Sunday 30 December 2012

तिला जगायचं होतं ............



तिला खूप खूप जगायचं होतं . तिच्या मनात भविष्याची सुंदर स्वप्ने होती. तिच्या अवघ्या कुटुंबाचा ती आधारस्तंभ होती. तिच्या वडिलांनी कर्ज काढून तिला उत्तम शिक्षण देऊ केले होते. एका छोट्याशा गावातून दिल्लीसारख्या मोठ्या शहरात नोकरी निमित्ताने ती आली. आपल्या मित्रासोबत चित्रपट बघून ती द्वारकेच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये बसली आणि जणू काही एखाद्या सावजावर नेम धरून टपलेला काळच तिच्यावर चालून आला. थोड्या वेळात तिच्या देहावर अनन्वित अत्याचार झाले. न भूतो न भविष्यती असे घाव तिला सोसावे लागले. तिचे असह्य वेदनांनी तडफडणारे शरीर विवस्त्र करून रस्त्यावर फेकले गेले. तिच्याबरोबर त्याचेही ! आजूबाजूच्या रस्त्यावर गाड्या सुसाट धावत होत्या पण त्या दोघांची दखल कुणी घेतली नाही. अखेर मोटरसायकलीवरून आलेल्या तिघांना ती आणि तो दिसले आणि पोलिसांना इन्फोर्म केले गेले. अशा रीतीने त्या दोघांची रवानगी सफदरजंग हॉस्पिटलात झाली. 
आज मृत्यूशी चार हात करणारी ती मुलगी 'दामिनी' आपल्यात नाही. अंगावर इतक्या भयंकर जखमांचे ओझे बाळगत तिने तेरा दिवस काढले तरी कसे असा प्रश्न मनाला वारंवार पडतो आहे. दामिनी आशावादी होती. आपल्या वेदनेने ठुसठूसणाऱ्या शरीराला नक्की आराम मिळेल आणि आपण या जीवघेण्या संकटातून बरे होऊ हा विश्वास तिच्या ठायी होता. आतडी जवळजवळ नाहीत, डोक्याला असंख्य जखमा झालेल्या, कंबरेखालच्या भागात असह्य वेदना, अंतर्गत रक्तस्राव, बेशुद्धी अशी देणगी तो महाभयंकर काळच तिला देऊन गेला होता. तरीही जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा 'Mother, I want to live' हा संदेश तिने तिच्या आईला पाठविला. अवघ्या तेवीस वर्षाच्या या दामिनीला ही पराकोटीची वेदना का सहन करायला लागावी? हा प्रश्न मनात अनेक वेळा उठला. नामांकित डॉक्टरसुद्धा तिच्या अंगावरील जखमा बघून हबकून गेले होते आणि तिच्या धैर्याची प्रशंसा करत होते. पण अखेर तिच्या असह्य वेदनांची सांगता झाली. लाखो-करोडो लोकांच्या मनात अनेक प्रश्नांचे जळजळीत निखारे ठेऊन ती गेली. 
आज तिच्या निमित्ताने भारत देशातील अनेक राज्यांतील कैक लोक अपराध करणाऱ्यांना सज्जड शिक्षा द्या अशी मागणी करण्याच्या हेतूने एकत्र आले. अनेक दिवस, महिने, वर्षे कित्येकांच्या मनात साचलेली उद्विग्नता तिच्या निमित्ताने दारोदार चर्चिली गेली. निदर्शने, घोषणा, मूक मोर्चे अजूनही चालू आहेत आणि चालू राहतील. तिला आणि तिच्या सारख्या अनेकींना न्याय मिळावा यासाठी लोकांचे जथ्थे रस्त्यावर उतरतील. सरकारला जन- भावनांची दाखल घ्यावीच लागेल. अपराध्यांना फासापर्यंत न्यावेच लागेल. 
पण एवढे करूनही असे गुन्हे पुन्हा होणारच नाहीत याची कुणी ग्वाही देऊ शकेल काय? किंबहुना या घटनेनंतर लगेचच राजधानीत आणि इतरत्र ठिकाणी अमानुष अत्याचाराच्या घटना घडल्याच! अशा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना आपल्या अवतीभोवती तोपर्यंत घडतच राहतील जोपर्यंत माणसाची मानसिकता बदलणार नाही. ही मानसिकता एका दिवसात, एका रात्रीत बदलणार नाही परंतु सातत्याने प्रयत्न केल्यास एक दिवस बदलेल एवढे मात्र निश्चित! माणसाला पैसे कमावण्याची संथा देण्याआधी माणसाला माणूस म्हणून वागण्याची संथा देणे अति आवश्यक आहे असे मला वाटते. नुसते लैंगिक शिक्षण देणे गरजेचे नाही तर वयाशी निगडीत असलेल्या लैंगिक भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे शिक्षण देणेही तेवढेच गरजेचे आहे. आपल्या शरीराची वैषयिक भूक भागवण्यासाठी समोर दिसेल त्या स्त्रीला लक्ष्य करणे हे असंस्कृत, कमकुवत, असमतोल मनाचे लक्षण आहे हे मुलांना पटवणे अत्यावश्यक आहे. बाल्यावस्थेतच मुलांना काही मानवी मूल्यांचे जतन करायला सांगणे आवश्यक आहे.  घरातील स्त्री रूपांचा मग ती आई असेल, आजी असेल, बहिण असेल, आत्या असेल योग्य तो आदर करणे हे इतर वडीलधाऱ्यांनी शिकवले पाहिजे. पौगंडावस्थेत भरकटणाऱ्या मुलांच्या मनाला संस्कारांचा आणि संयमाचा लगाम घालायला शिकवले गेले पाहिजे. शाळेतही आपल्याबरोबर शिकणाऱ्या वर्गभगिनी बरोबर चांगले वागायला त्या त्या वर्ग-शिक्षकांनी शिकवावयास हवे. समाजातील पुरुषांचा स्त्री-विषयक दृष्टीकोन बदलायला हवा असेल तर त्यासाठी मुलामुलींच्या बाल्यावस्थेपासूनच कंबर कसायला हवी. 
एकमेकांना दोष देत राहणे, चर्चा-वितंडवाद करत राहणे, सरकारवर सारखी आगपाखड करत राहणे, मुलींना घराबाहेर न सोडणे, त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणे हे काही चिरस्थायी उपाय नाहीत. त्यापेक्षा मुलांना नैतिक-अनैतिक यातील फरक खुबीने समजावणे, उत्तम आचरणाचे शिक्षण देणे, स्त्री असो वा पुरुष प्रत्येक व्यक्तीला सन्मानपूर्वक वागवण्यास शिकवणे, दुसऱ्याविषयी चांगले विचार मुलांच्या कोवळ्या मनात रुजतील अशी उदबोधक पुस्तके मुलांना उपलब्ध करून देणे, एकमेकांना मदत करण्याचे बाळकडू मुलांना देणे, मुलांची संगत तपासून पाहणे अशा काही गोष्टी प्रयत्नपूर्वक पालक आणि शिक्षक अशा दोहोंनी केल्यास उद्याची सुसंस्कृत पिढी तयार होईल यात शंका नाही. आपल्या मुलांना घडवण्यात प्रत्येकाचा सिंहाचा वाटा असला पाहिजे. हे सामाजिक अत्याचाराचे मूळ समूळ निपटून टाकण्यासाठी जबाबदारीचा हा विडा आज प्रत्येकानेच उचलण्याची नितांत गरज आहे.   

Monday 24 December 2012

ढिम्म सरकार ...... विषण्ण जनता !


