Tuesday 19 June 2012

लग्नाच्या बायका म्हणजे पायपुसणी नव्हेत

'नातिचरामी' हे विवाहाचं ब्रीदवाक्य असतं हे लग्नानंतर बहुतांश नवरे विसरूनच जातात. एकमेकांच्या साथीसोबतीने केलेला संसार चेहऱ्यावरची  समाधानाची घडी विस्कटू देत नाही. स्त्री -पुरुष हे एक-दुसऱ्यासाठी पूरक असतात. परस्परांच्या प्रापंचिक गरजांची पूर्तता विवाहाच्या माध्यमातून होत असते जी सर्वसंमत असते. परंतु लग्न लागते आणि विवाहितेची शारीरिक आणि मानसिक शक्ती पणाला लागते.  
बायकोवर अत्याचार करून तिला आपल्या मुठीत ठेवण्याची पद्धत अनेक पुरुषांना सन्माननीय वाटते. आपण पती आहोत म्हणजेच आपल्या बायकोवर हात टाकण्याचा, तिला वाट्टेल ते बोलण्याचा परवानाच जणू काही समाजाने दिलेला आहे अशी गोड गैरसमजूत अनेक नवरे करून घेतात. तिचा व तिच्या माहेरच्यांचा सतत पाणउतारा करणे, तिच्या कर्तृत्वाला तुच्छ लेखणे यात अनेकांना धन्यता वाटते. आपण आज्ञा करावी आणि आपल्या बायकोने ती तत्काळ पाळावी अशी यांची इच्छा असते. मी उठ म्हणताच तिने उठले पाहिजे आणि बस म्हणताच तिने बसले पाहिजे अशा भ्रामक कल्पनांनी  हे नवरे पछाडलेले असतात.    
बायकोला दार उघडायला उशीर झाला की वसकन अंगावर ओरडायचे, मनासारखे खायला केले नाही की शिव्या घालायच्या,  फोनवर कुणाशी बोलली की सारखा संशय घ्यायचा, एखाद्या प्रश्नाचे तोंड वर करून उत्तर दिले की थोबाडीत हाणायची हे बऱ्याच नवऱ्यांना पुरुषार्थाचे लक्षण वाटते. अनेक बायकाही पुरुषांच्या या तथाकथित समजुतींना आपल्या विनाकारण सोशिक वागण्याने खतपाणी घालत असतात. 
माझ्या ओळखीचे एक कुटुंब होते. ब्राह्मणकुलोत्पन्न म्हणून टेंभा मिरवणारे. त्या घरातील नवरा नामक दानव बायकोच्या उरावर बसून तिची यथेच्छ पिटाई करत असे. ती उर फुटेस्तोवर ओरडायची. ही रेकॉर्ड जवळ जवळ रोज वाजायची. सगळ्या सोसायटीवाल्यांना त्यांच्या घरातील गुपित एव्हाना नको इतके कळले होते. त्यांच्या पदरी दोन गोंडस मुली होत्या. त्यांच्या समोरच हे मारण्याचे प्रात्यक्षिक होत असे. त्या माणसाच्या तोंडी भयानक अपशब्द सतत असायचे. अशा वातावरणात ती बाई आणि तिच्या दोन लहान मुली राहत होत्या. त्या बाईचे माहेर सधन होते. तरीही ती बाई तिच्या दोन मुलींसकट त्याच घरात वर्षानुवर्षे खितपत पडली होती. शिवाय ती बाई स्वत: नोकरीही करीत होती. म्हणजेच नरकात सडत राहण्याची निवड तिचीच होती. हा असा मोडकळीला आलेला, कोणताही दर्जा नसलेला संसार करण्यात तिला नेमके काय स्वारस्य होते हे मला आजतागायत कळलेले नाही. 
आपल्यावर होत असलेला अन्याय निमुटपणे सहन करणे म्हणजेच नवऱ्याच्या अपप्रवृत्तीला खतपाणी घालणे ही साधी गोष्ट बायकांना कळत नाही का असे मला पोटतिडीकीने त्यांना विचारावेसे वाटते. हिंसा म्हणजे फक्त अंगावर हात उगारणे नाही तर शाब्दिक निंदा, अपशब्द, शिवीगाळ हेही हिंसेचेच प्रकार आहेत. माझ्या ओळखीचे एक महाशय स्वत: रात्री नऊ वाजता झोपतात आणि झोपायला जाताना टी.व्ही. बंद करतात. त्यानंतर त्या घरात कोणीही टी.