Friday, 31 January 2014

दंगलींचे राजकारण............


 निवडणुका जसजशा जवळ येतात तशा खपली धरलेल्या जखमा खरवडून त्याचे राजकारण सुरु होते. तळागळात दफन केलेले मुडदे वर येतात. अगदी जाहीर सभांमध्येही राजकीय वक्ते त्याचा झणझणीत परामर्श घ्यायला मागेपुढे पाहत नाहीत.  विविध वाहिन्यांचे संपादक, वार्ताहर, मुलाखतकार राजकीय व्यक्तींवर एखादे सावज मिळाल्यासारखे तुटून पडतात.  एखाद्या पक्षाचा प्रवक्ता दुसऱ्या पक्षाच्या प्रवक्त्यावर घणाघाती शाब्दिक हल्ला चढवतो. हीच संधी साधत तो प्रवक्ताही  शब्दांच्या डरकाळ्या फोडत त्याच्या शत्रू पक्षाला चारी मुंड्या चित केल्याचा आव आणतो. अशी सारी राजकीय रणधुमाळी आपण सर्वचजण रोजच टीव्ही वर पाहतो. त्यातून काहींचे मनोरंजन होऊ शकते  तर काहींना मनापासून या गलिच्छ राजकारणाचा संताप येऊ शकतो.     
आजकाल दंगलींचे राजकारण जिथेतिथे जोरात सुरु आहे.  १९८४ ची दंगल व्हर्सेस २००२ ची दंगल असे त्याचे स्वरूप आहे. मध्ये कुठेतरी १९९३च्या बाबरी मशिदीचा उल्लेखही मधेच डोकावतो. गांधी व्हर्सेस मोदी असे राजकारण सुरु असल्याने इंदिरा गांधी गेल्यानंतरच्या दंगली आणि गोध्रा हत्याकांडा नंतरच्या  दंगली अशी आग पुन्हा एकदा जनमानसांत पसरवली जात आहे .  या दंगलींच्या पटावर राजकारणातील प्यादी आपापली सरशी करू पाहत आहेत.  
हे म्हणजे कसं आहे की मी नव्याण्णव उंदीर मारले आणि तू शंभर . अर्थात तुझे पातक माझ्यापेक्षा जास्त, त्यामुळे सत्ता उपभोगायला मी तुझ्यापेक्षा जास्त लायक असा युक्तिवाद चालला आहे. तू हजार घरफोड्या केल्यास आणि मी केवळ नऊशे नव्याण्णव तेव्हा सिंहासनावर आरूढ व्हायला तुझ्यापेक्षा मीच जास्त योग्य नाही का असा सवाल, असे प्रश्न दुसऱ्या पक्षाला विचारले जात आहेत.    
इंदिरा गांधी गेल्यानंतर असंख्य निरपराध शिखांचे शिरकाण झाले. पोलिसांची कुमक तिथे योग्य वेळेस पोहोचली नाही . राजीव गांधी नुकतेच पंतप्रधान म्हणून घोषित झाले होते . ते या क्षेत्रात अननुभवी होते. त्यांनी या प्रसंगी उधृत केलेली वाक्ये आणि एकंदर शिखांच्या मनात कायमचा उमटलेला ओरखडा या सर्व गोष्टी जनतेला ज्ञात आहेत. गोध्रा हत्याकांड झाल्यानंतर गुजरातेत याचे उमटलेले हिंसक पडसाद सुद्धा समस्त जनतेने अनुभवले. पोलिस तिथेही योग्य वेळेत पोहोचू शकले नाहीत. ही सारी किमया नक्की कुणाची हे न कळण्याइतपत जनता दुधखुळी नाही.        
सध्या भारतापुढे उभे असलेले ज्वलंत प्रश्न सोडवण्यास एकही राज्यकर्ता उत्सुक नाही. देशाचा विकास साधण्याचा खटाटोप करण्याऐवजी स्वत:चा विकास साधण्यासाठी किंवा यातून स्वत:च्या पक्षाला राजकीय लाभ मिळवून देण्यासाठीच जो तो झटतो आहे. दंगलीत किती माणसे मारली गेली याचे  statistics दाखवून आणि तुमच्या पक्षाने आमच्या पक्षापेक्षा शंभर-दोनशे अधिक मारली असे म्हणून पापक्षालन होणार आहे का?  सत्ता उपभोगणे हा अंतिम हेतू असल्यामुळे हे पक्ष सत्ता काबीज करण्यासाठी कोणत्याही थराला शकतात याचे हे जिवंत उदाहरण आहे.  
