Wednesday 17 August 2011

अण्णा हजारे नावाची त्सुनामी


अनेक वर्षांपूर्वी एका गांधी टोपीने लाखो-करोडो लोकांना भुरळ घातली तश्याच एका गांधी टोपीच्या नेतृत्वाखाली आज लाखो-करोडोंनी आंदोलनाच्या मशाली पेटविल्या आहेत. अनेक धर्मांचे, पंथांचे, वयाचे, राज्यांचे नागरिक अण्णा नावाच्या एका झेंड्याखाली एकवटले आहेत. हा एवढा प्रचंड जनसमुदाय बघून वाटते की खरंच आज प्रत्येकाने मनात आणलं तर या भ्रष्टाचारी राजकारण्यांना मुळापासून हादरावण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे. अण्णांनी स्वप्राणाने या भ्रष्टाचारी लोकांविरुद्ध रणशिंग फुंकले आणि देशाच्या कानाकोपऱ्यात, गल्लीबोळांत , घरांघरात ते दुमदुमले. 
आज सरकारानितीमुळे अण्णा तिहार जेलमध्ये आहेत . तिथून ते सुटतील आणि उपोषणाचा शड्डू ठोकतील. देशांतर्गत पाठिंबा तर वाढतोच आहे पण आता हे लोण विदेशापर्यंत पोहोचले आहे. आपलं तसंच आपल्या पुढच्या पिढ्यांचं भलं व्हावं या भावनेनं जो तो या भ्रष्टाचाराविरुद्धाच्या लढ्यात सामील होतो आहे. ही लढाई माझी आहे ,माझ्याबरोबरीच्या अनेकांची  आहे या गोष्टीची जाणीव आता प्रत्येकाला झाली आहे. अनेकजण आपापल्या मुलाबाळांना घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. अनेक विचारवंत,चित्रपटसृष्टीतील नामवंत मंडळीही अण्णांच्या पाठीशी आहेत.
टी.व्ही.च्या अनेक वाहिन्यांवर राजकीय चर्चांना, आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. जो तो बेंबीच्या देठापासून ओरडून माझ्या पक्षाची भूमिका कशी योग्य आहे हे इतरांना पटवून देण्यात नाहक गुंतला आहे. सर्वसामान्य माणूस आपण या राजकीय दुष्टचक्रात कसे भरडले जात आहोत, होरपळून निघत आहोत हे जाहीररीत्या कबूल करायला पुढे सरसावला आहे. भ्रष्टाचाराची कीड, महागाईचा रोग,अस्वच्छतेचा-प्रदूषणाचा एड्स ,गुंडगिरीच्या साथी या व अशा सर्व आजारांवर अण्णा हजारे नावाचा रामबाण उपाय आता  सर्वसामान्यांना सापडला आहे. सत्ताधारी पक्षाच्या खुर्चीखाली अण्णा हजारे नावाचा टाईम बॉम्ब टिकटिक करतो आहे. इतर पक्ष वाहत्या गंगेत आपापले हात धुवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 
गेली अनेक वर्षे ज्या गोष्टींचा लाव्हा सामान्य माणसांच्या मनात खदखदतो आहे तो  अण्णा उर्फ किसन बाबुराव हजारे या रालेगनासिद्धीच्या विलक्षण रसायनामुळे रसरसून वाहू लागला आहे. अण्णांचा लोकपाल बिल संमत करून घेण्याचा हट्ट सत्ताधाऱ्यांच्या मुळावर येणार आहे. संसदेतील नियमांची ढाल कितीही पुढे केली तरी जनमताची धारदार तलवार तिला भेदून आरपार जाईल यात शंकाच नाही. सर्वसामान्यांचा वर्षानुवर्षे दबून राहिलेला  उद्वेग , राग एखाद्या प्रपाताप्रमाणे सत्ताधाऱ्यांच्या डोक्यावर कोसळतो आहे. 
आता उपोषणे, पदयात्रा झडतील. सत्ताधारी पक्ष नामोहरम होईल. इतर पक्षांच्या नेत्यांनाही यांपासून बरंच काही शिकता येईल . सर्वसामान्य अण्णा नामक सुसज्ज शस्त्राच्या आधाराने भ्रष्ट सत्ताधाऱ्यांवर वार करतील आणि चारी मुंड्या चीत होण्याचा अनुभव या राजकारण्यांच्या पदरात पडेल अशी आशा बाळगायला हरकत नसावी .

No comments:

Post a Comment