Monday 16 April 2012

समस्त पालकांना उद्देशून...........

१८ वर्षाचा मुलगा अथवा मुलगी कायद्याच्या दृष्टीने सज्ञान मानले जातात म्हणजेच स्वतंत्र निर्णय घेण्याच्या त्यांच्या क्षमतेवर कायदेशीर शिक्कामोर्तब होते. तरीही अनेक पालक अजून तू लहान आहेस, तुला काय कळते यातले, वेड्यासारखा वागू नकोस अशा अर्थाची वाक्ये सतत त्यांच्यासमोर उच्चारत असतात.  
मोठे होणे म्हणजे इथे नुसते वयाने मोठे होणे हे अभिप्रेत नसून बुद्धीने, सारासार विचारक्षमतेने आणि अनुभवाने असा अर्थ यात अध्याहृत असतो. वयानुसार भले-बुरे अनुभव येत जातात आणि जगाबद्दल, लोकांबद्दल एक मत आकारास येते. प्रत्येक व्यक्तीच्या अनुभवानुसार ही मते निश्चितपणे वेगळी असू शकतात. जे आईचे मत तेच मुलीचे वा जे वडिलांचे मत तेच मुलाचे असावे असा आग्रह असू नये. 
आपल्यापैकी बहुतेक सगळेच पालक मुलांच्या भवितव्यविषयी उत्सुक असतात आणि हे स्वाभाविक आहे पण मुलांच्या काही निर्णयांमुळे उत्सुकतेची जागा साशंकता घेते आणि मग मुलांच्या निर्णयात ढवळाढवळ करण्याची बहुतांश पालकांची उर्मी एकदम उफाळून येते. तू हा कोर्स घेऊ नकोस तू हाच घे हे सांगण्यामागे एक सुप्त भीती दडलेली असते. जो कोर्स तो मुलगा करू इच्छित आहे त्या कोर्सविषयी ठोस अशी माहिती पालकांना नसते आणि ती मिळवण्याची गरजही त्यांना वाटत नाही. पण कुणीतरी तमक्याने तो कोर्स घेतला होता आणि त्याला त्यात यश आलं नाही म्हणा किंवा पुढे त्या कोर्सला चांगले व्यावसायिक भविष्य नाही हे त्यांनी कधीतरी ऐकलेले असते. त्यामुळे आपल्या मुलानेही हा कोर्स करू नये असे त्यांना वाटते. हे वाटणे इथेच थांबत नाही. मग ह्या विशिष्ट कोर्सविषयी सर्व नकारात्मक विचार त्या मुलाच्या मनात भरवले जातात नुसते एवढेच नाही तर त्याने कोणता कोर्स करावा याविषयीची मते त्याच्यावर वारंवार थोपवली जातात. त्याची सज्ञानता मतदान करण्यापुरतीच सीमित राहते. मित्रांची मते, पालकांची मते आणि आजूबाजूची परिस्थिती हा विषमभुज त्रिकोण त्याला भेडसावू लागतो.  
माझ्या मैत्रिणीच्या मुलाला केटरिंगला जायचे होते. आपल्या मुलाने केटरर व्हावे हे वडिलांना अजिबात पसंत नव्हते. आज माझी पोझिशन बघ, ऑफिसात एवढ्या मोठ्या पोस्टवर असलेल्या वडिलांचा एकुलता एक मुलगा केटरर आहे असे चारचौघांत सांगायला मला बिलकुल आवडणार नाही. तू एम.बी.ए हो. वडिलांनी झटक्यात सांगून टाकले. आईनेही वडिलांचीच री ओढली. ती हाउसवाईफ असल्याने तिचे जग फारच सीमित होते. शिवाय नवऱ्याच्या विरुद्ध जाऊन मुलाच्या निर्णयाचे स्वागत करणे  तिला मंजूर नव्हते . शिवाय नवऱ्याचा हुद्दा बघता तो सांगेल ते योग्यच असेल असे तिला वाटत होते. तो मुलगा निराश झाला. घरी कुणाशीही बोलेनसा झाला. दिवस-रात्र बाहेर राहू लागला. सिगारेटी फुंकणे सुरु झाले. चेहरा ओढल्यासारखा, डोळे खोल गेलेले, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. शरीरावर परिणाम दिसू लागला. त्याच्या मित्रांनी घरी येऊन आईला त्याच्या मानसिक स्थितीची कल्पना देऊन त्याच्या वडिलांचे मन वळवायला सांगितले. आई घाबरून गेली आणि तिने वडिलांच्या कानावर हा प्रकार घातला. वडिलांनी कानाडोळा केला आणि काही दिवसांनी तो ताळ्यावर येईल असे सांगून तिला दिलासा दिला. या घटनेनंतर बरोब्बर आठ दिवसांनी हा मुलगा घरातून निघून गेला. कोणतीही चिठ्ठी-चपाटी त्याने लिहून ठेवली नाही. तुझ्या लाडाने तो बिघडला, तुम्ही नाही म्हणालात म्हणून तो निघून गेला असे एकमेकांवर आईवडिलांचे दोषारोप करून झाले. दोघेही पोलीस स्टेशनात वाऱ्या करू लागले. नातेवाईक, आजूबाजूचे, ऑफिसमधले सर्वांपर्यंत बातमी पोहोचली. सांत्वनाच्या  निमित्ताने लोक घरी येऊन चाचपणी करू लागले. टी.