एका वाहिनीवरून एक मुलाखत प्रक्षेपित होते. मुलाखतकार दंगली संबंधी प्रश्न विचारतो आणि  जे उत्तर येते त्यामुळे काही वर्षांपूर्वी दुखावलेली, अपमानित झालेली मने पुन्हा एकदा नव्याने दुखावली जातात. मग मोर्चे, निदर्शने यांना उत येतो. दु:खद आठवणी जाग्या होऊन ठुसठुसायला लागतात. दंगली कोणी पेटवल्या, सक्रिय सहभाग कुणाचा, पोलिस कधी आले, किती माणसे मेली या सर्व  मुद्द्यांवर परत एकदा चर्विचर्वण होते. पक्षाचा आणि वाहिन्यांचा TRP वाढायला याची मदत होत असावी . मात्र या दंगलींत प्रत्यक्ष भरडल्या गेलेल्या लोकांना याचा किती त्रास होत असेल असा साधा विचारही कुणाच्या मनात येत नाही. आपल्या गेलेल्या माणसांच्या दु:खावर काळ हेच औषध आहे असे समजून जी माणसे आज मानसिक दृष्ट्या सावरली असतील त्यांना पुन्हा त्याच भीषण गोष्टींची आठवण हे राजकीय पक्ष आणि इतर संबंधित का करून देऊ इच्छितात ?      
आमच्या भारत देशाची प्राचीन परंपरा, संमृद्ध संस्कृती, सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता या गोष्टींचा मागमूस तरी आता राहिला आहे काय असा प्रश्न पडतो.  जळी-स्थळी स्त्रीची होणारी अवहेलना, तिची दिसामाशी ढळणारी मानसिकता, तिला भेडसावणारी असुरक्षितता, अशिक्षितता, बेकारी, चोऱ्या-दरोडे-खून,  नैराश्यापोटी होणाऱ्या आत्महत्या, अस्मानाला भिडणारी महागाई, जीवनावश्यक गोष्टींची टंचाई,  हॉस्पिटल्सची दुरावस्था, सार्वजनिक अस्वच्छता,  चुकीच्या शिक्षणक्रमात भरडून निघणारे बाल्य, बालमजुरी, शेतकऱ्यांच्या समस्या, पोलीसदलाच्या समस्या, अंगणवाडी महिलांचे प्रश्न, रस्ते-वीज-पाणी, बोकाळलेली अश्लीलता  या आणि अशा कित्येक मुलभूत प्रश्नांना हात घालण्याऐवजी  केवळ दंगलींचे राजकारण पेटवून त्यावर स्वत:ची पोळी भाजणारे सर्व पक्ष म्हणजे असंवेदनशील प्रवृत्तीचे एक जितेजागते उदाहरण आहे.           
आज कोणत्याही राजकीय पक्षाला कसलेही तारतम्य, कोणताही विधिनिषेध उरलेला नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. एक मुद्दा निवडायचा आणि त्यावर रान उठवायचे असा प्रकार सर्रास चाललेला आहे. सत्ता कोणाचीही येवो , जनसामान्यांचे प्रश्न धसास लागतील अशी अजिबात शाश्वती नाही. महिलांच्या सुरक्षिततेची निश्चिंती नाही. स्वस्ताईची हमी नाही. तेव्हा कोणालाही मत देणे म्हणजे काळोख्या गल्लीत पुनश्च फिरून येणे यापेक्षा अन्य काही साध्य होईल अशी आशा बाळगणे व्यर्थ आहे.      

Thursday, 30 January 2014

निवडणुका आल्या दारी - तरी स्त्री -सुरक्षेची निसटती दोरी

निवडणुका तोंडावर आल्या आहेत. प्रत्येक पक्ष आपला अजेंडा ठरवण्यऐवजी दुसऱ्या पक्षाच्या धोरणांवर आगपाखड करण्यात आणि त्या पक्षाच्या ध्येय-धोरणांची यथेच्छ निंदा करण्यात गुंतला आहे.   जागोजागी सभा होत आहेत.  जनतेवर आश्वासनांची खैरात केली जाते आहे.  यात आम्ही वीज दर  कमी करू , काही जागांचे टोल बंद करू  असे आणि यासारखे काही मुद्दे आहेत.  निवडणुका झाल्यानंतरचे चित्र अर्थातच खूप वेगळे असणार आहे .  वाढती लोकसंख्या थोपवण्यासाठी करावी लागणारी जनजागृती,  परप्रांतीयांच्या लोंढ्यांना चाप, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता,  उत्तम रस्ते, मुबलक पाणी, सर्वसामान्यांना रास्त दारात  भाजीपाला व फळे , महिन्याचे रेशन, वाढत्या प्रदूषणाला आळा, गरिबांसाठी स्वस्त दरात घरे असे कित्येक मुद्दे हाताळण्याची नितांत आवश्यकता आहे. 
परंतु या सर्व मुद्द्यांपेक्षाही आज निकड भासते आहे ती लहानग्या मुलीपासून ते वयस्कर महिलेपर्यंतच्या सर्वांच्या सुरक्षेची!  दिल्लीतील निर्भयाच्या घटनेनंतर जणू काही सर्व ठिकाणी बलात्कारांचे पेवच फुटले आहे. याचे मुख्य कारण असे की बलात्कार करणाऱ्या नराधमांना शिक्षेचे भयच उरलेले नाही.  याउलट मुलींनी कोणते कपडे घालावेत, त्यांचे हावभाव कसे असावेत, त्यांनी रात्री घराबाहेर फिरू नये अशा अनेक सूचना रोज कानांवर आदळत आहेत. बलात्कार हा शब्द एखाद्या घणाप्रमाणे मनात थैमान घालतो आहे. आत्ताच हिंगोली येथे झालेले बलात्कार प्रकरण पहा. केवळ सात वर्षाचे वय असलेली मुलगी कामुक हावभाव किंवा तोकडे कपडे घालून पुरुषांना चाळवू शकेल का? तिला बिचारीला याचा अर्थ तरी माहित असेल काय? पण तरीही ती या पाशवी बलात्काराची शिकार बनलीच ना?  तिची विदारक कहाणी डॉ. आशा मिरगे यांनी जेव्हा सांगितली तेव्हा मन सुन्न झाले. शाळेसारख्या पवित्र समजल्या जाणाऱ्या ठिकाणी असा अन्याय एखाद्या मुलीवर होत असेल तर मग कुठले ठिकाण सुरक्षित समजावयाचे?  फक्त अनैसर्गिक पद्धतीने बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांनाच फाशी आणि नुसता सामुहिक बलात्कार केला गेला तर त्या गुन्हेगारांना फाशी नाही या निर्णयावर हसावे की रडावे तेच कळेनासे झाले आहे.
एखाद्या मुलीचे संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आयुष्य उध्वस्त करणारया अधम प्रवृत्तीला कोणत्या कारणास्तव मोकाट सोडायचे अथवा तो जहाल शिक्षेस पात्र  नाही असे समजायचे?  ज्या गोष्टी ज्या वयात योग्य रीतीने पालक मुलांना समजावतात त्या गोष्टी आज मात्र मुलींना त्यांच्या  अजाण किंवा  निष्पाप वयात समजावण्याची जबाबदारी पालकांवर येउन ठेपली आहे.  शाळेतील शिक्षकांवर तरी विश्वास कसा ठेवायचा? मध्यंतरी ठाण्यातील शाळेत एका मुलावर अत्याचार झाला होता.  जी माणसे आपल्यापेक्षा वयाने मोठी आहेत त्यांच्याकडे आदराने पाहावे की भीतीने, सावधपणाने अशी आत्यंतिक भीषण वेळ मुला-मुलींवर येउन ठेपली आहे.     
असे बलात्कारी काही काळ सरकारी पाहुणे बनतात आणि कालांतराने सुटतात. जणू त्यांना अशा प्रकारचा गुन्हा परत करण्याचे सरकारी लायसेन्सच मिळते. एक तर ह्या अशा केसेसचा न्यायनिवाडा  झटकन होत नाही.  झालाच तर त्यांना कडक शासन करण्यास कोर्टाचे हात दुबळे पडतात. अशा असंख्य केसेस आजमितीला न्यायालयात प्रलंबित आहेत. यामुळे होतं काय की भविष्यात असे अनेक वासनांध या प्रकारचे गुन्हे करायला सहज धजावतात. कारण त्यांना परिणाम माहिती असतात.  काही दिवस फार तर तुरुंगात राहायला लागेल यापलीकडे फारसे काही होणार नाही याची त्यांना शाश्वती असते.     
बलात्कार झालेल्या मुलींना मात्र घरी-दारी वाईट प्रसंग सहन करावे लागतात. अशा मुलींचे संपूर्ण घरच ह्यात भरडले जाते. तिचे कधीच भरून न येणारे शारीरिक नुकसान आणि  प्रचंड मानसिक धक्का या भांडवलावर तिला पुढचे आयुष्य कंठायचे असते. याची कल्पना फक्त त्या  अभागी जीवाव्यतिरिक्त इतर कोणाला कशी येणार? सरकार त्यांच्यासाठी आर्थिक आधार देऊ पाहत आहे ही बाब स्वागतार्ह आहे  पण मुळातच अशा घटना घडू नयेत यासाठी अत्यंत कडक पावले उचलण्याची जबाबदारी मात्र शासन झटकत आहे असे वाटू लागले आहे.  काही देशांत अशा बलात्कारींना देहांत शासन अथवा तत्सम इतरांना दहशत बसेल, भय वाटेल असं शासन करण्याची तरतूद आहे पण दुर्दैवाने आमच्या भारत देशात शासन आणि न्यायालये अशा प्रकारच्या शिक्षा देण्यास पुरेसे तयारच नाहीत ही अत्यंत खेदजनक आणि समस्त स्री वर्गाच्या दृष्टीने गंभीर बाब आहे.   
महिला सबलीकरण, सक्षमीकरण हे हब्द आपण अनेक वेळा ऐकतो . याची रुजवात प्रत्येक घरापासून होणे अत्यावश्यक आहे.  मुलाला आणि मुलीला सारखेपणाने वाढवणे, मुलीचा आत्मविश्वास दृढ करणे, घरातील महिला वर्गाचा आदर करणे, त्यांना मानसिक दृष्ट्या सबल करणे  या गोष्टी लहानपणापासूनच बिंबवल्या गेल्या पाहिजेत. शाळेत खालच्या इयत्तेपासून मुलींची शारीरिक क्षमता वाढेल असे प्रशिक्षण त्यांना द्यायला हवे. स्व-संरक्षणाचे धडे त्यांना मिळायला हवेत. प्रसंगी एखादे हत्यार बाळगायची सवलत त्यांना मिळायला हवी. सगळ्या थरांत याचा प्रचार व्हायला हवा. व्यापक पातळीवर या गोष्टींची अंमलबजावणी व्हायला हवी. मुलींच्या साठी उभारण्यात आलेल्या विद्यालयात अथवा हॉस्टेल मध्ये स्त्री -शिक्षिका आणि
स्त्री -रेक्टरच  हव्यात. अन्यथा या पुढची पिढी आपण स्वत:ला खरोखरच अपत्य होऊ द्यावे का या संभ्रमात पडलेली आपल्याला दिसेल.   

आज निवडणुकांच्या उंबरठ्यावर , मग कोणताही पक्ष निवडून सत्तेवर विराजमान होवो , त्या पक्षाने मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेला अग्रक्रम देणे ही युद्धपातळीवर हाती घेण्याची मोहीम आहे हे लक्षात असू द्यावे. 

Friday, 20 September 2013

विचार आणि वास्तव …………


आपण सर्वजण शालेय शिक्षण घेऊन, कॉलेजात जातो, तेथील शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करू लागतो , यथावकाश संसार थाटतो आणि इतरांप्रमाणे एकदाचे मार्गाला लागतो.  या प्रवासात अनेक खड्डे, खाच-खळगे असू शकतात, सगळ्यांचीच वाट सुकर,सोपी नसते. मग अनेक वेळा आपण परिस्थितीला बोल लावतो, चिंतातूर होतो, हतबल होतो, दडपणाखाली वावरू लागतो. समाज हा आपल्याला शत्रू वाटू लागतो. आपल्या आनंदासाठी, सुखासाठी आपण तज्ञांचे सल्ले घेत फिरतो. आपले हित कशात आहे हेच आपल्याला कळेनासे होते. आपल्या या घुसमटीला समोरची व्यक्ती वा परिस्थिती जबाबदार आहे हे आपण मनाशी पक्के ठरवून टाकलेले असते. आपण बाहेर उत्तरे शोधत फिरतो जी केवळ आपल्या आतच आपल्याला सापडू शकतात जी आपल्याशी आयुष्याची नव्याने ओळख करून देऊ पाहत असतात.        
विचार प्रत्येकजण करतच असतो अगदी समजायला लागल्यापासून! फक्त योग्य विचार कसा करावा याचे बाळकडू आपल्याला मिळालेले नसते. माणसाची विचारप्रक्रिया त्याचे व्यक्तिमत्व आणि त्याचे वास्तव घडवत असते. समोरच्या व्यक्तीचे विचार हे आपले विचार असू शकत नाहीत. त्याने आपल्यापर्यंत पोहोचवलेला विचार हा आपल्या आत झिरपू द्यावा अथवा नाही या निवडीचे स्वातंत्र्य प्रत्येकाचे असते. विचार आणि माणसाचे आरोग्य यांचे जवळचे नाते असते. घातक विचार, ऋण अर्थात निगेटिव्ह विचार, नैराश्यजनक विचार  आणि निरुपयोगी विचार यांनी आपल्या शरीरातील उर्जेचा ऱ्हास होत असतो. याउलट धन अथवा चांगले विचार, आशावादी विचार यांनी व्यक्तीच्या शरीरातील उर्जा जास्त प्रमाणात स्रवते.               
दोन माणसे मोबाईलवर जेव्हा एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा ज्या उर्जालहरींमुळे हा संवाद साध्य होतो त्या लहरी कधीच दृष्टीक्षेपात येत नाहीत. त्याचप्रमाणे एक व्यक्ती जेव्हा अमुक एक विचार करते त्यावेळी तिच्या विचारानुसार अशा लहरी अवकाशात प्रक्षेपित होत असतात. गुरुत्वाकर्षण तत्वानुसार ज्या प्रकारची उर्जा वातावरणात सोडली जाते तीच उर्जा परतून त्या व्यक्तीकडे येत असते. माणसाच्या मनातील प्रत्येक विचार हा अनुकूल वा प्रतिकूल अशा उर्जेने भरलेला असतो. तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे निर्देशित केलेला एखादा विचार त्यातील चांगल्या-वाईट उर्जेसकट त्या व्यक्तीकडे पोहोचतो आणि त्याच प्रकारची उर्जा परतून तुमच्याकडे येते.      
एखाद्या माणसाची हत्या करण्याआधी ती हत्या विचारांत झालेली असते. एखादा घातपात घडवण्याआधी तो विचारात झालेला असतो. एखादी लढाई प्रत्यक्ष हरण्याआधी ती विचारांतून हरलेली असते. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी तो आधी मनातील विचारांतून मिळवावा लागतो. दहाव्वीतील आपल्या पाल्याचा रिझल्ट अनेक पालकांनी प्रत्यक्ष परीक्षेआधीच कल्पनेत पाहिलेला असतो. विचारांना योग्य दिशा कशी द्यावी याचे क्लासेस जरी आज उपलब्ध नसले तरी तसे साहित्य मात्र जरूर आहे. अनेक रोगांचे मूळ हे मनात केल्या जाणाऱ्या विचारांत असते या निष्कर्षाप्रत वैद्यकीय क्षेत्रातील अनेक विद्वान आले आहेत.      
घातक अथवा निगेटिव्ह विचारांमुळे शरीरातील काही प्रतिकूल हार्मोन्स स्रवू लागतात ज्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. सतत उदास असणारी माणसे शक्तिपात झाल्यासारखी दिसतात. काही माणसांना सतत काही ना काही तक्रारी करायची सवय असते. मला बरे वाटत नाही, समोरील व्यक्ती माझ्याशी नीट वागत नाही, मला समजून घेत नाही, समाज कुठे चालला आहे, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, तरुण पिढी ऐकेनाशी झाली आहे अशी कोणतीही कारणे पुढे करून ही माणसे रडत असतात, कुढत असतात आणि स्वत:चे विचार सुधारण्याऐवजी  ज्या गोष्टींवर आपले काडीमात्र नियंत्रण नाही अशा गोष्टी बदलायची वाट पाहत बसतात. 
आपण दैव किंवा प्रारब्ध असे जे काही मानतो ते दुसरे-तिसरे काही नसून आपण अवकाशात सोडलेल्या उर्जेचे परतून येणे असते.  जो बाण अवकाशात मारला जातो तोच बाण तीच उर्जा घेऊन जेव्हा आपल्यासमोर येतो त्याला आपण नशीब ही संज्ञा देऊन मोकळे होतो. विचार निवडीचे स्वातंत्र्य आपले असते पण मुळात विचारांची निवड करायची कशी याविषयी आपण अनभिज्ञ असतो. आपल्याकडून अवकाशात सोडल्या जाणाऱ्या अनुकूल विचार लहरी ही आपल्या आनंदाची, सौख्याची नांदी असते. क्रोध, मत्सर, हेवा, असूया, निंदा या लहरी तीच उर्जा परत आपल्यापर्यंत पोहोचवतात याउलट आनंद, प्रशंसा, प्रेम, वात्सल्य,अनुकंपा,सहिष्णुता या लहरी तीच उर्जा परत आपल्याकडे आणतात. आपण घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेतो, संत -महात्म्यांचे आशीर्वाद घेतो तेव्हा त्यांच्यातील आपल्या विषयीचे प्रेम वा सद्भावना लहरींच्या रुपात आपल्यापर्यंत येउन योग्य ती उर्जा आपल्याला देत असतात.          
मनात आलेला वाईट विचार आपल्या दुष्कर्मात भर टाकतो तर सद्विचार सु-कर्मात! अनेक जण म्हणतात, आम्ही काहीच करत नाही, विचार येताच राहतात. पण असे नसते. वाईट विचारांना थोपवण्याची क्षमता आपल्यात नक्कीच असते आणि प्रयत्नपूर्वक चांगले विचार करण्याची क्षमताही आपल्यात असतेच असते. चुकीचे, नसते,भलभलते विचार करून अनारोग्याला किंवा प्रतिकूल परिस्थितीला आमंत्रण द्यायचे की चांगले, सद्विचार मनात रुजवून आपल्या भोवतीचे वातावरण आणि माणसांना आनंदी करायचे हे ज्याचे त्याने ठरवावे!      

Thursday, 5 September 2013

शिक्षक दिनाच्या निमित्ताने ………….