आठ दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत एक भयानक घटना घडली आणि तिचे पडसाद देशाच्या कानाकोपऱ्यात उमटले. दिल्लीतील युवा पिढी रस्त्यावर उतरली. निदर्शने, आंदोलने, घोषणा यांनी दिल्ली दुमदुमली. राजधानीत चर्चासत्रे चालू झाली. आरोपी पकडले गेले. देशभरातून त्या दुर्दैवी मुलीसाठी प्रार्थना सुरु आहेत. डॉक्टर तिला वाचवण्याची शिकस्त करत आहेत.  परंतु गेल्या आठवड्याभरातील वेगवेगळ्या घटनांमधून  सरकार आणि आम जनता यांच्यातील दरी वाढत जाते आहे. आरोपींच्या शिक्षेसंदर्भातील कोणत्याही ठोस निर्णयाप्रत अजून तरी सरकार पोहोचू शकलेली नाही. असे अनेक बलात्कारी, अत्याचारी आजही या देशाच्या पाठीवर राजरोस निर्भीडपणे फिरत आहेत. त्यांच्या कृष्ण-कृत्यांना आळा घालायला कुणी आलेलाच नाही. आणि जन्मभराची शिक्षा भोगत बसल्या आहेत अनेक असहाय तरुणी ! 
मुंबईत निखिल बनकर या तरुणाच्या हल्ल्याचे लक्ष्य झालेली तरुणी हॉस्पिटल मध्ये गंभीर अवस्थेत आहे. दिवसेंदिवस या घटना बेसुमार वाढल्या आहेत. जवळजवळ सगळ्या आई-वडिलांच्या डोक्याला नसता घोर लागला आहे. शाळा-कॉलेज-ऑफिस मध्ये जाणारी आपली पोर घरी सुखरूप येईल ना ही चिंता त्यांना दिवस-रात्र  कुरतडते आहे.  'सिंगल रेप-gang रेप' हे शब्द नको त्या वयात मुला-मुलींच्या ओठांवर येत आहेत. छोट्या-छोट्या मुलींना स्वत:चे रक्षण परपुरुषापासून कसे करायचे याविषयी मार्गदर्शन देण्याची वेळ आली आहे.  यातील काही मुली स्वकीयांपासूनच विटंबिल्या जात आहेत.  घरी-दारी लहान मुलींचे, तरुणींचे, स्त्रियांचे शत्रू निर्माण होत आहेत. मुलींच्या वयाचा जराही मुलाहिजा न ठेवता त्यांना आपल्या कामांधतेचे बळी ठरवण्यासाठी अनेक पुरुष तत्पर आहेत.    
हे सगळे अव्याहत चालू असताना सरकार मात्र अनेक गंभीर प्रश्नांना ठराविक चाकोरीबद्ध उत्तरे देत आणि मूळ प्रश्नाला बगल देत ढिम्म बसले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेतील दिरंगाई आणि ढिलाईमुळेच अपराध्यांचे फावले आहे. रस्त्यात चालणाऱ्या कोणत्याही मुलीवर हात टाकणे, तिची छेड काढणे, तिच्यावर acid फेकणे, चाकूहल्ला करणे त्यांना सहजसाध्य होते आहे. एकीकडे स्त्रीला देवी म्हणायचे आणि दुसरीकडे तिच्या देहाला खेळणे समजायचे अशा प्रकारची मानसिकता समाजात बोकाळली आहे.  सत्तेवर बसलेल्या व्हीआयपींना मुली आहेत पण त्या मुलींचे आयुष्य आणि सर्वसामान्य मुलींचे आयुष्य यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. कडेकोट बंदोबस्तात आपला अभ्यासक्रम आणि करियर करणाऱ्या त्यांच्या मुली आणि कोणत्याही प्रतिकूल परिस्थतीत कुटुंबाला आधार देत नोकरी करणाऱ्या, घर चालवणाऱ्या, एकट्या-दुकट्या राहणाऱ्या सामान्य मुली यात कुठल्याही दृष्टीने तुलना होऊ शकत नाही. रात्रीच्या वेळी बसची वाट बघत आणि परक्यांच्या घाणेरड्या नजरा सहन करत एकटीने उभे राहणे किती व्हीआयपीजच्या मुलींच्या वाट्याला आले आहे? रात्री उशिरा ट्रेनमधून जीव मुठीत धरून प्रवास करणे किती व्हीआयपीजच्या मुलींच्या वाट्याला आले आहे? त्यामुळे आम्हालासुद्धा मुली आहेत हा त्यांचा युक्तिवाद इथे प्रशस्त ठरत नाही. 
दिल्लीत घडलेली घटना हा क्रौयाचा परमोच्चबिंदू आहे पण याआधीही अशा अनेक अत्याचाराच्या, मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. अशा अनेक घटना घडूनही सरकारच्या निर्ढावलेल्या डोळ्यांना काही पाझर फुटत नाही. अपराधी मोकाट सुटतात आणि त्यांच्या वासनेला बळी पडलेल्या एकतर मरून तरी जातात किंवा खालमानेने आपला जीव जगवत राहतात. केईम मध्ये आजही अरुणा शानभाग खितपत पडून, न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगते आहे आणि तिच्यावर अत्याचार करणारा मात्र त्याच्या वाटची जुजबी शिक्षा भोगून त्याचे प्रापंचिक आयुष्य व्यतीत करतो आहे. 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी स्त्रीकडे वाकडा डोळा करून बघणाऱ्या माणसास सज्जड शिक्षा होत असे. अमक्याने स्त्रीवर अत्याचार केला आहे हे सिद्ध झाल्यास त्याचे हात-पाय कलम केले जायचे. अपराध आणखी गंभीर असल्यास त्याला हत्तीच्या पायी दिले जात असे. पेशव्यांच्या काळीही अशा प्रकारच्या कठोर शिक्षांची अंमलबजावणी होत असे. तात्पर्य स्त्रीवर केला जाणारा अत्याचार हा अक्षम्य आणि दंडनीय होता. आजही अनेक आखाती देशांत स्त्रीवर केल्या जाणाऱ्या अत्याचाराला अतिशय कठोर शिक्षा सुनावली जाते. आपल्याकडे अत्याचाराचे गांभीर्य लक्षात न घेता शिक्षा सुनावल्या जातात, ज्या त्या अपराधाच्या तुलनेत अतिशय माफक स्वरूपाच्या असतात. अवघी काही वर्षे तुरुंगवास आणि मग सुटका! आरोप सिद्ध न झाल्यास विनासायास सुटका! आरोपी 'बडे बापका बेटा' असल्यास उलट अपराधाला बळी पडलेल्या तरुणीवरच चारित्र्यहिनतेचे शिंतोडे! 
शिक्षा अशी द्यायला हवी की ती शिक्षा बघून इतरांना जरब बसावयास हवी. शिक्षा अशी हवी की कुणी स्त्रीकडे वाकडी नजर करून बघण्याची हिम्मतच करणार नाही. मग तिच्या अंगाला हात लावण्याची गोष्ट तर दूरच राहिली! जोपर्यंत अशा कठोर शिक्षांची अंमलबजावणी या देशात होणार नाही तोपर्यंत येथील मुली आणि स्त्रिया कधीच सुरक्षित राहणार नाहीत. प्रत्येक पुरुषाने स्त्रीचा आणि तिच्या स्त्रीत्वाचा यथोचित आदर करायलाच हवा. वेडेवाकडे प्रश्न विचारून स्त्रीला अपमानित करणारे पोलिस, कोर्ट यांनीही योग्य मर्यादा पळून त्या स्त्रीबरोबर घडलेल्या घटनेची पडताळणी करायला हवी.  
शेवटी या पृथ्वीतलावरील प्रत्येक पुरुषाचे अस्तित्व स्त्रीमुळेच आहे हे लक्षात घेण्याची नितांत गरज आहे. 

Monday 17 December 2012

महिलांवरील वाढते अत्याचार- एक शोचनीय बाब


आपला देश प्रगतीपथावर आहे असे अभिमानाने गर्जून सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांची गांधारी झाली आहे काय असे खडसावून विचारण्याची पाळी आज आली आहे. जाणूनबुजून डोळ्यांवर झापडे लावून रस्तोरस्ती, गल्लोगल्ली, प्रांतोप्रांती चाललेल्या महिलांच्या शारीरिक शोषणाविरुद्ध मूग गिळून गप्प बसलेल्या या सरकारला गदागदा हलवून जागे करण्याची वेळ येउन ठेपली आहे. 
रस्त्यावर, बसमध्ये, ट्रेनमध्ये, शाळेमध्ये, हॉटेलमध्ये कुठेही राजरोस बलात्कार होत आहेत. अगदी चिमुकल्या बाळांपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत कुणीही या विकृत नराधमांच्या वासनेची शिकार होत आहेत. रस्त्यावरील छेडछाडीला तर अंतच नाही. कुठे 'acid हल्ला तर कुठे 'चाकू हल्ला'! कुणी प्रेमाला नकार दिला म्हणून तर कुणी छेडछाडीला विरोध केला म्हणून स्त्रीत्वावर सरळसरळ , बिनदिक्कत घाला घातला जात आहे. रोड रोमिओ, श्रीमंत बापजाद्यांची पोरे, प्रेमभंगाने माथेफिरू झालेले असे कोणीही सर्रास, कसलाही विधिनिषेध न बाळगता स्त्रियांच्या पदराला हात घालायला धजावत आहेत. नागरिकांच्या रक्षणासाठी वचनबद्ध असलेल्या शासकीय यंत्रणेसाठी ही खचितच शरमेची बाब आहे.   
आज स्वत:च्या पायांवर भक्कमपणे उभे राहून कुटुंबाचा भार वाहणाऱ्या अनेक महिला आहेत. नवऱ्याच्या  खांद्याला खांदा लावून सक्षमपणे आर्थिक जबाबदारी पेलणाऱ्या अनेकजणी आहेत. शिक्षणासाठी आपला प्रांत सोडून दुसऱ्या  प्रांतात जाऊन शिकणाऱ्या अनेक आहेत. रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्या आहेत. रात्रपाळी करणाऱ्या आहेत. निवृत्त जीवन जगत एकाकी राहणाऱ्या आहेत. आपल्या निष्पाप, चिमुकल्या डोळ्यांनी हे विश्व समजून घेण्याचा प्रयास करणाऱ्या आहेत. या महिला वेगवेगळ्या वयातील, आर्थिक व सामाजिक स्तरातील आहेत. या समस्त महिलांच्या संरक्षणाची हमी कोणी द्यायची? वेळी-अवेळी कामावरून घरी परतणाऱ्या महिलांच्या रक्षणाची जबाबदारी शासनाची नाही का? दिवसढवळ्या रस्त्यावर पुरुषी अत्याचाराला बळी पडणाऱ्या महिलांना योग्य ते संरक्षण मिळणे गैरवाजवी आहे का? 
आज एकविसाव्या शतकातही स्त्री मग ती कोणत्याही वयातील असो, एक उपभोग्य वस्तू म्हणूनच तिच्याकडे पहिले जाते. ज्या छोट्या बाळाकडे बघून ममत्वाशिवाय इतर कोणत्याही भावना निर्माण होऊ शकत नाहीत , त्या बालिका सुद्धा या लैंगिक शोषणाचे बळी ठरतात. जी वृद्ध महिला माता , आजी या संबोधनासाठी योग्य असते तिच्यावरही या विकृतीचे शिंतोडे उडाल्यावाचून राहत नाहीत. अशा राज्यात सारे काही आलबेल आहे असे म्हणायचे? अगदी विकलांग मुलीलासुद्धा या वासनेचे लक्ष्य केले जाते. हे सारे मानवी अधोगतीचे द्योतक नाही काय? 
फक्त खेड्यापाड्यात नव्हे तर शहरी भागातही या घटना आता नित्याच्या झाल्या आहेत. सामुहिक बलात्कार जिथेतिथे बोकाळला आहे. जर सकाळी हातात पेपर धरायला घ्यावा तर डझनावारी याच बातम्या लक्ष वेधून घेत ढेपाळलेली शासकीय सुरक्षितता अधोरेखित करत असतात. अत्याचाराला बळी पडलेली महिला मग लोकांच्या सहानुभूतीचा, दयेचा, उपेक्षेचा विषय होते. जणू काही ताठ मानेने जगण्याचा तिचा अधिकार संपुष्टातच येतो. तिचा व्यक्तिश: यत्किंचितही सहभाग नसलेल्या दुष्कृत्याची ती अनपेक्षित बळी ठरते आणि समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन गढूळ होतो. घरी-दारी असे अपमानास्पद जिणे असह्य झाल्याने मृत्यूला कवटाळण्याशिवाय त्या पिडीत स्त्रीकडे अन्य पर्यायच उरत नाही. जी मुलगी अथवा स्त्री आजवर एखाद्या कुटुंबाचा गौरव किंवा आधार ठरलेली असते ती स्त्री किंवा मुलगी या घटनेनंतर शारीरिक तसेच मानसिक आघाताने पुरती खचून जाते. मनोमन उध्वस्त होते. तिच्यासाठी सगळीच आपली वाटणारी माणसे परकी होऊ लागतात. जगण्यापेक्षा मरण सुकर वाटू लागते. 
अनेक पुरुषांची मानसिकता बदलण्याची आज नितांत गरज आहे. मी पुरुष आहे म्हणजे मी शारीरिक दृष्ट्या श्रेष्ठ आहे. मी काहीही करू शकतो. हा अहंगंड समूळ नष्ट झाला पाहिजे. पुरुष-स्त्री समानतेचे नारे देणारयांनी खरोखरीच अशी समानता लोकांच्या आचरणात आहे का हे तपासून पहिले पाहिजे. कोणत्याही मुलीवर,स्त्रीवर अत्याचार करणाऱ्याला सज्जड शिक्षा समाजाकडून वेळच्या वेळी दिली गेली पाहिजे. स्त्रीचा आदर करण्याचे बाळकडू पुरुषाला घरातूनच मिळाले पाहिजे. या देशात प्रत्येक मुलीला, स्त्रीला मानाने, सुरक्षिततेने जगण्याचा हक्क आहे आणि तो हक्क नाकारणाऱ्या कोणत्याही माणसास जबरदस्त शिक्षा व्हायला हवी. 
नाहीतर 'सारे जहांसे अच्छा हिंदोस्ता हमारा' असे गर्वाने स्वातंत्र्यदिनी म्हणणाऱ्या करोडो भारतवासीयांवर शरमेने मान खाली घालण्याची पाळी येईल. 

