Monday, 24 December 2012

ढिम्म सरकार ...... विषण्ण जनता !


आठ दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत एक भयानक घटना घडली आणि तिचे पडसाद देशाच्या कानाकोपऱ्यात उमटले. दिल्लीतील युवा पिढी रस्त्यावर उतरली. निदर्शने, आंदोलने, घोषणा यांनी दिल्ली दुमदुमली. राजधानीत चर्चासत्रे चालू झाली. आरोपी पकडले गेले. देशभरातून त्या दुर्दैवी मुलीसाठी प्रार्थना सुरु आहेत. डॉक्टर तिला वाचवण्याची शिकस्त करत आहेत.  परंतु गेल्या आठवड्याभरातील वेगवेगळ्या घटनांमधून  सरकार आणि आम जनता यांच्यातील दरी वाढत जाते आहे. आरोपींच्या शिक्षेसंदर्भातील कोणत्याही ठोस निर्णयाप्रत अजून तरी सरकार पोहोचू शकलेली नाही. असे अनेक बलात्कारी, अत्याचारी आजही या देशाच्या पाठीवर राजरोस निर्भीडपणे फिरत आहेत. त्यांच्या कृष्ण-कृत्यांना आळा घालायला कुणी आलेलाच नाही. आणि जन्मभराची शिक्षा भोगत बसल्या आहेत अनेक असहाय तरुणी ! 
मुंबईत निखिल बनकर या तरुणाच्या हल्ल्याचे लक्ष्य झालेली तरुणी हॉस्पिटल मध्ये गंभीर अवस्थेत आहे. दिवसेंदिवस या घटना बेसुमार वाढल्या आहेत. जवळजवळ सगळ्या आई-वडिलांच्या डोक्याला नसता घोर लागला आहे. शाळा-कॉलेज-ऑफिस मध्ये जाणारी आपली पोर घरी सुखरूप येईल ना ही चिंता त्यांना दिवस-रात्र  कुरतडते आहे.  'सिंगल रेप-gang रेप' हे शब्द नको त्या वयात मुला-मुलींच्या ओठांवर येत आहेत. छोट्या-छोट्या मुलींना स्वत:चे रक्षण परपुरुषापासून कसे करायचे याविषयी मार्गदर्शन देण्याची वेळ आली आहे.  यातील काही मुली स्वकीयांपासूनच विटंबिल्या जात आहेत.  घरी-दारी लहान मुलींचे, तरुणींचे, स्त्रियांचे शत्रू निर्माण होत आहेत. मुलींच्या वयाचा जराही मुलाहिजा न ठेवता त्यांना आपल्या कामांधतेचे बळी ठरवण्यासाठी अनेक पुरुष तत्पर आहेत.    
हे सगळे अव्याहत चालू असताना सरकार मात्र अनेक गंभीर प्रश्नांना ठराविक चाकोरीबद्ध उत्तरे देत आणि मूळ प्रश्नाला बगल देत ढिम्म बसले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेतील दिरंगाई आणि ढिलाईमुळेच अपराध्यांचे फावले आहे. रस्त्यात चालणाऱ्या कोणत्याही मुलीवर हात टाकणे, तिची छेड काढणे, तिच्यावर acid फेकणे, चाकूहल्ला करणे त्यांना सहजसाध्य होते आहे. एकीकडे स्त्रीला देवी म्हणायचे आणि दुसरीकडे तिच्या देहाला खेळणे समजायचे अशा प्रकारची मानसिकता समाजात बोकाळली आहे.  सत्तेवर बसलेल्या व्हीआयपींना मुली आहेत पण त्या मुलींचे आयुष्य आणि सर्वसामान्य मुलींचे आयुष्य यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. कडेकोट बंदोबस्तात आपला अभ्यासक्रम आणि करियर करणाऱ्या त्यांच्या मुली आणि कोणत्याही प्रतिकूल परिस्थतीत कुटुंबाला आधार देत नोकरी करणाऱ्या, घर चालवणाऱ्या, एकट्या-दुकट्या राहणाऱ्या सामान्य मुली यात कुठल्याही दृष्टीने तुलना होऊ शकत नाही. रात्रीच्या वेळी बसची वाट बघत आणि परक्यांच्या घाणेरड्या नजरा सहन करत एकटीने उभे राहणे किती व्हीआयपीजच्या मुलींच्या वाट्याला आले आहे? रात्री उशिरा ट्रेनमधून जीव मुठीत धरून प्रवास करणे किती व्हीआयपीजच्या मुलींच्या वाट्याला आले आहे? त्यामुळे आम्हालासुद्धा मुली आहेत हा त्यांचा युक्तिवाद इथे प्रशस्त ठरत नाही. 
दिल्लीत घडलेली घटना हा क्रौयाचा परमोच्चबिंदू आहे पण याआधीही अशा अनेक अत्याचाराच्या, मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. अशा अनेक घटना घडूनही सरकारच्या निर्ढावलेल्या डोळ्यांना काही पाझर फुटत नाही. अपराधी मोकाट सुटतात आणि त्यांच्या वासनेला बळी पडलेल्या एकतर मरून तरी जातात किंवा खालमानेने आपला जीव जगवत राहतात. केईम मध्ये आजही अरुणा शानभाग खितपत पडून, न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगते आहे आणि तिच्यावर अत्याचार करणारा मात्र त्याच्या वाटची जुजबी शिक्षा भोगून त्याचे प्रापंचिक आयुष्य व्यतीत करतो आहे. 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी स्त्रीकडे वाकडा डोळा करून बघणाऱ्या माणसास सज्जड शिक्षा होत असे. अमक्याने स्त्रीवर अत्याचार केला आहे हे सिद्ध झाल्यास त्याचे हात-पाय कलम केले जायचे. अपराध आणखी गंभीर असल्यास त्याला हत्तीच्या पायी दिले जात असे. पेशव्यांच्या काळीही अशा प्रकारच्या कठोर शिक्षांची अंमलबजावणी होत असे. तात्पर्य स्त्रीवर केला जाणारा अत्याचार हा अक्षम्य आणि दंडनीय होता. आजही अनेक आखाती देशांत स्त्रीवर केल्या जाणाऱ्या अत्याचाराला अतिशय कठोर शिक्षा सुनावली जाते. आपल्याकडे अत्याचाराचे गांभीर्य लक्षात न घेता शिक्षा सुनावल्या जातात, ज्या त्या अपराधाच्या तुलनेत अतिशय माफक स्वरूपाच्या असतात. अवघी काही वर्षे तुरुंगवास आणि मग सुटका! आरोप सिद्ध न झाल्यास विनासायास सुटका! आरोपी 'बडे बापका बेटा' असल्यास उलट अपराधाला बळी पडलेल्या तरुणीवरच चारित्र्यहिनतेचे शिंतोडे! 
शिक्षा अशी द्यायला हवी की ती शिक्षा बघून इतरांना जरब बसावयास हवी. शिक्षा अशी हवी की कुणी स्त्रीकडे वाकडी नजर करून बघण्याची हिम्मतच करणार नाही. मग तिच्या अंगाला हात लावण्याची गोष्ट तर दूरच राहिली! जोपर्यंत अशा कठोर शिक्षांची अंमलबजावणी या देशात होणार नाही तोपर्यंत येथील मुली आणि स्त्रिया कधीच सुरक्षित राहणार नाहीत. प्रत्येक पुरुषाने स्त्रीचा आणि तिच्या स्त्रीत्वाचा यथोचित आदर करायलाच हवा. वेडेवाकडे प्रश्न विचारून स्त्रीला अपमानित करणारे पोलिस, कोर्ट यांनीही योग्य मर्यादा पळून त्या स्त्रीबरोबर घडलेल्या घटनेची पडताळणी करायला हवी.  
शेवटी या पृथ्वीतलावरील प्रत्येक पुरुषाचे अस्तित्व स्त्रीमुळेच आहे हे लक्षात घेण्याची नितांत गरज आहे. 

Monday, 17 December 2012

महिलांवरील वाढते अत्याचार- एक शोचनीय बाब


आपला देश प्रगतीपथावर आहे असे अभिमानाने गर्जून सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांची गांधारी झाली आहे काय असे खडसावून विचारण्याची पाळी आज आली आहे. जाणूनबुजून डोळ्यांवर झापडे लावून रस्तोरस्ती, गल्लोगल्ली, प्रांतोप्रांती चाललेल्या महिलांच्या शारीरिक शोषणाविरुद्ध मूग गिळून गप्प बसलेल्या या सरकारला गदागदा हलवून जागे करण्याची वेळ येउन ठेपली आहे. 
रस्त्यावर, बसमध्ये, ट्रेनमध्ये, शाळेमध्ये, हॉटेलमध्ये कुठेही राजरोस बलात्कार होत आहेत. अगदी चिमुकल्या बाळांपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत कुणीही या विकृत नराधमांच्या वासनेची शिकार होत आहेत. रस्त्यावरील छेडछाडीला तर अंतच नाही. कुठे 'acid हल्ला तर कुठे 'चाकू हल्ला'! कुणी प्रेमाला नकार दिला म्हणून तर कुणी छेडछाडीला विरोध केला म्हणून स्त्रीत्वावर सरळसरळ , बिनदिक्कत घाला घातला जात आहे. रोड रोमिओ, श्रीमंत बापजाद्यांची पोरे, प्रेमभंगाने माथेफिरू झालेले असे कोणीही सर्रास, कसलाही विधिनिषेध न बाळगता स्त्रियांच्या पदराला हात घालायला धजावत आहेत. नागरिकांच्या रक्षणासाठी वचनबद्ध असलेल्या शासकीय यंत्रणेसाठी ही खचितच शरमेची बाब आहे.   
आज स्वत:च्या पायांवर भक्कमपणे उभे राहून कुटुंबाचा भार वाहणाऱ्या अनेक महिला आहेत. नवऱ्याच्या  खांद्याला खांदा लावून सक्षमपणे आर्थिक जबाबदारी पेलणाऱ्या अनेकजणी आहेत. शिक्षणासाठी आपला प्रांत सोडून दुसऱ्या  प्रांतात जाऊन शिकणाऱ्या अनेक आहेत. रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्या आहेत. रात्रपाळी करणाऱ्या आहेत. निवृत्त जीवन जगत एकाकी राहणाऱ्या आहेत. आपल्या निष्पाप, चिमुकल्या डोळ्यांनी हे विश्व समजून घेण्याचा प्रयास करणाऱ्या आहेत. या महिला वेगवेगळ्या वयातील, आर्थिक व सामाजिक स्तरातील आहेत. या समस्त महिलांच्या संरक्षणाची हमी कोणी द्यायची? वेळी-अवेळी कामावरून घरी परतणाऱ्या महिलांच्या रक्षणाची जबाबदारी शासनाची नाही का? दिवसढवळ्या रस्त्यावर पुरुषी अत्याचाराला बळी पडणाऱ्या महिलांना योग्य ते संरक्षण मिळणे गैरवाजवी आहे का? 
आज एकविसाव्या शतकातही स्त्री मग ती कोणत्याही वयातील असो, एक उपभोग्य वस्तू म्हणूनच तिच्याकडे पहिले जाते. ज्या छोट्या बाळाकडे बघून ममत्वाशिवाय इतर कोणत्याही भावना निर्माण होऊ शकत नाहीत , त्या बालिका सुद्धा या लैंगिक शोषणाचे बळी ठरतात. जी वृद्ध महिला माता , आजी या संबोधनासाठी योग्य असते तिच्यावरही या विकृतीचे शिंतोडे उडाल्यावाचून राहत नाहीत. अशा राज्यात सारे काही आलबेल आहे असे म्हणायचे? अगदी विकलांग मुलीलासुद्धा या वासनेचे लक्ष्य केले जाते. हे सारे मानवी अधोगतीचे द्योतक नाही काय? 
फक्त खेड्यापाड्यात नव्हे तर शहरी भागातही या घटना आता नित्याच्या झाल्या आहेत. सामुहिक बलात्कार जिथेतिथे बोकाळला आहे. जर सकाळी हातात पेपर धरायला घ्यावा तर डझनावारी याच बातम्या लक्ष वेधून घेत ढेपाळलेली शासकीय सुरक्षितता अधोरेखित करत असतात. अत्याचाराला बळी पडलेली महिला मग लोकांच्या सहानुभूतीचा, दयेचा, उपेक्षेचा विषय होते. जणू काही ताठ मानेने जगण्याचा तिचा अधिकार संपुष्टातच येतो. तिचा व्यक्तिश: यत्किंचितही सहभाग नसलेल्या दुष्कृत्याची ती अनपेक्षित बळी ठरते आणि समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन गढूळ होतो. घरी-दारी असे अपमानास्पद जिणे असह्य झाल्याने मृत्यूला कवटाळण्याशिवाय त्या पिडीत स्त्रीकडे अन्य पर्यायच उरत नाही. जी मुलगी अथवा स्त्री आजवर एखाद्या कुटुंबाचा गौरव किंवा आधार ठरलेली असते ती स्त्री किंवा मुलगी या घटनेनंतर शारीरिक तसेच मानसिक आघाताने पुरती खचून जाते. मनोमन उध्वस्त होते. तिच्यासाठी सगळीच आपली वाटणारी माणसे परकी होऊ लागतात. जगण्यापेक्षा मरण सुकर वाटू लागते. 
अनेक पुरुषांची मानसिकता बदलण्याची आज नितांत गरज आहे. मी पुरुष आहे म्हणजे मी शारीरिक दृष्ट्या श्रेष्ठ आहे. मी काहीही करू शकतो. हा अहंगंड समूळ नष्ट झाला पाहिजे. पुरुष-स्त्री समानतेचे नारे देणारयांनी खरोखरीच अशी समानता लोकांच्या आचरणात आहे का हे तपासून पहिले पाहिजे. कोणत्याही मुलीवर,स्त्रीवर अत्याचार करणाऱ्याला सज्जड शिक्षा समाजाकडून वेळच्या वेळी दिली गेली पाहिजे. स्त्रीचा आदर करण्याचे बाळकडू पुरुषाला घरातूनच मिळाले पाहिजे. या देशात प्रत्येक मुलीला, स्त्रीला मानाने, सुरक्षिततेने जगण्याचा हक्क आहे आणि तो हक्क नाकारणाऱ्या कोणत्याही माणसास जबरदस्त शिक्षा व्हायला हवी. 
नाहीतर 'सारे जहांसे अच्छा हिंदोस्ता हमारा' असे गर्वाने स्वातंत्र्यदिनी म्हणणाऱ्या करोडो भारतवासीयांवर शरमेने मान खाली घालण्याची पाळी येईल. 

Friday, 14 December 2012

ऑफिस आणि कुटुंब ........ एक कसरत




पूर्वीच्या काळी चाकरमानी संध्याकाळी सहाच्या सुमारास घरी परतायचे. संध्याकाळी सहानंतर बहुतांश ऑफिसेस ओस पडायची. दुपारी घरचा डबा आणि रात्री घरचे जेवण यामुळे तब्येत उत्तम रहायची. कामाचा अवाजवी ताण नव्हता. रेल्वेने येणे-जाणे आता इतके भीषण नव्हते. एकत्र कुटुंब असल्याने आपल्या मुलांना कोण बघेल याची क्षिती नसायची. सणासुदीला गावी जाण्यासाठी सुटी मिळायची. एकंदरीत घर आणि ऑफिस हे दोन्ही गड व्यवस्थित राखता यायचे. आता मात्र हे चित्र पूर्णत: बदलले आहे.  
सकाळी घर सोडायचे. तुडुंब भरलेल्या बसमधून अथवा ट्रेनमधून कसेबसे स्वत:ला गोळा करत ऑफिस गाठायचे. कामाचे ढीग हातावेगळे करत राहायचे. यायच्या वेळेची निश्चिती नाही. काम आणि काम. अवाजवी ताण. वेळ मिळालाच तर काहीतरी पोटात ढकलून भूक भागवायची. वरिष्ठांची बोलणी खायची. मनाविरुद्ध गॉसीप ऐकायच्या. प्रमोशनच्या जीवघेण्या लढाया लढायच्या. रात्री उशिरा घरी परतल्यानंतरही laptop उघडून ऑफिसचे काम करत बसायचे. कुटुंबातील सदस्यांशी प्रेमाच्या चार गोष्टी बोलायला वेळ नाही, त्यांची वास्तपुस्त करायला वेळ नाही. सुट्या आहेत पण घेता येत नाहीत अशी अवस्था! आजकाल जवळ जवळ प्रत्येक घराचे थोड्याबहुत फरकाने हेच चित्र आहे. 
बहुतेक ऑफिसेस वातानुकुलीत असतात. त्यामुळे सतत थंड हवा शरीरात झिरपत राहते. कोवळे ऊन अंगावर घ्यायला कुणाला सवड नसते. बहुतांश ऑफिसमध्ये व्हेंडिंग मशिन्स असतात, म्हणून अनेक जण नुसता सारखा चहा किंवा कॉफी ढोसत राहतात. घरून डबा आणणे काहींना कमी प्रतिष्ठेचे वाटते म्हणून मग जेवणाच्या वेळी शेजारील हॉटेलमधून पदार्थ ऑर्डर केले जातात. जंक फूड खाण्याकडे बहुतेकांचा कल असतो. पोळी-भाजी पेक्षा पिझ्झा खाणे प्रिफर केले जाते नव्हे प्रतिष्ठित समजले जाते. या उलट काहींना ऑर्डर करून खायलाही वेळ नसतो. ते चहा-कॉफी वर वेळ मारून नेतात. शरीराला योग्य ते अन्न वेळच्या वेळी न मिळाल्याने शरीर बंड करून उठतं. मग डोकेदुखी, acidity, बद्धकोष्ठ, मेदधिक्य अशा तक्रारी वाढू लागतात. झोपेचा कोटा पूर्ण न झाल्याने चेहऱ्यावर मरगळ येते, ग्लानी आल्यासारखे वाटते. सतत थंड वातावरणात वावरल्याने सर्दी-खोकला होत राहतो. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे रक्तदाबाची पातळी खाली-वर होऊ लागते, stress Diabetes उद्भवू शकतो.  
पैसे भरपूर मिळतात म्हणून खूप जण ओव्हरटाईम करतात. स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून असा भरपूर कमावलेला पैसा मग डॉक्टरांच्या औषधांवर रिता करावा लागतो. अव्यवस्थित खाणे-पिणे, अपुरी झोप, अनियमित शेड्युल, व्यायामाचा अभाव आणि कामाचे प्रेशर यामुळे शारीरिक आणि मानसिक तक्रारी वाढू लागतात. स्वभाव चिडचिडा होऊ लागतो. नवरा-बायको दोघे याच पद्धतीने काम करत असल्यास मुला-बाळांकडे पूर्ण दुर्लक्ष होते. त्यांना वेळ अजिबात देता येत नाही. मग याची भरपाई म्हणून एखादी मोठी सुट्टी घेऊन परदेशवारी केली जाते. मुले तात्पुरती खुश होतात. परंतु घरी आल्यानंतर पुन्हा तेच कंटाळवाणे रुटीन सुरु होते. मुलांना महागडे कपडे, खेळ, खाणे देऊन त्यांना आनंदित ठेवण्याचा प्रयत्न आई-वडील करत असतात. अधिक पैसे = अधिक सुख हे समीकरण त्याच्या डोक्यात फिट्ट बसलेले असते. 
मुले शिकतात, मोठी होतात. स्वत:च्या पायावर उभी राहतात आणि बघता बघता  परदेशात भुरकन उडून जातात. कारण तिथे त्यांना बक्कळ पैसा मिळणार असतो. पैसा हेच सर्वस्व हे त्यांच्या पालकांचेच ब्रीदवाक्य असते. उतरत्या वयाचे पालक वरकरणी परदेशी गेलेल्या मुलाच्या कौतुकात रमल्याचे दाखवत असले तरी आपली मुले म्हातारपणी आपल्या जवळ राहणार नाहीत याची खंत त्यांना मनोमन सतावत असते. जेव्हा मुलांना पालकांची खऱ्या अर्थाने गरज असते तेव्हा पालक उपलब्ध होऊ शकत नाहीत आणि जेव्हा वयस्कर मात्या-पित्यांना खऱ्या अर्थाने आधाराची गरज भासते तेव्हा मुले उपलब्ध होऊ शकत नाहीत. अर्थात याला अपवादही काही कुटुंबे असतातच! परंतु आई-वडील आणि मुले यांना एकमेकांचा पुरेसा सहवास न लाभणे, त्यांना एकमेकांशी संवाद साधता न येणे, आनंदात आणि दु:खात एकमेकांचा आधार न मिळणे ही स्थिती खचितच गौरवास्पद नाही.  
माणसाच्या गरजांना अंत नाही. माणसाच्या आकांक्षांना अंत नाही. माणसाच्या अभिलाषांना अंत नाही. पण निव्वळ जास्तीत जास्त पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी आपण कौटुंबिक सौख्याचा, जिव्हाळ्याचा,आपल्या स्वास्थ्याचा आणि कोमल नात्यांचा अंत तर करत नाही ना याचे भान प्रत्येकाने ठेवणे नितांत गरजेचे आहे. 
     

Sunday, 25 November 2012

वेडेपणा .........



आयुष्यात एकदातरी वेडेपणा करावा 
आभाळभर चांदण्यांना हात लावून यावा 
नायगारयाच्या धबधब्यात हात धुवून घ्यावा 
आयफेलवरून एक पाय सहज खाली टाकावा 
गरुडाबरोबर उडण्याचा करार करावा 
सापाला पाठीमागून हळूच विळखा घालावा 
हृतिक रोशन समवेत पदन्यास करवा 
माधुरीचा हात एकदा अलवार हातात घ्यावा 
हिमालय हाताच्या मुठीत धरावा 
माध्यान्हीला 'मालकंस' गाऊन बघावा 
ओल्या मातीचा गंध कुपीत जपावा 
हरणांचा पाठलाग लीलया करावा 
ढगांचा कापूस दोन्ही हातांनी पिंजावा 
मावळता सूर्यरंग ओंजळीत घ्यावा 
सचिन, सौरव संगे 'ब्रेकफास्ट' करावा 
स्टेफी बरोबर गेमचा 'advantage' घ्यावा 
दूधसागर बशीने पिऊन टाकावा 
झाडांचा हिरवा वर्ख पांघरून घ्यावा 
वेडेपणाचा कळस असाच गाठावा 
अभ्यंतरी असू द्यावा अमृताचा ठेवा ...........

Friday, 23 November 2012

फोटोशॉप २- एक कल्पक खेळ .............

मागील फोटोशॉपवरील ब्लॉगमध्ये आपण 'Animation' द्वारा अचल चित्रांना विविध प्रकारे गतिमान स्वरूप कसे देता येऊ शकते या विषयीचा अभ्यास केला होता. या प्रकरणातही त्याच प्रकारचा अभ्यास आपण करणार आहोत. माझ्या प्रस्तुत विषयाच्या पहिल्या ब्लॉगला चांगला प्रतिसाद मिळाल्याने मी याच विषयावरील दुसरा ब्लॉग लिहित आहे. 

वरील दृश्यात कारंज्यातील पाण्याला 'Animation' द्वारा गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे हे पाणी वाहते असल्याचा आभास मी निर्माण केला आहे.  ह्यात पाण्याचा फवारा 'सिलेक्ट' करून त्याचे रंगही बदलता येणे शक्य आहे. 

वरील चित्रात अंड्यापासून ते पूर्ण वाढ झालेल्या फुलपाखराच्या अवस्था दिसत आहेत. शालेय अभ्यासक्रमात अशा चलत प्रतिमांचा वापर करून मुलांना शास्त्रीय संकल्पना अधिक सोप्या रीतीने समजावून दिल्या जाऊ शकतात. 


वरील चित्रात जलचर प्राणी अर्थात मासे आणि कासव दृश्यमान झाले आहेत. पैकी मासे गतिमान आहेत. ते एकमेकांशी संवाद साधत आहेत. ह्यात कासवाला 'सिलेक्ट' करून त्यालाही गतिमान करता येणे शक्य आहे. जेणेकरून पाण्याखालील जीवसृष्टीतील हालचालीचा आभास निर्माण करता येऊ शकेल. 

वरील चित्रात अंगठीतील खड्याचे रंग बदलत आहेत. जेवढे रंग हवे आहेत तेवढे 'Layers' निर्माण करून प्रत्येक 'Layer' साठी आपल्या आवडीचा रंग वापरावा. बाकीचे काहीही बदलण्याची आवश्यकता नाही. 

वरील चित्रात 'Magnifying Glass' वेगवेगळ्या राज्यांवर सरकते आहे व ती ती राज्ये (States) 'Highlight' करीत आहे. या चित्राद्वारे मुलांनाही या देशातील आणि अवघ्या जगातील वेगवेगळ्या देश-प्रदेशांची माहिती घेणे खचितच आवडेल. भौगोलिक अभ्यासक्रमात अशा प्रकारच्या चलत स्लाईड्स द्वारा आकलनास उत्तम मदत होऊ शकेल असे मला वाटते. 


Wednesday, 21 November 2012

क्षणभंगुर परि ऐसे जीवन ..........

