Monday 27 February 2012

चमचा आणि काटा - एक संभाषण




चमचा : तुला नीट खंगाळलेलं दिसत नाही मालकानं.
काटा : एकदम इडीयट आहे तो. त्याला किचनमधल्या वस्तू जागच्या जागी ठेवता येत नाहीत आणि खरकटी भांडी नीट घासताही  येत नाहीत.
चमचा : अरे सवय कुठे आहे त्याला कामाची? ऑफिसमधून आला की फुल स्पीडवर पंखा सोडून त्याच्याखाली हाफ चड्डीत बसतो. पेपरची सगळी पाने उलटीपालटी करित वाचतो आणि बायकोने दिलेला आयता चहा फुर्र फुर्र करत ढोसतो.
काटा :   ए त्या बरण्या बघ कशा वेगळ्याच दिसताहेत. 
चमचा :  बरोबर आहे. कारण बरण्यांची जागा त्या बावळटाने बदलली आहे. चहाची बरणी त्याने साखरेच्या बरणीच्या जागी ठेवली आहे. मसाले आणि ड्रायफ्रुट्स च्या बरण्या त्याच्या कृपेने एकमेकांशी खो खो खेळत आहेत. 
काटा :   मघाशी त्याने बरण्या शोधून मूठभर बदाम-काजू मटकावले आणि बरण्या अस्ताव्यस्त पसरून ठेवल्या. दोन दिवस बायको माहेरी काय गेली की हे पुरुष लोक घराला नुसती अवकळा आणतात.
चमचा : खरं आहे. अरे काल तिच्या माहेरी जाण्यावरून दोघांचं वाजलं की! तिची आई आजारी म्हणून ही जायला निघाली तर हा पठ्ठ्या म्हणतो कसा, 'मग मला जेवण कोण देणार?' का रे तुला दोन हात दिलेत ना परमेश्वराने? मग त्याने काय आयुष्यभर अंगाच खाजवित राहणार? 
काटा :  अरे साधा चहा करता येत नाही त्याला. जेवण करतोय! आज सकाळी त्याने ग्यासवर रिकामं पातेलं ठेवलं आणि त्यात पाणी घालायलाच विसरला. पातेलं चरचरायला लागलं तेव्हा त्याने घाईघाईने त्यात पाणी ओतलं. एका कपाला चार चमचे साखर आणि अर्धा चमचा चहा पावडर टाकली आणि असा तो मिट्ट गोड चहा करून प्यायला. 
चमचा : हा घरी आला की घराची नुसती अडगळीची खोली होऊन जाते. पेपर, मासिके, laptop , ऑफिसची ब्याग, रुमाल, मोबाईल, ह्याचे कपडे, ओला टॉवेल जिकडेतिकडे विखुरलेले असतात. हा आवरायचे म्हणून नाव घेत नाही. बायको आहे ना दिमतीला! परत ह्याला वेळच्या वेळी खायला-प्यायला नीट हवे. नाहीतर आरडओरड ठरलेली.
काटा : नाहीतर काय. घरी आला की मोठ्ठ्याने टी.व्ही. लावतो आणि त्या खास वाहिन्यांवरील नटमोगरयांकडे डोळे फाडफाडून पाहत बसतो. लुब्रा मेला!
चमचा : अरे ह्याची बायको दिसायला काही कमी आहे का? पण तिला बिचारीला स्वत:ला आरशात बघायलाही वेळ मिळत नाही. सारखं आपलं हे आवर ते आवर. ह्याला चारी ठाव गिळायला दे. मशीनला कपडे लाव. धुतलेल्या कपड्यांच्या घड्या कर. ह्याचे कपडे इस्त्रीला दे. एक ना दोन. 
काटा : ह्याचे बँकेचे व्यवहार हिनेच करायचे. भाजी-वाणसामान हिनेच आणायचं. पै पै चा हिशेब ठेवायचा. सणवार-पाहुणेरावळे  सांभाळायचे. शिवाय चिंटूचा अभ्यास घ्यायचा. त्याला मार्क कमी पडले की हा लांब तोंड करून ओरडणार, 'अगं घरीच असतेस ना मग तुला एवढं सुद्धा जमत नाही का?' अरे ती माणूस आहे की ओझ्याचं गाढव?      
चमचा : अरे परवा किचनचा नळ गळत होता. मालकीण म्हणाली, अहो जरा प्लंबरला प्लीज फोन करा ना. तर हा लगेच म्हणतो कसा, हे बघ, ऑफिसशिवाय  मला काही माहित नाही. ह्या सगळ्या घरगुती गोष्टींत तूच लक्ष घालायला हवंस. वा रे वा!
काटा : ए ती कढई बघितलीस सिंकमध्ये टाकलेली?
चमचा : श्शी! केवढी काळी कळकट झाली आहे. 
काटा : ह्याचीच किमया. काल जाताना तिने भाजी करून ठेवली होती. ह्याला ती फक्त गरम करून घ्यायची होती. ह्याने कढईत भाजी काढून ती गरम करायला ठेवली. ह्याचे लक्ष दुसरीकडेच. शेवटी भाजी करपली. ती त्याने चपातीबरोबर कशीबशी गिळली आणि भाजीची कढई तशीच सिंकमध्ये टाकली. तीत पाणी सुद्धा घालायचे कष्ट घेतले नाहीत.
चमचा : एका दिवसातच घराचा भयंकर कायापालट झालाय. अजून पूर्ण एक दिवस बाकी आहे. 
काटा : त्या वॉशिंग मशिनच्या बाजूला पाण्याचं थारोळ कसं झालं?
चमचा : मालकाने मशीनमध्ये पाणी भरायला लावलं आणि टी.व्ही. बघत बसला. त्या नटव्यांना बघता बघता हा विसरून गेला आणि पाणी जमिनीवर सांडलं.
काटा : पण मी म्हणतो त्याने पुसून का घेतलं नाही लगेच?
चमचा : अरे वेळ कुठे आहे त्याला ? बायकोच्या अपरोक्ष पहायच्या गमतीजमती आत्ताच पाहणार ना? शिवाय अवतीभवती चिंटू असला की ह्याची गोची होते. 
काटा : त्या तिथे टेबलावर काहीतरी चिकट पडलंय बघ. 
चमचा : हो. साखरेसारखं दिसतंय आणि त्याला मुंग्या लागल्या आहेत.
काटा : देवा देवा! कधी अक्कल येणार ह्या माणसाला? घराची पार वाट लावलीय.
चमचा : आता उद्या मोहना येईल ना घरकामाला तेव्हा तिच्या कपाळावर सतराशे साठ आठ्यांच जाळ पडलेलं असेल. उद्या ती धुसफुसतच  काम करेल बघ.
काटा : पण आपण काय करणार? ती कढई बघून तिला नक्की झीट येणार. साहेबाला ती मनातल्या मनात शिव्यांची लाखोली वाहणार.
चमचा : अरे ते फ्रीजचं दार अर्धवट उघडं आहे की काय? 
काटा : हो की रे. मघाशी त्याने बायकोने करून ठेवलेले पुडिंग फ्रीजमधून काढून खाताना मी पाहिले.
चमचा : आता फ्रीज बंद कसा होणार?
काटा : आता उद्या ह्या घराचा नकाशा मोहनाच बदलू शकेल. आपण कशाला डोक्याला नसती झिगझिग करून घ्यायची ?  
चमचा : तुझं बरोबर आहे. आपण जरा उभ्याउभ्याने विश्रांती घेऊया. 

Sunday 26 February 2012

माझी बालमोहन शाळा

शिक्षणमहर्षी कै. दादासाहेब रेगे यांनी नावारूपाला आणलेल्या शाळेत माझे शिक्षण झाले. माझ्या सुदैवाने मला अतिशय उत्तम शिक्षक आणि शिक्षिका लाभल्या. माझ्या शाळेतले सांस्कृतिक वातावरणही खूप छान होते. माझ्या शाळेतील संजूचे उपाहारगृह तर वाखाणण्यासारखे होते. माझ्या शाळेच्या समोरील टपरीवर जिरागोळ्या विकणारा बुवा एक खास वल्ली होता. 
रोजची शाळा दुपारची असायची. फक्त शनिवारी सकाळची शाळा. त्यावेळी आम्ही सर्व विद्यार्थी कवायतीसाठी शिवाजीपार्क मैदानावर जात असू. शाळेत बहुतेक सर्व सण साजरे केले जात असत. बालदिन, मातृदिनाला दादासाहेब रेगे यांची खास भाषणे असायची. विशेषकरून मातृदिनाच्या दिवशी एका बुजुर्ग शिक्षिकेला व्यासपीठावर बोलावून सर्वांसमक्ष दादा त्यांना आई मानून त्यांच्या पायांवर लोटांगण घालायचे. आईचे आपल्या सर्वांच्या जीवनातील स्थान या विषयावर बोलताना दादा स्वत: अनेक वेळा सद्गदित व्हायचे. १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी चाचा नेहरुंचाही वाढदिवस असतो. नेहरूंविषयी सुद्धा दादा भरभरून बोलायचे. आम्हा मुलांना या दोन्ही दिवशी खाऊ वाटला जाई. संक्रांतीला ऊस आणि तिळगुळ. श्रावणी शुक्रवारी मुठभरून चणे. चैत्रात आंब्याची डाळ आणि कैरीचे पन्हे. उन्हाळ्यात कलिंगडाची मोठी फाक. ललितापंचमीला साखर-खोबऱ्याची खिरापत. हा नेम कधीच चुकला नाही. दहाव्वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास जेवण असायचे. दहीहंडीच्या दिवशी शाळेत बाल-गोपाळांची हंडी असायची.  भगवान श्रीकृष्णांची मोठी तसबीर ठेवेलेली असायची. स्वत: दादा कृष्णाच्या गोष्टी सांगायचे. दरवर्षी आमची सहल असायची. तळेगावला बालमोहनची दुसरी शाखा. तिथेही आमची सहल जायची. शाळेत वक्तृत्व स्पर्धा, नाटके, गाणी याचेही आयोजन होत असे. अधूनमधून आम्हाला माहितीपट दाखवत असत. आम्हा मुलांकडून देशभक्तीपर गीते म्हणून घेतली जात असत. मला आठवतंय एका वर्षी ज्येष्ठ संगीतकार कै.वसंत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली 'आमार शोनार बांगला' हे गीत  आम्हाला शिकवले होते. 
आमच्या शाळेला दोन मधल्या सुट्ट्या असायच्या. एक छोटी व एक मोठी. डबे आणणं हे तसं कंपल्सरीच होतं. पण मोठ्या वर्गात गेलो आणि संजूच canteen आम्हाला खुणावायला लागलं. इडली,वडा-सांबार, बटाटेवडा, चाऊ-म्याऊ ( चटणी-पाव ) ही त्याची खासियत. रविवारी शाळेत असलेल्या नाटकांच्या मध्यंतरात बटाटेवड्यांचा नुसता खमंग दरवळ सुटायचा. नाटकाचं आकर्षण होतंच परंतु बटाटेवड्यांच अंमळ जास्तच होतं. शाळेच्या मधल्या सुट्टीत किंवा शाळा सुटल्यावर बुवाच्या टपरीला भेट असायचीच. ओली हिरवीगार बडीशेप, गाभुळलेल्या चिंचा, लाल पेरू, जिरागोळ्या ही मुख्य अमिषे! बुवा आणि त्याची टपरी यात जास्त कळकट कोण हे सांगणं मुश्कील होतं. आम्ही मुले ज्यात त्यात हात घालायला बघायचो. बुवा आमच्यावर मोठ्याने खेकसायचा. आमचे व त्याचे रोजचे व्यवहार याच पद्धतीने चालत. त्याच्या ओरडण्याचे वैषम्य एकालाही वाटत नसे. शाळा सुटली आणि बुवा इतिहासजमा झाला. 
अनेक शिक्षकांनी आम्हाला शिकवलं आणि आमचं शैक्षणिक दालन समृद्ध व्हायला हातभार लावला. कालपरत्वे सर्व शिक्षकांची नावे आठवत नाहीत पण आमच्या चौबळ बाईंनी शिकवलेली मराठी भाषा आजही स्मरणात आहे. प्रत्येक धडा शिकवताना त्या त्या लेखकाची किंवा कवीची साद्यंत माहिती, लेखकाने धड्यातून मांडलेले विचार, काव्याचे रसग्रहण त्या इतक्या तन्मयतेने आणि इतक्या खुबीने शिकवायच्या की त्या त्या धड्याबद्दलच्या सर्व शंकांचा निचरा होऊन जायचा. 
विज्ञान शिकवायला पांगम बाई होत्या. त्याही उत्तम रीतीने शिकवायच्या. दाभोळकर सर संस्कृत शिकवायचे. इंग्रजीचे आपटे सर यांना आम्ही शशी कपूर ही उपाधी दिली होती. मराठे सर उत्तम गणित शिकवायचे. आमच्या वर्गाला माथुर बाई गणित शिकवायच्या. डेरे-भांडारकर अर्थशास्त्र शिकवायच्या. परुळेकर बाई इतिहास आणि हिंदी शिकवायच्या. अर्थात इयत्ता बदलल्या की शिक्षकही बदलत. देसाई बाई, वर्तक सर,पापल सर पी.टी. शिकवायचे. गायनासाठी जोगळेकर, पाटकर आणि जोशी मास्तर होते. मायाताई, विद्याताई चित्रकलेसाठी होत्या. जाधव बाई भूगोल शिकवायच्या. या व्यतिरिक्तही बऱ्याच शिक्षकांनी आम्हा सर्वांच्या शैक्षणिक कारकिर्दीत खूप मोलाचे योगदान दिले आहे. दादासाहेब रेग्यांच्या पश्चात बापूसाहेबांनी शाळेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. 
तेव्हा शाळेची फी अत्यल्प होती. शाळेत सण साजरे करताना मुलांना जो खाऊ वाटला जायचा त्यासाठी कधीही शाळेने वेगळे पैसे आकारले नाहीत. अंगभूत कलागुणांना शाळेतील शिक्षक नेहमीच प्रोत्साहन द्यायचे. माझ्या कवितांना चौबळ बाईचं बहुमोल मार्गदर्शन लाभलं होतं. राष्ट्रीय दिनाच्या अथवा सणांच्या निमित्ताने आम्हा मुलांच्या प्रभातफेऱ्या निघायच्या. मोठमोठे फलक हातात घेऊन घोषणा देत शिवाजीपार्कवरून आमची स्वारी परत शाळेत यायची. दसऱ्याला शाळा आणि वर्ग सुशोभित केले जायचे. तोरणे, रांगोळ्या यांनी वर्ग सजायचे. नंतर आम्ही सगळी मुले हॉलमध्ये जमायचो. दसऱ्यानिमित्त भाषण व्हायचे आणि गोडाचा आस्वाद घेत आम्ही घरी परतायचो. 
आज शाळा सोडून इतकी वर्षे झाली. काही आठवणी अजून तितक्याच ताज्या आहेत तर काही कालौघात पुसट झाल्या आहेत. पूर्वीच्या काळच्या पालकांना अगदी माफक पैशांत कोणत्याही बाहेरील क्लासेसचा आधार न घेता मुलांना उत्तम व दर्जेदार शिक्षण देता आले. आम्ही सुदैवी की आम्हाला अशी शाळा व असे शिक्षक लाभले. त्या काळी शिक्षणाचे बाजारीकरण झाले नसल्यामुळे शाळांचे 'मार्केट' धंदेवाईकांना उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळेच शिक्षणाच्या पाण्याचा प्रवाह हा नैसर्गिक आणि शुद्ध राहिला. त्यात गढूळ विचारांचे प्रवाह मिसळले नाहीत. परीक्षा आम्हीही दिल्या परंतु आमच्या शाळेने आम्हाला केवळ परीक्षार्थी केले नाही. शालेय परीक्षा हा संपूर्ण जीवनातील एक महत्वाचा टप्पा होता पण पावलापावलावर परीक्षा घेणाऱ्या जगाच्या विद्यापीठात आत्मविश्वासाने वावरण्याचे धडे आम्ही याच शाळेत गिरवले हे आज मी अभिमानाने सांगू शकते. 




'ब' बोले तो ...........


अ : घड्याळात किती वाजले? 
ब : माझ्या मनगटावरील घड्याळात तासकाटा आणि मिनिटकाटा रोमान्स करत आहेत.
अ : खानमंडळींची पडद्यावरील कहाणी कधी संपणार?
ब : कोलकत्याची 'कहानी' सुरु झाल्यावर. ( आमी शोत्ती बोलची )
अ : वरण कसं झालंय?
ब : युतीसारखं. दिसतंय तर एकत्र पण डाळीचा आणि वरच्या पाण्याचा काडीमोड झालाय असं बघणाऱ्याला वाटावं.
अ : हे हॉटेल कसं वाटतंय?
ब : इथे हाताच्या बोटांचा थर्मामीटर पाण्यात न रुतवणारे वेटर्स असतील असं वाटतंय.   
अ : राजकारण्यांच सामान्यांवर एवढं वजन का पडतं?
ब : खाऊन खाऊन वजन वाढणारच की!
अ : सगळ्यात उत्तम खेळ कोणता?
ब : धोबीपछाड .
अ : कुठल्याही एका पाळीव प्राण्याचे नाव सांग.
ब : पोलीस.
अ : रस्त्यावरचे खड्डे कधी भरले जाणार?
ब : नगरसेवकांचे  खिसे भरले की.
अ : सगळ्यात स्वस्त काय?
ब :  मरण.
अ : देशाला स्वातंत्य्र मिळून उपयोग काय झाला?
ब : १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीची सोय झाली.
अ : काय गहाण टाकणं सगळ्यात सोपं?
ब : बुद्धी.
अ : लग्नसमारंभातील आवडती गोष्ट कोणती?
ब : 'Presents in blessings only' हा लग्नपत्रिकेवरील संदेश.
अ : रेल्वेचे 'मेगाब्लॉक' प्रकरण कधी संपणार?
ब : सरकारने 'एन्जिओप्लास्टी' केली की.
अ : 'राग' हा शब्द ठाऊक नसलेला माणूस.
ब : मनमोहन सिंग 
अ : माणसातील परमेश्वर कोण?
ब : परमेश्वर गोदरेज
अ : 'स्थितप्रज्ञ' कोणाला म्हणावे?
ब : जो इतरांच्या समस्यांकडे सोयीस्कररित्या डोळेझाक करतो त्याला.
अ : दवाखान्याला पर्यायी शब्द कोणता?
ब : कत्तलखाना 
अ : सत्तेसाठी काय करावे लागते?
ब : मेतकुट 
अ : आंधळा कोणाला म्हणावे ?
ब : ज्याला रस्त्यावर चालताना खड्डे दिसत नाहीत, ज्याला रेल्वेची बंद पडलेली CVM कूपन्सची मशीन्स दिसत नाहीत, ज्याला महागाईशी झुंजताना आम पब्लिक दिसत नाही, ज्याला रिक्षावाल्यांचा मुजोरपणा दिसत नाही, ज्याला पाण्यासाठी मैलोनमैल अनवाणी पायांनी चालणाऱ्या ग्रामीण महिला दिसत नाहीत, ज्याला शेतकरी, विद्यार्थी, वैफल्यग्रस्त लोकांनी केलेल्या आत्महत्या दिसत नाहीत, ज्याला स्वजनांचे त्रस्त दैनंदिन जीवन दिसत नाही त्या प्रत्येकाला.  
अ : हुशार कोणाला म्हणावे?
ब : ज्याला आपला 'ढ' पणा 'en-cash' करता येतो त्याला . 
अ : खरा भक्त कोणाला म्हणावे?
ब : ज्याची भक्ती खोटी असून भक्तीचा देखावा खरा असतो त्याला.
अ : अर्जुनाइतके एकाग्र कोण?
ब : सगळेच राजकारणी. कारण त्यांना खुर्ची सोडून इतर काहीही दिसत नाही.
अ : पुणेरी बोली कशी तयार होते?
ब : अंबाडीच्या भाजीचा आंबट-हिरवटपणा अधिक आवळ्याचा तुरटपणा अधिक खोबऱ्याचा खवटपणा आणि मिऱ्याचा मिरमिरीतपणा मिळून. 
अ : गंगा नदीचे वैशिष्ट्य काय?
ब : ( खेदाने ) तिथे आंघोळ करून आलेल्या लोकांना 'त्वचारोगतज्ञाची' गरज भासते.
अ : पंजाबी आणि मद्रासी लोकांमध्ये काय फरक आहे?
ब : जो करीना कपूर आणि विद्या बालन मध्ये आहे तो. 
अ : साहित्य संमेलनांत काय बघायला मिळते?
ब : जे सर्कसमध्ये बघायला मिळते तेच.
अ : देवाला सोन्या-चांदीने लोक का मढवतात?
ब : कारण भक्तीची माणके हृदयात नसतात म्हणून.
अ : साडेसाती कोणकोणत्या प्रकारची असते?
ब :  विद्यार्थ्यांना परीक्षांची, सत्ताधाऱ्यांना विरोधकांची, प्रवाशांना वाहनांची, ज्योतिषांना अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांची,  आजाऱ्यांना डॉक्टरांची, पादचाऱ्यांना रस्त्यांची,  कंपनीचालकांना संपाची, सरकारला करबुडव्यांची, घटस्फोटीतांना कोर्टाची आणि देशाला देशद्रोह्यांची.
 

Thursday 23 February 2012

साध्या सोप्या गोष्टी

आपण आयुष्यात मोठ्ठ्या गोष्टी मिळवण्याच्या हव्यासापायी छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद गमावून बसतो. या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींमधून आपण स्वत:ला तसेच आपल्या माणसांना आनंदी राहण्याचा आणि आनंदाने जगण्याचा कानमंत्र  देऊ शकतो.

घराच्या बाल्कनीत पाण्याने भरलेला वाडगा ठेवल्यास पक्ष्यांना त्यांची तहान भागवता येईल. घर तळमजल्यावर असल्यास थोडा खाऊ आणि पाणी ठेवल्यास कुत्रीमांजरीही याचा लाभ घेऊ शकतील. 
वाढदिवसाला जाताना महागड्या गिफ्टऐवजी जर एखादे कुंडीतले हिरवेगार रोपटे दिले तर मनातील आनंदाचं झाड जपलं जाईल आणि पर्यावरणासाठी काहीतरी केल्याचे समाधान आपल्याला मिळेल. 
झाडांशी, मुक्या प्राण्यांशी संवाद साधलात तर तुमच्यातील ममतेचा अंश त्यांना मिळू शकेल. तुमच्या स्पर्शाने त्यांना संजीवन मिळू शकेल.
तुमच्या दरमहा पगारातील छोटा हिस्सा जर समाजातील दुर्बल घटकांसाठी तुम्ही देऊ केलात तर सामाजिक ऋणातून काही अंशी उतराई होण्याचा आनंद तुम्हाला लाभू शकेल. तसेच ही कृती तुमच्या मुलांसाठी एक उत्तम आदर्श ठरू शकेल. 
घरच्यांबरोबर अथवा मित्र-मैत्रिणींबरोबर सहलीला गेलात तर ज्या ठिकाणी तुमचा मुक्काम असेल ती जागा स्वछ्च राहील याविषयी दक्षता बाळगा. रिकामी सिगारेटची पाकिटे, दारूच्या बाटल्या, अन्नाचे रिकामे खोके, प्लास्टिकच्या पिशव्या इतस्तत: टाकणे कटाक्षाने टाळा.  
मुलांनी चूक केल्यावर जसे त्यांना रागावता त्याचप्रमाणे मुलांनी एखादी चांगली गोष्ट केल्यास त्यांना शाबासकी देण्यास विसरू नका. त्यांचे प्रश्न, त्यांच्या चिंता तुमच्यासाठी क्षुल्लक असल्या तरी त्यांच्यासाठी त्या मोठ्या असतात हे त्यांच्या भूमिकेतून समजून घ्यायचा प्रयत्न करा व त्यांना कमी लेखू नका. मतदान करण्याच्या वयाच्या मुलांची मते स्वत:च्या मोठेपणाचा फायदा घेऊन धुडकावून लावू नका तर त्यांच्या मतांचा, विचारांचा आदर करा. 
गृहिणी असलेल्या स्त्रियांची कामे अजिबातच कमी महत्वाची नसतात हे पक्के लक्षात ठेवा. सगळ्यांच्या आवडीनिवडीचा विचार करून नाश्ता-स्वयंपाक करणे, डबे भरणे, कपडे-भांडी-लादी करणाऱ्या बायांची मर्जी सांभाळणे, किराणा सामान भरणे,आजारी माणसाचे वेळेवर औषधपाणी करणे, वडीलधाऱ्यांना, मुलांना, नवऱ्याला काय हवे नको ते बघणे, आल्यागेल्याची सरबराई करणे, मुलांचे अभ्यास, घरातील सण-समारंभ उत्साहाने साजरे करणे ह्या जबाबदाऱ्या फक्त ऑफिस आणि घर अशी झापड लावून वारी करणाऱ्याला कळणे कठीण आहे तेव्हा किमानपक्षी ह्या गृहिणी ह्या क्षेत्रात आपल्यापेक्षा जास्त सक्षम आहेत ही भावना मनात सदैव असू द्यावी. तू घरीच तर असतेस असे कुत्सित शेरे मारण्याऐवजी तुझे काम प्रशंसेस पत्र आहे हे त्यांना आपल्या बोलण्यातून जाणवून द्यावे.
ड्राइव्ह करताना मोबाईलचा वापर कटाक्षाने टाळावा. आपल्या इतकेच इतरांचेही आयुष्य अनमोल आहे ह्याची जाणीव असू द्यावी. आपण रिक्षा, taxi अथवा बसमध्ये बसलो असताना वाहनचालक जर मोबाईलवर संभाषण करत असेल तर त्याला वेळीच त्याच्या चुकांची जाणीव करून द्यावी. नको तिथे मूग गिळून गप्प बसू नये.  
मुलांनी निवडलेला शिक्षणाचा पर्याय अगदी आपल्याला मान्य नसेल तरी नाकारू नये. त्यांनी हा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे की मित्र-मैत्रिणींच्या आग्रहाला बळी पडून घेतला आहे ह्याची खातरजमा केल्यानंतरच आपले मत मांडावे परंतु ते मत त्यांच्यावर लादण्याचा अट्टाहास करू नये. चांगल्या-वाईटाची जबाबदारी त्यांची त्यांना घेऊ द्यावी. आपला मुलगा किंवा मुलगी ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि तो किंवा ती म्हणजे आपला 'extended part' नाही ह्याचे भान असू द्यावे. 
घरातील वडीलधाऱ्यांचा आपण यथोचित आदर करावा आणि मुलांनाही करावयास शिकवावे. 'oldies', 'garbage' अशा विशेषणांनी त्यांना संबोधू नये. आपल्यालाही भविष्यात हीच वाट चोखाळायला लागणार आहे ह्याचे भान असू द्यावे. वडीलधारयांकडून चुका झाल्यास त्यांना चांगल्या पद्धतीने त्या समजावून द्यायचा प्रयत्न करावा. 
हलकी व कष्टाची कामे करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना तूछच लेखू नये. आया आणि नर्सेस शिवाय कोणताही डॉक्टर हॉस्पिटल चालवू शकणार नाही. गटारसफाई ,नालेसफाई करणारे, कचरेवाले, गाड्या धुणारे, mechanic, प्लंबर, electrician, हवालदार, कपडे-भांडी-लादी करणाऱ्या मोलकरणी याच्याशिवाय समाजाचे पानही हलणार नाही याची योग्य ती जाणीव असणे गरजेचे आहे.  
घरामध्ये एसी जरूर बसवावा  पण मुलांना मोकळ्या हवेचे महत्वही सांगावे. मुलांबरोबर परदेशाच्या सहली करा पण त्याचबरोबर भारतातील पर्यटनस्थळांचे महत्वही सांगा जेणेकरून आपल्या देशाविषयीही त्यांना तितकीच ओढ वाटेल. 
कोणत्याही सामाजिक नियमांचे उल्लंघन न करता उत्तम नागरिक होण्याचे आपले कर्तव्य चोख बजावा. 
डोळ्यांवर श्रीमंतीचे अतिक्रमण करणारे चित्रपट मुलांना दाखवत असाल तर देशासाठी, समाजासाठी स्वत:चे तन-मन-धन अर्पण करणाऱ्या समाजातील उत्तुंग व्यक्तींचीही ओळख त्यांना करून द्यायला विसरू नका.
विजेचा,पाण्याचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर कसोशीने टाळा. 
आपल्या गरजा सीमित ठेवा, राहणी साधी ठेवा, वृत्ती आनंदी आणि समाधानी ठेवा, आपले वर्तन परोपकारी, इतरांना शारीरिक आणि मानसिक इजा न पोहोचवणारे असे ठेवा. 
जसे रिकाम्या हाती आलो आहे तसेच एक दिवस रिकाम्या हाती जायचे आहे हे सत्य अधोरेखित करा. पैशाने शिगोशिग भरलेली आपली झोळी इथेच राहणार आहे परंतु आपल्या चांगल्या किंवा वाईट कर्मांनी भरलेली झोळी मात्र आपल्या बरोबरच येणार आहे याची खात्री असू द्या. 


'प्रकाश'वाटांनी उजळलेला 'लोकबिरादरी प्रकल्प'


समाजसेवेचे एव्हरेस्ट सर केलेले महायोगी कै. बाबा आमटे,त्यांना सावलीसारखी साथ करणाऱ्या कै.साधनाताई आमटे आणि त्यांचे व्रत पुढे तितक्याच निष्ठेने सुरु ठेवणारे डॉ.प्रकाश आमटे, डॉ.सौ.मंदाताई आमटे आणि त्यांचे कुटुंबीय  हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर अवघ्या जगाचेच भूषण आहेत. 
१९७३ साली पुढाकार घेऊन कै.बाबांनी 'लोकबिरादरी प्रकल्प' स्थापन केला. या भागात राहणारे 'माडिया गोंड ' नावाचे आदिवासी सगळ्याच मानवी सुविधांपासून वंचित होते. साप,उंदीर,माकडे, मुंग्या या व्यतिरिक्त अन्न म्हणून काही असू शकते याविषयी ते पूर्णतया अनभिज्ञ होते. अठरा विश्वे दारिद्र्य पाचवीला पुजलेले! संभाषणकला अवगत नाही. शेती करता येत नाही. शिक्षणाचा गंध नाही. अनेक रोगांनी ग्रासलेले शरीर. अशा माडिया जमातीच्या विकासासाठी  डॉ.प्रकाश आमटे यांनी अक्षरश: जीव अंथरला. 
घनदाट अरण्याने वेढलेल्या गडचिरोली जिह्यातील आणि भामरागड तालुक्यातील हेमलकसा ह्या भागात हा प्रकल्प आहे. अरण्यात हिंस्त्र श्वापदे आहेत. मैलोनमैल जंगल तुडवीत जावे तेव्हा कुठे गावातील माणसांचे दर्शन होते. दळणवळणाच्या  कोणत्याही सोयी नाहीत. अशा ठिकाणी डॉ.प्रकाश आमटे त्यांच्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन गेली तीस एक वर्षे त्या दुर्गम भागातील आदिवासींची तसेच अनाथ वन्य प्राण्यांची सेवा करत आहेत. रुग्णालय आहे पण अद्ययावत वैद्यकीय सुविधा नाहीत, शाळा आहे परंतु शाळेसाठी लागणाऱ्या उत्तम सुविधा नाहीत, प्राण्यांचे अनाथालय आहे पण पैशांचा तुटवडा. असे असले तरीही कार्य जोमाने सुरु, उत्साहाला खीळ नाही, चेहऱ्यावरचे मृदू हास्यही अबाधित. दोन पायांच्या मनुष्यप्राण्यापेक्षा चार पायांच्या मुक्या जनावरांवर जास्त लोभ आणि विश्वास. आजारी आणि जखमी आदिवासींची शुश्रुषा करण्यासाठी हात सदैव तत्पर!  
श्री.विलास मनोहरांच्या 'नेगल' या पुस्तकामुळे हेमलकसातील अनाथालय ओळखीचे झाले. अस्वल, मगर, सिंह, वाघ, घोरपड, साप यांसारखे प्राणी सुद्धा लळा लावतात हे नव्याने कळले. नेगलचे आणि आरतीचे मित्रत्वाचे नातेही समजले. या सर्व अनाथ आणि मुक्या प्राण्यांना डॉ.प्रकाश सारखा पिता आणि डॉ.सौ.मंदाताई सारखी माता मिळाली. प्राण्यांच्या सुखदु:खाचा उलगडा झाला. हिंस्त्रपणे वागणारी माणसे आणि मायेने वागणारे प्राणी हा विरोधाभास प्रकर्षाने जाणवत राहिला. 
इथे जातपात,उच्चनीच,गरीब-श्रीमंत या संकल्पना नाहीत. धर्म,पंथ यांचा उहापोह नाही.प्रामाणिकपणे,सचोटीने मनुष्य-प्राण्यांची अहोरात्र सेवा करणे हाच येथील खरा धर्म आहे. नैसर्गिक आपत्ती येतात. पूर येतात. कधी जीवघेणी थंडी तर कधी असह्य उकाडा. परंतु या कश्याकश्याचाही सेवाकार्यावर परिणाम होत नाही. डॉ.प्रकाश आमटे याची पुढची पिढीसुद्धा त्यांच्याच व्रताचा वारसा त्याच निष्ठेने पुढे नेत आहे. दिगंत आणि अनिकेत यांनी याच कार्याला ईश्वर मानलं आहे. त्यांच्या विचारातील आधुनिकता त्यांना शाळा, रुग्णालय यांच्या सुसज्ज्यतेसाठी अमलात आणायची आहे. प्रकाश आमटे यांचे अनेक सहकारी उत्तम रीतीने या प्रकल्पासाठी आपले महत्वपूर्ण योगदान देत आहेत. तिथल्या शाळेत शिकून डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक वा इतर व्यावसायिक शिक्षण घेतलेल्यांना आजन्म त्याच परिसरात राहून कार्य करायचे आहे. माणसाच्या श्रमाचे मोल प्रेमात करणारी माणसे तिथे आहेत.  कोणतीही शहरी प्रलोभने यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करायला असमर्थ आहेत. शिक्षकांना शिक्षणाचा प्रसार करायचा आहे, डॉक्टरांना रुग्णांवर वैद्यकीय उपचार करून त्यांना अंधश्रद्धांतील फोलपणा पटवून द्यायचा आहे, मुक्या वन्य प्राण्यांची सेवा करून येथील आदिवासींची आणि प्राण्यांची या सेवाभावींना नव्याने गाठ घालून द्यायची आहे. आदिवासींचे आरोग्यसंवर्धन करायचे आहे. कुपोषित बालकांची समस्या सोडवायची आहे. प्राण्यांसाठी मुबलक अन्न उपलब्ध करून द्यायचे आहे. त्यांना ममतेचे बाळकडू पाजायचे आहे.    
शाळेतील मुलांच्या चेहऱ्यावर फुललेले आत्मविश्वासपूर्ण हास्य, रुग्णालयातून बरे होऊन घरी जाताना रुग्णांनी साश्रूनयनांनी कृतज्ञतापूर्वक दिलेली दुवा आणि मुक्या प्राण्यांच्या स्पर्शातून वाहणारी ममता हेच येथील सर्वांसाठी सर्वोच्च पुरस्कार आहेत.
शहरी भागांच्या आधुनिकीकरणाने दिपलेल्या आणि साऱ्या सुख-सुविधांच्या आधारे स्वर्ग शोधू पाहणाऱ्या शहरातील तरुण पिढीला या ' प्रकाशवाटा' आदर्श ठराव्यात आणि त्यांच्या पायाखालच्या वाटा अशा प्रेरणांनी उजळून निघाव्यात एवढीच इच्छा आहे.  



Wednesday 22 February 2012

ऋण (negative) विचारांचा कचरा ........

ज्याप्रमाणे थेंबाथेंबातून समुद्र निर्माण होतो आणि मातीच्या कणाकणातून जमीन तयार होते तद्वत विचारांच्या आवर्तनांच्या प्रक्रियेतून माणूस घडत असतो. विचारांचे वर्गीकरण मूलत: धन(positive) व ऋण(negative) असे होते. प्रत्येक माणसाची विचारप्रक्रिया ( thinking process) ही निराळी व स्वतंत्र अशीच असते. एखाद्याची विचार करण्याची पद्धत ही रक्तातून आलेली (inherited) किंवा परिस्थितीजन्य (circumstantial) असू शकते. शाळेत जरी फलकांवर सु-विचार लिहिलेले असले तरी फारच कमी शाळा मुलांना विचार कसा करावा याबद्दल योग्य मार्गदर्शन करतात असे खेदाने म्हणावे लागते. मानवी मनाची ग्रहणक्षमता ही टीपकागदाची असते. 'हुशार' असे लेबल लागलेल्या मुलांची विचारसरणी ही 'ढ' असे लेबल लागलेल्या मुलांच्या विचारसरणीपेक्षा निश्चित भिन्न असते. 'बावळट' असा शिक्का बसलेल्या मुलाची देहबोली (body language) तशीच असते. 'रडूबाई' असे बिरूद मिळालेल्या मुलीचा चेहरा तीच प्रतिमा प्रोजेक्ट करतो.  'बिनधास्त' असा लौकिक मिळवणारी मुलगी तिच्या देहबोलीतून जाणवत राहते. याचे कारण इतर लोकांनी त्यांच्याबद्दल केलेले विशिष्ट विचार त्यांनी तसेच्या तसे स्वीकारलेले असतात. 
ऋण विचार मानवी मन झटकन स्वीकारते. एखाद्या परीक्षेत 'नापास' झालेला मुलगा मित्र-मैत्रिणींना आपल्याबद्दल काय वाटेल, बाबांच्या पुढे प्रगतीपुस्तक ठेवल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होईल या विचारांनी खचून जातो. तो आत्मपरीक्षणाची मुभाही स्वत:ला देत नाही. एखाद-दुसरं गणित सोडवता आलं नाही म्हणून काही एखादा मुलगा 'टाकाऊ' या सदरात मोडत नाही. दोन्ही हात नसलेला मुलगा पायाच्या बोटांच्या साहाय्याने लिहिण्याची उणीव भरून काढू शकतो, चित्रे रेखाटू शकतो, रांगोळ्या काढू शकतो. एखादा उंचीने खुजा म्हणून हिणवला गेलेला मुलगा आपल्या आत्म-विश्वासाच्या बळावर एव्हरेस्ट सर करू शकतो. तू काय आयुष्यात स्वयंपाक करू शकणार असा शेरा मिळालेली एखादी स्त्री त्या प्रतिमेत न अडकता आपल्या कमतरतेवर मात करून एखादे हॉटेल चालवू शकते. घरोघरी पेपर टाकणारा एखादा मुलगा स्वत:ला तेवढ्याच वर्तुळात सिमित न ठेवता स्वप्रयत्नाने राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचू शकतो. 'व्यवहारशून्य' असा शिक्का बसलेला एखादा आपल्या या कमजोरीला अभ्यासू वृत्तीने आपले बलस्थान करू शकतो. 'काकूबाई' असे उपहासपूर्ण बोल आपल्या ऑफिसच्या सहकाऱ्यांकडून नित्यनेमाने सहन करणारी एखादी स्त्री आपल्या विचारांचा 'मेक-ओव्हर' करून त्यांना आश्चर्यचकित करू शकते. 
पण सर्वसाधारण माणसे ही ऋण विचारांचे कार्बन मनात साठवत स्वत:च्या प्रतिमेला त्यावर गिरवत जातात. आपण आळशी आहोत, अशक्त आहोत, अभ्यासात सुमार आहोत, अरसिक आहोत, दिसायला बावळट आहोत, गबाळे आहोत अशी ऋण-विशेषणे आपल्या मनावर आदळतात आणि आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतात. मित्रांशी क्रिकेट खेळताना फिल्डिंग मध्ये झालेली आपली छोटीशी चूक आपल्याला गुन्हा वाटू लागते, प्रगतीपुस्तक हातात घेताना शिक्षक आपल्याला हसताहेत असे वाटू लागते, मुली आपल्याशी बोलत नाहीत याचे एकमेव कारण म्हणजे आपण आकर्षक नाही हे मनात बिंबले जाते. ऋण विचारांचा कचरा मनात साठत राहतो आणि विचार बिघडण्याची प्रक्रिया सुरु होते.
होम-मेकर' असलेली स्त्री दिवस-रात्र सासरच्यांच्या दिमतीला असते. ती कमावती नाही हे सासरच्यांच्या वागणुकीतून अनेकवेळा अधोरेखित होत असते. दिवसभर तर तू घरीच असतेस, काय करतेस काय? हे नवरोबांचे खोचक वाक्य तिच्या कानावर कैकवेळा पडलेले असते. तिचे आर्थिक दृष्ट्या नवऱ्यावर अवलंबून असणे तिच्या प्रतिमेला अपकारक ठरते. आपण घरी आहोत म्हणजे आपण काही कामाच्या नाही असे समीकरण ती इतरांकडून तिच्याही नकळत स्वीकारते. तिची विचारसरणी, तिची मानसिकता तिला या दुष्टचक्रातून बाहेर काढू शकत नाही आणि तिने साठवलेला हा ऋण विचारांचा कचरा एखाद्या शारीरिक दुखण्यातून आपले डोके वर काढतो.    
कचरा हा टाकाऊ,त्याज्य भाग असतो. तो योग्य वेळेस विसर्जित केला नाही अथवा त्याची विल्हेवाट लावली नाही तर इतस्तत: रोगराई पसरू शकते त्याचप्रमाणे हा नैराश्यपूर्ण, ऋण विचारांचा मनातील कचरा वेळीच बाहेर टाकला गेला नाही तर त्याचे भेसूर रूप आपले आयुष्य नासवून टाकते. मी काय करू शकत नाही यापेक्षा मी काय करू शकतो यावर विचारमंथन होणे गरजेचे असते. आपल्या कमतरतेला विचारांच्या सहाणेवर पुन्हा पुन्हा उगाळण्यापेक्षा आपल्या बलस्थानांकडे लक्ष पुरवणे जास्त गरजेचे आणि श्रेयस्कर असते. इतरांच्या गुणांची टक्केवारी पाहून खट्टू होण्यापेक्षा आपल्या गुणांची टक्केवारी कशी वाढेल यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक असते. मी अमकीसारखी का नाही असे वाटून निराश होण्यापेक्षा आपली ओळख आपण स्वत:ला पटवून देण्यात यशस्वी झालो पाहिजे. विचारांच्या उंचीने मानसिक खुजेपणावर आपल्याला मात करता आली पाहिजे. आपल्या मनाच्या आरशात आपल्याला आपले रूप उजवे वाटले पाहिजे. कोणतेही वर्गीकरण, भेदाभेद, गंड, स्पर्धा यांपलीकडे जाऊन आपल्याला स्वत:ला पाहता आले पाहिजे. 
 बुद्धी ही एक अशी गोष्ट निसर्गाने मानवाला बहाल केली आहे की जिच्या सुयोग्य वापराने त्याला स्वत:च्या आयुष्यात नंदनवन फुलवता येईल. सुबुद्धी ही मानवाला धन विचारांप्रत नेईल तर कुबुद्धी किंवा दुर्बुद्धी त्याला ऋण विचारांप्रत नेईल. आपल्या मनातील विचारांचे पुस्तक उघडून ऋण विचारांची पाने ज्याक्षणी माणसाला सहजगत्या उलटता येतील त्याक्षणी पानापानागणिक धन विचारांचे संचित त्याच्या आयुष्यात वसंत आणेल.   




 

Monday 20 February 2012

'करावके (Karaoke) म्युझिक सिस्टीम' विषयी थोडेसे ............

आजकाल संगीत ही काही मूठभर लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही हे जरी कितीही खरे असले तरी एखादे गाणे नक्की कशा प्रकारे गावे याचे मार्गदर्शन जाणकार गुरूच करू शकतो. आजकाल जो तो आपापले गाण्याचे कौशल्य आजमावत असतो. यात वाईट काहीच नाही परंतु आपले गाणे आपल्याच कानाला सर्वप्रथम गोड लागायला हवे, अपील व्हायला हवे. आपल्या गाण्यातील त्रुटी आपल्याच कानाला प्रथम खटकायला हव्यात. हौसेखातर बरेच संगीतप्रेमी करावके सिस्टीम घेतात पण इथे एक गोष्ट मला नम्रपणे नमूद करावीशी वाटते की आपल्या गाण्याचा अंदाज मात्र यावरून बांधणे जरा धाडसाचेच आहे.  
करावके सिस्टीममध्ये प्रामुख्याने हिंदी तसेच मराठी आणि इतर प्रादेशिक गाणी समाविष्ट केलेली असतात. प्रत्येक गाण्याला एक विशिष्ट कोड नंबर असतो. हा कोड नंबर तुम्ही फीड करताच टी.व्हिच्या स्क्रीनवर  त्या गाण्याचे शब्द येतात. पार्श्वसंगीत सुरु होते आणि ते संपताच तुम्हाला माईकवर गाणे सुरु करायचे असते. एकेका ओळीतील एकेक शब्द जसजसा 'हायलाईट' होतो त्याबरहुकुम तुम्हाला गाणे गायचे असते. कडव्यांमध्येही पार्श्वसंगीत असते. ह्यातील बहुतांश गाणी अनेकदा ऐकलेली असल्यामुळे माहितीची असतात. तुम्ही जसेच्या तसे गाण्याचा प्रयत्न करता. ह्यातील तांत्रिक बाबीत तुम्ही तुमचे गाणे बसवलेत की तुमचा स्कोर साधारण शंभर पैकी पंचाण्णव ते शंभर असा येऊ शकतो. तुम्ही मनोमन हरखून जाता. आपण गाणे उत्तम गाऊ शकतो असा समज निर्माण होतो जो बऱ्याच वेळेस बरोबर नसतो.   
या सिस्टीममधील गाण्याचे 'tracks' हे ओरीजनल गाण्यावरूनच तयार केले असल्याने गाण्याची पट्टी फार उंच असते. ती बऱ्याचदा आपल्या गळ्याला पेलवणारी नसते. तरीही आपण त्याच पट्टीत गायचा प्रयत्न करतो. पण अशा उंच आणि गळ्याला न मानवणाऱ्या पट्टीतून गायल्याने गळा खराब होऊ शकतो. काही मंडळी जी केवळ हौसेखातर अशा पद्धतीने  गाणी गाऊ पाहतात त्यांनीही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तुम्ही गाणे सुरात गायलात की बेसूर गायलात याचे गुणविश्लेषण ( evaluation) ही सिस्टीम देऊ शकत नाही. तुमचा शंभर पैकी शंभर हा स्कोर हा फक्त तांत्रिक मुद्द्याला धरून असतो. अशा पद्धतीने गाणारयाचा 'टेक्निकल आस्पेक्ट' एकवेळ पक्का होऊ शकतो परंतु त्याची सुराची कच्ची बाजू या सिस्टीमवर गाऊन सुधारू शकत नाही.

प्रत्येक माणसाचा आवाज निसर्गत: वेगळा असतो. काहीजण उंच पट्टीतून सहज गाऊ शकतात तर काहींचा आवाज अजिबात चढत नाही. आपण आपल्या गळ्याला पेलवणाऱ्या पट्टीतून गायलो तरच आपले गाणे चांगले होऊ शकते अन्यथा ती एक फक्त कसरत होते. ज्याची सुराची बाजू पक्की आहे आणि जो उंच पट्टीतून गाऊ शकतो अशांसाठी ही सिस्टीम लाभदायक आहे. पण मी सुद्धा इतर गायकांप्रमाणे 'परफॉर्म' करू शकतो अशा 'attitude' ने जे गाऊन दाखवतात त्यांचे गाणे केविलवाणे वाटते. 
गाण्यातील शब्दफेक, आवाजातील चढउतार, भावना या गोष्टींचे गुणावलोकन ह्या सिस्टीममध्ये नसते. त्यामुळे तुम्हीच तुमचे 'critic' झाला नाहीत तर तुम्ही गायलेले गाणे आणि त्या गाण्याचा स्क्रीनवर दिसणारा उत्तम स्कोर यातील तफावत तुम्हाला दिसू शकणार नाही. सूर, ताल, शब्दफेक, भावना आणि सादरीकरण यांच्या सुयोग्य समन्वयातून उत्तम गाणे जन्माला येत असते. यांतील कोणतीही एक बाजू कमी पडली तरी गाणे लंगडे होते, खुजे होते. न पेलवणाऱ्या पट्टीतून खोटा आवाज काढून गायल्यास आवाजात सशक्तपणा येत नाही, बरेच वेळा आवाज चिरकतो, फुटतो. कणसूर गायल्यास ऐकणारा जाणकार असेल तर त्याला ते अपील होत नाही. 

एखादं गाणं आपल्या गळ्याला पेलवणाऱ्या पट्टीत असेल तर ते सादर करण्याचा जरूर प्रयत्न करावा. पण त्याआधी ते गाणं खूप वेळा अभ्यासपूर्वक ऐकावं. आपल्या गाण्याकडे डोळसपणे, प्रामाणिकपणे बघण्याचा प्रयत्न करावा. गाण्यातील त्रुटी सुधारण्याचा प्रयत्न करावा. आपल्या कानांना उत्तम सुरांची सवय लावावी. गाणे गायल्यानंतरही त्याचे मूल्यमापन करायला आपण कचरू नये. संगीतातील 'गुरु' ह्या पर्यायाचा आपण जरूर विचार करावा आणि त्याच्या आधाराने आपला संगीतविषयक दृष्टीकोन आपण प्रगल्भ करावा. 

Friday 17 February 2012

श्वानसंवाद


ब्रुनो :  काय रे पीटर, काल काय मिळालं?  
पीटर :  बिर्याणी आणि कटलेट्स.
ब्रुनो :  भाग्यवान आहेस लेका. ती अकरा नंबरवाली भलतीच फिदा दिसतेय तुझ्यावर.
पीटर : अरे नवऱ्याचा तुसडा आणि कळकट चेहरा आणि ते त्याचं शाहरुख खानसारखं तोतरं बोलणं 
             ऐकून  ती सॉलिड कंटाळली आहे. परवाच फोनवर कुठल्यातरी मैत्रिणीला सांगत होती.
             ह्याच्यापेक्षा माझा पीटर बरा असंही पुढे म्हणाली. 
ब्रुनो :  ग्रेट गोइंग.  पमी आली नाही अजून. मॉर्निंग वॉक संपला नाही वाटतं तिचा!
पीटर : का एवढा अस्वस्थ होतोस? तुला शंका आहे की ती ब्राउनी बरोबर गेली आहे. Am I right?
ब्रुनो :  म्हणून नाही. ती माझ्यासाठी पिझ्झा आणणार होती. 
पीटर : यार हल्ली तू त्या स्कोडाखाली का झोपत नाहीस? किती ऐसपैस जागा असते तिथे.
ब्रुनो : अरे यार तो स्कोडाचा मालक उपद्रवी आहे. माझी शेपटी दिसली रे दिसली की मला लाथ 
          मारायला बघतो  जणू काय मी त्याची सासरयाकडून ढापलेली स्कोडा पळवून नेणार आहे. 
पमी : हाय फ्रेंड्स. मी आले. 
ब्रुनो : तुझा भप्पी लाहिरीच्या साईजचा देह मला दिसणार नाही असं तुला का वाटतं ?
पमी : ब्रुनो, माझ्या स्थूलपणाची चेष्टा केलेली मला चालणार नाही. Henceforth I shall not tolerate.
ब्रुनो : ब्राउनीने शिकवलं वाटतं बोलायला?
पीटर : तुमची वादावादी पुरे झाली आता. ही बघा सिंड्रेला पण आली.  
सिंड्रेला : हाय एव्हरीबडी. 
पीटर :  हे तुझ्या हातात काय आहे?

सिंड्रेला : अरे रस्त्यावरची चार-पाच मोठी पत्रकं आणली आहेत. जाहिरातदार पत्रके वाटतात. लोक एकतर त्यांना केराची टोपली तरी दाखवतात किंवा बाहेर फेकून देतात. मी विचार केला की ही आपण फूड प्लेट म्हणून वापरावी. 
ब्रुनो :     आयडिया चांगली आहे पण फूड कुठे आहे? 
पमी :    अरे प्लेट आली आहे ना आता फूड पण येईल. Just waw.
ब्रुनो :    म्हणजे ?
पमी :    अरे म्हणजे wait and watch. हल्ली सगळं काही थोडक्यात बोललं किंवा सांगितलं जात नाही का?
पीटर :    ए, ती बघा सतरा नंबरवाली येते आहे. एव्हरीबडी टेक पोझिशन.
सिंड्रेला :  काल पार्टी झालेली दिसतेय घरी. केक, वेफर्स म्हणजे नक्कीच कुणाचा तरी वाढदिवस असणार. 
ब्रुनो :      आधी जिभा साफ करा. मग अंदाज बांधा. जाम भूक लागली आहे. 
पमी :      ए केक, वेफर्स आणि पिझ्झा मस्त होता. आपली तर पार्टीच झाली. 
पीटर :    काल मागच्या गल्लीत सॉलिड राडा झाला. बाहेरची कुत्री येऊन attitude देत होती.
ब्रुनो :     मग लुई, विल्सन आणि विकीने इंगा दाखवला की नाही?
पीटर :    दाखवला रे. पण अशी नेहमीच बाहेरची कुत्री यायला लागली तर आपल्यासारख्या स्थानिक 
                      कुत्र्यांनी कुठे जायचं?
ब्रुनो :      डरु नको यार. मी डेव्हिड भाईशी बोलतो. 
सिंड्रेला : उद्या पाच नंबर गल्लीत 'मिस लेन' ही स्पर्धा आहे. मी पार्टीसिपेट  करते आहे. तू येणार आहेस का पमी?
ब्रुनो :     ही काय 'सुदृढ श्वान' स्पर्धा आहे का पमीने भाग घ्यायला? 
पमी :     आता जर तू मला एकदाही कुत्सित बोललास तर तुझं त्या अमिना बरोबरचं लफडं सगळ्यांना सांगीन.
सिंड्रेला : ए मला सांग ना?  
पमी :     सांगू?
ब्रुनो :      सॉरी. पण प्लीज कोणाला काही सांगू नकोस माझे बाई. 
पीटर :    ही अमिनाची काय भानगड आहे रे? तुझ्या गळ्यावर, छातीवर त्या मार लागल्याच्या खुणा आहेत  त्या  नक्की कसल्या?
ब्रुनो :     तुला नसत्या उचापती काय करायच्या आहेत? 
सिंड्रेला : त्या अमिनाच्या मागे केवढी कुत्री लागतात ! पण मला काही ती तेवढी सेक्सी वाटत नाही हं! 
पीटर :    हम पाच मधल्या विद्या बालनला पाहून तिच्यात  कोणाला 'सिल्क मटेरीअल' आहे असं वाटलं होतं का?
ब्रुनो :     तुम्ही कशाला नसते वाद घालताय? आम्ही येऊ हं स्पर्धा बघायला. काय रे पीटर?
पीटर :   नक्की.
सिंड्रेला : पण लक्ष भलतीकडे ठेवू नका म्हणजे झालं. नाहीतर परत मार खायला लागेल. 
ब्रुनो :     टोमणे मारणं बंद कर आणि उद्याच्या तयारीला लाग. 
डेव्हिड :   हलो एव्हरीबडी. काय चाललंय?
पीटर :     काही नाही भाई. तुम्ही इथे कसे काय?

ब्रुनो :      ( पीटरच्या कानात) अरे मूर्खा, निवडणुका जवळ आल्या आहेत.

पीटर :     ओह , सॉरी भाई. आमच्यासाठी काय काम आहे ?

डेव्हिड :   प्रचार करायचा आहे. घोषणा तयार करायच्या आहेत. जाहीरनामा लिहायचा आहे. पत्रके वाटायची आहेत.

ब्रुनो :      भाई, पत्रके कशाला? ती एकतर केराच्या टोपलीत तरी जातात किंवा ( सिंड्रेलाकडे बघत) फूड प्लेट म्हणून वापरली जातात.
पीटर :    हो भाई. उगाच खर्च कशाला? आम्ही भुंकून भुंकून सगळीकडे चांगला प्रचार करू. एकही एरिया सोडणार नाही. 
ब्रुनो :     भाई, ती गोरेगावची टोळी प्रचारासाठी बोलवायची का?
डेव्हिड :  नको. त्यांच्या डिमांड्स फार आहेत. त्यापेक्षा आपण विरार-भाईंदरवाल्यांना बोलवूया. शिवाय ते टगेगिरी करण्यातही हुशार आहेत. त्यामुळे टोनीच्या टोळीला वचक बसेल.
पीटर : ठीक आहे. पण सगळ्यांच्या पोटा-पाण्याचं काय? 
पमी :  अरे, जेनिफर कधी उपयोगी पडणार मग? तिलाच देऊ आपण सगळ्यांच्या खाण्याचं contract. 
डेव्हिड : ठीक आहे. पण तुमचे लक्ष असू द्या. कोणी नाखूष राहायला नको. काय? नाहीतर ऐन वेळेला माझी पंचाईत करतील. 
सिंड्रेला : मग ठरलं तर सगळं एकदाचं. चला आता कामाला लागूया.
डेव्हिड : चला मी निघतो. मला जागावाटपाचा घोळ अजून निस्तरायचा आहे. 
ब्रुनो, पीटर, पमी व सिंड्रेला : आम्ही पण येतो. 



Wednesday 15 February 2012

Bhimbetka Rock Shelters

Bhimbetka is an archaeological site located in Raisen district in Madhya Pradesh. The Bhimbetka shelters exhibit the earliest traces of human life in India. 
Bhimbetka remained a center of human activity from the lower Paleolithic times. Some of the Stone age rock paintings found among the Bhimbetka rock shelters are approximately 12,000 years old. The name Bhimbetka is associated with Bhima in great Indian epic Mahabharata, a hero-deity renowned for his immense strength. The word Bhimbetka is said to have derived from 'the siting place of Bhima'. 


The rock shelters of Bhimbetka are 45 km south of Bhopal at the southern age of the Vindhyachal  hills. The entire area is covered by thick vegetation, has abundant natural resources in its perennial water supplies, natural shelters and rich forest flora & fauna.


Dr.Vishnu.S.Wakankar visited this area first with the team of archaeologists & discovered several pre-historic shelters in 1957. Of the nearly 750 rock shelters, 500 or so are adorned with paintings & about 15 are open to public. Due to the site's relative remoteness & lack of public transportation, few people come to visit this place. The area is surrounded by the trees of Teak & Sal.
The rock shelters & caves of Bhimbetka have a number of interesting paintings which depict the lives & times of people who lived in caves. The paintings include the scenes of childbirth, hunting, riding, warfare,communal dancing & drinking, religious ceremonies & burials. Other scenes usually depict music, animal fighting, honey collection, daily life, decoration of bodies & household scenes. Animals depicted include elephants, bisons, deers, sambhars, horses, peacocks & snakes. The mineral colours used are red, green, ochre & white & are still remarkably vibrant.
The superimposition of paintings show that the same canvas was used by different people at different times. 


I have created a slideshow on Bhimbetka Rock shelters. Kindly copy-paste the following link in the address bar & watch the slideshow :
http://www.kizoa.com/slideshow/d2316042k5180765o1/bhimbetka-rock-shelters

Monday 13 February 2012

का रे भुललासी वरलिया रंगा?

