Saturday 31 March 2012

मुलाखत - एका सुप्रसिद्ध चोराची ( आंतरराष्ट्रीय चोर संमेलनाच्या निमित्ताने)

या मुलाखतीच्या खास कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत.
नमस्कार.
आपले नाव?
ढापू चोरघडे.
केव्हापासून आपण हा व्यवसाय करताय?
अगदी लहानपणापासून. आमच्या रक्तातच आहे.
आपल्या घरीही......
माझे आजोबा,माझे वडील, माझे काका, माझा मोठा भाऊ, झालंच तर...
बाप रे! केवढा वारसा मिळालाय आपल्याला!
आमच्या घराच्या बायकाही काही कमी कर्तृत्ववान नाहीत. 
आपल्याला हाच व्यवसाय पत्करावा असे का वाटले?
शाळेत बाई विचारायच्या, तुम्हाला मोठे झाल्यावर काय व्हायचे आहे? कोणाला डॉक्टर, कोणाला इंजिनियर, कोणाला पायलट तर कोणाला चार्टर्ड अकाउंटट व्हायचे असायचे. मी मात्र त्याचवेळी ठरवले की काहीतरी जगावेगळे करून दाखवायचे. दुनियेला चकित करून सोडायचे. व्यवसायात कसे थ्रील हवे. कामात सफाई हवी. ह्या कानाचे त्या कानाला कळता कामा नये. त्या दृष्टीने हाच  व्यवसाय योग्य वाटला.
भक्कम वारसा तर आपल्याला लाभलेला आहेच. पण या व्यवसायातील आपले प्रेरणास्थान कोण आहे?
बोका.
तो कसा काय?
मी लहान असताना रात्री आमच्या घरी तो गुपचूप येऊन पातेल्यातील दुध सायीसकट फस्त करायचा. कसला आवाज नाही. हुं की चू नाही. सकाळी उठल्यावर आई पातेले उघडते तो काय, पातेले रिक्कामे! तिने पातेले बदलून बघितले तरी तो बोका तिच्यापेक्षा सवाई निघाला. आम्हाला सकाळी ओट्यावर उमटलेली त्याची छोटी पावले फक्त दिसायची. त्याच्या चोरीचा रागसुद्धा यायचा नाही. या व्यवसायातील प्रेरणा मला त्याच्यापासून मिळाली.
आपण आत्तापर्यंत एकूण किती चोऱ्या केल्यात?
थांबा हं. डायरी बघून सांगतो. एकूण १९९९ चोऱ्या. अजून एक चोरी केली की मी माझ्या वडिलांचा रेकॉर्ड ब्रेक करेन.
तुम्ही आजवर एकदाही पकडले गेला नाहीत हे खरं आहे का?
शंभर टक्के. अहो मी पकडला गेलो असतो तर माझ्या घराण्याचा बदलौकिक झाला असता. माझ्या कुळाला बट्टा न  लागू देण्याचं वचन मी वडिलांना दिलं आहे आणि मी अभिमानाने आज सांगू शकतो की मी ते वचन प्राणपणाने पाळले आहे.
तुम्ही इतक्या यशस्वीपणे चोऱ्या कशा काय करू शकता?
अहो ताई, त्यासाठी रीतसर अभ्यास करावा लागतो. ते काही येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे.
नक्की कसला अभ्यास करता तुम्ही?
असं बघा, प्रथम चोरी नक्की कुठे करायची आहे त्या एरियाचा अभ्यास करावा लागतो. नंतर कोणत्या सोसायटीत, कोणाच्या घरी करावयाची आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मिळवावी लागते. म्हणजे बघा, गुरखे कधी झोपतात, कधी आपली जागा सोडून जातात, ज्यांच्याकडे चोरी करावयाची आहे त्यांच्या घरी कोण कोण असते, तिथे कोण मोलकरीण काम करते, घरात एकूण ऐवज किती असेल, घराला कोणत्या वेळेस कुलूप असते, आजूबाजूचा शेजार, त्या मजल्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांच्या वेळा. आता तुम्हीच विचार करा की किती जोखमीचे काम आम्ही करतो ते. 
बाप रे! मला तर नुसतं ऐकूनच घाम फुटला. यापेक्षा साधी नऊ ते पाच नोकरी करणं परवडलं. शिवाय या कामासाठी तुम्हाला साहित्यही भरपूर लागत असेल नं?
ऑफकोर्स. कुलूप तोडण्याचे हत्यार, डबल डोअर असल्यास आणखी एक-दोन प्रभावी हत्यारे वापरावी लागतात. आत शिरल्यानंतर मुख्य कपाटाच्या किल्ल्या, त्या नसतील तर कपाटाला खिंडार पाडण्यासाठी स्पेशल हत्यार, मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी खास पिशवी, रोकड वाहून नेण्यासाठी खास कप्पेवाली पिशवी आणि हे सर्व करताना सतत आपली नजर सावधपणे फिरवावी लागते.
तुम्हाला यासाठी काही खास काळजी घ्यावी लागते का?
अर्थातच. मी हातमोजे वापरतो जेणेकरून माझ्या हाताचे ठसे कुठेही उमटणार नाहीत. मला उगाचच घरात उसकाउसकी केलेली आवडत नाही. काम कसे शिस्तशीर पाहिजे. ह्याला हात लागला हे फुटलं, ते विस्कटलं हे मला बिलकुल खपत नाही. घरातील कोणत्याही इतर वस्तूला माझा हात लागणार नाही याची काळजी मी घेतो. नेमके जे आहे तेच आणि तेवढेच मी उचलतो. चोर येऊन गेला आहे ते सहजासहजी कळता कामा नये  हा माझा कटाक्ष असतो.
व्वा व्वा, फारच छान! तुम्ही अगदी तत्वाचे पक्के आहात.
माझं असं म्हणणं आहे की त्या घरातील दागिने आणि रोकड चोरून एवीतेवी आपण त्यांना मनस्ताप दिलाच आहे तर मग निदान त्यांच्या घरातील बाकीच्या वस्तू तरी सहीसलामत राहिल्या पाहिजेत. बाहेरून आल्यानंतर यजमानांना घर अस्ताव्यस्त दिसता कामा नये. पसारा करायचा नाही. अहो ते तरी एकदम किती व्याप निस्तरतील?    
बरोबर आहे तुमचं. म्हणजे तुम्ही यजमानांच्या मानसिकतेचाही चांगलाच विचार करता. 
का नाही करायचा? अहो एवढं काही त्यांच्याकडून मिळणार असतं मग इतकं तरी दाक्षिण्य नको का दाखवायला? 
या चोरीचे वाटे तुम्ही कसे काय करता?
सरळ हिशेब असतो. या कामात ज्याने ज्याने म्हणून हातभार लावलेला असतो त्याचे ठराविक परसेंटेज असते. मदत करायचे इतके, प्रत्यक्ष चोरी करायचे इतके, असीस्टंट म्हणून काम करायचे इतके हे आधीच ठरलेले असते. त्यामुळे नंतर पैशांवरून आमच्यात कोणताही लोच्या होत नाही.   
हा व्यवसाय बदलावासा कधी वाटतो का?
का वाटावा?
या व्यवसायामुळे आपली नितीमत्ता ढासळते किंवा चारचौघांत आपल्याला उजळ माथ्याने वावरता येत नाही असे वाटते का?
नाही बुवा. मंत्रीसुद्धा उजळ माथ्याने वावरतातच की! त्यांची करोडोंची बिंगे फुटली तरी त्यांना त्यांची नितीमत्ता  ढासळल्यासारखी कुठे वाटते?
अहो ते राजकारण करतात. चोरी थोडेच करतात?
कसं असतं ताई, जो सापडतो तो चोर आणि जो सापडला जात नाही तो साव. अहो जगाचा न्यायच आहे तसा.  
तुम्हाला राजकारणात कितपत रस आहे?
गाईला जेवढा कुरणात चरण्यापुरता रस असतो तेवढाच. 
आपल्या कार्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव होणार आहे. कसे वाटते आहे?
उत्तम. 
युवा पिढीला आपले काय सांगणे आहे?
व्यवसाय कोणताही निवडा पण त्यात स्वत:ला झोकून द्या. हा व्यवसाय निवडलात तर कुलूप-किल्ली या गोष्टींवर कमांड आली पाहिजे. त्या त्या विभागाचा, स्थानिक माणसांचा अभ्यास पक्का व्हायला पाहिजे. तुमची देहबोली आत्मविश्वासपूर्ण हवी. कामात सफाई हवी. नजर तीक्ष्ण हवी. समोरून येणाऱ्या पोलिसाच्या नजरेला नजर भिडवता यायला हवी. तुरुंगाशी सलगी नको. या विषयात एकदा का तुम्ही पी.एच.डी. केलीत की मग कोणीही तुमचा हात धरू शकणार नाही.
आपण आज इथे आलात, आपल्या व्यवसायासंबंधी भरभरून बोललात आणि तरुणांना मार्गदर्शन केलंत त्याबद्दल आपले मन:पूर्वक धन्यवाद!   
आपण मला आज इथे सन्मानपूर्वक पाचारण करून चार शब्द बोलायची सुसंधी दिलीत याबद्दल मी आपल्या वाहिनीचा आभारी आहे. जय हिंद! जय महाराष्ट्र!
 
    
     

 
     


     

Thursday 29 March 2012

मांसाहार आणि प्रतिष्ठा

तसं बघायला गेलं तर माणूस हा एक मिश्राहारी प्राणीच आहे पण ज्यांच्या खाण्यात शाकाहारापेक्षा मांसाहाराचे प्रमाण जास्त असते अशी माणसे स्वत:ला उगाचच प्रतिष्ठित समजत असतात. त्यांचं 'नॉन-व्हेज' प्रेम बऱ्याच ठिकाणी उतू जात असतं. आता व्हेज म्हणजे वरण-भात-बटाट्याच्या भाजीला परब्रम्ह समजणारे आणि नॉन-व्हेज म्हणजे अंड्यापासून  ते मगरीची भजी खाणारे सगळे!  
माझ्या लहानपणाची एक गोष्ट मला आठवतेय. त्या वेळी आम्ही मुंबईत 'अमीन मंझील' या सिटीलाईट भागातील चाळीत राहत होतो. दुसऱ्या मजल्यावरील आमचं कुटुंब वगळता सगळे मांसाहारी. सबंध चाळीत आम्ही धरून फक्त दोन ब्राह्मण कुटुंबे. एकदा दसऱ्याचे दिवशी आमच्या घरी माझ्या आजी-आजोबांना सोने द्यायला चाळीतील काही व्रात्य मंडळी आली होती. जाता जाता आमच्या घराच्या व्हरांड्यात अंडे फोडून टाकण्याचे सत्कर्म ती करून गेली. त्यानंतर त्या बदमाशांना माझ्या आजीकरवी सज्जड शिक्षाही मिळाली. मुद्दा असा की ब्राह्मणांच्या घरात असे अंडे टाकणे यात त्यांना काही थ्रीलिंग वाटले असणार. 
मांसाहारी लोकांच्या घरात बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे सर्वसामान्यत: मांसाहारासाठी राखून ठेवलेले वार असतात. त्यामुळे इतर वारी जणू आपल्यावर आता काय संकट गुदरलय अशा अविर्भावात ही माणसे शाकाहार खात असतात. त्यात पण मग मांसाहाराचा 'फिल' यायला हवा म्हणून कुठे आले-लसूण लावून तळण कर, कुठे कांदा-खोबरे घालून वाटून कालवण कर असा शाकाहार 'modify' केला जातो. वरण-भात-भाजी खाणे म्हणजे जणू यांना काळ्या पाण्याची शिक्षा वाटते. मुगाच्या डाळीची वाफाळलेली खिचडी केली तर ह्यांना आपल्याविरुद्ध कुणी कट केल्यासारखा वाटतो. कोबी-पडवळ-कारली-तोंडली-दुधी खाण्यापेक्षा विहीर जवळ करावी असे ह्यांना वाटू लागते. ताकाची कढी, टोमाटोचे सार, तूरडाळीची आमटी यांतून  क्रेझ निर्माण होत नाही.  वांगी, भोपळा, मुळा यांच्या भरितापासून काडीमोड घ्यावासा वाटू लागतो.  भेंडी-गवारी-शिराळी या भाज्या पूर्वजन्मीच्या वैरिणी वाटू लागतात. थोडक्यात साधे, सात्विक अन्न यांना गोड लागत नाही. 
हॉटेलात जायचे तर फक्त 'नॉन-व्हेजच' खायचे असा ह्यांचा मांसाहारी बाणा असतो. म्हणजे ह्यांच्या खास भाषेत 'घासफूस' घरी खायचे आणि हॉटेलमध्ये मात्र  तंगडी-बिर्याणी आणि फिश फ्राय याला पर्याय नाही. आपण आलू मटर, पालक पनीर, व्हेज मख्खनवाला, दाल फ्राय, व्हेज पुलाव ही नावे मेनूकार्डवर नुसती बघितली तरी  हे आपल्याला 'डाऊनमार्केट' आहोत अशा पद्धतीने बघणार! काय तुम्ही, एवढे हॉटेलात येऊन खाऊन खाऊन काय खाणार तर पालक पनीर आणि दाल फ्राय. मग घरीच बसायचं की! अरे मस्त चिकन-मटण हाणा की! म्हणजे शाकाहार खाऊन आपण तृप्तीने ढेकर देणार आणि इथे ह्यांच्या पोटात दुखणार. फिश-चिकन-मटण म्हणजेच फक्त स्वर्गसुख बाकी  इतर कोणत्याच पदार्थात दम नाही अशी ह्यांचीच ह्यांनी गोड समजूत करून घेतलेली असते. 
मांसाहार आणि प्रतिष्ठा हातात हात घालून चालतात. शाकाहाराला प्रतिष्ठा नाही. नामांकित हॉटेलात जाऊन आपण व्हेज जेवण जेवलो तर आपल्या प्रतिष्ठेला बाधा येईल असे यांना वाटत असावे. यांच्या मते बोंबील फ्रायला जो दर्जा आहे तो कांदाभज्यांना नाही. तंदुरी चिकनला जे ग्लामर आहे ते पनीर टिक्क्याला नाही. मुर्ग मसल्लम म्हटल्याने जे सेन्सेशन निर्माण होते ते व्हेज कुर्म्याने होऊ शकत नाही. In short, शाकाहार घरी नाईलाजास्तव जोपासावा आणि समारंभात, पार्ट्यांत, हॉटेलांत आणि चारचौघांत मांसाहार हाच धर्म पाळावा असे यांचे म्हणणे असते. 
पूर्णत: शाकाहारी असलेले त्याच आवडीने इडली-सांबार खाऊ शकतात ज्या आवडीने इतर लोक चिकन-मटण खात असतात. आपल्या बरोबरीचे नॉन-व्हेज खात आहेत म्हणजे सत्कारास पात्र आहेत असे त्यांना कधीच वाटत नसते. आपले साधेसुधे खाणे अभक्षभक्षणाच्या प्रतिष्ठेच्या आड येते आहे असे यांना मुळीसुद्धा वाटत नाही. व्हेज खाऊन आपला लौकिक डगमगतोय आणि नॉन-व्हेज खाऊन त्यांची मान उंच होतेय अशी काल्पनिक चित्रे रंगवण्यात शाकाहारींना स्वारस्य वाटायचे काही कारण नाही. ज्याला जे पचते, जे रुचते ते त्याने खावे, आनंदाने खावे आणि तृप्त व्हावे एवढी सुज्ञता प्रत्येकाने मनी बाळगली तरी त्याच्या खाण्याची आनंदयात्रा  होईल. 
( विशेष टीप : मी मूळची ब्राम्हण परंतु काणकोणकरांशी लग्न झाल्यावर मात्र मी नॉन-व्हेज नुसतं खायला शिकले नाही तर करायलाही शिकले. माझ्या सासूबाई गोव्याकडच्या असल्याने तेथील खास पदार्थ उत्तम रांधायच्या. त्याच्या हाताखाली मी सर्व शिकले. पण माझ्या यजमानांना मात्र मांसाहाराची खास आवड नव्हती. त्यांना ब्राह्मणी पदार्थ जास्त आवडायचे. मलाही माफक नॉन-व्हेज आवडते पण मी शाकाहाराचीही तितकीच भोक्ती आहे. खाण्यात डावे-उजवे करायला मला व्यक्तिश: आवडत नाही. पण आजवरच्या आयुष्यात यासंदर्भात जे काही मजेशीर अनुभवायला मिळाले त्यावरील माझे विचार मी वरील ब्लॉगमध्ये  मांडले आहेत. जे आवडत ते खावं आणि आनंदाने जगावं हेच खरं. पण स्वत: मांसाहार करून इतर शाकाहारींना जे क:पदार्थ लेखतात किंवा शाकाहारी खाण्याला जे नाके मुरडतात त्यांना योग्य तो जाणीव करून द्यावी यासाठी हा खटाटोप आहे. )   

Wednesday 28 March 2012

कटकटींचा 'डेली सोप'

आपल्या रोजच्या त्रासात आणि त्राग्यात भर घालणाऱ्या गोष्टी बहुधा घडतच असतात. आपला दिवस चांगल्या पद्धतीने सुरु होऊ नये याकरता अनेक घटक प्रयत्नशील असतात. सकाळी उठून घरातील कामे हातावेगळी करण्यास सुरवात  करावी एवढ्यात बेल वाजते. 'आज पानी कम है. भरके रखो. कभी भी जा सकता है.' या वॉचमनच्या प्रेमळ सूचनेमुळे आपण मनोमन वैतागतो. दिवसाची नांदी काही चांगली झालेली नसते त्यामुळे पुढील दिवसभरात आणखी काय काय सोसावं लागणार आहे ह्याचं काल्पनिक चित्र आपण रंगवू लागतो. आता स्वयंपाकाऐवजी पाणी भरण्यावर लक्ष केंद्रित करावं लागतं.  
आपल्याला घरातील कामे उरकून बाहेर जायचे असते. आपण थोड्या घाईनेच वॉशिंग मशीन लावतो. पाणी, साबण आणि कपडे अशी जय्यत तयारी करून आपण दुसरे एखादे काम करावयास जातो. परत येऊन बघतो तो वॉशिंग मशीन फिरण्याच्या मूड मध्ये नसतेच मुळी! आतील कपडे स्वच्छ होण्यासाठी केव्हाचे आसुसलेले असतात. वॉशिंग मशिनच्या आतील यंत्रणेचे फिरणे, न फिरणे आपल्या ज्ञानकक्षेत येत नसल्याकारणाने ते दुरुस्त करणाऱ्या माणसाला पाचारण करावे लागणार असते. आपले बाहेर जाण्याचे मनसुबे विस्कटून जातात.  
यू.एसला स्थायिक झालेल्या मैत्रिणीची मेल आलेली असते. तिला रिप्लाय देण्यासाठी आपण उत्सुकतेने बसतो आणि तत्क्षणी घरातील वीज गायब होते. इन्व्हरटर नामक उपकरणाने दुरुस्त न होण्याचा विडा उचललेला असतो त्यामुळे वीज महामंडळाने कृपा केल्याखेरीज आपण आपल्या मैत्रिणीला मेल लिहिण्यास असमर्थ असतो. 
आपण जामानिमा करून लग्नाला निघालेले असतो. मुहूर्ताची वेळ नीट वाचून त्यानुसारच आपण घरातून निघालेलो असतो. लग्नाचा हॉल रेल्वे स्टेशनच्या जवळ नसल्याने आपण वातानुकुलीत बसने जाण्याचे ठरवतो. आपण अधिरतेने त्या इच्छित बसची वाट पाहू लागतो. 'शायद आज बस नाही है ' अशा आजूबाजूच्या शेऱ्यांना न जुमानता आपण वाट बघण्याचं महत्कार्य सुरु ठेवतो. हळूहळू संयम आणि विवेक आपली साथ देईनासे होतात. आपल्या कपाळावर आठ्यांचे जाळे हातपाय पसरू लागते. डोक्यावरचे ऊन जास्तच त्रास देऊ लागते. 'कुठल्या मुहूर्तावर ही शिंची बस येणार आहे कोण जाणे! जीव नुसता उबून चाललाय. कटकट झालीय नसती. एव्हाना सगळेजण आपली वाट पाहत असतील. सगळं शरीर नुसतं घामेजून गेलंय. मेरुने जावे का?  नको ते केवढ्याला पडेल आपल्याला. सगळं पुढचं बजेट अपसेट होईल. अजून या महिन्यात तीन लग्ने आहेतच. शिवाय कृपया आहेर आणू नये असं एकाही पत्रिकेवर लिहिलेले नाही. काय मेलं नशीब आहे आपलं!' हा संवाद काहीवेळ असाच चालू राहतो. आपल्या धुसफुसण्यावर इलाज म्हणून आरामात बस येते. आणि मुहूर्ताच्या नाही पण जेवणाच्या तयारीने आपण बसमध्ये एकदाचे चढतो. 
आपल्याला वाढदिवसाच्या पार्टीहून घरी परतायचे असते. रात्रीचे बारा वाजलेले असतात. चांगलाच उशीर झाल्यामुळे वाहन मिळेल का ही काळजी सतावत असते. बरोबरची मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी राहणारी असतात. बाहेर कुणाकुणाच्या गाड्या निघू लागतात. शास्त्रीनगर, बोरीवली  कुणाला सोडायचे आहे का? आपण आनंदात भरधाव धावतो. कारमध्ये विसावतो. ओळख जुजबी असली तरी आयतीच सोय झाल्यामुळे आपण भलत्याच खुशीत असतो. आपले घर येते आणि 'thank you ' चा उपचार पार पडून आपण कारमधून उतरतो. कारमधील माणसांच्या नजरा जरा वेगळ्याच वाटतात. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करून घराची बेल वाजवतो. घरात प्रवेश केल्यानंतर चपला ठेवण्यासाठी म्हणून आपण जातो आणि आपल्या लक्षात येते की आपण पादत्राणे न घालताच इथवर आलो आहे. आता कारमधील लोकांच्या नजरांचा उलगडा आपल्याला होतो आणि आपण खूप ओशाळतो. आपल्याला गाडीत बसण्याची एवढी घाई झाली होती की आपल्याला चपला घालायचेही भान राहिले नाही ह्या विचाराने आपण अर्धमेले होतो. एवढ्या लांब यजमानांकडे जाऊन चपला आणणे आपल्याला कसेसेच वाटते. परिणामी ओशाळेपणाची भावना मनात घेऊन आपण नव्या चपला घ्यायला जातो. 
आपल्याकडे पाहुणे आलेले असतात. त्यांची सरबराई करण्यात आपण मग्न असतो. गप्पाही रंगलेल्या असतात. इतक्यात दारावरची बेल वाजते. दारात सेल्सवूमन उभी असते. आपण दार जरुरीपुरतेच उघडल्याने तिला आतील चित्र स्पष्ट झालेले नसते. तिच्या हातात महिन्याकाठी स्त्रियांना लागणारे आवश्यक असे सामान असते. आपण तिला 'मला काही नको' असे सांगायच्या आतच तिची वाणी पाणलोटासारखी धबाधबा आदळू  लागते. तुम्ही कोणता ब्रांड वापरता? हा तिच्या टिपेच्या स्वरातील प्रश्न पाहुणेमंडळींनी न ऐकल्याची शक्यता फारच कमी असते. आपली परिस्थिती एकदम विचित्र होते. आपण तिला डोळ्यांनी, खाणाखुणा करून, टळ बाई एकदाची असे सुचवीत असतो. पण तिला आपले नाव, फोन नंबर आणि आपण वापरतो तो ब्रांड सावकाशीने टिपून घेण्यात भलताच आनंद असतो. आपला वेळ आणि आपल्या अब्रूचे खोबरे झाल्यावर तिचा आत्मा शांत होतो आणि तिचे चालतेबोलते संकट पुढील घरावर आदळते. आपण दरवाजा बंद करून जमेल एवढ्या जलदगतीने आत जातो आणि त्या आगाऊ विक्रेतीचा मनोमन उद्धार करतो.  
आपण महत्वाच्या कामासाठी निघालेले असतो. तुडुंब भरलेल्या लोकलमध्ये आपण स्वत:ला झोकून दिलेले असते. भाजीवाले, फेरीवाले, तृतीयपंथी, भिकारी यांच्या भाऊगर्दीतून मार्ग काढत आपण कसेबसे आतमध्ये सुरक्षित उभे राहण्याचा प्रयास करत असतो. लोकलमध्ये परफ्युम, घाम, भाज्या, सोललेली संत्री आणि बटाटेवडा यांचा संमिश्र दरवळ पसरलेला असतो. बऱ्याचदा प्रचंड गर्दीमुळे बगळ्यासारखी एका पायावर उभे राहण्याची सर्कसही आपल्याला करावी लागते. आतमध्ये सीटवरून भांडणांना उत आलेला असतो. एकमेकांची आयमाय उद्धारल्याशिवाय भांडणाऱ्या बायकांना चैन पडत नाही. अशावेळी इयरफोन कानात खुपसून बसलेल्या भाग्यवान असतात. एवढ्यात एकाच कल्लोळ होतो आणि काही समजायच्या आतच  आपल्या अंगावर आंबट वासाचे काही शिंतोडे उडाल्याचा साक्षात्कार आपल्याला होतो. आपल्याला तसूभरही हलता येत नाही. संतापाने आपल्याला रडावेसे वाटू लागते. अंगावरची वस्त्रे भिरकावून द्यावीशी वाटू लागतात. पुढील काही स्टेशने नाकाला रुमाल धरून, अपमानित स्थितीत आपण काढतो. स्टेशनावर उतरल्यानंतर वेटिंग रुममध्ये जाऊन जमेल तितके स्वत:ला पाण्याने पुसून घेतो आणि रडवेला झालेला आपला चेहरा सावरण्याचा प्रयत्न करत कामाच्या जागी कूच करतो.
टी.व्हीवरील वेगवेगळ्या वाहिन्यांवर डेली मालिकांचा रतीब सुरु असतो.  प्रत्येक मालिकेला नाके मुरडत आपण ती पाहत असतो. तिला नावे ठेवता ठेवता तिच्यात गुंतत असतो. महत्वाचा प्रसंग सुरु असतो. उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. काय होणार या प्रश्नाने डोक्याचा भुगा व्हायला लागलेला असतो. या क्षणी आपण आणि ती मालिका या व्यतिरिक्त इतर गोष्टींचे आपले भान हरवलेले असते. मालिकेतील दरवाज्याचे दार उघडते आणि नायिकेच्या भयभीत चेहऱ्यावर फोकस विसावतो. आपण हातातली उशी घट्ट धरतो. तेवढ्यात मोबाईल वाजतो आणि आपली साधना भंग होते. मैत्रिणीचा फोन असतो. आपली चिडचिड होते.घरचे यावेळी आपल्याला डिस्टर्ब  करणार नाहीत अशी आपल्याला खात्री असते. एका मिनिटाचा ब्रेक होतो. आपण मैत्रिणीला SMS करतो की 'very busy at the moment & will call you back'. ब्रेक संपतो आणि आपण पुन्हा त्या मालिकेच्या अवकाशात रुजू होतो.  

Tuesday 27 March 2012

देवदर्शनाचा बाजार

बहुचर्चित आणि ख्यात देवळांतील देवाचे दर्शन आज गरिबाला मर्सिडीज गाडीइतकेच स्वप्नवत झाले आहे. देवाची तुम्हाला दर्शन देण्याची लाख इच्छा असेल हो पण पुजाऱ्यांच्या अधिकृत परवानगीवाचून तुमची आणि त्याची दृष्टभेट होणे ही एक अशक्य कोटीतील गोष्ट आहे. 
माणसे दूरवरून जगाच्या कुठल्यातरी कानाकोपऱ्यातून येऊन देवदर्शनासाठी अजस्त्र अशा रांगेत पूजेचे साहित्य घेऊन उभी असतात. डोक्यावर उन्हाची घमेली उपडी होत असतात. पदराने, रुमालाने घाम पुसत त्यांची ती देवदर्शनासाठी वाट पाहण्याची साधना चालू असते. हातातले पूजेचे ताट सावरण्याची कसरत पदोपदी करावी लागत असते. धक्काबुक्कीच्या प्रसंगांना उत आलेला असतो. प्रत्येकाला दर्शनाची घाई असते. कुणाला बोललेला नवस फेडायचा असतो. कुणाला आपले मूल देवाच्या किंवा देवीच्या पायांवर घालायचे असते.काही नवदाम्पत्ये आपल्या संसाराला आशीर्वाद घेण्यासाठी आलेली असतात. कुणी घराच्या आजारी माणसासाठी अंगारा न्यायला आलेला असतो. कुणी आपले हक्काचे घर व्हावे म्हणून साकडे घालायला आलेला असतो तर कुणी मला यंदाचे निवडणुकीचे तिकीट मिळू दे म्हणून प्रार्थना करायला आलेला असतो. प्रत्येकाच्या मनीचे हेतू वेगळे असतात परंतु त्यासाठी देवदर्शनाची वाट चोखाळणे  त्यांच्यासाठी अपरिहार्य असते.
आपण स्वस्थपणे रांगेत उभे असलो तरी आपल्याला विचलित करणाऱ्या देवाच्या आरत्यांचा भडीमार आपल्या कानांना सहन करावाच लागतो. या सगळ्या आरत्यांचा बेस बॉलीवूड स्टाइल गाण्यांचा असतो. त्यांना हिंदी सिनेमातील कोणतीही गाणी चालतात. त्यावर फक्त चपखल शब्द बसवण्याची कारागिरी करायची आणि मग चमत्कार पाहायचा. त्यामुळे प्रत्येक आरती  आपल्याला ओळखीची वाटते. 'धडकने लागी दिल के तारो की दुनिया' किंवा 'परदेसीया ये सच है पिया' किंवा 'ताकी ओ ताकी'किंवा 'तोफा तोफा लाया लाया' किंवा 'पहला पहला प्यार है' किंवा 'बाजीगर ओ बाजीगर' अशा सगळ्या गाण्यांवर आरत्या बांधल्या जाऊ शकतात. ह्या आरत्या ऐकून आपण आपले मनोरंजन करून घ्यायचे. काय माहीत त्या गाभाऱ्यातील परब्रम्हाचेही होत असेल! प्रत्यक्ष देवळात शिरून त्या विश्वरूपाचे दर्शन होण्याआधी आपली सगळी गात्रे शिणलेली असतात. आपण पूजेचे ताट पुजाऱ्याला देतो. पुजारी फुले, हार, वेण्या अक्षरश: फेकतात. नारळ दुसरीकडे जातो. देवावरचे एखादे फुल, अंगाऱ्याची पुडी आणि  फुटाणे घाईघाईत आपल्या हातात कोंबले जातात. दक्षिणा पेटीत पडते. ही सगळी प्रक्रिया केवळ काही मिनिटांत घडते त्यामुळे तिथून बाहेर पडल्यावर आपण देवाचा चेहरा आठवू लागतो. पुजाऱ्याने केलेली घाई आठवते. फेकलेला हार व नारळ आठवतो. पण ज्याचे दर्शन घेण्यासाठी आपण इतका वेळ तिष्ठत होतो त्या देव्हाऱ्यातील देवाला आपण डोळे भरून पाहिलेलेही नसते. बहुतांश गाजलेल्या देवळांमध्ये थोड्याफार फरकाने हीच स्थिती असते. 
देवीच्या भरलेल्या ओट्या, वाहिलेले नारळ, वेण्या-फुले मागील दाराने परत विकण्यास येत राहतात. यानंतर देवाचा महिमा सांगणारी पुस्तके, दृक-श्राव्य सीडीज, माळा-अंगठ्या, मूर्ती-तसबिरी, अंगारा-प्रसाद घेतल्याशिवाय इतिकर्तव्यता होत नाही. लोकांच्या झोळ्यांत सामान आणि समाधान कोंबले जाते. आपल्या आत्तापर्यंत केलेल्या पापांचा निचरा झाला  असे देवदर्शन घेऊन आलेल्यांना वाटते. त्यात पवित्र नद्यांत, कुंडात डुबकी मारण्याचे पुण्यही बऱ्याच जणांच्या गाठीशी जमा झालेले असते. त्यामुळे नवीन दुष्कृत्ये ,अत्याचार, पापे करायचे लायसेन्स आपोआपच मिळून जाते. हा देवदर्शनाचा बाजार सार्वत्रिक आणि बारमाही चालू असतो. शिकलेले-बिनशिकलेले , सुसंस्कृत-असंस्कृत, उच्चस्तरीय-निम्नस्तरीय, देशी-विदेशी सगळ्या प्रकारची माणसे या दर्शनोत्सवात सामील झालेली आढळतात.   
काही वर्षांपूर्वी कृष्णाष्टमी निमित्त एका सार्वजनिक ठिकाणी एक देखावा आयोजित करण्यात आला होता. त्यात सुदर्शनधारी भगवान श्रीकृष्ण एका अतिशय सवंग गाण्यावर नाचातानाचे दृश्य होते. डोळे आणि कान पहावयाचे आणि ऐकवायचे नाकारत असल्याने काही भाविकांनी तेथून काढता पाय घेतला पण आयोजकांची मती मात्र या दृश्याला कसलीच हरकत घेत नव्हती. गणेशउत्सवातही कानांना खटकणारी गाणी असतात, बुद्धीला खटकणाऱ्या पडद्यामागील आर्थिक उलाढाली असतात, राजकीय चढाओढीखातर आयोजलेल्या स्पर्धा असतात, कोणाचा गणपती जास्त चांगला यावर आयोजकांची सामाजिक प्रतिष्ठा अवलंबून असते. आपापल्या गणपतीची आरास जास्तीत जास्त दैदिप्यमान करण्यासाठी अनेक ठिकाणाहून जबरदस्तीने गोळा केलेल्या वर्गण्या असतात. गणपतीनंतर नवरात्र येते. सार्वजनिक उत्सवात दानपेट्या, फंडपेट्या ओसंडून वाहू लागतात. सोने-चांदी-रत्ने यांनी देवांना मढवले जाते. देवाला नैवेद्यास्तव अन्न-धान्य-दूध-तूप दान केले जाते. या देवस्थानाच्या आजूबाजूला गरीब, अन्नान्नदशा झालेली माणसे हा पैसेवाल्यांचा खेळ असहायपणे बघत असतात. त्यांच्या डोळ्यांत व्याकुळता असते, कारुण्य असते. पण त्यांचे हात मात्र अभावितपणे देवासमोर जोडले जातात. या आशेवर की एक ना एक दिवस आपलेही भाग्य उजाडेल. परमेश्वर आपल्याला प्रसन्न होईल. आपल्याला अन्न-वस्त्र-निवाऱ्याची भ्रांत पडणार नाही.  
जो तो या पुढे पुढे जाण्याच्या हव्यासापायी स्वत:ला, निजस्वरुपाला विसरत चालला आहे. पैसा कितीही कमवा पुरत नाही, गाडी-बंगला-नोकरचाकर यथास्थितपणे बाळगणारी माणसे देखील 'आता पुरे, मी एवढ्यात तृप्त आहे' हे वाक्य चुकूनही उच्चारत नाहीत. पैशाने विकत घेतलेल्या वस्तूंनी देवाला सजवणे सोप्पे आहे पण हृदयातील भक्तिभावाने देवाला भिजवणे हे खूपच अवघड काम आहे. जे या भूमीतील संतांनी आम्हाला वारंवार अभंगांतून सांगितले ते आचरताना लोक दिसत नाहीत मात्र स्वार्थासाठी परमार्थ जवळ करणाऱ्यांचे जणू पेवच फुटले आहे. देवाची सोन्याने मढवलेली मूर्ती चोरीला जाण्याचे भय आहे पण हृदयात स्थापन केलेली भगवंताची मूर्ती चोरीला जाण्याची क्षितीच नाही.   

                                                  देव देव्हाऱ्यात नाही  देव नाही देवालयी 
                                                  देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई 
या ओळींचा गर्भितार्थ समजण्याची आज नितांत गरज आहे.


Sunday 25 March 2012

तर तुम्ही भाग्यवान आहात .........

तुम्ही थोटे-पांगळे-आंधळे-बहिरे-मुके यांपैकी कोणत्याही व्यंगाची कवचकुंडले घेऊन निपजला नसाल तर तुम्ही भाग्यवान आहात.
तुम्ही अशिक्षित, असंस्कृत आई-वडिलांच्या पोटी जन्माला येण्याचे पुण्य केले नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
तुमचे शैशव आणि तारुण्य अभ्यासाची अवास्तव कटकट मागे न लागता व्यतीत झाले असेल आणि तुम्ही आत्मघाताचा विचार करावा अशी परिस्थिती तुमच्या अवतीभवती वावरणाऱ्या माणसांनी निर्माण केली नसेल तर तुम्ही खरंच भाग्यवान आहात.
 तुमच्या अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांव्यातिरिक्त इतर वैयक्तिक गरजांचीही पूर्तता विनासायास झाली असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. 

कडाक्याच्या थंडीत किंवा धो धो पावसात तुम्हाला भल्या पहाटे घरोघरी पेपर आणि दुध टाकायला जायला लागलं नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडून पैसे कमवायची पाळी तुमच्यावर आली नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
तुम्हाला मणामणाची ओझी पाठीची हाडे खिळखिळी होईपर्यंत कधी वाहायला लागली नसतील तर तुम्ही भाग्यवान आहात.
पाचवीला पुजलेला आजार आणि आजारी माणसे यांनी तुम्ही किंवा तुमच्या घरच्यांनी जर बिछाना अडवला नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात. 
शिळीपाकी भाकरी, आंबूस वरण किंवा अशा अन्य खराब झालेल्या अन्नपदार्थांनी तुमची थाळी कधी  सजवली गेली नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात. 
दुपारच्या रणरणत्या उन्हात घामाने थबथबून, घशाला कोरड पडल्याने कासावीस होत जर सेल्समन, पोस्टमनची कामे तुम्ही केली नसतील तर तुम्ही भाग्यवान आहात.
ब्रोंकोग्राफी करायला गेलेला तुमच्या घरातील धडधाकट मनुष्य डॉक्टरांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे संवेदनाशून्य होऊन स्ट्रेचरवरून परत आला नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात. 
तुमच्या घरातील एखादा सदस्य 'स्वाईन फ्लू' सारख्या सार्वजनिक साथीचा बळी ठरला नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
लोकलच्या जीवघेण्या गर्दीत आपले शरीर रोज अपरिहार्यपणे गलितगात्र होणाऱ्यांच्या यादीत जर तुमचे नाव नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
कुठेही, कधीही होणाऱ्या बॉम्बस्फोटात किंवा एखाद्या राष्ट्रीय आपत्तीत जर तुम्ही किंवा तुमचे जिवलग कधी सापडले नसतील तर तुम्ही भाग्यवान आहात. 
सार्वजनिक ठिकाणी देवदर्शन घेण्यासाठी उभे असता चेंगराचेंगरी होऊन देवाज्ञा होण्याचा बिकट प्रसंग जर तुमच्या निकटवर्तीयांवर ओढवला नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
शंभर फुट  दरीत बस कोसळून तुमच्या अंगावर एकही ओरखडा उमटला नसेल तर तुम्ही निश्चितच भाग्यवान आहात.
तुमचे विमानाचे तिकीट आयत्या वेळेस चरफडत रद्द करायला लागून आणि नंतर त्याच विमानाचा टेक ऑफ करताना झालेला अपघात पाहून त्यामागची परमेश्वरी योजना जर तुम्हाला समजली असेल तर तुम्ही भाग्यवान आहात.   
तुमचे घर जर उघड्या नाल्यापाशी, गटारापाशी, कचऱ्याच्या मोठ्या ढिगापाशी, घोंघावणाऱ्या माशांच्या, डासांच्या, घुशींच्या सानिध्यात नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
दारूच्या, सिगारेटच्या, अंमली पदार्थांच्या व्यसनापायी तुमच्या अब्रूचे आणि पैशांचे खोबरे करणारे कारटे जर तुमच्या घरात निपजले नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.    
सतत अर्वाच्य, अश्लाघ्य बोलून तुमचा आणि तुमच्या घरच्यांचा पाणउतारा करणारा नवरा तुम्हाला लाभला नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
घरच्यांनी केलेल्या शैक्षणिक संस्कारांना पायदळी तुडवून ड्रायव्हर,चपराशी, प्लंबर, नोकर यांच्याबरोबर पळून गेलेली कारटी जर तुमच्या घरातली नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.   
गणितातल्या आकड्यांपेक्षा मटक्यातल्या आकड्यांवर विलक्षण श्रद्धा असणारे मूल जर तुमच्या हाडामांसाचा भाग नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
सासर नामक नरकात अनन्वित यातना निमुटपणे सहन करत खितपत पडलेली मुलगी जर तुमची नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात. 
देवाचे श्लोक लिहिलेल्या कागदात तंबाखू भरून, तो पेटवून त्यांचा लुथ्फ घेणारी अवलाद जर तुमची नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात. 
तरुण मुलाला त्याच्या मानसिक असंतुलनामुळे घरातील खाटेला बांधून ठेवणारे आई-वडील जर तुम्ही नसाल तर तुम्ही भाग्यवान आहात.
भाईगिरी, लाचखोरी यांमुळे दुर्लौकिक कमावलेला कोणी गुंड-पुंड हा तुमच्या पोटाचा गोळा नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात. 
जनतेला अन्न-धान्य पुरवून स्वत:ला मात्र अन्नाअभावी, कर्जफेडीसाठी लागणाऱ्या पैशाअभावी स्वत:ला फासाला टांगून घ्यायची पाळी येणारे शेतकरी जर तुम्ही नसाल तर तुम्ही भाग्यवान आहात. 
दुसऱ्यांना घरे बांधून देण्यासाठी आयुष्य झिजवताना स्वत: मात्र  कायम बेघर असणाऱ्यांपैकी जर तुम्ही नसाल तर तुम्ही भाग्यवान आहात.
खोडी काढली म्हणून शिक्षकाकडून मरेस्तोवर मार खाणाऱ्या विद्यार्थ्याचे पालक जर तुम्ही  नसाल तर तुम्ही भाग्यवान आहात.
देहाने मरण्याआधीच शतदा मरणे मरणाऱ्यांच्या नामावलीत तुमचे नाव लिहिण्यास जर विधाता विसरला असेल तर तुम्ही खूपच भाग्यवान आहात.

Wednesday 21 March 2012

रंग चित्रकलेचे - तरंग मनाचे

माझी मैत्रीण सौ.नीता फाळके दरवर्षी तिच्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवत असते. यावर्षीचा विषय होता 'माय ड्रीम इंडिया'. मुलांनी याविषयीची अनेकविध सुंदर चित्रे काढली. जवळजवळ दोन महिन्यांपासून ही तयारी चालू होती. मुलांच्या मनातील आपल्या देशाविषयीचे विचार या प्रदर्शनाच्या निमित्ताने सर्वांनाच कळले आणि तेही आखीव-रेखीव चित्रांच्या माध्यमातून!  एकंदर अडीचशे चित्रे मांडली गेली. काम तितकेसे सोप्पे नव्हते.  
नीताने या संदर्भात मला सांगितले की एकदा प्रदर्शनासाठीचा विषय निश्चित झाल्यावर मग मी माझ्या विद्यार्थ्यांशी या विषयावर चर्चा करते. हीच चर्चा ते घरी त्यांच्या पालकांशी करतात. मुलांच्या मनात कल्पना आकार घेऊ लागतात. परंतु विचार ते प्रत्यक्ष चित्र रेखाटणे हा प्रवास तसा आव्हानात्मक असतो. काही चित्रे प्रतीकात्मक असतात. चित्रांतून विद्यार्थ्याच्या मनातील भाव व्यक्त होत असतात. एखाद्या चित्रातून नेमके काय म्हणायचे आहे याचा आराखडा प्रथम विद्यार्थ्याच्या मनात पक्का होणे गरजेचे असते. चित्र कागदावर उतरवल्यानंतर उत्तम रंगसंगती साधावयाची असते. आणि अशा अनेक विचारांची अनेक चित्रे जेव्हा संकलित होतात तेव्हाच हे प्रदर्शन आकारास येऊ लागते.  
माझ्या कल्पनेतील भारताची भूमी ही 'सुजलाम सुफलाम' आहे. तिथे हिरव्याकंच शेतांतून सोन्यासारखे पिक निघाले आहे. शेतकरीराजा सर्वांना मुबलक अन्न पुरवून स्वत:ही सुखाच्या राशीत लोळतो आहे. सगळे नागरिक उत्तम नागरी सुविधांचा लाभ घेत आहेत. पाणी, वीज, अन्न, वस्त्र, निवारा कश्याकश्याची म्हणून टंचाई नाही. मुलगा आणि मुलगी यांना इथे समान वागणूक दिली जाते आहे. प्रत्येकजण साक्षर आहे. अद्ययावत इलेक्ट्रोनिक उपकरणांचा लाभ सर्वांना मिळतो आहे. सर्वधर्मीय लोक इथे सुखाने नांदत आहेत. गरिबी, भ्रष्टाचार,आतंकवाद, जातीयता, स्त्रियांवरील अत्याचार, बालमजुरी ही मानवतेला लागलेली कीड आता नष्ट झाली आहे. आरोग्यकेंद्रे, हॉस्पिटल्स, शौचालये, उद्याने, क्रीडाक्षेत्रे, मल्टीप्लेक्सेस, मोनोरेल, उत्तम रस्ते यांमुळे माणसाचे दैनंदिन आयुष्य सुकर होत चालले आहे. आपल्या देशाचे भूषण असलेल्या ऐतिहासिक वास्तू चांगल्या तऱ्हेने जतन केल्या जात आहेत. इथे सर्व धर्मांचे सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. निसर्गाची होणारी अपरिमित हानी नियंत्रणात आली आहे. नैसर्गिक गोष्टींचे संवर्धन केले जात आहे. सर्व पशु-पक्षांची योग्य ती निगा राखली जात आहे. 'चूल आणि मुल' ही संकल्पना आता मागे पडून स्त्री शक्ती स्व-कर्तृत्वाने प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होऊ पाहते आहे. अशा आशयांची बहुतेक चित्रे होती. या चित्रांतील आशयाला साजेशा कवितांच्या ओळी तसेच मथळेही लिहिले होते. आपापल्या वयाप्रमाणे आपली कल्पनाशक्ती लढवून मुलांनी ही चित्रे प्रदर्शनात सादर केली.  
एक हात दुसऱ्या हातात शिक्षणाचा वसा सुपूर्द करतो आहे आणि तो हात आणखी चार साक्षरांना जन्म देतो आहे असे चित्र होते. एका चित्रात मनगटावरील घड्याळामध्ये स्त्रियांच्या कालमानानुसार बदललेल्या भूमिका चित्रित केल्या होत्या. प्रापंचिक आणि व्यावसायिक जबाबदारी असा दुहेरी समतोल साधणारी स्त्री एकाच देहातील दोन व्यक्तीमत्वांच्या माध्यमातून रेखाटली होती. एका चित्रात सगळ्या समाजविघातक प्रवृत्तींना पायांखाली चिरडले गेले होते तर दुसऱ्या चित्रात ही मानवतेला लागलेली विषारी मुळे उपटून टाकण्यात आली होती. वर्ग आणि वर्णभेदाचे उच्चाटन झाले होते.  एका चित्रात गरिबी, समाजकंटक प्रवृत्ती यांना कचऱ्याची टोपली दाखवण्यात आली होती. असा सर्व सुखसोयींनी, साधनांनी युक्त असा भारत जगाच्या पाठीवर अश्वगतीने व अश्वशक्तीने घोडदौड करत होता. या भारत देशात 'सुवर्ण युग' अवतरले होते.      
शालेय शिक्षणापेक्षा काहीतरी वेगळे यात अनुभवायला मिळाले. सरधोपट, ठोकळेबाज पद्धतीने दिलेल्या विषयावर जमते तसे चित्र काढण्यापेक्षा इथे मुलांच्या विचारांना, बुद्धीला खाद्य मिळाले आणि त्यांनी आपापली कल्पनाशक्ती वापरून अतिशय समर्पक अशी चित्रे  काढली. एखादे चित्र कागदावर सजीव करण्याआधी ते मनात मूर्त व्हावे लागते ही जाणीवही मुलांना झाली. हे एक छान, सुबक चित्रांचे प्रदर्शन तर होतेच पण त्याहीपेक्षा जास्त मुलांच्या विचारांचे, त्यांच्या जाणिवांचे प्रदर्शन होते. निळ्या , निरभ्र आकाशात स्वच्छंदपणे विहार करणाऱ्या अनेकरंगी विचारांचे थवे  पांढऱ्याशुभ्र कागदांवर अलगदपणे येऊन विसावले होते.  
खूप छान वाटले हे आगळेवेगळे प्रदर्शन पाहून! 

