Thursday 27 June 2013

निसर्गाचा कोप की मानवी घात ?


केदारनाथ ह्या भगवान शंकराचा वास असलेल्या पावनभूमीवर निसर्गाने अवचित घाला घातला आणि मृत्यूचे भीषण तांडव सगळ्यांच्याच अंत:करणाचा थरकाप उडवून गेले. अनेक घरे वाहून गेली , अनेक संसार विस्कटले, अनेक मने मृतप्राय झाली , अनेक हृदये विदीर्ण झाली. प्रत्यक्ष केदारनाथ मंदिराच्या अवतीभवती प्रेतांचा खच पडला. रस्ते नाहीसे झाले. चंद्रापर्यंत झेपावलेल्या माणसाचे थिटेपण पुनश्च अनुभवास आले.       
झाडांची बेमालूम केलेली कत्तल, वळवलेल्या किंवा बुजवलेल्या नद्या, खाड्या, नष्ट केलेली तिवरे, जागोजागी अवैधपणे बांधलेल्या इमारती अशी कित्येक कारणे एकत्र आली आणि भारतीयांना महाप्रलयाची चुणूक बघायला मिळाली. 
लष्करातील जवान आपले प्राण पणाला लावून, अहोरात्र राबून अडकलेल्या लोकांची सुटका करत आहेत. कित्येक प्रेतांवर अंत्यसंस्कार करायचे अद्याप बाकी आहेत. केदारनाथ परिसराला दुर्गंधीने वेढलेले आहे. तेथील अनेक गावांवर रोगराईचे सावट पसरलेले आहे अडकलेल्यांना उपासमारीची, जीवघेण्या थंडीची चिंता भेडसावते आहे. आजूबाजूच्या पट्ट्यातील लुटारू, बलात्कारी यांना परिस्थितीच्या खिंडीत अडकलेले असहाय लोक आणि त्यातील महिला ही जणू काही सुवर्णसंधीच वाटते आहे. जे लोक बेपत्ता आहेत त्यांच्या येथील नातेवाईकांना अनेक शंका-कुशंकांनी ग्रासलेले आहे. आपल्या प्रियजनांच्या वाटेकडे आशेने डोळे लावून बसलेले अनेक जण आहेत. ज्यांच्या घरातील अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत त्या मागे राहिलेल्यांना आपल्या आयुष्याचेच निर्माल्य झाल्यासारखे वाटत आहे.  
अशा परिस्थितीत वरिष्ठ राजकारणी केवळ हवाई पाहणी करण्यात धन्यता मानत आहेत ही अत्यंत खेदजनक बाब आहे. कोणी राजकारणी पुनर्वसनाचा मुद्दा हाताशी धरून त्याचे सत्तेसाठी भांडवल करू पाहत आहेत. स्थानिक लोकांशी, नेत्यांशी, व्यावसायिकांशी साटेलोटे जमवून तेथील भूखंड गिळंकृत करणाऱ्या राजकारण्यांची बजबजपुरी माजली आहे. मग तिथे मोठाली हॉटेल्स, इमारती उभ्या राहतात. त्यांची ध्येये साध्य करण्यासाठी म्हणून मोठमोठ्या वृक्षांची निघृणपणे कत्तल केली जाते, नद्यांचे स्त्रोत वळवले जातात, रान-तिवरे नष्ट केली जातात. पर्यावरणाचा विध्वंस होतो. निसर्गाचा समतोल ढळतो आणि मग अशा प्रकारे निसर्ग मानवाचा घास घेतो.   
