Monday 30 November 2015

'Happy to Bleed' च्या निमित्ताने …….

कुठल्याशा देवस्थानच्या अध्यक्षांनी 'मासिक पाळी सुरु असलेली स्त्री शोधणारं यंत्र जेव्हा येईल तेव्हाच त्यांच्या प्रवेशाबाबत निर्णय घेऊ' अशा आशयाचं स्वत:चं प्रतिगामित्व सिद्ध करणारं वक्तव्य केलं आणि देशभरातील महिला विशेषत: युवती आक्रंदून उठल्या. मोर्चे, चर्चा, लेख यांना उधाण आलं.    
मुळात स्त्री अथवा पुरुष कोणत्याही देवालयात जेव्हा प्रवेश करतात तेव्हा त्यांच्या शरीराबरोबर त्यांचे मनही शुचिर्भूत असण्याची नितांत आवश्यकता असते. पावित्र्याच्या कल्पना या केवळ शरीराशी संबंधित नसून त्या मनाशीही संबंधित असतात. जर शरीराबरोबर मनाची शुचिर्भूतता पारखणारं यंत्र अस्तित्वात आलं तर मला शंका आहे की देशभरातील १% पुरुषांना तरी मंदिरात प्रवेश मिळेल का?  
स्त्रियांना येणारी मासिक पाळी म्हणजे पावित्र्याचा ऱ्हास किंवा अशी स्त्री मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेण्यास अपात्र हे कोणी ठरवलं? 'भाव तेथे देव' या उक्तीप्रमाणे 'देव' या संकल्पनेचा माणसाच्या मनात वसणाऱ्या भावाशीच फक्त संबंध आहे. तिथे शरीराचा संबंध येतच नाही. मनात काडीचाही भक्तीभाव नाही तरी देवळात जाऊन पैसा आणि सोनेचांदी यांची खैरात करणारे महाभाग पवित्र का म्हणून समजायचे? पुरुषांना मासिक पाळी येत नाही म्हणून त्यांच्या तथाकथित पावित्र्यावर शिक्कामोर्तब करणारे पुरुषच ना? म्हणजे देवाबद्दल श्रद्धा, भक्ती मनाच्या गाभाऱ्यात न का वसेनात पण मंदिराच्या गाभाऱ्यात यांना बिनदिक्कत प्रवेश! शरीराचे आणि देवाचे नाते तेवढेच महत्वाचे पण मनात जपलेले पावित्र्य कवडीमोलाचे! प्रत्येकाच्या मनातील परमेश्वराचा अंश ज्याला त्याला जपता येणं हाच खरा धर्म. मनातील विचारांचे पावित्र्य उघड करणारे यंत्र आले तर देवळे ओस पडतील याची खात्री आहे.   
पूर्वीच्या काळी घरातील बाईचा परीघ सीमित होता तरी आलेल्या पाहुण्यांची सरबराई, आल्यागेल्याची उठबस करता करता बायका दमून जायच्या. शिवाय त्या काळी यंत्रांची उपलब्धता नसल्याने अंगमेहनतीची कामेही बरीच असायची. मासिक पाळीच्या चार दिवसांतील सक्तीची विश्रांती हा शिणवटा कमी करण्याचा एक हेतू होता. रजस्वला स्त्रीची शारीरिक झीज कमी व्हावी तसेच तिची चिडचिड, तिचा त्रागा कमी व्हावा असाही त्यामागे उद्देश होता. पण अशा 'कावळा शिवलेल्या' स्त्रियांना जी वागणूक मिळत असे ती सर्वस्वी आक्षेपार्ह होती. तिला शिवायचं नाही, तिच्या जवळ जायचं नाही, तिचे जेवणाचे ताट दुरून सरकवायचे, तिला स्वयंपाकघरात प्रवेश द्यायचा नाही, देवघरात जाण्यास मज्जाव करायचा हे सामाजिक वर्तन निंदनीय होते. आज इतक्या वर्षांनंतरही जर ही मानसिकता समाज बदलू शकत नसेल तर अशा प्रतिगामी घटकांनाच बहिष्कृत करण्याची गरज आहे.                   
अनेक वर्षांपासून पौरुषत्वाचे झेंडे मिरवणारयांकडून हे स्त्रीचं 'दमन' होत आलं आहे. स्त्रीचं खच्चीकरण हेच काही पुरुषांच्या आयुष्याचं ब्रीद असतं. बौद्धिक दृष्ट्या प्रगत नसलेले आणि स्त्रीच्या शरीराबद्दल वैज्ञानिक दृष्ट्या अनभिज्ञ असलेलेच असे वाद निर्माण करत असतात. ज्या समस्त पुरुष जातीची उत्पत्ती ज्यापासून झाली आहे अशा उत्पत्तीस्थानाला अपवित्र ठरवणारे आणि या कारणास्तव त्यांना मंदिरात प्रवेश नाकारणारे पुरुष 'शिव-शक्ती' च्या नात्याविषयी कितपत सज्ञान आहेत असा प्रश्न पडतो. शुचिता आणि सामर्थ्य यांच्या संयोगातून विश्वाचे सृजन झाले आणि त्यामुळेच स्त्री आणि पुरुष यांच्यात कोणतीही श्रेष्ठ-कनिष्ठता नाही तर वास्तविक स्त्री व पुरुष हे परस्पर पूरक आहेत या माहितीकडे यांनी सोयीस्कररित्या डोळेझाक केलेली दिसते.             
वर्षानुवर्षे त्याच त्याच ऐकलेल्या आणि बघितलेल्या गोष्टी महिलांवर लादायच्या आणि आपण आखून दिलेल्या मार्गावरूनच त्यांनी चालायचे हा आग्रह धरायचा हा बहुतांश पुरुषवर्गाचा खाक्या आहे. पण यापुढे नव्या पिढीतील स्त्रिया ह्या बुरसटलेल्या प्रथा , चालीरीती यांना नजीकच्या काळातच तिलांजली देतील. त्या स्वत:चा मार्ग स्वत: निर्माण करतील जो त्यांच्यासाठी सन्मान्य असेल. त्यांच्या पावित्र्याच्या कल्पना या शरीराशी नसून मनाशी निगडीत असतील. मनाच्या पवित्र गाभाऱ्यातील देव त्यांना तिथेच गवसेल आणि मग अशा तथाकथित परंपरांना कवटाळून बसणारयांनी बांधलेल्या मंदिराच्या पायऱ्या चढायची त्यांना गरजच भासणार नाही.                 

No comments:

Post a Comment