Friday 30 December 2011

आत्महत्त्या

चोरी,खून,दरोडा या आणि तत्सम अपराधांप्रमाणेच आत्महत्त्या हा ही एक गंभीर अपराध आहे हे कळण्याची समजही नसलेली मुले स्वत:ला फासावर लटकवून मोकळी होतात. आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माणसांचा विचार अशावेळी या भाबड्या जीवांच्या मनात डोकावत नाही का? आयुष्याने घातलेलं अवघड कोडं उकलण्याची क्षमता या मुलांच्यात नसते का? जीव देणं म्हणजे नक्की काय या गोष्टीचे आकलन न होताच ही मुले आपलं अस्तित्व या जगातून सहजपणे पुसून टाकण्याचा हा जीवघेणा खटाटोप का करतात? 
अभ्यासात आलेल्या अपयशाने आलेलं प्रचंड नैराश्य हे बहुतांश आत्महत्त्यांमागील कारण असतं. माझ्या घरचे मला काय म्हणतील, मित्र-मैत्रिणी, इतर नातेवाईक काय म्हणतील, माझे शिक्षक काय म्हणतील या भीतीपोटी आत्महत्त्या केल्या जातात. पूर्ण समाजात माझी व माझ्या घरच्यांची छी थू  होईल, सगळेजण माझ्याकडे यापुढे एक अपयशी मूल म्हणून बघतील असा पक्का समज या मुलांच्या मनात रुजलेला असतो. घरातील माणसांच्या, शाळेतील शिक्षकांच्या, यशस्वी मित्र-मैत्रिणींच्या नजरा चुकवायच्या असतील, त्यांची बोलणी ऐकायची नसतील आणि अंगावर माराचे वळ वागवायचे नसतील तर यावर आत्महत्त्या हा एकमेव मार्ग आहे हे या मुलांना पटते आणि आपल्या गळ्याभोवतीचा फास आधी यांच्या मनात तयार होतो.  
आपण एक मूल जन्माला घातलं की त्याच्या भूतलावरील जगण्याचे, वागण्याचे सगळे कॉपिराईट्स आपल्याला मिळाले असे अनेक पालकांना वाटत असते. आपल्याच म्हणण्याप्रमाणे त्याने बसावे,उठावे,हसावे,रडावे ही अपेक्षा बाळगणारे हिटलरचे वंशज घराघरात नांदत असतात. आपल्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्याचे हक्काचे साधन आपण जन्माला घातलेले असते. आपण डॉक्टर होऊ शकलो नाही म्हणून काय झालं, आपल्या मुलाला आपण नक्की डॉक्टर करू, इंजिनियर करू,जगप्रसिद्ध गायक-वादक करू, उद्योगपती करू अशी अनेक बीजं पालकांच्या मनात मूळ धरू लागलेली असतात. आपल्या मुलांच्याही काही इच्छा असू शकतील, त्यांच्या वैयक्तिक आवडी-निवडी असू शकतील हा नुसता विचारही पालकांच्या पथ्थ्यावर पडणारा नसतो. रोबोट नावाचे जसे यांत्रिक मानव असतात आणि ते जी कळ दाबली जाते त्याप्रमाणे हालचाल करतात आणि हुकुमाचे पालन करतात तशीच काहीशी अपेक्षा पालकांची मुलांकडून असते. त्याची भाषा,त्याचा मित्रपरिवार,त्याचे कपडेलत्ते,त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी पालक नियंत्रित करू पाहतात. अभ्यास नावाचे या मुलांचं बाल्य कुरतडणारे भूत घेऊन स्वत:च त्यांच्या मानगुटीवर बसतात.     
शाळेतील शिक्षकही विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क मिळवण्याच्या स्पर्धेत तोंडाला फेस येईपर्यंत धावणारं एक यंत्र समजतात. कसाही अभ्यास करा, रात्रीचा दिवस करा पण असे काही मार्क मिळवा की आपल्या शाळेचं नाव गाजेल असा प्रेमळ संदेश हे मुलांना सतत देत असतात. क्लास नामक एक रक्तशोषक संस्था काही वर्षात निर्माण झाली आहे. भरपूर फी घेऊन ऐशी टक्क्यांच्या वरील विद्यार्थी निवडून त्यांना मार्गदर्शनाच्या नावाखाली पिळून काढायचे, सारखे पेपर सोडवून घेऊन त्यांच्या चिमुकल्या डोक्याचे भजे करायचे आणि मग या विद्यार्थ्यांना भरघोस मार्क मिळाले की त्या जोरावर क्लासची जाहिरात करायची असा यांचा खाक्या असतो. मुलं आपली ब्रेकफास्टचे, लंचचे डबे घेऊन शाळा आणि क्लास अशा वाऱ्या करत असतात. 
पूर्वीच्या काळी जेव्हा हिंदुस्तानावर इंग्रजांचे राज्य होते तेव्हा अनेक राजकीय कैद्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली जायची. त्यांना घाण्याला जुंपून त्यांच्याकडून मरेस्तोवर कामे करून घेतली जायची. आज अनेक घरात पालक इंग्रजांची आणि मुले कैद्यांची भूमिका बजावत असतात. वीर सावरकरांनी स्वत:च्या सुटकेसाठी ज्याप्रमाणे महासागरात उडी घेतली आणि जीव वाचवला तद्वत या कैदखान्यातून सुटका करण्यासाठी ही निष्पाप मुले स्वत:ला आत्महत्त्येच्या खाईत लोटून देतात आणि जीवाला होणाऱ्या यातनांना पूर्णविराम देतात.  
नाही होऊ शकलं एखादं मूल डॉक्टर,इंजिनियर,एम बी ए  तर काय आकाश कोसळणार आहे? जीवन आनंदाने जगण्याचे यांव्यतिरिक्त काही सन्मान्य मार्ग नाहीत? आपली इभ्रत, प्रतिष्ठा, सामाजिक-आर्थिक पत जपण्यासाठी मुलांचं आयुष्य पणाला लावण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? मुलाने नोकरी ऐवजी एखादा त्याला आवडता  बिझनेस थाटला, तो फॉरेनची वारी न करता भारतातच राहिला तर कुठे बिघडले? एखाद्या मुलाने कोणते शिक्षण घ्यावे, कशाप्रकारची नोकरी करावी ही ज्याची त्याची वैयक्तिक बाब आहे असे पाश्चात्य देशीय मानतात. तिथे मुलेही आपले स्वातंत्य्र पराकोटीचे जपताना दिसतात. पण आपल्याकडे मात्र मी सांगेन तसं आणि तसंच माझं मूल वागलं पाहिजे असा अट्टाहास पालकांच्या वर्तनातून जाणवतो. 