एखाद्याने चेहऱ्याला वरून मेक-अप फासला म्हणून काही तो अभिनयसम्राट  होऊ शकत नाही. तंबोरयाची पोझ घेऊन बसलेला माणूस जोपर्यंत तोंड उघडत नाही तोपर्यंत कदाचित मी महान गायक आहे असा आभास निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकतो. जातिवंत चित्रकाराची भाषा रंगाचा कुंचला आणि canvas आपापसात बोलके झाल्यावरच कळू शकते. वाघाचे कातडे पांघरले म्हणून वाघाची शूरता अंगी बाणता येत नाही. धनराशीत लोळणारयाला मखमली पलंगावर पडून झोपेचे सोंग वठवता येऊ शकते पण निद्रादेवीचे आणि त्याचे नाते घट्ट असेलच असे सांगता येऊ शकत नाही. बर्फीवरील चांदीचा वर्ख बघून बर्फीचा दर्जा ठरवता येत नाही. गुलाबाची कृत्रिम फुले घरातील फुलदाणी नक्की सजवू शकतात परंतु मनातील फुलदाणीला भावणारा सुवास निर्माण करू शकत नाहीत.
आजकाल माणसे एखाद्या वस्तूच्या अथवा व्यक्तीच्या बाह्यरुपावर चटकन भाळताना दिसतात. एखाद्याच्या रूपावरून, आर्थिक कुवतीवरून, सामाजिक प्रतिष्ठेवरून त्याचे मूल्यमापन केले जाते जे नेहमीच अचूक असू शकत नाही. व्यक्तीची आर्थिक क्षमता ही त्या व्यक्तीची बौद्धिक, वैचारिक पातळी मोजण्याची फुटपट्टी असू शकत नाही. फुगा जोपर्यंत फुगलेला असतो तोपर्यंतच तो आकर्षक वाटतो कारण त्याच्यातील आकर्षकता ही फक्त बाह्यरूपाने फुगण्यातच दृश्यमान होत असते. दही किती घट्ट लागले आहे हे समजण्यासाठी आपल्याला बरणीचे बंद झाकण उघडून बघायचे कष्ट घ्यावेच लागतात. वरकरणी सुंदर असलेली एखादी वास्तू आतून भकास,उदास, उजाड असू शकते. बाहेरून आधुनिक दिसणाऱ्या फ्रीजमधील थंड पाण्यापेक्षा बाहेरून ओबडधोबड दिसणाऱ्या माठातील पाणी शरीराला जास्त उपकारक ठरू शकते. आकर्षक वेष्टनात गुंडाळलेली एखादी वस्तू कदाचित शोभिवंत असू शकेल पण उपयोगी असेलच असे नाही. 
पुलंनी आपल्या एका पुस्तकात वसंतराव देशपांडे यांच्याविषयी लिहिले आहे की वसंताचे गायक म्हणून खरे सामर्थ्य दोन तंबोऱ्यांच्यामध्ये तो बसल्यानंतरच जाणवायचे. त्यावेळी एखादा राग आळवताना वसंता कुणीतरी वेगळाच होऊन जायचा. त्याची ती मूर्ती देव्हाऱ्यातील देवासारखी पूज्य वाटायची. रात्री मैफिल गाजवून सकाळी जेव्हा वसंता त्याच्या सायकलवर टांग मारून कारकुनी करायला निघायचा तेव्हा वाटायचे की काल जो गायला तो हाच होता का?  ज्या इमाने-इतबारे तो गायला त्याच इमाने-इतबारे त्याने नोकरीही केली. मी कोणीतरी मोठ्ठा गायक अशा भ्रमात तो कधी वावरला नाही आणि मी ऑफिसमध्ये जाऊन कारकुनी करतो ह्या जाणीवेने तो कधी शरमिंदा झाला नाही. तो आपले प्रत्येक काम सर्वस्व ओतून करायचा. श्रेष्ठता-कनिष्ठता या वर्गीकरणाला त्याच्या मनात कधी स्थान मिळाले नाही आणि म्हणूनच त्याच्यातील माणुसकीचे सत्व त्याला एक दर्जा बहाल करून गेले जो आमच्यातील मैत्रीचा एक दुवा होता.  
एखादी व्यक्ती सकृतदर्शनी  कशी दिसते, कशी भासते यावर अंदाज बांधणारे बहुतांश असतात. गरीब-श्रीमंत, चांगली-वाईट, उच्च-नीच अशी सगळी नामाभिधाने लावण्यासाठी सोपी असतात. त्यासाठी माणसांना विशेष कष्ट पडत नाहीत पण एखाद्याच्या अंतरंगात सुहृद होऊन डोकावणे हे सहजसोपे नसते. त्यासाठी लागणारा निखळ मैत्रीचा हात हा मनात कोणत्याही वर्गवाऱ्या कोणतीही किल्मिषे, कोणतेही पूर्वग्रह न ठेवता पुढे करावा लागतो.  विहिरीचा तळ शोधायचा असेल तर काठावर उभे राहून चालत नाही त्यासाठी खोल पाण्यात निधडेपणाने उडी घ्यावी लागते.  
आकाशात फुललेलं इंद्रधनुष्य सहज पाहता येतं पण माणसाच्या मनात फुललेलं इंद्रधनुष्य पाहायला प्रगल्भ दृष्टी लागते जी ह्या लौकिक गोष्टींच्या पलीकडील असते. देवाच्या मूर्तीला सोन्या-चांदीने मढविणारे पुष्कळ असतात पण मनातील भक्तीभावाचा अभिषेक करणारे क्वचितच सापडतात. कोणताही देव हा पैसे किंवा अलंकार याचा भुकेलेला नसून तो फक्त भावाचा भुकेलेला असतो हे समजण्यासाठी संत-साहित्य वाचायचे कष्ट माणसाला घ्यावे लागतात. जात-पात,वर्गवारी,उच्च-नीचता,आर्थिक भेदाभेद यांपलीकडे एखाद्याला समजून घेण्याची मानसिकता अभावानेच आढळते.  
माणसाकडे असलेली घर,बंगला,गाडी,ऐवज,स्थावर जंगम ही भौतिक सुखे पाहून दिपणारेच अधिक असतात. परंपरागत हक्काने आलेले अथवा माणसाने कमावलेले हे धन माणसाला वरपांगी ऐश्वर्य बहाल करू शकते पण मनाने ऐश्वर्यसंपन्न  असणारी माणसे ही येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरक ठरतात. पूज्य बाबा आमटे, मदर तेरेसा यांसारख्या विभूती जेव्हा या पृथ्वीतलावर जन्म घेतात तेव्हा त्यांच्या ऐश्वर्यसंपन्न विचारांमुळे, आचारांमुळे अनेकांना संजीवनी मिळते, त्यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो.  
आज माणूस दोन हात आणि दोन पायांनी जगातील सारी भौतिक सुखे ओरबाडू पाहतो आहे. पैशांनी माणसे विकत घेण्याची किमया त्याला साधली आहे. लोकांना आपल्यापुढे नमविण्याचे कसब त्याला बऱ्यापैकी अवगत झाले आहे. अनेक तात्कालिक आणि नाशवंत गोष्टींच्या आधारे गगनाला गवसणी घालण्यासाठी त्याचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. आपल्या मूल स्वरूपावर त्याने अहंमन्यतेची, व्यापारी वृत्तीची पुटे चढवली आहेत आणि आपल्या अंतर्यामी वसत असलेल्या त्या ईशस्वरूपाचा त्याला पूर्णत: विसर पडत चालला आहे.  
एका गावात असलेल्या देवळात महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना दुग्धाभिषेक करण्यासाठी अनेक धनिकांची चढाओढ  लागली होती. सोन्या-चांदीच्या मोठ्या लोट्यांतून हे धनिक गाभाऱ्यातील पिंडीवर अभिषेक करत होते पण काही केल्या गाभारा भरत नव्हता. या रांगेमध्ये असलेल्या गोर-गरिबांकडे हे श्रीमंत अतिशय तुच्छतेने बघत होते. एक जख्खड म्हातारी या रांगेत कशीबशी उभी होती. तिच्याकडे एका फुटक्या पेल्यात जेमतेम दूध  होते. बऱ्याच वेळानंतर तिची पाळी आली. तिने देवाला भक्तिभावाने हात जोडले आणि म्हणाली,' घरी अन्नान्नदशा आहे. एकुलत्या एका गायीने दिलेल थोडं दूध उपाशी असलेल्या नातवाला पाजलं आणि उरलंसुरलं दूध घेऊन तुझ्याकडे आले आहे पण रागावू नकोस. आमच्यावर कृपा कर.' असे म्हणून तिने ते दूध पिंडीवर ओतले आणि अहो आश्चर्यम! गाभारा पूर्ण भरला. हा चमत्कार पाहून लोक तिच्या पायी पडू लागले.  राजाकरवी तिचा सन्मान केला गेला आणि या कुटुंबाच्या चरितार्थाची काळजी मिटली. 
या खुलभर दुधाच्या कहाणीचा आज लोकांना सोयीस्कररित्या विसर पडला आहे याचे वैषम्य वाटते.

Saturday 11 February 2012

Just be yourself

I remember, a few days ago when actress Vidya Balan was being interviewed. Admiring her talent, the interviewer commented that there is nobody like Vidya Balan. Vidya instantly replied, 'but why anybody should be like Vidya Balan'? Nobody on the earth is just like you ; so be yourself.' I think this is a great message.
It is very easy to get influenced by others but it is difficult to get influenced by our inner thoughts. Most of the people behave in the way the others behave.We often get influenced by our near & dear ones, people surrounding us, superiors & celebrities we adore. To get impressed by a heroic personality is not at all an offense but to frame ourselves in others lifestyle is not worth appreciating.
Just because some salesman knocks at our door, are we going to buy the product just to increase his sales? Certainly not. Only when we are fully convinced about the utility of that product we shall think of buying it. A person smokes & drinks because his friends do so can not justify his vice. Just by aping others you are putting your body at a high risk. If your father is a doctor, it is not necessary for you to follow his footsteps unless & until your inner voice allows you to proceed on the same path. 
The way we think others can't. Our inspirations are different from others. Our liking & disliking differentiate ourselves from others. Some students have a great inclination towards Maths & Science while some students develop hatred towards these subjects. Some are much better in Social studies than others. You can't measure everyone's caliber using the same scale. Some are very sharp at musical notes while some can sketch with more fluency. Some are admirably good at kitchen work while some are efficient in handling external affairs. Animals behave through their instincts and we people fail to listen to our instincts. The natural force that exists inside us gets hardly any motivation. 
Because of peer, parental and/or social pressure many youngsters opt for demanding professional courses. Sometimes the calculations go wrong & frustration takes over you. Many of us do not take any efforts to explore ourselves. We have a treasure of things inside us but we always do the things at superficial level. To reach a desired goal it is essential for us to touch our instincts. 
The moss gathered over water is the external tinge & not the real colour of water. If we wish to see the real colour of water we should take efforts to dive deep. We always give undue importance to shallow things which give our lives a fake colour. 
Some of us follow certain customs, traditions just because others follow them. Most of the times it seems as if we have deliberately blindfolded our eyes.  Nobody wants to understand the exact reason for performing or following a particular act. We are just concerned with the outcome hoping that it works out smoothly. 
As a human being we have a privilege to think in a better way. To shape our lives in the way we wish. To design our lives for our betterment. To raise our lives in such a way that every aspect of our life grows brighter & brighter. To make our lives more meaningful. To accomplish the unfulfilled desires. To nourish & enrich our soul. To satisfy our existence on earth. To give our-self  the feeling of contentment. 
Your life is only & solely yours. Your existence on the earth is a reward.  Try to respect your life & put some efforts to uplift yourselves. Please do not embellish your spirit with artificial things that will snatch away from you the whole purpose of life. 


