Monday, 20 February 2017

निवडणुका आणि आम्ही .......


हल्ली वर्तमानपत्र घरी आलं की मी एकदम शब्दकोडे सोडवायला घेते . सुरवातीची पाने skip करावीशी वाटतात. नवीन काय असतं त्यात? एकमेकांवर शाब्दिक लत्ताप्रहार, उपहासाच्या कोपरखळ्या , टोमण्यांचे गुद्दे, वैचारिक आणि नैतिक घसरगुंड्या! यात मतदारांसाठी आश्चर्य करावे असे काहीच नसते. मनपाच्या सत्तेवर असलेला पक्ष आपण गेल्या पाच वर्षात जी काही कामे केली (त्यांच्या लेखी ) त्याची उजळणी पुन्हा पुन्हा मतदारांसमोर करतो आणि विरोधी पक्ष सत्तेवर बसलेल्या पक्षाने कसे काहीच काम केले नाही याचे पाढे वाचतो. यावेळेस आम्हाला निवडून दिलेत तर पुढील पाच वर्षात या शहराचा संपूर्ण कायापालट करू असे आश्वासन सर्व  विरोधी पक्ष अजीजीने देत असतात .
मतदाराला या सर्व राजकीय धुमश्चक्रीतून काय मिळते? काहीही नाही. रस्त्यावरचे खड्डे त्याच्या राशीला जे अहोरात्र होते ते निवडणूक झाल्यावरही तसेच राहणार असतात. खरं सांगू का या आपल्यासोबत कायमस्वरूपी राहणाऱ्या गोष्टींचा मग आपल्याला लळाच लागतो. खड्डेविरहित असा रस्ता हा रस्ता तरी कसा म्हणायचा? आपण पायी अथवा वाहनातून जात असताना दुतर्फा खोदकाम चालू नसेल, येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचा प्रचंड खोळंबा होत नसेल, वाहनचालकांचा एकमेकांशी मायबापांचा उद्धार करणारा अतिपरिचित संवाद होत नसेल तर विलक्षण अस्वस्थ व्हायला होतं. हे शहर आपलंच आहे का याची शंका मनोमन येते. शिवाय खड्ड्यात उलटलेली वाहने आणि त्याभोवती घोंघावणारी गर्दी हेही एक ओळखीचे लक्षण असते. आता सांगा या रस्त्यावरील सगळे खड्डे बुजवले गेले आणि ते परत कधीही कोणत्याही कामासाठी वेळी-अवेळी उकरले गेले नाहीत व त्यामुळे पुढचे प्रसंग आपसूकच टळले गेले तर आपल्याला आपल्या लाडक्या शहराची खूण कशी पटणार? पावसाळ्यात या अशा सार्वत्रिक असलेल्या खड्ड्यात आणि उघड्या गटारात पाणी साचून साचून त्यात मुले-माणसे आणि वाहने आडवी झाली नाहीत तर हे शहर आपल्याला परकं नाही का  वाटणार? अगोदरच अतिशय अरुंद असलेल्या रस्त्यांवर फ्लायओव्हर बांधण्याचे कंत्राट घेऊन येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची जबरदस्त कोंडी करणे आणि पादचाऱ्यांच्या सहनशीलतेला आव्हान देणे हा ही नित्याचाच भाग आहे ना? वाहनांच्या भोंग्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि धुरामुळे श्वसनाला होणारी हानी या काय टाळता येण्याजोग्या गोष्टी आहेत का? रस्त्याच्या नाक्यावर टेहळणी करणारे रोडरोमिओ ही काय समाजसुधारणा झाल्याची पावती आहे का? सार्वजनिक वाहनांत बसल्यानंतर मुली आणि बायकांचा धक्के मारून विनयभंग करणारे , अडीनडीला मुजोरपणे वागून नागरिकांचे जिणे कठीण करणारे वाहनचालक ही काय गौरवास्पद गोष्ट आहे का?
रस्त्यावर पान खाऊन आणि न खाता पचापच थुंकणारे, प्लॅस्टिक च्या पिशव्या, बाटल्या, कागद अशा अनेक वस्तू इतस्ततः: फेकणारे, रस्त्याच्या कडेला, कोपऱ्यात बिनदिक्कत शौचविधी करणारे, उद्यानात, बाकांवर, फुटपाथवर कोणतीही भीडभाड न बाळगता प्रणयाराधन करणारे, भकाभक सिगारेट ओढणारे, दारू पिऊन कोठेही आडवे झालेले, विमानाच्या वेगात बाईक पळवणारे, ट्रॅफिक चे नियम धाब्यावर बसवणारे, मोबाईल वर संभाषण करता करताच गाड्या हाकणारे असे सर्व जिथे सुखनैव नांदतात त्याच शहरात आपणही अनेक वर्षे वास्तव्याला आहोत ही अभिमानास्पद गोष्ट आहे की खेदजनक बाब आहे हे माझ्या बालमनाला पडलेले एक कोडे आहे.याला आळा घालण्याची जबाबदारी कोणाची हे कोणीच सांगत नाही. वरील कृत्यांचे समूळ उच्चाटन करणे हे मनपाच्या अखत्यारीत येते की नाही? वर उल्लेखिलेल्या गोष्टी शिक्षेस पात्र आहेत की नाही आणि असल्या तर अशा सर्व कृत्यांचे जनक असलेल्या महाभागांना शिक्षा केली जाते की नाही? की नुसत्याच मुठी गरम करून यांची शिक्षा माफ केली जाते का?      
रस्त्यावर पडलेला कचरा हे डोळ्यांसाठी एक सर्वपरिचित असे लक्षण आहे. घंटागाड्या येतात, तेवढ्यापुरते कचऱ्याचे ढीग उचलले जातात पण पुनश्च तेवढाच  कचरा रस्त्यावर ठिकठिकाणी साचतो, त्या उकिरड्यावर उंदीर, कुत्रे, गुरे मोकाट वावरतात. सॅनिटरी टॉवेल्स, फुकट गेलेले अन्न, भाजी-फळांच्या साली, मासळीचे अवशेषअशा असंख्य गोष्टी रोगराईला आव्हान देत रोज रस्त्यावर पडून असतात. येणारेजाणारे नाक मुठीत धरून, कासावीस होऊन तिथून रोजची येजा करतच असतात. अनारोग्याला आमंत्रण देणाऱ्या या घाणीकडे मनपा किती गांभीर्याने बघते?   
हाऊसिंग योजना, करसवलती, पाणीपुरवठा, वीज, वाहतूक, कचरा, सार्वजनिक आरोग्य, नागरी सुविधा, क्रीडा,पर्यावरण रस्ते, आपत्कालीन व्यवस्था अशा अनेक मुद्द्यांवर आज सांगोपांग चर्चा होणे आणि त्यातून काहीतरी चांगले निष्पन्न होणे हेच जनतेला अभिप्रेत आहे. नुसते बाह्यरूपाने शहर सुंदर करून आतली कुरूपता तशीच झाकून ठेवणे याला विकास म्हणायचा का? म्हणजे देहावर सुंदर कपडे आणि आत अनेक रोगांनी पोखरलेलं शरीर याला सुदृढता म्हटल्यासारखेच आहे. 
दुसऱ्याला म्हणजेच दुसऱ्या पक्षाला हीन लेखून आपल्या पक्षाचा मोठेपणा येनकेनप्रकारे सिद्ध करणे हा बहुतांश सगळ्या पक्षांचा कार्यक्रम आहे. दुसरी रेघ छोटी करून आपली रेघ मोठी आहे हे भासवण्याचाच हा प्रकार आहे. पण यासाठी आपली रेघ प्रयत्नपूर्वक, कसोशीने आणि सातत्याने, सन्मार्गाने कशी मोठी होईल यासाठी कटिबद्ध राहण्याची कोणाचीच तयारी नाही. निवडणूक होईतोवरच मतदार हा 'राजा' आहे नंतर मात्र त्याच्यासाठी दैनंदिन जीवन ही एक सजा आहे.

