Tuesday 9 December 2014

मुले की पैसे निर्माण करणाऱ्या टाकसाळी?

आपण शिक्षण नक्की कशासाठी घेतो याचा बहुधा आज बहुतांश लोकांना विसर पडत चालला आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते. स्वत: शिक्षित होऊन स्वत:च्या कुटुंबाला आणि समाजाला त्याचा उपयोग करून देता येत असेल तरच त्या शिकण्याला काही अर्थ आहे. केवळ उद्याच्या अवास्तव  ' pay package' कडे लक्ष ठेऊन त्या दिशेने व त्या उद्देशाने शिकणारा विद्यार्थी आज शाळा घडवत आहेत का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.    
पहिल्या पाचात येणारे विद्यार्थी हे शाळेचे 'brand ambassador' समजले जातात. या विद्यार्थ्यांमुळे शाळेचे नाव केवळ उज्ज्वल होणार नसते तर यामुळे अनेक grants, donations मिळण्याचा मार्ग सुकर होणार असतो. यांच्या शैक्षणिक प्रगतीवर शाळा आपल्या उत्कर्षाचे इमले बांधत असतात. अशा रेस मध्ये अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांवर शाळांचा शैक्षणिक जुगार चालू असतो. हे आजच्या बऱ्याच शाळांचे चित्र आहे.
बरं शाळांना किती दोष देणार?  काल आस्था अगरवाल हिचा channels वर interview काय दाखवला, IIT चे फोन अव्याहत खणाणू लागले. तिला जर facebook ने २.५ कोटी चे  pay package ऑफर केले आहे तर भविष्यात माझ्या मुलाला किंवा मुलीलाही ते मिळू शकते या विचारांनी पालकांचा एवढा ताबा घेतला की आता सहावी-सातवीतच त्यांना IIT चे कोचिंग मिळू शकेल काय याचा विचार करण्यात आता त्यांचे अनेक दिवस अन रात्री जातील.    