पण निसर्गाची कत्तल करणारे ह्यात भरडले जात नाहीत तर ह्यात तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांची आहुती पडते. त्यांच्या आलिशान बंगल्यात बसून निसर्गाचे हे भयाकारी तांडव पाहण्यात हे मश्गुल असतात. एखाद दुसरी मुलाखत दिली जाते तीही ढिम्म चेहऱ्याने! आम्ही ही मदत पाठवली आहे, ही कुमक पाठवली आहे, अमक्या रकमेचा धनादेश पाठवला आहे असे म्हटले कि ह्याची नैतिक जबाबदार जणू संपूनच जाते. निसर्ग संपत्ती, प्राणी संपत्ती, जल-जैविक संपत्ती ह्या सगळ्यावर तर निसर्गाच्या समतोल अवलंबून असतो. ह्यातील कोणत्याही गोष्टीचा साठा नष्ट झाल्यास अथवा जाणूनबुजून नष्ट केल्यास भू-स्खलनाचा धोका अपरिहार्यपणे संभवू शकतो. हा निसर्गाचा प्रकोप संपूर्ण सृष्टीची राखरांगोळी करण्यास पूर्णपणे समर्थ असतो. स्वार्थासाठी, राजकीय मतलबासाठी पोखरलेले डोंगर व त्यावर झालेली ढगफुटी यामुळेच हा प्रलय झाला. फक्त ह्या परिस्थितीला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जबाबदार असलेले सुरक्षित राहिले आणि परमेश्वर चरणी नत व्हायला गेलेले प्रलयाच्या दलदलीत कायमचे गाडले गेले.         
आपले पूर्वज आर्य निसर्गालाच देव मानून त्याची पूजा करायचे. त्यांच्यासाठी देव हा सगुण स्वरूप नसून अवतीभवती पसरलेला निर्गुण निराकार निसर्ग हा होता. निसर्गाला जर देव मानले तर हल्लीचे सत्ताधारी,व्यावसायिक ह्या देवावरच लोभाची कुऱ्हाड चालवत आहेत आणि तेही अत्यंत बेदरकार,निर्लज्ज वृत्तीने! आणि स्वत:ची खुर्ची शाबूत राहू दे म्हणून देव्हाऱ्यात बसवलेल्या सगुण स्वरूपाला सोने-चांदी-हिऱ्यांनी मढवत आहेत. परंतु हे राजकारण्यांनो एक लक्षात ठेवा, ज्या कोटी लोकांच्या बळावर आज तुम्ही ही सत्ता उपभोगू शकता त्या जनतेच्या प्रक्षोभाला आमंत्रण देऊ नका अन्यथा भयंकर मानवी प्रकोपाला तुम्हाला आज ना उद्या सामोरे जावेच लागेल.             
   