मानवी मूल्यांवर आधारित शिक्षण आज दुर्मिळ होत चालले आहे. नवीन नवीन शाळा आणि क्लासेसचे जिथेतिथे नुसते पेव फुटले आहे. भरमसाट फी घ्यायची, चकचकीत शाळेत, एअर कंडीशण्ड वर्गात मुलांना बसवायचे आणि तेच ते चाकोरीतले शिक्षण द्यायचे असा सगळा शिक्षणाचा खेळ चालू आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे बहुतेक शाळा फारसे लक्ष पुरवित नाहीत. शारीरिक विकासाइतकाच मुलांचा भावनिक विकासही महत्वाचा आहे हे आज शिक्षण क्षेत्रातील महत्वाची पदे भूषवणारे लोकही विसरून गेले आहेत. मुलांचे शिक्षण हे घरापासून सुरु होत असल्याने मुलांचे पालक हेच त्यांचे पहिले शिक्षक असतात. पण वेळेच्या अभावापायी म्हणा किंवा इच्छेच्या अभावापायी पण बहुतांश पालक ही आद्य  शिक्षकाची भूमिका निष्ठेने बजावताना दिसत नाहीत. त्यामुळेच की काय शारीरिक आणि भावनिक सक्षमता हरवून बसलेली आणि केवळ पैशालाच परब्रम्ह मानणारी पिढी यापुढे निर्माण होईल की काय अशी शंका मनाला ग्रासू लागली आहे.         
मोकळ्या वातावरणात जाणे, सकाळचा अद्वितीय निसर्ग पाहणे, आजूबाजूच्या परिसरातील झाडा-फुलांशी मायेने बोलणे, सूर्योदय पाहणे, आकाशाचे रंग बदलताना डोळ्यांनी टिपणे, मुक्या प्राण्यांशी ममतेने वागणे, संकटग्रस्तांची  तत्परतेने मदत करणे,  कोणत्याही सामाजिक,आर्थिक स्तरातील माणसाशी शालीनतेने वागणे, त्याच्या व्यवसायाचा यथायोग्य आदर करणे, दैनंदिन व्यवहारातील छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणे, घरी पालकांना सर्व प्रकारची मदत करणे या आणि अशासारख्या सवयी आज आपण मुलांना लावतो आहोत का याचा पालकांनी आणि शिक्षकांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची पाळी आली आहे.           
प्रदूषणावर शाळेत धडा असतो पण हे प्रदूषण टाळण्यासाठी नेमके काय करायला हवे याचे प्रात्यक्षिक मुलांना का दाखवत नाहीत?  रस्त्यावर इथेतिथे कचरा टाकू नये ही वृत्ती अंगी बाणण्यासाठी मुलांना शहराच्या, गावाच्या अस्वच्छ भागाची पाहणी करायला नेउन तेथील वातावरण आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांची गैरसोय दाखवणे गरजेचे नाही का? विजेचा,पाण्याचा वापर नियंत्रित कसा करावा हे शिकवणे महत्वाचे नाही का? वृध्द,आजारी माणसाची शुश्रुषा कशी करावी, प्रथमोपचार कसे करावेत, शासनाने पुरविलेल्या शासकीय सुविधांचा लाभ कशा प्रकारे घ्यावा, मानवी मुल्यांची जपणूक कशी करावी, झाडे कशी लावावीत व त्यांची निगा कशी राखावी अशा कोणत्याही प्रकारचे शिक्षण देण्यास शाळा तसेच पालक अनुत्सुक दिसून येतात.     
आजकाल मुलांच्या शाळेच्या सहलीही पंचतारांकित हॉटेलात उतरतात. एकंदर पॉश शाळा, हॉटेल्स आणि मॉल्स या सो-कॉल्ड उच्चभ्रू वातावरणात मुले वाढतात पण विकसित होत नाहीत. शिक्षकांनी शिकवलेल्या पाठ्यपुस्तकाच्या धड्यातील  उत्तरे पाठ करून परीक्षेत घोकणे याला बुद्धीचा विकास कसे म्हणायचे? भूमितीतील प्रमेये आणि भाषेचे निबंध मुले पाठ करतात केवळ काही मार्कांचे उद्दिष्ट ठेवून! घरी पालकांना वेळ नसल्याने श्लोक वर्ग, संस्कार वर्ग इथे मुलांना बळजबरीने पाठवले जाते,  कुत्र्यांच्या, मांजरींच्या पिल्लांना दगड मार, त्यांच्या शेपट्या ओढ, झाडांची पाने, फुले कुस्करून त्यांचा लगदा कर, दुपारच्या वेळी लोकांच्या घराची डोअरबेल वाजवून पळून जा अशा बाललीलांत बरीचशी मुले रमताना दिसतात, सगळ्यात कळस म्हणजे छंद वर्गात मुलांना ढकलणे! चित्रकला-गाणे-नृत्य याकडे आपल्या मुलाचा कल आहे की नाही हे आजमावण्यासाठी हा आटापिटा केला जातो. हे सगळे सातव्या-आठव्या इयत्तेपर्यंत चालते. नववी आणि दहावीत मूल गेले की हे सगळे छंद वर्ग ताबडतोब मुलाला न विचारताच बंद केले जातात. मग अभ्यास एके अभ्यास. तू अमके टक्के मिळव, तुला महागडी वस्तू मिळेल हे आमिष दाखवले की आपली जबाबदारी संपली या भ्रमात अनेक पालक वावरत असतात. नापास झालेल्या मुलांना घरी-दारी अपमान सहन करावा लागतो. तू धुणी-भांडी कर, तू वडा-पावाची गाडी चालव असे मौलिक सल्ले पालक आणि शिक्षकांकडून मुलांना दिले जातात त्यांच्या हातात असलेल्या एखाद्या कलेची जराही दाखल न घेता!              
आपण माणूस घडवतो आहोत की पैशांचा पाऊस पाडणाऱ्या टाकसाळी बनवतो आहोत, आपण भावना-संवेदनांची कदर करणारी पिढी घडवत आहोत की कोरडेठक्क पाषाण घडवत आहोत, आपण दुसरयाला माणुसकीने वागवणारी पिढी घडवत आहोत की दुसऱ्याला सतत निंदनीय, तिरस्करणीय पद्धतीने अवमानित करणारे, अर्वाच्च्य शब्दांनी संबोधणारे, केवळ काही रकमेसाठी समाजातील कार्यनिष्ठ माणसांचा खून पाडणारे, स्त्री-जातीची अब्रू वेशीवर टांगणारे नर-राक्षस घडवत आहोत, आपण निसर्गाचे, प्राणीमात्रांचे मित्र घडवत आहोत की शत्रू, आपण जीवनातील आव्हाने खंबीरपणे स्वीकारणारी पिढी घडवत आहोत की नैराश्याच्या गर्तेत स्वत:ला झोकून आयुष्य पणाला लावणारी, आत्महत्येस प्रवृत्त होणारी, व्यसनांच्या आहारी जाउन स्वत:ला बरबाद करणारी  पिढी घडवत आहोत का याचा अतिशय गांभीर्याने विचार करण्याची वेळ कधीच येउन ठेपली आहे.        

Wednesday, 28 August 2013

मानसिक आरोग्याचे बाळकडू ………….