 

Tuesday, 31 January 2017

तौलनिक अहंकारांचे भीषण युद्ध .........


लग्न झालेलं एक जोडपं. उच्चशिक्षित. पदरी एक मूल. तो finance हेड तर ती marketing हेड. उच्चभ्रू वस्तीत त्यांचा स्वत:चा फ्लॅट. यायला जायला स्वत:ची गाडी. घरात सर्व सुखसोयी. त्या दोघांचेही आई-वडील त्यांच्या घराच्या जवळपासच. ऑफिसमधून परत घरी येताना मुलाला तिच्या आईच्या घरून pick up करणे हा तिचा नित्यक्रम!  
 लौकिकार्थाने सर्व दिसायला छानच. सुखी परिवार वगैरे. पण त्याच्या आत खोलवर कुठेतरी एक ठणकणारी जखम. तिच्या आणि त्याच्या पगाराच्या तफावतीची. आपल्यापेक्षा तिचा पगार जास्त ही वेदना त्याला क्षणोक्षणी विच्छिन्न करणारी. ही भळभळणारी जखम उराशी घेऊन वावरणारा हा आधुनिक अश्वत्थामा! दिसामाशी जास्तच उद्विग्न आणि उध्वस्त होत चाललेला. तिच्या प्रत्येक बोलण्याचा विपर्यास करणारा. मूल ही फक्त तिची जबाबदारी आहे असे मानणारा.   
मुलाला शाळेत drop करण्याबाबत आणि नंतर pick करण्याबाबत त्या दोघांत झालेला एक समझोता . एक महिना ही जबाबदारी त्याने घ्यायची तर एक महिना तिने. असे ठरलेले असतानाही एके दिवशी ही जबाबदारी घ्यायला त्याचा नकार. कारण ऑफिसमधील एक्सट्रा workload चे. दिवसरात्र ऑफिसमध्ये खपूनही salary वाढत नाही त्यामुळे तो मनोमन खचलेला, घुसमटलेला. तिच्यापेक्षा माझा पगार ४०००० ने कमी ही त्याची खरी खंत जी तो मित्रापुढे उघड करतो. तिच्याबद्दलचा त्याचा आकस भलताच वाढलेला. आपल्याला मिळणाऱ्या पगाराच्या आकड्यावरूनच तिने आपले नामकरण केले आहे असे त्याला पदोपदी वाटत राहते. 'ओ मिस्टर एक लाख दहा हजार' असे ती आपल्याला कुत्सितपणे म्हणत हिणवते आहे असे भास त्याला होतात. मित्राच्या समजावण्याचा त्याच्यावर परिणाम शून्य.  
तुझा जॉब माझ्यापेक्षा कसा कमी जोखमीचा, कमी जबाबदारीचा अशी तिला सतत त्याची मुक्ताफळे. एक दोनदा तर तो तिला नोकरी सोडण्याचा आग्रह ही करतो. घराकडे आणि मुलाकडे तुझं सर्वस्वी दुर्लक्ष होतंय असे कारण तो पुढे करतो. तिला मात्र हे विस्कटत चाललेलं घर सावरायचं असतं. तिच्या कोणत्याही बोलण्याचा तो चुकीचा अर्थ काढतोय ते तिला माहित असतं आणि त्यामागचं कारणही तिला ठाऊक असतं. त्याने आपल्यापेक्षा जास्त पगार कमवावा, दुसरी एखादी जास्त पगाराची नोकरी accept करावी असंच तिला वाटत असतं. तो अकारणच inferiority complex ने पछाडला गेलाय हे तिला समजत असतं. ती तिच्या मैत्रिणीकडे तिचं मन मोकळं करते. त्याने एक पाऊल पुढे टाकावं मी चार पावले माझ्याबाजूने पुढे टाकीन हे ती तिच्या आईलाही बोलून दाखवते.   
 या त्यांच्या अहंकाराच्या आपापसातील लढाईत त्यांचं निरागस मूल मात्र कोमेजून जात असतं. त्याच्या मनावर परिणाम व्हायला लागलेला असतो. वेळीच या भांडणांना आवर घातला नाही तर मुलावर विपरीत परिणाम होईल या भीतीने ती व्याकुळ होते. एक दिवस ती ठरवते की बस्स खूप झालं. हा संसार पुरता मोडायच्या  आधीच सावरला पाहिजे. ती ठरवते की आज संध्याकाळी त्याच्याशी या विषयावर बोलायचं आणि या सततच्या वादांना कायमचा पूर्णविराम द्यायचा. ती आईला सांगते की आज मी सोनूला घरी आणणार नाही कारण मला ऑफिस मध्ये बरंच काम आहे. तो आज तुझ्याकडेच राहील. आपण आपल्या नवऱ्याशी कधी एकदा बोलतोय आणि परत एकदा आपल्या संसाराची घडी ठाकठीक करतोय असं तिला होतं. 
 गाडीतून घरी येताना मुलाविषयी आणि एकंदरीतच त्यांची जुजबी चर्चा होते. परंतु सूर मात्र विसंवादाकडेच झुकलेले असतात. हे दोघे घरी येतात. ती समन्वयासाठी पुढे सरसावते. त्याला दोन धीराचे शब्द सांगू लागते. आपल्या वागण्याचा मुलावर होणार परिणाम त्याला पटवून देऊ पहाते. पण तो मात्र वर्षानुवर्षांचा राग मनात ठेऊन असतो. तुझा पगार माझ्यापेक्षा जास्त म्हणूनच तू आज वर तोंड करून माझ्याशी बोलते आहेस, मला कमी दर्जाचा दाखवण्यात तुला कसा आसुरी आनंद होतो आहे वगैरे बोलून तिचा उरलासुरला संयम कसा संपेल यासाठी प्रयत्नशील राहतो. सामंजस्याचे वागणे तर सोडाच पण या चर्चेतून काहीच निष्पन्न होऊ शकणार नाही हे तिच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा तिचाही तोल जातो आणि तीही चार खडे बोल त्याला सुनावण्यासाठी कंबर कसते. दोघांचेही राग शिगेला पोहोचतात. तो पुढचामागचा कसलाही विचार न करता डायनिंग टेबलावर पडलेली सूरी उचलतो आणि क्रोधाच्या परमोच्च अवस्थेत तिच्यावर तिच्यावर सपासप वार करतो. ती जमिनीवर अस्ताव्यस्त रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते गतप्राण होऊन. यानंतर तो स्वत:ला गॅलरी मधून खाली झोकून देतो. तोही on the spot मरण पावतो. 
 ही कपोल कल्पित कहाणी नव्हे तर नुकतीच मुंबई सारख्या शहरात घडलेली घटना आहे. ही घटना नुसती हादरवणारी नाही तर तुम्हा आम्हा सर्वांना अंतर्मुख करणारी आहे. अहंकाराचा नाश अपेक्षित असताना स्वत:चाच नाश ओढवून घेणाऱ्या तरुण जोडप्याची आणि त्यांच्या अचानक, एकाएकी निराधार, पोरक्या  झालेल्या निष्पाप मुलाची ही गोष्ट आहे.   
 मिळणाऱ्या पगाराच्या आकड्यांतील तफावतीमुळे दोन कधीकाळी एकत्र आलेली मने इतकी दुभंगू कशी शकतात? दुसऱ्याचा जीव घेण्याइतपत त्यांच्यातील एकाची मजल कशी जाऊ शकते? त्यांच्या मुलाचा विचारही त्यांच्यातील नात्याला एकत्र बांधून ठेऊ शकत नाही? आपल्या बुद्धीचा, शिक्षणाचा वापर अशा पद्धतीने एखादा माणूस कसा काय करू शकतो? आयुष्यात इतकं शिकून, ऐश्वर्य मिळवूनही ही अशांती, अतृप्ती मनात वास्तव्य कसं करू शकते? या आणि अशा अनेक प्रश्नांना जन्म देणारी ही घटना आहे. 
 नवराबायकोमधील ही अशी आर्थिक तुलना संसाराला कशी घातक ठरू शकते . मद्यप्राशन न करताही चढलेली ही एकमेकांतील स्पर्धेची नशा नात्याला असे भीषण वळण देऊ शकते याचे हे ठळक उदाहरण. तुलना आणि स्पर्धा ही हत्यारे माणसाचे या पृथ्वीतलावरील अस्तित्व पुसून टाकण्यास किती सक्षम आहेत याचा हा सबळ पुरावा. या घटनेतून योग्य तो बोध घेता आला तर निदान भविष्यात नेस्तनाबूत होणारे काही संसार तरी वाचू शकतील म्हणून हा लेखन प्रपंच.