Tuesday 25 June 2013

प्रेम, आकर्षण, लग्न वगैरे वगैरे…………


सध्या मद्रास हायकोर्टाने दिलेला स्त्री-पुरुष संबंधा विषयीचा निकाल वेगवेगळ्या कारणास्तव गाजतो आहे. अनेक रोमीओंचे धाबे यामुळे दणाणले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळात प्रेम, लैंगिक आकर्षण आणि कायदेशीर विवाह या संबंधीच्या कल्पना खूपशा वैयक्तिक असतात. पुरोगामी, प्रतिगामी असे वेगवेगळ्या  विचार प्रवाहांचे गट अत्यंत निरनिराळी मते समाजात मांडताना दिसतात. पण या सगळ्याचा उहापोह न करता एक पुरोगामी विचाराची स्त्री म्हणून मला काही मते मांडावीशी वाटतात.      
सर्वसामान्य स्त्रीची प्रेमाची व्याख्या ही पुरुषाच्या प्रेमाच्या व्याख्येपेक्षा निश्चित वेगळी असते. आपण ज्या पुरुषावर मनापासून प्रेम करतो त्याने आपल्याशी लग्न करावं, आपल्याला आधार द्यावा, आपलं रक्षण करावं, आपल्या मुलांना पित्याचं प्रेम द्यावं, आपला संसार सुखाचा करावा अशा भावना मनाशी बाळगून स्त्री एखाद्या पुरुषावर प्रेम करू पाहते. पण पुरुषांचा प्रेम या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन असा असतोच असे नाही. त्यांच्या मनातील स्त्री विषयक लैगिक आकर्षण आधी जागं होतं आणि कालांतराने प्रेमभावना जागी होते पण ती प्रत्येकाच्या बाबतीत होतेच असेही नाही. पुरुषाला सर्वस्व अर्पण करणारी स्त्री त्याच्याशी संसार करण्याच्या इराद्यानेच पुढे जात असते तथापि एखाद्या स्त्रीशी शारीरिक दृष्ट्या समरस होणारा पुरुष तिच्याशी लग्न करण्याच्या उद्देशानेच जवळ येतो असे नाही. लग्न हा केवळ सामाजिक उपचार असतो. मंगळसूत्र, अंगठ्या, कायदेशीर विवाह नोंदणी ही स्त्री-पुरुष  संबंधांना मिळालेली समाजमान्यता असते एवढाच याचा अर्थ आहे. लग्ने जमतात, जमवली जातात पण प्रेम जमवून, ठरवून करता येत नसते. आपल्याकडे विवाह हा एक 'स्टेटस सिम्बॉल' मानला जातो. समारंभांना नवरा-बायकोने जोडीने जाणे ही गोष्ट प्रतिष्ठेची 
मानली जाते. मग अशा नवरा-बायकोत प्रेमाचा अंश असो वा नसो, रूढार्थाने असे पती-पत्नीचे लेबल लावून त्यांना समाजात मानाने फिरता येऊ शकते.  लौकिकार्थाने 'आदर्श' संसार करता येऊ शकतो आणि मुलेबाळे सुद्धा प्रसवता येऊ शकतात.    