एखाद्या मुलीवर, स्त्रीवर अत्याचार घडतो आणि मग जळी -स्थळी -काष्ठी -पाषाणी त्या घटनेची मीमांसा होते. मुलांच्या, मुलींच्या स्त्रियांच्या, पुरुषांच्या घोळक्यातून याच चर्चा ऐकू येतात. सरकार, पोलिस, कायदा या सर्व घटकांवर आगपाखड सुरु होते. दिवस अतिशय वाईट आलेले आहेत, बाहेर वावरण्याचीही भीती वाटू लागली आहे, या देशाचे काय होणार आहे कुणास ठाऊक, पुढील पिढीचे भवितव्य कठीण आहे वगैरे वगैरे वाक्ये कानी पडत राहतात. प्रश्न उभे राहतात आणि उत्तरे मात्र दुरान्वयानेही दृष्टीपथात येत नाहीत. मुलीवर,स्त्रीवर अत्याचार झाला की आरोपी शोधा आणि तुरुंगात डांबा, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करा, वांझोट्या चर्चांचे रान उठवा आणि परत अशा एखाद्या घटनेची सतत चिंता वाहत आलेला दिवस ढकला हेच चित्र कमी-जास्त फरकाने सगळीकडे पाहायला मिळते.        
पण या गंभीर प्रश्नाच्या मुळाशी दडलेली आहे मानसिकता. ती बदलायची तर आहे पण नक्की कोणत्या मार्गाने हे समजत नाही.  मुलांच्या-मुलींच्या जडणघडणीसाठी  एक विशिष्ट वय असते. घरात आई-वडील तर शाळेत शिक्षक हे मुलांचे मार्गदर्शक असतात. मुलांची प्रेरणास्थाने असतात. आजूबाजूच्या परिस्थितीचे, समाजाचे आघात मुलांच्या कोवळ्या मनांवर होण्याआधीच  त्यांच्या मानसिक आरोग्याची जपणूक या पालकांनी तसेच शिक्षकांनी करणे अत्यावश्यक आहे. या मुलांची किंवा मुलींची ठराविक वैचारिक बैठक पक्की होण्याआधीच त्यांना निकोप मानसिक आरोग्याचे बाळकडू या आदरस्थानांकडून मिळणे गरजेचे आहे.     
सर्व प्रकारच्या हिंस्त्र, वासना उद्दीपित करणाऱ्या साधनांपासून या मुलांना प्रयत्नपूर्वक दूर ठेवणे नितांत आवश्यक आहे.  या जगात पैशापेक्षाही मानवता अधिक महत्वाची आहे हा सु-विचार मुलांच्या मनावर सातत्याने ठसवला जायला हवा. पर्यावरणाची काळजी, मुक्या प्राण्यांबद्दल जिव्हाळा, वृद्धांबद्दल यथोचित आदर, संकटप्रसंगी दुसरयाच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती, मुलांच्या मनात स्त्री-जातीबद्दल आदर, मुलींच्या मनात समाजात वावरण्याची निर्भयता या गोष्टी शाळेतूनच शिकवल्या जायला हव्यात. ज्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेता येईल अशा थोर व्यक्तींची जीवनचरित्रे  दृक-श्राव्य माध्यमाद्वारे मुलांना दाखवायला हवीत. प्रत्येक मुलाच्या मनात सहिष्णू भाव रुजायला हवा  व त्यासाठी घरी पालकांनी आणि शाळेत शिक्षकांनी आपले सक्रिय योगदान द्यायला हवे.    
पूर्वी मुले गुरूगृही घडत असत. घर आणि समाज यांपासून ही मुले कैक योजने दूर असत. त्यामुळे त्या मुलांना त्यांच्या विचारांपासून विचलित करणारी माध्यमे वा प्रलोभने नसायची. गुरुवर्यांच्या नजरेसमोर ही मुले संस्कारित होत असत. त्यामुळे गुरूचा उत्तम प्रभाव या मुलांवर पडत असे. अशी मुले मग मोठी होऊन समाजात मिसळल्यानंतर एक चांगला मानसिक प्रवाह घेऊन वावरायची. त्यांची वैचारिक बैठक गुरूगृही पक्की झालेली असायची. म्हणजे त्यावेळी समाजविघातक कृत्ये व्हायची नाहीत असे नाही परंतु त्याचे प्रमाण मात्र नगण्य असायचे.       
आज समाजाचे विदारक चित्र आपल्याला दिसते आहे पण ते बदलण्याची गरज किती जणांना मुळापासून वाटते हे महत्वाचे आहे. वडील-मुलगी, काका-पुतणी, मामा-भाची, आजोबा-नात ,भाऊ-बहिण या नात्यांमधील पावित्र्य नष्ट होताना आज दिसते आहे. माणसे हिंस्त्र बनत चालली आहेत. केवळ काही पैशांसाठी समाजातील चांगल्या माणसांना नष्ट करण्याचा घाट घाटला जातो आहे.  कृतिशीलता कमी होऊन शिथिलता वाढली आहे. आज माणसांची यंत्रे घराघरातून टाकसाळीचे काम करत आहेत. मुले पालकांच्या अस्तित्वाला, प्रेमाला वंचित होत चालली आहेत. मुलांवर चांगले संस्कार करायला ना पालकांना वेळ आहे ना शाळेतील गुरुजनांना!  मुले सुख शोधण्याच्या भरात यंत्रांतून मिळणारे बरे-वाईट ज्ञान त्यांच्या मनात भरून घेत आहेत. चांगले काय, वाईट काय याविषयी मार्गदशन करणारे पैशामागे धावत सुटले आहेत. कारण त्यांना त्यांच्या मुलांना अनेक उत्तमोत्तम, उंची साधने खरेदी करून द्यायची आहेत, त्यांना परदेशवारयांना घेऊन जायचे आहे, मुलांना येणारे एकाकीपण, नैराश्य काही यांत्रिक साधनांनी किंवा पर्यटन करायला नेउन घालवायचे आहे. त्यांच्या मूळ गाभ्यावर कोणतेही आवश्यक संस्कार न करता!       
बाहेरील अनावश्यक खाण्याने मुलांचे शारीरिक आरोग्य ढासळते आहे आणि आवश्यक त्या संस्काराअभावी त्यांचे मानसिक आरोग्यही उतरणीला लागले आहे. स्त्रीत्व आणि पौरुष यांविषयीच्या चुकीच्या व्याख्या समाजमनात बिंबल्या आहेत.  या व्याख्या बदलण्याची गरज समाजाला वाटते काय हे तपासून पाहण्याची वेळ आली आहे.  
कलियुगात असेच होणार असे अकलेचे तारे तोडणारे महाभागही भरपूर आहेत. गतानुगतिक समजांनी समाज आज अगतिक, हतबल झाला आहे. पण हे चित्र बदलावयाचे असेल तर जात-धर्म-लिंग-वय-प्रांत या घटकांना बाजूला सारून मुळापासून काही करण्याची गरज भासणार आहे. योगक्रिया, आत्मसंयमन याद्वारे मुलांना लहानपणीच मानसिक दृष्ट्या सशक्त,सक्षम करण्याची गरज आहे. चांगल्या,शुध्द विचारांचे बीज मुलांच्या कोवळ्या, संस्कारक्षम मनात रुजवण्याची गरज आहे.  आहारानुसार विचार बनतो आणि विचाराप्रमाणे आचार बनतो. म्हणूनच सात्विक, सकस आहार आणि उत्तम विचारांचे खतपाणी घालून मुलांचे आचरण सुयोग्य बनवणे हि तुम्हा-आम्हा सर्व समाजघटकांची सामुहिक जबाबदारी आहे. तर आणि तरच  उद्याच्या सुरक्षित समाजाची हमी देता येईल.         

