Sunday 10 June 2012

सामाजिक व्यंग

वैयक्तिक वैगुण्यामुळे समाजाकडून नाकारलेली, उपेक्षिलेली, बहिष्कृत केलेली माणसे स्व-कर्तृत्वाने त्यांच्या व्यंगावर मात करून  जेव्हा इतरांसाठी एक आदर्श प्रस्थापित करतात तेव्हा वास्तविक पाहता समाजाचा खुजेपणाच दृग्गोचर होतो. अगदी शाळकरी वयापासूनच हे सामाजिक वर्गीकरण सुरु होत असतं. हा मुका, हा बहिरा, हा आंधळा, हा पांगळा, हा थोटा, हा लुळा असे शिक्के माथ्यावर मिरवतच ही मुले मोठी होत असतात. सामान्य किंवा नॉर्मल मुलांच्या शाळेत यांना प्रवेश नाकारला जातो आणि इथेच ही आपपरभावाची बीजे मुलांच्या मनात रुजू लागतात. 
या मुलांकडे बघण्याचा सामाजिक दृष्टीकोन गढूळलेला आढळतो. आपण त्यांची कीव करतो, त्यांना दयार्द्र, सहानुभूतीपूर्ण नजरेने पाहतो जे त्यांना कदापि मान्य नसतं. कुणाच्याही बुद्धिमत्तेचा कस हा त्यांच्या शारीरिक व्यंगावरून लागत नसतो. ही मुले परीक्षेत इतर मुलांइतकेच किंवा त्यांच्यापेक्षाही जास्त मार्क मिळवू शकतात. अशा मुलांना जर कोणत्याही शाळेत प्रवेश मिळाला तर ह्या मुलांच्या मनातील न्यूनतेची भावना समूळ नष्ट होऊ शकते. शिवाय जी मुले निर्व्यंग आहेत अशांना या मुलांमध्ये मिळून मिसळून वागण्याचे बाळकडू मिळू शकते जे समाजहिताच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. 
रस्त्यावरून व्हीलचेअरवर एखादी व्यक्ती जाताना आढळली की त्यांच्याकडे कुतूहलमिश्रित दयेने बघितले जाते. ही माणसे जर कोणत्याही प्रकारे आपल्याकडून मदतीचा हात घेत नाहीत तर मग तुमच्यात काही कमतरता आहे अशा दृष्टीने त्यांच्याकडे पाहण्याचा आपल्याला काय अधिकार आहे ? आपण त्यांना दुबळी, असहाय आणि अगतिक माणसे समजतो हे आपलं मानसिक थिटेपण असतं. एखाद्या अंध व्यक्तीला त्यांच्या वैगुण्यापलीकडे जाऊन आपण समजून घेऊ शकत नाही हा आपल्या डोळस वृत्तीचा पराभव असतो. एखाद्या पांगळ्या व्यक्तीला त्याची खरी अडचण समजून न घेता हा चढण्या-उतरण्यास असमर्थ या दृष्टीने आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपले मानसिक पंगुत्व ठळकपणे अधोरेखित होत असते. 
ही माणसे अभिनय करतात, नाचतात, गातात, शारीरिक कसरती करतात, उच्चशिक्षण घेतात,  उत्तम अधिकारावर नोकऱ्या करतात, व्यवसाय करतात, परदेशवाऱ्या करतात, संसार करतात. मग कुठे कमी पडतात ही माणसे? का त्यांना सन्मान्य वागणूक समाजाकडून दिली जात नाही? का त्यांच्याकडे करुणार्द्र नजरेने पहिले जाते?  शारीरिक व्यंग असलेली माणसे ही फक्त लाचारीने भिक मागण्याच्याच लायकीची आहेत ही समाजाची मनोधारणा अतिशय लाजिरवाणी नाही का? 
जेव्हा एखाद्या तरुणीवर दिवसाढवळ्या मुठभर गुंडांकडून अत्याचार होतो तेव्हा अवतीभवती जमलेली निष्क्रिय बघ्यांची प्रचंड गर्दी कोणत्या डोळसपणाची साक्ष देते? अतिशय अश्लाघ्य बोलून एखाद्या व्यक्तीचे काढलेले धिंडवडे आपण जेव्हा कानाआड करतो तेव्हा ती आपण बहिरे असल्याची जाणीव नसते का? एखाद्या खिसेकापूला पकडण्यासाठी जेव्हा आपण आपल्या पायांना गती देत नाही तेव्हा हे आपलं पांगळेपण नसतं का? यावर सुज्ञांनी जरूर विचार करावा. 
बसमध्ये, ट्रेनमध्ये गर्दीच्या वेळी चढताना या व्यक्तींना विलक्षण कसरत करावी लागते. पण कोरडे कढ काढणे, हळहळणे या व्यतिरिक्त आपण काही करू शकतो हा विचार मनात येणे महत्वाचे आहे. निर्व्यंग, सुदृढ माणसांनी संघटीत होऊन सरकारला या सामाजिक अनास्थेविषयी लेखी निवेदन देणे गरजेचे आहे. या व्यक्तींसाठी येण्याजाण्याचे मार्ग सुकर करणे हे शासनाला बंधनकारक असायला हवे. अशा व्यक्तींसोबत वावरताना त्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतेची जाणीव न भासवणे ही आपली महत्तम जबाबदारी असली पाहिजे. त्यांच्या विचारांचा आदर करणे, त्यांना प्रोत्साहित करणे, वेगवेगळ्या सांस्कृतिक उपक्रमांत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणे ही आपली भूमिका असायला हवी. त्यांना सहानुभूतीची नाही तर प्रेमाची, आपुलकीची गरज आहे हे आपल्या मनाला समजावता आले पाहिजे.  
यशशिखरे पादाक्रांत करण्यासाठी मानसिक उत्तुंगता लागते आणि अशी उत्तुंगता लाभलेली माणसे शारीरिक कमतरतेवर खुबीने मात करून असाध्य वाटेला आपल्या अंकित करतात. जिद्दीचे, परिश्रमाचे, चिकाटीचे पंख घेऊन जन्माला आलेली ही माणसे वाटेत सलणारे काटे अलवारपणे बाजूला सारून आपल्या पायाखाली गुलाबाची बाग फुलवतात.  आणि आपण जर मानसिक विकलांगतेचे बळी नसलो तर त्यांच्या या गरुडभरारी पुढे सहजी नत होतो. 

No comments:

Post a Comment