Friday 14 December 2012

ऑफिस आणि कुटुंब ........ एक कसरत




पूर्वीच्या काळी चाकरमानी संध्याकाळी सहाच्या सुमारास घरी परतायचे. संध्याकाळी सहानंतर बहुतांश ऑफिसेस ओस पडायची. दुपारी घरचा डबा आणि रात्री घरचे जेवण यामुळे तब्येत उत्तम रहायची. कामाचा अवाजवी ताण नव्हता. रेल्वेने येणे-जाणे आता इतके भीषण नव्हते. एकत्र कुटुंब असल्याने आपल्या मुलांना कोण बघेल याची क्षिती नसायची. सणासुदीला गावी जाण्यासाठी सुटी मिळायची. एकंदरीत घर आणि ऑफिस हे दोन्ही गड व्यवस्थित राखता यायचे. आता मात्र हे चित्र पूर्णत: बदलले आहे.  
सकाळी घर सोडायचे. तुडुंब भरलेल्या बसमधून अथवा ट्रेनमधून कसेबसे स्वत:ला गोळा करत ऑफिस गाठायचे. कामाचे ढीग हातावेगळे करत राहायचे. यायच्या वेळेची निश्चिती नाही. काम आणि काम. अवाजवी ताण. वेळ मिळालाच तर काहीतरी पोटात ढकलून भूक भागवायची. वरिष्ठांची बोलणी खायची. मनाविरुद्ध गॉसीप ऐकायच्या. प्रमोशनच्या जीवघेण्या लढाया लढायच्या. रात्री उशिरा घरी परतल्यानंतरही laptop उघडून ऑफिसचे काम करत बसायचे. कुटुंबातील सदस्यांशी प्रेमाच्या चार गोष्टी बोलायला वेळ नाही, त्यांची वास्तपुस्त करायला वेळ नाही. सुट्या आहेत पण घेता येत नाहीत अशी अवस्था! आजकाल जवळ जवळ प्रत्येक घराचे थोड्याबहुत फरकाने हेच चित्र आहे. 
बहुतेक ऑफिसेस वातानुकुलीत असतात. त्यामुळे सतत थंड हवा शरीरात झिरपत राहते. कोवळे ऊन अंगावर घ्यायला कुणाला सवड नसते. बहुतांश ऑफिसमध्ये व्हेंडिंग मशिन्स असतात, म्हणून अनेक जण नुसता सारखा चहा किंवा कॉफी ढोसत राहतात. घरून डबा आणणे काहींना कमी प्रतिष्ठेचे वाटते म्हणून मग जेवणाच्या वेळी शेजारील हॉटेलमधून पदार्थ ऑर्डर केले जातात. जंक फूड खाण्याकडे बहुतेकांचा कल असतो. पोळी-भाजी पेक्षा पिझ्झा खाणे प्रिफर केले जाते नव्हे प्रतिष्ठित समजले जाते. या उलट काहींना ऑर्डर करून खायलाही वेळ नसतो. ते चहा-कॉफी वर वेळ मारून नेतात. शरीराला योग्य ते अन्न वेळच्या वेळी न मिळाल्याने शरीर बंड करून उठतं. मग डोकेदुखी, acidity, बद्धकोष्ठ, मेदधिक्य अशा तक्रारी वाढू लागतात. झोपेचा कोटा पूर्ण न झाल्याने चेहऱ्यावर मरगळ येते, ग्लानी आल्यासारखे वाटते. सतत थंड वातावरणात वावरल्याने सर्दी-खोकला होत राहतो. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे रक्तदाबाची पातळी खाली-वर होऊ लागते, stress Diabetes उद्भवू शकतो.  
पैसे भरपूर मिळतात म्हणून खूप जण ओव्हरटाईम करतात. स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून असा भरपूर कमावलेला पैसा मग डॉक्टरांच्या औषधांवर रिता करावा लागतो. अव्यवस्थित खाणे-पिणे, अपुरी झोप, अनियमित शेड्युल, व्यायामाचा अभाव आणि कामाचे प्रेशर यामुळे शारीरिक आणि मानसिक तक्रारी वाढू लागतात. स्वभाव चिडचिडा होऊ लागतो. नवरा-बायको दोघे याच पद्धतीने काम करत असल्यास मुला-बाळांकडे पूर्ण दुर्लक्ष होते. त्यांना वेळ अजिबात देता येत नाही. मग याची भरपाई म्हणून एखादी मोठी सुट्टी घेऊन परदेशवारी केली जाते. मुले तात्पुरती खुश होतात. परंतु घरी आल्यानंतर पुन्हा तेच कंटाळवाणे रुटीन सुरु होते. मुलांना महागडे कपडे, खेळ, खाणे देऊन त्यांना आनंदित ठेवण्याचा प्रयत्न आई-वडील करत असतात. अधिक पैसे = अधिक सुख हे समीकरण त्याच्या डोक्यात फिट्ट बसलेले असते. 
मुले शिकतात, मोठी होतात. स्वत:च्या पायावर उभी राहतात आणि बघता बघता  परदेशात भुरकन उडून जातात. कारण तिथे त्यांना बक्कळ पैसा मिळणार असतो. पैसा हेच सर्वस्व हे त्यांच्या पालकांचेच ब्रीदवाक्य असते. उतरत्या वयाचे पालक वरकरणी परदेशी गेलेल्या मुलाच्या कौतुकात रमल्याचे दाखवत असले तरी आपली मुले म्हातारपणी आपल्या जवळ राहणार नाहीत याची खंत त्यांना मनोमन सतावत असते. जेव्हा मुलांना पालकांची खऱ्या अर्थाने गरज असते तेव्हा पालक उपलब्ध होऊ शकत नाहीत आणि जेव्हा वयस्कर मात्या-पित्यांना खऱ्या अर्थाने आधाराची गरज भासते तेव्हा मुले उपलब्ध होऊ शकत नाहीत. अर्थात याला अपवादही काही कुटुंबे असतातच! परंतु आई-वडील आणि मुले यांना एकमेकांचा पुरेसा सहवास न लाभणे, त्यांना एकमेकांशी संवाद साधता न येणे, आनंदात आणि दु:खात एकमेकांचा आधार न मिळणे ही स्थिती खचितच गौरवास्पद नाही.  
माणसाच्या गरजांना अंत नाही. माणसाच्या आकांक्षांना अंत नाही. माणसाच्या अभिलाषांना अंत नाही. पण निव्वळ जास्तीत जास्त पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी आपण कौटुंबिक सौख्याचा, जिव्हाळ्याचा,आपल्या स्वास्थ्याचा आणि कोमल नात्यांचा अंत तर करत नाही ना याचे भान प्रत्येकाने ठेवणे नितांत गरजेचे आहे. 
     

Sunday 25 November 2012

वेडेपणा .........



आयुष्यात एकदातरी वेडेपणा करावा 
आभाळभर चांदण्यांना हात लावून यावा 
नायगारयाच्या धबधब्यात हात धुवून घ्यावा 
आयफेलवरून एक पाय सहज खाली टाकावा 
गरुडाबरोबर उडण्याचा करार करावा 
सापाला पाठीमागून हळूच विळखा घालावा 
हृतिक रोशन समवेत पदन्यास करवा 
माधुरीचा हात एकदा अलवार हातात घ्यावा 
हिमालय हाताच्या मुठीत धरावा 
माध्यान्हीला 'मालकंस' गाऊन बघावा 
ओल्या मातीचा गंध कुपीत जपावा 
हरणांचा पाठलाग लीलया करावा 
ढगांचा कापूस दोन्ही हातांनी पिंजावा 
मावळता सूर्यरंग ओंजळीत घ्यावा 
सचिन, सौरव संगे 'ब्रेकफास्ट' करावा 
स्टेफी बरोबर गेमचा 'advantage' घ्यावा 
दूधसागर बशीने पिऊन टाकावा 
झाडांचा हिरवा वर्ख पांघरून घ्यावा 
वेडेपणाचा कळस असाच गाठावा 
अभ्यंतरी असू द्यावा अमृताचा ठेवा ...........

Friday 23 November 2012

फोटोशॉप २- एक कल्पक खेळ .............

मागील फोटोशॉपवरील ब्लॉगमध्ये आपण 'Animation' द्वारा अचल चित्रांना विविध प्रकारे गतिमान स्वरूप कसे देता येऊ शकते या विषयीचा अभ्यास केला होता. या प्रकरणातही त्याच प्रकारचा अभ्यास आपण करणार आहोत. माझ्या प्रस्तुत विषयाच्या पहिल्या ब्लॉगला चांगला प्रतिसाद मिळाल्याने मी याच विषयावरील दुसरा ब्लॉग लिहित आहे. 

वरील दृश्यात कारंज्यातील पाण्याला 'Animation' द्वारा गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे हे पाणी वाहते असल्याचा आभास मी निर्माण केला आहे.  ह्यात पाण्याचा फवारा 'सिलेक्ट' करून त्याचे रंगही बदलता येणे शक्य आहे. 

वरील चित्रात अंड्यापासून ते पूर्ण वाढ झालेल्या फुलपाखराच्या अवस्था दिसत आहेत. शालेय अभ्यासक्रमात अशा चलत प्रतिमांचा वापर करून मुलांना शास्त्रीय संकल्पना अधिक सोप्या रीतीने समजावून दिल्या जाऊ शकतात. 


वरील चित्रात जलचर प्राणी अर्थात मासे आणि कासव दृश्यमान झाले आहेत. पैकी मासे गतिमान आहेत. ते एकमेकांशी संवाद साधत आहेत. ह्यात कासवाला 'सिलेक्ट' करून त्यालाही गतिमान करता येणे शक्य आहे. जेणेकरून पाण्याखालील जीवसृष्टीतील हालचालीचा आभास निर्माण करता येऊ शकेल. 

वरील चित्रात अंगठीतील खड्याचे रंग बदलत आहेत. जेवढे रंग हवे आहेत तेवढे 'Layers' निर्माण करून प्रत्येक 'Layer' साठी आपल्या आवडीचा रंग वापरावा. बाकीचे काहीही बदलण्याची आवश्यकता नाही. 

वरील चित्रात 'Magnifying Glass' वेगवेगळ्या राज्यांवर सरकते आहे व ती ती राज्ये (States) 'Highlight' करीत आहे. या चित्राद्वारे मुलांनाही या देशातील आणि अवघ्या जगातील वेगवेगळ्या देश-प्रदेशांची माहिती घेणे खचितच आवडेल. भौगोलिक अभ्यासक्रमात अशा प्रकारच्या चलत स्लाईड्स द्वारा आकलनास उत्तम मदत होऊ शकेल असे मला वाटते. 


Wednesday 21 November 2012

क्षणभंगुर परि ऐसे जीवन ..........

