Monday 14 December 2015

बाजीराव -मस्तानी ….


संजय लीला भन्साळी यांचा बाजीराव-मस्तानी हा बहुचर्चित चित्रपट येत्या १८ तारखेला चंदेरी पडद्यावर झळकणार आहे. यातील गाण्यांचे प्रोमोज टीव्ही वर दाखवले जात आहेत. भन्साळी यांनी म्हणे तब्बल बारा वर्षे या चित्रपटाची अभ्यासपूर्ण तयारी केली(?) बाजीराव हे खंदे लढवय्ये होते. मस्तानीचा  उल्लेख 'नाटकशाळा' असा केला जायचा. काशीबाई या बाजीरावांच्या भार्या असून त्या शालीन आणि कुलीन अशा स्त्री होत्या. त्यांची मस्तानीबरोबरची उठबस ही अशक्यप्राय कोटीतील गोष्ट होती. शिवाय बाजीराव हे फक्त नाच-गाण्यात रमणारे राज्यकर्ते नसून एक शूर आणि निष्णात राजकारणी म्हणून त्यांचा लौकिक होता. या पार्श्वभूमीवर या आगामी चित्रपटातील बाजीरावांवर चित्रित केलेले आणि काशीबाई आणि मस्तानी या दोघींवर चित्रित केलेली गाणी पूर्णपणे आक्षेपार्ह आहेत.          
इतिहासाच्या निरीला हात घालताना तो जरा जपूनच आणि अवधान सांभाळूनच घालावा लागतो हे भन्साळी यांना कुणीतरी सांगायला हवे. अनेक दस्तऐवजातून  आणि चरित्रातून ह्या अलौकिक व्यक्तींच्या उज्ज्वल प्रतिमा करोडो लोकांच्या हृदयात कोरल्या गेलेल्या असतात. या अशा लोकोत्तर पुरुषांचे तेजोमय कर्तृत्व हे अनेकांसाठी एक स्फूर्तीस्थान असते. त्यांचे खाजगी आयुष्य हा फक्त त्यांच्या संपूर्ण जीवनातील एक भावनिक कप्पा असतो जो इतरांसाठी बंद असतो. अशा वीरांचे खाजगी आयुष्य चव्हाट्यावर आणून जणू काही अशा प्रकारचेच जीवन बाजीराव जगत होते हे दाखवण्याचा खटाटोप या चित्रपटाच्या निमित्ताने केला जात आहे.  
शिवाजी महाराजांचे खाजगी आयुष्य अथवा ज्या शूरांनी स्वपराक्रमाने इतिहास घडवला त्यांचे खाजगी जीवन अधोरेखित करून काय साधले जाणार आहे? ज्या व्यक्तींशी आपले नाते हे केवळ त्यांच्या असाधारण कर्तृत्वामुळे जोडले जाते त्या व्यक्तींच्या खाजगी जीवनाचा उहापोह चित्रपटाद्वारे करून कोणता संदेश जनमानसात दिला जातो याचे भान ठेवणे नितांत गरजेचे आहे. ज्या नव्या पिढीतील तरुणांनी बाजीरावांना कधी इतिहासातून अथवा कथा-कादंबरी यांच्या माध्यमातून अनुभवलेच नाही अशा व्यक्तींना बाजीरावाची ही पडद्यावर साकारली गेलेली प्रतिमाच खरी वाटू लागेल.  जे जाणते आहेत आणि बाजीरावांचे लढवय्येपण ज्यांनी इतिहासातून अनुभवले आहे  त्यांना ही गाणी म्हणजे बाजीरावांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रतिमेचे धिंडवडे वाटल्याशिवाय राहणार नाहीत.    
केवळ भव्य-दिव्य आणि दिमाखदार सेट्स लावून, नट्यांना भरजरी साड्या आणि दागिन्यांनी मढवून इतिहासाची पाठराखण करता येत नाही. लोकांची दिशाभूल मात्र जरूर करता येते. भन्साळी यांच्या चित्रपटातील सोहळे जरी कितीही नेत्रदीपक असतील तरी त्यांनी हे लक्षात घ्यावे की अशा महापुरुषांचे कार्य हेच मुळी जनसामान्यांचे डोळे दिपवणारे होते.  बाजीरावांचे फक्त मस्तानीवर प्रेम नव्हते तर त्यांच्या तख्तावर, राज्यातील जनतेवर आणि त्यांच्या नसानसातून स्त्रवत असलेल्या शौर्यावरही त्यांचे निस्सीम प्रेम होते. त्यांची निष्ठा नाच-गाण्यापेक्षा त्यांच्या समशेरीवर अधिक होती. घडलेला इतिहास त्याचे विद्रुपीकरण करून किंवा तो भ्रष्ट स्वरुपात दाखवणे हे थोर पुरुषांचे चारित्र्यहनन केल्यासारखेच आहे.       
असो.  चित्रपटावर आताच भाष्य करणे योग्य होणार नाही कारण अजून हा चित्रपट रिलीज झालेला नाही. परंतु त्यातील गाण्यांची झलक मात्र इतिहासाचे वास्तव गढूळ करणारी आहे असे प्रामाणिकपणे वाटते.  

1 comment: