Saturday 26 May 2012

पालक-शाळा-कोचिंग क्लासेस--एक जळजळीत वास्तव

आमच्या वेळेस म्हणजे साधारण १९७५-७६ साली एखादा मुलगा वा मुलगी कोचिंग क्लासेसला जात असेल तर  तो किंवा ती अभ्यासात बरी नसावी असा एक सर्वसामान्य निष्कर्ष निघत असे. 'ढ' किंवा 'सुमार' ( ही लेबलेही आपणच आपल्या सोयोसाठी लावत असतो) विद्यार्थ्यांसाठी शाळेबाहेरील क्लासेस ही एक सोय होती. शालान्त  परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी म्हणून मग ही मुले अशा क्लासेसचा आधार घेत असत.  पण आज मात्र ह्या कोचिंग क्लासेसची व्याख्या पूर्णांशाने बदलली आहे. आज जो कोचिंग क्लासला जात नाही त्याच्याकडे किंवा तिच्याकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलली आहे. अशा विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला मित्र-मैत्रिणींकडून बहिष्कृततेची वागणूक मिळते. शिक्षक आणि इतर पालकांच्या नजराही याबाबतीत बोलक्या असतात. आपण कोचिंग क्लासला जात नाही म्हणजे आपण काही गुन्हा केला आहे अशी भावना मनात बाळगून ही मुले ते दहाव्वीचे वर्ष जगत असतात. 
माझी धाकटी मुलगी २००३-२००४ साली दहाव्या इयत्तेत गेली. मी पहिल्यापासूनच ठरवले होते की तिला कोणत्याही क्लासला घालायचे नाही. ती वृत्तीने अभ्यासू होती. फक्त तिच्यात योग्य आत्मविश्वासाचा अभाव होता. गणित याविषयाची मुख्यत्वेकरून बीजगणित या विषयाची तिला थोडी धास्ती होती. नियमित अभ्यास केलास आणि लिहिण्याचा सराव ठेवलास तर तुला परीक्षा अजिबात अवघड जाणार नाही हे मी तिला सांगितले होते. मे महिन्याच्या सुट्टीतच तिच्या अभ्यासाचे एक वेळापत्रक आखून मी तिचा थोडा थोडा अभ्यास घेऊ लागले. धडा वाचून महत्वाच्या गोष्टी अधोरेखित करणे, कठीण गणिते पुन्हा पुन्हा सोडवणे, पेपर लिहिण्याचा सराव करणे व अमुक एक प्रश्न सोडवण्यासाठी वेळेचे नियोजन करणे इत्यादी गोष्टी मी तिला शिकवल्या.  शाळेतील मिड-टर्म एक्झाम्स जवळ आल्या होत्या. तू कोणत्याही क्लासला जात नाहीस त्यामुळे तुला निश्चित कमी मार्क मिळणार असे तिच्या जवळच्या म्हणवणाऱ्या मैत्रिणींनी तिला छातीठोकपणे सांगितले होते. माझी मुलगी शाळेतून घरी यायची तीच हिरमुसली होऊन. जणू काही क्लासला न जाऊन ती मोठ्ठा अपराधच करत होती.   मैत्रिणींच्या अशा वागणुकीने ती काही वेळेस रडवेली होत असे. पण मी आणि माझ्या मोठ्या मुलीने तिला वेळोवेळी खूप धीर दिला. समजावून सांगितले. अखेरीस मिड-टर्म परीक्षेचा निकाल लागला आणि माझ्या मुलीला त्यात चांगले मार्क मिळाले. मैत्रिणींची तोंडे आपोआप बंद झाली. माझी मुलगी ही त्यांच्या वर्गात क्लासला न जाणारी एकमेव मुलगी होती. तिच्या वर्गशिक्षिकेनेही तिचे कौतुक केले. तिचा आत्मविश्वास वाढला. आता ती अधिक जोमाने अभ्यास करू लागली. कोणत्याही क्लासला न जाता शालान्त परीक्षेत तिला ८३% मिळाले. तिच्या काही मैत्रिणींना मात्र प्रश्न पडला की आपण जर क्लासला जात होतो तर मग तिच्यापेक्षा  आपल्याला कमी मार्क कसे मिळाले? 
मला वाटते ही प्रत्येकाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोणत्याही कोचिंग क्लासच्या जाहिरातबाजीला बळी न पडता आपण नियमित आणि व्यवस्थित अभ्यास केला तर सहज चांगले मार्क मिळू शकतात. अर्थात प्रत्येकाची चांगल्या मार्काची व्याख्या ही भिन्न असू शकते. प्रत्येक मूल प्रत्येक विषयात पारंगत असणे शक्य नाही. आपल्या मुलाचा जो विषय थोडा कच्चा आहे असे आपल्याला व त्याला वाटते त्या विषयापुरते त्याला मार्गदर्शन करणे हे उचित आहे. पण सरसकट सगळे विषय त्याला कंटाळा येईपर्यंत शाळेत आणि क्लासमध्ये परत परत शिकायला लावणे हा अन्याय आहे. त्याला किंवा तिला वैयक्तिक मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. पण शाळा संपल्यावर क्लास नामक दुहेरी शाळेत त्याला किंवा तिला ढकलून मुलांचा वेळ वाया घालवण्याचे कार्य बरेच पालक मात्र निष्ठेने पार पाडत असतात. 
बहुतांश कोचिंग क्लासेसना त्यांच्या क्लासचे नाव उज्ज्वल करणारे हिरे हवे असतात. कारण या गुणी मुलांच्या मार्कांच्या जोरावर त्यांच्या क्लासचे भविष्य अवलंबून असते. घरीदारी तू अजून मार्क मिळव, या परीक्षेत नव्वद टक्के मिळाले  आहेत यावर समाधान न मानता पंच्याण्णव टक्के कसे मिळवता येतील ते बघ असा उपदेश वडीलधारयांकडून सतत केला जातो. ( विशेष म्हणजे ह्या मुलांच्या पालकांना शाळेत कधीही उत्तम मार्क मिळालेले नसतात) शाळेतही शिक्षक ही परीक्षा नसून हे एक युद्ध आहे हे लक्षात असू द्या आणि जास्तीत जास्त ( म्हणजेच शंभराला दोन-तीन टक्के कमी) मार्क मिळवून दुसऱ्यांना ( इतर शाळांना) नेस्तनाबूत करा आणि आपल्या शाळेचे नाव मोठे करा असा मौलिक संदेश वेळोवेळी देतच असतात.  
नववी संपवून तुमचे मूल दहाव्वीत पदार्पण करते आणि अनेक नामवंत क्लासेसकडून प्रवेशाबाबत विचारणा होते. तुमच्या मुलाला ऑलरेडी चांगले मार्क मिळाले असतील तर क्लासवाल्यांच्या दृष्टीने ही एक नामी संधी असते. '८५ टक्के आहेत ना, मग आमच्या क्लासमध्ये घाला नव्वदच्या वर मिळण्याची हमी आम्ही देतो किंवा यावर्षी नव्वद टक्के मिळालेत ,आमच्या क्लासला आल्यावर दहाव्वीत हमखास ९५-९६ टक्के मिळतील.' या क्लासवाल्यांच्या गोड आर्जवाला भुलून पालक पाल्याचे कल्याण करण्यासाठी त्याला वा तिला त्या क्लासमध्ये घालतात. आजकाल ७० ते ८० टक्के मिळवणारी मुले कमी गुणवत्तेची समजली जातात आणि त्याखाली टक्के मिळवणारी मुले ही कोणाच्या खिजगणतीतही नसतात.  
शाळेचे साडेपाच-सहा तास आणि त्यानंतर क्लासचाही जवळजवळ तेवढाच वेळ मुले फक्त खर्डेघाशी करत असतात. घराच्या मंडळींना अभ्यास या एका शब्दाशिवाय दुसरे काही सुचत नाही. शाळेतील शिक्षक शाळेचा शंभर टक्के निकाल लागावा यासाठी मुलांच्या डोक्यावर प्रेशरची तलवार सतत टांगती ठेवतात. क्लासमधील शिक्षक खूप मेहनत करा, जास्तीत जास्त मार्क मिळावा, आपल्या क्लासचे नाव रोशन करा हे मुलांवर सातत्याने बिंबवत राहतात. शाळा -क्लास आणि घराबाहेरील रम्य विश्व मुलांना कितीही खुणावत असले तरी घाण्याला जुंपलेल्या बैलांप्रमाणे ही मुले अहोरात्र या अभ्यास नामक चक्रव्यूहात अडकलेली असतात.  दोन-तीन खाऊचे डबे देऊन आणि जबरदस्तीने दूध प्यायला लावून मुलांना दिवसभरासाठी पिटाळले जाते. शाळा आणि क्लास या दुहेरी कटकटीतून दमूनभागून घरी आलेली मुले जरा कुठे विसावतात. पण त्यांचे हे भाग्य त्यांच्यापासून अनेकदा हिरावून घेतले जाते आणि त्यांना होमवर्क नामक गोष्टीला जुंपले जाते. ही वस्तुस्थिती आहे. 
मूल दहाव्वीत गेले की त्याच्यासाठी सर्व करमणूकांचे दरवाजे बंद होतात. टी.व्ही. बंद, मैदानी खेळ बंद, मित्र-मैत्रिणींबरोबर फिरणे बंद, फोन बंद, सर्व छंद बंद. त्यांनी फक्त दिवस-रात्र अभ्यासाला वाहून घ्यायचे. कारण पालकांची कॉलर ताठ करायची जबाबदारी त्यांची असते, शाळा आणि क्लासच्या नावाचा झेंडा अटकेपार नेण्याची जबाबदारी त्यांचीच असते. त्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या परिश्रमाच्या, मेहनतीच्या सुरस कथा वृत्तपत्रांतून प्रकाशित होणार असतात, पुष्पगुच्छांनी त्यांची घरे ओसंडून वाहणार असतात, त्यांच्या मुलाखती वाहिन्यांवरून प्रसारित होणार असतात, राजकीय, सामाजिक वर्तुळात त्यांच्या हुशारीच्या कथा रंगणार असतात, भविष्याची सोनेरी दालने त्यांना आपसूक खुली होणार असतात, त्यांची कारकीर्द आंतरराष्ट्रीय भरारी घेणार असते. 
दहाव्वीत गेलेल्या मुलाला अथवा मुलीला एक मनही असतं हे सोयीस्कररित्या विसरण्यात सगळ्यांना आनंद असतो. अभ्यासाव्यतिरिक्त त्यांना इतरही काही विश्व असतं पण या विश्वाशी इतरांना काही देणं-घेणं नसतं. पाल्याने आपल्या मनाप्रमाणे वागावे असे पालकांना वाटते, विद्यार्थ्याने शाळा किंवा क्लासचे नाव उज्ज्वल करावे असे शिक्षकांना वाटते पण त्या मुलाला किंवा मुलीला काय वाटते याचे सोयरसुतक मात्र कुणालाच नसते. 
अभ्यासाचा, अपेक्षांचा भार दिवसेंदिवस वाढत जातो, चरकातून पिळून निघाल्याचा अनुभव मुलांना येत राहतो, पालकांच्या, शिक्षकांच्या अवास्तव आकांक्षांचे ओझे नकोसे वाटू लागते.  फुलपाखरासारखी भिरभिरणारी रंगीबेरंगी युवावस्था अर्थहीन, रसहीन वाटू लागते. आणि अशा प्रचंड निराशेच्या गर्तेत सापडलेल्या कुणा विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला केमिस्टच्या दुकानातील त्या झोपेच्या गोळ्यांची बाटली खुणावू लागते जी तिला या सगळ्या ताणापासून चिरमुक्ती देणार असते.   
पाहा विचार करा.

No comments:

Post a Comment