Sunday 27 November 2016

धिक्कारार्ह, आक्षेपार्ह, निंदनीय, तिरस्करणीय बाल्य ........


सहा वर्षाच्या मुलीवर ८,९,आणि १० वर्षाची मुले शारीरिक अत्याचार करतात ही घटना पचवता येणंच अवघड आहे. पण हा प्रसंग काल्पनीक नाही तर तो प्रत्यक्षात घडलेला असल्याने त्याचे गांभीर्य वाढले आहे.
मुळात हे असे बीभत्स कृत्य करण्याची इच्छा या कोवळ्या वयात या मुलांच्या मनात निर्माण कशी होते हाच खरा प्रश्न आहे. काहीतरी बघून , उत्तेजित होऊन हा असा अत्याचार करण्यास ही मुले जर प्रवृत्त होत असतील तर याचा वेळीच विचार होणे अत्यावश्यक आहे नाहीतर ही पिढीच्या पिढी बरबाद होण्याची शक्यता आहेच त्याचबरोबर लहानग्या अनेक मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उग्र स्वरूप धारण करणार आहे. 
इतक्या लहान वयाची मुले हे कृत्य करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सिद्ध कशी होतात तेच कळत नाही. शाळा, शिक्षक आणि पालक यांच्या सान्निध्यात बहुतांश वेळ व्यतीत करणारी ही मुले अशी एकाएकी वासनेच्या आहारी जाऊन एखाद्या मुलीच्या शरीराशी अत्यंत गलिच्छ, धृणास्पद रीतीने खेळू पाहतात यासारखी दुसरी शोकांतिका नाही. 'लहानपण न देगा देवा' असे म्हणायची आता पाळी आली आहे. शाळेत शिकवले जाणारे सुविचार, श्लोक, प्रार्थना आणि जन्मदात्यांनी केलेले संस्कार अक्षरश: सुळावर चढले आहेत.
हल्ली अगदी लहान वयाची शाळकरी पोरेही येणाऱ्या जाणाऱ्या मुलींवर अचकट विचकट शेरे मारतात. त्यांच्या घोळक्यात कल्पनाही करवणार नाही अशा विषयांची चर्चा सुरु असते. त्यात आता जवळजवळ प्रत्येकाच्या हातात अवेळीच स्मार्ट फोन आलेला असल्याने कुणी कुणाला 'hot'व्हिडीओ सेण्ड करतात. ती दृश्ये बघून काही धाडसी मुले इतरांना instigate करण्याचा प्रयत्न करतात.  यातूनच मग हा सामूहिक अत्याचाराचा बेत मनात आकाराला येतो. एक ना एक दिवस सावज टप्प्यात येतं आणि मग अशा हिडीस प्रयोगांना भूमी मिळते. जगातील समस्त मानसोपचार तज्ञांसाठी ही मुलांची मानसिकता म्हणजे एक आव्हानच आहे. 
जग पुढे जातंय ते  information & technology'' च्या प्रगती मुळे. पण हीच technology आता मानवतेच्या मुळावर येतेय की काय ह्याची भीती वाटू लागली आहे. स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या वयाचा विधिनिषेध नाही, परिणामांची क्षिती नाही, सुसंस्कारांचे पाठबळ नाही अशा अवस्थेत ही कोवळी मने चुकीच्या दिशेने फोफावत चालली आहेत. आपलं मूल दिवसभर  नक्की काय करतंय, त्याच्या मनात नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्याची प्रामाणिक इच्छा किती पालकांना असते? त्यांना आपल्या मुलांशी संवाद साधायला वेळ कुठे असतो? या मुलांच्या निरागसतेला, निष्पाप वृत्तीला ग्रहण लागल्याचं किती पालकांच्या लक्षात येतं?  अपराध घडल्यावर मग अशा 'अजाण'मुलांना सुधारगृहात पाठवलं जातं. पण सुधारगृहातून बाहेर येताना या मुलांची मानसिकता, अत्याचार करण्याची प्रवृत्ती बदललेली असेल अशी हमी कोणी देऊ शकतं का? यापुढील त्यांची वाटचाल सन्मान्य मार्गावरूनच होईल अशी शक्यता गृहीत धरता येऊ शकते का? 
precaution is better than cure'' अशी इंग्रजीत म्हण आहे. गुन्हा घडून गेल्यानंतर वरवरची मलमपट्टी करण्याऐवजी असे गुन्हे घडू नयेत म्हणून, अशी विकृत मानसिकता तयार होऊ नये म्हणून आधीच काही ठोस पावले का उचलली जात नाहीत?  मोर्चे, घोषणा,कॅण्डल मार्च, बंद, चर्चा या post activities अशा वेळेस  वांझोट्या ठरतात हे आपण आजवर सगळ्यांनी अनुभवलं आहे, शिक्षक, पालक, मानसोपचारतज्ञ्, सामाजिक संस्था हे सर्व घटक पुढे येऊन, एकजुटीने या समस्येच्या मुळाशी का जात नाहीत? वास्तविक पाहता हे काम आजमितीला युद्ध पातळीवर करण्याची नितांत गरज आहे. 
आपल्याला या नव्याने उदयाला येणाऱ्या पिढीतून देशाचे भावी सुजाण नागरिक निर्माण करायचे आहेत की बलात्कारपटू हे ठरवण्याची वेळ निश्चितच येऊन ठेपलेली आहे. या मोहिमेत प्रत्येक जबाबदार नागरिकाने आपले वैचारिक सहकार्य देणे आत्यंतिक गरजेचे आहे असे मला वाटते.          

No comments:

Post a Comment