Monday 19 March 2012

पुतळे


आजकाल जिवंत माणसांपेक्षा पुतळ्यांचे महत्व जास्त वाढले आहे. चालतीबोलती हाडामांसाची माणसे नकोत पण निर्जीव पुतळे हवेत. कारण हे पुतळे बिचारे निषेधार्थ आवाज उठवू शकत नाहीत. त्यांची विटंबना करा, त्यांना चपलांचे हार घाला, त्यांच्यावरून राजकारण करा, त्यांची स्थापना करून कावळ्या-कुत्र्यांची सोय करा, त्यांचे काही म्हणणे नसते.   
हे पुतळे बांधण्याचा आग्रह धरणारे किती जण या गतकाळातील लोकनायकांच्या तत्वांचे प्रामाणिकपणे आचरण करणारे असतात? एकही नाही. तरीही यांना कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेले पुतळे हवेत. देशातील कोट्यावधी गरीब जनता अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत सोयींपासून  वंचित राहो, यांना पुतळे हवेत. दिवसेंदिवस महागाई अगदी गगनाला भिडो, यांना पुतळे हवेत. लक्षावधी बेरोजगार नोकरीच्या शोधार्थ वणवण फिरोत पण यांना पुतळ्याचा प्रश्न जीवनमरणाचा वाटतो. दिसामाशी प्रचंड वाढणारी गर्दी, बाहेरील देशांतून येणारे लोंढे, अपुरी भासणारी वाहतुकीची साधने, पाण्याचा तुटवडा, जागोजागी दिसणारे कचऱ्यांचे ढीग, उखडलेले रस्ते, उघडी गटारे, हॉस्पिटल्सची दुरावस्था, प्रदूषणाची सतत भेडसावणारी समस्या, गरजेच्या वस्तू महागल्याने सामान्यांची परिस्थितीशी सदोदित चाललेली लढाई या व अशा प्रश्नांपेक्षा पुतळे अथवा स्मारके कुठे उभारायची हा प्रश्न जास्त ज्वलंत आहे असे यांना वाटते.
कधी वाटते की या निष्प्राण पुतळ्यांत  कुणीतरी प्राण फुंकावेत आणि त्यांचे मनोगत ऐकावे. जिवंत माणसांना भेडसावणारे प्रश्न किती महत्वाचे आणि पुतळ्यांच्यावरून होणारे राजकारण किती महत्वाचे यावरील त्यांचं भाष्य तरी ऐकता येईल. काय म्हणतील ते या राजकारण्यांना? अरे, आमच्या तत्वप्रणालींशी ज्यांचे काडीचेही सोयर-सुतक नाही अशी  माणसे जेव्हा काही राजकीय हितसंबंध, स्वार्थ जोपासण्यासाठी आमची स्थापना करायला निघतात तेव्हाच आमची खरी विटंबना होते. ज्या वीरांनी, देशभक्तांनी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या स्वतंत्र भारतातील किती जनता आज खऱ्या अर्थाने वैचारिकदृष्ट्या,  आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे याचा हिशेब द्या. हा भारत आजमितीला जातपात, धर्मांधता, लाचारी, बेकारी, गरिबी, भ्रष्टाचार, चोरीमारी, खून-आत्महत्या, आतंकवाद यांपासून खऱ्या अर्थाने मुक्त झाला आहे का याचा हिशेब द्या. ज्या थोर लोकांनी या देशाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी आपले अवघे आयुष्य पणाला लावले अशा लोकांनी घालून दिलेला समाजहिताचा आदर्श तुम्ही दृष्टीसमोर ठेवून त्याबरहुकुम वागताय का याचा हिशेब द्या. देशाचे शांघाय करण्याच्या प्रयत्नात किती जनविकासाच्या प्रकल्पांना तुम्ही कायमची घरघर लावणार आहात त्याचा हिशेब द्या. गरीब-श्रीमंत यांमधील दरी मिटवण्यासाठी तुम्ही किती सक्रीय आहत याचा हिशेब द्या. नवनवीन बांधकामे काढून तेथील हिरवळ,तिवरे,वृक्ष यांना हानी पोहोचवणाऱ्या महाभागांना तुम्ही का राजाश्रय देता याचा खुलासा करा. नद्या, खाड्या बुजवणाऱ्या, नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश करणाऱ्यांना तुम्ही कोणती शिक्षा देता याचा खुलासा करा. देशाद्रोह्यांविरुद्ध कडक शिक्षेची अंमलबजावणी तर सोडाच पण त्यांच्या सुरक्षेवर कोट्यावधी रुपये अकारण खर्च करणाऱ्यांनो तुमच्या या निंदनीय कृत्याचा खुलासा करा. जंगले तोडणाऱ्या, आपल्या स्वार्थासाठी मुक्या जनावरांची हत्या करणाऱ्या या मानवाच्या रूपातील पशुंनो आपल्या या निर्दय वागणुकीचा खुलासा करा.  इतक्या वर्षांत साधी असहाय स्त्रियांकडे बघण्याची समाजाची दृष्टी तुम्ही बदलवू शकला नाहीत हा आमच्या मूल्यांचा  पराभव आहे. धर्माचे,जातीपातीचे अवडंबर माजवून त्या बळावर राजकारण खेळले जाते आहे हा आमच्या विचारसरणीचा पराभव आहे.  क्षुद्र स्वार्थापायी आज अनेकजण गरिबीच्या, बेकारीच्या अंधारात ढकलले जात आहेत हाही आमचा पराभव आहे. अजूनही सर्वार्थाने या देशातील निरक्षरता आणि दारिद्य्र यांचे समूळ उच्चाटन होत नाही हा आमचा पराभव आहे. 
ज्या पायदळी तुडवल्या गेलेल्या आमच्या तत्वांच्या छाताडावर आज राजकारणी मनसुबे रचले जात आहेत त्या देशात सन्मानाने उभे राहण्यासाठी आम्हाला जागाच उरलेली नाही. गरीबाच्या पोटाला पुरेसे अन्न द्या, बेकारांना नोकरी द्या, बेघरांना माफक दरात घरे द्या, महागाईचा आवळलेला फास सैल करा, ज्याच्या श्रमावर अवघा देश, राष्ट्र पोसले जाते त्या शेतकऱ्याची झोळी सुखाने भरा, जनावरांच्या हत्या करू नका, नैसर्गिक संपत्तीचे जतन करा, वाढत्या लोकसंख्येला आळा घाला, बाहेरून येणारे लोंढे थांबवा, जातीयतेला खतपाणी घालू नका  मग भले आमचे पुतळे उभारले नाहीत तरी चालेल. नाहीतरी केवळ १५ ओगस्ट, २६ जानेवारी अशा काही तारखांनाच देशांतील लोकांना राष्ट्रप्रेमाचे भरते येत असते. त्या निमित्ताने आम्हाला धुवून-पुसून स्वच्छ केले जाते. कारण झेंडावंदनाचा  उपचार पार पाडायचा असतो. इतर वेळेस मात्र काही पक्षी-प्राणी आमच्यावर त्यांचा हक्क निर्विघ्नपणे बजावत असतात. आमच्या काही अवयवांचीही पडझड झालेली असते. धुळीचे लोट आमच्यावर त्यांचे वर्चस्व गाजवीत असतात. आमच्या अंतरंगात डोकावून पाहण्याची कोणाचीच इच्छा नसते कारण आम्ही मुळी निर्विकार, निर्विचार, स्तब्ध, अचल असतो. ही मानहानी सोसण्यासाठीच का आम्ही आमचे रक्त सांडले? असा आम्हाला वारंवार प्रश्न पडतो.   
आमचे पुतळे अजिबात उभारू नका पण आमचे विचार अंगीकारून कृपया समाजाचे हित साधा एवढीच आमची कळकळीची विनंती आहे नाहीतर जिवंत माणसांचे पुतळे होण्यास वेळ लागणार नाही.  


Wednesday 14 March 2012

किमया मेकअपची !

निमिषा कॉलेजमधून घरी आली आणि  तिने पलंगावर स्वत:ला हताशपणे झोकून दिले.  सुधाताईंनी कानोसा घेतला. हे असे किती दिवस चालायचे? हिच्याशी आजतरी बोललेच पाहिजे. निमू उठतेस का? मी गरमागरम चहा आणि तुझी आवडती भजी करते. निमिषाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सुधाताईंनी ताडले की आज तिचे जरा जास्तच बिनसले असावे. गेले पंधरावीस दिवस निमिषा अस्वस्थ होती. तिचा चेहरा निराशेने काळवंडला होता. तिच्या म्हणण्याप्रमाणे खूप खूप क्रीम्स, लोशन्स, फेस स्क्रब्स लावूनही तिचा चेहरा टवटवीत, तजेलदार, तुकतुकीत दिसत नव्हता. जाहिरातीतील नट्यांनी अंगाला लावलेले साबण ती वापरत होती. त्यांनी रेकमेंड केलेली फेअरनेस क्रीम्स वापरत होती. शिवाय पिंपल्सचा प्रॉब्लेम सतावत होता तो वेगळाच! काही दिवसांत, काही महिन्यांत त्या नट्यांच्या चेहऱ्यात जे आमुलाग्र बदल होतात ते निमिषालाही अपेक्षित होते. त्यांच्या केसाचे टेक्स्चर आणि तिच्या केसांचे टेक्स्चर यांत तिच्या मते जमीन-अस्मानाचा फरक होता. सुधाताईंनी  त्यांच्या परीने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ज्याचे नाव ते! जाहिरातींची खोटी, बनावट दुनिया तिला खरी, वास्तवातील वाटायला लागली होती. ती स्वत:ची त्या जाहिरातींमधल्या मॉडेल्सशी, नट्यांशी तुलना करून स्वत:ला कमी लेखू लागली होती. या न्यूनगंडाच्या भावनेमुळे तिला तिचे मित्र-मैत्रीणीही नकोसे वाटू लागले होते. थोडक्यात काय तिचे कशातच मन लागत नव्हते.  
सुधाताई हुशार होत्या. आज कसेही करून निमिषाला सत्याचा चेहरा दाखवायचाच असे त्यांनी ठरवले. नाहीतर ती कायमची मोडून जाईल अशी चिंता त्यांना सतावत होती. त्यांनी निमिषाला बळेबळेच उठवले. तिला हात-पाय धुवायला सांगितले आणि तिच्या पुढ्यात गरम चहाचा कप ठेवला. निमिषा सुधाताईंना नजर (eye contact) सुद्धा  देत नव्हती. सुधाताई आतमध्ये गेल्या  आणि त्यांनी तिच्यासमोर एक मासिक उलगडून तिला दिसेल असे ठेवले. तिने हळूच मासिकावरील ते चित्र पहिले आणि ती उडालीच! श्शी! आई ही कोण आहे ग? तिने तो चेहरा ओळखला होता पण तिचा विश्वास बसत नव्हता. मग सुधाताईंनी असे अनेक चेहरे मासिक उलगडून तिला दाखवले. प्रत्येक चेहऱ्यागणिक तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटत होते. चेहऱ्यावर मेक-अप नसताना या सगळ्या नट्या कशा दिसतात पाहिल्यास ना? अग चेहऱ्यावर एवढी रंगरंगोटी केल्यावर आपणही त्यांच्यासारखे  छानच दिसू की! त्यांची केशभूषा-वेशभूषा-मेकअप ही सारी बाह्य किमया असते. पण अभिनय मात्र त्यांचा त्यांनाच करावा लागतो बरं का. तू बघतेस त्या जाहिराती आकर्षक असतात पण तद्दन खोट्या असतात. या नट्या खरोखरच ते शाम्पू, ते साबण, ती नाना प्रकारची क्रीम्स वापरतात असं तुला खरंच वाटतं का? अग एकदा का अभिनय करून त्या पडद्यामागे गेल्या की अगदी तुझ्या-माझ्यासारख्याच त्या सामान्य दिसू लागतात. उलट इतक्या पॉवरफुल लाईट्समुळे त्यांची त्वचा लवकर खराब होते. ते खोलगट डोळे, ते बसकं नाक, ती गालफडे, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या बघून निमिषा चांगलीच हबकली होती. याच नट्या पडद्यावर कित्ती सुंदर दिसतात? त्यांचं चालणं, बोलणं, हसणं, दिसणं  पाहून अगदी मन मोहून जातं.   खरेच त्यांच्या त्या रुपाला आपण इतके दिवस खरं समजत होतो आणि आपले आरशातले रूप पाहून मनोमन खंतावत होतो. जाहिरातीतल्या त्या मॉडेल्स काही दिवसातच कोणकोणती क्रीम्स थापून एकदम सुंदर दिसायला लागायच्या, त्यांचे ते शाम्पू लावल्यानंतरचे सळसळते ,चमकदार केस पाहून आपण दिपून जायचो. आईने किती वेळा आपल्याला सांगितले तरी आपण विश्वास म्हणून ठेवायचो नाही. निमिषा खुदकन हसली. तिचा हसरा चेहरा पाहून सुधाताई आनंदल्या.  
आई मी या मासिकातल्या नट्यांपेक्षा खरंच चांगली दिसतेय की!  निमिषाचा हरवलेला विश्वास तिला परत मिळाला होता. अग आई कॉलेजचा अन्युअल डे दोन दिवसांवर आलाय आणि कॉमपेरिंग मला करायचं आहे. मी विदुलाला फोन करते हं ! असे म्हणून एका वेगळ्याच खुशीत निमिषाने मोबाईल कानाला लावला.   

