Sunday 8 April 2012

'हुशारी' आणि 'ढ' पणा

मूल जसजसे मोठे होत जाते तसतसे त्याला हा 'हुशार' किंवा हा 'ढ' अशी लेबले लोकांकडून लागायला सुरवात होते. वास्तविक पाहता हुशारी म्हणजे अमुक एक विषय जाणून घेऊन तो आत्मसात करण्याची आपली क्षमता. आता ही क्षमता प्रत्येकागणिक भिन्न असते. सर्व माणसे एकाच विषयात पारंगत कशी होतील? प्रत्येकाचा स्वाभाविक पिंड, त्याची वैचारिक जडणघडण, पालकांच्या आणि शिक्षकांच्या विचारांचा मुलावर पडणारा प्रभाव, सभोवतालची परिस्थिती आणि मनातून अमुक एक ध्येय साध्य करण्याची दुर्दम्य इच्छा अशा सगळ्या घटकांवर लौकिकार्थाने जी हुशारी किंवा जो ढ पणा असतो तो अवलंबून असतो.     
काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. माझी मोठी मुलगी दहाव्वीला बसली होती. रिझल्ट लागायचा होता. अकरावीला 'आर्ट्स' घेण्याचे आधीच तिने ठरवले होते. 'मानसशास्त्र' अर्थात 'Psychology' हा विषय अंतिम पदवीपरीक्षेसाठीही तिने ठरवून टाकला होता. माझ्या सोसायटीत राहणाऱ्या एका बाईंनी विलक्षण उत्सुकतेपोटी मला विचारले , हं मग काय घ्यायचे ठरवले आहे तुमच्या लेकीने?  मी सांगितले की तिने आर्ट्स घेण्याचे ठरवले आहे. त्यावर त्यांनी मला प्रतिप्रश्न विचारला, का हो कमी मार्क मिळणार आहेत का तिला? म्हणजे आर्ट्स या शाखेचा आणि कमी मार्कांचा असा काही संबंध त्या बाईंनी मनोमन प्रस्थापित केला होता. 
जास्त मार्क मिळवणारी मुलेच फक्त  'सायन्स' किंवा 'कॉमर्स' या शाखेसाठी लायक असतात असाही एक समज फोफावलेला  असतो. म्हणजे गणित किंवा शास्त्र येणारा विद्यार्थी हुशार असतो मग अगदी त्याला भाषा किंवा इतिहास-भूगोल जेमतेम येत असतील तरीही! हे ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे?  मी बालमोहन शाळेत शिकत असताना माझ्या वर्गात सुनील राजे नावाचा मुलगा होता. तो निव्वळ अप्रतिम 'स्केचेस' काढायचा. लोकमान्य टिळकांचे त्याने काढलेले चित्र मला अजूनही आठवते इतके ते सुंदर जमले होते. पण त्याने काढलेल्या चित्राला गणित आणि शास्त्राच्या तराजूत का म्हणून बसवायचे? वर्गात फळ्यावर गणित सोडवून दाखवल्यानंतर त्याच पद्धतीने दुसरे गणित सोडवणे ही जर 'हुशारी' असेल तर मग कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय उत्कृष्ट चित्र काढणारा 'अतिहुशार' का म्हणायचा नाही? 
वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षापासून म्हणजे सर्वसाधारणपणे खेळा- बागडायच्या वयात ज्येष्ठ शास्त्रीय गायक की.कुमार गंधर्व मैफिली गाजवू लागले होते. त्यांची गाण्यातील समज एखाद्या गणितज्ञापेक्षा खचितच कमी नव्हती. आता सांगा की लौकिकार्थाच्या तराजूने त्यांची 'हुशारी' कशी तोलायची? संगीतकार ए.आर.रेहमान सुद्धा वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षापासून सातत्याने चांगले संगीत देत आहे. पंडित भीमसेन जोशी सवाई गन्धर्वांकडे गाणे शिकायला मिळावे म्हणून घरातून पळून गेले होते. त्यांची पुढील कारकीर्द तळपत्या सूर्याइतकीच दैदीप्यमान होती हेही आपण सर्व जाणतो. ही आणि अशी अनेक कलेचा वारसा लाभलेली माणसे त्यांच्या क्षेत्रात हुशारच होती. त्यांना शालेय परीक्षेत मार्क किती मिळाले यावरून आपण त्यांची गुणवत्ता ठरवायची का? जगदविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याने तर शिक्षणच अर्ध्यावर सोडलं यामुळे त्याच्या 'ढ' पणावर म्हणा किंवा शालेय अभ्यासात न दाखवलेल्या 'हुशारी'वर शिक्कामोर्तब होते का?  
काही महिन्यांपूर्वी टी.व्ही.