Wednesday, 28 December 2016

एक आग सी वो दिल में ..............


एक आग सी वो दिल में लगाकर चले गये|
हसते हुए निगाहें झुकाकर चले गये |  किंवा

मेरे आसूओ पे नजर न कर 
मेरा शिकवा सुनके खफा न हो
उसे जिंदगी का भी हक नहीं
जिसे दर्द-ए-इष्क मिला न हो |       किंवा

हर नयी शाम सितारों के दिये जलते है
और मेरे दिल में में कई  गीत मचल जाते है |

या युनूस मलिक यांनी स्वरबद्ध केलेल्या गझला सुमनच्या गळ्यातून अप्रतिम साकारल्या आहेत. वरील तीन गझला फक्त वानगी दाखल आहेत. मराठी भाव-भक्तिगीतांच्या प्रांगणात आणि हिंदी चित्रपटातील मोजकी गाणी ज्या गायिकेच्या नावावर आहेत त्या सुमन कल्याणपूर या गायिकेने या आणि अशा बऱ्याच गझला ज्या ताकदीने गायल्या आहेत त्याला तोडच नाही.
ढाक्यातील मलमलच्या तलम वस्त्राप्रमाणे तलम सूर गळ्यात घेऊन सुमन इथे आली आणि तलत मेहमूद या गायकाने तिच्यातील गायिकेला जोखलं. पुढे तिला अनेक हिंदी,मराठी तसेच इतर भाषांमध्ये पार्श्वगायनाची संधी मिळाली आणि काही गाणी तिच्या नावावर नोंदली गेली. ना ना करते प्यार, न तुम हमें जानो, दिल एक मंदिर है, अजहून आये बालमा, आजकल तेरे मेरे  प्यार के चर्चे   अशी हिंदी गाणी तसेच कशी करू स्वागता, जेथे सागरा, झिमझिम झरती, केतकीच्या बनी तिथे, देवा दया तुझी की, भक्तीच्या फुलांचा , तुझ्या कांतीसम रक्तपताका, मी चंचल होऊन आले अशी काही मराठी गीते सुमन ने लोकप्रिय केली.   
तिच्या गळ्यातील ताकदीच्या मानाने जी काही गाणी तिच्या वाट्याला आली ती तशी संख्येने कमीच आहेत असे म्हणायला अजिबात हरकत नसावी. ती सतत लताची रिप्लेसमेंट म्हणून ओळखली गेली. तिच्या नावावरील  बरीच गाणी तिच्या आणि लताच्या आवाजातील साधर्म्यामुळे लताच्या नावावर नोंदली गेली. नंतर अनेक वर्षे सुमन या गायनाच्या क्षेत्रापासून दूर निघून गेली.  काही महिन्यांपूर्वी  you tube वर सुमनसुगंध या कार्यक्रमात तिला आपको दिल में बिठा लुं तो चले जाईयेगा हे गाताना ऐकले आणि मनात आठवणी दाटून आल्या.तिच्या नावाला कीर्तीने, प्रसिद्धीने कधी झपाटले नाही. तिचे नाव मोजक्याच कानांना माहित झाले.
युनूस मलिक नावाच्या संगीतकाराने तिच्या गाण्यातील क्षमता ओळखली आणि या गझला गाण्यासाठी तिची निवड केली. बैठकीच्या गझला गाण्यासाठी आवश्यक तो गळ्याचा पोत तिला लाभलेला नसूनही ती त्या अनुपमेय गायली. गझलांमधील दर्द तिने सहीनसही पोहोचवला. सुरांच्या अनवट लड्या तिने सौंदर्याने  नटवल्या. सुरांच्या लोभस सान्निध्यात तिने गझलेचे एक एक वस्त्र रेशमी केले आणि एक वेगळी सुमन या सर्व गझलांमधून भेटत गेली.
आजही अनेकांना सुमन कल्याणपूर या नावाची आणि तिच्या वसलेल्या गायिकेची खरी ओळख पटलेली नाही. पण एकदा या गझला कानावर पडल्या की मग या नावाची आणि त्या गझलांची जन्मभराची ओळख होईल हे नक्की!
तिच्या अलौकिक सुरांचे सान्निध्य असेच आम्हा तुषार्त रसिकांना कायमचे लाभो हीच इच्छा!

Saturday, 24 December 2016

दंगल' च्या निमित्ताने ..........


