Friday 7 September 2012

आपली माणसे आणि परकी माणसे

कुरुक्षेत्रावरील त्या प्रचंड सैन्यात आपले गुरु, आजोबा, काका, भाऊ तसेच इतर आप्तेष्ट बघून अर्जुन विस्मित झाला, स्तिमित झाला आणि नंतर अक्षरश: गर्भगळीत झाला. 'आपल्या आणि परक्या' या बद्दलच्या संभ्रमात तो हिंदोळू लागला. शत्रुपक्षातील 'आपली' माणसे त्याला आता 'परकी' वाटू लागली. परंतु त्याचवेळी आपल्या माणसांशी युद्ध करायचे ही भावनाही त्याला विद्ध करू लागली. अखेर त्याच्या मनाची ही दोलायमान अवस्था पाहून भगवान श्रीकृष्णांनी त्याला गीतोपदेश केला. 
ज्या विश्वकर्म्याने हे प्रचंड जग निर्माण केले आहे ते भयंकर गूढ, अनाकलनीय असेच आहे. पण निसर्गाने निर्माण केलेलं माणूस नावाचं खेळणं ही तर गूढतेची परिसीमाच आहे असं म्हणायला हरकत नाही. माणूस हा केंद्रबिंदू आणि त्याने आपल्या भोवती आखलेल्या वर्तुळाच्या परीघावर नाचणारी ही असंख्य 'आपली' व 'परकी' माणसे! असे असंख्य केंद्रबिंदू, असंख्य वर्तुळे आणि तेवढीच अगणित माणसे!     
कालपरवापर्यंत आईचा पदर धरून चालणारा मुलगा चतुर्भुज होतो आणि काही महिन्यानंतर 'माझी काळजी घेण्यास माझी बायको समर्थ आहे' ही मौखिक मेहेरबानी आईवर करतो तेव्हा तो आपलेपणाच्या कक्षेतून आपसूकच बाद झालेला असतो. जातीने, धर्माने परकी असलेली 'ती' विवाहोत्तर सासरच्या माणसांत दुधात साखर मिसळावी तद्वत मिसळून जाते आणि 'आपलीशी' होऊन जाते.  
पं.कुमार गंधर्व भूप रागात वर्ज्य किंवा 'परक्या' समजल्या जाणाऱ्या शुद्ध मध्यमाला अवचितपणे 'आपलेसे' करून श्रोत्यांना व जाणकारांना अचंबित करून टाकत असत. पारंपारिक भूप गाणाऱ्या गवयांना परका वाटलेला भूपातील मध्यम कुमारांच्या भूपाच्या बैठकीत आपलेपणा जागवून जायचा.    
महाभारतातील अर्जुन हा प्रातिनिधीक आहे. आजही जागोजागी, घरोघरी आपलं कोण आणि परकं कोण या संभ्रमात पडलेले कैक अर्जुन दिसतात. गीतेतील तत्वज्ञान प्रत्येकाला पेलेलच असं नाही त्यामुळे ज्याच्या त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार, दुसऱ्याला समजून घेण्याच्या प्रयासातून अनेक गीता, अनेक तत्वज्ञाने तयार होत असतात.  
अगदी 'आमची जेवण करण्याची पद्धत आणि तुमची जेवण करण्याची पद्धत' इथपासून आपल्या-परक्यातल्या सुप्त संघर्षाची ठिणगी पडते. ज्याच्या त्याच्या भाजी-आमटी-चटण्या-कोशिंबिरी करण्याच्या पद्धतीत फरक हा असतोच! या सर्व पद्धती त्या त्या विशिष्ट जातींशी निगडीत अशा असतात. पण आपलीच पद्धत कशी 'सुपीरियर' हे  प्रत्येकालाच दुसऱ्याला पटवून देण्यात धन्यता वाटते. यातूनच आपले आणि परकेपणाची जाणीव वृद्धिंगत होण्यास हातभार लागतो.     
वर्ण,जाती,धर्म या सर्वांच्या मूळाशी द्वेषाची भावना इतकी जोम धरून असते की आज स्वातंत्र्यप्राप्तीनंतर  इतक्या वर्षांनीही जाती-धर्मातील अंतर आपण नाहीसे करू शकलेलो नाही. भारताची शकले होऊन 'हिंदुस्तान' आणि 'पाकिस्तान' जन्माला आले ते मुळी जन्मत:च आपल्या-परक्याची भक्कम तटबंदी आपल्याभोवती बांधूनच! 
एखाद्या चित्रपटामध्ये अन्यायाने पिचलेल्या सुनेची रडकथा पाहताना एखादी सासू नाकाला रुमाल धरून रड रड रडते पण घरी आल्यानंतर तिच्या 'आपल्या मुलीला' आणि 'परक्या सुनेला' वागवण्याच्या दृष्टीकोनात तसूभरही फरक पडलेला नसतो. 
कालपरवापर्यंत आपल्याच बरोबर खांद्याला खांदा लावून समाजसेवा करणारा 'आपला मित्र ' सत्तेच्या खुर्चीवर विराजमान झाला की एकदम 'परका' किंवा दुसराच कुणीतरी वाटायला लागतो. 
अगदी आत्तापर्यंत आपल्यात वावरणाऱ्या माणसाला ताटीवर निष्प्राण पडलेला पाहिल्यानंतर तो आता 'आपल्यात' नाही ही भावना प्रबळ होते.  तो 'परलोकवासी' झाला असे आपण जाहीर सभेत सांगतो. 'परक्या' या बिरुदावालीत जाऊन बसलेल्या त्याच्यासाठी प्रसंगी आपण चार अश्रू ढाळतो पण आता आपल्याला आधार हवा असतो तो आपल्यासारख्याच जिवंत हाडामांसाच्या कुणाचातरी! 
'सासर आणि माहेर' या दोन शब्दांतही 'आपलं आणि परकं' ही जाणीव निर्माण करण्याचे विलक्षण सामर्थ्य आहे. 'सासरी गेल्यानंतर तू नीट वाग',  'त्या लोकांशी जमवून घे', 'आम्ही तिथे नसणार' ही सगळी वाक्ये त्या 'परक्या' सासरसंबंधीच असतात. कुणाला आपलं म्हणायचं आणि कुणाला परकं म्हणायचं या संभ्रमात ती नववधू आयुष्याची तब्बल पन्नास वर्षे रेटते आणि घरी नवीन आलेल्या सुनेलाही त्याच त्या वर्षानुवर्षे जतन केलेल्या 'आपल्या-परक्याच्या' भिंगातून तपासात राहते. वर्षामागून वर्षे उलटतात, सासवा-सुनांचे चेहरे बदलतात परंतु आपलेपणाची आणि परकेपणाची भावना मात्र जराही बदलत नाही.  
सकाळपासून ज्याला साक्षी ठेवून आपण सर्व कामधाम आटोपतो ते सूर्यबिंबही मावळतीला गेलं की परकं वाटू लागतं आणि क्षितिजावर नव्याने उदयाला आलेला चंद्र आपलासा वाटायला लागतो.  
शेवटी काय 'पुरुष-प्रकृती, 'दिवस-रात्र', 'ऊन-पाऊस', चंद्र-सूर्य' या नैसर्गिक प्रवृत्ती जितक्या प्रबळ आहेत तितकीच 'आपलं आणि परकं' ही मानवी प्रवृत्तीदेखील!  

No comments:

Post a Comment