उणापुरा तीस वर्षाचा तरुण काही एक दृश्य स्वरूपाचे कारण नसताना अचानक काही सेकंदात होत्याचा नव्हता होतो आणि समस्त जीवित जातीच्या क्षणभंगुरतेवर शिक्कामोर्तब होते.आदल्या दिवशी नातेवाईकांच्या, मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात मनसोक्त गप्पा मारणारा तरुण एकदम एकाएकी 'Pulmonary Cardiac Arrest' चा बळी ठरतो यावर मन विश्वास ठेवायला तयार होत नाही. तेही ऐन दिवाळीच्या दिवसांत आणि पाडव्याच्या दिवशी. लग्नाला जेमतेम दोन वर्षे पुरी होतात न होतात तोच बायकोला पाडव्याच्या दिवशी एवढी भीषण ओवाळणी मिळावी हा केवढा मोठा दैवदुर्विलास! सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसलेला आपला मुलगा, घरी-दारी आनंदाची उधळण करणारा आपला मुलगा, नियमित व्यायाम करणारा आपला मुलगा असा अचानक कसा गेला हे न पेलणारे आणि न सुटणारे कोडे घेऊनच आता वडील उर्वरित आयुष्य जगणार. तर नऊ मास पोटात वाढवून, संगोपन करून, सगळे लाड-कोड पुरवलेला  आपला मुलगा या जगातूनच निघून गेला या जाणीवेने माउली आजन्म अश्रू ढाळत राहणार. तिची व्यथा तर इतरांच्या जाणिवांच्या कक्षेत न बसणारी. ती अंतर्यामी उध्वस्त झालेली. ज्याला आपला मानला , नातिचरामी म्हणत ज्याच्या सोबतीने अग्नीभोवती सात फेरे घेतले, ज्याच्या साथीने आयुष्य सुंदर होण्याची स्वप्ने बघितली आणि ज्याचा हात प्रगाढ विश्वासाने हातात घेतला तो आपला हात सोडून न परतीच्या वाटेवर निघून गेला हा नुसता विचारही तिला भयानक ग्रासणारा. त्याच्या फक्त आठवणींवर आपले यापुढील आयुष्य कंठायचे ही तिच्या मनाला पदोपदी विदीर्ण करणारी जाणीव आणि आता सुख-दु:खाच्या वाटेवर यापुढे आपल्या सोबत तो नाही ही मनातील अंधार अधिक गहिरा करणारी जाणीव घेऊन तिने जगायचे नव्हे स्वत:ला जगवत ठेवायचे. नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्र-मैत्रिणी चार दिवसांपुरते. काही दिवसांनी आपापल्या व्यापात व्यस्त होणारे.  
 कसलेही व्यसन नसलेला माणूस एकाएकी दगावतो आणि वर्षानुवर्षे व्यसनांच्या आधीन असलेली माणसे क्वालिटी नसलेले जीवन जगत राहतात. धुम्रपान केल्याने कर्करोग होतो अशी भीती असते पण म्हणून प्रत्येक धुम्रपान करणारा कर्करोगाला बळी पडत नाही किंबहुना अनेक वर्षे जगतोही! व्यसने न केल्याबद्दलच्या शिक्षा मात्र अनेक लोक भोगत राहतात. निर्व्यसनी, मिताहारी, नियमितपणे जगणारा कुणी कधीही होत्याचा नव्हता होऊ शकतो. निर्व्यसनी आयुष्य अधिक नियमित आयुष्य म्हणजे प्रदीर्घ आयुष्य असे आयुष्याचे समीकरण खात्रीपूर्वक मांडता येत नाही. अपघात होऊ नये म्हणून आपण गाडी कितीही सावधपणे आणि नियमांचे उल्लंघन न करता चालवली तरी समोरून येणारे वाहन तुम्हाला तेवढेच सुरक्षित आयुष्य बहाल करेलच याची हमी देता येणे सर्वथैव अशक्य आहे. शंभर फुट दरीत कोसळलेल्या बसमधील एखादे लहानगे मूल शरीरावर कुठेही साधा ओरखडाही न येता जिवंत राहते आणि घराच्या घरी पेपर वाचताना माणसाचा अंत होतो. कोणत्याही शास्त्रीय मिमांसेच्या पलीकडील या गोष्टी आहेत. गतकाळात माणसाला हृदयविकाराचा झटका आला होता का तसेच आता आला आहे का हे 'ECG' या साधना मार्फत समजू शकते परंतु  ECG काढून बाहेर येताच माणूस दगावतो ही घटना सगळ्या वैद्यकीय शास्त्राची पाळेमुळे हादरवते. 
हे सगळे पहिले, ऐकले की जीवनाच्या क्षणभंगुरतेची प्रचीती येते. आपल्या योजना आणि 'त्याच्या' योजना नेहमीच 'coincide' होतात असे नाही. मनात रचलेले बेत आणि 'त्याचे' बेत यांची गोड युती होतेच असे नाही. आपल्या ललाटरेखेचे सामर्थ्य तोकडे ठरते. आपली संकुचित जाणीव त्या सर्वेश्वराच्या व्याप्तीला ओळखू शकत नाही. भविष्यात आपल्यापुढे कोणते फासे तो 'सर्वात्मक' टाकणार आहे आणि त्यात आपली पट तरुन जाण्याची शाश्वती किती हे गणित अनाकलनीय आहे. आणि म्हणूनच पैसा-अडका, दागिने, स्थावर-जंगम, मानमरातब, प्रतिष्ठा, खानदान या गोष्टी जरी मनुष्याला प्राप्य असल्या तरी ती जीवन समाप्त करणारी निर्णायक 'उल्का' कधी कशी आणि कोणावर कोसळेल याचा थांग लावणे ही समस्त मानवजातीच्या आवाक्याबाहेरील गोष्ट आहे हे आस्तिक-नास्तिक, प्रगत-अप्रगत, गरीब-श्रीमंत, उच्चभ्रू-सामान्य अशा प्रत्येकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.     

Sunday 11 November 2012

आली दिवाळी दिवाळी ............

घराघरांतून साफसफाई सुरु झाली, बेसनाचे खमंग वास दरवळू लागले की दिवाळी जवळ आल्याची चाहूल लागते. वेगवेगळ्या तऱ्हेचे कंदील, पणत्या यांनी रस्त्यावरील दुकाने सजू लागतात. वर्षभरात या देशात कितीही अप्रिय घटना घडल्या असू देत, दिवाळीची चाहूल लागताच घरी-दारी उत्साहाला उधाण येते. माणूस गरीब असो वा श्रीमंत, दिवाळीची खरेदी करण्यासाठी तो बाहेर पडतोच पडतो. 
पूर्वी दिवाळी आली की घराघरातून ठिपक्याच्या कागदाची, रांगोळीची, गेरूची देवाणघेवाण सुरु व्हायची. घरातील पोरसोरांपासून ते वयस्कर मंडळी कोणत्या ना कोणत्या कामात गुंतलेली असायची. चकलीचे सोरे, चकत्या, शंकरपाळ्याचे कातणे घरोघरी फिरवले जायचे. आज कोणाकडे कोणता फराळ केला जाणार आहे याची माहिती इतरांना असायची. रंगीबेरंगी आकाशकंदील, वेगवेगळ्या आकाराच्या पणत्या तसेच ग्लासातील दिवे यांनी चाळी, बिल्डिंगा  सुशोभित व्हायच्या. पाहुणे  येणार म्हणून खास पदार्थ केले जायचे, भेटवस्तू  तयार ठेवल्या जायच्या. नरक चतुर्दशीला घरोघरी दुष्ट शक्तींचा नाश करणारी प्रतीकात्मक चिबुडे फोडली जायची. त्यानंतर लक्ष्मी पूजन, पाडवा, भाऊबीज सारे काही यथासांग पार पडायचे.       
आजचे दिवाळीचे स्वरूप बरेच बदलले आहे. आज दिवाळीला बरीच घरे अंधारात असतात. कुटुंबेच्या कुटुंबे सुट्टीचा आनंद उपभोगण्यासाठी बाहेरगावी जातात. घरोघरी फराळ होतोच असे नाही. विकतचा फराळ आणला जातो. ठिपक्यांच्या रांगोळी ऐवजी साच्याची रांगोळी काढण्याकडे बायकांचा कल असतो. कंदिलाविना,  पणत्यांशिवाय  घरे भकास वाटतात. घरातील वर्दळ, पै -पाहुणे, बायकांची लगबग, पोरांचे फटाके लावणे यापासून आपण लांब जातो आहे असे वाटू लागते. ते दिवाळीच्या पहिल्या दिवशी अंगाला तेल-उटणे लावून आंघोळ करणे, नवे कोरे कपडे घालणे, देव-दर्शन घेणे, वडीलधारयांच्या  पाया पडणे, फटाके आणि फराळ यांचा आस्वाद घेणे कालबाह्य होत चालले आहे की काय असे वाटू लागते.  
आता दिवाळी आली की भव्य मॉल सजू लागतात. लोकही खरेदी करण्यासाठी मॉल अधिक प्रिफर करतात. मॉलमधील ऑफरनुसार स्वस्तातील गोष्टी मिळवण्यासाठी लोकांची एकच झुंबडगर्दी उडते. आयता फराळ, आयत्या भेटवस्तू, आकर्षक कपडे  यांनी मॉल फुलतात. ओवाळणीची ताटेसुद्धा रेडीमेड मिळतात. काही वेळेस आपापल्या सोयीनुसार पुढे-मागे  भाऊबीज साजरी केली जाते.  आजकाल बहिणींकडून भावांनाही महागड्या भेटी दिल्या जातात. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना बड्या हॉटेलमध्ये दिवाळी निमित्ताने खास मेजवान्या दिल्या जातात. 
कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांवर गदा आली ही चांगलीच गोष्ट आहे  पूर्वी फटाके भरपूर वाजायचे तेव्हा प्रदूषणाची कोणी पर्वा केली नाही पण आजकाल प्रदूषणाच्या नावाखाली काही घरात मुलांना फटाके वाजवू देत नाहीत. शोभेचे फटाकेही उडवू देत नाहीत. काही मुलांना फराळ घरी करता येतो हेही ठाऊक नसते. आपली संस्कृती टिकवणे आपल्याच हातात असते. ज्या गोष्टी वाईट किंवा हानिकारक आहेत त्या जरूर त्याज्य ठरवाव्यात परंतु चांगल्या गोष्टींचे जतनही जरूर करावे. माणसाला माणसाशी बांधून ठेवणाऱ्या गोष्टी आज दुर्मिळ होत चालल्या आहेत. दिवाळीच्या निमित्ताने जर माणसे एकत्र येत असतील, आनंदाची,सौख्याची देवाणघेवाण करत असतील तर तो धागा तरी घट्ट पकडून तरी माणसाला एकमेकांच्या साथीने पुढची वाटचाल नक्कीच सुकर करता येईल अन्यथा रोज झपाट्याने बदलत जाणाऱ्या जगात कोणत्याही आनंदाचे निमित्त माणसाला एकमेकाच्या जवळ आणू शकणार नाही अगदी दिवाळीही!  

Monday 29 October 2012

आधुनिक उखाणे.........

कालमानाप्रमाणे जुने विचार, जुनी संस्कृती, जुन्या परंपरा आता कालबाह्य होत चालल्या आहेत. जिथे तिथे आधुनिकतेचे फॅड बोकाळले आहे. झगमगाटाचा, झटपट श्रीमंतीचा सोस दिसामाशी वाढतो आहे.  या पार्श्वभूमीवर नव्या, आधुनिक विचारांची ओळख करून देणारे पुढील उखाणे.,,,,,,,,,,,,  


स्टीलचे ताट त्यात चांदीची वाटी 
आज ह्याच्या तर उद्या त्याच्या पाठी  

गाजराचा हलवा, शेवयांची खीर
तू गरीब म्हणून सात पावले मागे फिर................

श्रीखंडात चारोळी, दुधात केशर 
उगाच का घ्यायचे मी लग्नाचे प्रेशर............

उंची कपडे, परफ्युम, श्रीमंती थाट
म्हणून तर लग्नाचा घाटलाय घाट ..........

मूव्ही, पॉप टेट्स  सीसीडी, पिझ्झा हट 
वडिलांनी लावलीय नुसती लग्नाची कटकट ...............