आपल्या मुलाची क्षमता, त्याची आवडनिवड, त्याच्या अपेक्षा लक्षात घेऊन त्याला त्यासाठी प्रोत्साहित करणारे पालक आज दुर्दैवाने हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच आहेत. मुलाला योग्य वाटेवरून जाण्याकरता मार्गदर्शन करणे म्हणजे त्याचे निर्णय स्वत: घेणे नव्हे. त्याला चांगल्या-वाईटाची, भल्या-बुऱ्याची जाणीव करून देणे एवढेच पालकांचे कर्तव्य असते. त्याला त्याचे आवडते शिक्षण घेण्यासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देणे हे पालकांचे उद्दिष्ट असावयास हवे. शालेय पुस्तकी अभ्यासाची आवड असेल तर ठीक अन्यथा इतर काही मार्गांनी त्याचे व्यक्तिमत्व विकसित होऊन त्याचे आयुष्य मार्गी लागणार असेल तर अशा मुलांसाठी पालकांनी त्यांचे मित्र होणं गरजेचं आहे. त्यांना समजून घेऊन आपण त्यांच्या उत्तम आणि उज्ज्वल भविष्याची मुहूर्तमेढ रोवत आहोत याची खात्री पालकांनी स्वत:च स्वत:ला देणे आवश्यक आहे. शाळेतील शिक्षकांनीही मुलांच्या भविष्याची दोरी सर्वस्वी आपल्याच हातात घ्यायचा नाद सोडला पाहिजे. त्यांना त्यांच्या कलांनी फुलण्यासाठी ,बहरण्यासाठी सर्वतोपरी मदत केली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याची कुवत, क्षमता ओळखून त्याप्रमाणे त्याला अथवा तिला प्रोत्साहित करण्यासाठी झटले पाहिजे. 
मुलांच्या नाजूक भावविश्वाला,त्यांच्या बाल्याला धक्का न लावता, त्यांच्या इच्छा कोमेजू न देता, त्यांचे स्वातंत्य्र अबाधित ठेऊन व त्यांच्या मनाची भाषा समजून घेऊन जर पालकांनी त्यांना वाढवण्याचा,घडवण्याचा प्रयत्न केला तर इतक्या चिमुकल्या,निष्पाप,निरागसतेला आत्महत्त्या नामक घातक विचार  कधीही दंश करणार नाही. 

Thursday 29 December 2011

लोकपालाचा तमाशा

ज्याप्रमाणे दरवेशी दारोदारी हिंडून एखाद्या प्राण्याचा खेळ करतात त्याप्रमाणे लोकपाल विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत नाचवले गेले. प्रत्येक  पक्षाच्या खासदाराने, नेत्याने आपापल्या वकुबाप्रमाणे लोकपालला वेगवेगळ्या पद्धतीने तपासले, त्याची छाननी करून, सरकारने मांडलेले लोकपाल विधेयक कुचकामी असल्याचा निर्वाळा दिला. राजकीय चर्चा रंगल्या, वाद-विवाद झडले,  दुसऱ्या पक्षाने घेतलेल्या भूमिकेचे तीन-तेरा वाजवून झाले. अधिवेशनाची नियोजित वेळ संपली आणि लोकपाल विधेयकाची कोणत्याही ठोस निर्णयाअभावीच  सांगता झाली.  
लोकशाही राज्यपद्धतीत एकमताने कोणताही अति-महत्वाचा निर्णय  घेणे हे अत्यंत जिकीरीचे काम आहे. प्रत्येक पक्षाची विचारसरणी वेगळी, धारणा वेगळ्या त्यामुळे लोकपालातील सगळ्या तरतुदींविषयी एकवाक्यता होणे अवघड होऊन बसले. त्यात सत्ताधारी पक्ष एकीकडे आणि इतर पक्ष दुसरीकडे असे चित्र दिसत होते. अरुण जेटली, अभिषेक मनु सिंघवी  यांच्यासारख्यांनी प्रभावी वक्तव्य केले खरे परंतु लोकपालातील त्रुटी सुधारण्याकरता किंवा मांडलेले लोकपाल स्वीकारण्या करता याचा काहीच उपयोग होऊ शकला नाही. मत-मतांतरामुळे गदारोळ मात्र झाले. कोणीतरी अण्णा हजारेंनाच लोकपाल म्हणून नेमा असेही छद्मीपणे सुचवून पहिले. सीबीआय स्वायत्त हवी की नको यावरूनही रान उठवले गेले. मांडलेल्या लोकापालाची कोणी खिल्ली उडवली तर कोणी उपहास केला. हे लोकपाल नको यावर मात्र विरोधी पक्षांचे मतैक्य झालेले दिसले.   
इकडे एमएमआरडीए मैदानावर चाललेले उपोषण अण्णांनी प्रकृतीअस्वास्थ्यामुळे मागे घेतले आणि ते राळेगणसिद्धीला परतले. सामान्यांचाही सक्षम लोकपालासाठी लढण्याचा नेट ओसरल्यासारखा वाटला. या सर्वामुळे सध्यातरी लोकपालाचे भवितव्य अधांतरी आहे. सरकारने मांडलेले लोकपाल जरी क्षणभर बाजूला ठेवले तरी मुळात सक्षम लोकपाल कुणाला हवे आहे काय असा प्रश्न निश्चितच पडला आहे.  
भ्रष्टाचाराला समूळ उपटून टाकण्यासाठी एखादी सबळ योजना राबवता यावी म्हणून लोकपालचा विचार करण्यात आला. इतकी वर्षे बासनात पडून राहिलेली ही योजना अण्णा हजारे आणि त्यांच्या लाखो अनुयायांच्या दबावामुळे तसेच जनमताच्या रेट्यामुळे विचाराधीन होऊ शकली. सत्ताधाऱ्यांनी आणि इतर पक्षांनी त्याचा कीस काढला. मुळात एखादी महत्वाची यंत्रणा स्वायत्त हवी की तिच्यावर सरकारचा अंकुश हवा हीच खरी हे विधेयक अयशस्वी होण्यामागची मेख आहे. एखाद्या यंत्रणेवर सरकारी अंकुश असेल तर ती योग्य वेळी हवी तशी वाकवता येऊ शकते, एखाद्या गैर-व्यवहाराची चौकशी थांबवता येऊ शकते, त्या यंत्रणेत हवा तसा हस्तक्षेप करता येऊ शकतो परंतु ती यंत्रणा जर स्वायत्त झाली तर सत्ताधारी पक्षाच्या स्वातंत्र्यावर घाला येईल , अनेक सत्ताधारी, नामधारी पदाधिकाऱ्यांना पायउतार व्हावे लागेल आणि भ्रष्टाचारविरहित  आचाराचे धडे गिरवावे लागतील, जे सत्ताधारी पक्षाच्या हिताचे होणार नाही आणि म्हणूनच असे लोकपाल न आलेलेच बरे असेच जर राजकीय पक्षाला वाटत असेल तर त्यात वावगे काय?    
अनेक वाहिन्यांवरही या लोकपालाविषयी पोटतिडीकीने आपली मते मांडताना बरेचजण दिसतात खरे पण सारखे असे वाटत राहते की असे सर्वार्थाने परिपूर्ण, समर्थ लोकपाल खरेच आपल्या लोकशाहीला लाभणार आहे काय?  लोकशाही राज्यपद्धतीत प्रत्येकालाच आपले तोंड उघडण्याचा जर सारखाच अधिकार आहे तर सगळ्यांची तोंडे सारख्याच प्रकारे बंद करणारं आणि भ्रष्टाचारावर अंकुश ठेवणारं लोकपाल अस्तित्वात येऊ शकेल काय? या देशातील कोट्यावधी जनतेला पावलोपावली गिळणारा, त्यांचे जगणे कठीण करणारा महागाईचा भस्मासुर या यंत्रणेअंतर्गत जाळून खाक होईल काय? पट्टेवाल्यापासून  ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांना एकसमान न्याय लागू केला जाईल काय? चिरीमिरीपासून ते कोट्यावधींची भ्रष्टाचारी उलाढाल करणाऱ्यांना ही यंत्रणा कडकलक्ष्मीचा अवतार दाखवू शकेल काय? सर्वसामान्याचे जगणे या यंत्रणेमुळे अधिक सुकर, सोपे होईल काय? या देशात आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत ही भावना जनमानसात वाढीस लागेल काय? आपल्या अर्थव्यवस्थेला, सुरक्षिततेला भगदाडे पाडणाऱ्यांना ही यंत्रणा सज्जड शिक्षा ठोठावेल काय? 

