Tuesday 7 May 2013

आय नो ………


काही व्यक्ती या विश्वातील प्रत्येक लहानसहान घटना आपल्या परिचयाची आहे अशा वृत्तीने वागत असतात. त्यांचा परवलीचा एकाच शब्द असतो 'आय नो' म्हणजे मला माहित आहे, मला ज्ञात आहे. कोणत्याही पेपरातून छापून आलेली हर एक गोष्ट यांना कशी माहित असते? स्वत:ची नोकरी, व्यवसाय अथवा विद्यार्थीदशेत असल्यास शाळा किंवा कॉलेज या गोष्टींना सुट्टी देऊन ह्या व्यक्ती दिवसाचे चोवीस तास फक्त आणि फक्त वर्तमानपत्रेच वाचत बसतात की काय अशी शंका यावी इतपत हे महाभाग 'आय नो' हा शब्द पुन्हा पुन्हा उच्चारत असतात.      
काही गोष्टी यांच्या परिचयाच्या असतील किंवा यांच्या कानावर आल्या असतील पण म्हणून प्रत्येक गोष्ट कशी यांना माहित असेल? अंजली तेंडूलकर ही सचिन तेंडूलकरची बायको आहे किंवा हृतिक रोशनला सहा बोटे आहेत किंवा शाहरुख खान आपल्या बायकोपेक्षा सिगारेटीवर जास्त प्रेम करतो किंवा जयाने रेखाकडे संसदेत टाकलेला जळजळीत कटाक्ष किंवा मनमोहन सिंग यांची बारमाही तटस्थता किंवा सोन्याचा भाव उतरला या गोष्टी 'आय नो' काय 'वुई नो' या वर्गात मोडतात पण म्हणून सोनियाच्या घरातील मांजरी व्याली या बातमीला राखी 'आय नो' असे का म्हणाली हे मला आजतागायत उलगडलेले नाही. ( या व्यक्ती अनुक्रमे सोनिया गांधी आणि राखी गुलजार किंवा राखी सावंत नव्हेत हे कृपया लक्षात घ्यावे)   
मला तर वाटते की ह्या व्यक्ती जन्मल्या जन्मल्या रडण्याऐवजी 'आय नो' हेच म्हणत असाव्यात. आता किनई बाळा तुझी आई तुला दुदू पाजणार आहे असं नुसतं कोणी म्हणायचा अवकाश की हुंकाराऐवजी 'आय नो' लोकांच्या कानावर पडत असेल. दिन्याला ब्याण्णव टक्के मिळाले हे कोणीही न सांगताच अर्णवला कसे कळले? फोनवरून जेव्हा आलोकने त्याला ही बातमी दिली तेव्हा तो लगेच म्हणाला 'आय नो'. आलोकने शंका येउन विचारले, तुला आधीच माहित होते ? कसे काय? रिझल्ट तर आत्ता लागला. यावर अर्णवचे उत्तर असे होते, अरे दिन्याने सॉलिड अभ्यास केला होता. तेव्हाच मी समजून चुकलो की हा नव्वदी पार करणार.      
अदिती साडी खरेदीला आईबरोबर दुकानात शिरली . तिथे तिला तिची जुनी मैत्रीण वृषाली भेटली. अदिती म्हणाली, माझ्या ताईचे लग्न ठरले आहे. वृषाली म्हणाली, 'आय नो'. अदिती आश्चर्याने म्हणाली, अगं तुला कशी कळली ही बातमी ? यावर वृषाली म्हणाली, अगं तुला साड्यांच्या दुकानात आईबरोबर शिरताना पहिले आणि माझ्या लगेच लक्षात आले. ग्रेट, अदिती म्हणाली.     
या 'आय नो' वर्गातील लोकांना बाजारभाव, सेन्सेक्समधील चढ-उतार, शिक्षकांच्या-व्यापाऱ्यांच्या मागण्या, वकिली डावपेच, राजकीय कुस्त्या, खून-दरोडे-बलात्कार सत्र , सुपरस्टार लोकांची इंगिते, हिट-फ्लॉप सिनेमा-नाटके, खाद्य-पर्यटन या विषयीचे ज्ञान म्हणजे थोडक्यात काय सगळे सगळे ठाऊक असते. त्यामुळे अय्या, बाप रे, खरं की काय, कित्ती कित्ती छान वगैरे प्रतिक्रिया यांना कधी देताच येत नाहीत. सगळ्या बातम्यांवर यांची आपली एकच प्रतिक्रिया 'आय नो'.        
या 'आय नो' वाल्यांची मदत घेऊन खालील प्रश्न सोडविता येतील का? कारण यांना सगळ्याचीच उत्तरे आधीच ठाऊक असतात. दुष्काळाचे निवारण कसे करता येईल ? यावर्षी पाऊस कसा पडेल? देशाचा पुढील पंतप्रधान कोण होईल? सैफ-करीना यांना अपत्यप्राप्ती कधी होईल? अंबानी बंधूंचे संबंध कधी सुधारतील? मराठी मालिका कधी वास्तवदर्शी होतील? पर्यावरणातील प्रदूषण कसे कमी करता येईल? 
एकदा राजू आपल्या दोन कुत्र्यांना घेऊन फिरायला बाहेर पडला. समोरून त्याचा एकेकाळचा 'आय नो'वाला मित्र  रवि येत होता. काय म्हणतोस ? कसा आहेस ? अशा काही जुजबी गप्पा झाल्यावर काहीतरी नवीन माहिती देण्याच्या उद्देशाने राजू रविला म्हणाला , माझ्या या दोन पठ्ठ्यांना रोज एक किलो चिकन लागतं. 'आय नो' , रवि म्हणाला. राजू हिरमुसला. तुला याबद्दल कशी काय माहिती आहे? तुझ्याकडे पण कुत्री आहेत का? नाही. माझ्याकडे एक मांजरी आहे. ती रोज साधारण अर्धा किलो पर्यंत चिकन खाऊ शकते त्यावरून मी अंदाज लावला. तेव्हापासून राजू रोज वेगळ्या रस्त्यावरून जातो .         

No comments:

Post a Comment