Friday 20 September 2013

विचार आणि वास्तव …………


आपण सर्वजण शालेय शिक्षण घेऊन, कॉलेजात जातो, तेथील शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करू लागतो , यथावकाश संसार थाटतो आणि इतरांप्रमाणे एकदाचे मार्गाला लागतो.  या प्रवासात अनेक खड्डे, खाच-खळगे असू शकतात, सगळ्यांचीच वाट सुकर,सोपी नसते. मग अनेक वेळा आपण परिस्थितीला बोल लावतो, चिंतातूर होतो, हतबल होतो, दडपणाखाली वावरू लागतो. समाज हा आपल्याला शत्रू वाटू लागतो. आपल्या आनंदासाठी, सुखासाठी आपण तज्ञांचे सल्ले घेत फिरतो. आपले हित कशात आहे हेच आपल्याला कळेनासे होते. आपल्या या घुसमटीला समोरची व्यक्ती वा परिस्थिती जबाबदार आहे हे आपण मनाशी पक्के ठरवून टाकलेले असते. आपण बाहेर उत्तरे शोधत फिरतो जी केवळ आपल्या आतच आपल्याला सापडू शकतात जी आपल्याशी आयुष्याची नव्याने ओळख करून देऊ पाहत असतात.        
विचार प्रत्येकजण करतच असतो अगदी समजायला लागल्यापासून! फक्त योग्य विचार कसा करावा याचे बाळकडू आपल्याला मिळालेले नसते. माणसाची विचारप्रक्रिया त्याचे व्यक्तिमत्व आणि त्याचे वास्तव घडवत असते. समोरच्या व्यक्तीचे विचार हे आपले विचार असू शकत नाहीत. त्याने आपल्यापर्यंत पोहोचवलेला विचार हा आपल्या आत झिरपू द्यावा अथवा नाही या निवडीचे स्वातंत्र्य प्रत्येकाचे असते. विचार आणि माणसाचे आरोग्य यांचे जवळचे नाते असते. घातक विचार, ऋण अर्थात निगेटिव्ह विचार, नैराश्यजनक विचार  आणि निरुपयोगी विचार यांनी आपल्या शरीरातील उर्जेचा ऱ्हास होत असतो. याउलट धन अथवा चांगले विचार, आशावादी विचार यांनी व्यक्तीच्या शरीरातील उर्जा जास्त प्रमाणात स्रवते.               
दोन माणसे मोबाईलवर जेव्हा एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा ज्या उर्जालहरींमुळे हा संवाद साध्य होतो त्या लहरी कधीच दृष्टीक्षेपात येत नाहीत. त्याचप्रमाणे एक व्यक्ती जेव्हा अमुक एक विचार करते त्यावेळी तिच्या विचारानुसार अशा लहरी अवकाशात प्रक्षेपित होत असतात. गुरुत्वाकर्षण तत्वानुसार ज्या प्रकारची उर्जा वातावरणात सोडली जाते तीच उर्जा परतून त्या व्यक्तीकडे येत असते. माणसाच्या मनातील प्रत्येक विचार हा अनुकूल वा प्रतिकूल अशा उर्जेने भरलेला असतो. तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे निर्देशित केलेला एखादा विचार त्यातील चांगल्या-वाईट उर्जेसकट त्या व्यक्तीकडे पोहोचतो आणि त्याच प्रकारची उर्जा परतून तुमच्याकडे येते.      
एखाद्या माणसाची हत्या करण्याआधी ती हत्या विचारांत झालेली असते. एखादा घातपात घडवण्याआधी तो विचारात झालेला असतो. एखादी लढाई प्रत्यक्ष हरण्याआधी ती विचारांतून हरलेली असते. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी तो आधी मनातील विचारांतून मिळवावा लागतो. दहाव्वीतील आपल्या पाल्याचा रिझल्ट अनेक पालकांनी प्रत्यक्ष परीक्षेआधीच कल्पनेत पाहिलेला असतो. विचारांना योग्य दिशा कशी द्यावी याचे क्लासेस जरी आज उपलब्ध नसले तरी तसे साहित्य मात्र जरूर आहे. अनेक रोगांचे मूळ हे मनात केल्या जाणाऱ्या विचारांत असते या निष्कर्षाप्रत वैद्यकीय क्षेत्रातील अनेक विद्वान आले आहेत.      
घातक अथवा निगेटिव्ह विचारांमुळे शरीरातील काही प्रतिकूल हार्मोन्स स्रवू लागतात ज्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. सतत उदास असणारी माणसे शक्तिपात झाल्यासारखी दिसतात. काही माणसांना सतत काही ना काही तक्रारी करायची सवय असते. मला बरे वाटत नाही, समोरील व्यक्ती माझ्याशी नीट वागत नाही, मला समजून घेत नाही, समाज कुठे चालला आहे, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, तरुण पिढी ऐकेनाशी झाली आहे अशी कोणतीही कारणे पुढे करून ही माणसे रडत असतात, कुढत असतात आणि स्वत:चे विचार सुधारण्याऐवजी  ज्या गोष्टींवर आपले काडीमात्र नियंत्रण नाही अशा गोष्टी बदलायची वाट पाहत बसतात. 
आपण दैव किंवा प्रारब्ध असे जे काही मानतो ते दुसरे-तिसरे काही नसून आपण अवकाशात सोडलेल्या उर्जेचे परतून येणे असते.  जो बाण अवकाशात मारला जातो तोच बाण तीच उर्जा घेऊन जेव्हा आपल्यासमोर येतो त्याला आपण नशीब ही संज्ञा देऊन मोकळे होतो. विचार निवडीचे स्वातंत्र्य आपले असते पण मुळात विचारांची निवड करायची कशी याविषयी आपण अनभिज्ञ असतो. आपल्याकडून अवकाशात सोडल्या जाणाऱ्या अनुकूल विचार लहरी ही आपल्या आनंदाची, सौख्याची नांदी असते. क्रोध, मत्सर, हेवा, असूया, निंदा या लहरी तीच उर्जा परत आपल्यापर्यंत पोहोचवतात याउलट आनंद, प्रशंसा, प्रेम, वात्सल्य,अनुकंपा,सहिष्णुता या लहरी तीच उर्जा परत आपल्याकडे आणतात. आपण घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेतो, संत -महात्म्यांचे आशीर्वाद घेतो तेव्हा त्यांच्यातील आपल्या विषयीचे प्रेम वा सद्भावना लहरींच्या रुपात आपल्यापर्यंत येउन योग्य ती उर्जा आपल्याला देत असतात.          
मनात आलेला वाईट विचार आपल्या दुष्कर्मात भर टाकतो तर सद्विचार सु-कर्मात! अनेक जण म्हणतात, आम्ही काहीच करत नाही, विचार येताच राहतात. पण असे नसते. वाईट विचारांना थोपवण्याची क्षमता आपल्यात नक्कीच असते आणि प्रयत्नपूर्वक चांगले विचार करण्याची क्षमताही आपल्यात असतेच असते. चुकीचे, नसते,भलभलते विचार करून अनारोग्याला किंवा प्रतिकूल परिस्थितीला आमंत्रण द्यायचे की चांगले, सद्विचार मनात रुजवून आपल्या भोवतीचे वातावरण आणि माणसांना आनंदी करायचे हे ज्याचे त्याने ठरवावे!      

No comments:

Post a Comment