Wednesday 10 December 2014

तुलनेचा विध्वंसक काटा

मार्क ट्वेनचा तुलनेसंदर्भातील विचार पहा, ' “Comparison is the death of joy.”  
Shenon Alder यांचे या संदर्भातील सूचक वाक्य पहा, “The battle you are going through is not fueled by the words or actions of others; it is fueled by the mind that gives it importance.”  

प्रत्यक्षात मात्र या तुलनेची प्रचीती आपणा सर्वांना जळीस्थळी येत असते. या संदर्भातील एक सत्य घटना मी इथे नमूद करू इच्छिते जी अनेकांसाठी 'eye opener' ठरू शकेल.     
दिल्लीत अ आणि ब ही दोन कुटुंब एकमेकांच्या शेजारी राहत होती. अ घरातील मुलीशी ब घरातील मुलाची सतत तुलना केली जायची. आणि ही तुलना करणारी दुसरी तिसरी कुणी नसून खुद्द त्या मुलाची आई होती. तिने बघ किती छान मार्क मिळवले नाहीतर तू. सगळेजण बघ तिचे किती कौतुक करताहेत, आपल्या गल्लीतही ती सगळ्यांच्या कौतुकाचा विषय झाली आहे. मला तुझे कौतुक करायची आणि ऐकायची अशी संधी कधी मिळणार आहे कोणास ठाऊक? त्या मुलाच्या कानावर ही मुक्ताफळे पडणे हे नित्याचेच झाले होते. प्रथम प्रथम तो आईच्या या उपहासपूर्ण बोलण्याने आतल्या आत निराश व्हायचा, खच्ची व्हायचा, न्यूनगंडाने त्याला पुरेपूर घेरले होते. पण मग जसजसे दिवस,महिने आणि वर्षे उलटली तेव्हा या न्यूनगंडाची जागा संताप, द्वेष आणि कमालीचा तिरस्कार या भावनांनी घेतली. ती मुलगी घरी आली की तो तिच्याशी अवाक्षर ही न बोलता निघून जायचा. रस्त्यात ती दिसली की फूटपाथ बदलायचा. परंतु त्याच्या या वृत्तीचा अर्थ मात्र त्या मुलीला कधी उमगलाच नाही. कारण त्यांच्या घरातील या प्रकारच्या तणावाबाबत ती पूर्णपणे अनभिज्ञ होती. त्याचा हा विक्षिप्तपणा तिच्या लक्षात आल्यावरही तिने त्याला काहीही विचारले नाही व त्याच्या वागण्याकडे कानाडोळा केला. यथावकाश तिचे शिक्षण पूर्ण होऊन तिला मुंबईला नोकरी मिळाली. appointment letter हातात पडताच तिच्या आणि कुटुंबियांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. शेजारी सुद्धा ही बातमी गेलीच. झाले. त्या मुलाच्या आईने त्या मुलाला टोमणे मारले, त्याचा उद्धार केला आणि तिच्या तुलनेत तो कसा क्षुद्र आहे ते जाणवून दिले. तो मुलगा आतून संतापाने,द्वेषाने,तिरस्काराने खदखदत होता. आता त्याला त्याच्या भावनांना वाट मोकळी  करून द्यायची होती.  काहीएक योजना त्याच्या मनात आकार घेऊ लागली. ती मुलगी नोकरीवर रुजू होण्यासाठी मुंबईला निघाली. सोबत तिचे वडील होते. आपल्या मनात नव्या आयुष्याची अनेक स्वप्ने रंगवत ती मुलगी दादर स्टेशनवर उतरली आणि तिच्या खांद्यावर कुणीतरी थोपटले म्हणून तिने मागे वळून पहिले आणि डोळ्यांचे पाते लावते न लावते तोच तिच्या चेहऱ्यावर कुणीतरी acid टाकले आणि तिच्या चेहऱ्याबरोबर तिची स्वप्नेही जाळून खाक झाली. तिच्या वडिलांच्या दृष्टीने हा सगळाच प्रकार अनाकलनीय असाच होता. तिला हॉस्पिटलमध्ये तातडीने नेण्यात आले परंतु जवळजवळ आठवड्या भरातच  तिने या जगाचा निरोप घेतला. तपासाअंती  कळून आले की त्या शेजारच्या मुलानेच सूड भावनेपोटी हे कृत्य केले होते. त्याने पोलिसांना सांगितले कि त्या मुलीशी माझे काहीच वैमनस्य नव्हते पण आईच्या सततच्या तुलनेला कंटाळून मनाच्या प्रचंड वाईट अवस्थेत मी हे केले. त्याच्या आईला हे ऐकून जबर मानसिक धक्का बसला. दोन्ही कुटुंबातील एकी या एका घटनेने नष्ट तर झालीच शिवाय मानसिक दृष्ट्या दोन्ही कुटुंबेही उध्वस्त झाली.      
जन्माला आलेले प्रत्येक मुल हे जसे काही शारीरिक संस्कार घेऊन जन्माला येत असते तसे काही मानसिक,भावनिक आणि कार्मिक संस्कार घेऊन जन्माला येत असते. त्यामुळेच प्रत्येकजण हा दुसऱ्या पेक्षा वेगळा असतो परंतु कमी किंवा जास्त नसतो. एका मुलामध्ये असलेली एखादी विशेषता दुसऱ्या मुलात असतेच असे नाही पण त्याच्यात काही खास गुण असू शकतो जो इतरांत नसतो. पण घरीदारी लहानपणापासूनच आपल्याला एकाच फूटपट्टीने मापले जाते. याचा आदर्श डोळ्यासमोर ठेव, त्याचे काहीतरी गुण घे असे सांगितले जाते म्हणजे थोडक्यात इतरांचे अनुकरण कर पण स्वत:तील विशेषत्वाला  किंवा सत्वाला मारून टाक असेच अप्रत्यक्षरित्या सांगितले जाते.  हे कितपत योग्य आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.       
या तुलनेपायी अनेक मुले आज शालेय जीवनातील निर्भेळ आनंदाला वंचित होतात. मुलांमधील सुप्त गुणांचा योग्य विकास  होत नाही परिणामी अशी मुले मनोमन खुरटतात तरी किंवा बंडखोर अथवा विकृत होतात. त्यांच्या स्वतंत्र अभिव्यक्तीवर तुलनेची गदा येते आणि फुले उमलण्याआधीच कोमेजून जातात.  अनेक पालकांना वाटते की तुलना केली म्हणजे तरी आपले  पाल्य सुधारेल पण त्यांना हे कळत नाही की अशी सततची तुलना करून आपण आपल्या मुलाला भावनिक दृष्ट्या कमकुवत करतो आहोत. त्याला निराशेच्या गर्तेत ढकलतो आहोत. त्याच्या मनातून येणारी उजेडाची तिरीप आपण या सततच्या तुलनेने कायमची विझवतो आहोत.     
 प्रत्येक मुलाला जन्मत:च एक सुंदर देणं लाभलेलं असतं ते म्हणजे विचारांचं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच. त्याला जर पालकांनी प्रोत्साहनाच खतपाणी घातलं व त्या विचारांचा सन्मान केला तरच रोप सर्वार्थाने बहरेल नाहीतर सततच्या तुलनेच्या घणाघाती फावड्याने अकालीच कुस्करून जाईल.                            

No comments:

Post a Comment