Tuesday 24 April 2012

काकस्पर्श

या शीर्षकाचा महेश मांजरेकर कृत चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे असे ऐकिवात आहे. असो. साधारणत: श्राद्धसंस्कारांच्या वेळी, पिंडदान करतेसमयी या काक म्हणजेच कावळ्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. कावळा पिंडाला शिवला की मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा अडकलेला श्वास मोकळा होतो. तिची किंवा त्याची पश्चात काही इच्छा, वासना राहिली नसावी म्हणूनच तर इतक्या लवकर पिंडाला कावळा शिवला अशी आपण आपली समजूत करून घेतो. ( कावळा पिंडाला लवकर शिवला नाही तर दर्भाचा कावळा करून त्यास पिंडाला शिवायला लावणे अशीही सोय असतेच की!) 
वास्तविक पाहता इच्छा, वासना असते म्हणूनच जन्म-मृत्युच्या भोवऱ्यात माणूस पुनश्च गटांगळ्या खात असतो. अगदी म्हातारा होऊन जरी माणूस गेला तरीही त्याची काहीतरी इच्छा ही उरलेली असतेच. काहीतरी शिकायचे, कुणाशीतरी बोलायचे, कुणाची माफी मागायची राहून गेलेली असते.आयुष्यभर पैसा पैसा करत वेडीवाकडी वणवण केलेली असते. वारेमाप खस्ता खाल्लेल्या असतात. निवांत क्षण असे आयुष्यात फारसे वाट्याला आलेलेच नसतात. रिटायर्ड आयुष्य असे घालवू न तसे घालवू असे मनसुबे कित्येकदा रचलेले असतात. पाण्याच्या सपाट्याने नितळ वाळूवरील अक्षरे एकदम पुसून जावीत असेच काहीसे भाग्य त्या मनसुब्यांच्या वाट्याला आलेले असते. आपण रिटायर होतो काय आणि अवघ्या सहा महिन्यांनी पत्नीचा देहांत होतो काय! क्षणार्धात मुलगा-सून आणि त्यांचा संसार आपल्याला एकदम परका वाटू लागतो. त्यांचे आणि आपले ट्युनिंग जमूच शकत नाही असे वाटू लागते. आपला नातू लहान असेपर्यंत आपल्या अवतीभवती घोटाळत असतो. पण कालौघात तोही मोठा होतो आणि आपले वर्तुळ आपल्यापुरते सीमित होऊन जाते. 
माणूस कोणत्याही वयात गेला तरी शोक हा होतोच. वय वेगळे असते, मृत्यूची निमित्ते वेगवेगळी असतात पण जी नाती आपण आयुष्यभर जोपासलेली असतात त्या नात्यांपासून सहजासहजी विरक्त होता येत नाही. सण-समारंभ, नैमित्तिक कर्मकांडे, पूजाअर्चा या प्रथांकडे निवृत्त मनाने पाठ फिरावावीशी वाटत नाही. एखाद्या म्हाताऱ्या आजींचे मनही लोणच्याच्या बरणीपाशी , ताक-दह्याच्या घुसळणीपाशी सारखे घुटमळत राहते. ऑफिसमधून सन्मानाने निवृत्त झालेला किंवा झालेली प्रपंचातून कृतार्थ मनाने निवृत्ती स्वीकारू शकत नाही. कितीही पोथ्या वाचा, कीर्तने करा, पारायणे करा, प्रवचनाला जा, मनाला वानप्रस्थाश्रमी होणे मान्य नसते.  त्यामुळेच माणूस गेला आणि त्याच्या पिंडाला कावळा शिवला म्हणजे त्याची कोणतीही इच्छा-वासना अपुरी राहिली नाही हे तितकेसे तर्कसंगत वाटत नाही. 
