Monday 20 February 2017

निवडणुका आणि आम्ही .......


हल्ली वर्तमानपत्र घरी आलं की मी एकदम शब्दकोडे सोडवायला घेते . सुरवातीची पाने skip करावीशी वाटतात. नवीन काय असतं त्यात? एकमेकांवर शाब्दिक लत्ताप्रहार, उपहासाच्या कोपरखळ्या , टोमण्यांचे गुद्दे, वैचारिक आणि नैतिक घसरगुंड्या! यात मतदारांसाठी आश्चर्य करावे असे काहीच नसते. मनपाच्या सत्तेवर असलेला पक्ष आपण गेल्या पाच वर्षात जी काही कामे केली (त्यांच्या लेखी ) त्याची उजळणी पुन्हा पुन्हा मतदारांसमोर करतो आणि विरोधी पक्ष सत्तेवर बसलेल्या पक्षाने कसे काहीच काम केले नाही याचे पाढे वाचतो. यावेळेस आम्हाला निवडून दिलेत तर पुढील पाच वर्षात या शहराचा संपूर्ण कायापालट करू असे आश्वासन सर्व  विरोधी पक्ष अजीजीने देत असतात .
मतदाराला या सर्व राजकीय धुमश्चक्रीतून काय मिळते? काहीही नाही. रस्त्यावरचे खड्डे त्याच्या राशीला जे अहोरात्र होते ते निवडणूक झाल्यावरही तसेच राहणार असतात. खरं सांगू का या आपल्यासोबत कायमस्वरूपी राहणाऱ्या गोष्टींचा मग आपल्याला लळाच लागतो. खड्डेविरहित असा रस्ता हा रस्ता तरी कसा म्हणायचा? आपण पायी अथवा वाहनातून जात असताना दुतर्फा खोदकाम चालू नसेल, येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचा प्रचंड खोळंबा होत नसेल, वाहनचालकांचा एकमेकांशी मायबापांचा उद्धार करणारा अतिपरिचित संवाद होत नसेल तर विलक्षण अस्वस्थ व्हायला होतं. हे शहर आपलंच आहे का याची शंका मनोमन येते. शिवाय खड्ड्यात उलटलेली वाहने आणि त्याभोवती घोंघावणारी गर्दी हेही एक ओळखीचे लक्षण असते. आता सांगा या रस्त्यावरील सगळे खड्डे बुजवले गेले आणि ते परत कधीही कोणत्याही कामासाठी वेळी-अवेळी उकरले गेले नाहीत व त्यामुळे पुढचे प्रसंग आपसूकच टळले गेले तर आपल्याला आपल्या लाडक्या शहराची खूण कशी पटणार? पावसाळ्यात या अशा सार्वत्रिक असलेल्या खड्ड्यात आणि उघड्या गटारात पाणी साचून साचून त्यात मुले-माणसे आणि वाहने आडवी झाली नाहीत तर हे शहर आपल्याला परकं नाही का  वाटणार? अगोदरच अतिशय अरुंद असलेल्या रस्त्यांवर फ्लायओव्हर बांधण्याचे कंत्राट घेऊन येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची जबरदस्त कोंडी करणे आणि पादचाऱ्यांच्या सहनशीलतेला आव्हान देणे हा ही नित्याचाच भाग आहे ना? वाहनांच्या भोंग्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि धुरामुळे श्वसनाला होणारी हानी या काय टाळता येण्याजोग्या गोष्टी आहेत का? रस्त्याच्या नाक्यावर टेहळणी करणारे रोडरोमिओ ही काय समाजसुधारणा झाल्याची पावती आहे का? सार्वजनिक वाहनांत बसल्यानंतर मुली आणि बायकांचा धक्के मारून विनयभंग करणारे , अडीनडीला मुजोरपणे वागून नागरिकांचे जिणे कठीण करणारे वाहनचालक ही काय गौरवास्पद गोष्ट आहे का?
रस्त्यावर पान खाऊन आणि न खाता पचापच थुंकणारे, प्लॅस्टिक च्या पिशव्या, बाटल्या, कागद अशा अनेक वस्तू इतस्ततः: फेकणारे, रस्त्याच्या कडेला, कोपऱ्यात बिनदिक्कत शौचविधी करणारे, उद्यानात, बाकांवर, फुटपाथवर कोणतीही भीडभाड न बाळगता प्रणयाराधन करणारे, भकाभक सिगारेट ओढणारे, दारू पिऊन कोठेही आडवे झालेले, विमानाच्या वेगात बाईक पळवणारे, ट्रॅफिक चे नियम धाब्यावर बसवणारे, मोबाईल वर संभाषण करता करताच गाड्या हाकणारे असे सर्व जिथे सुखनैव नांदतात त्याच शहरात आपणही अनेक वर्षे वास्तव्याला आहोत ही अभिमानास्पद गोष्ट आहे की खेदजनक बाब आहे हे माझ्या बालमनाला पडलेले एक कोडे आहे.याला आळा घालण्याची जबाबदारी कोणाची हे कोणीच सांगत नाही. वरील कृत्यांचे समूळ उच्चाटन करणे हे मनपाच्या अखत्यारीत येते की नाही? वर उल्लेखिलेल्या गोष्टी शिक्षेस पात्र आहेत की नाही आणि असल्या तर अशा सर्व कृत्यांचे जनक असलेल्या महाभागांना शिक्षा केली जाते की नाही? की नुसत्याच मुठी गरम करून यांची शिक्षा माफ केली जाते का?      
रस्त्यावर पडलेला कचरा हे डोळ्यांसाठी एक सर्वपरिचित असे लक्षण आहे. घंटागाड्या येतात, तेवढ्यापुरते कचऱ्याचे ढीग उचलले जातात पण पुनश्च तेवढाच  कचरा रस्त्यावर ठिकठिकाणी साचतो, त्या उकिरड्यावर उंदीर, कुत्रे, गुरे मोकाट वावरतात. सॅनिटरी टॉवेल्स, फुकट गेलेले अन्न, भाजी-फळांच्या साली, मासळीचे अवशेषअशा असंख्य गोष्टी रोगराईला आव्हान देत रोज रस्त्यावर पडून असतात. येणारेजाणारे नाक मुठीत धरून, कासावीस होऊन तिथून रोजची येजा करतच असतात. अनारोग्याला आमंत्रण देणाऱ्या या घाणीकडे मनपा किती गांभीर्याने बघते?   
हाऊसिंग योजना, करसवलती, पाणीपुरवठा, वीज, वाहतूक, कचरा, सार्वजनिक आरोग्य, नागरी सुविधा, क्रीडा,पर्यावरण रस्ते, आपत्कालीन व्यवस्था अशा अनेक मुद्द्यांवर आज सांगोपांग चर्चा होणे आणि त्यातून काहीतरी चांगले निष्पन्न होणे हेच जनतेला अभिप्रेत आहे. नुसते बाह्यरूपाने शहर सुंदर करून आतली कुरूपता तशीच झाकून ठेवणे याला विकास म्हणायचा का? म्हणजे देहावर सुंदर कपडे आणि आत अनेक रोगांनी पोखरलेलं शरीर याला सुदृढता म्हटल्यासारखेच आहे. 
दुसऱ्याला म्हणजेच दुसऱ्या पक्षाला हीन लेखून आपल्या पक्षाचा मोठेपणा येनकेनप्रकारे सिद्ध करणे हा बहुतांश सगळ्या पक्षांचा कार्यक्रम आहे. दुसरी रेघ छोटी करून आपली रेघ मोठी आहे हे भासवण्याचाच हा प्रकार आहे. पण यासाठी आपली रेघ प्रयत्नपूर्वक, कसोशीने आणि सातत्याने, सन्मार्गाने कशी मोठी होईल यासाठी कटिबद्ध राहण्याची कोणाचीच तयारी नाही. निवडणूक होईतोवरच मतदार हा 'राजा' आहे नंतर मात्र त्याच्यासाठी दैनंदिन जीवन ही एक सजा आहे.

 

Tuesday 31 January 2017

तौलनिक अहंकारांचे भीषण युद्ध .........


लग्न झालेलं एक जोडपं. उच्चशिक्षित. पदरी एक मूल. तो finance हेड तर ती marketing हेड. उच्चभ्रू वस्तीत त्यांचा स्वत:चा फ्लॅट. यायला जायला स्वत:ची गाडी. घरात सर्व सुखसोयी. त्या दोघांचेही आई-वडील त्यांच्या घराच्या जवळपासच. ऑफिसमधून परत घरी येताना मुलाला तिच्या आईच्या घरून pick up करणे हा तिचा नित्यक्रम!  
 लौकिकार्थाने सर्व दिसायला छानच. सुखी परिवार वगैरे. पण त्याच्या आत खोलवर कुठेतरी एक ठणकणारी जखम. तिच्या आणि त्याच्या पगाराच्या तफावतीची. आपल्यापेक्षा तिचा पगार जास्त ही वेदना त्याला क्षणोक्षणी विच्छिन्न करणारी. ही भळभळणारी जखम उराशी घेऊन वावरणारा हा आधुनिक अश्वत्थामा! दिसामाशी जास्तच उद्विग्न आणि उध्वस्त होत चाललेला. तिच्या प्रत्येक बोलण्याचा विपर्यास करणारा. मूल ही फक्त तिची जबाबदारी आहे असे मानणारा.   
मुलाला शाळेत drop करण्याबाबत आणि नंतर pick करण्याबाबत त्या दोघांत झालेला एक समझोता . एक महिना ही जबाबदारी त्याने घ्यायची तर एक महिना तिने. असे ठरलेले असतानाही एके दिवशी ही जबाबदारी घ्यायला त्याचा नकार. कारण ऑफिसमधील एक्सट्रा workload चे. दिवसरात्र ऑफिसमध्ये खपूनही salary वाढत नाही त्यामुळे तो मनोमन खचलेला, घुसमटलेला. तिच्यापेक्षा माझा पगार ४०००० ने कमी ही त्याची खरी खंत जी तो मित्रापुढे उघड करतो. तिच्याबद्दलचा त्याचा आकस भलताच वाढलेला. आपल्याला मिळणाऱ्या पगाराच्या आकड्यावरूनच तिने आपले नामकरण केले आहे असे त्याला पदोपदी वाटत राहते. 'ओ मिस्टर एक लाख दहा हजार' असे ती आपल्याला कुत्सितपणे म्हणत हिणवते आहे असे भास त्याला होतात. मित्राच्या समजावण्याचा त्याच्यावर परिणाम शून्य.  
तुझा जॉब माझ्यापेक्षा कसा कमी जोखमीचा, कमी जबाबदारीचा अशी तिला सतत त्याची मुक्ताफळे. एक दोनदा तर तो तिला नोकरी सोडण्याचा आग्रह ही करतो. घराकडे आणि मुलाकडे तुझं सर्वस्वी दुर्लक्ष होतंय असे कारण तो पुढे करतो. तिला मात्र हे विस्कटत चाललेलं घर सावरायचं असतं. तिच्या कोणत्याही बोलण्याचा तो चुकीचा अर्थ काढतोय ते तिला माहित असतं आणि त्यामागचं कारणही तिला ठाऊक असतं. त्याने आपल्यापेक्षा जास्त पगार कमवावा, दुसरी एखादी जास्त पगाराची नोकरी accept करावी असंच तिला वाटत असतं. तो अकारणच inferiority complex ने पछाडला गेलाय हे तिला समजत असतं. ती तिच्या मैत्रिणीकडे तिचं मन मोकळं करते. त्याने एक पाऊल पुढे टाकावं मी चार पावले माझ्याबाजूने पुढे टाकीन हे ती तिच्या आईलाही बोलून दाखवते.   
 या त्यांच्या अहंकाराच्या आपापसातील लढाईत त्यांचं निरागस मूल मात्र कोमेजून जात असतं. त्याच्या मनावर परिणाम व्हायला लागलेला असतो. वेळीच या भांडणांना आवर घातला नाही तर मुलावर विपरीत परिणाम होईल या भीतीने ती व्याकुळ होते. एक दिवस ती ठरवते की बस्स खूप झालं. हा संसार पुरता मोडायच्या  आधीच सावरला पाहिजे. ती ठरवते की आज संध्याकाळी त्याच्याशी या विषयावर बोलायचं आणि या सततच्या वादांना कायमचा पूर्णविराम द्यायचा. ती आईला सांगते की आज मी सोनूला घरी आणणार नाही कारण मला ऑफिस मध्ये बरंच काम आहे. तो आज तुझ्याकडेच राहील. आपण आपल्या नवऱ्याशी कधी एकदा बोलतोय आणि परत एकदा आपल्या संसाराची घडी ठाकठीक करतोय असं तिला होतं. 
