Saturday 13 December 2014

सुखाची परिभाषा





“Happiness is when what you think, what you say, and what you do are in harmony.”
Mahatma Gandhi 


Happiness is not something ready made. It comes from your own actions.”
Dalai Lama XIV


सुखाची परिभाषा ही व्यक्तिपरत्वे भिन्न असते. दोन वेळा अन्नाची भ्रांत असलेल्यास एक वडापावही सुखप्राप्ती करून देऊ शकतो तर पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य असलेल्या भागात अर्धा बादली पाणी आंघोळीसाठी मिळणे ही सुखाची परमावधी होऊ शकते. इथे सुख हे साधनांशी म्हणजेच वडापाव किंवा पाणी ह्या गोष्टींशी निगडीत आहे. परंतु भौतिक सुखाची सर्व साधने उपलब्ध असूनही माणसे सुखप्राप्तीच्या शोधात फिरताना दिसतात. अनेक वैध वा अवैध मार्गांनी आपली सुखाची झोळी कशी भरेल या शोधार्थ अनेकजण भटकत असतात. वास्तविक पाहता सुख,आनंद,शांती ह्या खऱ्या तर माणसाच्या सहज(natural ) प्रवृत्ती आहेत. परंतु शिक्षण,हुद्दा, संपत्ती, सामाजिक प्रतिष्ठा,स्थावर जंगम इस्टेट,गाड्या या संपादित (acquired ) गोष्टींच्या मांदियाळीत त्या कुठेतरी
वळचणीला पडल्या आहेत.       