वर उल्लेखिलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे जर ही यंत्रणा देऊ शकणार नसेल तर मग असे हे लोकपाल विधेयक जरी संमत होऊन आले तरी या देशातील जनतेला त्याच्याशी काहीही सोयरसुतक नसेल.



Saturday 24 December 2011

आपलं मत


हे फक्त निवडणुकीत ग्राह्य धरलं जातं एरवी याला कुत्र्याच्या भूंकण्याइतकही महत्त्व नाही. आपण मारे घरी-दरी यंव नी त्यंव मतांच्या पिंका टाकत असतो पण त्याला काडीइतकीही किंमत असते का याचा विचार आपण करतच नाही. 
सकाळच्या घाई-गर्दीच्या वेळेला जरा जादा गाड्या सोडा असे कितीही सौजन्यपूर्वक आपण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगितले तरी आपल्या आणि आपल्यासारख्या इतरांच्या मताचा त्यांच्यावर का म्हणून परिणाम होईल? आपण म्हणजे कोण? सकाळच्या वेळी रेल्वेच्या प्रवाशांना कोंडीत पकडून घायकुतीला आणण्याची त्यांचीही काही ठाम मतं आहेत. ऐन वेळेस ओव्हरहेड वायर तुटायला हवी, पेंटोग्राफ जळायला हवा, गाडी डिरेल व्हायला हवी अशी त्यांची काही वर्षानुवर्षांची घट्ट साचलेली मते आहेत ती कोणी विचारात घ्यायची? आपणच ना? 
आयबीएन आणि झी २४ तास या दोन्ही वाहिन्यांवर रात्रीच्या वेळेस अनेक पक्षांच्या लोकांची आपापल्या पक्षाच्या मतांवरून झोंबाझोंबी चालू असते. प्रत्येकजण आपल्या मतावर ठाम राहून आपल्या पक्षाच्या वागणुकीचे समर्थन करत असतो. एकमेकांवर यथेछ्च आगपाखड करून झाल्यावर हा करमणुकीचा कार्यक्रम संपतो. या मतामतांच्या गल्बल्यातून काहीच साध्य होत नाही. एकमेकांची निन्दानालस्ती आणि प्रेक्षकांचे मनोरंजन हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन हा कार्यक्रम आखलेला असतो.    
आपापली गाडी पार्क करण्यावरून सोसायटीतील रहिवाश्यांची प्रचंड भांडणे होतात. याचे एकमेव कारण म्हणजे माझी गाडी मी इथेच पार्क करणार या मतावर प्रत्येकजण ठाम असतो. आपले मत इतरांनी मनावर घ्यायचे काही कारणच नसते कारण त्यांचीही मते आपल्या इतकीच पक्की असतात. त्यामुळे भांडणे होत राहतात, तोडगा निघत नाही. आपली गाडीच्या टायर मधली हवा जोपर्यंत कुणी काढत नाही तोपर्यंत ही भांडणे फक्त तोंडातोंडी चालतात त्यानंतर आपापल्या हाताची मते आजमावायला कुणी मागेपुढे पाहत नाही.
आज आयटेम साँगच्या नावाखाली स्त्रीदेहाचे जे उत्तान प्रदर्शन मांडले जाते, ज्या बीभत्स हावभावांचा, अश्लील शब्दांचा वापर केला जातो त्याच्या विरुद्ध कितीही जनमताचा पाऊस पाडा, काहीही उपयोग होत नाही. तुम्ही टी.व्ही.ऑफ करा, अशा चित्रपटांवर बहिष्कार टाका,फार काय रस्त्यात अश्लील चित्रे दिसली तर डोळे मिटून घ्या की. तुम्हाला कोणी मनाई केलीय? राखी सावंतला तुम्ही बेंबीच्या  देठापासून कितीही ओरडून सांगितलेत की बाई गं  तुझ्या आणि तुझ्यासारख्या अनेकींच्या अशा नाचण्याने युवा पिढी बिघडत चाललीय,बहकत चाललीय, निलाजरी होत चाललीय तरी त्या तुमचं काय म्हणून ऐकतील? तुम्ही कोण? त्या अशा नाचतात म्हणून तरुणांचं मनोरंजन होतं, त्यांना बऱ्याच गोष्टी शिकता येतात. तुम्ही आक्षेप घेणारे कोण?  
शाहरुख खानला, 'अरे बाबा आता तू म्हातारा दिसायला लागला आहेस तेव्हा पिक्चर मध्ये काम करणे थांबव' असे कितीही कंठशोष करून आपण सांगितले तरी त्याने का ऐकावे? तो पैशांच्या राशीत लोळतो म्हणून तुम्ही जळताय. बॉक्स ऑफिसवर त्याचे पिक्चर भले फार दिवस न टिकू देत पण खर्च केलेला पैसा जोपर्यंत वसूल होतो आहे तोपर्यंत असे शाहरुख खान येतंच राहणार. तुम्ही बघा दिलीप-देव-राज यांना घरातल्या छोट्या पडद्यावर! फुकटची मते मांडू नका.       
नवीन लोकलवर,बसवर, मोटारींवर, उपाहार आणि सिनेमागृहांमध्ये आणि रस्त्यांवर कृपया थुंकू नका हे मत जाहीररीत्या प्रदर्शित करायचं कुणालाच काय कारण? थुंकदाणी शिवाय इतर ठिकाणी थुंकणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे भारतात जन्माला आलेल्या बहुतांश लोकांचे मत आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे हाही आपल्या लोकांचा अत्यंत आवडता छंद आहे तेव्हा तुमच्या फुसक्या मतांनी त्यांना विचलित होण्याचं काही कारणच नाही.  
कसाब सारख्या अनेकांचा निर्घृणपणे जीव घेणाऱ्या अपराध्यावर इतके कोट्यावधी पैसे खर्च करू नका,तो सरकारचा जावई नाही, त्याला लवकरात लवकर फाशी द्या आणि न्यायदेवतेची विटंबना थांबवा असे अनेकजण घसे कोरडे पडेपर्यंत ओरडले, तज्ञांच्या मतांचा कीस पडला, जनसामान्यांत चर्चा घडवून आणल्या गेल्या, या भयानक दुर्घटनेत ज्यांचे बळी गेले त्यांच्या निकटवर्तीयांच्या भावना जाणून घ्यायचा प्रयत्न झाला, आले का यश? कोणाची मते विचारात घेतली गेली? उलट कसाबला बिर्याणी आवडते ह्याचीच बातमी झाली.     
या सगळ्याचे तात्पर्य काय तर तुमची मते ही फक्त तुमच्याजवळच असली पाहिजेत, इतरांवर ती लादायचा जरा जरी प्रयत्न केलात तर त्यांची मते तुमच्यावर बरसलीच म्हणून समजा. आता ते उडणारे शिंतोडे गंगाजलाचे असतील किंवा सांडपाण्याचेही असू शकतील. तेव्हा मते व्यक्त करण्याआधी स्वत:चा विचार जरूर करा.