एवढ्या मोठ्या विश्वात अगदी नगण्य रूपाने आपण वावरत असतो. आपले अस्तित्व एखाद्या छोट्याशा ठिपक्याएवढे असते. एखाद्या मोठ्या मॉलमध्ये शिरताक्षणी लहान मूल अगदी झपाटून जाते. प्रत्येक खेळणे त्याला बोलावत असते. त्याच्या आई-वडिलांच्या खिशाचा विचार त्याच्या चिमुकल्या मनात डोकावतही नाही.त्याला जे पाहिजे त्यासाठी ते एकतर हट्ट तरी करते अथवा आपल्या गोड बोलांनी ते खेळणे मिळवते. पण एक खेळणे जरी मिळाले तरी त्याचे मन मात्र अनेक खेळण्याभोवती गुंतून पडलेले असते. पुढच्या वेळेस कोणते खेळणे घ्यावयाचे याबद्दलचे बेत त्याचे मन रचत असते. या विश्वाच्या अफाट पसाऱ्यातील आपणही मुलच असतो. अनेक विलोभनीय दृश्ये ,ठिकाणे  आपल्याला पहायची असतात, यशाची अनेक शिखरे आपल्याला सर करायची असतात, लौकिकाच्या, प्रतिष्ठेच्या, बरकतीच्या मार्गावरील कैक खेळणी आपल्याला खुणावत असतात. सुबत्तेच्या पायघड्यांवरून आपल्याला मार्गक्रमणा करायची असते,  घरीदारी आनंदाच्या कारंज्यात आपल्याला डुंबायचे असते. पण नशिबाचे, नियतीचे बेत मात्र गुलदस्त्यात असतात. त्याची उकल आपल्याला वर्षागणिक आणि वयागणिक थोडीबहुत होत जाते. काही स्वप्ने पूर्ण होतात तर काहींना तिलांजली द्यावी लागते. आज ना उद्या हे करू असे म्हणताना आयुष्य वाळूच्या कणासारखे मुठीतून झरझर निसटत जाते. 
अनेक वर्षे बायका आपल्या इच्छा-आकांक्षा ओठांबाहेर न येऊ देता मन मारून जगलेल्या असतात. पतीसाठी करणे, मुलांसाठी करणे यात पाउण आयुष्य निघून गेलेले असते. म्हातारपण हे जणू पोथ्या-प्रवचनासाठीच आरक्षित केल्यासारखे या बायका जगत असतात. अनेक गोष्टींचा आस्वाद घ्यायचे राहून गेलेले असते. खेळ-साहित्य-गाणे-चित्रकला-पाककला-भरतकाम-अभिनय हे आणि असे अनेक वैयक्तिक छंद जोपासायचे राहून गेलेले असतात. नंतर करू, नंतर करू असा विचार करता करता आयुष्याची संध्याकाळ झालेली असते. आता उरलेला वेळ नामस्मरणात घालवावा असा त्यांच्या परीने सुज्ञ विचार बायकांनी जरी केला तरीही मनाच्या तळाशी या न केलेल्या पण त्यावेळी कराव्याशा वाटलेल्या गोष्टी ठाण मांडून असतातच! कुठे चांगले चित्र-प्रदर्शन पहिले अथवा कुणा नामवंताच्या गाण्याला हजेरी लावली की मनोमन आपण शिकलो नाही याची खंत वाटतेच वाटते. पूर्तता न झालेल्या या सर्व इच्छांची उजळणी मनातल्या मनात अव्याहत होत राहते. 
ज्या व्यक्तीच्या वासनांचा संपूर्णपणे क्षय झाला आहे अशी व्यक्ती एकतर या भूतलावर सापडणे अशक्यप्राय गोष्ट आहे अथवा ही व्यक्ती प्रापंचिक चौकटीतून सर्वस्वी मुक्त होऊन परमार्थाच्या मार्गावर चालली आहे असे मानायला हरकत नाही. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत एखादीतरी क्षुल्लक का होईना इच्छा ही राहतेच! कुणाला नातवंडाचे तोंड बघायचे असते, कुणाला परदेशात कायमच्या स्थायिक झालेल्या आपल्या मुलाला डोळे भरून पहायची इच्छा असते, कुणाला आपल्या मुलाला आयुष्यात यशस्वी झालेले पाहायचे असते तर कुणाला आपल्या मुलाला व्यसनमुक्त झालेले! अगदी गंभीर आजारी असलेल्या माणसालादेखील  विशिष्ट पदार्थ खायची प्रचंड इच्छा होते. ते पदार्थ त्याच्यासाठी वर्ज्य असे तरी! जसे मूल जन्म घेते तशा मनातील इच्छाही जन्म घेतात. कालपरत्वे मुलाचा माणूस होत जातो आणि मनातील इच्छांचा आवाका वाढत राहतो. माणसामाणसागणिक इच्छा जरी भिन्न असल्या तरीही त्याची पूर्तता करण्यासाठी माणूस कधी स्वत:शी, कधी परिस्थितीशी तर कधी  अवतीभवतीच्या माणसांशी झुंजत  राहतो. तरीही काही इच्छा या अपूर्णच राहतात. 
