांची छी थू  होईल, सगळेजण माझ्याकडे यापुढे एक अपयशी मूल म्हणून बघतील असा पक्का समज या मुलांच्या मनात रुजलेला असतो. घरातील माणसांच्या, शाळेतील शिक्षकांच्या, यशस्वी मित्र-मैत्रिणींच्या नजरा चुकवायच्या असतील, त्यांची बोलणी ऐकायची नसतील आणि अंगावर माराचे वळ वागवायचे नसतील तर यावर आत्महत्त्या हा एकमेव मार्ग आहे हे या मुलांना पटते आणि आपल्या गळ्याभोवतीचा फास आधी यांच्या मनात तयार होतो.  
आपण एक मूल जन्माला घातलं की त्याच्या भूतलावरील जगण्याचे, वागण्याचे सगळे कॉपिराईट्स आपल्याला मिळाले असे अनेक पालकांना वाटत असते. आपल्याच म्हणण्याप्रमाणे त्याने बसावे,उठावे,हसावे,रडावे ही अपेक्षा बाळगणारे हिटलरचे वंशज घराघरात नांदत असतात. आपल्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्याचे हक्काचे साधन आपण जन्माला घातलेले असते. आपण डॉक्टर होऊ शकलो नाही म्हणून काय झालं, आपल्या मुलाला आपण नक्की डॉक्टर करू, इंजिनियर करू,जगप्रसिद्ध गायक-वादक करू, उद्योगपती करू अशी अनेक बीजं पालकांच्या मनात मूळ धरू लागलेली असतात. आपल्या मुलांच्याही काही इच्छा असू शकतील, त्यांच्या वैयक्तिक आवडी-निवडी असू शकतील हा नुसता विचारही पालकांच्या पथ्थ्यावर पडणारा नसतो. रोबोट नावाचे जसे यांत्रिक मानव असतात आणि ते जी कळ दाबली जाते त्याप्रमाणे हालचाल करतात आणि हुकुमाचे पालन करतात तशीच काहीशी अपेक्षा पालकांची मुलांकडून असते. त्याची भाषा,त्याचा मित्रपरिवार,त्याचे कपडेलत्ते,त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी पालक नियंत्रित करू पाहतात. अभ्यास नावाचे या मुलांचं बाल्य कुरतडणारे भूत घेऊन स्वत:च त्यांच्या मानगुटीवर बसतात.     
शाळेतील शिक्षकही विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क मिळवण्याच्या स्पर्धेत तोंडाला फेस येईपर्यंत धावणारं एक यंत्र समजतात. कसाही अभ्यास करा, रात्रीचा दिवस करा पण असे काही मार्क मिळवा की आपल्या शाळेचं नाव गाजेल असा प्रेमळ संदेश हे मुलांना सतत देत असतात. क्लास नामक एक रक्तशोषक संस्था काही वर्षात निर्माण झाली आहे. भरपूर फी घेऊन ऐशी टक्क्यांच्या वरील विद्यार्थी निवडून त्यांना मार्गदर्शनाच्या नावाखाली पिळून काढायचे, सारखे पेपर सोडवून घेऊन त्यांच्या चिमुकल्या डोक्याचे भजे करायचे आणि मग या विद्यार्थ्यांना भरघोस मार्क मिळाले की त्या जोरावर क्लासची जाहिरात करायची असा यांचा खाक्या असतो. मुलं आपली ब्रेकफास्टचे, लंचचे डबे घेऊन शाळा आणि क्लास अशा वाऱ्या करत असतात. 
पूर्वीच्या काळी जेव्हा हिंदुस्तानावर इंग्रजांचे राज्य होते तेव्हा अनेक राजकीय कैद्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली जायची. त्यांना घाण्याला जुंपून त्यांच्याकडून मरेस्तोवर कामे करून घेतली जायची. आज अनेक घरात पालक इंग्रजांची आणि मुले कैद्यांची भूमिका बजावत असतात. वीर सावरकरांनी स्वत:च्या सुटकेसाठी ज्याप्रमाणे महासागरात उडी घेतली आणि जीव वाचवला तद्वत या कैदखान्यातून सुटका करण्यासाठी ही निष्पाप मुले स्वत:ला आत्महत्त्येच्या खाईत लोटून देतात आणि जीवाला होणाऱ्या यातनांना पूर्णविराम देतात.  
नाही होऊ शकलं एखादं मूल डॉक्टर,इंजिनियर,एम बी ए  तर काय आकाश कोसळणार आहे? जीवन आनंदाने जगण्याचे यांव्यतिरिक्त काही सन्मान्य मार्ग नाहीत? आपली इभ्रत, प्रतिष्ठा, सामाजिक-आर्थिक पत जपण्यासाठी मुलांचं आयुष्य पणाला लावण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? मुलाने नोकरी ऐवजी एखादा त्याला आवडता  बिझनेस थाटला, तो फॉरेनची वारी न करता भारतातच राहिला तर कुठे बिघडले? एखाद्या मुलाने कोणते शिक्षण घ्यावे, कशाप्रकारची नोकरी करावी ही ज्याची त्याची वैयक्तिक बाब आहे असे पाश्चात्य देशीय मानतात. तिथे मुलेही आपले स्वातंत्य्र पराकोटीचे जपताना दिसतात. पण आपल्याकडे मात्र मी सांगेन तसं आणि तसंच माझं मूल वागलं पाहिजे असा अट्टाहास पालकांच्या वर्तनातून जाणवतो. 