व्ही.वर फोटो दाखवला गेला. पेपरमध्ये आई-वडिलांचे 'असशील तसा निघून ये. आई फार आजारी आहे' अशी विनंतीही छापून आली. वडिलांची 'इमेज आणि इभ्रत' नको त्या प्रकारे चव्हाट्यावर आली. त्याची आई भकास दिसू लागली. तिला हे आयुष्य नकोसे वाटू लागले. मुलाला सपोर्ट करायला हवा होता असेही वाटू लागले. ती तिच्या नवऱ्याशी बोलेनाशी झाली. त्याच्या मित्रांनीही तोंडात मिठाची गुळणी धरली होती.  अखेर तपासांती काही महिन्यांनी त्या मुलाचा शोध लागला. तो गोव्याला होता. सुखरूप होता. त्याच्या मित्रांनी त्याला थोडी आर्थिक मदत केली होती. गोव्याला एका हॉटेलवर तो रुजू झाला होता आणि साईड बाय साईड त्याच हॉटेलमध्ये केटरिंगचा कोर्सही करत होता. आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. मुलाने स्वत:च्या जीवाचे काही बरे-वाईट केले नाही हे पाहून त्यांना उभारी आली. आई-वडील त्याला आणायला गेले. पण मुलाने हा कोर्स पूर्ण करीन आणि मगच घरी येईन असे निक्षून सांगितले. मुलगा हातचा जाता जाता राहिला ह्या गोष्टीवर त्याच्या पालकांनी समाधान मानले. इतर पालकांसाठीही हा धडाच होता. 
बरेच पालक मुले मोठी झाल्यानंतरही मुलाने काय खावे-प्यावे, कोणत्या वाहनाने प्रवास करावा अथवा करू नये, कोणत्या प्रकारचे मित्र-मैत्रिणी निवडाव्यात, रस्ता क्रॉस कसा करावा, कोणते सिनेमे बघावेत, कोणते कपडे घालावेत, कोणत्या हॉटेलांत जावे, कोणता व्यावसायिक कोर्स निवडावा,कोणते खेळ खेळावेत या किंवा अशा बहुतेक गोष्टींवर अकारण आपले मतप्रदर्शन करत राहतात. आपले मुलाविषयीचे प्रेम हे आधी अधिकारात आणि नंतर काळजीत, अतिकाळजीत, चिंतेत आणि मग व्यथेत रुपांतरीत होत राहते.  
आपली मुले जोवर लहान आणि अज्ञ असतात तोवर त्यांना पंखांखाली सुरक्षित ठेवणे योग्य असते पण एकदा का ती सज्ञान झाली की ती विचारपूर्वक आपले निर्णय घेऊ शकतात. ती व्यकी म्हणून स्वतंत्र असतात. तुमच्या मार्गदर्शनाची त्यांना गरज असते पण तुमचा त्यांच्या आयुष्यातील अवाजवी हस्तक्षेप त्यांना आवडत नाही. ठराविक वयानंतर त्यांना लहानांसारखी वागणूक दिलेलीही खपत नाही. त्यांची गाडीही चांगल्या-वाईट स्टेशनांवरूनच पुढे सरकणार असते. त्यांच्या विचारांनी दिशा आणि गती पकडलेली असते. त्यांचे सहप्रवासी होणे ठीक असते पण त्यांच्या विचारांची सीट बळकावू पाहणे हे त्यांच्या सज्ञानतेवर , स्वतंत्रतेवर अतिक्रमण केल्यासारखे होते.  तुमच्या अनाहूत सल्ल्यांचा बुलडोझर त्यांच्या कोवळ्या पण सक्षम मनावर फिरतो आणि त्यांची स्वप्ने क्षणार्धात धुळीला मिळतात. या वडिलकीच्या वादळाच्या तडाख्यातून काहीजण सावरतात तर काही न परतण्याची वाट जवळ करतात. म्हणूनच सज्ञान मुलांचे मित्र जरूर व्हा पण तुमच्या पालकत्वाचे ओझे त्यांच्यावर लादून त्यांचे स्वतंत्र व्यक्तित्व गुदमरू देऊ नका. त्यांच्या उमलण्याचा आनंद घ्या पण त्यांच्या उमलण्याच्या वाटेतील काटे होऊ नका. त्यांच्या निर्णयाचे खुल्या दिलाने स्वागत करायला शिका. तुमच्या इच्छा-आकांक्षा यांची पूर्तता करण्याचे ते हुकमी एक्के नाहीत ही खुणगाठ मनाशी पक्की बांधा. त्यांनाही टक्के-टोणपे खाऊ द्या. त्यांनाही उन्हाचे चटके लागू द्या. त्यातूनच त्यांचे बावनकशी सोने तावून-सुलाखून बाहेर येईल याची खात्री बाळगा. 