जिरेसाळ भात त्यावर लोणकढे तूप
मला बाई आवडते मशरूम सूप................ 

नवी कोरी गाडी आणि देखणा छोकरा
महिन्याकाठी गाठते मी नवीन बकरा...........

घरीदारी लग्नाचे वाजताहेत पडघम
माझ्या मनात पळण्याचे विचार आहेत जानम.......... 

कमावलेली बॉडी आणि सेक्सी स्टाईल 
कधी दिसेल मला माझा हिरो साहिल............

दिव्यादिव्यांनी उजळला कोपरा
Date, Long-drive बेत आता फिक्स करा............ 

समर्थ म्हणाले, 'शुभमंगल सावधान'
नको करूया लग्न राखू त्यांचा मान.............

रोयालचा पेंट आणि वाघबकरी चहा
कांदेपोहे खा आणि मुलगी पहा...................

गोडात गोड पाकातले चिरोटे 
असे कसे निपजले आपलेच कारटे?...........

ज्याचा असेल गाडी-बंगल्याचा व्याप 
तोच होईल माझ्या बाळाचा बाप...........

चॉकलेट कुकी आणि आईसक्रीम, डोनट 
श्रीमंत होण्याचा शोधूया 'shortcut'...............

माधुरीच्या साड्या आणि सलमानचे नखरे
आई-वडील करतील माझ्या स्वप्नांचे खोबरे..........

Blackberry, iPad, laptop, notebook
नवरा माझा असावा नामवंत 'cook'...........

उंची सूट, फाइव्ह स्टार, फंकी ज्वेलरी 
तोच असेल माझ्या स्वप्नांचा मानकरी.................. 

ताटाभोवती काढली महिरप नक्षीदार 
 पगार असावा रग्गड, दिसणे जरी सुमार.................

अंगणात माझ्या दरवळतो पारिजात
परदेशी वरासाठी केली मी यातायात ..................

सनई-चौघडे, फटाके, वरात 
इतर 'दारात', MBA 'घरात'...........


हॉलिडे डेस्टीनेशन, हनिमून, lingerie 
Attractive package - Thomas Cook/Strawberry...........   




Friday 19 October 2012

टाळ-मृदुंग दक्षिणेकडे, माझे गाणे पश्चिमेकडे ............

शालान्त परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी जसे 'D'- group चे म्हणजेच 'higher difficulty level' असलेले प्रश्न असतात तसेच ज्येष्ठ संगीतकार कै.श्रीनिवास खळ्यांनी स्वरबद्ध केलेले 'काळ देहासी आला खाऊ' हे गाणे आहे. लयकारीवर उत्तम प्रभुत्व असल्याखेरीज हे गाणे पेलता येणे सर्वस्वी अशक्य आहे. तशा खळ्यांच्या बहुतांश रचना या संगीत शिकणाऱ्यासाठी किंवा संगीत शिकलेल्यांसाठीही 'D'- group च्या category मध्येच जमा असतात.
नुसते सूर घोटले आणि गाणे जमले असे त्यांच्या रचना गाताना होत नाही. 'या चिमण्यांनो', नीज माझ्या नंदलाला', 'पाण्यातले पहाता', 'जाहल्या काही चुका', 'अगा करुणाकरा', 'भेटी लागे जीवा', 'श्रावणात घननिळा' अशी कोणतीही गाणी घ्या ह्यात 'distinction' मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे क्रमप्राप्त होते. या गाण्यांना हात घालण्याआधी  सूर-ताल-लयीचा आपल्या डोक्यावरील हात तपासून पाहणे अत्यावश्यक असते. 
त्यांची सुरांची 'permutations आणि combinations' इतकी अनवट असतात की सूर-ताल-लयीची माहिती अपुरी असेल तर अंधाऱ्या गुहेत भरकटण्याची पाळी येऊ शकते. ही सुरांची जीवघेणी मिश्रणे थोडी बहुत गाता आली तरी त्यांच्या रचना अंशाने तरी गाऊ शकल्याचे समाधान मिळते.  
'सारेगमप' ह्या सांगीतिक स्पर्धात्मक कार्यक्रमात वयाने लहान असलेल्या ( पण सांगितिक वय मोठे असलेल्या) प्रथमेश लघाटेने  'काळ देहासी' हे गाणे उत्कृष्टरित्या सादर करून पं.हृदयनाथ मंगेशकरांना आश्चर्यमुग्ध केले होते. ह्या गाण्याचे मूळ गायक श्री.सुरेश वाडकर हे आहेत. सुरांचा अनुपमेय साठा त्यांच्या गळ्यात आहे. लय-तालावर मांड आहे. त्यामुळे या गाण्याला त्यांनी अतिशय योग्य असा न्याय दिला आहे याबद्दल कोणाचेही दुमत असायचे कारण नाही. 
पण मला खरे कौतुक वाटते ते स्वप्नील बांदोडकर या गुणी गायकाचे! 'अंतर्नाद' या खळे यांच्या रचनांवरील कार्यक्रमात हे गाणे स्वप्नीलने ज्या पद्धतीने सादर केले त्याला तोड नाही. मूळ गाण्यात नसलेल्या सूक्ष्म जागा-हरकती त्याने ज्या खुबीने आणि ताकदीने गायल्या आहेत त्याबद्दल तो नि:संशय प्रशंसेस पात्र आहे. श्री.सुरेश वाडकरांच्या तालमीत तयार झालेल्या त्याच्या गळ्यातून हे गाणे सालंकृत होऊन श्रोतृहृदयी उतरले आणि खळे काकांनीही त्याला प्रसन्नपणे दाद दिली. ज्या आनंदाने स्वप्नील लयीचा लुथ्फ घेत गात होता आणि पखवाजावर श्री निलेश परब यांनी त्याला जी तेवढीच उत्कृष्ट साथ केली त्याबद्दल त्या दोघांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.  
ज्याप्रमाणे गांडीव धनुष्य पेलण्यासाठी धनुर्धर अर्जुनासारखे समर्थ बाहू लागतात त्याचप्रमाणे खळे काकांची गाणी पेलण्यासाठी तितकाच समर्थ गळा लागतो. पश्चिमेकडे म्हणजेच मुक्तीच्या दिशेने मार्गक्रमणा करणारे स्वप्नीलचे गाणे आहे. ही जन्मांतरीची ठेव त्याने जतन करावी, वाढवावी आणि अशीच गाणी गात श्रोत्यांची हृदये जिंकावीत. 
( 'अंतर्नाद' हा   जुना कार्यक्रम आहे. मी अनेकवेळा स्वप्नीलचे हे गाणे ऐकले. प्रत्येकवेळी याविषयी लिहीवेसे वाटत होते परंतु ते जमले नाही. म्हणून उशिराने का होईना मी याविषयी लिहायचे ठरवले. माझ्या १५० व्या ब्लॉगच्या निमित्ताने मी हा लेख लिहिते आहे.) 


Thursday 18 October 2012

प्रणाम (कविता)



जगातील साऱ्या सुंदरतेला आणि साऱ्या गलिच्छतेला माझा प्रणाम 
जगातील साऱ्या सुबुद्धतेला आणि साऱ्या निर्बुद्धतेला माझा प्रणाम 
लताच्या अलौकिक स्वराला माझा प्रणाम 
लाचार जोडलेल्या करालाही माझा प्रणाम
रवीशंकरच्या सतारीवर लीलया फिरणाऱ्या बोटांना माझा प्रणाम
एका हातातून दुसऱ्या हातात लीलया सरकणाऱ्या नोटांनाही माझा प्रणाम 
नेपोलियनच्या शौर्याला माझा प्रणाम
हिटलरच्या क्रौर्यालाही माझा प्रणाम
तेंडुलकरच्या खेळाला माझा प्रणाम
राजकारण्यांच्या खेळालाही माझा प्रणाम
नाटकांवर पोट भरणाऱ्यांना प्रणाम
पोटासाठी नाटके करणाऱ्यांनाही प्रणाम
कर्णाच्या दातृत्वाला माझा प्रणाम
वांझोट्या मातृत्वालाही माझा प्रणाम
पुलंच्या विद्वत्तेला माझा प्रणाम
निर्बुद्धांहाती आलेल्या सत्तेलाही माझा प्रणाम
सागराच्या खळखळण्याला माझा प्रणाम
गांडूळाच्या वळवळण्यालाही माझा प्रणाम
निखालस सत्याला माझा प्रणाम
पोलिसी हप्त्यालाही माझा प्रणाम
सुबक दिमाखदार ऐश्वर्याला माझा प्रणाम
ओंगळ नागव्या दारिद्य्रालाही माझा प्रणाम
सुजाण सकस समंजसपणाला माझा प्रणाम
 निरस, निकस अनभिज्ञतेलाही माझा प्रणाम 
प्रणाम! प्रणाम! प्रणाम! त्रिवार प्रणाम!
माणसातला माणूस जिवंत ठेवणाऱ्या 
प्रत्येक भाबड्या आशावादाला माझा प्रणाम!

  

