Thursday 23 February 2012

'प्रकाश'वाटांनी उजळलेला 'लोकबिरादरी प्रकल्प'


समाजसेवेचे एव्हरेस्ट सर केलेले महायोगी कै. बाबा आमटे,त्यांना सावलीसारखी साथ करणाऱ्या कै.साधनाताई आमटे आणि त्यांचे व्रत पुढे तितक्याच निष्ठेने सुरु ठेवणारे डॉ.प्रकाश आमटे, डॉ.सौ.मंदाताई आमटे आणि त्यांचे कुटुंबीय  हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर अवघ्या जगाचेच भूषण आहेत. 
१९७३ साली पुढाकार घेऊन कै.बाबांनी 'लोकबिरादरी प्रकल्प' स्थापन केला. या भागात राहणारे 'माडिया गोंड ' नावाचे आदिवासी सगळ्याच मानवी सुविधांपासून वंचित होते. साप,उंदीर,माकडे, मुंग्या या व्यतिरिक्त अन्न म्हणून काही असू शकते याविषयी ते पूर्णतया अनभिज्ञ होते. अठरा विश्वे दारिद्र्य पाचवीला पुजलेले! संभाषणकला अवगत नाही. शेती करता येत नाही. शिक्षणाचा गंध नाही. अनेक रोगांनी ग्रासलेले शरीर. अशा माडिया जमातीच्या विकासासाठी  डॉ.प्रकाश आमटे यांनी अक्षरश: जीव अंथरला. 
घनदाट अरण्याने वेढलेल्या गडचिरोली जिह्यातील आणि भामरागड तालुक्यातील हेमलकसा ह्या भागात हा प्रकल्प आहे. अरण्यात हिंस्त्र श्वापदे आहेत. मैलोनमैल जंगल तुडवीत जावे तेव्हा कुठे गावातील माणसांचे दर्शन होते. दळणवळणाच्या  कोणत्याही सोयी नाहीत. अशा ठिकाणी डॉ.प्रकाश आमटे त्यांच्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन गेली तीस एक वर्षे त्या दुर्गम भागातील आदिवासींची तसेच अनाथ वन्य प्राण्यांची सेवा करत आहेत. रुग्णालय आहे पण अद्ययावत वैद्यकीय सुविधा नाहीत, शाळा आहे परंतु शाळेसाठी लागणाऱ्या उत्तम सुविधा नाहीत, प्राण्यांचे अनाथालय आहे पण पैशांचा तुटवडा. असे असले तरीही कार्य जोमाने सुरु, उत्साहाला खीळ नाही, चेहऱ्यावरचे मृदू हास्यही अबाधित. दोन पायांच्या मनुष्यप्राण्यापेक्षा चार पायांच्या मुक्या जनावरांवर जास्त लोभ आणि विश्वास. आजारी आणि जखमी आदिवासींची शुश्रुषा करण्यासाठी हात सदैव तत्पर!  
श्री.विलास मनोहरांच्या 'नेगल' या पुस्तकामुळे हेमलकसातील अनाथालय ओळखीचे झाले. अस्वल, मगर, सिंह, वाघ, घोरपड, साप यांसारखे प्राणी सुद्धा लळा लावतात हे नव्याने कळले. नेगलचे आणि आरतीचे मित्रत्वाचे नातेही समजले. या सर्व अनाथ आणि मुक्या प्राण्यांना डॉ.प्रकाश सारखा पिता आणि डॉ.सौ.मंदाताई सारखी माता मिळाली. प्राण्यांच्या सुखदु:खाचा उलगडा झाला. हिंस्त्रपणे वागणारी माणसे आणि मायेने वागणारे प्राणी हा विरोधाभास प्रकर्षाने जाणवत राहिला. 
इथे जातपात,उच्चनीच,गरीब-श्रीमंत या संकल्पना नाहीत. धर्म,पंथ यांचा उहापोह नाही.प्रामाणिकपणे,सचोटीने मनुष्य-प्राण्यांची अहोरात्र सेवा करणे हाच येथील खरा धर्म आहे. नैसर्गिक आपत्ती येतात. पूर येतात. कधी जीवघेणी थंडी तर कधी असह्य उकाडा. परंतु या कश्याकश्याचाही सेवाकार्यावर परिणाम होत नाही. डॉ.प्रकाश आमटे याची पुढची पिढीसुद्धा त्यांच्याच व्रताचा वारसा त्याच निष्ठेने पुढे नेत आहे. दिगंत आणि अनिकेत यांनी याच कार्याला ईश्वर मानलं आहे. त्यांच्या विचारातील आधुनिकता त्यांना शाळा, रुग्णालय यांच्या सुसज्ज्यतेसाठी अमलात आणायची आहे. प्रकाश आमटे यांचे अनेक सहकारी उत्तम रीतीने या प्रकल्पासाठी आपले महत्वपूर्ण योगदान देत आहेत. तिथल्या शाळेत शिकून डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक वा इतर व्यावसायिक शिक्षण घेतलेल्यांना आजन्म त्याच परिसरात राहून कार्य करायचे आहे. माणसाच्या श्रमाचे मोल प्रेमात करणारी माणसे तिथे आहेत.  कोणतीही शहरी प्रलोभने यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करायला असमर्थ आहेत. शिक्षकांना शिक्षणाचा प्रसार करायचा आहे, डॉक्टरांना रुग्णांवर वैद्यकीय उपचार करून त्यांना अंधश्रद्धांतील फोलपणा पटवून द्यायचा आहे, मुक्या वन्य प्राण्यांची सेवा करून येथील आदिवासींची आणि प्राण्यांची या सेवाभावींना नव्याने गाठ घालून द्यायची आहे. आदिवासींचे आरोग्यसंवर्धन करायचे आहे. कुपोषित बालकांची समस्या सोडवायची आहे. प्राण्यांसाठी मुबलक अन्न उपलब्ध करून द्यायचे आहे. त्यांना ममतेचे बाळकडू पाजायचे आहे.    
शाळेतील मुलांच्या चेहऱ्यावर फुललेले आत्मविश्वासपूर्ण हास्य, रुग्णालयातून बरे होऊन घरी जाताना रुग्णांनी साश्रूनयनांनी कृतज्ञतापूर्वक दिलेली दुवा आणि मुक्या प्राण्यांच्या स्पर्शातून वाहणारी ममता हेच येथील सर्वांसाठी सर्वोच्च पुरस्कार आहेत.
शहरी भागांच्या आधुनिकीकरणाने दिपलेल्या आणि साऱ्या सुख-सुविधांच्या आधारे स्वर्ग शोधू पाहणाऱ्या शहरातील तरुण पिढीला या ' प्रकाशवाटा' आदर्श ठराव्यात आणि त्यांच्या पायाखालच्या वाटा अशा प्रेरणांनी उजळून निघाव्यात एवढीच इच्छा आहे.  



No comments:

Post a Comment