समस्त पुरुषी मानसिकतेला आव्हान देणारा असा हा चित्रपट आहे. मुली जास्तीत जास्त काय करू शकतात हा अहंगंड जोपासणाऱ्या सो कॉल्ड पुरुषी प्रवृत्तीला या निमित्ताने दिलेलं हे चोख उत्तर आहे. आखाड्यात उतरण्यासाठी मुलगा हवा अशी स्वाभाविक इच्छा असणाऱ्या महावीरसिंग फोगट यांना एकापाठोपाठ एक अशी चार कन्यारत्न होतात आणि तेवढ्यापुरता त्यांचा हिरमोड होतो. पण एका प्रसंगा नंतर आपल्या मुलींच्या रक्तातच पहिलवानकी आहे याचा साक्षात्कार महावीरना  होतो आणि पहिल्या दोन मुलींना आखाड्यात उतरवण्यासाठी महावीर शर्थ करतात. यथावकाश त्यांच्या मुली त्यांच्याकडून कुस्ती आत्मसात करतात आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय संपादन करतात. ही दंगल या चित्रपटाची शौर्यगाथा आहे. या चित्रपटात एक वाक्य असे आहे की "दंगल लढने से पहले डर से लढना जरुरी है". हे वाक्य मला खूप महत्वाचं वाटतं. ही दंगल मनाच्या आखाड्यातही पूर्ण ताकदीनिशी लढली गेली पाहिजे. शौर्य हे केवळ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवणं प्रत्येक वेळी अपेक्षित नसतं तर ते दैनंदिन आयुष्यातही दाखवता यायला हवं. 
आपण कुठेतरी या पुरुषांपेक्षा कमी आहोत, कमजोर आहोत ही भावना उरीपोटी बाळगून आज वर्षानुवर्षे मुली दुय्यम अथवा कमी महत्वाचं आयुष्य जगत आल्या आहेत. कौटुंबिक स्तरावर चाललेली तुलना सहन करत आल्या आहेत. वडिलांची, नवऱ्याची मारझोड तोंडातून अवाक्षर न काढता सोसत आल्या आहेत. पाशवी अत्याचाराला बळी पडत आल्या आहेत. केवळ  मुलीचा जन्म म्हणून नीतिनियमांचा दाखवलेला बडगा मानत आल्या आहेत.
खाणंपिणं, शिक्षण, सोयीसुविधा, समारंभ, कौटुंबिक सवलती, छंद या आणि अशा सगळ्याच बाबतीत मुलगी असो वा स्त्री तिला काहीनाकाही तडजोड ही करावी लागतेच! लग्नांनंतर मुलीचं अवघं विश्वच जणू बदलून जातं. नवरा किंवा सासरचे विरोध करतात म्हणून मग अनेक मुलींची  शिक्षणं थांबतात, छंद मागे पडतात. पदरी मूल आले की तिला दुसरे जगच उरत नाही. हल्ली हे चित्र कदाचित काही टक्क्यांनी बदलले असले तरी आजमितीलाही अनेक मुली आणि स्त्रिया ही मानसिक घुसमट, मुस्कटदाबी सहन करत आहेत. पूर्वी नुसतीच हक्काची मोलकरीण हवी होती, आज कमाऊ मोलकरीण हवी आहे.  
स्वातंत्र्य ही गोष्ट जणू स्त्रीशी निगडीतच नाही अशा अविर्भावात काही पुरुष वावरत असतात. लग्नाआधी व लग्नानंतर आपले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य किती स्त्रियांना मिळत याची टक्केवारी बरेच काही सांगू शकेल. कळसूत्री बाहुली म्हणून  स्व-स्त्रीला  वागवणारे अनेक महाभाग आजही अस्तित्वात आहेत. आणि  हे फक्त ग्रामीण भागात नाही तर आधुनिकतेचा वास असणाऱ्या शहरातही आढळून येतंय. 
मुलगी म्हणजे हातावरचा निखारा, मुलगी म्हणजे परक्याचं धन, मुलगी म्हणजे जीवाला घोर, मुलगी म्हणजे अहोरात्र टांगती तलवार असे एकाहून एक अतिशय फडतूस समज अजूनही लोकांनी मनात बाळगले आहेत. त्यांना सतत  खतपाणी घालत  आले आहेत. कर्व्यांनी स्त्री-शिक्षणाची बीजे यासाठी रोवली होती का? यासाठी सावित्रीबाई फुले यांनी शेणगोळे झेलले होते का? उत्तम शिकलेल्या पण आयुष्यात काहीही साध्य न करता आलेल्या स्त्रिया भरपूर आहेत.परिस्थितीने ग्रासलेल्या व सक्तीने त्रासलेल्या मुली आणि स्त्रिया संख्येने अजिबात कमी नाहीत.  
जशा आपल्या अजोड कर्तृत्वाने तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या पण हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या स्त्रिया आहेत तितक्याच केवळ धैर्याचे बाळकडू न मिळाल्याने मनासारखं आयुष्य जगता येत नाही म्हणून नैराश्यापोटी मृत्यूला जवळ करणाऱ्या सुद्धा आहेत. स्त्री आणि पुरुष अशी सरधोपट वर्गवारी करून आणि शारीरिक बळाचा वापर करून मुलीच्या अथवा स्त्रीच्या प्रगतीस खीळ ठोकण्याचे अलौकिक कार्य करणाऱ्या पुरुषांना जोवर मनाच्या आखाड्यात पराभूत केलं जाणार नाही तोवर ही क्रांती होणे शक्य नाही.     
म्हणूनच ज्या क्षणी मनाच्या मैदानातील ही लढाई मुली व स्त्रिया जिंकतील, त्या क्षणी गीता आणि बबिताची ही शौर्यगाथा खऱ्या अर्थाने पुढे प्रवाहित होईल.        


