Wednesday 12 November 2014

सत्तेसाठी काहीही …………

विधानसभेत काल घडलेल्या सबंध नाट्याचा मला पुनरुच्चार करायचा नाही परंतु या कृतीमुळे भाजप सरकारची राज्यातील विश्वासार्हता निश्चितच लयास गेली आहे.   
सुशिक्षित,सुजाण ,सुज्ञ असा मतदार ( नोटांची चळत पाहून आपली मते न विकणारा आणि कोणत्याही पक्षाला बांधील नसणारा ) काहीएक विचार करून आपले मत अमुक एका पक्षाच्या पारड्यात टाकत असतो. त्या त्या पक्षातील मुख्य चेहऱ्याकडे आणि त्याच्या आजवरच्या राजकीय कर्तृत्वाकडे पाहून हे बहुमुल्य मत मतदार देत असतात. कॉंग्रेस -राष्ट्रवादीने त्यांच्या राजकीय कर्तृत्वाने जनमानसात जो अविश्वास निर्माण केला त्यांची परिणती म्हणून यावेळेस मतदार राजाची पावले भाजप सरकारच्या दिशेने आपसूकच वळली.   
हे नवीन सरकार तरी नागरिकांच्या हिताचे व त्यांचे दैनंदिन आयुष्य सुकर व्हावे असे काहीतरी करेल या विश्वासापोटीच हि नवी सोयरिक जनता जुळवू पाहत होती. भाजप सरकार मोठ्या संख्येने राज्यात आले खरे पण जनतेने या पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. भाजप नंतर दुसरा मोठा  पक्ष म्हणून शिवसेनेला जनमान्यता मिळाली. आता भाजप आणि शिवसेना मिळून या राज्याचा नवा संसार थाटतील  असे जनतेला वाटत असतानाच त्या पक्षांतर्गत मानापमानाची नाटके रंगली आणि भाजप-शिवसेनेचा काडीमोड झाला.    
ज्या राष्ट्रवादीला 'भ्रष्ट्वादी ' आणि NCP म्हणजे 'naturally corrupt party' म्हणून कुत्सितपणे भाजप हिणवत राहिली आणि ज्या भाजपने सत्तेवर येताच अशा भ्रष्टाचाऱ्यांना जेलमध्ये  टाकू अशा वल्गना केल्या त्याच भाजपची आज राष्ट्रवादी पक्षाबाबतची भूमिका संदिग्ध व संशयास्पद असावी हे अत्यंत दुर्दैवी आहे.
आम्ही विश्वास दर्शक ठरावाची सगळी प्रक्रिया कायदेशीर रित्याच पार पाडली असा भाजप आज कितीही ठणाणा करून सांगत असली तरी ते कितपत खरं आहे हे त्यांनाही माहित आहे आणि सुज्ञ जनतेलाही ते आता ज्ञात झाले आहे.  

ज्येष्ठ घटनातज्ञ प्रा.उल्हास बापट यांनी काल सांगितले की त्यांनी तांत्रिक बाबी जुळवून आनत्या खऱ्या परंतु जे काही काल विधानसभेत घडले ते नैतिकतेला धरून तर नव्हतेच शिवाय यात लोकशाहीचे सर्व संकेत भाजपने झुगारून दिले. ज्येष्ठ विधिज्ञ आणि सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती श्री.पी .बी .सावंत  यांनी विश्वास दर्शक ठरावाच्या संपूर्ण प्रक्रियेलाच बेकायदेशीर असे संबोधले आहे.    
विधानसभेच्या अध्यक्षपदी श्री. हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड व्हावी यासाठी भाजपने आटोकाट प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि कॉंग्रेस व शिवसेनेने शस्त्रे खाली ठेवून या अध्यक्ष पदाच्या शर्यतीतून माघार घेतली. पुढचे काम भाजपच्या दृष्टीने अत्यंत सोपे झाले. वास्तविक पाहता विधानसभेचा अध्यक्ष हा नि:पक्षपाती असायला हवा पण सत्तेच्या मोहापायी काय वैध नि काय अवैध याचा सारासार विचार आणि  विवेक कोणालाच राहू नये याचे सखेद आश्चर्य वाटते आहे.  
या सगळ्या प्रक्रियेत भाजपने १४५ चा बहुमताचा आकडा गाठला आहे असे कुठेच सिध्द झालेले नाही. पण भाजपचे प्रवक्ते तर जोरजोरात सांगत आहेत की आम्ही बहुमत सिद्ध केले. पण ते नक्की कसे हे तुम्हाला मत दिलेल्या जनतेला तरी समजण्याचा हक्क आहे की नाही?
राष्ट्रवादीने आम्हाला पाठींबा जाहीर केला आहे, आम्ही थोडाच त्यांच्याकडे मागितला होता असे एकीकडे सारखे म्हणत राहायचे आणि शिवसेने बरोबर अजूनही आमची चर्चा सुरु आहे असे म्हणत संभ्रमावस्था निर्माण करायची अशी खेळी भाजपने सुरवाती पासूनच आरंभली आहे. राष्ट्रवादीचा पाठींबा न मिळता भाजपचे बहुमत कसे सिद्ध झाले हे एकदा जनतेला तरी कळू दे.  काँग्रेस -शिवसेनेचे मतविभाजन मागण्याचे 'timing' चुकले अशी तांत्रिक बाब पुढे करून भाजपने आवाजी मतदानाने  विश्वास दर्शक ठराव पारित करून घेतला आहे हे न समजण्या इतकी जनता दुधखुळी नाही.      

यापुढे सत्ता स्थापनेसाठी आसुसलेले इतर पक्ष सुद्धा याच तांत्रिक '(अ)-नीतीचा ' अवलंब आपल्या फायद्यासाठी करून घेतील हे निश्चित आहे. असा नवा 'आदर्श' प्रस्थापित करण्याचे श्रेय भाजपला द्यायलाच हवे.   
या महाराष्ट्र देशातील सर्वसामान्य मतदार भलेही या तांत्रिक बाबींशी अवगत नसेल परंतु अशा बनवाबनवीच्या आयुधाने व राष्ट्रवादीच्या छुप्या पाठींब्यावर तरलेले सरकार 'विश्वासार्ह' नाही हे खचितच त्याच्या मनामध्ये आजपासून अधोरेखित करेल.        

No comments:

Post a Comment