Thursday 9 February 2012

थ्री चिअर्स फॉर युसुफ and प्रिया-'valentine' डे च्या निमित्ताने

युसुफ खान आणि प्रिया गोडबोले. दोघांची ओळख ऑफिसच्या निमित्ताने व्ही.टीला जाताना झालेली. ठराविक लोकल पकडताना दोघांची नजरानजर व्हायची. तो जेन्ट्स मध्ये आणि ती लेडीजच्या डब्यात! हळूहळू एकमेकांकडे बघताना चेहऱ्यावर हास्य दिसू लागले. तिची नोकरी नवीन होती. एकदा मोबाईलवर बोलत असताना ती चालत चालत platformच्या टोकाशी गेली. समोरून भरधाव लोकल येत होती. आणि क्षणार्धात ती खसकन मागे ओढली गेली. युसुफने जीवाच्या आकांताने तिला ओढले होते. परत असे करशील तर तुझा मोबाईल तुला परत मिळणार नाही अशी प्रेमाची धमकीही तिला मिळाली. या घटनेनंतर तिच्या मनात युसुफविषयी ओढ निर्माण झाली आणि त्याची परिणती दोघांच्या एकमेकांवरील प्रेमात झाली. 
आता ऑफिस व्यतिरिक्तही दोघे एकमेकांना भेटू लागले. एकमेकांना जाणून घ्यायचा प्रयत्न करू लागले. आपले प्रेम धर्मबाह्य असल्याने आपल्याला घरच्यांकडून संमती मिळणार नाही हे दोघे समजून होते. युसुफ एका चांगल्या कंपनीत वरच्या हुद्द्यावर नोकरीला होता. घरून परवानगी मिळणारच नव्हती त्यामुळे लग्न झाल्यानंतर राहायचे कुठे हा त्यांच्यापुढील यक्षप्रश्न होता. अखेर युसुफने त्याच्या अगदी जवळच्या मित्रांशी याबाबत सल्ला-मसलत केली आणि गृहकर्ज काढून नवे घर घेण्याचे निश्चित केले. नवे घर होईपर्यंत त्यांनी कटाक्षाने त्यांच्या प्रेमाची जाहीर वाच्यता करायचे टाळले. जानेवारी महिन्यात घराचा ताबा मिळाला. आवश्यक ते सुशोभीकरण झाले आणि १४ फेब्रुवारीला कोर्टात जाऊन विवाह नोंदणी करण्याचे ठरले. आता घरी सांगणे भागच होते.
अपेक्षेप्रमाणेच दोघांच्याही घरून या लग्नाला कडवा विरोध झाला. ती कोकणस्थ ब्राह्मण तर तो उच्चभ्रू मुसलमान. नातेवाईक, शेजारीपाजारी,समाज काय म्हणेल या भीतीने आणि धर्मांतराच्या संभाव्य धोक्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला या लग्नापासून परावृत्त करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. त्याच्या आईने तर हिंदू सून मी माझ्या घरात येऊ देणार नाही असे निक्षून सांगितले. पण दोघेही आपापल्या निर्णयावर ठाम होते. अखेर काही मित्र-मैत्रिणींच्या साक्षीने १४ फेब्रुवारी रोजी युसुफ आणि प्रिया विवाहबंधनात बांधले गेले. त्यांचा त्यांच्या नवीन घरात प्रवेश झाला. आता त्यांच्या या नव्या विश्वात ते फक्त एकमेकांसाठी होते. 
लग्नानंतर नोकरी आणि घर अशी दुहेरी जबाबदारी प्रिया सांभाळू लागली. दोघांचे ऑफिस अवर्स जवळजवळ सारखेच होते. घरकामात युसुफही प्रियाला मदत करू लागला. ती कट्टर ब्राह्मण असल्यामुळे तिच्या घरी कधीही अंडेही शिजले नव्हते. युसुफ अट्टल मांसाहारी. एकदा प्रियाने युसुफला खुश करण्यासाठी अंड्याचे आमलेट करायचे ठरवले. तिने रेसिपी बघून घेतली. अंडे फोडून तव्यावर टाकले आणि त्या वासाने ती बाथरूम कडे धावली. त्या दिवसापासून युसुफने मांसाहार वर्ज केला. प्रियाने नमाज आणि रोज्याचे महत्व युसूफकडून समजावून घेतले. त्याला तोडकेमोडके मराठी येत होते पण तिच्या सान्निध्यात राहून तो बऱ्यापैकी मराठी बोलायला शिकला. दिवाळी आणि ईद असे दोन्ही सण त्याच्या घरात साजरे होऊ लागले. 
एकमेकांच्या आवडीनिवडी जपत त्यांचा संसार फुलू लागला. कोणत्याही अप्रिय विषयावर चर्चा करण्याचे दोघे टाळत. त्या दोघांचे जवळचे मित्र आणि मैत्रिणी सोडून त्यांच्या घरात इतर कुणीही फिरकले नव्हते. त्या दोघांच्या घरच्यांनी त्यांना जवळजवळ बहिष्कृत केले होते. एकदा तिची आई आजारी आहे असे तिच्या कानावर आल्यामुळे चिंतीत होऊन ती तिच्या आईला भेटायला गेली परंतु तिच्या तोंडावरच घराचा दरवाजा बंद केला गेला. ती घरी येऊन खूप रडली. युसुफनेही घरची खुशाली समजून घेण्यासाठी घरी एक-दोनदा फोन केला होता पण त्याच्या  घरच्यांनी त्याच्याशी संभाषण करण्याचे टाळले. घरच्यांना दुखावल्याचे शल्य दोघांच्याही मनात होते पण त्यांचाही नाईलाज होता.  
म्हणता म्हणता त्यांच्या लग्नाला पाच वर्षे झाली आणि प्रियाला गोड चाहूल लागली. दोघेही हरखून गेले. बाळाची स्वप्ने रंगवू लागले. दिवस जसजसे भरत आले तसा प्रियाने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. एव्हाना त्यांचे कर्जही फिटत आले होते. युसुफ प्रियाला काही कमी पडू देत नव्हता. तिचे सगळे डोहाळे तोच पुरवत होता. तिला काय हवे काय नको यात तो जातीने लक्ष घालत होता. तिच्या वाट्याला जास्तीत जास्त आनंदाचे क्षण यावे यासाठी प्रयत्नशील होता. अधूनमधून मित्रमंडळी येऊन त्या दोघांची आस्थेने वास्तपुस्त करत होती. त्यांच्या घरच्यांनाही बाळाच्या आगमनाची बातमी या दोघांच्या मित्रांकरवी कळली होती परंतु दोघांच्याही घरून साधी चौकशी करायलाही कुणी फिरकले नाही. अखेर बाळाचे आगमन झाले. प्रियुल असे त्याचे नामकरण झाले. आई-बाबांचे बोट धरून प्रियुलची वाटचाल सुरु झाली. त्याला इतर नातेवाईक मंडळींचे कधीच दर्शन झाले नाही. आई-बाबा हेच त्याचे चिमुकले विश्व होते. 
दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्षे गेली. प्रियुल पाच वर्षांचा होणार होता.. प्रियुलचा वाढदिवस आणि त्यांच्या लग्नाचा दहाव्वा वाढदिवस एकदम साजरा करण्याचे ठरले. मित्र-मैत्रिणींना आमंत्रणे केली गेली. प्रियुलचे लहानगे मित्रही येणार होते. युसुफ आणि प्रियाच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांच्यासाठी सरप्राईज गिफ्टचे आयोजन केले होते. सगळे घर रंगीबेरंगी फुगे आणि माळांनी भरून गेले. जेवणाचा खास बेत आखला होता. भला मोठ्ठा केक टेबलावर प्रसंगाची शोभा वाढवत होता. पाहुणे यायला सुरवात झाली. घर गजबजून गेले. हास्याची कारंजी उडू लागली. केक कापायची वेळ झाली आणि लहानगा प्रियुल केक कापण्यासाठी पोझ घेऊन उभा राहिला. एवढ्यात प्रिया आणि युसुफला अनपेक्षित धक्का बसला. त्या दोघांचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. समोर खान आणि गोडबोले कुटुंबीय हसतमुखाने हजर होते. प्रियाने इतक्या वर्षांच्या साचलेल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. ही अपरिचित मंडळी बघून प्रियुल प्रथम बावरून गेला पण मग त्यांची ओळख पटताच तितक्याच जोशात त्यांच्याशी मस्ती करू लागला. घराला खऱ्या अर्थाने घरपण आले. इतक्या वर्षांचा हरवलेला आनंद मनमुराद लुटण्याचा जो तो प्रयत्न करू लागला. ती विरहाची, दु:खद जाणिवांची मधली वर्षे आनंदकल्लोळात विरघळून गेली. युसुफ आणि प्रियाच्या मित्र-मैत्रिणींच्या अथक परिश्रमांना शेवटी यश मिळालं. खान आणि गोडबोले कुटुंबियाची भेट त्यांनी घडवून आणली आणि एकमेकांविषयीच्या गैरसमजाचे मळभ पुसले गेले. 
खरंच काय लागतं हो विवाह यशस्वी होण्यासाठी? फक्त एकमेकांवरील अतूट विश्वास आणि निरपेक्ष प्रेम. काही मोजक्या कपड्यांनिशी प्रियाने घर सोडलं तर युसुफनेही तेच केलं. पैसाअडका किंवा तिचे स्त्रीधनही तिने बरोबर घेतले नाही.  वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाची शिदोरीसुद्धा त्यांच्या नशिबात नव्हती. कुठलाही परंपरागत सोहळा नाही की हौसमौज नाही. तरीही त्यांचं लग्न यशवी झालं.  
लौकिकार्थाने किंवा वरकरणी अनेक लग्ने यशस्वी झाल्याचे आपल्याला वाटत असते. कारण गृहछिद्रे झाकण्याचे कसब अनेकांना अवगत असते. संसार होतात. नवरा-बायकोची, आई-वडिलांची कर्तव्ये पार पडली जातात. पण अशा संसारात राम असतोच असे नाही. अनेक वर्षे एकत्र राहूनही नवरा-बायकोचे चेहरे एकमेकांसाठी अनोळखीच असतात. मानसिक तादात्म्य साधले जात नाही. 
दाम मोजून घर खरेदी नक्की करता येऊ शकतं पण घरातील परस्परांचे सुख अबाधित ठेवणारी प्रेम नावाची गोष्ट जगातील कोणत्याही दुकानात उपलब्ध होऊ शकत नाही. तिची देवाणघेवाण ही भौतिक सुखा पलीकडची असते. अशा प्रेमाची जाणीव हा उत्तम मनुष्यत्वाचा सहज स्त्रोत असतो. अशा प्रेमाला कोणत्याही जातीपातींच्या, उच्च-नीचतेच्या,गरीब-श्रीमंतीच्या तराजूत तोलता येत नाही. पैसा व प्रतिष्ठा हे प्रेमाचे समीकरण होऊ शकत नाही. 
आणि म्हणूनच या 'valentine' डे च्या निमित्ताने अशा अनेक भावी युसुफ आणि प्रियासाठी आपण शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सारासार विचारशक्तीसाठी प्रार्थना करूया.