मी स्पिरिच्युअल (?) आहे

खूप देवभोळ्या लोकांना ते स्पिरिच्युअल आहेत असे वाटत असते. पोथ्या-पारायणे केली, नवस-सायास केले, देवदर्शने केली की त्यांना स्पिरिच्युअल झाल्यासारखे वाटत असावे. सारख्या देवळात जाणाऱ्या बाईविषयी इतर बायकांचे मत ' ए, ती खूपच स्पिरिच्युअल आहे ना' असेच असते.      
वास्तविक पाहता 'स्पिरीट' म्हणजे 'सोल' अर्थात माणसाचा अंतरात्मा. या स्पिरिटच्या जवळ जाणे याला माणसाचा स्पिरिच्युअल प्रोग्रेस असे म्हणता येईल. आपल्या आत असलेला चैतन्याचा उगम अनुभवणे या भावस्थितीला स्पिरिच्युअल म्हणता येईल. बरेच वेळा स्पिरिच्युअल आणि धार्मिक यात गल्लत केली जाते. धर्मानुसार आचरण करणे वेगळे आणि आपला पिंड, मूळ जाणून त्यानुसार आचरण करणे वेगळे. देवळातील देवाचे दर्शन घेणे म्हणजे स्पिरिच्युअल होणे नाही. देवदर्शनाला जाणे हा नित्यक्रम असू शकतो, हा एक दिखाऊपणा असू शकतो, ही एक अगतिकता असू शकते, तो एक विरंगुळा असू शकतो किंवा ही एक समवयस्कांबरोबर चर्चेची जागा असू शकते. 
अध्यात्म्यावरील प्रवचनांना हजेरी लावण्याच्या उद्देशाने जाणारे अधिक असतात. तात्विक, बोधप्रद असे भाष्य ऐकून तेवढ्यापुरते ते त्यात रंगून जातात पण बाहेर येताच प्रपंचातील गोष्टींचा उहापोह सुरु होतो. 'आपुला आपणाशी संवाद' ज्यांना खऱ्या अर्थाने साधता येतो ते आत्मोन्नती साधू शकतात. प्रापंचिक असूनही स्वत:च्या पिंडाशी, आत्मरूपाशी जे तादात्म्य पावू शकतात त्यांना त्या ईश्वरी शक्तीची प्रचीती येते. नाम घ्या असे प्रवचनकारांनी सांगितले आहे म्हणून केवळ जे नाम घेऊ इच्छितात परंतु त्यांची ती हाक अंतरहृदयापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्या शक्तीची प्रचीती येण्यास ते असमर्थ ठरतात. 

माझ्याकडे एक बाई त्यांच्या मुलाच्या पत्रिकेसंदर्भात काही प्रश्न घेऊन आल्या होत्या. माझा मुलगा देवाला हात म्हणून जोडत नाही, देवाचं काही म्हणत नाही, देवळात चुकूनही जात नाही अशा अनेक तक्रारी त्यांनी माझ्यासमोर मांडल्या. त्याच्या नास्तिक वागण्याचा एकंदर त्यांना फारच ताप झालेला माझ्या लक्षात आला. आमच्याकडे देवाचं, कुळाचाराच केवढं आहे आणि हा पडला असा. आता यावर उपाय काय हे त्यांना समजेनासं झालं होतं म्हणून हा पत्रिका दाखवण्याचा उपचार होता. मुलगा दहाव्वीत होता. त्याचा अभ्यास उत्तम होता. त्याला खेळात आणि चित्रकलेतही विशेष गती होती. कोणत्याही क्लासला न जाता तो मेहनत करून चांगले गुण मिळवत होता. दहाव्वीला असल्यामुळे जर याने एकदाही देवाचे स्तोत्र म्हटले नाही, नमस्कार केला नाही किंवा देवळात गेला नाही तर याचे काही खरे नाही अशी बहुतेक त्या बाईंनी समजूत करून घेतली होती. थोडक्यात त्यांचा मुलगा देव मानत नव्हता. हा कुणाशी वाईट वागतो का हो? हा दुष्ट,गर्विष्ठ आहे का?  हा वडीलधारयांशी विनयाने वागत नाही का? याचे मित्रांशी जमते का? हा अप्रामाणिक आहे का? ह्याला इतरांना मदत करायला आवडते का? असे काही प्रश्न त्यांना मी विचारले. हा मुलगा सुस्वभावी, विनयशील, प्रामाणिक, निगर्वी आणि कष्टाळू आहे असे त्यांच्याकडून मला कळले. ज्या गोष्टी तो करतो त्या मन लावून किंबहुना त्यात सर्वस्व ओतून करतो ही माहितीही त्यांनी दिली. तेव्हा तुम्ही बिलकुल काळजी करू नका. त्याला त्याचा देव सापडला आहे असे मी सांगितले. त्यांचे फारसे समाधान झालेले त्यांच्या चेहऱ्यावरून मला दिसले नाही त्यावरून ह्या बहुधा आता दुसऱ्या एखाद्या ज्योतिषाचा दरवाजा ठोठावतील असे मी मनातल्या मनात भाकीत केले.  
आपल्यापैकी बहुतांश लोक हे सगुण भक्ती करणारे असतात. ह्या घरांतील देव्हाऱ्यात किंवा देवळांतील गाभाऱ्यात स्थापलेल्या मूर्तीची पूजा आपण करतो. रोज देवाला जाणारे असतात, स्तोत्रे म्हणणारे असतात, जपमाळा ओढणारे असतात, प्रदक्षिणा घालणारे असतात, शंखनाद करणारे असतात, टिळे लावणारे असतात, पैशाने, सोन्या-चांदीने देवाला मढवणारे असतात, स्वत:च्या पोझिशनचा फायदा घेऊन रांगेत घुसून देवदर्शन करू पाहणारेही असतात. यांतील खरोखर किती लोकांचा भक्तीभाव आतून जागृत झालेला असतो? सांगणे अत्यंत कठीण आहे.  
देव बघण्यासाठी अथवा देवत्वाची प्रचीती येण्यासाठी देवळातच जायला पाहिजे असे कुठे लिहून ठेवले आहे का? तुमच्या अभ्यासात, कामात, कर्तव्यात, परोपकारातही तुम्ही देवाला पाहू शकता. तुमच्यातील सद्गुण हे देवस्वरुपच असतात. 'नसे राउळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी' ह्या गदिमांच्या ओळी इथे तंतोतंत पटतात. स्वत:त वसलेल्या त्या आत्म-स्वरुपाची प्रचीती येणे अगोदर गरजेचे असते. त्या स्वरूपाने दिलेली साद ऐकणे गरजेचे असते. त्यांचा आवाज समजणे गरजेचे असते. नाहीतर घरच्यांनी सांगितले म्हणून, भीतीपोटी म्हणून, टेन्शन येते म्हणून, मित्रांनी खेचले म्हणून देवळात जाणारे अनेक असतात. राम म्हणायचे म्हणून राम असे म्हटले गेले तरी त्यात राम असतोच असे नाही तर त्याचा उद्भव हृदयातून व्हायला हवा. आंधळ्या-पांगळ्याला, तहानल्या-भुकेलेल्याला, मुक्या जनावराला, आजाराने-वृद्धत्वाने जर्जर झालेल्याला मदतीचा हात जेव्हा दिला जातो त्यात राम असतोच. 
महायोगी कै. बाबा आमटे देवळाच्या पायऱ्या भले चढले नाहीत पण त्यांच्यातील देवाचं दर्शन अनेकांना संजीवन देऊन गेलं. स्व-चैतन्याला ओळखून त्यांनी कुष्ठसेवेचं रामायण घडवलं आणि असंख्य पीडितांच्या मनात आनंदवन फुलवलं. याच चैतन्याच्या लाटेवर आरूढ झालेले रामकृष्ण परमहंस जगाने अनुभवले. मदर तेरेसांच्या अंत:करणातील त्या चैतन्यरुपी शक्तीने दीन-दु:खितांच्या मनावर हळुवार फुंकर घातली. स्वामी विवेकानंदांच्या त्या चैतन्याने अवघ्या विश्वालाच गवसणी घातली. स्वत:चा आतला आवाज ओळखून त्याबरहुकुम आचरण करणारी ही माणसे म्हणजे 'दिव्यत्वाची प्रचीती' ठरली.  पराकाष्ठेचे हाल सोसून ज्ञानेश्वरांनी जनोद्धारासाठी अंत:प्रेरणेने ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्यांच्यातील परम-रूपाचा साक्षात्कार लिखित स्वरुपात आपण आजही अनुभवतो आहोत.    
जितका माणूस स्व-स्वरूपापासून दूर जाईल तितकीच त्याची 'स्पिरिचुअल' भावना लयाला जाईल.  आपल्या मनावर साचलेलं मायेचं शेवाळ प्रयत्नपूर्वक बाजूला सारून ज्या क्षणी माणूस आत्म-रुपाला पाहील व त्याप्रमाणे आचरण करेल त्या क्षणी तो 'स्पिरिचुअल' होईल.  

