Monday 13 February 2012

का रे भुललासी वरलिया रंगा?

एखाद्याने चेहऱ्याला वरून मेक-अप फासला म्हणून काही तो अभिनयसम्राट  होऊ शकत नाही. तंबोरयाची पोझ घेऊन बसलेला माणूस जोपर्यंत तोंड उघडत नाही तोपर्यंत कदाचित मी महान गायक आहे असा आभास निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकतो. जातिवंत चित्रकाराची भाषा रंगाचा कुंचला आणि canvas आपापसात बोलके झाल्यावरच कळू शकते. वाघाचे कातडे पांघरले म्हणून वाघाची शूरता अंगी बाणता येत नाही. धनराशीत लोळणारयाला मखमली पलंगावर पडून झोपेचे सोंग वठवता येऊ शकते पण निद्रादेवीचे आणि त्याचे नाते घट्ट असेलच असे सांगता येऊ शकत नाही. बर्फीवरील चांदीचा वर्ख बघून बर्फीचा दर्जा ठरवता येत नाही. गुलाबाची कृत्रिम फुले घरातील फुलदाणी नक्की सजवू शकतात परंतु मनातील फुलदाणीला भावणारा सुवास निर्माण करू शकत नाहीत.
आजकाल माणसे एखाद्या वस्तूच्या अथवा व्यक्तीच्या बाह्यरुपावर चटकन भाळताना दिसतात. एखाद्याच्या रूपावरून, आर्थिक कुवतीवरून, सामाजिक प्रतिष्ठेवरून त्याचे मूल्यमापन केले जाते जे नेहमीच अचूक असू शकत नाही. व्यक्तीची आर्थिक क्षमता ही त्या व्यक्तीची बौद्धिक, वैचारिक पातळी मोजण्याची फुटपट्टी असू शकत नाही. फुगा जोपर्यंत फुगलेला असतो तोपर्यंतच तो आकर्षक वाटतो कारण त्याच्यातील आकर्षकता ही फक्त बाह्यरूपाने फुगण्यातच दृश्यमान होत असते. दही किती घट्ट लागले आहे हे समजण्यासाठी आपल्याला बरणीचे बंद झाकण उघडून बघायचे कष्ट घ्यावेच लागतात. वरकरणी सुंदर असलेली एखादी वास्तू आतून भकास,उदास, उजाड असू शकते. बाहेरून आधुनिक दिसणाऱ्या फ्रीजमधील थंड पाण्यापेक्षा बाहेरून ओबडधोबड दिसणाऱ्या माठातील पाणी शरीराला जास्त उपकारक ठरू शकते. आकर्षक वेष्टनात गुंडाळलेली एखादी वस्तू कदाचित शोभिवंत असू शकेल पण उपयोगी असेलच असे नाही. 
पुलंनी आपल्या एका पुस्तकात वसंतराव देशपांडे यांच्याविषयी लिहिले आहे की वसंताचे गायक म्हणून खरे सामर्थ्य दोन तंबोऱ्यांच्यामध्ये तो बसल्यानंतरच जाणवायचे. त्यावेळी एखादा राग आळवताना वसंता कुणीतरी वेगळाच होऊन जायचा. त्याची ती मूर्ती देव्हाऱ्यातील देवासारखी पूज्य वाटायची. रात्री मैफिल गाजवून सकाळी जेव्हा वसंता त्याच्या सायकलवर टांग मारून कारकुनी करायला निघायचा तेव्हा वाटायचे की काल जो गायला तो हाच होता का?  ज्या इमाने-इतबारे तो गायला त्याच इमाने-इतबारे त्याने नोकरीही केली. मी कोणीतरी मोठ्ठा गायक अशा भ्रमात तो कधी वावरला नाही आणि मी ऑफिसमध्ये जाऊन कारकुनी करतो ह्या जाणीवेने तो कधी शरमिंदा झाला नाही. तो आपले प्रत्येक काम सर्वस्व ओतून करायचा. श्रेष्ठता-कनिष्ठता या वर्गीकरणाला त्याच्या मनात कधी स्थान मिळाले नाही आणि म्हणूनच त्याच्यातील माणुसकीचे सत्व त्याला एक दर्जा बहाल करून गेले जो आमच्यातील मैत्रीचा एक दुवा होता.  
एखादी व्यक्ती सकृतदर्शनी  कशी दिसते, कशी भासते यावर अंदाज बांधणारे बहुतांश असतात. गरीब-श्रीमंत, चांगली-वाईट, उच्च-नीच अशी सगळी नामाभिधाने लावण्यासाठी सोपी असतात. त्यासाठी माणसांना विशेष कष्ट पडत नाहीत पण एखाद्याच्या अंतरंगात सुहृद होऊन डोकावणे हे सहजसोपे नसते. त्यासाठी लागणारा निखळ मैत्रीचा हात हा मनात कोणत्याही वर्गवाऱ्या कोणतीही किल्मिषे, कोणतेही पूर्वग्रह न ठेवता पुढे करावा लागतो.  विहिरीचा तळ शोधायचा असेल तर काठावर उभे राहून चालत नाही त्यासाठी खोल पाण्यात निधडेपणाने उडी घ्यावी लागते.  
