Sunday 7 December 2014

विचार बदला नशीब बदलेल ………

काही वर्षांपूर्वी एका ट्रकच्या मागील बाजूला मी हा सुविचार वाचला होता. त्या ट्रक मालकाला हा सु-विचार कसा सुचला असेल याचा त्यानंतर मी विचार करत होते. आपण अनेकजण असे विचार येताजाता वाचत असतो खरे परंतु तो विचार आत्मसात करून, त्यावर मनन करून तो आचरणात आणणारे मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच असतात.  
आज प्रत्येकानेच स्वत:चे विचार पुनश्च तपासून पाहण्याची गरज आहे. अशा विचारांचा स्त्रोत अथवा मूळ बदलण्याची गरज आहे. कारण प्रत्यक्ष चोरी करण्या आधी ती चोरी विचारांत झालेली असते. समाजविघातक कृत्ये घडण्याआधी ती करणाऱ्यांच्या मनात घडलेली असतात. मनात विचार येणं, ते बोलून दाखवणं आणि त्याप्रमाणे योजनाबद्ध कृती घडणं हे आज आपण सर्रास बाहेर अनुभवत असतो. जळीस्थळी  याचा प्रत्यय आपल्यापैकी अनेकांना आलेला असतो. सगळी माणसे अशी गैर कृत्ये करत नसली तरी आपल्या विचारांना बरेच वेळा योग्य दिशा देऊ शकत नाहीत.         
अनेक वेळा माणसे इतरांचे विचार बदलण्याचा खटाटोप करतात. त्याने असे वागले पाहिजे, तिने असे वागता कामा नये असे मतप्रदर्शन वारंवार करतात. परंतु हीच माणसे स्वत:चे विचार बदलण्याचा विचारही मनात आणत नाहीत. आपण इतरांना बदलू शकत नाही हे प्रत्येकाने मनात अधोरेखित करण्याची गरज आहे. दुसऱ्याचे विचार माझ्या नियंत्रणात नाहीत पण माझे विचार माझ्या नियंत्रणात असू शकतात या वास्तवाचा स्वीकार माणसे करताना दिसत नाहीत. एकाच कुटुंबात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे विचार जर सारखे असते तर मग कौटुंबिक वाद हे उद्भवलेच नसते. समाजात वावरणाऱ्या प्रत्येकाचे विचार जर परस्परांशी जुळले असते तर समाजात एकोपा,शांतता नांदली असती.          
परंतु असे घडत नाही याचे कारण प्रत्येकाच्या विचारांची बैठक वेगळी असते. प्रत्येक व्यक्ती तिच्याबरोबर निराळे 'संस्कार' घेऊन आलेली असते. प्रत्येकाचे एक logic असते त्यानुसार ती व्यक्ती वागते, आचरण करते. ते त्या व्यक्तीच्या दृष्टीने योग्य असते म्हणूनच ती करत असते. तिचे वर्तन चूक की बरोबर ही बाब सर्वस्वी वेगळी पण तिच्या वागण्यावर किंवा विचारांवर आपले नियंत्रण असू शकत नाही. समोरची व्यक्ती सिगारेट ओढते हे आपल्याला गैर वाटून आपण त्या व्यक्तीच्या तोंडातील सिगारेट हिसकावून फेकली तर आपल्या अशा कृत्याने तिची सिगारेट ओढण्याची सवय नष्ट होईल का याचा विचार आपण करायला हवा. आपण अशा व्यक्तीपासून दूर राहण्याचा विचार जरूर करू शकतो कारण त्या व्यक्तीच्या विचार किंवा आचारावर आपले नियंत्रण असू शकत  नाही.        
काही वेळा परिस्थिती अशी येते की माणसे हतबल होतात. समजा सकाळच्या वेळी आपली गाडी traffic मध्ये बराच वेळ अडकली आहे. आपल्याला ऑफिसला  पोहोचायला उशीर होणार हे उघड आहे. आपल्यासारखीच इतरही अनेक माणसे त्यांच्या वाहनांमध्ये खोळंबली आहेत. अशा वेळी प्रामुख्याने आपल्या मनात काय काय विचार येतात. 'आजच उशीर व्हायचा होता, माझी महत्वाची मिटिंग आहे, काय कटकट आहे या traffic ची, आता मला उशीर होणार, बॉसची बोलणी उगाचच खावी लागणार, इतरांसमोर माझ्या इज्जतीचा फालुदा होणार, माझ्या प्रमोशनवर गदा येणार, तो लेले माझ्या पुढे जाणार, आज रात्री उशिरापर्यंत थांबावे लागणार, बायकोला प्रॉमिस केले होते की लवकर येईन म्हणून, बाहेर जाणार होतो, शी! सगळ्या plan चा चुथडा झाला' या सगळ्या विचारांनी आपण पुरते घेरले जातो. पण या विचारांचे जनक आपणच असतो ना? शिवाय या विचारांनी traffic jam  सुटतो का? हे विचार बरोबर घेऊनच आपण ऑफिसला जातो. परिस्थितीचा राग आपण ज्याच्या त्याच्यावर काढतो आणि अनेक मने दुखावतो. आपल्या त्या दिवसाच्या कार्यक्षमतेवर याचा परिणाम होतो. आपला सबंध दिवस अर्थातच वाईट जातो. उरलेल्या यातना आपण घरी भोगतो. त्रास होणे हे जरी साहजिक असले तरी तो किती करून घ्यायचा आणि त्यामुळे इतरांना किती द्यायचा हे आपल्या विचारांतच असते ना?                    
दुसरी माणसे आणि परिस्थिती आपल्या नियंत्रणाच्या कक्षेबाहेर असतात. अमुक एक परिस्थिती उद्भवल्यास अथवा अमुक एक व्यक्ती आपल्याशी विशिष्ट प्रकारे वागल्यास नेमका कशाप्रकारे विचार करायचा हे शिकवणाऱ्या शाळा नाहीत पण आपल्या मनात अशा वेळी येणाऱ्या विचारांना नेमकी दिशा  कशी द्यायची या करता आज त्या संबंधीचे विपुल वाचन, आत्मपरीक्षण, मनन आणि चिंतन करण्याची खरी आवश्यकता आहे.  कुटुंब आणि समाज सुदृढ होण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मनातील विचार आणि विचारांचा स्त्रोत सुयोग्य दिशेने वळवण्याची गरज आहे.   
मनाच्या मुळाशी प्रत्येकाने उत्तम व योग्य विचारांचं खतपाणी घातलं तर आणि तरच नशीब म्हणजेच future आपल्यासाठी आनंदाची पर्वणी घेऊन येईल.   
एक अतिशय सुंदर विचार मला या ठिकाणी उद्धृत करावासा वाटतो:
'ज्याप्रमाणे तुम्ही रोज चोखंदळपणे आपल्यावर सुंदर दिसतील अशा कपड्यांची निवड करता अगदी त्याचप्रमाणे तुम्ही नेहमी योग्य विचारांची निवड करा. कारण ही एकच गोष्ट अशी आहे की जी तुमच्या नियंत्रणात असू शकते.'    


No comments:

Post a Comment