Monday, 26 August 2013

अत्याचाऱ्यांचे माजलेले तण आणि मवाळ शासन …………


वर्तमानपत्र आणि टी. व्हीच्या अनेक वाहिन्यांवर हेडलाईन्स या मथळ्याखाली महिलांवरील वेगवेगळ्या अत्याचाराचे किस्से जवळजवळ दररोज झळकत आहेत.  इतक्या पराकोटीच्या उद्वेगजनक घटना राजरोस घडताना शासन आणि कायदयाची अंमलबजावणी करणारे मात्र या विकृत अत्याचारी घटकांना अत्यंत कडक किंवा कठोर शिक्षा सुनावताना दिसत नाहीत किंबहुना त्यांना शिक्षा देण्यातच अक्षम्य दिरंगाई होते आहे ही शरमेची आणि निंदनीय तसेच असमर्थनीय गोष्ट आहे.   
समाजातील या विकृत घटकांबद्दल समस्त जनमानसात एक प्रक्षोभ आहे. वेळोवेळी निदर्शने, मोर्चे काढून त्याचे प्रकटीकरण झाले आहे. मुंबई असो वा दिल्ली, शहर असो वा खेडे एकूणच लहान मुली, महिला यांच्या सुरक्षित विश्वाला केव्हा टाचणी लागेल आणि त्यांची अब्रू वेशीवर कधी टांगली जाईल याचा नेम नाही. मग अशी बीभत्स घटना घडली की लोकक्षोभाला आवरण्यापुरती  आश्वासने द्यायची, त्यांच्या संरक्षणाची पोकळ हमी द्यायची हे धोरण शासनाकडून अव्याहत चालू राहिले आहे.       
दिल्ली इथे घडलेल्या निर्भयाच्या केसची पुढील प्रगती काय आहे हे कोणी सांगू शकेल का? आरोपी नुसते गजाआड होताना दिसतात पण मुळात त्यांना कोणतीही सज्जड, अद्दल घडवणारी शिक्षा मिळताना दुर्दैवाने दिसत नाही. ते चार भितींमध्ये सरकारचे जावई बनून पाहुणचार घेत असतात. हे स्त्रियांच्या शीलावर घाला घालणारे अशिक्षित, बेकार, बेरोजगार तरुण मस्तपैकी फुकाचे उदरभरण करत असतात. सुनावणी, तारीख, वाद-प्रतिवाद असे कोर्ट-कचेऱ्यांत वापरले जाणारे शब्द लोक कधीतरी वाचतात आणि खटला फक्त चालू असल्याची माहिती समजू शकते पण यापलीकडे जाऊन अशा बलात्कारी आरोपींना प्रत्यक्ष जबरदस्त शिक्षा मिळालेली अजूनतरी दृष्टीपथात यायची आहे.    
का शासन या आरोपींना कठोर शिक्षा द्यायला असमर्थ आहे? समाजहिताच्या किंवा स्त्री-हिताच्या दृष्टीने असा एखादा कायदा का संमत होऊ शकत नाही? इतरत्र वावरणाऱ्या आणि संधीचा फायदा घेणाऱ्या या प्रकारच्या विकृत वासनांधांना चाप बसावा असे सरकारला खरेच मनापासून वाटत नाही का? निष्पाप बालिका, तरुण मुली, महिला यांनी आज आपल्यावर अतिप्रसंग तर ओढवणार नाही ना या चिंतेतच सदोदित वावरायचे का? आपल्या तीन-चार महिन्यांच्या अजाण बाळावर घरातून की बाहेरून सैतानी घाला येईल या विचारांतच त्या बाळाच्या आईने तिची शक्ती आणि बुद्धी झिजू द्यायची का?  एखाद्या मुलीच्या, स्त्रीच्या उध्वस्त होणाऱ्या आयुष्याची शासनाच्या लेखी काहीच किंमत नाही का? तिचे विस्कटलेले आयुष्य आणि तिच्या घरच्यांचा समाजापुढे झालेला मानभंग या बाबी आरोपींना कडक शिक्षा सुनावण्यास अपुऱ्या आहेत का?   
मुंबईतील केस बाबतही हेच चालले आहे.  कधी ते 'fast trak'  कोर्ट स्थापन होणार आणि कधी या मुलीला न्याय मिळणार ? त्यात पुन्हा कुणी म्हणतय फाशी द्या, कुणी दयेचा आधार घेऊन म्हणतय फाशी नको. अरे पण मग या आरोपींना कठोर शिक्षा केली नाही तर इतर समाज कंटकांना कसा कायद्याचा धाक बसणार? परत परत घरी-दारी असे अत्याचार होत राहणार आणि आरोपी फक्त गजाआड होत राहणार, तेही सापडले तर ! या प्रश्नांवर संसदेत पुनश्च गदारोळ होत राहणार, रस्त्यावर निषेध मोर्चे काढले जाणार आणि प्रकरण काहीसे जुने झाले की त्यातील हवा निघून जाणार. शासन चौकशी समित्या नेमणार, कडक कारवाईची हमी देत राहणार  आणि या आरोपींना सज्जड शिक्षा देत इतर भविष्यातील आरोपींना वचक बसवणारा कायदा जन्माला येण्याआधीच  माणुसकीचे आचके देत गतप्राण होणार. निष्फळ, कोणत्याही एका निर्णयाप्रत न येणाऱ्या राजकीय चर्चा रंगणार. शासन आणि कायदा यांचे हेच चित्र जनसामान्यांच्या मनात अधोरेखित होणार.     
एखादी वाचता येणारी, तिसऱ्या-चौथ्या इयत्तेत शिकणारी मुलगी आईला टी.व्ही. वरील अक्षरे वाचून विचारणार,'आई बलात्कार म्हणजे काय गं ?' तिच्या निष्पाप डोळ्यांना डोळा न भिडवता आई म्हणणार तू अजून लहान आहेस, तुला काय करायच्यात नसत्या गोष्टी? पण तिला लहान राहण्याची मुभा तर या अशा सर्रास रस्तोरती सांडलेल्या अत्याचाऱ्यांनी तर दिली पाहिजे ना? असंख्य निरागस कळ्या, फुले स्वत:च्या कामवासनेपायी निर्दयपणे तुडवणारे हे पिसाट या भूतलावर राहण्याच्या लायकीचे तरी आहेत का ते एकदा शासनाने तपासून पहिले पाहिजे.       
अनेक थोर संतांचा, महात्म्यांचा आणि विचारवंतांचा वारसा लाभलेल्या या देशात आज विकृत वासनेने आपले वखवखलेले हात-पाय जागोजागी पसरावेत आणि त्यांच्या या बीभत्स कृत्याचा निषेध होण्यापलीकडे काही होऊ नये हे या देशाचे दुर्भाग्यच! शिकून सवरून,पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून संसाराचे हात बळकट करणाऱ्या स्त्रीवर पुन्हा घरातील चार भिंतींच्या आत घाबरून,असुरक्षित होऊन बसायची पाळी येऊ नये एवढीच मनोमन इच्छा आहे.       

Thursday, 22 August 2013

वारसा ………. अंधश्रद्धेविरुध्द लढण्याचा !


