Thursday 30 January 2014

निवडणुका आल्या दारी - तरी स्त्री -सुरक्षेची निसटती दोरी

निवडणुका तोंडावर आल्या आहेत. प्रत्येक पक्ष आपला अजेंडा ठरवण्यऐवजी दुसऱ्या पक्षाच्या धोरणांवर आगपाखड करण्यात आणि त्या पक्षाच्या ध्येय-धोरणांची यथेच्छ निंदा करण्यात गुंतला आहे.   जागोजागी सभा होत आहेत.  जनतेवर आश्वासनांची खैरात केली जाते आहे.  यात आम्ही वीज दर  कमी करू , काही जागांचे टोल बंद करू  असे आणि यासारखे काही मुद्दे आहेत.  निवडणुका झाल्यानंतरचे चित्र अर्थातच खूप वेगळे असणार आहे .  वाढती लोकसंख्या थोपवण्यासाठी करावी लागणारी जनजागृती,  परप्रांतीयांच्या लोंढ्यांना चाप, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता,  उत्तम रस्ते, मुबलक पाणी, सर्वसामान्यांना रास्त दारात  भाजीपाला व फळे , महिन्याचे रेशन, वाढत्या प्रदूषणाला आळा, गरिबांसाठी स्वस्त दरात घरे असे कित्येक मुद्दे हाताळण्याची नितांत आवश्यकता आहे. 
परंतु या सर्व मुद्द्यांपेक्षाही आज निकड भासते आहे ती लहानग्या मुलीपासून ते वयस्कर महिलेपर्यंतच्या सर्वांच्या सुरक्षेची!  दिल्लीतील निर्भयाच्या घटनेनंतर जणू काही सर्व ठिकाणी बलात्कारांचे पेवच फुटले आहे. याचे मुख्य कारण असे की बलात्कार करणाऱ्या नराधमांना शिक्षेचे भयच उरलेले नाही.  याउलट मुलींनी कोणते कपडे घालावेत, त्यांचे हावभाव कसे असावेत, त्यांनी रात्री घराबाहेर फिरू नये अशा अनेक सूचना रोज कानांवर आदळत आहेत. बलात्कार हा शब्द एखाद्या घणाप्रमाणे मनात थैमान घालतो आहे. आत्ताच हिंगोली येथे झालेले बलात्कार प्रकरण पहा. केवळ सात वर्षाचे वय असलेली मुलगी कामुक हावभाव किंवा तोकडे कपडे घालून पुरुषांना चाळवू शकेल का? तिला बिचारीला याचा अर्थ तरी माहित असेल काय? पण तरीही ती या पाशवी बलात्काराची शिकार बनलीच ना?  तिची विदारक कहाणी डॉ. आशा मिरगे यांनी जेव्हा सांगितली तेव्हा मन सुन्न झाले. शाळेसारख्या पवित्र समजल्या जाणाऱ्या ठिकाणी असा अन्याय एखाद्या मुलीवर होत असेल तर मग कुठले ठिकाण सुरक्षित समजावयाचे?  फक्त अनैसर्गिक पद्धतीने बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांनाच फाशी आणि नुसता सामुहिक बलात्कार केला गेला तर त्या गुन्हेगारांना फाशी नाही या निर्णयावर हसावे की रडावे तेच कळेनासे झाले आहे.
एखाद्या मुलीचे संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आयुष्य उध्वस्त करणारया अधम प्रवृत्तीला कोणत्या कारणास्तव मोकाट सोडायचे अथवा तो जहाल शिक्षेस पात्र  नाही असे समजायचे?  ज्या गोष्टी ज्या वयात योग्य रीतीने पालक मुलांना समजावतात त्या गोष्टी आज मात्र मुलींना त्यांच्या  अजाण किंवा  निष्पाप वयात समजावण्याची जबाबदारी पालकांवर येउन ठेपली आहे.  शाळेतील शिक्षकांवर तरी विश्वास कसा ठेवायचा? मध्यंतरी ठाण्यातील शाळेत एका मुलावर अत्याचार झाला होता.  जी माणसे आपल्यापेक्षा वयाने मोठी आहेत त्यांच्याकडे आदराने पाहावे की भीतीने, सावधपणाने अशी आत्यंतिक भीषण वेळ मुला-मुलींवर येउन ठेपली आहे.     
असे बलात्कारी काही काळ सरकारी पाहुणे बनतात आणि कालांतराने सुटतात. जणू त्यांना अशा प्रकारचा गुन्हा परत करण्याचे सरकारी लायसेन्सच मिळते. एक तर ह्या अशा केसेसचा न्यायनिवाडा  झटकन होत नाही.  झालाच तर त्यांना कडक शासन करण्यास कोर्टाचे हात दुबळे पडतात. अशा असंख्य केसेस आजमितीला न्यायालयात प्रलंबित आहेत. यामुळे होतं काय की भविष्यात असे अनेक वासनांध या प्रकारचे गुन्हे करायला सहज धजावतात. कारण त्यांना परिणाम माहिती असतात.  काही दिवस फार तर तुरुंगात राहायला लागेल यापलीकडे फारसे काही होणार नाही याची त्यांना शाश्वती असते.     
बलात्कार झालेल्या मुलींना मात्र घरी-दारी वाईट प्रसंग सहन करावे लागतात. अशा मुलींचे संपूर्ण घरच ह्यात भरडले जाते. तिचे कधीच भरून न येणारे शारीरिक नुकसान आणि  प्रचंड मानसिक धक्का या भांडवलावर तिला पुढचे आयुष्य कंठायचे असते. याची कल्पना फक्त त्या  अभागी जीवाव्यतिरिक्त इतर कोणाला कशी येणार? सरकार त्यांच्यासाठी आर्थिक आधार देऊ पाहत आहे ही बाब स्वागतार्ह आहे  पण मुळातच अशा घटना घडू नयेत यासाठी अत्यंत कडक पावले उचलण्याची जबाबदारी मात्र शासन झटकत आहे असे वाटू लागले आहे.  काही देशांत अशा बलात्कारींना देहांत शासन अथवा तत्सम इतरांना दहशत बसेल, भय वाटेल असं शासन करण्याची तरतूद आहे पण दुर्दैवाने आमच्या भारत देशात शासन आणि न्यायालये अशा प्रकारच्या शिक्षा देण्यास पुरेसे तयारच नाहीत ही अत्यंत खेदजनक आणि समस्त स्री वर्गाच्या दृष्टीने गंभीर बाब आहे.   
महिला सबलीकरण, सक्षमीकरण हे हब्द आपण अनेक वेळा ऐकतो . याची रुजवात प्रत्येक घरापासून होणे अत्यावश्यक आहे.  मुलाला आणि मुलीला सारखेपणाने वाढवणे, मुलीचा आत्मविश्वास दृढ करणे, घरातील महिला वर्गाचा आदर करणे, त्यांना मानसिक दृष्ट्या सबल करणे  या गोष्टी लहानपणापासूनच बिंबवल्या गेल्या पाहिजेत. शाळेत खालच्या इयत्तेपासून मुलींची शारीरिक क्षमता वाढेल असे प्रशिक्षण त्यांना द्यायला हवे. स्व-संरक्षणाचे धडे त्यांना मिळायला हवेत. प्रसंगी एखादे हत्यार बाळगायची सवलत त्यांना मिळायला हवी. सगळ्या थरांत याचा प्रचार व्हायला हवा. व्यापक पातळीवर या गोष्टींची अंमलबजावणी व्हायला हवी. मुलींच्या साठी उभारण्यात आलेल्या विद्यालयात अथवा हॉस्टेल मध्ये स्त्री -शिक्षिका आणि
स्त्री -रेक्टरच  हव्यात. अन्यथा या पुढची पिढी आपण स्वत:ला खरोखरच अपत्य होऊ द्यावे का या संभ्रमात पडलेली आपल्याला दिसेल.   

आज निवडणुकांच्या उंबरठ्यावर , मग कोणताही पक्ष निवडून सत्तेवर विराजमान होवो , त्या पक्षाने मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेला अग्रक्रम देणे ही युद्धपातळीवर हाती घेण्याची मोहीम आहे हे लक्षात असू द्यावे. 

No comments:

Post a Comment