शेवटी देह म्हणजे या इच्छांची पूर्तता करण्याचे एक माध्यम असते. वर्षानुवर्षांच्या, जन्मानुजन्मांच्या आत्म्यावर झालेल्या संस्कारांतून या इच्छा-वासना उदय पावलेल्या असतात. जोवर शरीर असते तोवर या इच्छांना मूर्त स्वरूप लाभणे शक्य असते. ज्या क्षणी देहातून प्राण म्हणा किंवा जीव म्हणा निघून जातो आणि लौकिकार्थाने शरीर अचेतन होते त्या अवस्थेत कोणत्याही इच्छांची पूर्तता होणे हे संभव नसते. पण अमूर्त स्वरुपात, साठवणीच्या रुपात या इच्छा-वासना असतातच! त्याचा क्षय होत नाही फक्त आता त्या माध्यमाअभावी प्रकट होऊ शकत नाहीत.  ज्या अंतस्थ प्रेरणा घेऊन माणसे यशाची शिखरे पादाक्रांत करतात त्या प्रेरणांचा उगम कोठून होतो? कुणाला आकाशातील ग्रहगोल अभ्यासावेसे वाटतात तर  कुणाला या ग्रहगोलांचे मानवी आयुष्यातील महत्व जाणून घ्यावेसे वाटते. नेमके अमुक एकाच विषयाचे मनन किंवा अध्ययन आतील प्रेरणेशिवाय होणे हे असंभव आहे. ही आतील प्रेरणा , हा स्त्रोत नक्की येतो कुठून? याविषयी अनेकजण अनभिज्ञ राहणेच पसंत करतात. अंतर्मन, सिक्स्थ सेन्स, इंट्युशन या शब्दांचा नक्की आधार कोणता? बरेचजण या अंतस्थ उर्मींना उपहासिक दृष्टीने  बघतात. पिंडाला कावळा शिवला त्यामुळे आता मृत व्यक्तीची कोणतीही इच्छा शिल्लक राहिली नाही असे मानणारे प्रतिगामीच आज संख्येने अधिक आहेत. 
देह निवर्ततो, इच्छा नाहीत. शरीराचे निर्वाण होते, वासनांचे नाही. कारण प्रत्येक शरीरागणिक जर मानवी इच्छा-वासनांचाही क्षय झाला असता तर नरजन्माचे प्रयोजनच उरले नसते. काही महापुरुषांनी लोककल्याणासाठी देह धारण केला तर काही नराधमांनी मानवतेला पायदळी तुडवण्यासाठी! चौऱ्याऐंशीलक्ष योनीं फिरून येणारा मानवाचा जन्म हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. या अशा अनेक जन्मांतील बऱ्या-वाईट संस्कारांची बीजे मनुष्य जन्माबरोबर इच्छा-आकांक्षांत परावर्तीत होतात. या जन्मात ज्या इच्छा केवळ बिजस्वरुपातच राहतात त्यांच्या पूर्ततेसाठी पुनश्च देह धारण करणे क्रमप्राप्तच असते. भगवान श्रीकृष्णांनी पार्थाला केलेल्या गीतोपदेशात ते म्हणतात, 'जो जन्माला आला त्याचे मरण निश्चित आहे आणि जो मृत्यू पावला त्याचा जन्मही निश्चित आहे'. कोर्टात खरे बोलण्यासाठी या गीतेच्या महान ग्रंथाचा उपयोग केला जातो पण त्यात सांगितलेले तत्वज्ञान मात्र बहुतेककरून डोळेझाक करण्यासाठीच असते, ते आचरण्यासाठी नसते असा कित्येकांचा  एक गोड गैरसमज असतो.  
त्यामुळे मरणोत्तर काकस्पर्श हा माणसांत लपलेल्या इच्छा-वासनांची जाणीव करून देणारा असतो, त्यांना पूर्णविराम देणारा नसतो. 

No comments:

Post a Comment