Monday 14 May 2012

सत्यमेव जयते - एक काळजाला हात घालणारा शो

सत्यमेव जयतेचे बघता बघता दोन एपिसोड्स झाले आणि लाखो प्रेक्षकांची हृदये पाझरली. ज्या सुरक्षित कोशात, वातावरणात आपण आपले दैनंदिन आयुष्य कंठत असतो त्या भोवतीच्या परिघात एवढी भीषण रहस्ये दडलेली आहेत हे पाहताना जीवाचा थरकाप होतो. प्रत्यक्ष प्रसंग ऐकताना मन सुन्न होऊन जाते. जीवनाच्या या भयंकर लढाईतून तावून सुलाखून निघालेल्या या शोषीतांना सलाम करावासा वाटतो. सर्वात महत्वाचे म्हणजे आपली ही कहाणी निर्भीडपणे, नि:संकोचपणे प्रेक्षकांसमोर कथन करणाऱ्यांचे मनोमन कौतुक वाटते.  
स्त्री भ्रूणहत्या या विषयानंतर बालकांचे लैंगिक शोषण हा विषय या कार्यक्रमाद्वारे लोकांसमोर आला. वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक स्तरातील मुलांच्या तसेच मुलींच्या लैंगिक शोषणाचे भीषण वास्तव काळीज हलवून गेले. लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या एकूण मुलांमधील ५३% आकडेवारी ही फक्त मुलांची आहे हे ऐकताना पटकन विश्वास बसला नाही. मुला-मुलींचे निरागस बाल्य अशा घृणास्पद रीतीने संपवणाऱ्या विकृत नराधमांची विलक्षण चीड आली. 
घर, शाळा, खेळ, सवंगडी, सहली  हे ज्यांचे अवघे विश्व, निष्पाप डोळे , निरागस भाव हाच ज्यांचा स्थायीभाव, डोळ्यांना निद्रादेविने दिलेले स्वप्नांचे पंख लावून त्या सुंदर साम्राज्यात विहार करणारे ज्यांचे निकोप मन अशा लहानग्यांना इतक्या बीभत्स अनुभवांना सामोरे जावे लागावे यासारखे दुर्दैव नाही. आपल्या अंगप्रत्यांगाचा वापर असाही कुणी करून घेऊ शकतो याचे आकलन न होण्याच्या वयात ही मुले या विदारक प्रसंगांना सामोरी गेली. त्यांनी अपार शारीरिक वेदना तर सहन केल्याच पण प्रचंड मानसिक आघातही सोसले. 
भयंकर प्रपातकारी वादळातून ही चिमुकली रोपटी उन्मळून पडता पडता कशीबशी सावरली गेली. हे आघात केले होते त्यांच्याच जवळच्या म्हणवणाऱ्या माणसांतील पशूंनी! समुद्रावर जाऊन शंख-शिंपले गोळा करण्याच्या वयात यांनी शारीरिक व्रण झेलले. आकाशात झेप घेतलेले विमान भान हरपून पाहण्याच्या वयात त्यांचे कोवळे अस्तित्व छिन्न होऊन गेले. रंगीत चित्रे रेखाटण्याच्या उद्योगात मग्न होण्याच्या वयात ही मुले मानसिक छळाला, अत्याचाराला बळी पडली. माणसाच्या रूपातील सैतानांनी त्यांचे स्वप्नवत आयुष्य कधीही न बऱ्या होणारी जखमांनी नासवून टाकले. 
या कार्यक्रमात सहभागी होऊन अशा अनेक पिडीतांनी आपापल्या भावनांना, मनातील उद्वेगाला, अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तसेच या लैंगिक शोषणाचे बळी ठरलेल्यांना मदतीचा हात देणाऱ्या काही संस्थांची माहितीही मिळाली. परंतु अशा पिडीतांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून देणारा आणि त्याद्वारे अशा असंख्य छुप्या नराधमांच्या विकृत प्रवृत्तीला चाप लावणारा कोणताही कायदा अस्तित्वात नाही हे ऐकून धक्काच बसला. या अपराध्यांना वास्तविक पाहता कायद्याद्वारे प्रचंड जरब बसावयास हवी. घरातील एखाद्या नातेवाईकाने हे घाणेरडे कृत्य केले असेल तर इतर नातेवाईकांनी त्याला बहिष्कृत करावयास हवे. सर्वांसमक्ष त्याच्या निंदनीय कृत्याची छाननी व्हावयास हवी. अपराधी जर घराबाहेरील असेल तर त्याच्या संपर्कातील लोकांसमोर त्याचा बुरखा फाडावयास हवा. जेणेकरून त्याच्यापासून इतर सावध होतील आणि अशा काही कोवळ्या जीवांच्या आयुष्याची राखरांगोळी व्हायची तरी वाचेल. 
