Tuesday 17 July 2012

प्रश्नांचा भाता आणि उत्तरांचे बाण........


सर्वात 'कठीण' गोष्ट कोणती?
शेवकांडीचे लाडू.
न मागता मिळणारी गोष्ट कोणती?
लाथ.
तुम्हाला अर्जुन व्हायला आवडेल का?
ते पोपट कोण आहे यावर अवलंबून राहील.
 तुमचे 'आदर्श' कोण?
माननीय चव्हाण साहेब.
सगळ्यात मोठी बालवाडी कोणती?
लोकसभा.
जंगलाएवढी गूढ व भयानक गोष्ट कोणती?
दाढी.
 स्वच्छ डॉक्टर, स्वच्छ हवा यात जास्त दुर्मिळ गोष्ट कोणती?
आरोग्य आणि हवामानखात्याचे स्वच्छ अहवाल पाहायला मिळाले की स्पष्ट होईल.
पाण्याइतकी वाहती गोष्ट कोणती?
सर्व 'बाबा' लोकांचे ऐश्वर्य.
मिठाईइतके गोड काय असते?
राजकारण्यांची आश्वासने.
सर्वात महाग गोष्ट कोणती?
हास्य.
सोयीस्कर आंधळ्यांना काय म्हणतात?
समाज.
सगळ्यात उत्तम कोठा कोणाचा असतो?
कितीही खाल्ले तरी अपचन न होणारयाचा अर्थात..............  
उंदीर आणि अभ्यास यांत काय साम्य आहे?
उंदीर वस्तू पोखरतात आणि अभ्यास मुलांचा मेंदू पोखरतो.
तिन्ही त्रिकाळ करायला आवडेल अशी गोष्ट कोणती?
झोप.
 अहंकाराचा फुगा कसा फोडावा?
नम्रतेच्या टाचणीने.  
राजकारणी आणि मल्ल यांच्यातील साधर्म्य कोणते?
प्रतिस्पर्ध्याविरुद्ध दंड थोपटणे.
पावसाळ्यात कोणती गोष्ट करावी?
पर्जन्यखात्याचे अंदाज कधी खरे मानू नयेत.
राग म्हणजे काय?
जो श्रोत्यांची पर्वा न करता आळवला जातो तो.
शरीरयष्टी आणि स्वभाव यांच्यातील विरोधाभासाचे उदाहरण कोणते?
दारासिंग.
महत्वाचा दिवस कोणता?
सुट्टीचा प्रत्येक दिवस.
लोकसंख्यावाढीचे कारण काय?
प्रेम ,प्रेम आणि प्रेम.
दिवसेंदिवस दुर्लभ होत जाणारी गोष्ट कोणती?
एकमेकांचा सहवास. 
 कोणते शिखर सर करायला अत्यंत अवघड असते?
त्यागाचे.
कायदा हातात घेणाऱ्यांना काय म्हणतात?
उच्चभ्रू.
आजच्या स्त्रीला कोणती उपमा द्याल?
आधुनिकतेचा वर्ख पांघरून परंपरेच्या रंगात बुडालेली शोभिवंत मिठाई. 
रेखाने राज्यसभेत येऊन नक्की काय साधले?
जयाला विचारा.
एखादी अ-वास्तव वाटणारी गोष्ट कोणती?
आत्मचरित्र.
दोन सावत्र गोष्टी कोणत्या?
नीती आणि कीर्ती.
या पृथ्वीवरील 'देव'माणसे कोण?
यशवंत देव, रमेश देव, मंजिरी देव.
गाण्याच्या मैफिलीला जाताना काय करावे?
कापसाचे बोळे बरोबर घ्यावेत.
पापे करणाऱ्यास देव पाताळात धाडतो म्हणजे कुठे धाडतो?
सरकारी ऑफिसात.
 सर्वात मोठे कुरण कोणते?
आध्यात्मिक क्षेत्र.
सर्वात मोठे मायाजाल कोणते?
अभिनय क्षेत्र.
सर्वात मोठे उत्खनन कोणते?
राजकीय क्षेत्र.
आवाज कोणाचा?
सत्तेची भीक मागणारयांचा. 
नाच कोणाचा?
जनतेचे पाय आवळणारयांचा.
आखाडा कोणाचा?
नीतीच्या छाताडावर आरूढ होऊन मर्दानगीचा आव आणणारयांचा.
नामशेष झालेली गोष्ट कोणती?
संवेदना.
विस्मृतीत गेलेली गोष्ट कोणती?
देशाभिमान.
हरवलेली गोष्ट कोणती?
लाज.
हरपत चाललेली गोष्ट कोणती?
माणुसकी.



No comments:

Post a Comment