वरील एका मुलाखतीत लेखक अनिल अवचट यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता तो असा की केवळ काही विषयांची परीक्षा हा अंतिम निकष लावून एकाच वयाच्या किंवा एकाच इयत्तेत शिकणाऱ्या मुलांच्या बुद्धीचे मूल्यमापन कसे होऊ शकते? प्रत्येकाचाच गणित हा विषय जसा उत्तम असतोच असे नाही त्याचप्रमाणे प्रत्येकाचा भाषा हाही विषय उत्तम असेलच असे नाही. काही मुलांना काही विशिष्ट विषयांत अशी काही गती असते की ते इतरांना तोंडात बोटे घालायला लावतील कारण त्यांची त्या विशिष्ट विषयातील ग्रहणशक्ती म्हणा किंवा आकलन म्हणा इतरांपेक्षा सरस असते. एखादा लहानगा ज्या खुबीने घरातील बिघडलेली यंत्रे दुरुस्त करेल त्याप्रमाणे शेजारच्या घरातील मुलगाही करेल का? पण शेजारच्या  घरातील मुलगा त्याचा अभ्यास मात्र मन लावून करत असेल आणि पहिला नंबर आणत असेल. मग आता यंत्रे दुरुस्त करणारा मुलगा अभ्यासात जेमतेम असेल तर तो पालकांची बोलणी नक्की खाणार. आला मोठा यंत्रे दुरुस्त करणारा! आधी अभ्यास नीट करून दाखव असा त्याचा 'उद्धार' नक्की होत असणार. शिवाय शेजारचा राजू बघ नेहमी कसा पहिला नंबर आणतो, शिक त्याच्याकडून काही अशा टोचाही त्याला सहन कराव्या लागणार. कारण हा अभ्यासात 'ढ' आणि तो 'हुशार'! शेजारच्या राजूला यंत्रे दुरुस्त करता येत नाहीत म्हणून त्याला कोणीही काही बोलणार नाही किंवा त्याच्यावर 'ढ' असा शिक्काही बसणार नाही. रेडीमेड उत्तरे घोकून जो परीक्षेचा गड सर करतो तो हुशार पण ज्याला कुणी कधीही बापजन्मात जे शिक्षण दिलेले नाही त्या विषयांतील कौशल्याचे कौतुक होणे तर सोडाच पण अभ्यासापासून पळवाट किंवा रिकामपणाचे उद्योग अशा नजरेनेही त्याच्याकडे बघितले जाणार.     
शिक्षकांनी सांगितलेली उत्तरे पाठ करा, निबंध पाठ करा, भूमितीतील प्रमेये पाठ करा, काढलेल्या आकृत्या परत परत गिरवा अशा प्रकारे वर्षभर अभ्यास झाल्यानंतर जी काही परीक्षा होते त्यात काहीजण उत्तम मार्क मिळवतात तर काही थोडेसे! काहीजण चक्क नापासही होतात. पालक-शिक्षकांकडून तुलना होतात, हुशार-ढ अशा वर्गवाऱ्या होतात,  कौतुक होते, उपेक्षा होते. एवढे शिकवूनही 'गधडा' किंवा 'गधडी' नापास होतेच कशी? या विषयाच्या मुळाशी कोणी हात घालत नाही कारण  ते अवघड असते. हुशार किंवा ढ अशी लेबले लावणे सोपे असते. शाळेत जातोय, ट्युशन लावलीय, आई-बापाचे पैसे जातायत पण त्याला काही आहे का? त्या गधड्याला नक्की कोणत्या विषयात गती आहे, स्वारस्य आहे किंवा त्याच्यातील सुप्त गुण काय आहेत याचा रीतसर अभ्यास करायला आई-वडिलांना थोडाच वेळ असतो? ज्येष्ठ सतारवादक पण.शंकर अभ्यंकर यांनी एकदा रंगलेल्या गप्पांत एक किस्सा सांगितला होता. त्यांना लहापणापासून संगीताची विलक्षण ओढ. शालेय विषयांत फारशी गती नव्हतीच. चौथी झाली आणि वडिलांनी सांगितले आता उद्यापासून तुझी शाळा बंद. तुला हवे तेवढे गाणे शिक. शंकर अभ्यंकर मनातून खूप आनंदले आणि त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे त्यांनी चीज केले. ते पुढे म्हणाले 'शाळा शिकू नकोस आणि गाणे शिक' असा सल्ला देणारे माझे वडील हे जगावेगळेच होते. 
कालांतराने माणसाचे तारुण्य ओसरते. प्रापंचिक जबाबदाऱ्या पेलता पेलता मध्यमवयात माणूस पदार्पण करतो. अनेक गोष्टी करायच्या, शिकायच्या राहून गेलेल्या असतात. कुणाचे गायक व्हायचे स्वप्न तर कुणाचे चित्रकार व्हायचे स्वप्न धुळीला मिळालेले असते. स्वप्न आणि वास्तव याचा मेळ कुणाला घालता आलेला नसतो. खूप शिक, नोकरी कर आणि भरपूर पैसे मिळव अशा सल्ल्यांना शिरोधार्य मानून अनेकांनी वाटचाल केलेली असते. भौतिक सुखे हात जोडून उभी असली तरी इच्छा, प्रेरणा अंतर्धान पावलेल्या असतात. अशातच कधीतरी पेटीवर बोटे फिरवून बघावीशी वाटू लागतात, कुंचला हातात धरावासा वाटू लागतो, कागदाची फुले करण्याची उर्मी दाटून येते, कोणे एकेकाळी केलेले विणकाम बघत बसावेसे वाटू लागते, शाळेत असताना केलेल्या नाटकांतल्या संवादांशी मन खेळू लागते, खेळण्यासाठी हात शिवशिवू लागतात, सायकलीच्या पायडलवरून पाय फिरवावासा वाटू लागतो. आज मी जर अमुक एक शिक्षण घेतले असते तर मी एव्हाना कुठल्या कुठे गेलो असतो या अंतर्मनात दडलेल्या वाक्याला आपल्याला घासूनपुसून परत लख्ख करावेसे वाटू लागते. 
ज्या शस्त्रांनी आपली हुशारी सिद्ध झाली असती ती शस्त्रे आपल्याला अशी चाकोरीबद्ध वृक्षाच्या मुळाशी गाडावी लागली याची खंत आता मनात दाटून येते. 'हुशारी' सिद्ध झाली नाही आणि आपण 'ढ' म्हणून गणले गेलो याची रुखरुख मनाला लागून राहते. 

1 comment:

  1. खुपच छान! आजकालच्या रॅट रेसच्या काळामध्ये किति पालक असा विचार करतील?
    आम्ही नुकतेच परतलो आहोत सवडीनुसार आधिचे लेख वाचीन.

    ReplyDelete