या २ एपिसोड्स मधून हाताळले गेलेले विषय नवीन नाहीत. इतरही असेच बहुचर्चित विषय यानंतर हाताळले जाऊ शकतील पण आमीर खान सारख्या सशक्त आणि सक्षम कलाकाराला घेऊन अशा सामाजिक समस्यांना, प्रश्नांना जाहीर वाचा फोडणे हे या कार्यक्रमाच्या यशाचे गमक आहे. सामाजिक बांधिलकी मानणारा आमीर पीडितांच्या कथा ऐकताना अनेकदा भावविव्हल होतो. पूर्ण तयारीनिशी, आकडेवारीनिशी मैदानात हा गडी उतरला आहे. अनेकांना बोलते करतो आहे. शोकाकुलांना मिठीत घेतो आहे. आजवर अशा अनेक समस्यांचा उहापोह प्रसारमाध्यमांतून होत आला आहे. पण या सर्व समस्यांवर सर्वमान्य तोडगा काढणे आता अपरिहार्य होऊन बसले आहे. एखादा कायदा संमत करून घ्यायचा तर त्यासाठी जनमताचा रेटा हवा. जनतेची ताकद हवी. सरकारदरबारी अपील करायचे तर लेखी स्वाक्षऱ्या हव्यात. प्रसंगी जन-आंदोलन उभारावयास हवे. सर्वसामान्यांच्या अधिकारासाठी लढणारा खंदा लढवय्या हवा. तरच हे काम तडीस जाऊ शकेल. तरच या सामाजिक समस्यांची उकल होऊ शकेल. तरच पीडितांना, शोषितांना खऱ्या अर्थाने न्याय मिळू हकेल. तरच अशा सैतानी वृत्तीला अंकुश बसू शकेल. 
या कार्यक्रमाअखेर आमिरने घेतलेले मुलांचे वर्कशॉपही परिणामकारक होते. हा अवेअरनेस, ही जागृती लहान असली तरी मुलांमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. काही न कळण्याच्या अजाण वयात आयुष्याला कोणतेही गंभीर वळण मिळण्याआधी ह्या गोष्टी प्रत्येक घरातील पालकांनी मुलांना त्यांना सहज आकलन होईल अशा पद्धतीने समजून सांगणे अत्यंत गरजेचे आहे. एखाद्या गोष्टीचा प्रतिकार करण्यास शारीरिक दृष्ट्या असमर्थ असलेल्या लहानग्यांना स्वत:चा बचाव करण्याचे तंत्र तरी मोठ्यांनी सांगणे अत्यावश्यक आहे. किंबहुना शाळाशाळांमधून अशी वर्कशॉप्स आयोजित करण्यात आली पाहिजेत. 
एखादे फूल फुलण्यासाठी आजूबाजूस पोषक वातावरण नसेल तर ते फूल अकालीच कोमेजून जाईल. त्याचे निर्माल्य होईल. या गोष्टीचे भान प्रत्येकानेच ठेवले पाहिजे आणि या कार्यक्रमात आमिरसोबत आपलाही खारीचा वाटा उचलला पाहिजे. अशा अपप्रवृत्तींना मुळासकट उपटून टाकण्यासाठी आपण जास्तीत जास्त सजग आणि प्रयत्नशील राहिले पाहिजे. तरच अनेक लहानग्यांचे भविष्य सुरक्षित होऊन त्यांचे बाल्य अ-बाधित राहील. 
( या कार्यक्रमाच्या अखेरीस सादर झालेल्या दोन्ही गीतांनी मनाला हळवा स्पर्श केला हे मी आवर्जून नमूद करू इच्छिते.)

1 comment:

  1. Karyakram pahilelya sarv samanyanchya manatil bhavana uttam tarhene madalya ahet. tuzya blog cha ullekh kalachya Loksatta madhye pan ahe. Kontyahi sanvedanshil vyaktichya anttakaranala haat ghalanara ha programe ahe. Keep it up Amir and keep it up you too!

    ReplyDelete