Tuesday 20 December 2011

आजी-आजोबा

कालौघात आजी-आजोबा ही जिव्हाळ्याची संस्था नामशेष होत चालली आहे. जणू काही घरातून देवघराची उचलबांगडीच झाली आहे. सुरकुतलेल्या हातांनी मायेच्या माणसांसाठी केलेल्या  पुरणपोळीचे महत्व  कमी कमी होत चालले आहे. सायंकाळी तुळशी-वृंदावना समोर भक्तिभावाने जोडलेले हात, नातवंडे मांडीवर घेऊन म्हटलेले श्लोक , मायेने भरवला जाणारा गुरगुट्या भाताचा घास, डोळ्यांवर पेंग येत असताना ऐकू येणाऱ्या पंचतंत्रातील सुरम्य कथा,परीक्षेचा निकाल चांगला लागल्यानंतर पाठीवरून फिरणारा आजोबांचा कौतुकाचा हात आणि त्यानंतर आजीने हातावर दिलेली खोबऱ्याची वडी या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत.
आजकाल न्युक्लीयर कुटुंबाची कल्पना जिथेतिथे बोकाळली आहे. घराच्या चार भिंती इतक्या संकुचित झाल्या आहेत की त्यात आजी-आजोबांना सामावून घेण्यासाठी जागाच राहिलेली नाही. सोयी-सुविधांची तणे नको तेवढी माजली आहेत. पैसे कमावण्याच्या शर्यतीत प्रत्येकजण स्वत:ला मरेस्तोवर झोकून देतो आहे. अपरिहार्यतेच्या नावाखाली ज्याने त्याने नात्यांनाही कडी-कुलुपात बंदिस्त केले आहे. यंत्राच्या आधीन माणूस झाला आहे आणि त्याने स्वत:चेही यंत्र करून घेतले आहे. या यंत्रवत आयुष्यात भाव-भावनांची पाळेमुळेच गोठून गेली आहेत. म्हणूनच टोलेजंग इमारतीत खरेदी केलेल्या हजार चौरस फुटांच्या प्रशस्त ब्लॉकमध्ये  आजी-आजोबांसाठी एखादी खोलीही नाही. आधुनिक यंत्रे,खेळणी,फर्निचर यांच्या साम्राज्यात जुन्यापुराण्या आउट-डेटेड मॉडेल्सना जागाच नाही. 
आजकाल म्हणे लग्न करू इच्छिणारी मुलगी लग्नाआधी मुलाला विचारते की तुझ्या घरात किती गार्बेज आहे? या गार्बेज मध्ये मुलाचे आई-वडील,असले तर आजी-आजोबा,काका-काकी,आत्या इत्यादी कुणीही मोडू शकतात. किती गार्बेज आहे हे मुलाने सांगितले की मग ती ठरवणार की असल्या गार्बेजवाल्या गोडाऊनमध्ये राहायचं की नाही ते. मुलाला तिच्याशी लग्न तर करायचं असतं त्यामुळे तो मग नवीन ब्लॉक घेतो आणि अडगळीच्या वस्तू जुन्या जागेत सोडून येतो. तिला स्वतंत्र राज्य मिळतं आणि भंगार तिच्या घरात येत नाही. काही वर्षे गेल्यानंतर आपल्यालाही रद्दीचाच भाव येणार आहे या सत्याकडे तात्पुरती का होईना पण पाठ फिरवली जाते. 
मुलांनी शाळेतून घरी आल्यानंतर दाराला काय बघायचं तर मोठ्ठं कुलूप! ते स्वहस्ते उघडून आत शिरायचं, खायचं अन्न मायक्रोवेव्ह मध्ये गरम करायचं, संगणकाशी खेळत मन रमवायच, रिकामं घर न्याहाळत बसायचं आणि अभ्यास संपवून रात्री उशिरा येणाऱ्या आई-वडिलांची वाट पहायची. या दिनक्रमात पाहुणे म्हणून चार दिवस आलेल्या वडील-धारयांच्या येण्याने खंड पडला तर चरफडत राहायचं. ही नव्या युगातील कितीही कटू वाटली तरी वस्तुस्थिती आहे.      

ढळला रे ढळला दिन सखया
संद्याछाया भिवविती हृदया 
अता मधूचे नाव का सया
लागले नेत्र रे पैलतीरी 
अशा अवस्थेप्रत मार्गक्रमणा करणाऱ्या आजच्या आजी-आजोबांची ही हृद्य कहाणी आहे व त्यावर आस्थेची,मायेची फुंकर घालता न येऊ शकणाऱ्या तुम्हा-आम्हा सर्वांचाच हा दारूण पराभव आहे. 