उणापुरा तीस वर्षाचा तरुण काही एक दृश्य स्वरूपाचे कारण नसताना अचानक काही सेकंदात होत्याचा नव्हता होतो आणि समस्त जीवित जातीच्या क्षणभंगुरतेवर शिक्कामोर्तब होते.आदल्या दिवशी नातेवाईकांच्या, मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात मनसोक्त गप्पा मारणारा तरुण एकदम एकाएकी 'Pulmonary Cardiac Arrest' चा बळी ठरतो यावर मन विश्वास ठेवायला तयार होत नाही. तेही ऐन दिवाळीच्या दिवसांत आणि पाडव्याच्या दिवशी. लग्नाला जेमतेम दोन वर्षे पुरी होतात न होतात तोच बायकोला पाडव्याच्या दिवशी एवढी भीषण ओवाळणी मिळावी हा केवढा मोठा दैवदुर्विलास! सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसलेला आपला मुलगा, घरी-दारी आनंदाची उधळण करणारा आपला मुलगा, नियमित व्यायाम करणारा आपला मुलगा असा अचानक कसा गेला हे न पेलणारे आणि न सुटणारे कोडे घेऊनच आता वडील उर्वरित आयुष्य जगणार. तर नऊ मास पोटात वाढवून, संगोपन करून, सगळे लाड-कोड पुरवलेला  आपला मुलगा या जगातूनच निघून गेला या जाणीवेने माउली आजन्म अश्रू ढाळत राहणार. तिची व्यथा तर इतरांच्या जाणिवांच्या कक्षेत न बसणारी. ती अंतर्यामी उध्वस्त झालेली. ज्याला आपला मानला , नातिचरामी म्हणत ज्याच्या सोबतीने अग्नीभोवती सात फेरे घेतले, ज्याच्या साथीने आयुष्य सुंदर होण्याची स्वप्ने बघितली आणि ज्याचा हात प्रगाढ विश्वासाने हातात घेतला तो आपला हात सोडून न परतीच्या वाटेवर निघून गेला हा नुसता विचारही तिला भयानक ग्रासणारा. त्याच्या फक्त आठवणींवर आपले यापुढील आयुष्य कंठायचे ही तिच्या मनाला पदोपदी विदीर्ण करणारी जाणीव आणि आता सुख-दु:खाच्या वाटेवर यापुढे आपल्या सोबत तो नाही ही मनातील अंधार अधिक गहिरा करणारी जाणीव घेऊन तिने जगायचे नव्हे स्वत:ला जगवत ठेवायचे. नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्र-मैत्रिणी चार दिवसांपुरते. काही दिवसांनी आपापल्या व्यापात व्यस्त होणारे.  
 कसलेही व्यसन नसलेला माणूस एकाएकी दगावतो आणि वर्षानुवर्षे व्यसनांच्या आधीन असलेली माणसे क्वालिटी नसलेले जीवन जगत राहतात. धुम्रपान केल्याने कर्करोग होतो अशी भीती असते पण म्हणून प्रत्येक धुम्रपान करणारा कर्करोगाला बळी पडत नाही किंबहुना अनेक वर्षे जगतोही! व्यसने न केल्याबद्दलच्या शिक्षा मात्र अनेक लोक भोगत राहतात. निर्व्यसनी, मिताहारी, नियमितपणे जगणारा कुणी कधीही होत्याचा नव्हता होऊ शकतो. निर्व्यसनी आयुष्य अधिक नियमित आयुष्य म्हणजे प्रदीर्घ आयुष्य असे आयुष्याचे समीकरण खात्रीपूर्वक मांडता येत नाही. अपघात होऊ नये म्हणून आपण गाडी कितीही सावधपणे आणि नियमांचे उल्लंघन न करता चालवली तरी समोरून येणारे वाहन तुम्हाला तेवढेच सुरक्षित आयुष्य बहाल करेलच याची हमी देता येणे सर्वथैव अशक्य आहे. शंभर फुट दरीत कोसळलेल्या बसमधील एखादे लहानगे मूल शरीरावर कुठेही साधा ओरखडाही न येता जिवंत राहते आणि घराच्या घरी पेपर वाचताना माणसाचा अंत होतो. कोणत्याही शास्त्रीय मिमांसेच्या पलीकडील या गोष्टी आहेत. गतकाळात माणसाला हृदयविकाराचा झटका आला होता का तसेच आता आला आहे का हे 'ECG' या साधना मार्फत समजू शकते परंतु  ECG काढून बाहेर येताच माणूस दगावतो ही घटना सगळ्या वैद्यकीय शास्त्राची पाळेमुळे हादरवते. 
हे सगळे पहिले, ऐकले की जीवनाच्या क्षणभंगुरतेची प्रचीती येते. आपल्या योजना आणि 'त्याच्या' योजना नेहमीच 'coincide' होतात असे नाही. मनात रचलेले बेत आणि 'त्याचे' बेत यांची गोड युती होतेच असे नाही. आपल्या ललाटरेखेचे सामर्थ्य तोकडे ठरते. आपली संकुचित जाणीव त्या सर्वेश्वराच्या व्याप्तीला ओळखू शकत नाही. भविष्यात आपल्यापुढे कोणते फासे तो 'सर्वात्मक' टाकणार आहे आणि त्यात आपली पट तरुन जाण्याची शाश्वती किती हे गणित अनाकलनीय आहे. आणि म्हणूनच पैसा-अडका, दागिने, स्थावर-जंगम, मानमरातब, प्रतिष्ठा, खानदान या गोष्टी जरी मनुष्याला प्राप्य असल्या तरी ती जीवन समाप्त करणारी निर्णायक 'उल्का' कधी कशी आणि कोणावर कोसळेल याचा थांग लावणे ही समस्त मानवजातीच्या आवाक्याबाहेरील गोष्ट आहे हे आस्तिक-नास्तिक, प्रगत-अप्रगत, गरीब-श्रीमंत, उच्चभ्रू-सामान्य अशा प्रत्येकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.     

Sunday, 11 November 2012

आली दिवाळी दिवाळी ............