प्रश्न असतो तो परस्परांमधील नात्याचा, संबंधांचा! निसर्गनियमानुसार लैंगिक आकर्षण आणि त्यानंतर सहवासाने निर्माण होणारं प्रेम जर दोघांत रुजलच नाही तर संसार हा केवळ एक बाह्य उपचार ठरतो. ना अशी स्त्री कधी सुखी राहू शकत ना पुरुष! आजमितीला अशी अनेक जोडपी असे उपचार पार पडताना आढळतात. संसाराचे रहाटगाडगे, संसाराचा गाडा अशी शुष्क संबोधने वापरून हे उभयता दिवस रेटत राहतात. स्त्रिया अकाली पोक्त दिसू लागतात. यांच्या पुरुषांची नजर इतरत्र वेध घेत फिरू लागते. दोघांतील दुही वाढू लागते. आपण लग्न का केलं हा विचार अंतरबाह्य पोखरू लागतो  आणि लग्न या संकल्पनेवर आपण उपहासाने हसू पाहतो.       
स्त्रीने पुरुषाचा संसार करायचा, त्याच्यापासून होणारी मुले मोठी करायची , घरची चूल सांभाळायची आणि पुरुषाने स्त्रीला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून द्यायची, कुटुंबाचा आर्थिक भार उचलायचा आणि आपला वरचष्मा कुटुंबावर आणि पर्यायाने स्त्रीवर प्रस्थापित करायचा हे दिवस आता सरले आहेत. आज स्त्री शिक्षित आहे, कमावती आहे, स्वत:चा आणि स्वत:च्या कुटुंबाचा सांभाळ करण्या इतपत सक्षम आहे. तिलाही वर हवा आहे पण इच्छित ! कुणाच्याही गळ्यात वरमाला घालून त्याला जन्मभरासाठी आपला पती म्हणून स्वीकारणारी स्त्री एकतर ग्राम्य, विचारांनी मागासलेली अथवा आर्थिक दृष्ट्या परावलंबी तरी असावी,          
प्रेम हे एक अजब रसायन आहे. प्रेमासाठी जीव घेतले जातात तसेच दिलेही जातात. पण या धकाधकीच्या आणि संपूर्णपणे अस्थिर आणि क्षणभंगुर आयुष्यात हिरवळ फुलवण्याचे सामर्थ्य निव्वळ प्रेमभावनेत आहे. जो तुम्हा-आम्हा सर्वांचा हक्क आहे. लैंगिक आकर्षण ही वयानुसार कमी होत जाणारी बाब आहे तर प्रेमभावना ही चिरंतन टिकणारी अशी गोष्ट आहे.   
यापुढे प्रत्येक स्त्रीने सर्वार्थाने इतके सक्षम व्हावे की तिला स्वत:ला हवे तसे जगता येईल, आपल्या प्रेमासाठी लायक असलेल्या माणसाशी लग्न करता येईल आणि जिथे प्रेमाखेरीज आदर या भावनेचीही सम विभागणी होईल. जिथे केवळ तिच्या शरीरावर नाही तर तिच्या विचारांवर प्रेम करणारा, तिच्या मतांचा यथायोग्य आदर करणारा सहचर तिला लाभेल. त्यामुळे केवळ लैंगिक आकर्षणावर टिकलेला लग्न नामक उपचार मोडीत निघाल्यावर पोटगी मागण्याची वेळ तिच्यावर येणार नाही. त्याच्या आधाराशिवाय स्वत:च्या पोटात वाढणारे बाळ तिला या जगात येऊ देता येईल किंवा लग्न या सामाजिक उपचारापर्यंत न जाता ही तिची प्रेमभावना अबाधित ठेवता येईल.                    