Monday 19 December 2011

हॉस्पिटल

माझ्या आत्याच्या 'Thalium' टेस्टच्या निमित्ताने मला माहीमच्या 'हिंदुजा' हॉस्पिटलमध्ये जाण्याचा योग आला. ही हिंदुजा हॉस्पिटलची वास्तू माहीम चौपाटीला जवळजवळ लागून आहे. हॉस्पिटल भव्य आहे, स्वच्छ आहे, टापटीप आहे ,शिस्तशीरही असावं बहुतेक!  थोडक्यात बघणेबल आहे. लीलावती,हिंदुजा,जसलोक,ब्रीच क्यांडी,अंबानी ही हॉस्पिटल्स सुद्धा अद्ययावत सोयींनी सुसज्ज आहेत, मुंबईची शान आहेत असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. पण तरीही हॉस्पिटल हे शेवटी हॉस्पिटलच! जे.जे. काय,वाडिया काय, के.ई.एम काय,नानावटी-कूपर काय किंवा लीलावती-हिंदुजा-अंबानी काय! ती काही प्रेक्षणीय स्थळे होऊ शकत नाहीत. एखाद्या रविवारी उठून आपण चला चला एक्सेलवल्डला जाऊया तद्वत चला चला आपण लीलावतीला जाऊया,हिंदुजाला जाऊया असं खासच म्हणणार नाही.       
या टेस्ट ज्या विभागात केल्या जातात तिथे आम्ही वेळेवर पोहोचलो. काउंटरवर पैसे भरले, पावती घेतली आणि आतमध्ये गेल्यावर रुग्णाची वैद्यकीय माहिती असलेला फॉर्म भरून दिला. सगळे सोपस्कार पार पडले आणि आता वेळ होती प्रतीक्षेची! थोड्याच वेळात माझ्या आत्याला टेस्टसाठी आतमध्ये नेण्यात आले आणि मी व माझी बहीण बाहेरील कक्षात बसून राहिलो. हॉस्पिटल भलतेच वातानुकुलीत असल्याने प्रचंड गारठा जाणवू लागला. हळूहळू इतर रुग्ण त्यांच्या त्यांच्या नातलगांसह येऊ लागले. आम्ही या वातावरणाला नवखे असलो तरी इतर मात्र बऱ्यापैकी सरावलेले असावेत. त्यांच्याकडे रिपोर्टच्या थप्प्या होत्या. मानसिक तयारी होती. आतील जीवघेण्या थंडीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी त्यांनी शाली आणल्या होत्या. आजूबाजूला वावरणारे ज्युनियर डॉक्टरही त्यांच्या परिचयाचे होते.    
माझी मामेआत्या सुरतेची. तिचे जवळचे असे कुणी नाही. तिची वृद्ध आईही काही महिन्यांपूर्वी निवर्तलेली! आत्या मुलखाची घाबरट. तिच्या शरीरात तिच्या म्हणण्याप्रमाणे वस्तीला बरेच किरकोळ आजार. बीपी,डायबेटीस या तिच्या नातलगांनी केव्हाच वर्दी दिलेली! इसीजी काढला आणि स्ट्रेस टेस्ट करण्याचा सल्ला तिला दिला गेला. तिच्या मनात या स्ट्रेस टेस्ट विषयी प्रचंड भीती कारण तिच्या ओळखीचे तीनजण ही टेस्ट करतानाच गचकले होते. अन्जिओग्राफि करायची नव्हती त्यामुळे मग तिच्या वाट्याला ही 'Thalium' नावाची टेस्ट आली. तिच्या म्हणण्याप्रमाणे सुरतेला ह्या विशिष्ट टेस्टचं नावही कुणी ऐकलेले नाही. त्यामुळे मुंबईला येणं तिला भाग होतं. तिची काळजी, त्या अपरिचित टेस्ट विषयीची धाकधूक आमच्या मनात होती. 
तास झाला,दोन तास झाले तरी टेस्ट संपत नव्हती. ती फक्त एका रूममधून  दुसऱ्या रुममध्ये जाताना आम्हाला दिसत होती. इकडे ही प्रचंड वातानुकुलीत थंडी आमची टेस्ट घेत होती. शाली पांघरणारे आमची अवस्था नजरेने टिपत होते. अंगावर आलेले काटे पुन्हा पुन्हा निरखणे, उठून उठून बाथरुमला जाणे,डॉक्टर,नर्सेस,आया यांची धावपळ बघणे असा आमचा टाईमपास सुरु होता. आत्या बरी असेल ना, तिला काही होणार नाही ना, तिचे रिपोर्ट्स नॉर्मल येतील ना अशा चिंता करण्यातही बऱ्यापैकी वेळ जात होता.   
एका विशिष्ट प्रकारचं रसायन किंवा द्राव नसांद्वारे शरीरात सोडला जातो आणि मग त्याबरहुकूम हृदयातील हालचाली सूक्ष्मरित्या टिपल्या जातात. स्क्रीनवर सगळ्या घडामोडी रुग्णाला पाहता येतात. या घडामोडींचा तपशील म्हणजे रिपोर्ट. तो उलगडून सांगण्यासाठी निष्णात डॉक्टर्स असतातच! नंतर त्यानुसार पुढील उपाययोजना केली जाते. त्यामुळे ही टेस्ट होऊन,त्याचे रिपोर्ट्स येऊन, त्या रिपोर्टमध्ये काय दडलेलं आहे हे जोपर्यंत डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत अनेक शंका-कुशंकांना जागा होती. अनुकूल-प्रतिकूल विचारांना थारा होता. आत्याचा घाबरलेला चेहरा सारखा नजरेसमोर येत होता. तसं तिचं काही वाईट होणार नाही असं मन म्हणत असतानाच असं काही झालंच तर प्रथम कुणाला सांगायचं याच्या नोंदीही मनातल्या मनात तयार होत होत्या. 
तिथे नेहमीच येणारे जरा खाली जाऊन चहा वगैरे घ्या म्हणजे बरं वाटेल असा सल्ला देत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. आम्ही खाली गेलो आणि पोटाला चहा-खाण्याचा आधार दिला. थंडीची भीषणता थोडी कमी झाली. पायही मोकळे झाले. दिवस वर येत होता तशी लोकांची वर्दळही वाढत होती. बरेच लोक बाहेर तिष्ठत बसले होते. काही समुद्र न्याहाळत डोळ्यातल्या पाण्याला वाट करून देत होते. पोर्चमध्ये गाड्याच गाड्या उभ्या होत्या. तो नजारा काही वेळ बघितला आणि आम्ही पुह्ना वर आलो. वरच्या परिस्थितीत जराही बदल नव्हता. स्वागत कक्षात माणसे खोळंबली होती. आतमध्ये रुग्णांच्या टेस्ट सुरूच होत्या. अंगाभोवातीच्या शाली आणखीनच घट्ट झाल्या होत्या. आमच्या प्राक्तनात आणखी कुडकुडणे लिहिलेले होते. 
एका गुजराती कुटुंबातील स्त्री आजारी होती. तिच्या पोटात ट्युमर होता. दोन वर्षांपासून अनेक टेस्ट होत होत्या. अनेक डॉक्टरांचे उंबरठे झिजवूनही हा ट्युमर काढावा की न काढावा याविषयी एकवाक्यता होत नव्हती. त्या रुग्णाची फाईल वेगवेगळ्या रिपोर्ट्सनी ओसंडून वाहत होती. डोळे मिटून शांत बसणे, देवाचे नाव आळवणे,पुन्हा एकदा रिपोर्टची प्रतीक्षा करणे यापलीकडे त्या कुटुंबाच्या हातात काहीच नव्हते. एका लहान मुलीला किडनीचा आजार होता. तिच्या सततच्या होणाऱ्या टेस्ट मुळे त्या मुलीचे आई-वडील हैराण झाले होते. मुलीला आपल्याला सारखे सारखे इकडे का आणले जाते हे कळण्याइतपत  ती मोठी नसल्याने रडत होती आणि आई-वडिलांच्या विमनस्कतेत भर पडत होती. या आजारावर उपाय शोधण्यात डॉक्टरांना यश आलं नव्हतं. कसनुसा झालेला तिच्या आईचा चेहरा, तिच्या डोळ्यांत वारंवार येणारं पाणी बघताना आम्हाला गलबलून येत होतं. या हॉस्पिटलच्या पोटात अशा कितीतरी  करुण  कहाण्या दडलेल्या होत्या. 
सरतेशेवटी आमची सहा ते सात तासांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली आणि माझी आत्या त्या टेस्ट मधून तावून सुलाखून सुखरूप बाहेर आली. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट्स मिळाले, ते नॉर्मल असल्याची ग्वाही डॉक्टरांनी दिली आणि विजयी मुद्रेने माझी आत्या सुरतेला परतली देखील! तिथल्या भयानक थंडीचे परिणाम मात्र नंतर आठवडाभर सर्दी-खोकल्याच्या रुपात आम्हाला भोगायला लागले. 
त्या रात्री झोपताना या अशा हॉस्पिटल्स मधलं जग पुन्हा अनुभवायची पाळी आणू नकोस अशी प्रार्थना करायला मी विसरले नाही.