Sunday, 4 December 2016

रैन का सपना .......


पं संजीव अभ्यंकर . मेवाती घराण्याचे एक तरुण, सशक्त गायक. पं जसराज यांचे  संगीत परंपरेचे दायित्व समर्थपणे पेलणारे आणि जनमानसात या घराण्याचे  गाणे अतिशय कौशल्याने प्रवाहित करणारे. संगीतसाधना करणाऱ्या श्रीमती शोभा अभ्यंकर यांचा हा सुपुत्र वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी व्यासपीठावरून पहिले गाणे गायला आणि व्यासपीठाचे आणि त्याचे नाते अतूट झाले. त्याच्या गाण्याची संमोहिनी रसिकांवर त्यांच्याही नकळत पसरली आणि कान तृप्त होऊनही तृषार्तच राहिले, संजीवना अधिकाधिक ऐकण्यासाठी.
संजीवच्या गाण्यात तंत्र आणि माधुर्य यांचा अभूतपूर्व संगम आहे. गाणं केवळ तंत्राच्या आहारी गेलं तर एकवेळ अचूक होतं पण तेवढंच रुक्षही होतं. पण बुद्धी आणि भावना यांचा सुयोग्य मिलाफ असलेलं गाणं श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतं. याच पठडीतील गाणं संजीव यांचं आहे. पं भीमसेन जोशी, पुलं , वसंतराव देशपांडे, गंगुबाई हनगल, हिराबाई बडोदेकर यांच्यासारख्या दिग्गजांकडून संजीवचं गाणं वाखाणलं गेलं. 
तिन्ही सप्तकात लीलया फिरणारा अतीव मृदू आणि तितकाच गोड आवाज, ताना आणि बोलतानांवरील विलक्षण प्रभुत्व, मुद्रेवरील हसरा आणि शांत भाव आणि आत्मविश्वासाने ठासून भरलेलं भावपूर्ण गाणं हे संजीवच्या यशाचं गमक आहे. खळाळत्या झऱ्याचं सौंदर्य,  सळसळत्या हिरव्यागार पानांचा उत्साह आणि कोवळ्या रेशमी किरणांची ओजस्विता म्हणजे  संजीवचं गाणं. 
ललत रागातील 'रैन का सपना' असो वा मधुकौंस मधील ये ऋत'रुसवे की नाही' असो वा 'शाममुरारी बनवारी गिरिधारी' ही पुरियाधनाश्री रागातील बंदिश असो, एकेक राग हळुवारपणे उलगडत नेण्याचं संजीवचं कसब  निव्वळ लाजबाब! ध्यान लागले रामाचे किंवा यासारखी भक्तिरसाने ओथंबलेली त्यांची कैक गीते अध्यात्म्याच्या गाभ्याला अलवार स्पर्श करतात. तू असतीस तर'' सारखे त्यांनी गायलेले भावगीतंही लक्षणीय. 
जसराजजी संजीवचं गाणं ऐकताक्षणी म्हणाले की हा मागच्या जन्मातील गाणं गातो आहे. एखाद्या गवैय्याची मागील जन्माची ख्वाईश जणू संजीवच्या गळ्यातून पूर्ण होतेय. असेलही. एका आयुष्यात कधीही संपूर्णपणे प्राशन न करता येणारा हा संगीताचा विराट समुद्र आहे. त्यामुळे हे पूर्वजन्मीचे सांगीतिक तरंग आणि  लाटा बरोबर  घेऊनच संजीव याजन्मीच्या किनाऱ्याला लागले असतील कुणी सांगावे. 
 असेच स्वच्छ, नितळ गाणे संजीवनी अव्याहतपणे गात राहावे आणि रसिकश्रोत्यांनी तितक्याच अव्याहतपणे ते हृदयाच्या कुपीत अत्तराप्रमाणे बंदिस्त करत राहावे अशी ईश्वरी योजना असावी असे प्रकर्षाने वाटते.

Sunday, 27 November 2016

धिक्कारार्ह, आक्षेपार्ह, निंदनीय, तिरस्करणीय बाल्य ........