व्ही. लावू शकत नाही. अगदी त्यांच्या बायकोला कितीही वाटले तरीही तिनेही लगेच निद्राधीन व्हायचे. ही कोणती मनमानी? ती घरातील कामांची निरवानिरव करून जरा शांतपणे बाहेर विसावते आहे तोवर लाईट्स ऑफ. टी.व्ही. बंद. तिला एखादे पुस्तक वाचावेसे वाटले तरी वाचायचे नाही, एखादी टी.व्ही.सिरीयल बघावीशी वाटली तरी बघायची नाही हा काय जुलूम? आणि अशा वेळी ती तोंड शिवल्यासारखी गप्प का म्हणून बसून राहते? तीही आज स्वत: कमावती आहे. स्वत:च्या पायावर उभी आहे. तरीही तिची ही कथा असेल तर मग ज्या बायका सर्वस्वी नवऱ्यावर अवलंबून आहेत त्यांची अवस्था नि:संशय आणखीच वाईट असणार.   
लहानपणापासूनच संसार म्हणजे तडजोड आहे हे मुलींच्या मनावर मोठ्यांकडून बिंबवले जाते. शिवाय आपल्या आई-वडिलांना त्या रोज पाहत पहातच मोठ्या होत असतात. नवऱ्याने तोंडाला येईल ते बोलायचे, प्रसंगी हात उगारायचा आणि बायकोने सहन करायचे ही शिकवण त्यांना आपसूकच मिळत असते. बायकांनो तुम्ही कितीही शिका, मोठ्या व्हा, कर्तृत्ववान बना, कमवा पण शेवटी नवऱ्याची बोलणी आणि मार खाण्यातच तुमच्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे असे कोणीतरी पिशाच्च या बायकांच्या कानात ओरडते आहे की काय असे काही वेळेस वाटू लागते. 
वास्तविक पाहता विवाहसंस्थेने नवरा-बायको या दोघांना समान दर्जा आणि समान हक्क बहाल केले आहेत. या नात्यात कोणी श्रेष्ठ नाही कोणी कनिष्ठ नाही. कोणी वरचढ नाही कोणी खाली नाही. एकमेकांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक गरजा पुऱ्या करत सुखा समाधानाने संसार करणं या विवाह परंपरेत अभिप्रेत आहे. आपल्यापासून जन्मणाऱ्या मुलांचे उत्तम संगोपन करणे, त्यांना उत्तम संस्कार व शिक्षण देणे आणि त्यांचे भावी आयुष्य सुरक्षित करणे तसेच त्यांना आपल्या पायांवर उभे राहण्यास समर्थ बनवणे हे आई-वडिलांचे आद्य कर्तव्य असले पाहिजे. 
विवाहेच्छू मुलीला हे बघ एकदा तुझे लग्न झाले की आम्ही सुटलो, यानंतर तेच तुझे घर, नवरा सांगेल तसे वागायचे, तो ठेवेल तसे राहायचे, तो तुझा पतीपरमेश्वर आहे, तो तुला बोलला, त्याने तुला मारले तरी तू सहन केले पाहिजेस कारण तुझी बाईची जात आहे असा जो काही मौलिक मंत्र दिला जातो तो अत्यंत खेदजनक आहे, हास्यास्पद आहे, आक्षेपार्ह आहे. एकीकडे स्त्रियांना मातेसमान आदरपूर्वक वागवणाऱ्या शिवरायांच्या राज्यात राहायचे आणि याच स्त्रियांनी वर्षानुवर्षे पुरुषांकडून मिळणारी निंदनीय वागणूक सहन करायची ह्या परस्परविरोधी गोष्टी आहेत. 
स्त्री व पुरुष हे या संसाराचे परस्पर पूरक असे दोन ध्रुव आहेत. दोघेही समान आहेत, सन्मान्य आहेत, आदरणीय आहेत. या अखंड सृष्टीची निर्मितीही या परस्पर साहचर्यातून झालेली आहे. तेव्हा स्त्रीचा, पत्नीचा आदर करणे हे प्रत्यक पुरुषाचे कर्तव्य असले पाहिजे आणि असा आदर पतीकडून न मिळाल्यास त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणे हे पत्नीचे संसारातील प्रयोजन असले पाहिजे. 

No comments:

Post a Comment