आपल्या मुलाची क्षमता, त्याची आवडनिवड, त्याच्या अपेक्षा लक्षात घेऊन त्याला त्यासाठी प्रोत्साहित करणारे पालक आज दुर्दैवाने हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच आहेत. मुलाला योग्य वाटेवरून जाण्याकरता मार्गदर्शन करणे म्हणजे त्याचे निर्णय स्वत: घेणे नव्हे. त्याला चांगल्या-वाईटाची, भल्या-बुऱ्याची जाणीव करून देणे एवढेच पालकांचे कर्तव्य असते. त्याला त्याचे आवडते शिक्षण घेण्यासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देणे हे पालकांचे उद्दिष्ट असावयास हवे. शालेय पुस्तकी अभ्यासाची आवड असेल तर ठीक अन्यथा इतर काही मार्गांनी त्याचे व्यक्तिमत्व विकसित होऊन त्याचे आयुष्य मार्गी लागणार असेल तर अशा मुलांसाठी पालकांनी त्यांचे मित्र होणं गरजेचं आहे. त्यांना समजून घेऊन आपण त्यांच्या उत्तम आणि उज्ज्वल भविष्याची मुहूर्तमेढ रोवत आहोत याची खात्री पालकांनी स्वत:च स्वत:ला देणे आवश्यक आहे. शाळेतील शिक्षकांनीही मुलांच्या भविष्याची दोरी सर्वस्वी आपल्याच हातात घ्यायचा नाद सोडला पाहिजे. त्यांना त्यांच्या कलांनी फुलण्यासाठी ,बहरण्यासाठी सर्वतोपरी मदत केली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याची कुवत, क्षमता ओळखून त्याप्रमाणे त्याला अथवा तिला प्रोत्साहित करण्यासाठी झटले पाहिजे. 
मुलांच्या नाजूक भावविश्वाला,त्यांच्या बाल्याला धक्का न लावता, त्यांच्या इच्छा कोमेजू न देता, त्यांचे स्वातंत्य्र अबाधित ठेऊन व त्यांच्या मनाची भाषा समजून घेऊन जर पालकांनी त्यांना वाढवण्याचा,घडवण्याचा प्रयत्न केला तर इतक्या चिमुकल्या,निष्पाप,निरागसतेला आत्महत्त्या नामक घातक विचार  कधीही दंश करणार नाही. 

No comments:

Post a Comment