Sunday 11 March 2012

ब्रेन प्रोग्रामिंग

नुकतंच मी डॉ. रमा मराठे यांनी लिहिलेलं 'ब्रेन प्रोग्रामिंग' अशा शीर्षकाचे पुस्तक वाचले. अतिशय साध्या, सोप्या शैलीत त्यांनी काही मुद्दे मांडून सकारात्मक ( positive) आणि नकारात्मक (negative) अशा परस्परविरोधी ब्रेन प्रोग्रामिंगविषयी  सविस्तर चर्चा केली आहे. अनेकांना हे पुस्तक उदबोधक ठरेल यात शंका नाही. ही बहुमूल्य माहिती पुस्तकाव्दारे दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार! 
आपण जन्मल्यापासून ते वार्धक्यापर्यंत घरातील माणसांचा, इतर नातलगांचा, शेजाऱ्यांचा, ओळखीच्यांचा, मित्र- मैत्रिणींचा सामाजिक आणि राजकीय घटकांचा, बाह्य घडामोडींचा आपल्यावर चांगला वा वाईट परिणाम होत असतो.  आपल्या संपर्कात आलेली माणसे आपल्याला आपल्याविषयी काही विशिष्ट प्रतिमा ( image ) देत असतात. काही वेळेस ह्या प्रतिमा सकारात्मक असतात तर काही वेळेस नकारात्मक! उदा. आई अनेक वेळा तिच्या दोन मुलांमध्ये त्यांच्या बाह्य रूपावरून किंवा तिला जाणवलेल्या गोष्टींवरून फरक करते. हा काळा तो गोरा किंवा हा उंच तो बुटका किंवा हा जाड तो बारीक किंवा हा हुशार तो मठ्ठ याप्रमाणे. आईकडून या भावना व्यक्त होतात आणि मुले ह्या तिने दिलेल्या प्रतिमा स्वीकारतात.  सकारात्मक प्रतिमा मुलांचे मनोबल उंचावतात तर नकारात्मक प्रतिमा स्वीकारल्यामुळे मुलांचे मनोबल खचते. आपण काळे आहोत अथवा बुटके आहोत अथवा जाडे आहोत किंवा मठ्ठ आहोत ही आईची आपल्याबद्दलची मते अंतर्मनात खोलवर रुतून बसतात आणि आपल्याला स्वत:विषयी घृणा उत्पन्न होते. घरचे किंवा समाज आपल्याला स्वीकारतो ही त्यांची मेहेरबानीच आहे असे आपल्याला प्रकर्षाने वाटू लागते. आपण अभ्यासात (इतरांच्या म्हणण्यानुसार) मठ्ठ आहोत म्हणजे आपण कुचकामी आहोत हा विचार आपल्या आत्मविश्वासावरच थेट आघात करतो. परिणामी न्यूनगंडाची भावना आपल्याला अंतर्बाह्य पोखरून टाकते आणि आपले व्यक्तित्व झाकोळले जाते. 
खरं म्हणजे आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच असतो हे निर्विवाद सत्य आहे. आपल्याला घडवणारे आपणच आणि  बिघडवणारेही आपणच असतो. वडील रोज दारू ढोसतात म्हणून तेवढेच योग्य समजून एक मुलगा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून दारुडा होतो आणि दुसरा या पित्यासारखं कसं व्हायचं नाही यासाठी अमाप प्रयत्न करून एक यशस्वी उद्योजक होतो. एकाच वातावरणात दोघेही वाढलेले पण दोघांच्या अंतर्मनात स्त्रवणारे विचार मात्र सर्वस्वी भिन्न!  आपल्या पुढील पाण्याचा ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे हे आपली त्याकडे बघायची दृष्टी ठरवत असते. आयुष्यातील आव्हानांना संकटं म्हणून घाबरायचे की यशाप्रत नेणारा खडतर मार्ग म्हणून त्यांना सामोरे जायचे ह्याकडे बघण्याचा दृष्टीकोन ज्याचा त्याचा वैयक्तिक असतो. आव्हाने पेलण्याची ताकद ही मनात असावी लागते आणि मन अशा आव्हानांकडे सकारात्मक दृष्टीने बघण्यास उद्युक्त व्हावे लागते. यासाठी योग्य ते ब्रेन प्रोग्रामिंग व्हावे लागते. 
शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तींकडे आपण आदराने बघतो, त्यांचे गुणगान करतो प्रसंगी त्यांचा हेवाही करतो. आपल्याला हे जमणार नाही अशी एक न्यूनत्वाची भावना त्यांच्याकडे बघताना आपण करून घेतलेली असते. परंतु हे यशाचे शिखर सर करताना त्यांनाही कैकदा प्रतिकूलतेशी झुंजावे लागलेले असते. समाजाचा रोष सहन करावा लागलेला असतो. कौटुंबिक निंदा सहन करावी लागलेली असते. वाटेत येणारे, थकवणारे, वाकवणारे धोंडे, काटेकुटे स्व-प्रयत्नांनी दूर सारावे लागलेले असतात.  यश हे कुणालाच सहजसाध्य नसते. प्रथम ते मिळवण्यासाठी आणि नंतर ते टिकवण्यासाठी खूप प्रयास करावे लागतात.  माउंट एव्हरेस्ट चढण्यासाठी तुम्ही ट्रेनिंग लाख घ्याल पण त्याआधी मनातील माउंट एव्हरेस्ट पादाक्रांत कराल की नाही? शिखर सर करण्यासाठी उपयोगी अवजारे जवळ आहेत पण मनातील सकारात्मक अवजार जर योग्य वेळी परजल गेलं नाही तर काय उपयोग? बाह्य लढाई जिंकण्याआधी ती लढाई मनातून जिंकणे अति-आवश्यक आहे. 
अनेक वेळा चुकीच्या ब्रेन प्रोग्रामिंगमुळे  आपण चांगली संधी गमावून बसतो. एक उच्चशिक्षित , चांगल्या स्वभावाचा तरुण मुलगी बघायला येतो. मुलीला मात्र काळी, बुटकी, नाकात गेलेली अशी अनेक लेबलं इतरांनी लावलेली असतात. कसं व्हायचं हिचं? हिच्याशी लग्न कोण करणार? असे प्रश्न ती घरच्यांच्या डोळ्यांत बघत आलेली असते. हीच नकारात्मक प्रतिमा ती सातत्याने स्वत:ला देत आलेली असते. वास्तविक पाहता ती अभ्यासात हुशार असते. चांगली शिकलेलीही असते परंतु तिच्या बाह्यरूपावरून इतरांनी तिला दिलेली प्रतिमा तिने स्वीकारल्यामुळे तिचा आत्मविश्वास हरवलेला असतो. तिच्या मनातील न्यूनगंडाची भावना प्रबळ होते आणि हा आलेला मुलगाही आपल्याकडे त्याच नजरेने बघेल या भीतीने ती बाहेर येत नाही आणि  आयुष्यातील एक संधी ती मनातून हरते. 
आपण स्वत:ला आनंदाच्या लहरींवर तरंगत ठेवायचं की दु:खाच्या खाईत लोटायचं हे ज्याचं त्याने ठरवावं. प्रत्येकाची स्वत:ची बलस्थानं असतात, कमतरता असतात. प्रयत्न असा झाला पाहिजे की तुमच्या उणीवा अग्रभागी राहणार नाहीत. आपल्या मनाचं सारथ्य आपल्याला कुशलतेने करता यायला हवं. नकारात्मक विचारांचे अवजड धोंडे प्रयत्नपूर्वक बाजूला सारून आपला रथ आपल्याला इप्सिताच्या दिशेने कूच करता यायला हवा. तेव्हाच अतिशय दुर्लभ असा मनुष्य जन्म अचूक ब्रेन प्रोग्रामिंगची कास धरून आपण निश्चितच सार्थकी लावू शकतो. 

Thursday 8 March 2012

'वूमन्स डे' च्या निमित्ताने.........

दरवर्षीप्रमाणे ८ मार्च हा दिवस येतो आणि काही मोजक्या विदुषी सन्मानित होताना आपल्याला दिसतात. तेवढ्यापुरता स्त्री-स्वातंत्र्याचा उदोउदो होतो आणि तो दिवस पालटताच पुन्हा जळी-स्थळी पुरुषप्रधान संस्कृती आपले हातपाय पसरू लागते. 

मुळात खरोखरी किती स्त्रियांना वैचारिक स्वातंत्र्य मिळते किंवा ते मिळवता येते ही एक संशोधनाचीच बाब आहे. आजही शहरी स्त्री काय किंवा ग्रामीण स्त्री काय आपल्या अस्मितेसाठी, आपल्या सन्मानार्थ दृढपणे उभी राहिलेली आपल्याला क्वचितच दिसते. अनेक स्त्रियांवर अनन्वित अत्याचार होतात, स्त्री-भ्रूणहत्या सर्रास केल्या जातात, मुलगा आणि मुलगी असा घृणास्पद भेदभाव त्यांना वाढवताना केला जातो, घटस्फोटित, बलात्कारित, परित्यक्ता, विधवा, आजन्म कुमारिका स्त्रीकडे अत्यंत आक्षेपार्ह नजरेने समाज बघतो. बोडकी, लाल आलवणातील स्त्री ही स्त्रीची बाह्य-प्रतिमा जरी आज लुप्त झालेली असली तरीही समाजाची अशा स्त्रियांकडे बघण्याची दृष्टी ही सदोष असते. 'स्त्री म्हणजे आपल्या पायाखालची वहाण' या पुरुषांच्या मानसिकतेला आव्हान देऊन अनेक स्त्रिया निर्भीडपणे  उभ्या राहिल्या आणि स्वत:चे वैचारिक अस्तित्व त्यांनी सिद्ध केले परंतु अशा स्त्रियांची टक्केवारी आजमितीला फारच कमी आहे ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. 
आपलं तान्हुलं पोर पाठुंगळीला घेऊन झाशीची राणी इंग्रजांवर स्वार झाली.संत मुक्ताईने तिच्या ओजस्वी वाणीने समाजोद्धार केला. अहिल्याबाई होळकरांनी समाजहिताचा विडा उचलून निपक्षपातीपणे राज्यकारभार केला.'There is only one man in the Parliament' असा अनोखा सन्मान भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा झाला. मदर तेरेसा यांची करूणामूर्ती अनेक पीडितांच्या जगण्याला अर्थ देऊन गेली. सातासमुद्रापार जाऊन आणि अत्यंत प्रतिकूल शिक्षण संपादन करून डॉ.आनंदीबाई जोशी यांनी तथाकथित समाजव्यवस्थेला जबरदस्त हादरा दिला. डॉक्टर आयडा स्कडर यांनी भारतात येऊन केलेले सामाजिक वैद्यकीय कार्य मानवतेला भूषणास्पद ठरले. नर्मदा आंदोलन श्रीमती मेधा पाटकर यांच्या कणखर आवाजात चोहीकडे दुमदुमले. कै.साधनाताई आमटे आणि डॉ. सौ.मंदाताई आमटे यांनी अनेक शोषितांच्या, पीडितांच्या, रोग्यांच्या मनात आशेची, चैतन्याची, आनंदाची पालवी निर्माण केली. श्रीमती लतादिदींनी आपल्या अतुलनीय आवाजाने कलाक्षेत्रात क्रांती आणली. श्रीमती पुष्पा शेणोलीकर यांनी स्त्रीपुरोहित म्हणून पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात लौकिक मिळवला.  कल्पना चावला यांनी थेट अंतराळात भरारी घेऊन स्वत:चे कर्तृत्व अमर केले. भारताचे राष्ट्रपतीपद भूषवणाऱ्या श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी पाऊणशे वयोमान असताना सुखोय भरारी मारून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. 
अशा कित्येक स्त्रियांची उदाहरणे आपल्यापुढे असूनही अनेक स्त्रिया वैचारिक प्रकाशापासून अजून सहस्त्र योजने दूर आहेत असे वाटते. अंधाराची सवय जडलेल्या स्त्रिया अधिक आहेत. पिता,नवरा आणि मुलगा ठेवेल तसे राहावे या मानसिकतेला शिकल्या-सावरलेल्या महिलाही छेद देऊ पाहत नाहीत ही मोठी शोचनीय बाब आहे. कौटुंबिक धुरा वाहायची स्त्रीने आणि कौटुंबिक निर्णय मात्र घ्यायचे पुरुषांनी हा फरक न समजण्या इतकी स्त्री अडाणी नाही. परंतु तिचे या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेला झुगारून देण्याचे धैर्य कुठेतरी निश्चितच कमी पडते आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आर्थिक सक्षमता सिद्ध करणारी स्त्री वैचारिक सक्षमता सिद्ध करण्यात थोडी मागे राहते असे मला प्रकर्षाने वाटते. 
स्त्री उच्चशिक्षित असो वा अल्पशिक्षित, उच्चस्तरीय असो वा निम्नस्तरीय , आर्थिकदृष्ट्या सबळ असो वा अल्पबळ आपल्या वैयक्तिक विकासासाठी तिने सतत प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. गाव असो वा शहर असो आपल्या सन्मानासाठी तिने झटणे गरजेचे आहे. स्त्री कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असो तिने विचार स्वातंत्र्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे.  कुटुंबासाठी अहोरात्र झटणाऱ्या स्त्रीला तिचा वैचारिक अधिकार अबाधित ठेवणे गरजेचे आहे. 
स्त्री स्वातंत्र्याचा उष:काल पहावयाची मनीषा बाळगणाऱ्या स्त्रीला परंपरेने दिलेला अंधार भेदण्यासाठी वैचारिक तलवार परजता आली पाहिजे.   




