Monday 24 November 2014

भाजपचे भविष्य स्मृती इराणींच्या 'हाती'? - विषयाचा विपर्यास


मनुष्यबळ विकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांनी आपला हात भविष्य समजून घेण्यासाठी ज्योतिषापुढे पसरत भाजपच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले. याच्या निषेधार्थ जवळजवळ सर्व channels नी आपापला आवाज उठवला. वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला. वास्तविक पाहता अनेक दिग्गज राजकारणी, उद्योगपती, अभिनेते आणि समाजातील इतर प्रतिष्ठित यांची ज्योतिषांकडे व्यवस्थित उठबस असते. अनेकांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, हातात गंडेदोरे, बोटांत अंगठ्या असतात आणि हे आपण पाहिलेले असते. फक्त या गोष्टींचा जाहीर बोलबाला होत नाही. या 'activities' अत्यंत गुप्तपणे होत असतात. स्मृती इराणींनी एवढे चातुर्य दाखवले असते तर आज त्यांच्यावर असे टीकेचे अस्त्र सोडण्याची संधी channels ना मिळाली नसती. पण त्या आपल्याबरोबर सगळा लवाजमा घेऊन गेल्या आणि मिडियाला आयतेच खाद्य मिळाले. आता हे त्यांनी हेतुपुरस्सर केले असेल तर माहित नाही किंवा हा 'attention seeking' चा ही प्रकार असू शकेल.              
मंत्र्यांना खाजगी जीवन नसते.  त्यांना हे मंत्रिपद अपघाताने मिळाले. त्यांनी वेळेचा अपव्यय केला. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्नचिन्हच आहे. ज्योतिषाला हात दाखवून त्या आजच्या तरुण पिढीसमोर नक्की कोणता आदर्श ठेवू पाहत आहेत? अशा अनेक प्रश्नांच्या फैरी त्यांच्यावर झाडल्या गेल्या. त्यांचे या संदर्भातील फोटो सुद्धा प्रसारित झाले. त्यांच्या वैचारिक भूमिकेबद्दल रान उठवून झालं. मात्र त्यानंतर channels  वर 'फलज्योतिष' हे शास्त्र की थोतांड आहे ही जी चर्चा सुरु झाली ती पूर्णपणे अप्रस्तुत होती.       
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये अगदी पुसटशी सीमारेषा आहे. जो कर्तृत्ववान आहे तो सुद्धा श्रद्धाळू असू शकतोच की! श्रद्धा ही व्यक्तीसापेक्ष बाब आहे. कोणाची श्रद्धा परमेश्वरावर, कोणाची महंत लोकांवर तर कोणाची ज्योतिषावर. ही एक अत्यंत व्यक्तिगत गोष्ट आहे. मी अनेक डॉक्टर सुद्धा बुवा-बाबांच्या चरणी लीन झालेले बघितले आहेत. ज्यांचे कर्तृत्व अगोदरच सिध्द झाले आहे व तेही सार्वजनिक रित्या त्यांना ज्योतिषांची गरजच काय असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. मनगटातील कर्तृत्व आणि दैववाद यांची सांगड कशासाठी घालायची? अनेक ज्योतिष्यांनी कालच्या चर्चेत अतिशय सावध भूमिका घेतली होती. कोणाचे चूक किंवा कोणाचे बरोबर, कोण योग्य व कोण अयोग्य हे ठरवण्याचा नैतिक अधिकार दुसऱ्याला नाही जोपर्यंत तो दखलपात्र गुन्हा नाही. देव मुळी नाहीच आहे असे म्हणून तुम्ही मंदिरे उभारण्यासाठी हरकत घेऊ शकता का? मी नास्तिक आहे म्हणून दुसऱ्यानेही नास्तिकच असावे हा आग्रह कितपत रास्त आहे? ज्याप्रमाणे देव आहे असे अत्यंत ठामपणे सांगणारे आहेत तसेच देव अस्तित्वातच नाही असे छाती पिटून सांगणारेही आहेत. ज्योतिष हे एक सन्माननीय शास्त्र आहे असे म्हणणारे आहेत तसे ज्योतिषाचे शास्त्रीयत्व अमान्य करणारे सुद्धा ढीगभर आहेत. याचे कारण प्रत्येक माणूस आणि त्याची मानसिकता ही इतरांपेक्षा सर्वस्वी वेगळी असते आणि यापुढेही असणार आहे.               
अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत की कर्तृत्व असूनही त्या व्यक्तींना यश प्राप्त झालेले नाही. कारणे काहीही असोत. आपल्या शेतात प्रामाणिकपणे, निष्ठेने काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या तोंडचा घास निसर्गाच्या अवकृपेने असंख्य वेळा काढला गेला आणि जातोय. तो शेतकरी कुठे प्रयत्नात कमी पडला? परंतु त्याच्या मनगटातील कर्तृत्व सिध्द करून दाखवण्याची संधी मात्र निसर्गाने हिरावून घेतली. आज शिकून सवरून स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करून दाखवायला जगाच्या पाठीवर निघालेल्या अनेक तरुणांना अपयशाला सामोरे जायला लागतेय. बेकारी, बेरोजगारी यांचा सामना करताना त्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अनेक आसन्नमरण अवस्थेत असलेले वयोवृध्द रुग्ण नको झालेला जीव मरण येत नाही म्हणून कसेबसे जगवत आहेत तर दुसरीकडे तरणेताठे अपघाती किंवा अचानक मृत्यूला कवटाळत आहेत. या गोष्टींचे 'logical calculation' काय असू शकेल? अंदाज, तर्क या गोष्टी जर अ-शास्त्रीय ठरवल्या तर मग ज्या तर्काच्या, अनुमानाच्या आधारे पोलिस गुन्हेगार लोकांपर्यंत पोहोचतात ती सुसंगतताही मोडीत काढायला लागेल.           
मी घरातून यावेळी बाहेर पडू का? इतपत ज्योतिषाच्या आधीन व्हायचं की नाही हे ज्याने त्याने ठरवले पाहिजे. प्रत्येक माणसाला उपजत विवेकबुद्धी किंवा सद्सद विवेक हा असतोच. त्याचा वापर त्याने केला नाही तर तो त्याचा दोष आहे. माझ्यावर आज मंत्रीपदाची मोठी जबाबदारी आहे. मी जाहीररीत्या ज्योतिषाकडे गेले तर त्याचे समाजात आणि राजकारणात काय पडसाद उमटतील ह्या गोष्टीचा विचार स्मृती इराणी यांनी करायला हवा होता. त्यांच्या विवेकशून्यतेला शास्त्र कसे जबाबदार?       
एकीकडे आपला 'TRP' वाढवण्यासाठी पेपर आणि वाहिन्यांमधून भविष्यकथनाचे  कार्यक्रम करायचे व  दैनंदिन भविष्य छापायचे आणि दुसरीकडे याच शास्त्राची 'TRP' वाढावा या दृष्टीकोनातून संभावना करायची हे दुटप्पी धोरण किती योग्य आहे याचा विचार करण्याची आज आत्यंतिक गरज आहे. 

No comments:

Post a Comment