Wednesday 17 October 2012

इंग्लिश विंग्लिश - एक नितांत सुंदर चित्रपट

अशक्यकोटीतील गोष्टी करून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे, लाखो-करोडो रुपयांचा चुराडा करून चांगल्या वाहनांचे क्रियाकर्म करणारे, मनोरंजनाच्या गोंडस नावाखाली अत्यंत टुकार आणि खालच्या दर्जाचे विनोद दाखवणारे चित्रपट पुन्हा पुन्हा जन्माला येतच असतात परंतु अशा चित्रपटांतील कथानकात 'जीव' नावाची वस्तूच नसते. या अशा चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर नव्याने बॉक्स ऑफिसवर झळकलेला 'इंग्लिश विंग्लिश' हा चित्रपट असे कोणतेही नेत्रदीपक खेळ न करताही प्रेक्षकांची मने काबीज करण्यात यशस्वी झाला आहे. 
हा स्त्री-प्रधान चित्रपट आहे. या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मध्यमवयीन स्त्रीची आहे. ज्या स्त्रीचे संपूर्ण विश्व हे तिच्या पतीराजांभोवती आणि मुलांभोवती फिरत असते. स्त्रीला कमी समजणे हा भारतातील राष्ट्रीय छंद आहे असे मानण्यास हरकत नसावी. काही स्त्रियाही आपल्या अज्ञानपूर्ण वागणुकीने हा समज फोफावण्यासाठी हातभार लावीत असतात. तर अशा कुटुंबातील या गृहिणीचा एकमेव छंद असतो म्हणा किंवा तिला आवड असते म्हणा ती लाडू बनविण्याची! घराच्या घरी लाडूंचे उत्पादन करून ते घरोघरी विकणे हा तिचा गृहोद्योग असतो. या गृहिणीची कमतरता कोणती असेल तर ती म्हणजे सफाईदार इंग्लिश न बोलता येणे.या तिच्यातील उणीवेमुळे अनेकदा ती घरच्यांच्या विनोदाचा, चेष्टेचा विषय ठरते. तिच्या अडाणीपणाला, इंग्रजीच्या अज्ञानाला नवरा हसतो आणि मुलेही हसतात. तिच्या मुलीला आईला शाळेत नेण्याची लाज वाटते. अशा या गृहिणीला एकटीला कारणपरत्वे न्यूयॉर्कला जावे लागते आणि सुरवातीला तेथील वातावरणाला घाबरलेली, बुजलेली ती काही दिवसांनी मोकळी होते. काही कडवट अनुभव पचवत ती स्वत:ला सिद्ध करते आणि घरच्यांच्या कुतूहलाचा आणि आदराचा विषय होते.  
विषय स्त्री-प्रधान, या चित्रपटाची दिग्दर्शिका सुद्धा एक स्त्रीच आहे. अतिशय संवेदनशील पद्धतीने या चित्रपटाची हाताळणी झालेली आहे. शशी गोडबोले नावाच्या एका मध्यमवर्गीय, अत्यंत साधे आयुष्य जगणाऱ्या या स्त्रीचा हा प्रवास अतिशय प्रशंसनीयरित्या गौरी शिंदे यांनी दाखविला आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. श्रीदेवीनेही या भूमिकेला यथोचित न्याय दिला आहे. तिचा या चित्रपटातील प्रत्येक 'फ्रेम' मधील वावर आणि तिच्या साध्या पण सुंदर साड्या ही या चित्रपटाची सौदर्यस्थळे आहेत. चित्रपटातील सर्वांची कामे अत्यंत चोख आहेत. कोठेही 'लुपहोल्स' जाणवत नाहीत. आपल्या आईला इतर आयांसारखे इंग्लिश बोलता येत नाही म्हणून तिला कमी लेखणे, तिचा राग करणे, तिचा आदर न करणे इ. गोष्टी हृदयाला भिडतात. नवीन नवीन इंग्लिश शब्द शिकताना, वाक्ये जुळवताना, ऐकताना हळूहळू शशीचा आत्मविश्वास दुणावू लागतो आणि तिच्या भाचीच्या लग्न-समारंभात एक छोटेखानी परंतु अतिशय हृद्य असे भाषण करते. पतीचे प्रेम मिळूनही ज्या आदराला ती आतापर्यंत मुकलेली असते तो आदर, ते कौतुक ती अखेर पतीच्या डोळ्यांत पाहते आणि इथे चित्रपट संपतो.  
अगदी छोट्या छोट्या 'फ्रेम्स' मधूनही मानवी स्वभाव वैशिष्ट्ये दाखवण्याचे गौरीचे कसब वाखाणण्यासारखे आहे. कोणतेही भव्य-दिव्य सेट्स न वापरता, अंगावर येणारे श्रीमंती थाट न दाखवता अगदी साधेपणाने या विषयाची मांडणी केली गेली आहे. अनेक वर्षांनी एक निखळ चांगला चित्रपट बघितल्याचे समाधान माझ्या मनाला मिळाले. याबद्दल या चित्रपटाच्या अस्तित्वासाठी  कारण ठरलेल्या प्रत्येकाचेच मनापासून आभार!  प्रत्येकाने आवर्जून पाहावा आणि त्यापासून बोध घ्यावा असा हा चित्रपट आहे यात शंका नाही.      

Thursday 27 September 2012

जीवेत शरद: शतम !

लताचा आवाज ही कालमानाच्या अथवा वयाच्या संकल्पनेत बसणारी गोष्टच नव्हे.  निर्गुण, निराकार शक्तिसारखा तिचा आवाज हा सर्वव्यापी आहे. आजवर अनेकांनी लताविषयी भरभरून लिहिले आहे. तिला आकंठ ऐकले आहे. तरीही तिच्याविषयी खूप काही लिहावेसे, बोलावेसे वाटते. तिचा मंजुळ, नितळ, अनुपमेय स्वर कानात साठवण्यासाठी मन आपसूक आतुर होते. तिच्या स्वरातील अध्यात्म पुन्हा पुन्हा अनुभवावेसे वाटत राहते.   
तिच्या शरीराला वयाची मर्यादा असली तरी तिचा आवाज हा चिरंजीव, चिरंतन आहे. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी तिचा आवाज हे एक मूर्तिमंत चैतन्य आहे. विरहात पोळलेल्या प्रेमीजनांसाठी तिचा आवाज हे एक मृदुल मलम आहे. भक्तिरसात बुडालेल्यांसाठी तिचा आवाज ही एक योगसाधना आहे. इतका चतुरस्त्र आवाका असलेला हा अलौकिक स्वर आज अजून एका वर्षाने वृद्धिंगत होतो आहे.
लता हा कानसेनांच्या हृदयात फुलणारा बारमाही वसंत आहे. इथे शिशिराची पानगळ औषधालाही नाही.  
किती संगीतकारांसाठी लता गायली? किती संगीतकार तिच्या आवाजातील सौदर्य सर्वदूर पसरवण्यासाठी जन्माला आले? सांगणे मुश्कील आहे. ती जीव ओतून गायली. रात्रीचा दिवस करून गायली. एका चहाच्या कपावर तिने अनेक गाण्यांचे सौदर्य सशक्तपणे तोलून धरले. पोटाला बसणारे चिमटे तिच्या गाण्याला अधिकाधिक परिपक्व, सक्षम आणि दृढ करत गेले. 'पिकोलो' जातीच्या तिच्या आवाजाने अवघ्या दुनियेलाच भ्रमिष्ट केले. जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी तिच्या आवाजाचे सान्निध्य रसिकाला सुखावू लागले. संसार तापाने शिणलेल्या, श्रमलेल्या लाखो-करोडो जनतेसाठी तिचा आवाज ही एक हमखास दवा झाली.  
तिला कधीच अहोजाहो करावेसे वाटत नाही. तिच्या बाबतीत लौकिक उपचार पाळावेसे वाटत नाहीत. तिने आपल्या कानाद्वारे हृदयाचा कप्पा कधीच काबीज करून त्यात कायमची वसाहत केली आहे. आता जी व्यक्ती इतकी जवळची आहे तिला संबोधताना अहोजाहो काय करायचे? ती आमचे आदरस्थान आहे यात शंका नाही पण तिला आदरार्थी संबोधून आम्हाला तिला परके करायचे नाही. तिचा खडीसाखरेसारखा गोड आवाज सदैव आमच्या भोवती रुंजी घालत राहतो. तिची छोटीशी मूर्ती, दुसऱ्या खांद्यावरून ओढून घेतलेला पदर, तिचे आदबशीर, सौजन्यपूर्ण वागणे, तिच्या डोळ्यांतील मिश्कील छटा, तिचे चांदणहास्य हे सगळे अंत:करणात अनेक वर्षांपासून साठलेले आहे. 
कै.कल्पना चावला आणि सुनिता विल्यम्स यांनी अंतराळात भरारी मारण्याआधीच लताच्या आवाजाने गगनाला गवसणी घातली आहे. अशी विश्वव्याप्त गोष्ट ही प्रत्येकाच्या मनाच्या गाभाऱ्यात नेहमीच निष्ठापूर्वक पूजली जाते. तिच्या 'मीरा भजनांनी' अनेकदा अतींद्रिय अनुभूती दिलेली आहे. ही एका अंशीही अतिशयोक्ती नाही. तिच्या प्रेमागीतांवर अनेक प्रेमींनी आपले सूर जुळवले आहेत.  तिच्या 'जा रे जा रे उड जा रे पंछी' या गाण्याने अनेक विरहीजनांची हृदये विद्ध झाली आहेत. तिच्या 'ओ सजना बरखा बहार आयी' या गीतातील गोडवा आजही रत्तीभरही कमी झालेला नाही. 'रैना बीती जाये', 'बैय्या ना धरो', 'ये जिंदगी उसी की है', 'मोहे पनघट पे', 'जाग दर्दे इश्क जाग', जिया लागे ना', 'मनमोहना बडे झुठे', 'सावरे सावरे' या आणि अशा असंख्य गाण्यांची आपण जन्मोजन्मीची गुलामी पत्करलेली आहे. 
संत तुकारामांच्या अभंगातील आर्त लता आपल्याला अंतर्मुख करून गेली आहे. 'भेटी लागे जीवा', 'कमोदिनी काय जाणे', अगा करुणाकरा' ही लताची साद शब्दातीत आहे. तसेच 'पैल तोगे काऊ कोकताहे', 'ओम नमोजी आद्या, 'घनु वाजे घुणघुणा' हे ज्ञानेश्वारांचे लताने गायलेले अभंग ही भक्तीरसाचे सेवन करणाऱ्यांसाठी एक आनंदपर्वणी आहे. 'सुंदर ते ध्यान उभे विटेवरी' हा अभंग ऐकताना त्या सगुण स्वरूपपलीकडील अगाध सौदर्याची प्रचीती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. 
मदन मोहनने तिच्याकडून गाऊन घेतलेल्या गझलांमधील लुथ्फ ठायी ठायी जाणवत राहतो. 'आपकी नजरोने समझा', 'है इसिमे प्यारकी आबरू, 'यु हसरतों के दाग' या आणि अशा कैक गझला आपल्या मनावर आजही गारुड करून आहेत. अनिल विश्वास, खेमचंद प्रकाश, नौशाद, शंकर-जयकिशन, सलील चौधरी, एस.डी, आर.डी बर्मन, जयदेव, मदन मोहन, सज्जाद, सी.रामचंद्र अशा अनेक संगीतकारांनी लताच्या आवाजात आपल्या रचना अजरामर केल्या किंवा अशा अलौकिक प्रतिभावंत संगीतकारांच्या रचनांतून लता आपल्या काळजात कायमची रुतली आहे. 
तिच्या विषयी किती लिहावं हेच समजत नाही. लता हा एक अजोड ग्रंथ आहे जो कधीच आत्मसात झालेला आहे. पण आपल्या श्रावणशक्तीनुसार तिला कितीही ग्रहण केली तरी ती दशांगुळे उरतेच! हेच तिच्या आवाजाचे खरे मर्म आहे.
अशा या श्रोत्यांच्या कानाला भरभरून तृप्त करणाऱ्या अनमोल आवाजातील माधुर्य कधीही लुप्त न होवो हीच लताच्या वाढदिवशी त्या जगनियंत्याच्या चरणी प्रार्थना! 

Sunday 23 September 2012

रेल्वे स्टेशन आणि मी ........