Tuesday 18 June 2013

अनुमती - एक कटू सत्य


अगदी अलीकडेच प्रदर्शित झालेला अनुमती हा एक विचाराधीन चित्रपट आहे. नवरा-बायको यांच्या नात्यातील एक  घट्ट वीण अधोरेखित करणारा असा हा चित्रपट आहे. काही काही आजार असे असतात की त्यातून माणूस बरा होईल की नाही हे सांगणे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही निश्चितपणे सांगता येणे शक्य नसते. अद्ययावत साधन-सुविधा असलेली हॉस्पिटल्स, अत्यंत महागडे औषधोपचार, डॉक्टरांच्या फीज परवडणे ही सर्वसामान्य  माणसाच्या आवाक्याबाहेरील गोष्ट असते.  ज्या मुलांना आई-वडिलांनी लहानपणापासून तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेले असते, ती मुलेही त्यांच्या मोठेपणी संसार,जबाबदाऱ्या या चक्रात इतकी अपरिहार्यपणे अडकली जातात की त्यांच्याकडूनही कुठल्याही घवघवीत मदतीची अपेक्षा करणे व्यावहारिक दृष्ट्या शक्य नसते. अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करता करता एका हरलेल्या किंवा लौकिकार्थाने अपयशी ठरलेल्या एका माणसाची ही कथा आहे.    
गजेंद्र अहिरे यांचा हा चित्रपट स्तुत्य आहे. काही वेळेस चित्रपट तुटक वाटतो हे खरे परंतु हे या चित्रपटाचे अपयश आहे असे मात्र वाटत नाही. कोकणातील निसर्ग मात्र अप्रतिम टिपला गेला आहे. समुद्राच्या खडकांवर आपटणाऱ्या लाटा, दुतर्फा माडांची झाडे, पायाखालचे हिरवेगार गवत आणि पावसाची संततधार हे दृश्य डोळ्यांना अक्षरश: जखडून ठेवते. संपूर्ण चित्रपटात रत्नाकर पाठारे  यांची त्यांच्या पत्नीला वाचवण्याची जीवापाड धडपड दाखवली आहे. त्यांची हतबलता, असहायता, DNR  फॉर्मवर साईन न करण्यासाठी त्यांच्या मनाची चाललेली कुतरओढ परिणामकारकरित्या दाखवली गेली आहे.       
हा सबंध चित्रपट म्हणजे जुन्या आठवणींचे आणि प्राप्त परिस्थितीचे एक कोलाज आहे असे म्हणायला हरकत नाही. चित्रपटाचा विषय गंभीर आहे, शेवट डिप्रेसिव्ह आणि संदिग्ध आहे. तरीही तुम्हा-आम्हा सारख्यांच्या मनात अशा एका कटू सत्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. भविष्यातील तरतुदीविषयी सजगता निर्माण करणारा आहे. भावनांच्या प्रवाहात न भरकटता शांतपणे आणि सुज्ञपणे विचार करायला लावणारा आहे.  
हा संपूर्ण चित्रपट ज्या कारणासाठी बघावासा वाटतो तो नि:संशय विक्रम गोखले या अभिनेत्यामुळे ! मनात चाललेली घालमेल अभिनित करण्याचे त्यांचे कौशल्य केवळ अतुलनीय आहे. ती हतबलता, निराशा, मनाला आलेला विलक्षण थकवा, अनेक शंका-कुशंकांनी पोखरलेले मन, पत्नीच्या आजारपणामुळे आलेली लाचारी, कटू वास्तवाने विझत चाललेली डोळ्यातील चमक, पत्नीच्या सतत मनात रुंजी घालणाऱ्या गतकाळातील आठवणी या रसायनातून रत्नाकर पाठारे ही भूमिका विक्रम गोखले यांनी उत्कृष्ट साकारली आहे  याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. नीनाने रंगवलेली रत्नाकरच्या पत्नीची म्हणजेच मधूची भूमिका चांगली आहे पण यात नीना आपल्याला फक्त गतकाळाच्या माध्यमातूनच भेटते. रीमाचे काम नीटनेटके परंतु अगदी छोटेसे आहे. आपल्या सासऱ्याच्या मनातील वादळ समजून घेऊ शकणारी सून सई ताम्हणकर हिने चांगली साकारली आहे. सुबोध भावे यांचे काम छोटेसे पण लक्षणीय आहे. नेहा पेंडसेची भूमिकाही ठीक आहे.   
 विझत चाललेल्या ज्योतीला कसे विझण्यापासून परावृत्त करायचे आणि ती ज्योत तेवती राहण्यासाठी प्रयत्नांचे पहाड कसे जीवाची पर्वा न करता फोडण्याची शिकस्त करायची याचा वस्तुपाठ म्हणजे हा चित्रपट आहे असे म्हणायला हरकत नाही. प्रेक्षकांनी जरूर बघावा असा हा चित्रपट आहे.   