घरीदारी ऐश्वर्यलोलुप जीवन जगणारा माणूस जेव्हा ती आत रिक्त राहिलेली सुखाची-समाधानाची-आनंदाची पोकळी भरण्यासाठी बाहेर उपाय शोधत राहतो तेव्हा सुख हे कोणत्याही बाह्य किंवा जड साधनांशी निगडीत नाही हे प्रत्ययास येते.  
आईवडील मुलाला म्हणतात तू येत्या परीक्षेत इतके मार्क मिळव म्हणजे आम्हाला आनंद होईल. परीक्षा देणाऱ्या मुलाला वाटते की उत्तम मार्क मिळवणे का एकच आपल्या आईवडिलांना सुखी करण्याचा मार्ग आहे. मग मुलाला आपल्या अपेक्षेप्रमाणे मार्क मिळतील की नाही या विवंचनेत आईवडील आपली दिनचर्या व्यतीत करतात आणि आपण उत्तम अभ्यास केला तरी आईवडिलांच्या अपेक्षा पुऱ्या करून त्यांना आनंद देऊ शकू का या तणावात मुलाचे दिवस जातात. वाशी येथे राहणारी जिया एक अतिशय अभ्यासू,प्रामाणिक मुलगी. वर्गात बहुधा दुसरी वा तिसरी येणारी. चित्रकलेत कमालीचा हात ! दहाव्वीचे वर्ष त्यामुळे घरीदारी फक्त अभ्यासाच्याच परवचा आणि अभ्यासाचेच श्लोक. धनुर्धर अर्जुनापेक्षाही लक्ष अभ्यासावर जास्तच एकाग्र करावे यासाठी पालकांचा व शिक्षकांचा प्रचंड आटापिटा. जिया शाळा,कोचिंग क्लास आणि चित्रकला या सर्वांचा समतोल नीट सांभाळत असते. तिला प्रिलिम्स मध्ये ८९.७० % मिळतात. हातात मार्कशीट येताक्षणी ती विलक्षण कासावीस होते. आईवडिलांचे चेहरे तिच्या डोळ्यांसमोर तरळतात. ती त्याच मानसिक अवस्थेत घरी येते. आतल्या खोलीत जाऊन आपल्या छंदातून ताण हलका करू पाहते. वडील घरी आल्यावर आधी कमी मार्क मिळाल्यामुळे रणकंदन होते. पण मग फायनलला ८९ च्या विरुध्द म्हणजे ९८ मिळवीन असे मला प्रॉमिस कर असे वडील आज्ञार्थी प्रेमळपणे सांगतात. जिया कसेबसे प्रॉमिस करते. ती या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर तिचा पुढचा शैक्षणिक प्रवास तिच्या आईवडिलांनी अगोदरच आखलेला असतो. शिक्षणाचा तो टप्पा गाठल्यानंतरच  ते सुखाने श्वास घेऊ शकणार असतात. शाळेतील,क्लासमधील शिक्षकांकडून  'Exam is like a war. Either you win or you loose. So fight.' असा मोलाचा सल्ला दिला जातो. जियाला तर आपण प्रत्येक क्षणी रणांगणावर आहोत असे वाटू लागते. ती हतबल होते, मनोमन निराश होते. आपण आईवडिलांच्या अवाजवी अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही अशी तिची खात्री होते आणि ती एक निर्णय घेते. मित्राकडे पार्टीला गेलेले आईवडील घरी परततात तेव्हा त्यांना पलंगावर पडलेले जियाचे निष्प्राण शरीर दिसते आणि काही महिन्यांपूर्वी घरात नांदणारे सुख कापरासारखे केव्हाच उडून गेलेले असते.                             
अ नामक इसम नवी कोरी करकरीत मारुती गाडी खरेदी करतो. मनासारखा रंग, आतील सोयी, मऊ गुबगुबीत उशा त्याला मनोमन सुखावतात. तो त्या गाडीतून  फिरायला बाहेर पडतो. सुखाची, आनंदाची चव चाखत प्रवास सुरु असतो. एके ठिकाणी सिग्नलला गाडी थांबते. सहज अ चे लक्ष शेजारी जाते. त्याच्या गाडीच्या शेजारी अलिशान, जास्त गतिमान, तरलपणे रस्ता कापणारी, अद्ययावत, जास्त capacity असलेली मर्सिडीज उभी असते. त्या मर्सिडीजचा चालक अ च्या गाडीकडे काहीशा तुच्छतेने पाहतो. आता अ ची सुखाची संकल्पना पूर्णपणे जमीनदोस्त होते. त्याला आपली गाडी मर्सिडीज पुढे अगदी क्षुल्लक वाटू लागते. काही क्षणांपूर्वीचा  त्याचा हसरा चेहरा आता पूर्णपणे म्लान होतो. त्याच्या सुखाच्या व्याख्येलाच छेद जातो.  
ऋतु आहुजा गिफ्ट म्हणून मिळालेल्या साडीकडे पुन्हा पुन्हा पाहते. या साडीचा रंग, पोत तिला खूप आवडलेला असतो. तिच्या अंदाजाने ती साडी कमीत कमी तीन-चार हजाराची असणार असते. इतकी सुंदर साडी नेसून परवाच्या नीलम अरोराच्या पार्टीला आपल्याला जाता येईल म्हणून ती मनोमन खूष होते.  तिला सुखाच्या हिंदोळ्यावर असल्यासारखे वाटते. एवढ्यात तिच्याकडे तिची एक मैत्रीण येते.  ऋतु तिला अगदी कौतुकाने ती साडी दाखवते. ती साडी बघताच मैत्रीण उद्गारते, 'अगं अशी साडी परवाच मी एका प्रदर्शनात पहिली. पाचशे रुपयांना मिळत होती.'  ऋतु चा सगळा आनंद मावळतो. सुख विरघळून जातं. कारण तिची सुखाची कल्पना त्या साडीच्या किमतीशी निगडीत असते.    
सुखाचा विचार हा जरी साधनांमुळे निर्माण झाला असला तरी कोणतीही जड वा निर्जीव साधने सुख निर्माण करू शकत नाहीत. नाहीतर या साधनांनी सर्वांना सारखंच सुख दिलं असतं. एखाद्याला आवडलेली वस्तू दुसऱ्याला आवडतेच असे नाही पण ती दुसऱ्याला आवडली नाही म्हणून सुख देण्याच्या दृष्टीने तिचे मूल्य कमी झाले असे समजणे ही वैचारिक अपरिपक्वता आहे.  
इतरांच्या यशापयशावर आपले सुख वा आपला आनंद अवलंबून ठेवणे हे असमंजस वृत्तीचे निदर्शक आहे. सुख वा आनंद हा ज्याचा त्याचा वैचारिक गाभा आहे. सुख अथवा दु:ख हे विचारांतूनच निर्माण होत असतं. भोवती वावरत असलेली माणसे त्यांच्याकडे असलेली माहिती आपल्याकडे प्रवाहित करतात आणि या मिळालेल्या अनुकूल वा प्रतिकूल माहितीच्या आधारे आपले विचार जन्म घेतात. इतरांच्या सुखाचे संदर्भ हे आपल्या सुखाच्या संदर्भापेक्षा वेगळे आहेत परंतु आपले सुखाचे संदर्भ आपल्यासाठी अमुल्य आहेत हे ज्याला वेळीच कळते तो सर्वार्थाने सुखी होतो.                          


No comments:

Post a Comment