Tuesday 6 March 2012

पॉवर हंगर - एक मनोवैचित्र्य


पॉवर हंगर अर्थात शक्ती-क्षुधेचा प्रयोग करणारी माणसे ही फक्त राजकीय आणि सामाजिक बाजारपेठेतच नाहीत तर कुटुंबकारणातही  सक्रीय असतात. 'अटेन्शन सिकींग' हा हेतूही या सक्रीयतेत अभिप्रेत असू शकतो.आपल्याला लोकांनी महत्व द्यावं, येनकेनप्रकारेण आपला चारचौघांतील वावर सतत दृश्यमान व्हावा यास्तवकाही माणसे आपल्या 'कम्फर्ट झोन'च्या बाहेर जाऊन कार्यरत असतात. वास्तविक पाहता माणूस हासामाजिक प्राणी असल्याने समाजातील आपले अस्तित्व दुसऱ्याला जाणवून देण्याची त्याची इच्छा ही स्वाभाविक असते पण काही माणसे केवळ अटेन्शन सिकींगसाठी शक्ती-प्रदर्शनाचा अवलंब करतात. अशा माणसांचा हा 'पॉवर प्ले' त्यांच्या मनातील वैचित्र्याचा निदर्शक असतो.   
राजकारणात सक्रीय असलेल्या व्यक्ती ज्याप्रमाणे रस्तोरस्ती होर्डींग्ज लावून स्वत:ची छबी ( कर्तृत्व apart )  जनमानसात ठसवू पाहतात त्याचप्रमाणे कुटुंबकारणात सक्रीय असलेले ज्यात त्यात जबरदस्तीने डोकावू पाहतात. त्यांची ही सक्रियता सिनेमामध्ये दाखवल्या जाणाऱ्या एखाद्या क्षणिक जाहिरातीएवढीच महत्वाची असते. 'काम केले पाच पैशांचे आणि आव आणला पाच हजाराचा' असा यांचा बाणा असतो. परंतु कुटुंबातील लोकांची मानसिकता, त्यांच्या आवश्यकता, कमतरता  या गोष्टींचा त्यांचा अभ्यास पक्का असल्याने त्यांचं प्रतिबिंब यांना आरशात उतरवणं सोप्पं जातं. 
कधीतरी प्रसंगपरत्वे येणारा पाहुणाच यावासा वाटतो. त्याने यावे, काय असेल ते खावे-प्यावे, चार क्षण आनंदात घालवावेत एवढीच माफक अपेक्षा असते पण अनाहूतपणे येऊन घरच्या गोष्टींत नाक खुपसणारा पाहुणा मात्र परत न आला तर बरा असे वाटण्यास पात्र असतो. पॉवर म्हणजे शक्ती ही पूर्वी गोधन, अश्व-गज, सैन्य या रुपात मोजली जात असे आज ती पैसा, इस्टेट, गाड्या या रूपांत मोजली जाते. या भौतिक साधनांच्या बळावर 'पॉवरफुल' झालेली ही माणसे 'अटेन्शन सिकींग' साठी नवनवे खेळ खेळत राहतात.  
राजकारणात वैयक्तिक स्वार्थासाठी जसे पक्षांतर केले जाते त्याप्रमाणे या 'पॉवर हंग्री' व्यक्ती आपली सोय बघून 'ग्रुप्स' बदलतात. यांच्या 'नावडत्या' यादीत असणाऱ्या माणसांची नावे आता 'आवडत्या' यादीत नमूद केली जातात. ज्या माणसांकडे पूर्वी काही येणेजाणे नव्हते वा त्यांच्याशी तसे काही देणेघेणे नव्हते त्या माणसांसाठी ही माणसे आता सदैव उपलब्ध होऊ पाहतात.  आपल्याकडील आर्थिक  क्षमतेच्या बळावर ही माणसे आपली प्यादी कुटुंबपटावर पुढे पुढे सरकवत राहतात. एकेक नव्या कुटुंबाकडे कूच करत यांची राजकारणी घोडदौड चालू असते. नवीन राज्ये पादाक्रांत करायची असतात. नवे भिडू जिंकून मिळवायचे असतात. जुन्याच सरहद्दी नव्याने उल्लंघून जायच्या असतात. आकांक्षांचे नवे गड सर करायचे असतात.
पण हा सगळा खटाटोप फक्त स्वत:चे शक्तीप्रदर्शन करण्यासाठीच असतो. नाती हवी असतात पण ती स्वत:च्या 'श्री-शक्तीचा' जयजयकार करण्यासाठी! तुमचा आधारस्तंभ फक्त मीच आहे हा सुप्त अहंकार जपण्यासाठी! तुमच्या सेवेला मी तत्पर आहे असे वरकरणी भासवण्यासाठी! आपली वैचारिक अ-क्षमता झाकण्यासाठी!  
आपल्या या स्वभाव-वैचित्र्याला परोपकार असे गोंडस नाव देत स्वत:चीच पाठ थोपटून घेणाऱ्या या माणसांपासून सुज्ञांनी चार हात लांब राहणे हेच सर्वार्थाने श्रेयस्कर आहे. 




Monday 5 March 2012

बहिऱ्या आणि आंधळ्यांची आधुनिक दुनिया.....


'शास्त्र हे वरदान की शाप?' अशा विषयाचा एक निबंध आम्हाला शाळेत बहुतेक वेळा लिहिण्यासाठी यायचा. आमच्या बालमनांना शास्त्राला शाप का म्हणायचं हे कळत नव्हतं म्हणा किंवा त्याची प्रचीती आली नव्हती. आज मात्र पावलोपावली अशा  अत्याधुनिकतेचा साज चढवलेल्या या शास्त्राला 'शाप' असे म्हणण्याची पाळी अनेक लोकांनी आणली आहे. 
देशहितरक्षणार्थ वापरली जाणारी आयुधे समाजकंटक सामाजिक अस्थिरता निर्माण करण्यासाठी, एखाद्याला संपवण्यासाठी सर्रास वापरतात आणि हे शास्त्र सामान्यजनांसाठी तापदायक ठरते. तलवारी आणि पिस्तुलांची दहशत ही उघड असते पण आजकाल  'मोबाईल' नामक अस्त्राची छुपी दहशत निर्माण झाली आहे. अनेकदा आपण रिक्षात बसतो. रिक्षाचालकाचा मोबाईल वाजतो आणि माणसांच्या आणि वाहनांच्या जबरदस्त गर्दीतून रिक्षा हाकत हाकत त्याचं ते मोबाईलवरील अनावश्यक संभाषण आपल्याला जीव मुठीत धरून ऐकावं लागतं. जागोजागी रस्त्यांची कामे चालू असतात. ओव्हरहेड ब्रिजची बांधकामे चालू असतात. बऱ्याच ठिकाणी 'ट्राफिक पोलीस' नावाची चालतीबोलती संस्था दृष्टोत्पत्तीस पडत नाही. त्यामुळे वाहनांची एकमेकांच्या पुढे जाण्याची शर्यत लागलेली असते. या जीवघेण्या सर्कशीतून आपल्याला इच्छित स्थळी सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी त्या रिक्षाचालकाची असते. एखाद्या टर्निंगवर समोरून वाहन सुसाट वेगाने येत असतं. आपल्या मनात नाही नाही ते वाईट विचार येत राहतात. केवळ आपलं नशीब बलवत्तर असल्यामुळे 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' या म्हणीचा आपल्याला प्रत्यय येतो. रिक्षा चालवताना मोबाईलवर बोलणे हा गुन्हा आहे हे त्याला रिक्षेतून उतरताना सांगण्याचं धारिष्ट्य आपण करतो तेव्हा लगेचच तुम्हाला सहीसलामत पोहोचवलं ना मग खालीपिली कीटकीट करू नका  असा त्या रिक्षावाल्याचा उद्दाम शेरा ऐकावा लागतो. एकदा पुणे-मुंबई व्होल्व्होचा बसचालक सुद्धा बस सुटल्यापासून मोबाईलवर बोलत होता . अनेक वेळा मनात आले की त्याला सांगावे अरे बाबा तुला गप्पा मारायची इतकी लहर आली असेल तर बस थांबव आणि पोटभर बोलून घे पण आम्हा बस-प्रवाशांचा जीव असा टांगणीला लावू नकोस. पण मजा म्हणजे बसमधील इतर प्रवासी त्याच्या या मोबाईलसूक्ताला काहीच हरकत घेत नव्हते जणू काही आम्ही आमचा जीव तुझ्या हवाली केला आहे तेव्हा  तारायाचे असेल तर तार किंवा मार! 
आपण रस्त्यावर महानगरपालिकेने न बुजवलेले खड्डे चुकवत चालत असतो. रस्त्यावर लहान मुले, म्हातारेकोतारे, अपंग, आजारी असे अनेकजण चालत असतात. आपल्या समोरून वायुवेगाने एखादी बाईक येत असते. बाईकस्वार मोबाईलवर  बोलण्यात गुंग असतो. आजूबाजूच्या पादचारयांकडे त्याचे यत्किंचितही लक्ष नसते. तो मोबाईलवर हास्याचे फवारे उडवण्यात बिझी असतो. त्या बाईकखाली येता येता एक मुल कसेबसे वाचते. लोक गोळा होतात आणि  बाईकवाल्याची यथेच्छ धुलाई होते. त्याचा मोबाईल अध्याय तिथे तेवढ्यापुरता तरी संपतो. पण भविष्यात असे अपघात घडणारच नाहीत याची हमी कोण देऊ शकतं?  आपली काहीही चूक नसतानादेखील आपल्याला हे वाहनचालक अपघाताची शिक्षा देण्यास पूर्णपणे समर्थ असतात. शासन कितीही कायदे करुदे पण रस्त्यारस्त्यात, गल्लीबोळांत मोबाईलवर बोलत सुसाट वाहने हाकणाऱ्या ह्या बेजाबदार चालकांना पोलीस यंत्रणा कुठे पुरी पडू शकणार ? ही आधुनिकतेच्या आहारी जाऊन स्वेच्छेने बहिरी झालेली एक जमात आहे जी भविष्यातील अनेक अपघातांची जनक होऊ शकते. 
आजच पेपरात वाचलं की गुगल बाजारात असे काही भन्नाट गॉगल आणणार आहे की ते डोळ्यांवर चढवताक्षणी त्यावर अनेक गोष्टी दिसू लागतील. अचूक पत्ता शोधता येईल. गाणी ऐकता येतील. एक ना दोन! म्हणजे एक संकट कमी होतं म्हणून की काय त्याच्या जोडीला हे नवीन संकट येऊन ठाकले आहे. कानात इयरफोन्स, डोळ्यांवर गॉगल म्हणजे कान असून बहिरे नी डोळे असून आंधळे अशी अवस्था युवा पिढीची होणार नव्हे सर्वांचीच होणार. ही म्हणजे अपघाताच्या जगातील क्रांतीच असेल. रस्त्यावरून चालायची भीती, वाहनांत बसायची भीती अशी स्थिती सामान्य डोळसांची होणार. जर बहुसंख्य लोक स्व-इच्छेने बहिरे आणि आंधळे होणार असतील तर जे असे बहिरे नाहीत त्यांना आणि डोळसांनाच जागरूक राहावे लागणार आहे. 'रात्र वैऱ्याची आहे' हा वाक्प्रचार बदलून आता 'दिवस बहिऱ्या व आंधळ्यांचे आहेत' असा नवा वाक्प्रचार रूढ करावा लागणार आहे. मुलांनी परीक्षेला जाताना बहिऱ्या आणि आंधळ्या रिक्षाचालकांच्या रिक्षांत अथवा अशा लोकांच्या वाहनांत बसून प्रवास करू नये अशी एक कळकळीची सूचना इतर सूचनांच्याबरोबर द्यावी लागणार आहे. गॉगल लावलेल्या एखाद्या माणसाला समोरचं काही नीट दिसतंय का याची शहानिशा करावी लागेल. काही वेळा तर असंही वाटू शकेल की एकवेळ दारूची नशा परवडली पण ही अशी झिंग नको ज्यामुळे आपल्या जाणीवा तर हरपतीलच पण इतरांच्या जाणीवा शाबूत ठेवण्याचे भान आपल्याला राहणार नाही. 
शेवटी शास्त्र हे वरदान की शाप हे ज्याचं त्याने अनुभवांती ठरवावे आणि किमान तो शाप ठरणार नाही ह्याची वैयक्तिक खबरदारी घ्यावी.