Wednesday 12 June 2013

अवेळीच मिटलेल्या अथवा मिटू पाहणाऱ्या कळ्यांना …………


नुकतीच जिया खान या अभिनेत्रीने प्रचंड नैराश्यापोटी आत्महत्या केली आणि मन अतिशय अस्वस्थ झाले. तिने लिहिलेल्या पत्रातील मजकूर जाहीर झाला आणि तिच्यावर झालेल्या अन्यायाची जाहीर वाच्यता झाली. यातील किती खरे किवा किती खोटे याचा यानंतर कीस काढला जाईल. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतील. पण एक अवघी पंचवीस वर्षाची युवती आपले सगेसोयरे,  आपले करियर या गोष्टींचा जराही विचार न करता मृत्युच्या विचारांना आपल्यावर अधिराज्य गाजवू देते हे एक भीषण सत्य कोणालाच विसरता येणार नाही.  
तिने लिहिलेल्या पत्रात तिच्या प्रियकराने तिच्यावर सतत जबरदस्ती केल्याचे म्हटले आहे. मला एक कळत नाही की आपण ज्याला आपले सर्वस्व मानतो, ज्याच्यावर स्वत:हूनही अधिक प्रेम करतो, ज्याला निष्ठेने तन-मन-धन अर्पण करतो त्या पुरुषाची नियत आपल्याला आधी कशी कळत नाही? जो माणूस केवळ आपल्या देहाचा उपभोग घेण्यासाठी आपल्या जवळ येतो तो माणूस किती चांगल्या वर्तणुकीचा असू शकेल याचा अंदाज या मुलींना कसा येत नाही? जो पुरुष पार्ट्या,मद्य,मुली यात रममाण होण्यात धन्यता मानतो तो माणूस एकपत्नीबाणी कसा होऊ शकेल? किंबहुना लग्न,विवाह या कल्पना तरी त्याच्या मनाला शिवण्याची सुतराम शक्यता आहे का याचा पडताळा या मुलींना कसा येत नाही? एखाद्या पुरुषाच्या स्वाधीन होण्याआधी तो पुरुष खरोखर त्या लायकीचा आहे की नाही याची खातरजमा मुली का करून घेत नाहीत? त्याने आपली फसवणूक केली असे म्हणण्यापेक्षा मुलींनो तुम्ही आपली फसवणूक करून घेतलीत असे मला म्हणावेसे वाटते.  
आपण गरोदर राहू याची भीती असतानाही तिने स्वत:ला कोणतीही काळजी न घेता त्याच्या स्वाधीन करावे ही गोष्ट मनाला पटतच नाही. ती गर्भवती राहिली आणि ते बाळ तिला तिच्या इच्छेविरुद्ध abort  करावे लागले. गरोदर राहिल्यानंतर तिने जिद्दीने त्या बाळाला वाढवण्याचा निर्णय का घेतला नाही आणि गरोदर राहायचे नव्हते तर मग योग्य ती काळजी का घेतली नाही या प्रश्नांची उत्तरे जीयाबरोबरच वाहून गेली आहेत. जे चित्रपटातील करियर तिला आश्वासक वाटत होते त्या करियरला लाथ मारून अयोग्य माणसाच्या मोहजालात ती भरकटत कशी गेली या प्रश्नाचे उत्तर आता कधीच मिळणार नाही.    
अनेक मॉडेल्स, मुली चित्रपटसृष्टीत करियर करण्याच्या उद्देशाने आपापली शहरे, गावे सोडून मुंबानगरीत स्थायिक होतात आणि करियर पेक्षाही गुंतागुंतीच्या आणि जीवघेण्या मोहजालात गुरफटल्या जातात. त्यांनी त्यांच्या आयुष्याची रंगवलेली स्वप्ने काही दिवसातच धुळीला मिळतात आणि पुढ्यात असलेले आयुष्य दुधात मिठाचा खडा पडल्यासारखे नासून जाते. यातील काहीजणी मग स्वत:ला सिगारेट,दारू, ड्रग्ज या व्यसनांत पूर्णपणे बुडवून घेतात तर काहीजणी उद्विग्न मनस्थितीत मृत्यूला कवटाळतात.  
एखाद्या विकृत स्वभावाच्या माणसाच्या स्वाधीन स्वत:ला करून संपवण्यासाठीच केवळ आपण या शरीराचा वापर करणार आहोत का याचा विचार प्रत्येक सुशिक्षित म्हणवणाऱ्या मुलीने या क्षणापासून केला पाहिजे असे मला वाटते. आपले विचार, तत्वे, स्वप्ने  यांना साकार होण्याचा अधिकार आहे की नाही याचा विचार केला गेला पाहिजे. आपली सुखाची कल्पना आणि दुसऱ्या व्यक्तीची सुखाची कल्पना यांचा समन्वय साधला जातोय का याचा विचार किमान केला गेला पाहिजे. आपले प्रेम आपण दुसऱ्यावर त्याची इच्छा नसताना लादतोय का याचा विचार व्हायला हवा आणि या अशा एकतर्फी प्रेमसंबंधातून आपल्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे की नाही याचेही भान प्रत्येक मुलीला असलेच पाहिजे. त्या पुरुषाच्या मोहजालात अडकून आपले घरच्यांशी असलेले नातेसंबंध दुरावत चालले आहेत का याचाही आढावा स्वत:शी घेणे आवश्यक आहे.      
शेवटी मृत्यूचे पाश गळ्याभोवती आवळत स्वत:चे आयुष्य स्वत:ला परके करायचे की प्रेमात सावधानता बाळगत नाती,करियर उत्तम रीतीने सांभाळत भविष्याच्या रेशमी लड्या आपल्याशा करायच्या हा निर्णय ज्याचा त्याचा !