मुलांच्या पाठीवरील ओझे आणि मनावरील स्पर्धात्मक अभ्यासाचा ताण कमी करावा असे आज अनेक डॉक्टर आणि मानसोपचार तज्ञ सांगत आहेत. कोवळ्या वयात लादलेल्या अपेक्षांची पूर्तता करताना निर्माण होणारा अंतर्गत तणाव अनेक व्याधींना निमंत्रण देणारा आहे. हे माहित असूनही परिस्थिती आणि अपरिहार्यता या सबबी पुढे करून शाळा आणि पालक आपापल्या महत्वाकांक्षा विद्यार्थ्यांवर अविरत लादत असतात.    
आता थोडा तर्कशुध्द रीतीने काही गोष्टींचा विचार करायला हवा. IIT तज्ञांच्या मते, एकूण सीट्स १०००० आणि पास आउट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६ ते ६. ५ लाख. म्हणजे IIT मध्ये प्रवेश मिळेल याची संभवनीयता अर्थात probability किती? त्यात आस्थाने ज्या शाखेचे शिक्षण घेतल्याने तिला हे यश प्राप्त झाले त्या शाखेच्या किती सीट्स? शिवाय तिला मिळालेले pay package हे तसे दुर्मिळ कोटीतले त्यामुळे ही शक्यता सुद्धा इतर विद्यार्थ्यांच्या बाबतीत तशी धूसरच नव्हे काय? तरीही आपापल्या पाल्याला नेमके त्याच शाखेचे IIT मधील शिक्षण मिळावे यासाठी पालकांची ही तडफड पहिली की वाटते खरेच हि यांनी जन्माला घातलेली मुले आहेत की पैसे generate करण्याच्या संस्था आहेत?      
आज इंजिनियरिंग चे शिक्षण घेऊन विद्यार्थी फायनान्स ला जातात हा त्या घेतलेल्या शिक्षणाचा व्यय नाही का? आज 'research &development' ला न जाण्याचे नक्की कारण काय? या बाबतच्या शैक्षणिक सुधारणा करण्याबाबत सरकार पुरेसे गंभीर आहे का? मुळात अशा प्रकारच्या फक्त पैसा हे अंतिम लक्ष्य ठेवून त्यानुसार केवळ त्याच प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना देऊ करणाऱ्या शिक्षण संस्था तितक्याच दोषी नाहीत का? 
या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आता आपली आपणच शोधायची आहेत.  मुलांचा फक्त शैक्षणिक बुद्ध्यांक वाढवून त्यांचा भावनिक बुद्ध्यांक संपुष्टात आणणारे हे शिक्षण समाजमान्य कसे होऊ शकते? आपण उद्याचे उत्तम नागरिक तयार करतो आहोत की operating machines हा विचार करण्याची वेळ येउन ठेपली आहे इतके हे वास्तव भयानक आहे. प्रेम, समानूभूती, दया, आदर, अनुकंपा,विवेक, संयम, शांती अशा काही मानवी मूल्यांच्या खुणा जतन करणारे शिक्षण यापुढे मिळणार आहे की धाप लागेपर्यंत जीवघेणे धावा आणि जमेल तितकी माया ओरबाडा असा संदेश घरीदारी दिला जाणार आहे? मुलांच्या वैयक्तिक आवडीनिवडीला तिलांजली दिली जाऊन यावर काळाची गरज या सबबीखाली फक्त अमाप पैसा असलेले व्यवसायच त्यांना त्यांच्या इच्छेविरुध्द करण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे?   
शिक्षण हवे ते माणसाला दुसऱ्या माणसाशी वैचारिक दृष्ट्या जोडण्यासाठी. पण आज बाहेरील प्रचंड ताण निर्माण करणाऱ्या स्पर्धांमुळे माणूस माणसापासून तुटत चाललाय. इर्षा, द्वेष,असूया, हाव, आर्थिक ताकद, अहंकार असे सगळे अवगुण जिथेतिथे तणासारखे माजले आहेत, फोफावत आहेत. या सगळ्यात चिरडले जाते आहे, कोमेजले जाते आहे ते बालमन. 'बाल्य'  हा शब्दच कालबाह्य होत चाललाय. तू खूप मोठा हो म्हणजे खूप पैसे कमव असा त्यामागील अर्थ आहे.              
जन्म आणि मृत्यू या टोकांमधील प्रवास सहज,सुंदर व निखळ आनंदाचा व्हावा यासाठी जीवन असतं. सुदृढ मन आणि सुदृढ शरीर घेऊन आपण मार्गक्रमणा केली तर आपोआप हा प्रवास अधिक छान, रमणीय होतो. आपल्या आवडीनुसार आपण या जीवनप्रवासात रंग भरू शकतो. त्याला योग्य तो आकार देऊ शकतो. आयुष्य एकदाच मिळते व ते अनमोल असते असे वाचले आणि अनेकदा ऐकलेले सुद्धा असते मग अशा आयुष्यात रंग भरून ते सुरम्य करण्यासाठी कुंचला सुद्धा आपल्याच हातात हवा ना? आपल्याला मिळालेले आयुष्य आपल्या पद्धतीने जगावे की त्याची किल्ली इतरांच्या हातात द्यावी हा निर्णय ज्याने त्याने घ्यावा.          
आपली मुले ही आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याची साधने नसून, त्या स्वत: पूर्ण विचार करून निर्णय घेणाऱ्या सक्षम व्यक्ती आहेत हे आज पालकांनी मनोमन समजण्याची गरज आहे. त्याचबरोबर पैसा हा जरी अपरिहार्य असला तरी आनंदाचा आणि सुखाचा तो एकमेव मापदंड नाही हेही लक्षात घेण्याची नितांत आवश्यकता आहे.       

No comments:

Post a Comment