Sunday 18 December 2011

पतीचा छळवाद वर्षानुवर्षे निमुटपणे सोशीत जगणाऱ्या तमाम स्त्रियांना .........


कालपासून नुकतीच 'Life OK' नावाच्या channel वर सौभाग्यवती भव: ही मालिका सुरु झाली आणि वर्षानुवर्षे चावून चावून चोथा झालेला तो विषय पुन्हा एकदा ऐन प्रवाहात आला. स्त्री मग ती कुठल्याही सामाजिक, आर्थिक स्तरातील असो, छळवादासाठी तिचे स्त्री असणे हेच पुरेसे असते. चांगले सुशिक्षित,संस्कारित माहेर लाभलेली स्त्री या पुरुषी छळवादाला बळी पडू शकणार नाही याची हमी कोणीही देऊ शकत नाही.   
छळवाद हा मानसिक,शारीरिक अशा कोणत्याही प्रकारचा असू शकतो. मजा म्हणजे आर्थिक दृष्ट्या नवऱ्यावर अवलंबून नसणाऱ्या स्त्रियांच्या वाट्यालाही जर या यातना येत असतील तर ज्या स्त्रिया पूर्णपणे नवऱ्यावर अवलंबून आहेत त्यांच्या व्यथा काय वर्णाव्या?  
बायकोच्या माहेराकडून अवाजवी अपेक्षा ठेवणे, तिच्या माहेरच्यांचा सतत उद्धार करणे, बायकोच्या चारित्र्यावर संशय घेणे, तिचा सातत्याने इतरांसमोर मानभंग करणे, तिच्या उठण्या-बसण्याला मर्यादा घालणे, तिच्या बौद्धिक कुवतीची खिल्ली उडवून आसुरी आनंद घेणे, तिच्या छंदांवर, स्वातंत्र्यावर गदा आणणे, तिला एक निव्वळ हक्काची उपभोगाची वस्तू या दृष्टीकोनातून बघणे, तिला सतत घरकामात पिचत ठेवणे, मुलाबाळांची जबाबदारीही तिची एकटीचीच असल्यागत वागणे, वेळप्रसंगी तिला धमकावणे, तिच्या अंगावर हात टाकणे, तिला अर्वाच्य बोलणे, तिचे स्त्रीधन स्वत:कडे ठेवून तिला बाहेरचा रस्ता दाखविणे अशा अनेक प्रकारच्या छळवादांना स्त्रीला सामोरे जावे लागते.   
मुळातच स्त्री व पुरुष हे एकमेकांना पूरक असावेत, निसर्ग नियमांनुसार एकमेकांशी बध्द असावेत, एकमेकांच्या अपेक्षांची पूर्तता करत त्यांनी संसार सुकर करावा, पोटच्या मुलाबाळांना त्यांनी उत्तम घडवावे, जनमानसात आदर्श प्रस्थापित करावा, पुढील पिढ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, कौटुंबिक शुचिता,महत्ता जपावी यासाठी विवाहसंस्था अस्तित्वात आली. दोन घराण्यांचा मिलाफ, पुरुषाला स्त्रीचा व स्त्रीला पुरुषाचा आधार, स्त्री व पुरुष या दोघांकडील नातेसंबंधांचा मुलांना होणारा फायदा, मुलांना फुलण्यासाठी,सर्वार्थाने उमलण्यासाठी उपलब्ध होणारी कौटुंबिक पार्श्वभूमी याचा साकल्याने विचार करूनच लग्ने  ठरवली जातात. हे सर्व ज्ञात असूनही लग्न झाल्यानंतर माशी शिंकते आणि लग्न झाले नसते तर फार बरे झाले असते हा विचार असा छळवाद भोगणाऱ्या बायकांच्या मनात थैमान घालू लागतो.         
ही आपली हक्काची बायको आहे यापेक्षा ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे असा विचार खरोखर किती पुरुष करतात? तिने माझ्या घरच्यांची सेवा करावी अशी मागणी करणारे पुरुष बायकोच्या माहेरच्यांची सेवा किती तत्परतेने करताना दिसतात? ऑफिसमधून दोघेही सारखेच थकूनभागून घरी परतल्यानंतर पुढ्यात आयता चहा आणि गरमागरम खाणे या फर्माइशीचा  हक्क फक्त पुरुषांनाच का व कोणी दिला आहे? घरातील सर्व निर्णय घेण्याचा मक्ता फक्त पुरुषांकडेच का?  स्त्रीचे वैयक्तिक मत किती पुरुष ग्राह्य धरतात? बायकोचा आत्म-सन्मान ( self-respect ) पायदळी तुडवण्याचा, खच्ची करण्याचा खटाटोप न करणारे पुरुष किती आहेत? घर घेणे, घराचे सुशोभीकरण, आर्थिक गुंतवणुकी, मुलांचे शिक्षण, वाहनाची खरेदी अशा अनेक महत्वाच्या निर्णयाबाबत आपल्या बायकोशी सल्ला-मसलत करणारे नवरे किती आहेत? लग्न झाल्यानंतर बायकोने नोकरी करावी की न करावी, घरच्यांसाठी तिने नेमका किती वेळ आखून ठेवावा, स्वयंपाकपाणी स्वत: करावे की करवून घ्यावे, तिची एखादी आवड जोपासावी की न जोपासावी, सोशल नेट्वर्किंग वाढवावे की मर्यादित ठेवावे , कपडे-दागिने कोणते घालावेत, समाजात तिने कसे वावरावे याबाबतीतले निर्णय तिच्यावरच सोडण्यातली प्रगल्भता किती नवरे दाखवतात?        
लग्न झाल्यानंतर आपला नवरा ही काय वल्ली आहे हे बायकोच्या ध्यानात यायला लागते आणि मग तिच्या स्वभावानुसार तिची भूमिका ठरते. बंडखोर प्रवृत्तीची स्त्री नवऱ्याला त्याची चूक दाखवायला कमी करत नाही, त्याच्या पुरुषी अहंकारा विरुध्द सक्षमपणे उभी राहू शकते परंतु जन्मजात सोशिकपणाचे बाळकडू प्यायलेली स्त्री मात्र त्याच्या अहंकाराला कुरवाळत, समाजाला घाबरत त्या घर नामक कोंडवाड्यात पिचत राहते. दुर्दैवाने आजमितीला  स्वत:ला निराशेच्या गर्तेत लोटणाऱ्या, पिचून घेणाऱ्या स्त्रियांची संख्या लक्षणीय आहे. लोक काय म्हणतील,नातेवाईक काय म्हणतील,समाज काय म्हणेल याचा विचार करता करता स्वत:चे आयुष्य मात्र या स्त्रिया पणाला लावतात. आपण लग्न केल आहे म्हणजे पुढील शारीरिक,मानसिक अत्याचाराला आपण बांधील आहोत असा गैरसमज बहुतांश स्त्रिया करून घेतात. आपण एक स्वतंत्र व्यक्ती आहोत, आपण सुशिक्षित,सु-संस्कारित आहोत, आपण कुटुंबाचं एक अविभाज्य अंग आहोत, जसे आपण भावनिक दृष्ट्या नवऱ्यावर अवलंबून आहोत तसाच तोही आपल्यावर आहे, जसा तो आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे तशाच आपणही आहोत हा विचार करणाऱ्या स्त्रियांची संख्या आज नगण्य आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते.    
आपण जन्माला येतो तीच आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची पहिली खूण असते. आपल्या इच्छा-आकांक्षा, आपल्या आवडी-निवडी, आपली साध्ये यांच्यावर फुली मारून जे निरस आयुष्य आपल्या वाट्याला येतं ते जगण्यासाठी का  आपला जन्म झालेला असतो? पंख बांधलेला पक्षी इच्छा असूनही गगनभरारी घेऊ शकतो का?  आपलं आयुष्य आपण आनंदाने उपभोगावं आणि इतरांनाही त्यांचं आयुष्य आनंदाने उपभोगू द्यावं हे माणुसकीच व्रत प्रत्येकानेच घ्यायला हवं. दुसऱ्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय करणे तसेच दुसऱ्याकडून अन्याय मुकाट सहन करणे या गोष्टी भूषणास्पद नाहीत हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
तेव्हा पतीच्या जाचाला बळी पडणाऱ्या तमाम बायकांनो, वेळीच सावध व्हा! 

