Wednesday 9 May 2012

स्त्रियाच स्त्रियांच्या वैरी असतात .......

आमीर खानने त्याच्या छोट्या स्क्रीनवरील पदार्पणातच अवघ्या भारताला हलवून सोडले. विषयही तसाच होता. स्त्री भ्रूणहत्त्या. शहरी तसेच ग्रामीण भागांतून काही पिडीत महिला आमंत्रित केल्या होत्या. त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या कहाण्या ऐकताना मन हेलावून गेले. एक स्त्री साक्षर झाली की सारे कुटुंबच साक्षर होते असे म्हणतात. पण साक्षरतेचा, उच्चशिक्षणाचा आणि मानवी प्रवृत्तीचा दुरान्वयानेही संबंध नसतो असे हा कार्यक्रम पाहताना उमगले. 
आपल्याकडे स्त्री विवाह करून सासरी जायला निघाली की तिचे आई-वडील तिला सांगतात की आता सासर हेच तुझे सर्वस्व! तुझा नवरा, तुझे सासू-सासरे, दीर-नणंदा सांगतील तसे वाग. त्यांना नाराज करू नकोस. त्यांचा शब्द खाली पडू देऊ नकोस. माहेरची बेअब्रू होईल असे वर्तन तुझ्या हातून घडता कामा नये. पती हाच आजपासून तुझा परमेश्वर आहे. तू जन्मलीस या घरी पण आता  तुझी अर्थी निघणार तिथूनच! हे मुलीला सांगणारी खुद्द आईच असते. 'तुझ्यावर अन्याय झाला तर अजिबात गप्प राहू नकोस. आम्ही सारेजण तुझ्या पाठीशी आहोत. आमची काहीही मदत लागली तर नि:संकोचपणे अर्ध्या रात्री हाक मार असे सांगणारी आई अजून तरी जन्माला यायची आहे.' त्यामुळे आपल्या जन्मदात्रीच्या सांगण्यानुसार, बजावण्यानुसार नव-विवाहिता वागू लागते. अनेक वेळेस स्वत:च्या इच्छा मारून जगते. सासरच्यांसमोर ब्र काढण्याची तिची हिम्मत नसते. तिच्या पती परमेश्वराने- सासूने तिला कितीही अपमानित केले तरीसुद्धा तिच्या आईच्या शिकवणीप्रमाणे ती मूग गिळून गप्प बसते. यथावकाश ती गरोदर राहते आणि तिच्या आनंदाला पारावार उरत नाही. नव्या जीवाच्या गोड चाहुलीने तिचे मन प्रफुल्लीत होते. तिच्या सासूला मात्र घराण्याला कुलदीपकच हवा असतो. तिचे जे मत असते तेच तिच्या आज्ञेत असलेल्या मुलाचे मत असते. मग योजना आखल्या जातात. डॉक्टरांना विश्वासात घेऊन आणि त्यांचे खिसे गरम करून गर्भलिंगचिकित्सा केली जाते. तिच्या पोटात मुलगी वाढत असते. त्यामुळे हे बीज समूळ नष्ट करण्याचे बेत पक्के होतात. त्या स्त्रिला तिच्या पोटात दिसामाशी वाढत जाणाऱ्या बाळाचे कोण अप्रूप असते. हे बाळ म्हणजे मुलगा आहे की मुलगी हा प्रश्नच मुळी तिच्या दृष्टीने गौण असतो.  आपल्या रक्तामांसाचे कुणीतरी आपल्या पोटात हालचाल करते आहे हीच मुळी तिच्या दृष्टीने आनंदाची पर्वणी असते. सासू आणि नवऱ्याने आखलेल्या योजनेबद्दल ती अनभिज्ञ असते. एक दिवस उजाडतो. तिला हॉस्पिटलमध्ये काही टेस्ट्स करण्यासाठी म्हणून दाखल केले जाते आणि नेमका तोच दिवस तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी अखेरचा दिवस ठरतो.  त्या बाळाचा दोष फक्त एवढाच असतो की ती एक मुलगी असते. तिचा गर्भपात करण्याच्या कटात जे डॉक्टर सामील असतात त्यांच्यात स्त्रियाही असतात. अतिशय निलाजरेपणाने आणि कोडग्या, मुर्दाड मनाने हा गर्भपाताचा उपचार पार पडला जातो. हे ऐकून अंगावर सर्रकन काटा येतो पण जेव्हा एक स्त्रीच दुसऱ्या निष्पाप स्त्रीच्या हत्येला जबाबदार असते  हे पाहिल्यानंतर अशा स्त्रियांची शिसारी येते. 
