Sunday 9 September 2012

विधिलिखित

विधिलिखित हा शब्द तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादाच्या मुळावरच घाव घालतो. स्वत:ला कडवे बुद्धिवादी म्हणवून घेणारे जे काही महाभाग आहेत, त्यांना हा शब्द सलतो, झोंबतो आणि खुपतोही! याची करणे अनेक आहेत. मुळात आपल्या सिमित बुद्धीच्या पलीकडेही काही अतर्क्य, अनाकलनीय असे काही आहे हे मानणे या व्यक्तींना फारच जड जात असावे.  
खडखडीत बरा झालेला एखादा रुग्ण एकाएकी दगावतो आणि त्याच्या दगावण्याची शास्त्रीय मीमांसा वैद्यकशास्त्र करू लागते. या उलट एखाद्याच्या दगावण्याची शंभर टक्के खात्री डॉक्टरला वाटत असताना तो मात्र त्या समस्त वैद्यकशास्त्राच्या नाकावर टिच्चून जगतो आणि पुन्हा एकदा वस्तुनिष्ठ कसोट्यांवर हे शास्त्र उगाळले जाते. एखादी प्रवासी बस दरीत कोसळते आणि मृत पावलेल्या त्या शंभर एक जणांत एक छोटेसे बालक एक साधा ओरखडाही न येता लीलया श्वास घेत असते. विमानप्रवासाला निघालेली एखादी सखुबाई किंवा सखाराम अचानक तापाने फणफणतो आणि आपल्या नशिबात विमानप्रवास नाही या जाणीवेने मनोमन खंतावतो.  हेच विमान 'टेक ऑफ' करताना अचानक पेट घेते आणि क्षणार्धात त्या विमानाची आतील प्रवाशांसकट राखरांगोळी होते. अशा वेळी ती सखुबाई किंवा सखाराम त्या 'नशीब' नामक गूढ सामर्थ्याचे पुन्हा पुन्हा आभार मानतात. परमेश्वर नामक चमत्काराचा साक्षात्कार त्यांचे अंत:करण हेलावून टाकतो.  
एखाद्या श्रीमंत कुळात जन्म घेतलेला युवक 'स्व-कर्तृत्वाने' अध:पतनाच्या खाईत जातो तर अठरा विश्वे दारिद्र्यातून 'स्व- कर्तृत्वाने' एखादा अजरामर 'कार्व्हर'ही जन्माला येतो. कुठे शून्यातून आनंदवनाची निर्मिती करणारा महायोगी 'बाबा आमटे' जन्माला येतो तर कुठे सत्तेला मद्यासारखे उपभोगून तिच्या जोरावर असंख्य निष्पापांचे बळी घेणारा सत्तांध 'हिटलर' जन्माला येतो.  
'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीची प्रचीती जे मोठ्या जीवावरच्या संकटातून वाचले आहेत त्यांच्या बाबतीत येते. काही अपरिहार्य कारणास्तव न्यूयॉर्कच्या 'वल्ड ट्रेड सेंटर' मध्ये काम करणारे सदगृहस्थ वेळेवर पोहोचू शकत नाहीत आणि हीच गगनचुंबी इमारत त्यांच्या डोळ्यांदेखत अतिरेक्यांच्या हल्ल्याचे लक्ष होते. या महाभयंकर संकटातून वाचल्याची जाणीव होताक्षणी हे गृहस्थ साश्रू-नयनांनी त्या जगत्पालकाचे आभार मानतात कारण त्यांना त्या ईश्वरी अस्तित्वाचा प्रत्यय आलेला असतो.   
जो म्हणतो देव आहे त्याच्यासाठी तो असतो आणि जो त्याचं अस्तित्व मान्य करत नाही त्याच्यासाठी तो नसतो. 'देव' या संकल्पनेचा अर्थ अशा रीतीने सोपा करून ज्येष्ठ कविवर्य कै.कुसुमाग्रज यांनी उलगडून सांगितला होता.  
परमेश्वरी संकेताशिवाय कोणतेही चांगले अथवा वाईट कार्य घडणे हे सर्वथैव अशक्य असते. या पृथ्वीतलावर अ-तुलनीय काम करणारी माणसे ही त्या सर्वव्यापी शक्तीचे प्रेषितच असतात. एखादी घटना घडणे हा संकेत असतो आणि त्यासाठी निमित होणारा माणूस हे एक माध्यम असते. तो त्याच्या इच्छेनुसार माणसांची प्यादी या विश्वाच्या विस्तीर्ण पटावर सरकवून खेळ खेळत असतो. काही प्यादी तरतात तर काही नेस्तनाबूत होतात. कालपट चालूच असतो. प्यादी बदलत राहतात. दृष्टी-भ्रमामुळे या खेळालाच आपण सत्य मानतो आणि आपल्या अस्तित्वासाठी, वर्चस्वासाठी झगडत राहतो. 
'शेवटी आपण सारे पत्त्यातल्या नावांचे धनी, मजकुराचा मालक निराळाच असतो'  या पुलंच्या सत्याचा सूर गवसलेल्या ओळी मनाला अशावेळी अंतर्मुख करतात. 

No comments:

Post a Comment