Monday 19 May 2014

मिशन 'मातोश्री'

काँग्रेसला धूळ चारत शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला आणि आम्हा  'बालमोहन १० वीई' च्या उद्धवच्या वर्गमित्र -मैत्रिणींना त्याला भेटायचं एक छान निमित्त मिळालं. कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित असलेली ही भेट नव्हती तर पूर्णपणे अनौपचारिक असा हा मित्रत्वाचा सोहळा होता.      
उद्धवसाठी भेट म्हणून अतिशय सुंदर असा केक आम्ही तयार करून घेतला आणि ताज्या टवटवीत फुलांचा सुरेख गुच्छ देखील मागवला.  ठरल्याप्रमाणे शिवाजीपार्क येथील जिप्सी या सर्वमान्य संकेतस्थळी आम्ही जमलो आणि काही अवधीतच मातोश्रीकडे प्रयाण केले . 

मातोश्रीत जाण्याची माझी तरी ही पहिलीच वेळ होती. मध्यंतरी अनेक वर्षे आम्हा मित्र-मैत्रिणींचा एकमेकांशी संपर्क नव्हता नाहीतर याआधी हा योग नक्कीच आला असता . विशेषकरून शिवसेनेचे सर्वेसर्वा बाळासाहेब असताना आम्हाला तिथे जाता आले असते याची थोडी रुखरुख वाटली.  आजवर बहुतेक सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे पाय कुठल्या ना कुठल्या निमित्ताने जिथे वळले होते त्या शिवसेनेच्या तीर्थस्थानी जाण्याची संधी आम्हाला मिळाली. कलानगरचे वळण आले आणि 'साहेब ' या फुलांनी सजवलेल्या शब्दाने आमचे स्वागत झाले. आम्ही आत शिरलो. जिथे तिथे गस्त घालणारे पोलिस दिसत होते. आमच्या गाड्या मातोश्रीपाशी आल्या. पायउतार होऊन आम्ही जवळजवळ लगेचच त्यांच्या स्वागतकक्षात गेलो. तिथे अगोदरच प्रचंड संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते आणि इतर संबंधित उपस्थित होते. उद्धव यायला जरा वेळ होता. आम्ही आमच्या मित्राच्या घरात हक्काने शिरून यथेच्छ बडबड सुरु केली. आजूबाजूचे लोक कुतूहल मिश्रित नजरेने आमच्या उत्साही ताफ्याकडे पाहत होते. आमच्यावर कोणतेच औपचारिकपणाचे बंधन नव्हते. आम्ही सर्वच जण बिनदिक्कत आपलेच घर असल्यासारखे मोकळेपणाने वावरत होतो. शेजारच्या छोट्या कक्षात आम्हा सर्वांची बसायची व्यवस्था केली आणि आम्ही तिथे जायला वळलो. तेवढ्यात समोरून शिवसेनेतील ज्येष्ठ व्यक्ती म्हणजेच मनोहर जोशी सर आले. मी त्यांना सर म्हणून सरळ हाक मारली आणि आम्ही उद्धवचे वर्गमित्र आहोत असं सांगितलं. त्यांनाही आनंद वाटला व त्यांनी आम्हाला बसायला सांगितले. मुख्य म्हणजे कोणत्याही राजकीय विषयाची कास धरून आम्ही तिथे आलो नसल्याने उद्धव सोबत केवळ निखळ आनंद साजरा करणे एवढाच आम्हा सर्वांचा अंतस्थ हेतू होता.     
        
अतिशय स्वादिष्ट पेढे आणि कोकम सरबताचा आम्ही आस्वाद घेतला. काही वेळाने उद्धव आला. आम्हा अर्वांचे अभिनंदन त्याने स्वीकारले. पण आमच्या कदाचित बरेच तास आधीच येउन ताटकळत बसलेल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी तो परत बाहेर गेला. त्याची खरे तर बरीच तारांबळ होत होती. एकीकडे वर्गमित्र भेटल्याचा आनंद वेगळाच होता पण दुसरीकडे पक्षीय जबाबदारी पार पडण्याचे बंधनही होतेच की ! शिवसेनेच्या विजयानंतरची आतषबाजी आम्ही अनुभवत होतो. बाहेर घोषणांचा गजर चालू होता. त्या घोषणात आम्ही आमच्या '१०वी ई' चा गजराही गुंफून टाकला.       
काही वेळाने रश्मी ठाकरे येउन आम्हाला भेटल्या. त्यांनी सुहास्यवदनाने आम्हा सर्वांचे स्वागत केले. त्या जणू आमच्यातल्याच होऊन गेल्या. यामुळे आमचा उरलासुरला संकोच गळून पडला आणि आम्ही जणू आमचे वय विसरून वर्गात असल्यासारखेच वागायला लागलो. नंतर युवराज आदित्य आले आणि त्याच्या बाबांचे अ-राजकीय मित्र-मैत्रिणी पाहून त्यालाही मौज वाटली. त्यानंतर उद्धवच्या हस्ते केक कापण्याचा व तो त्याला भरवण्याचा समारंभ पार पडला.  गप्पा आणि आठवणींत रमून गेलेल्या आमचे पाय निघता निघत नव्हते पण बाहेरची वाढती गर्दी आणि परतायची ओढ यामुळे आम्ही उद्धव-रश्मी आणि आदित्यचा निरोप घेतला.       
इतक्या वर्षांनी झालेली आम्हा वर्गमित्रांची आणि मैत्रिणींची भेट आणि त्या भेटीला मातोश्रीतून मिळालेला निखळ मैत्रीचा दुजोरा ही दौलत मनात साठवत आम्ही आपापल्या घरी परतलो.  

2 comments:

  1. अतिशय सुरेख शब्दात प्रसंगाची मांडणी केली आहे.
    अभिनंदन !!!

    नितिन अभ्यंकर
    १० वी क

    ReplyDelete