आज माझा दादरला कवितांचा कार्यक्रम होता तोही दोन ठिकाणी. मी लगबगीने घरातील सारी कामे आवरली आणि निघण्याची तयारी करू लागले. जरा लवकरच निघायला हवे, मी मनाशी म्हटले. इथून बस किंवा रिक्षा जी काही आधी मिळेल ती पकडायला हवी. रिकामी रिक्षा अडवण्यासाठी लोक रस्ताभर पसरलेले असणार. आपल्या भाग्यात रिक्षा येण्यासाठी आपल्याला घरापासून किमान दहा-पंधरा मिनिटे चालावे लागणार. त्यापेक्षा बसचा ऑप्शन बरा. तिथे जाऊन भल्या मोठ्या रांगेत उभे राहायचे. समोर तीन-चार रिकाम्या बसेस दृष्टीला दिसणार. पण त्यापैकी आपल्याला हव्या त्या बसला गतिमान करणारा बसचालक चहा पीत सहकाऱ्यांशी गप्पा मारत असणार. माझ्यासारखेच अनेक उतारू या दृश्याला विलक्षण असहायतेने डोळ्यांत साठवत बसणार. मग काही वेळाने त्याच्या शेड्युलप्रमाणे तो रमत गमत बसच्या दिशेने जाणार. आपण रांगेत अगदी शेवटी असल्याने बसणे सोडून द्या पण उभ्याने तरी जाता येईल काय याची चिंता करत राहणार. या सगळ्या सव्य-पसव्व्याचा हिशेब करत बऱ्याच अगोदर मी घरातून निघाले.  
मी घरापासून बस stop च्या दिशेने चालू लागले. पण अहोभाग्य ! एका उतारूला पोहोचवून एक रिक्षा परत येत होती. मी हावऱ्यासारखी रिक्षा झडप घालून पकडली आणि ती रिक्षा पकडायला आलेल्या काही लोकांकडे विजयी मुद्रेने पाहत मी ठाणे स्टेशनाच्या दिशेने निघाले. मी भलतीच खूष होते. गाडीही अशीच पटकन मिळावी अशी मनोमन प्रार्थना करत होते. मी रिक्षातून उतरले. रिक्षावाल्याकडे चक्क सुटे पैसे होते जे त्याने मला अजिबात न कुरकुरता दिले. रिक्षाचा पल्ला मी आज सर केला होता. मी स्टेशनात शिरले. पर्समध्ये CVM कुपन्स होती. स्टेशनवरील यंत्राने साथ दिली तर त्यांच्यावर शिक्क्याचे संस्कार होणार होते. मी साशंक मनाने त्या यंत्राशेजारी गेले आणि माझी कुपन्स पंच झाली. मला गहिवरून आल्यासारखे वाटले. मी एकवार सभोवार नजर फिरवली  आणि माझ्या लक्षात आले की स्टेशन आमुलाग्र बदलले आहे. मी माझ्याच नादात असल्याने माझे लक्ष इतर कुठे गेलेच नव्हते. तिकीटाची रांग भराभर पुढे सरकत होती. आजूबाजूला भिकारी औषधालाही दिसत नव्हते. पान खाऊन पचापच थुंकण्याच्या अमूल्य खुणा जमिनीवर कुठेच दिसत नव्हत्या. लोकांच्या चेहऱ्यावर हास्य होते. तिकीट देणारेही शांत आणि समाधानी चेहऱ्याने तिकिटांचे वाटप करत होते. आरडाओरड नाही, गोंधळ नाही, शिवीगाळ नाही सारे कसे शांत, निवांत, सुरळीत चालले होते. कोणीही तिकिटांच्या रांगेत घुसत नव्हते. तिकीट काउंटर वरील कर्मचारी चहा पिण्यासाठी म्हणूनही गायब होत नव्हते. उखडलेल्या फरश्या, पाण्याची थारोळी, कचरापट्टी काही काही म्हणून दृष्टीपथात येत नव्हते. फेरीवाले, भाजीवाले अदृश्य झाले होते. या अनोळखी वातावरणामुळे मी विलक्षण भांबावले. सुन्न झाले. इतक्यात काही हवंय का आपल्याला? अशी गोड आवाजात पृच्छा झाली. मी झटकन वळून पहिले तरं एक महिला कर्मचारी मला मदत करण्यासाठी म्हणून तत्परतेने उभी होती. दादरला जाणारी गाडी कोणत्या फलाटावर लागेल? मुळात एकामागोमाग एक अशा अविश्वसनीय गोष्टी घडल्याने हे रेल्वे स्टेशन आहे यावरील माझा विश्वास डळमळीत झाला होता. त्यामुळे आपण ज्या भूमीवर उभे आहोत ती रेल्वेच्या मालकीची आहे की नाही किंवा या ठिकाणाला नक्की काय म्हणतात हेच लक्षात येत नव्हते. अहो एक, तीन अथवा चार नंबरच्या फलाटावर जा तिथे तुम्हाला इच्छित गाडी मिळेल, फास्ट लोकल हवी असेल तरं सहा नंबरवर जा. गुड डे. ती सुहासिनी, मधुरभाषिणी  इतर भगिनींना मदत करण्यासाठी पुढे गेली. 
रेल्वे प्रशासन एकाएकी इतके पराकोटीचे कसे सुधारले हे मी ह्याची देही, ह्याची डोळा अचंबित होऊन पाहत होते. फलाटावर कोणतीही अनावश्यक गडबड नव्हती. चाकरमानी समाधानी, चिंतामुक्त दिसत होते. कॉलेजकुमारांच्या आणि कुमारींच्या घोळक्यातून वार्तालाप होत होते, हास्याचे फवारे उडत होते. फलाट विलक्षण स्वच्छ दिसत होते. चकचकीत पोलिश केलेल्या बुटासारखे! येणाऱ्या गाडीची अनाउन्समेंट वेळेवर होत होती. ती गाडी नेमकी कोणत्या फलाटावर येणार आहे ही पूर्वसूचना मिळाल्याने प्रवाशांची धावपळ वाचत होती. मी सी.एस.टी कडे जाणारी गाडी पकडली. गाडीत चढताना जराही धक्काबुक्की झाली नाही. मुळात गाड्या वेळेवर असल्याने चढण्यासाठी फारशी गर्दी नव्हतीच. मला सकाळच्या गाडीत विनासायास विंडो सीट मिळाली. मी आनंदाने रडण्याच्या बेतात होते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गाडीत बसल्यानंतर एकदाही नाक धरायला लागले नाही. भाजी, मासळी, कचरा किंवा विष्ठा यांचा मागमूसही नसल्या कारणाने 'क्षण आला भाग्याचा' असे मोठ्याने म्हणावेसे वाटत होते. गाडीच्या पृष्ठभागावर पान खाऊन पिचकाऱ्या मारल्याची भारतीय संस्कृतीला साजेशी अभिमानास्पद चिन्हे नव्हती. आज रेल्वे स्टेशनात आल्यापासून नुसता सुखाचा वर्षाव होत होता. प्रत्येक स्टेशनावर चढता-उतरताना करावी लागणारी जीवघेणी कसरत आज दिसतच नव्हती. जेमतेम काही प्रवासी चढत होते तरं काही उतरत होते. तेही एकमेकांना दाक्षिण्य दाखवून. या सुखाच्या परमावधीचा अनुभव डोळ्यांत साठवत आणि  गाणे गुणगुणत मी दादरला सुखनैव उतरले. माझी न सुटलेली साडी, न विस्कटलेले केस आणि न घामेजलेला चेहरा हे माझ्या सुखाचे भांडवल होते. 
इतक्यात आई ऊठ , आई ऊठ अशा परिचित हाका मला ऐकू आल्या. आज तुझा दादरला कार्यक्रम आहे ना ? मग लवकर निघायला हवं तुला. माझी लेक मला जागं करित होती.    

Thursday 13 September 2012

पांडू


मुळात मी पाळीव प्राण्यांची शौकीन नाही. मला प्राणी पाहायला आवडतात पण दुरूनच! कुत्री-मांजरी हे सर्रास घरात वावरणारे प्राणी. माझ्या लहानपणी माझ्या मनात कुत्र्यांविषयी प्रचंड भीती होती. रस्त्यावरून चालताना गल्लीतली कुत्री एकाएकी भुंकायला लागली की मी माझ्या बाबांचा हात खूप घट्ट धरत असे. जणू काय ही सर्व कुत्री आता माझ्यावर चाल करून येणार आहेत असा माझा एकूण अविर्भाव असायचा. माझे बाबा कुत्र्यांना गोंजारायचे, त्यांचे लाड करायचे पण माझी आत्या मात्र गल्लीच्या दुसऱ्या टोकाला एक जरी कुत्रं दिसलं की 'हायपर' व्हायची. माझ्या बाबांचे मित्र विजय खातू यांच्याकडे चार-पाच कुत्री होती. गणपतीला त्यांच्याकडे आवर्जून बोलावणे असायचे. मी खूप टाळाटाळ करायची पण बाबांपुढे माझे काही चालायचे नाही. त्याच्या घरी गेल्यावर आधी श्वान-दर्शन आणि मग गणपती-दर्शन! गणपती भोवतीची त्यांनी केलेली सुंदर आरास मी कधीच नीट पाहू शकले नाही कारण सगळे लक्ष त्या कुत्र्यांकडे असायचे. ती कोणत्याही कारणाने भुंकू लागली की मला धडधडायला लागायचे. या कारणामुळे कुत्रा या प्राण्यापासून मी सदैव चार हात लांबच राहिले. 
कालमानाप्रमाणे माझे वय वाढले तरीही घरच्या किंवा दारच्या कुत्र्यांची भीती तशीच अबाधित राहिली. समोरून कुत्रं दिसलं की माझा रस्ता बदलत असे. कुत्रांच्या वेगवेगळ्या जातीबद्दलही मला जराही औत्सुक्य नसे. माझ्या सुरतेच्या आत्याचे घर हे कुत्र्या-मांजरांना आंदण दिल्यासारखेच होते. कुठल्या ना कुठल्यातरी प्राण्याचा तिच्या घरात हमखास वावर! तिच्या घरातील कुत्र्यांच्या सवयींविषयी ती भरभरून बोलत असे. त्यांचे अमाप लाड ती करत असे. प्रसंगी त्यांना औषधोपचारही ती करायची. तिच्या घरी तिची लाडकी लंगडी कुत्री तिच्या बेडवर ऐसपैस पहुडलेली आणि आत्या मात्र खाली गादी घालून झोपलेली असे दृश्य अनेकदा दिसायचे. त्यावरून आम्ही तिची भरपूर चेष्टाही करायचो. पण तेव्हाही मला या प्राण्याचे कधीच आकर्षण वाटले नाही. 
मात्र पांडू माझ्या आयुष्यात आला आणि मी बदलले. हा माझ्या घरचा पाळीव कुत्रा नव्हे तर आम्ही राहतो त्या इमारतीच्या जवळ वावरणारा, एका पायाने किंचित अधू असलेला कुत्रा. पावसाळ्यात याचे बस्तान आमच्या इमारतीतच असते. Labrador जातीचा हा फिकट चहाच्या रंगाचा कुत्रा अत्यंत लोभस आणि निरुपद्रवी आहे. त्याच्या भित्र्या,भोळ्या आणि बावळट स्वभावामुळे आम्ही ( मी आणि माझ्या लेकींनी) त्याचे नामकरण 'पांडू' असे केले. हा तसा एरवी शांतच असतो म्हणजे इतर कुत्र्यांसारखे सतत भुंकणे, एखाद्याच्या अंगावर जाणे, एखाद्याच्या हातात पिशवी दिसली की त्याच्यामागे जात हुंगणे ही कुत्र्याच्या जातीला शोभणारी सत्कृत्ये तो करत नाही. तो शांत एका कोपऱ्यात पडून असतो. त्याच्याकडून त्याच्या भाई-बंधुंच्याही काही अपेक्षा नसाव्यात. मात्र कधीतरी एकदम अवसान आल्यासारखा उठून कोणाच्यातरी मागे धावत जातो आणि मी ही तुमच्यासारखाच एक नॉर्मल कुत्रा आहे असे त्याच्या बांधवांना सांगण्याचा प्रयत्न तो करतो. आपापली कुत्री घेऊन हिंडायला येणारे बहुतेक करून रस्त्यावरील कुत्र्यांची टार्गेट्स असतात. त्या पाळीव कुत्र्यांवर ही समस्त रस्त्यावरील कुत्री नुसत्या भुंकण्याच्या फैरी झाडत असतात. तो सगळा सोहळाच अवर्णनीय असतो. पण या सगळ्या गोंधळात पांडू मात्र विलक्षण अलिप्त असतो नव्हे तसा तो राहू शकतो. कधी कधी वाटत की हा पांडू म्हणजे कुत्र्यांच्या जातीला कलंक आहे. भुंकणे नाही, बागडणे नाही, कचऱ्यात तोंड घालणे नाही, आल्या-गेल्याला घाबरवणे नाही. मी बरा आणि माझे अलिप्त राहणे बरे या भूमिकेतून जणू तो वावरत असतो. 
पांडूचे चापल्य आणि कुत्र्याच्या जातीला जन्माला आल्याचे सार्थक फक्त एकाच बाबतीत दिसून येते. दर रविवारी जेव्हा आमच्या बिल्डींगमध्ये राहणाऱ्या सावंत काकांच्या मागे तो ज्या पद्धतीने वारा प्यायल्यासारखा जातो त्यावरून त्याच्यात कुत्रा नामक जातीचा थोडा तरी अंश आहे याची प्रचीती येते. त्यांच्या त्या मासळी-चिकन-मटण या गोष्टींनी भरलेल्या पिशव्या पहिल्या की पांडू फॉर्मात येतो. त्याची रविवारची तरतूद झालेली असते. एकदा चुकून रविवारी मी त्याच्यासाठी सामिष नसलेले अन्न घेऊन आले तेव्हा त्याने माझ्याकडे ढुंकूनही पहिले नाही. तो सरळ सावंत काकांच्या घराच्या दिशेने चालता झाला. थोडक्यात त्याला रविवार नक्की कळत असावा अशी माझी खात्री आहे. तो गोडघाशा आहे. प्लास्टिकच्या पिशवीतून दिलेले खायचे पदार्थ त्याला आवडत नाहीत. प्लास्टिकच्या बाउलमधून दिलेले पदार्थ तो प्रिफर करतो. पदार्थ जरी समोर असला तरी आधी माझ्याकडून लाड करून घेतल्यानंतरच तो अन्न खातो. माझ्या भावना त्याच्यासाठी महत्वाच्या असाव्यात. 
त्याचे भोकरासारखे काळेभोर आर्जवी डोळे बघितले की मी विरघळून जाते. त्याच्याशी (मराठीतच) खूप बोलते. त्याला भाषा कळली नाही तरी लहरी (vibrations) कळत असाव्यात. त्याला आन्जारते-गोंजारते. तोही शेपटी हलवून आणि चारी पाय वर घेऊन माझ्या बोलण्याला प्रतिसाद देतो. काही कारणाने कधी त्याला खायला मिळाले नाही की माझ्या हृदयात कालवाकालव होते. माझ्याकडून त्याचे आवडते असे काही स्पेशल खायला मिळाले की तोही खूष असतो. मात्र रविवार सोडून. रविवार खऱ्या अर्थाने साजरे करणारे सावंत काका त्याला त्या दिवशी जास्त जवळचे वाटतात.  
मला श्वान-संप्रदायाविषयी कुतूहलाने विचार करायला भाग पाडणारा पांडू आज माझ्या प्रेमाचे एक अविभाज्य अंग होऊन बसला आहे.  
(टीप: वरील फोटो पांडूचा नाही. मला तो फोटो काढून देत नाही. त्याच्यासमोर मोबाईल धरल्यास तो तोंड फिरवतो. त्यामुळे साधारण त्याच्यासारख्या दिसणाऱ्या कुत्र्याचा फोटो मी नाईलाजास्तव वर घातला आहे.) 