Tuesday 13 December 2011

हरवत चाललेला आकाशाचा तुकडा


पूर्वी माझ्या  घरातून सूर्य,चंद्र,तारे ही नभांगणातील संपदा व्यवस्थित दिसत असे. सूर्य उगवतानाचे आकाश ,चंद्र उगवतानाचे आकाश मी अनुभवत असे. आजकाल आकाशापर्यंत दृष्टी पोहोचण्यासाठी मान वर करावी तर बिल्डींगांचे  अवाढव्य राक्षसी सांगाडे दृष्टीपथात येतात. दोन उंच इमारतींच्या मधून  छोट्याशा आकाशाच्या तुकड्याचे दर्शन होते हेही भाग्यच म्हणायचे! 
आता खरोखरीच मुलांना पुस्तकातून आकाश, सूर्य,चंद्र,तारे दाखवण्याची वेळ आली आहे. आकाश निळसर असते हे समजायला आधी आकाश तर दिसले पाहिजे ना? इमारतींची गच्ची, समुद्र, रस्ता ही आकाश नीट दिसण्याची सध्यातरी हमखास ठिकाणे आहेत. प्रभू श्रीरामचंद्रांनी बालपणी ज्या चंद्रासाठी हट्ट केला होता तो हा चंद्र असे म्हणत घरातून बोट दाखवावे तर अजस्त्र इमारतींनी चंद्राला गिळंकृत केलेले! सूर्य वर येताना सोनेरी लालसर होत जाणारे क्षितीज, सूर्य मावळताना क्षितिजावर पसरत जाणारे संध्या-रंग आता चित्रातून मनात सजीव करायचे दिवस आलेत. आता कवींनाही चंद्र-सूर्यावर कविता करताना मोकळ्या ठिकाणाची निवड करावी लागेल. आकाशातून विहार करणारे पक्षी बघण्यासाठी  आता काय मुला-बाळांना घेऊन रस्त्यावर उतरायचे? ढगांतून जाणारं विमान पाहण्यासाठी गच्चीवर धाव घेण्याशिवाय पर्याय नाही. आपण राहतो तो मजला खालचा असेल तर रस्ता,वरचा असेल तर गच्ची आणि मधला असेल तर पुस्तक अशी निवड करायची आता पाळी आली आहे. 
अजूनपर्यंत तरी बिल्डर लोकांनी गच्च्या,समुद्र,रस्ते,बगीचे, खेळांची मैदाने,विमानांच्या धावपट्ट्या मोकळ्या सोडल्या आहेत हे आपलं सुदैव! घराच्या बाल्कनीत बसून,हातात गरमागरम वाफाळत्या चहाचा कप घेऊन आकाशातून पाऊस पडताना बघण्याची मजा  अनुभवायला आता थेट लोणावळा-खंडाळ्याला जायचं का; की आता 'कितना बारीश हो रहा है' हे बम्बैय्या हिंदी समोरच्या बाल्कनीतील लोकांकडून ऐकण्यात धन्यता मानायची? 'हे विमान फिरते अधांतरी,किती मौज दिसे ही पहातरी' असे ती मजा अनुभवत लिहिणारे तेव्हाचे कवी परत तोच अनुभव घेण्याच्या फंदात कसे पडणार? निरभ्र आकाश कसं दिसतं,ढगाळलेलं आकाश कसं दिसतं हे दृश्य मुलांना कसं दिसणार? 
मला तर वाटतं की पुढची पिढी ही घर सोडून एकतर मॉल मध्ये किंवाएसी गाड्यांमध्ये राहील.. आकाश, ग्रहगोल, ढग, ऋतू,जलाशय,तरुवर या निसर्गनिर्मित गोष्टींपेक्षाही अनेक कृत्रिम प्रलोभने यांना गुंगवून टाकतील. कदाचित अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृत्रिम आकाशही ग्रहगोलांच्या सकट त्यांच्या भेटीस येईल. काय सांगावे,दोन इमारतींच्या मधून दिसणाऱ्या आकाशाच्या तुकड्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या आमच्या पिढीची कहाणी त्यांना उद्या पाठ्य-पुस्तकातून वाचायला मिळेलही!