अशा केसेस केवळ ग्रामीण भागांत घडत नाहीत तर शहरी भागांतही घडतात. अशिक्षितांच्या तसेच शिकालेल्यांच्याही घरी या घटना राजरोस घडतात. एखाद्या स्त्रीने हिम्मत करून मी माझ्या पोटातील मुलीला जन्म देणार असे सांगितले की मुलीच्या जन्मानंतर तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरु होतो. त्या मुलीला मारण्याचेही प्रयत्न केले जातात. पण या सगळ्या घटनांत घरातील वडीलधारी स्त्रीचा अर्थात सासूचा पुढाकार असतोच असतो. नवरा आणि मुलांवर ती हुकमत गाजवते. तिचा शब्द हा अंतिम असतो, निर्णायक असतो. ती स्वत: जरी स्त्री म्हणून जन्माला आली असली तरी आपल्या सुनेच्या पोटी स्त्री-रत्न जन्माला येऊ नये यासाठी ती विलक्षण प्रयत्नशील राहते. तिचा कितीही वेळा गर्भपात करायला लागला तरी चालेल पण तिने फक्त मुलालाच जन्म द्यायला हवा असे तिचे ठाम मत असते. तिला खोडून काढायची हिम्मत घरात इतरवेळी 'पौरुषत्व' गाजवणाऱ्या माणसांत नसते. सुनेला मुलगा होण्याचे चिन्ह दिसत नाही हे कळताच ती तिच्या मुलाच्या पुनर्विवाहाचा घाट घालते. पोटी जन्मलेला मुलगा उद्या बदफैली, व्यसनी निपजला तरी चालेल पण त्याने आपल्या घराण्याचा वारसा पुढे चालवायला हवा असा एक विचित्र आणि विकृत हट्ट या मागणीत असतो. 
वास्तविक पाहता नैसर्गिक रचनेनुसार, पोटात वाढणाऱ्या बाळाचे लिंग ठरवणारा हा पुरुषच असतो. स्त्रियांमध्ये फक्त 'एक्स' गुणसूत्रे असतात तथापि पुरुषांमध्ये 'एक्स' आणि 'वाय' अशी गुणसूत्रे असतात. पुरुषांतील एक्स गुणसूत्राचे स्त्रीच्या गुणसूत्राशी  मिलन झाले तर मुलगी होते आणि वाय या गुणसूत्राचे मिलन झाले तर मुलगा होतो. हे समजून न घेताच तू आमच्या घराण्याला मुलगा देऊ शकत नाहीस आणि म्हणून तू या घरात राहायला लायक नाहीस अशा शंख जो स्त्रीच्या नावाने केला जातो त्यात कितपत तथ्य आहे हे सुज्ञांनी पडताळून पाहावे. 
मुलगी सासरी आल्यानंतरही पैसे, चैनीच्या वस्तू, दागदागिने माहेराहून आणण्यासाठी तिच्यामागे तगादा लावला जातो. अगदी मुलगी कमावणारी असली तरी! माहेर सधन नसेल तर मग मुलीला उपाशी ठेव, तिला मारहाण कर, सारखे घालूनपाडून बोल, तिच्या माहेरच्यांचा उद्धार कर आणि अखेरीस तिला पेटवून दे असे उपाय सर्रास अवलंबले जातात. यात अग्रणी असते ती मुलीची सासू. आपल्या मुलीप्रमाणे वागवणे तर सोडाच पण साधे माणुसकीचे वर्तनही तिच्याशी कोणी करत नाही.  
विधवा स्त्रीला सण-समारंभात भाग न घेऊ देणे, वांझ स्त्रीला डोहाळेजेवण-बारसे अशा समारंभांना न बोलावणे हे काम स्त्रियाच पार पडत असतात. नहाण आल्यावर मुलीला इथे जाऊ नको , तिथे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको असे सतराशे साठ निर्बंध टाकणाऱ्या स्त्रियाच असतात.  पूर्वीच्या काळात सतीची प्रथा, केशवपनाची प्रथा बंद करण्यासाठी लढणारे पुरुष होते. विधवा स्त्रियांच्या पुनर्विवाहाची संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात उतरवणारेही पुरुषच होते. घरातील प्रत्येक स्त्रीने शिक्षित व्हावे यास्तव झटणारेही पुरुषच होते. हुंडाबळीच्या आणि हुंड्याच्या प्रथेच्या विरोधात आवाज उठवणारे पुरुष होते. तिरसट आणि हेकेखोर असा लौकिक असलेले पण आपल्या बायकोने डॉक्टर व्हावे या ध्यासापोटी तिला सातासमुद्रापार पाठवणारे गोपाळराव जोशी तसेच आपल्या बायकोने उत्तम शिकून समाजात नव-विचारांचा प्रसार करावा यासाठी तिला शिक्षित करणारे नवमतवादी न्यायमूर्ती रानडे ही उदाहरणे स्त्रियांनी जरूर अभ्यासावीत. 
आज जर सुनेच्या पाठी सासू कोणत्याही प्रसंगात खंबीरपणे उभी राहिली तर अनेक विवाहितांना सन्मानपूर्वक जगता येईल. स्त्रीभ्रूणहत्येचा प्रश्नच निकालात लागेल. स्त्रियांचा यथोचित आदर करणे हे घरातील पुरुषांना क्रमप्राप्त होईल. आज कोणत्याही क्षेत्रात स्त्रिया पुरुषांपेक्षा तसूभरही कमी नाहीत. उलट स्त्रिया अनेक आघाड्या ज्या पद्धतीने कुशलतेने सांभाळतात ती कुशलता पुरुषांकडे औषधालाच सापडते. आपलं स्त्रीत्व आपण ज्या पद्धतीने स्वाभिमानाने सांभाळलं त्याचप्रमाणे आपल्या मुलीला आणि सुनेलाही ते तितक्याच अभिमानाने सांभाळण्यासाठी सहकार्य करण्यास ज्या दिवशी सासू पदर खोचून उभी राहील तो दिवस भारतीय इतिहासात सुवर्णक्षराने लिहिण्याजोगा असेल. 

No comments:

Post a Comment