आकाशात फुललेलं इंद्रधनुष्य सहज पाहता येतं पण माणसाच्या मनात फुललेलं इंद्रधनुष्य पाहायला प्रगल्भ दृष्टी लागते जी ह्या लौकिक गोष्टींच्या पलीकडील असते. देवाच्या मूर्तीला सोन्या-चांदीने मढविणारे पुष्कळ असतात पण मनातील भक्तीभावाचा अभिषेक करणारे क्वचितच सापडतात. कोणताही देव हा पैसे किंवा अलंकार याचा भुकेलेला नसून तो फक्त भावाचा भुकेलेला असतो हे समजण्यासाठी संत-साहित्य वाचायचे कष्ट माणसाला घ्यावे लागतात. जात-पात,वर्गवारी,उच्च-नीचता,आर्थिक भेदाभेद यांपलीकडे एखाद्याला समजून घेण्याची मानसिकता अभावानेच आढळते.  
माणसाकडे असलेली घर,बंगला,गाडी,ऐवज,स्थावर जंगम ही भौतिक सुखे पाहून दिपणारेच अधिक असतात. परंपरागत हक्काने आलेले अथवा माणसाने कमावलेले हे धन माणसाला वरपांगी ऐश्वर्य बहाल करू शकते पण मनाने ऐश्वर्यसंपन्न  असणारी माणसे ही येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरक ठरतात. पूज्य बाबा आमटे, मदर तेरेसा यांसारख्या विभूती जेव्हा या पृथ्वीतलावर जन्म घेतात तेव्हा त्यांच्या ऐश्वर्यसंपन्न विचारांमुळे, आचारांमुळे अनेकांना संजीवनी मिळते, त्यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो.  
आज माणूस दोन हात आणि दोन पायांनी जगातील सारी भौतिक सुखे ओरबाडू पाहतो आहे. पैशांनी माणसे विकत घेण्याची किमया त्याला साधली आहे. लोकांना आपल्यापुढे नमविण्याचे कसब त्याला बऱ्यापैकी अवगत झाले आहे. अनेक तात्कालिक आणि नाशवंत गोष्टींच्या आधारे गगनाला गवसणी घालण्यासाठी त्याचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. आपल्या मूल स्वरूपावर त्याने अहंमन्यतेची, व्यापारी वृत्तीची पुटे चढवली आहेत आणि आपल्या अंतर्यामी वसत असलेल्या त्या ईशस्वरूपाचा त्याला पूर्णत: विसर पडत चालला आहे.  
एका गावात असलेल्या देवळात महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना दुग्धाभिषेक करण्यासाठी अनेक धनिकांची चढाओढ  लागली होती. सोन्या-चांदीच्या मोठ्या लोट्यांतून हे धनिक गाभाऱ्यातील पिंडीवर अभिषेक करत होते पण काही केल्या गाभारा भरत नव्हता. या रांगेमध्ये असलेल्या गोर-गरिबांकडे हे श्रीमंत अतिशय तुच्छतेने बघत होते. एक जख्खड म्हातारी या रांगेत कशीबशी उभी होती. तिच्याकडे एका फुटक्या पेल्यात जेमतेम दूध  होते. बऱ्याच वेळानंतर तिची पाळी आली. तिने देवाला भक्तिभावाने हात जोडले आणि म्हणाली,' घरी अन्नान्नदशा आहे. एकुलत्या एका गायीने दिलेल थोडं दूध उपाशी असलेल्या नातवाला पाजलं आणि उरलंसुरलं दूध घेऊन तुझ्याकडे आले आहे पण रागावू नकोस. आमच्यावर कृपा कर.' असे म्हणून तिने ते दूध पिंडीवर ओतले आणि अहो आश्चर्यम! गाभारा पूर्ण भरला. हा चमत्कार पाहून लोक तिच्या पायी पडू लागले.  राजाकरवी तिचा सन्मान केला गेला आणि या कुटुंबाच्या चरितार्थाची काळजी मिटली. 
या खुलभर दुधाच्या कहाणीचा आज लोकांना सोयीस्कररित्या विसर पडला आहे याचे वैषम्य वाटते.

No comments:

Post a Comment