आज आपण एकविसाव्या शतकात आहोत ही वस्तुस्थिती असली तरीही आपल्यापैकी कित्येकांची मने किंवा त्यांचे विचार प्रतिगामित्वाकडेच झुकणारे आहेत असे खेदाने म्हणावेसे वाटते. अंधश्रद्धेचा विळखा निव्वळ ग्रामीण भागापुरताच सीमित नसून अनेक शिक्षित, शहरी माणसेही या अघोरी प्रथांना कवटाळताना आजही आपल्याला दिसतात. 
अफाट पैसा हवा आहे बाबाकडे जा, अपत्यप्राप्ती होत नाही मंत्रतंत्र कर, दुष्ट शक्तींपासून संरक्षण हवे आहे मंतरलेला धागा किंवा ताईत बांध असे अनेक उपाय आपल्या अवतीभवती पसरलेले बांधव राजरोस करत असतात.  घरात कुणी आजारी असेल तर त्या व्यक्तीला तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले पाहिजेत पण अशा वेळेस भोंदू बाबांचा, त्यांच्या तांत्रिक शक्तींचा आधार घेतला जातो. कर्वे-फुले यांसारखे थोर पुरुष नुसते पुरुषांनीच नाही तर या देशातील स्त्रीनेही शिक्षित व्हावे म्हणून झटले, सावित्रीबाई फुलेही त्यांच्या यजमानांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या. त्यांनी समाजाचा, सनातन्यांचा अपरिमित रोष सहन केला पण  बहुजनांना शिक्षित करण्याचा आपला लढा आमरण चालू ठेवला. आज त्यांचा वारसा सांगणारे आपण शिक्षित झालेले आपले मन बासनात गुंडाळून किती सहजतेने या बुवा-बाबांच्या चरणी अर्पण करतो ही खरोखरीच निंदनीय बाब आहे.     
रोज वर्तमानपत्रातून अशा कितीतरी बातम्या आपल्या दृष्टीस पडत असतात. काविळीवर योग्य ती वैद्यकीय उपाययोजना न करता मंत्रतंत्राचा अवलंब केल्याने सोळा वर्षीय मुलीचा मृत्यू किंवा तुला लवकरच अपत्यप्राप्ती होईल असे सांगून एखाद्या बाबाने स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवून तिची फसवणूक केली. या बातम्यांतून कुणीच कसलाही बोध घेत नाही ही अनाकलनीय गोष्ट आहे. देवाला किंवा देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी बालकाचा किंवा कुमारिकेचा बळी देणे किंवा मुक्या जनावराचा बळी देणे अजूनही अनेक ठिकाणी प्रचलित आहे. अंगारे-धुपारे, मंत्र-तंत्र, गंडेदोरे, ताईत हे उपाय केल्यानंतर खरोखरीच जर माणसांचे सर्व प्रश्न सुटले असते तर वैद्यकशास्त्र अस्तित्वातच आलं नसतं, मानसोपचार तज्ञांची गरज भासली नसली, शालेय शिक्षण रद्दबातल झालं असतं.          
अठरा वर्षे अनेक राजकीय पक्षांचे उंबरठे झिजवून डॉ. दाभोलकरांना जादूटोणाविरोधी विधेयक संमत करून घेण्यात अपयश आलं ही सगळ्या भारतवासियांसाठी खाली मान घालायला लावणारी बाब नाही का? कुणाकुणाचे हितसंबंध, राजकीय स्वार्थ यात गुंतले असल्या कारणाने हे विधेयक राजकीय पटावरून पुढे सरकवले जाण्यास असमर्थ ठरले आहे. अनेक चर्चा, वाद-वितंडवाद होऊनही या विधेयकाभोवती अनेक अंधश्रद्धांचा जीवघेणा विळखा पडलेला आहे. हवेतून उदी काढणे, ताईत काढणे किंवा अनेक वस्तू काढणे ही निव्वळ हातचलाखी आहे , या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक दृष्टीकोन नाही हे सप्रमाण सिध्द करून दाखवले गेले तरीही या भस्म-विभूती-मंतरलेले धागे मानवी मनाचा कब्जा सोडत नाहीत हे पाहून लाज वाटते.   
आज अशा अनेक बुवा-बाबांनी जादूच्या, हातचलाखीच्या बळावर जनमानसातील त्यांचं स्थान पक्कं केलं आहे. अध्यात्म्याच फक्त आवरण आहे पण आत मात्र सैतानाचा वावर आहे. तरुण मुली, स्त्रिया या अशा बाबांना सहज फशी पडतात, त्यांच्या अज्ञानाचा, निरागसतेचा फायदा ही मंडळी उठवतात. अनेक पुरुषही या बाबांच्या नादी लागून आपल्या आयुष्याचं वाटोळं करून घेतात. या बुवा-बाबां मध्येही श्रेण्या असतात. त्याप्रमाणे त्यांना शिष्यगण मिळतात, देणग्या मिळतात, त्यांची पब्लिसिटी होत राहते, हे महागड्या गाड्या, विमानांतून प्रवास करतात, गुबगुबीत मलमलचे गालिचे यांच्या पायांखाली अंथरले जातात,  अत्यंत महाग भेटवस्तू या बाबांना भक्तगणांकडून अर्पण केल्या जातात. चार-दोन प्रभावी प्रवचने ठोकली की यांच्या कार्याचा सर्वत्र उदोउदो होतो.                .     
आज डॉ. दाभोलकरांचे चाहते आणि वारसदार सर्वदूर पसरलेले आहेत, त्यांची शिकवण, त्यांचे विचार , त्यांचे संघटना कौशल्य आज समाजात रुजवण्याची नितांत गरज आहे. अंधश्रद्धेची पुटे समाजमनावरून कायमची पुसू पाहणाऱ्या आणि त्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या डॉ. दाभोलकरांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहण्यासाठी हा पुरोगामित्वाचा लढा आज मोठ्या संख्येने पुढे नेण्याची गरज आहे. तुम्ही-आम्ही सर्वांनीच या लढ्यात सहभागी व्हायला हवे तरच समाज-परिवर्तनाची आशा बाळगता येईल. सत्तेवरील आणि सत्तेच्या विरोधात बसलेल्या सर्व घटकांनी आपापले वैयक्तिक मतभेद बाजूला सारून या परिवर्तनाची कास धरली पाहिजे नाहीतर ही अंधश्रद्धेची काळरात्र  कधीच संपणार नाही आणि मानवाच्या सर्वकष प्रगतीला खीळ बसल्याशिवाय राहणार नाही.