सहा वर्षाच्या मुलीवर ८,९,आणि १० वर्षाची मुले शारीरिक अत्याचार करतात ही घटना पचवता येणंच अवघड आहे. पण हा प्रसंग काल्पनीक नाही तर तो प्रत्यक्षात घडलेला असल्याने त्याचे गांभीर्य वाढले आहे.
मुळात हे असे बीभत्स कृत्य करण्याची इच्छा या कोवळ्या वयात या मुलांच्या मनात निर्माण कशी होते हाच खरा प्रश्न आहे. काहीतरी बघून , उत्तेजित होऊन हा असा अत्याचार करण्यास ही मुले जर प्रवृत्त होत असतील तर याचा वेळीच विचार होणे अत्यावश्यक आहे नाहीतर ही पिढीच्या पिढी बरबाद होण्याची शक्यता आहेच त्याचबरोबर लहानग्या अनेक मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उग्र स्वरूप धारण करणार आहे. 
इतक्या लहान वयाची मुले हे कृत्य करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सिद्ध कशी होतात तेच कळत नाही. शाळा, शिक्षक आणि पालक यांच्या सान्निध्यात बहुतांश वेळ व्यतीत करणारी ही मुले अशी एकाएकी वासनेच्या आहारी जाऊन एखाद्या मुलीच्या शरीराशी अत्यंत गलिच्छ, धृणास्पद रीतीने खेळू पाहतात यासारखी दुसरी शोकांतिका नाही. 'लहानपण न देगा देवा' असे म्हणायची आता पाळी आली आहे. शाळेत शिकवले जाणारे सुविचार, श्लोक, प्रार्थना आणि जन्मदात्यांनी केलेले संस्कार अक्षरश: सुळावर चढले आहेत.
हल्ली अगदी लहान वयाची शाळकरी पोरेही येणाऱ्या जाणाऱ्या मुलींवर अचकट विचकट शेरे मारतात. त्यांच्या घोळक्यात कल्पनाही करवणार नाही अशा विषयांची चर्चा सुरु असते. त्यात आता जवळजवळ प्रत्येकाच्या हातात अवेळीच स्मार्ट फोन आलेला असल्याने कुणी कुणाला 'hot'व्हिडीओ सेण्ड करतात. ती दृश्ये बघून काही धाडसी मुले इतरांना instigate करण्याचा प्रयत्न करतात.  यातूनच मग हा सामूहिक अत्याचाराचा बेत मनात आकाराला येतो. एक ना एक दिवस सावज टप्प्यात येतं आणि मग अशा हिडीस प्रयोगांना भूमी मिळते. जगातील समस्त मानसोपचार तज्ञांसाठी ही मुलांची मानसिकता म्हणजे एक आव्हानच आहे. 
जग पुढे जातंय ते  information & technology'' च्या प्रगती मुळे. पण हीच technology आता मानवतेच्या मुळावर येतेय की काय ह्याची भीती वाटू लागली आहे. स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या वयाचा विधिनिषेध नाही, परिणामांची क्षिती नाही, सुसंस्कारांचे पाठबळ नाही अशा अवस्थेत ही कोवळी मने चुकीच्या दिशेने फोफावत चालली आहेत. आपलं मूल दिवसभर  नक्की काय करतंय, त्याच्या मनात नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्याची प्रामाणिक इच्छा किती पालकांना असते? त्यांना आपल्या मुलांशी संवाद साधायला वेळ कुठे असतो? या मुलांच्या निरागसतेला, निष्पाप वृत्तीला ग्रहण लागल्याचं किती पालकांच्या लक्षात येतं?  अपराध घडल्यावर मग अशा 'अजाण'मुलांना सुधारगृहात पाठवलं जातं. पण सुधारगृहातून बाहेर येताना या मुलांची मानसिकता, अत्याचार करण्याची प्रवृत्ती बदललेली असेल अशी हमी कोणी देऊ शकतं का? यापुढील त्यांची वाटचाल सन्मान्य मार्गावरूनच होईल अशी शक्यता गृहीत धरता येऊ शकते का? 
precaution is better than cure'' अशी इंग्रजीत म्हण आहे. गुन्हा घडून गेल्यानंतर वरवरची मलमपट्टी करण्याऐवजी असे गुन्हे घडू नयेत म्हणून, अशी विकृत मानसिकता तयार होऊ नये म्हणून आधीच काही ठोस पावले का उचलली जात नाहीत?  मोर्चे, घोषणा,कॅण्डल मार्च, बंद, चर्चा या post activities अशा वेळेस  वांझोट्या ठरतात हे आपण आजवर सगळ्यांनी अनुभवलं आहे, शिक्षक, पालक, मानसोपचारतज्ञ्, सामाजिक संस्था हे सर्व घटक पुढे येऊन, एकजुटीने या समस्येच्या मुळाशी का जात नाहीत? वास्तविक पाहता हे काम आजमितीला युद्ध पातळीवर करण्याची नितांत गरज आहे. 
आपल्याला या नव्याने उदयाला येणाऱ्या पिढीतून देशाचे भावी सुजाण नागरिक निर्माण करायचे आहेत की बलात्कारपटू हे ठरवण्याची वेळ निश्चितच येऊन ठेपलेली आहे. या मोहिमेत प्रत्येक जबाबदार नागरिकाने आपले वैचारिक सहकार्य देणे आत्यंतिक गरजेचे आहे असे मला वाटते.          

Thursday, 24 November 2016

मोदींस पत्र ......


आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांस ,

अहो काय करून बसलात तुम्ही? अचानक, तडकाफडकी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करून तुम्ही किती जणांच्या झोपा उडवल्यात याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? आता कोणत्या डॉक्टरांकडे जायचं त्यांनी? मुळात आपले पंतप्रधान अशी काही 'हालचाल' करू शकतात हेच आम्हा भारतीयांच्या अजून पचनी पडलेलं नाही.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना वाटलं असेल का असं काही 'खतरनाक' करावंसं ? वाटून तरी त्यांनी काय केलं असतं म्हणा. ते बिचारे सत्तेच्या मैदानात उतरले तेच मुळी अठरापगड पक्षांचं कडबोळं काखोटीला मारून. त्यात त्यांचा 'बोलविता धनी' (सॉरी धनीण) वेगळाच! त्यामुळे सत्तेवर आल्यापासून त्यांनी जी तोंडात मिठाची गुळणी धरली ती शेवटपर्यंत! मुळात राजकारण्यांची पावलं 'विधायक' गोष्टींकडे वळू शकतात असा विचारही आम्हा सामान्य जनतेच्या डोक्यात कधी येत नाही आणि आलाच तर तो आम्ही डासासारखा फटकन मारून टाकतो.  
भुजबळांची रवानगी तुमच्या भाजपने राजकीय विश्रामगृहात केली.  अहो काय म्हणायचं याला? आता नोटबंदी जाहीर करून तुम्ही तर 'विक्रमादित्य'झालात. देशाचे पंतप्रधान भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यात सक्रिय असल्याचे पाहून आम्हा सामान्य नागरिकांना खूप गहिवरून येतंय. 'अजी सोनियाचा ( कृपया नावाचा विपर्यास करू नका ) दिनू'असं म्हणत नाचावंसं वाटतंय. 
पण तुमच्या लक्षात आलंय का तुम्ही कोणाशी पंगा घेतलाय ? केजरी आणि राहुल ही बाळे ठणाणा करतायत , किंचाळताहेत, रडतायत. त्यांना आधी शांत करा हो. निदान तुमच्याकडे असलेल्या 'व्हाईट मनी'तून त्यांना दोन खुळखुळे तरी आणून द्या.
तासनतास रांगेत तिष्ठत आम्ही राहतोय आणि एसी केबिनमध्ये आणि आलिशान गाड्यांत बसून विरोधक टाहो फोडत आहेत. अहो सत्तेवर येण्याआधी मी यंव करेन नि त्यंव करेन अशा राजकीय वल्गना सगळेच करतात. पण म्हणून सत्तारूढ झाल्यावर त्या दिलेल्या वचनांशी बांधील राहिलंच पाहिजे असं थोडंच आहे? आणि आम्हीही अशा राजकीय वल्गनांना सिरियसली घेतंच नाही.
पूर्वी जशा रेशनच्या दुकानांवर रॉकेल, साखर आणि तांदूळ घ्यायला लांबलचक रांगा लागायच्या तशा आज ATM बाहेर आणि बँकांत लागतायत. लोकांची गैरसोय होतेय, त्यांना उन्हातान्हात उभं राहावं लागतंय, त्यांचं रुटीन अपसेट झालंय असं चित्र जरी दिसत असलं तरी या भ्रष्टाचाऱ्यांचं कंबरडं एकदाचं मोडेल या सुखद जाणिवेची झुळूक हा त्रास सुसह्य व्हायला मदत करते आहे. या सुखाला विरोधकांची नजर मात्र लागायला नको. 
जनतेच्या त्रासाचं भांडवल करून तुम्हाला जेरीस आणण्याचे मनसुबे विरोधकांकडून रचले जात आहेत. ते तरी काय करतील बिचारे? २०१९ च्या निवडणुकी नंतरचं चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर आताच तरळायला लागलंय. आम्हाला त्रास होतोय पण यातून जर भ्रष्टाचाऱ्यांना सणसणीत चपराक बसणार असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ही जनभूमिका विरोधकांच्या जखमेवर मीठ चोळतेय. 
मोदीजी तुमच्या सततच्या विदेशवाऱ्यांमुळे विरोधकांना काहीतरी बोलायला वाव मिळाला होता . पण ही नोटाबंदी करून त्यांच्या तोंडचा घास पळवलात तुम्ही . आणि एवढे १८-१८ तास कसलं काम करता हो?  अहो राजकारण्यांनी खुर्च्या फक्त उबवायच्या असतात.  त्यावर बसून त्यांनी जनहिताचे निर्णय थोडेच घ्यायचे असतात? अहो इतक्या वर्षांत जे आक्रीत घडलं नाही ते तुम्ही  घडवून आणलंत पण 'सरकार आणि निष्क्रिय'हे समानार्थी शब्द आहेत असं समजणाऱ्या आम्हा जनतेच्या अंगवळणी ही सवय पडायला नको का?
आता ५०० आणि १००० च्या नोटांची असंख्य बंडले उरीपोटी कवटाळून बसणाऱ्यांची आम्हाला विलक्षण काळजी वाटू लागली आहे. काय करतील ते? कुठे जातील ते? नोटांबर स्वत:ही गंगेत जलसमाधी घेतील का ते?
मुळात सरकार काहीतरी करतंय हीच भावना आमच्या मनात नव्याने जन्माला आली आहे. राजकीय वाद-विवाद, तंटे, कोलांट्या उड्या, धोबीपछाड, हमरीतुमरी अनुभवत आम्ही आज इथवर आलो आहोत. पण या वांझोट्या माळरानावर आणि बरबटलेल्या वाटांवर स्वच्छ, शुभ्र आणि सच्चेपणाचा सुवास असलेली फुले उमलणार असतील तर मोदीजी आम्ही थोडाबहुत त्रास सोसायला नक्कीच तयार आहोत. 
आपल्या धाडसाला त्रिवार सलाम!

आश्चर्याच्या  धक्क्यातून अजून न सावरू शकलेली
जनता ......