 गाडीतून घरी येताना मुलाविषयी आणि एकंदरीतच त्यांची जुजबी चर्चा होते. परंतु सूर मात्र विसंवादाकडेच झुकलेले असतात. हे दोघे घरी येतात. ती समन्वयासाठी पुढे सरसावते. त्याला दोन धीराचे शब्द सांगू लागते. आपल्या वागण्याचा मुलावर होणार परिणाम त्याला पटवून देऊ पहाते. पण तो मात्र वर्षानुवर्षांचा राग मनात ठेऊन असतो. तुझा पगार माझ्यापेक्षा जास्त म्हणूनच तू आज वर तोंड करून माझ्याशी बोलते आहेस, मला कमी दर्जाचा दाखवण्यात तुला कसा आसुरी आनंद होतो आहे वगैरे बोलून तिचा उरलासुरला संयम कसा संपेल यासाठी प्रयत्नशील राहतो. सामंजस्याचे वागणे तर सोडाच पण या चर्चेतून काहीच निष्पन्न होऊ शकणार नाही हे तिच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा तिचाही तोल जातो आणि तीही चार खडे बोल त्याला सुनावण्यासाठी कंबर कसते. दोघांचेही राग शिगेला पोहोचतात. तो पुढचामागचा कसलाही विचार न करता डायनिंग टेबलावर पडलेली सूरी उचलतो आणि क्रोधाच्या परमोच्च अवस्थेत तिच्यावर तिच्यावर सपासप वार करतो. ती जमिनीवर अस्ताव्यस्त रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते गतप्राण होऊन. यानंतर तो स्वत:ला गॅलरी मधून खाली झोकून देतो. तोही on the spot मरण पावतो. 
 ही कपोल कल्पित कहाणी नव्हे तर नुकतीच मुंबई सारख्या शहरात घडलेली घटना आहे. ही घटना नुसती हादरवणारी नाही तर तुम्हा आम्हा सर्वांना अंतर्मुख करणारी आहे. अहंकाराचा नाश अपेक्षित असताना स्वत:चाच नाश ओढवून घेणाऱ्या तरुण जोडप्याची आणि त्यांच्या अचानक, एकाएकी निराधार, पोरक्या  झालेल्या निष्पाप मुलाची ही गोष्ट आहे.   
 मिळणाऱ्या पगाराच्या आकड्यांतील तफावतीमुळे दोन कधीकाळी एकत्र आलेली मने इतकी दुभंगू कशी शकतात? दुसऱ्याचा जीव घेण्याइतपत त्यांच्यातील एकाची मजल कशी जाऊ शकते? त्यांच्या मुलाचा विचारही त्यांच्यातील नात्याला एकत्र बांधून ठेऊ शकत नाही? आपल्या बुद्धीचा, शिक्षणाचा वापर अशा पद्धतीने एखादा माणूस कसा काय करू शकतो? आयुष्यात इतकं शिकून, ऐश्वर्य मिळवूनही ही अशांती, अतृप्ती मनात वास्तव्य कसं करू शकते? या आणि अशा अनेक प्रश्नांना जन्म देणारी ही घटना आहे. 
 नवराबायकोमधील ही अशी आर्थिक तुलना संसाराला कशी घातक ठरू शकते . मद्यप्राशन न करताही चढलेली ही एकमेकांतील स्पर्धेची नशा नात्याला असे भीषण वळण देऊ शकते याचे हे ठळक उदाहरण. तुलना आणि स्पर्धा ही हत्यारे माणसाचे या पृथ्वीतलावरील अस्तित्व पुसून टाकण्यास किती सक्षम आहेत याचा हा सबळ पुरावा. या घटनेतून योग्य तो बोध घेता आला तर निदान भविष्यात नेस्तनाबूत होणारे काही संसार तरी वाचू शकतील म्हणून हा लेखन प्रपंच.