Tuesday 11 September 2012

बायकांनो, तुमच्यातील 'काली' जागवा!

स्थळ दिल्ली शहर. शेजारच्या गाजियाबाद या छोट्या शहरातून लग्न करून दिल्लीला आलेली विवाहिता. सुशिक्षित. कुलीन. संस्कारी. Dentist . दिल्लीसारख्या मोठ्या शहरात स्वत:चे करियर सुरु करण्याची मनीषा बाळगणारी. हसरी. आत्मविश्वासाने अंतर्बाह्य फुललेली. तिला बघायला आलेल्या मुलामध्ये स्वत:चा जीवनसाथी शोधणारी. आई-वडील-भाऊ असे तिचे कुटुंब. तिचे वडील आणि ती स्वत: हुंडा या प्रथेचा कडवा विरोध करणारे.  
लग्नाच्या पहिल्या रात्री पतीकडून श्रीमुखात खाण्याचे सौभाग्य प्राप्त झालेली. अशी ही स्मृती विवाहानंतर केवळ काही महिन्यांतच नैराश्याची शिकार होते. मानसोपचार तज्ञाकडे उपचार घेऊ लागते. सुकलेला चेहरा, डोळ्याखाली साचलेली काळी वर्तुळे, आत्मविश्वास हरवलेली देहबोली, मनातील स्वप्नांची झालेली राखरांगोळी ही तिची लग्नानंतरची पुंजी. तिच्या सासरच्या घरात सदैव सत्संगत रमण्याचा देखावा करणारे सासू-सासरे आणि तिच्या देहावर आणि मनावर अनन्वित अत्याचार करणारा तिचा राक्षसी वृत्तीचा पती.  
तिला एक मोठा दीरही असतो जो त्याच्या मेहनतीवर त्याच्या व्यवसायात मोठा झालेला असतो. प्रसंगी त्याने त्याच्या सासरच्यांकडून काही आर्थिक मदत घेतलेली असते. आणि नेमके हेच स्मृतीच्या पतीच्या दु:खाचे मूळ असते. अशाच भरघोस आर्थिक मदतीची अपेक्षा तो स्मृतीच्या वडिलांकडून करत असतो ज्यावर तो त्याच्या व्यवसायाचा डोलारा उभारणार असतो. ज्या वडिलांनी यथाशक्ती खर्च करून आपल्याला वाढवलं, शिकवलं, बौद्धिक दृष्ट्या सक्षम केलं आणि आपल्या लग्नातही ज्यांनी भरपूर खर्च आनंदाने व मुलीचे कल्याण व्हावे या इच्छेने सोसला त्या बापाला आपल्या पतीला आर्थिक मदत करण्यासाठी भरीस पाडावे असे तिला मुळीच वाटत नव्हते. ती 'नाही' या शब्दावर ठाम होती आणि या नाही म्हणण्याची किंमत ती पुरेपूर मोजत होती. दिवसेंदिवस ती नैराश्याच्या खोल गर्तेत रुतत चालली होती. तिच्या करीयरची स्वप्ने कधीच धुळीला मिळाली होती. पतीच्या आई-वडिलांची सेवा करण्यासाठी ती तत्पर होती पण तिच्या आत साचलेल्या वेदनेचे गांभीर्य त्यांना कधी कळलेच नाही. तिच्या दीनवाण्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या दिवट्याचा संताप कधी आलाच नाही. 
आपल्या भावाला त्याच्या सासरच्यांकडून मिळणारी आर्थिक मदत आपल्याला का मिळू शकत नाही या विचारांनी स्मृतीचा पती सैरभैर झाला होता. किंबहुना अशी भरघोस आर्थिक मदत मिळावी म्हणूनच त्याने लग्नाचा घाट घातला होता. त्याच्या सगळ्या मनसुब्यांवर डॉक्टर स्मृतीने बोळा फिरवला होता आणि म्हणूनच ती त्याच्या क्रोधाला सारखी बळी पडत होती. अधूनमधून वडिलांशी फोनवरून याविषयी संभाषण व्हायचे परंतु त्यांनीही प्रत्यक्ष तिथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला नाही. रडणाऱ्या मुलीचे फोनवरून सांत्वन करण्यापलीकडे ते विशेष काहीच करू शकले नाहीत. तुला मी घरी न्यायला येतो असे त्यांनी कधी म्हटल्यानंतर ती, मी परत येणार नाही एवढेच म्हणायची. दिसामाशी ती झुरत होती, झिजत होती. ती पूर्णपणे उध्वस्त झाली होती. तिने निमुटपणे ती परिस्थिती स्वीकारली. पतीच्या जाचाला सहन करत राहिली. अखेर एक दिवस सारे काही असह्य झाल्यानंतर तिने गळफास लावून स्वत:ला संपवून टाकले. तिच्या फुलपाखरासारख्या आयुष्याची शोकांतिका झाली. 
हे सगळे 'क्राईम पेट्रोल' मध्ये बघितल्यानंतर मन क्षणभर सुन्न झाले. तिने अन्यायाचा प्रतिकार का केला नाही या विचाराने मन पोखरून टाकले. तिचे स्वत:चं इतकं सुंदर आयुष्य कुठल्यातरी फडतूस आणि अत्यंत हिडीस माणसासाठी असे फुंकून का टाकावे हा प्रश्न अनुत्तरीत राहिला. का ती माहेरी निघून नाही गेली? का तिने तिचे करियर कोणातरी पती नामक इसमाच्या सांगण्यावरून अर्धवट सोडले? का ती शेवटपर्यंत त्याच्याकडून अकारण शारीरिक आणि मानसिक अत्याचार सहन करत राहिली? तिचे संस्कार, तिचे शिक्षण, तिचा आत्मविश्वास, तिचे सामर्थ्य कुठे लोप पावले? अशा नालायक लोकांसाठी तिने आत्म-बलिदान का केले?  
अशा अनेक स्मृती आज या देशाच्या नव्हे जगाच्या कैक कोनाड्यांत खितपत पडल्या आहेत. निमुटपणे अत्याचार सोसत आहेत. त्यांचे नैराश्य त्यांना अजगरासारखा विळखा घालून बसले आहे. त्यांचा खचलेला आत्मविश्वास त्यांना या मृतप्राय अवस्थेपर्यंत पोहोचवतो आहे. त्यांच्या मनात भावी गळफास तयार होत आहेत. काहीही कारण नसताना स्वत:चे शारीरिक आणि मानसिक शोषण दुसऱ्याला करू देण्याची अशा सर्व स्मृतींची इच्छा ही सर्वार्थाने निदनीय अशीच आहे. 
अशा सर्व स्मृतींना माझे कळकळीचे सांगणे आहे की कुणाच्या तरी विकृत हट्टाखातर स्वत:च्या जीवनाची आहुती देणे हे सर्वस्वी अयोग्य आहे. या पृथ्वीतलावरील आपला जन्म हा हकनाक कुणाचे भक्ष्य होण्यासाठी खचितच नाही. आपल्या आत्मविश्वासाला, आत्म-सन्मानाला चिरडणारा आपला पती नामक इसम आपल्या आयुष्यात राहण्यास अजिबात लायक नाही. 
सर्व दुष्ट प्रवृत्तींचे हनन करण्यासाठी जसा पार्वतीने कालीचा अवतार धारण केला तसेच स्वत:चे सामर्थ्यपूर्ण उग्र रूप समाजातील अशा अप-प्रवृत्तींना दाखवण्याची आज नितांत गरज आहे. अशी 'काली' प्रत्येक स्त्रीत वसलेली असते फक्त तिचे योग्य वेळ येताच प्रकटीकरण होणे अत्यावश्यक आहे. 
तेव्हा समस्त स्त्रियांनो, पुरुषी अत्याचारावर आरूढ होण्यासाठी तुमच्यातील 'काली' जागवा !