1 comment:

  1. लेख छान आहे. पालकांनी अती काळजीच्या आहारी जाऊन अधिकार दाखवून पाल्यास विवश करू नये हे ठीक आहे पण जर सन्तुलीत विचार करणारा पालक असेल ( आणि असे बरेच असतात), त्यास आपल्या पाल्याच्या बौधीक कुवतीची नीट जाण असेल तर आणि त्याचा पाल्य जर इतर मित्रान्मुळे त्याला न झेपु शकणारा अभ्यासक्रम करायचा म्हणत असेल तर पालकाचे हे कर्तव्य असते की त्याने पाल्यासोबत नीट चर्चा करून, त्याला न दुखावता ह्या गोष्टीची कल्पना द्यावी. माझ्या स्वतहाचे पहाण्यात जवळच्या लोकांमधील अशी उदाहरणे आहेत की केवळ पाल्यास सर्व समजते, आता तो मोठा झाला आहे त्याचा निर्णय त्यास घेऊ द्या, आपण पूर्णपणे त्याच्या निर्णय मागे उभे राहीले पाहिजे ह्या समजुती पोटी मुलास न झेपणारा अभ्यासक्रम घेऊ दिला आणि अंती आर्थिक नुकसान तर झालेच परंतु कालाप्व्यय झाला शिवाय मुलास नैरश्यानी ग्रासले ते वेगळेच. तात्पर्य, ह्याही पैलूला तितकेच महत्व आहे.

    ReplyDelete