घराघरांतून साफसफाई सुरु झाली, बेसनाचे खमंग वास दरवळू लागले की दिवाळी जवळ आल्याची चाहूल लागते. वेगवेगळ्या तऱ्हेचे कंदील, पणत्या यांनी रस्त्यावरील दुकाने सजू लागतात. वर्षभरात या देशात कितीही अप्रिय घटना घडल्या असू देत, दिवाळीची चाहूल लागताच घरी-दारी उत्साहाला उधाण येते. माणूस गरीब असो वा श्रीमंत, दिवाळीची खरेदी करण्यासाठी तो बाहेर पडतोच पडतो. 
पूर्वी दिवाळी आली की घराघरातून ठिपक्याच्या कागदाची, रांगोळीची, गेरूची देवाणघेवाण सुरु व्हायची. घरातील पोरसोरांपासून ते वयस्कर मंडळी कोणत्या ना कोणत्या कामात गुंतलेली असायची. चकलीचे सोरे, चकत्या, शंकरपाळ्याचे कातणे घरोघरी फिरवले जायचे. आज कोणाकडे कोणता फराळ केला जाणार आहे याची माहिती इतरांना असायची. रंगीबेरंगी आकाशकंदील, वेगवेगळ्या आकाराच्या पणत्या तसेच ग्लासातील दिवे यांनी चाळी, बिल्डिंगा  सुशोभित व्हायच्या. पाहुणे  येणार म्हणून खास पदार्थ केले जायचे, भेटवस्तू  तयार ठेवल्या जायच्या. नरक चतुर्दशीला घरोघरी दुष्ट शक्तींचा नाश करणारी प्रतीकात्मक चिबुडे फोडली जायची. त्यानंतर लक्ष्मी पूजन, पाडवा, भाऊबीज सारे काही यथासांग पार पडायचे.       
आजचे दिवाळीचे स्वरूप बरेच बदलले आहे. आज दिवाळीला बरीच घरे अंधारात असतात. कुटुंबेच्या कुटुंबे सुट्टीचा आनंद उपभोगण्यासाठी बाहेरगावी जातात. घरोघरी फराळ होतोच असे नाही. विकतचा फराळ आणला जातो. ठिपक्यांच्या रांगोळी ऐवजी साच्याची रांगोळी काढण्याकडे बायकांचा कल असतो. कंदिलाविना,  पणत्यांशिवाय  घरे भकास वाटतात. घरातील वर्दळ, पै -पाहुणे, बायकांची लगबग, पोरांचे फटाके लावणे यापासून आपण लांब जातो आहे असे वाटू लागते. ते दिवाळीच्या पहिल्या दिवशी अंगाला तेल-उटणे लावून आंघोळ करणे, नवे कोरे कपडे घालणे, देव-दर्शन घेणे, वडीलधारयांच्या  पाया पडणे, फटाके आणि फराळ यांचा आस्वाद घेणे कालबाह्य होत चालले आहे की काय असे वाटू लागते.  
आता दिवाळी आली की भव्य मॉल सजू लागतात. लोकही खरेदी करण्यासाठी मॉल अधिक प्रिफर करतात. मॉलमधील ऑफरनुसार स्वस्तातील गोष्टी मिळवण्यासाठी लोकांची एकच झुंबडगर्दी उडते. आयता फराळ, आयत्या भेटवस्तू, आकर्षक कपडे  यांनी मॉल फुलतात. ओवाळणीची ताटेसुद्धा रेडीमेड मिळतात. काही वेळेस आपापल्या सोयीनुसार पुढे-मागे  भाऊबीज साजरी केली जाते.  आजकाल बहिणींकडून भावांनाही महागड्या भेटी दिल्या जातात. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना बड्या हॉटेलमध्ये दिवाळी निमित्ताने खास मेजवान्या दिल्या जातात. 
कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांवर गदा आली ही चांगलीच गोष्ट आहे  पूर्वी फटाके भरपूर वाजायचे तेव्हा प्रदूषणाची कोणी पर्वा केली नाही पण आजकाल प्रदूषणाच्या नावाखाली काही घरात मुलांना फटाके वाजवू देत नाहीत. शोभेचे फटाकेही उडवू देत नाहीत. काही मुलांना फराळ घरी करता येतो हेही ठाऊक नसते. आपली संस्कृती टिकवणे आपल्याच हातात असते. ज्या गोष्टी वाईट किंवा हानिकारक आहेत त्या जरूर त्याज्य ठरवाव्यात परंतु चांगल्या गोष्टींचे जतनही जरूर करावे. माणसाला माणसाशी बांधून ठेवणाऱ्या गोष्टी आज दुर्मिळ होत चालल्या आहेत. दिवाळीच्या निमित्ताने जर माणसे एकत्र येत असतील, आनंदाची,सौख्याची देवाणघेवाण करत असतील तर तो धागा तरी घट्ट पकडून तरी माणसाला एकमेकांच्या साथीने पुढची वाटचाल नक्कीच सुकर करता येईल अन्यथा रोज झपाट्याने बदलत जाणाऱ्या जगात कोणत्याही आनंदाचे निमित्त माणसाला एकमेकाच्या जवळ आणू शकणार नाही अगदी दिवाळीही!