Sunday 11 December 2011

राजकारण्यांचा 'The End' नसणारा सुपर 'डर्टी' पिक्चर

'बालाजी' निर्मित आणि विद्या बालन 'हिरो' असलेला डर्टी चित्रपट अडीच तासात संपण्याची शाश्वती आहे परंतु सत्ताधारी आणि विरोधक जनतेला दाखवत असलेला सुपर डर्टी चित्रपट कधीही समाप्त होण्याची शाश्वती नाही. पोटाची भूक शमविण्यासाठी आणि पैसा व प्रसिद्धीची लालसा असणारी 'सिल्क' अध:पतनाच्या खाईत लोटली जाते, परतीचे मार्ग केव्हाच बंद झालेले असतात, तिच्याकडे बघण्याची समाजाची दृष्टी निव्वळ एक भोगवस्तू  एवढीच आहे हे ही तिला कळून चुकते आणि मग व्यसनाधीन सिल्क  स्वत:चे अस्तित्व या जगातून कायमचे पुसून टाकते. पण हे अस्तित्व पुसून टाकताना एकवार आपली साडीतली सोज्वळ प्रतिमा  ती आरशात न्याहाळते. अंगावरचे कपडे बेधडकपणे उतरवून लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटवणारी सिल्क स्वत:ला अंगभर कपड्यांत शेवटची साठवू पाहते. तिची ही केविलवाणी धडपड पाहताना अंगावर काटा उभा राहतो. या शोकांतिकेला पैसे मोजून प्रेक्षक अडीच तास इच्छा असेल तर स्वीकारतात पण वर्षानुवर्षे सामान्य जनतेला नागवे करून स्वत:चे स्विस बँकेतील खाते फुगावणाऱ्या राजकारण्यांना मात्र लोकांची इच्छा असो व नसो स्वीकारावेच लागते. 
भ्रष्टाचाराच्या कुविख्यात मार्गावरून चालतानाही आपले पाऊल वाकडे पडते आहे याची क्षिती राजकारण्यांना वाटत नाही. सामाजिक,नैतिक अध:पतन वगैरे शब्द यांच्या शब्दकोशातून कायमचे गायब झालेले असतात. एकमेकांवर दोषारोप करून शाब्दिक वस्त्रहरण करणे, देशातील जनतेला सतत असुरक्षिततेच्या वातावरणात अडकवून ठेवणे, देशातील अति गंभीर समस्यांचे तातडीने निवारण करण्यात प्रचंड चालढकल करणे, देशांतर्गत जातीयतेची बीजे रोवून एकात्मतेची शकले पाडणे आदी कार्यक्रम राजकारण्यांच्या अजेंड्यावर सर्वप्रथम असतात. मोठमोठी भाषणे ठोकून जनतेला प्रभावित करायचे, मोठमोठी आश्वासने देऊन कामकरी,चाकरमानी यांना तात्पुरते खुश करायचे, सवलतींचे आमिष दाखवून गरिबांना आपल्याच पक्षाला मते द्यायला प्रवृत्त करायचे, सोयीसुविधांची आकर्षक चित्रे जनतेच्या डोळ्यांना दाखवायची, अमका कर तमका कर जनतेवर लादून स्वत: मात्र करबुडव्याची भूमिका बजावायची, भारताचे शांघाय करायच्या कैफात सामान्यांच्या प्रश्नांकडे सोयीस्कररित्या डोळेझाक करायची असे हे या सुपर डर्टी चित्रपटाचे न संपणारे कथानक आहे.
देशाच्या कोपऱ्यात कुठेही आणि केव्हाही घडणाऱ्या अपघातांचे,घातपातांचे भांडवल करून राजकारणातील उंट,घोडे,हत्ती,प्यादी यांच्यावर मात करायची हा ही वर्षानुवर्षे खेळला जाणारा राजकारण्यांचा मनोहारी खेळ आहे.  लोकांचे जीव जातात, माणसे लुळी -पांगळी  होतात, कुणाच्या कुटुंबातला आधार जातो, कुणी देशाच्या रक्षणासाठी कामी येतात, कुणी अनपेक्षित धक्क्याने मानसिक संतुलन हरवून बसतात पण यापैकी कुठल्याही समस्येशी या पुढाऱ्यांचे,नेत्यांचे देणेघेणे नसते. निवडणुका जवळ आल्या की निरनिराळी कधीच पूर्ण न होणारी आश्वासने द्यायची, जनतेपाशी मतांची भिक मागायची, रस्त्यातील खड्डे बुजवण्याची नाटके करायची, तेवढ्यापुरते कचऱ्यांचे ढिगारे जनतेच्या दृष्टीआड करायचे, नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते उकरायचे,  दोन-चार बसेस,लोकल जादा सोडायच्या हा यशाचा हमखास मार्ग जवळजवळ बहुतांश राजकारणी थोड्याफार फरकाने अवलंबत असतात. 
याच राजकारण्यांच्या कृपेमुळे शिक्षणव्यवस्था भ्रष्ट होते, डोनेशन घेण्याची व्याधी तिला कायमची जडते, जीवघेण्या शैक्षणिक शर्यतीत अनेक निष्पाप विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडते, अभ्यासाच्या अवाजवी दबावाखाली आत्महत्यांचे पेव फुटते, शेतकरीराजा कर्जाच्या बोज्याखाली त्याचा जीव जाईपर्यंत पिचत राहतो, स्वत:चा जीव घेण्याची कल्पना त्याच्या डोक्याचा ताबा घ्यायला लागते, त्याच्या बायको-मुलांचा विचार न करता तो फक्त स्वत:च्या मृत्यूचा स्वार्थी विचार करू लागतो, निराशेच्या गर्तेत सापडलेल्या जीवांना व्यसने जिवाभावाची वाटू लागतात, कंपन्या बंद झालेले चाकरमानी कुटुंबासकट रस्त्यावर येतात, बॉम्बस्फोट, गोळीबार, राडे-दंगली  आपण कायमच असुरक्षित  असण्याची हमी देतात, जातीयवाद,प्रांतीयवाद  आपल्या उरावर बसतो, महागाई महामारीसारखी पसरून सगळ्यांचेच आर्थिक शोषण करते, गल्लोगल्ली साठलेला कचरा, वेगवेगळी प्रदूषणे जनतेला आजारी पडण्यास समर्थ ठरतात, हॉस्पिटल ही वास्तू एखाद्याला रोगातून मुक्त करू शकते पण हलगर्जीमुळे ओढवलेल्या अपघाताच्या योगातून सोडवू शकेल याची हमी देता येत नाही, लाचखोरी,चोरी,दलाली,अफरातफर ही कृत्ये सन्माननीय वाटू लागतात, भ्रष्टाचार केलेले,बलात्कार केलेले,हत्या केलेले  अपराधी एखाद्या हिरोच्या अविर्भावात वावरताना आढळतात.
डर्टी पिक्चरमधील सिल्कला निदान शेवटच्या क्षणी तरी स्वत:ची अंगभर साडीतली प्रतिमा न्याहाळावीशी  वाटते परंतु स्वत:ची मलीन झालेली प्रतिमा ओळखून ती सुधारण्यासाठी लागणारी निकोप  आणि धीट दृष्टी राजकारणी केव्हाच गमावून बसले आहेत.