Tuesday 20 December 2011

आजी-आजोबा

कालौघात आजी-आजोबा ही जिव्हाळ्याची संस्था नामशेष होत चालली आहे. जणू काही घरातून देवघराची उचलबांगडीच झाली आहे. सुरकुतलेल्या हातांनी मायेच्या माणसांसाठी केलेल्या  पुरणपोळीचे महत्व  कमी कमी होत चालले आहे. सायंकाळी तुळशी-वृंदावना समोर भक्तिभावाने जोडलेले हात, नातवंडे मांडीवर घेऊन म्हटलेले श्लोक , मायेने भरवला जाणारा गुरगुट्या भाताचा घास, डोळ्यांवर पेंग येत असताना ऐकू येणाऱ्या पंचतंत्रातील सुरम्य कथा,परीक्षेचा निकाल चांगला लागल्यानंतर पाठीवरून फिरणारा आजोबांचा कौतुकाचा हात आणि त्यानंतर आजीने हातावर दिलेली खोबऱ्याची वडी या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत.
आजकाल न्युक्लीयर कुटुंबाची कल्पना जिथेतिथे बोकाळली आहे. घराच्या चार भिंती इतक्या संकुचित झाल्या आहेत की त्यात आजी-आजोबांना सामावून घेण्यासाठी जागाच राहिलेली नाही. सोयी-सुविधांची तणे नको तेवढी माजली आहेत. पैसे कमावण्याच्या शर्यतीत प्रत्येकजण स्वत:ला मरेस्तोवर झोकून देतो आहे. अपरिहार्यतेच्या नावाखाली ज्याने त्याने नात्यांनाही कडी-कुलुपात बंदिस्त केले आहे. यंत्राच्या आधीन माणूस झाला आहे आणि त्याने स्वत:चेही यंत्र करून घेतले आहे. या यंत्रवत आयुष्यात भाव-भावनांची पाळेमुळेच गोठून गेली आहेत. म्हणूनच टोलेजंग इमारतीत खरेदी केलेल्या हजार चौरस फुटांच्या प्रशस्त ब्लॉकमध्ये  आजी-आजोबांसाठी एखादी खोलीही नाही. आधुनिक यंत्रे,खेळणी,फर्निचर यांच्या साम्राज्यात जुन्यापुराण्या आउट-डेटेड मॉडेल्सना जागाच नाही. 
आजकाल म्हणे लग्न करू इच्छिणारी मुलगी लग्नाआधी मुलाला विचारते की तुझ्या घरात किती गार्बेज आहे? या गार्बेज मध्ये मुलाचे आई-वडील,असले तर आजी-आजोबा,काका-काकी,आत्या इत्यादी कुणीही मोडू शकतात. किती गार्बेज आहे हे मुलाने सांगितले की मग ती ठरवणार की असल्या गार्बेजवाल्या गोडाऊनमध्ये राहायचं की नाही ते. मुलाला तिच्याशी लग्न तर करायचं असतं त्यामुळे तो मग नवीन ब्लॉक घेतो आणि अडगळीच्या वस्तू जुन्या जागेत सोडून येतो. तिला स्वतंत्र राज्य मिळतं आणि भंगार तिच्या घरात येत नाही. काही वर्षे गेल्यानंतर आपल्यालाही रद्दीचाच भाव येणार आहे या सत्याकडे तात्पुरती का होईना पण पाठ फिरवली जाते. 
मुलांनी शाळेतून घरी आल्यानंतर दाराला काय बघायचं तर मोठ्ठं कुलूप! ते स्वहस्ते उघडून आत शिरायचं, खायचं अन्न मायक्रोवेव्ह मध्ये गरम करायचं, संगणकाशी खेळत मन रमवायच, रिकामं घर न्याहाळत बसायचं आणि अभ्यास संपवून रात्री उशिरा येणाऱ्या आई-वडिलांची वाट पहायची. या दिनक्रमात पाहुणे म्हणून चार दिवस आलेल्या वडील-धारयांच्या येण्याने खंड पडला तर चरफडत राहायचं. ही नव्या युगातील कितीही कटू वाटली तरी वस्तुस्थिती आहे.      

ढळला रे ढळला दिन सखया
संद्याछाया भिवविती हृदया 
अता मधूचे नाव का सया
लागले नेत्र रे पैलतीरी 
अशा अवस्थेप्रत मार्गक्रमणा करणाऱ्या आजच्या आजी-आजोबांची ही हृद्य कहाणी आहे व त्यावर आस्थेची,मायेची फुंकर घालता न येऊ शकणाऱ्या तुम्हा-आम्हा सर्वांचाच हा दारूण पराभव आहे. 

No comments:

Post a Comment