Wednesday 25 November 2015

अभिनेता आणि 'सत्यमेव जयते' फेम आमीर खान यांस उद्देशून …….


का हो तुम्हाला दुर्बुद्धी सुचली असे वक्तव्य करण्याची? ही दुर्बुद्धी म्हणायची की तुमच्या आगामी 'दंगल' या चित्रपटासाठी केलेला पब्लिसिटी स्टन्ट? तुमच्या सारखीच करोडो कुटुंबे या भारत देशात राहतात. असहिष्णुता वाढली म्हणून यापैकी किती कुटुंबे दुसऱ्या देशात स्थलांतरित होण्याचा विचार करतात? आणि इतर देशांत सगळेच आलबेल आहे का? तिथेही काही खटकणाऱ्या गोष्टी असतीलच ना? थोडे आत्मपरीक्षण केलेत तर तुम्हाला या देशातील सहिष्णुतेची ग्वाही मिळेल.     
एक अभिनेता म्हणून तुमची वाटचाल सुरु झाली त्यावेळेस या भारत देशातील जनता तुमची जात, तुमचा धर्म लक्षात न घेता तुमच्या अभिनयाला दाद देत होती. कोणत्याही जातीच्या,धर्माच्या,पंथाच्या पलीकडे तुमचे आणि सिनेरसिकाचे नाते निर्माण झाले. तुम्ही अभिनयात बाजी मारून जवळजवळ प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वत:चं एक अढळ स्थान निर्माण केलंत. दिल चाहता है, थ्री इडीयट्स, सरफरोश, लगान, गजनी, पीके हे व असे अनेक चित्रपट रसिकमनात तुमच्या अभिनयाची मोहोर उमटवून गेले.             
पीके या चित्रपटात तुम्ही हिंदू धर्माची, देवदेवतांची यथेच्छ खिल्ली उडवलीत, श्रद्धांची थट्टा केलीत, रुढींचा उपहास केलात, तरीही हा चित्रपट चालला. जरा कल्पना करा की अशा प्रकारचा चित्रपट तुम्ही इस्लामी देशांत केला असतात तर आज हे वक्तव्य करण्यासाठी तरी शिल्लक राहिला असतात का? या देशातील जनतेने तुम्हाला खऱ्या अर्थाने 'हिरो' बनवलं. या जनतेमुळेच तुम्हाला कीर्तीची चव चाखायला मिळाली. तुम्ही प्रथितयश झालात. अनेक मानसन्मान तुम्हाला लाभले. अनेक तरुणांचे तुम्ही 'रोल मॉडेल' झालात तर तरुणींनी तुम्हाला त्यांच्या मनात पूजलं.            
तुम्ही 'सत्यमेव जयते' नावाच्या शो च्या माध्यमातून छोट्या पडद्यावर आलात. अनेक संवेदनशील मुद्दे हाताळलेत. अनेक उद्बोधक चर्चा घडवून आणल्यात. पीडितांच्या समस्या समजून घेतल्यात. त्यांच्या व्यथा ऐकताना अनेक वेळा तुमच्या डोळ्यांत पाणी तरळलेले अवघ्या भारतवासियांनी पाहिले. तुम्ही या शो द्वारे एक 'अवेअरनेस' जनतेत निर्माण करायचा प्रयत्न केलात जो स्तुत्य होता. अर्थात तुमची ही 'समाजसेवा' चालू आहे या भ्रमात भारतीय जनता मुळीच नव्हती. तरीही या शो ला प्रचंड लोकप्रियता मिळाली. प्रत्येक प्रोजेक्ट मधून तुम्ही उदंड पैसा कमावलात. या देशातील जनतेची तुमच्यामध्ये झालेली मानसिक गुंतवणूक एन्कॅश करण्यात तुम्ही यशस्वी झालात. या देशातील जनतेने तुम्हाला जे मिळवून दिले तो त्यांच्या सहिष्णुतेचा परिपाकच होता. आज 'आमीर खान' या नावाला आलेलं वलय केवळ या भारत देशातील जनतेमुळेच आहे याचा आपल्याला सोयीस्कर विसर पडला का हो?                       
जगाच्या पाठीवर कोणी कुठे रहावे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय आहे. आपल्या कुटुंबाच्या भवितव्याची चिंता जर आपल्याला एवढी सतावत होती तर आपण केव्हाच हा देश सोडायला स्वतंत्र होतातच. आपल्याला कोणी अडवलं होतं का? या देशातील असहिष्णुतेविषयी जाहीर भाष्य करून आपण अनेकांचा रोष ओढवून घेतलात. सगळीकडे चर्चांची राळ उठवून दिलीत. आपल्याला हेच अपेक्षित होते का? अशा प्रकारे आपल्याला मिळालेल्या कुप्रसिद्धीचा वापर आपल्याला 'दंगल' या चित्रपटासाठी करून घेता येऊ शकतो ही शक्यता आपण विचारात घेतलीत का? या निमित्ताने आमीर खान हे नाव पुनश्च ज्याच्या त्याच्या तोंडी येईल हे तुमचं गणित अचूक आलं का?         
आपल्याकडे लोकांचं चुकतंच. आपण या अभिनेत्यांना एकदम डोक्यावर घेतो. त्यांना देवाचा दर्जा द्यायला मागेपुढे पाहत नाही. कमी म्हणून त्यांची देवळेही बांधतो. आपलं आयुष्य ही हिरो मंडळी व्यापून टाकतात. इतके की आपण त्यांच्यापुढे थिटे वाटायला लागतो. खणखणीत पैसे मोजून ही स्वत:ला कलाकार म्हणवणारी मंडळी समाजसेवेचा आव आणून अभिनय करतात. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात जे आपण ओळखू शकत नाही. अर्थात ह्यालाही अपवाद आहेत. ह्या 'नटश्रेष्ठ' मंडळींची पूजा बांधण्याऐवजी या भूतलावर अशा अनेक व्यक्ती आहेत ज्या पूजेस पात्र आहेत त्यांच्या दिशेने आज जनतेने मोर्चा वळवला पाहिजे. या भारत देशासाठी आपले तनमनधन अर्पण करणाऱ्या भूमिपुत्रांचे आपण चाहते झालो पाहिजे. अत्यंत निरलसपणे समाजासाठी, देशासाठी झटणाऱ्या व्यक्ती हेच खरे आपले 'हिरो' असतात, नायक असतात.                 
मेकअपच्या आत दडलेला खरा चेहरा असा प्रसंगी बाहेर येतो आणि मग हीच जनता त्याच लोभस वाटणाऱ्या चेहऱ्याला डांबर फासायला कमी करत नाही. अनेक वर्षे पूजनीय वाटणारी व्यक्ती मग निंदनीय वाटू लागते. भक्तीची जागा संताप घेतो. आतापर्यंत ही गोष्ट आमिर खान ह्यांना समजली असेल असे वाटते. स्वत:च्या वक्तव्याबद्दल त्यांनी फेरविचार जरूर करावा. इच्छा असल्यास समस्त देशवासीयांची माफी मागावी अथवा असहिष्णुतेचे कारण पुढे करून आपल्या कुटुंबकबिल्यासह गाशा गुंडाळावा.                    

2 comments: